Category Archives: सिंधुदुर्ग

विशेष गाडीचा सावंतवाडी स्थानकावरील थांबा हटवला; प्रवाशांमध्ये नाराजी

   Follow us on        

सावंतवाडी: कोकण रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या वतीने आगामी काळात चालवण्यात येणाऱ्या अहमदाबाद-मंगळुरू विशेष गाडीच्या (०९४२४/०९४२३) थांब्यांच्या यादीतून सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकाचा थांबा वगळण्यात आल्याने स्थानिक प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. यापूर्वी या गाडीला सावंतवाडी येथे थांबा दिला जात होता, मात्र २७ फेब्रुवारी ते २१ मार्च २०२६ या कालावधीत धावणाऱ्या विशेष फेऱ्यांसाठी प्रशासनाने जाणीवपूर्वक हा थांबा काढून घेतल्याचा आरोप केला जात आहे.

कुठल्याच लॉजिक मध्ये बसत नाही 

या गाडीला यापुर्वी असलेले जवळ जवळ सर्वच थांबे तसेच ठेवून सावंतवाडीचा थांबा काढण्यात आला आहे. कमी प्रवासी संख्या असलेल्या थांब्याना हात न लावता चांगली प्रवासीसंख्या footfall असलेल्या स्थानकाचा थांबा काढला हे कोणत्याही लॉजिक मध्ये बसत नाही.

जाणीवपूर्वक हा थांबा काढून घेतल्याचा आरोप

कोकण रेल्वेच्या महाराष्ट्र हद्दीतील स्थानकांमध्ये उत्पन्नाच्या बाबतीत ५ व्या स्थानावर असलेल्या सावंतवाडी स्थानकाचे या वर्षीचे उत्पन्न सुमारे १८ कोटी रुपये आहे. पुढील वर्षात हा आकडा २० कोटींच्या पार जाण्याची शक्यता असून, तसे झाल्यास स्थानकाला NSG-3 ही उच्च श्रेणी प्राप्त होईल. मात्र, ही श्रेणी मिळू नये आणि स्थानकाचा विकास होऊ नये, यासाठीच राजधानी, गरीब रथ आणि मंगळुरू स्पेशल सारख्या महत्त्वाच्या  गाड्यांचे थांबे जाणून बुजून नाकारले जात असल्याचे बोलले जात आहे.

कोकण रेल्वे प्रवासी संघटना (सावंतवाडी)ने याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ​रेल्वे प्रशासनाच्या या भूमिकेमुळे सावंतवाडीच्या महत्त्वावर घाला घातला जात आहे. कोकण रेल्वे (KR) प्रशासनाकडून होणारा हा अन्याय थांबवून तात्काळ सावंतवाडी येथे थांबा बहाल करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.

उत्पन्न असूनही सुविधांपासून वंचित ठेवण्याच्या या धोरणामुळे पर्यटनावर आधारित असलेल्या या भागातील अर्थव्यवस्थेलाही फटका बसू शकतो अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

सिंधुदुर्गच्या समुद्रकिनाऱ्यांवर आता सीसीटीव्हीची नजर!

   Follow us on        

मुंबई, २५ फेब्रुवारी २०२६: महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाच्या समुद्रकिनारी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या प्रस्तावाला गती देण्यावर भर देण्यात आला.

महाराष्ट्र सागरी मंडळाच्या ८५व्या संचालक मंडळ बैठकीत या प्रकल्पाला तत्त्वतः मान्यता मिळाली आहे. मात्र, प्रशासकीय व तांत्रिक मान्यता प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत सर्व अडथळे दूर करून काम लवकरात लवकर सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

सिंधुदुर्ग हा पर्यटनाचा जिल्हा असून, तारकरली, मालवण, देवगड, विजयदुर्ग, आचरा आदी ठिकाणी दरवर्षी लाखो पर्यटक येतात. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तसेच किनारपट्टीवरील अवैध कृत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरेल, असे मत यावेळी व्यक्त झाले.बैठकीला आयटी विभागाचे वीरेंद्र सिंग, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे), जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे) व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या उपक्रमामुळे सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवरील सुरक्षा अधिक मजबूत होईल आणि पर्यटन क्षेत्राला नवीन चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

 

सिंधुदुर्गातील चार ऐतिहासिक समुद्री किल्ल्यांच्या संशोधनासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर

   Follow us on        

मालवण, १९ फेब्रुवारी २०२६: छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाचे संवर्धन आणि शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकोट आणि सर्जेकोट या चार प्रमुख समुद्री किल्ल्यांच्या सखोल अभ्यास, दस्तावेजीकरण आणि संशोधनासाठी मुंबई विद्यापीठांतर्गत मालवण येथे स्वतंत्र अध्यासन केंद्र (Study Centre) उभारण्यास मंजुरी मिळाली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने या प्रकल्पासाठी ५० लाख रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. हे केंद्र मालवणात स्थापन होणार असून, शिवकालीन व्यापार, आरमार व्यवस्था, या किल्ल्यांच्या रणनीतिक महत्त्व आणि ऐतिहासिक दस्तऐवजांचा वैज्ञानिक अभ्यास होईल. यामुळे युवा संशोधकांना मार्गदर्शन, व्याख्याने, संशोधन प्रकल्प आणि या वारशाचे जागतिक स्तरावर प्रसार होण्यास मदत होईल.

सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या पुढाकाराने आणि प्रस्तावानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी एप्रिल २०२५ मध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याच्या ३५८व्या वर्धापन दिनी या केंद्राची घोषणा करण्यात आली होती. आता निधी मंजुरीमुळे प्रकल्पाला प्रत्यक्ष गती मिळाली आहे.पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी या निर्णयाचे स्वागत करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री आशिष शेलार आणि महायुती सरकारचे आभार मानले आहेत.

या केंद्रामुळे शिवरायांच्या दूरदृष्टी आणि पराक्रमाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचेल आणि सिंधुदुर्गच्या सागरी वारशाला नवे आयाम मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.हे केंद्र केवळ संशोधनापुरते मर्यादित न राहता, स्थानिक इतिहासप्रेमी, विद्यार्थी आणि पर्यटन क्षेत्रालाही फायदेशीर ठरेल.

 

 

सिंधुदुर्ग: गोव्याच्या दिशेने जाणार्‍या ट्रकचा विचित्र अपघात

   Follow us on        

ओटवणे : कोल्हापूरहून बांदा-गोव्याच्या दिशेने लोखंडी प्लेट्स आणि स्टील ट्यूब्स घेऊन जाणारा एक कॅन्टर (MH 09 BA 9279) विलवडे तिठ्यावर पहाटे एका विचित्र अपघाताचा बळी ठरला. रस्त्यावरील मोठी चढण, खड्डे आणि क्षमतेपेक्षा जास्त भरलेला लोखंडी माल यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.

​चढणीवर गाडी आवरताना कॅन्टरची पुढची दोन्ही चाके जमिनीपासून तब्बल १० ते १५ फूट हवेत उडाली. गाडी अशा विचित्र अवस्थेत हवेत लटकलेली पाहून परिसरात खळबळ उडाली. सुदैवाने, मागच्या बाजूला असलेला जड माल जमिनीला टेकल्यामुळे गाडी मागे सरकली नाही किंवा उलटली नाही, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.

​या घटनेत चालक सुखरूप असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेनंतर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती, जी जेसीबीच्या मदतीने पूर्ववत करण्यात आली. स्थानिक नागरिकांनी या धोकादायक चढणीची आणि खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

 

मानवता विकास परिषदेचे अध्यक्ष श्रीकांत उर्फ बाळा सावंत यांचा मालवण – कणकवली ‘विशेष दौरा’ उत्साहात पार

   Follow us on        
सिंधुदुर्ग: मानवता विकास परिषद अध्यक्ष, रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषद अध्यक्ष तथा राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज सेवा समिती कार्यवाह श्रीकांत सावंत यांचा ६ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण- कणकवली दौरा संपन्न झाला. या दरम्यान श्रीकांत सावंत यांनी  मालवण तालुक्यातील मसुरे आंगणेवाडीतल्या आंगणे कुटुंबियांच्या श्री देवी भराडी मातेच्या वार्षिकोत्सवाला भेट दिली. त्यांनी श्री. देवी भराडी मातेचे दर्शन घेतले व उपस्थितांशी भेटी घेत चर्चा केली. श्रीकांत सावंत यांनी या दौर्यात राजकीय नेत्यांच्या, सामाजिक कार्यकर्त्यांच्या भेटी घेत चर्चा केली.
त्यांनी मालवण येथे नगरपरिषद निवडणुकीतील विजयाबद्दल नगरसेवक मंदार केणी यांची भेट घेत अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. वेरली सरपंच धनंजय परब यांचेही त्यांनी अभिनंदन केले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकांमधल्या विजयाबद्दल श्रीकांत सावंत यांनी क्षमा हडकर यांचा शाल देऊन सत्कार केला. यावेळी त्यांच्यासोबत भय्यु प्रभुगावकर व संदीप हडकर उपस्थित होते. ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदी सौ. शर्मिला पिंपळोलकर यांची निवड झाल्याबद्दल देखिल श्रीकांत सावंत यांनी सदिच्छा भेट घेतली. दरम्यान, श्रीकांत सावंत यांनी वरीष्ठ वकिल श्री. समीर गवाणकर व मसुरे येथे डाॅ. अनिरुद्ध मेहेंदळे, हाॅटेल व्यावसायिक संजय गावडे यांचीही सदिच्छा भेट घेतली.
श्रीकांत सावंत यांनी या दौऱ्यातील गाठी भेटी अत्यंत सकारात्मक होत्या असे सांगितले आणि समाजाला  मानवता, धर्म आणि राष्ट्र यांच्या प्रती जागृतीसाठी राष्ट्रसंत परमपूज्य पाचलेगांवकर महाराजांना अभिप्रेत कार्य करत रहायचा आग्रह सुरू ठेवायचे आवाहन केले. यावेळी श्रीकांत सावंत यांनी भेट घेतलेल्या विविध मान्यवरांना राष्ट्रसंत पाचलेगांवकर महाराजांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त त्यांना समर्पित तसेच श्रीकांत सावंत मुख्य संपादक असलेला संचारेश्वर विशेषांक सदिच्छा भेट स्वरुपात दिला.

सावंतवाडी रेल्वे स्थानकावर प्रवाशांची धावपळ थांबणार; ‘डिजिटल कोच इंडिकेटर’चे काम अखेर सुरू!

   Follow us on        

सावंतवाडी: कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुविधेसाठी ‘डिजिटल कोच इंडिकेटर’ बसवण्याचे काम आता प्रत्यक्ष सुरू झाले आहे. गेल्या वर्षी २६ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आलेल्या रेलरोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि १७ मार्च २०२५ रोजी कोकण रेल्वे महामंडळाच्या बेलापूर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत या सुविधेबाबत ठोस निर्णय घेण्यात आला होता.

या कामाची टेंडर प्रक्रिया २४ ऑक्टोबर २०२५ रोजी पूर्ण झाल्यानंतर आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. या डिजिटल इंडिकेटरमुळे प्रवाशांना आपली गाडी स्थानकात आल्यावर आपला डबा (कोच) नेमका कोणत्या ठिकाणी येणार आहे, याची अचूक माहिती मिळणार आहे. यामुळे प्रवाशांची होणारी धावपळ थांबणार असून प्रवास अधिक सुखकर होणार आहे. स्थानकावर यापूर्वी लिफ्टची सुविधा उपलब्ध झाली असून, आगामी काळात प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर १७० मीटरची निवारा शेड देखील उभी राहील, असा विश्वास संघटनेचे उपाध्यक्ष श्री. सागर तळवडेकर यांनी व्यक्त केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाहिल्या ‘५-स्टार हॉटेल’ प्रकल्पाला गती देण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांची आढावा बैठक

   Follow us on        

मुंबई​: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी ताज समूहाकडून (IHCL) प्रस्तावित असलेल्या पहिल्या पंचतारांकित रिसॉर्ट प्रकल्पाला आता गती मिळाली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी मुंबईत एक विशेष बैठक पार पडली. सिंधुदुर्गचे आमदार मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने आणि उपस्थितीत ही बैठक झाली.

​या प्रकल्पाची प्रक्रिया २०२५ मध्ये वेगाने सुरू झाली होती. २३ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या प्राथमिक चर्चेनंतर, प्रशासकीय स्तरावर कामात सुसूत्रता आणण्यासाठी ही आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत जमीन अधिग्रहण, पर्यावरणीय परवानग्या आणि स्थानिकांचा सहभाग यावर सखोल चर्चा करण्यात आली.

​वेंगुर्ळा तालुक्यातील शिरोडा-वेलाघर परिसरात प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे.

​आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला विश्वास:

​”सिंधुदुर्ग हा निसर्गसंपन्न जिल्हा असून पर्यटनाच्या दृष्टीने यात मोठी क्षमता आहे. ताज सारखा जागतिक ब्रँड शिरोडा-वेलाघर येथे आल्यास सिंधुदुर्गच्या पर्यटनाला नवीन उंची मिळेल. यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि जिल्ह्याचा आर्थिक विकास होईल. हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.”

​या बैठकीला पर्यटन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (MTDC) प्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. या प्रकल्पामुळे सिंधुदुर्गला ‘लक्झरी पर्यटन डेस्टिनेशन’ म्हणून जागतिक नकाशावर स्थान मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

तिलारी वनक्षेत्रात वाघिणीसह दोन बछड्यांचा वावर

   Follow us on        

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथील तिलारी वनक्षेत्रातून निसर्गप्रेमींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. या भागात पहिल्यांदाच एका वाघिणीसह तिच्या दोन लहान बछड्यांच्या पाऊलखुणा वनविभागाला आढळून आल्या आहेत. या शोधामुळे सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वाघांचे केवळ वास्तव्यच नाही, तर तिथे वाघांचे नैसर्गिक प्रजनन होत असल्याचेही आता स्पष्ट झाले आहे. तिलारीचा हा परिसर महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमेवर असून तो वन्यजीवांसाठी अत्यंत महत्त्वाचा ‘कॉरिडॉर’ मानला जातो. वाघिणीसोबत बछड्यांचे अस्तित्व असणे हे या जंगलातील पोषक पर्यावरणाचे लक्षण आहे.

या पार्श्वभूमीवर वनविभागाने सतर्कता वाढवली असून, वाघांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी परिसरात शंभरहून अधिक ‘कॅमेरा ट्रॅप्स’ लावण्यात आले आहेत. व्याघ्र गणनेच्या कामात गुंतलेल्या पथकाला या पाऊलखुणा आढळल्या असून, वनविभागाने या क्षेत्रातील गस्त अधिक कडक केली आहे. या नव्या पाहुण्यांच्या आगमनामुळे तिलारी वनक्षेत्राला अधिकृतपणे ‘व्याघ्र राखीव क्षेत्र’ किंवा संरक्षित क्षेत्राचा दर्जा मिळण्याच्या मागणीला आता पुन्हा बळ मिळाले आहे. स्थानिक ग्रामस्थांनाही सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, या वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीचा ६०० कोटींचा विकास आराखडा मंजूर; बैठकीत अभिनंदनाचा ठराव

   Follow us on        

ओरोस:सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय येथे काल जिल्हा नियोजन समितीची महत्त्वाची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास आराखडा ६०० कोटी रुपयांच्या पुढे नेल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले असून, या ऐतिहासिक टप्प्याबद्दल बैठकीत अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. या वाढीव निधीमुळे जिल्ह्याच्या प्रलंबित आणि प्रस्तावित विकासकामांना मोठी गती मिळणार आहे. यावेळी बोलताना, निधीची उपलब्धता वाढल्याने प्रशासकीय यंत्रणेने आता अधिक सक्रिय होऊन कामाला गती द्यावी आणि विकासकामांची अंमलबजावणी वेळेत पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले.

​या बैठकीस आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे आणि कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रशासकीय पातळीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक मोहन दहीकर आणि अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांसह विविध शासकीय विभागांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला असून, प्रशासनाला कामाचा वेग वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नारळाच्या करवंट्या-झावळ्यांपासून साकारला इको-फ्रेंडली सेल्फी पॉइंट; पावशी सखी केंद्र ठरले आकर्षणाचे केंद्र!

   Follow us on        

सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पावशी गावात सखी मतदान केंद्र खूपच चर्चेत आहे! नारळाच्या करवंट्या, माडाच्या झावळ्या आणि बांबू यांचा वापर करून पूर्णपणे पर्यावरणपूरक (इको-फ्रेंडली) सेल्फी पॉइंट उभारण्यात आला आहे. हा सेल्फी पॉइंट मतदान केंद्राचे मुख्य आकर्षण ठरला असून, मतदारांना आकर्षित करत होता.

या मतदान केंद्राचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पूर्णपणे पर्यावरणपूरक (eco-friendly) पद्धतीने तयार केलेला सेल्फी पॉइंट. नारळाच्या झाडांच्या करवंट्या (fronds), माडाच्या झावळ्या (palm leaves) आणि बांबू यांसारख्या स्थानिक, नैसर्गिक आणि पुनर्वापरयोगी साहित्याचा वापर करून हा सेल्फी पॉइंट उभारण्यात आला आहे. या सुंदर आणि सर्जनशील रचनेमुळे मतदानासाठी आलेल्या मतदार – विशेषतः तरुण आणि महिलांना – सेल्फी घेण्यासाठी आणि सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी खूपच आवडले आहे.सखी मतदान केंद्र म्हणजे काय?

‘सखी मतदान केंद्र’ ही संकल्पना राज्य निवडणूक आयोगाने राबवली आहे. या केंद्रांवर संपूर्ण कर्मचारी वर्ग महिला असतो. महिलांना मतदान प्रक्रियेत अधिक सहज आणि सुरक्षित वाटावे यासाठी खास सोय उपलब्ध करून दिली जाते. यामध्ये बालसंगोपन केंद्र (creche), स्वच्छता पॅड्स, पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था अशा सुविधा पुरवल्या जातात. परिणामी ग्रामीण भागातील महिलांचा मतदानाचा टक्का वाढण्यास मदत होते.पावशी गावातील या केंद्राने केवळ मतदान प्रक्रियेलाच नव्हे तर पर्यावरण जागृतीलाही चालना दिली आहे. प्लास्टिक आणि इतर कचऱ्याऐवजी स्थानिक उपलब्ध साहित्याचा वापर करून पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

 

 

 

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search