विजयदुर्ग: पालकमंत्री नितेश राणे यांनी होळीच्या कालावधीत मोठ्या गाजावाजात सुरू केलेली रो-रो बोट सेवा गुढीपाडव्याच्या दिवशीच बंद पडली आहे. या बोट सेवेचे तिकीट सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारे नसल्याने आणि बोटीत मिळणारे खाद्यपदार्थही महाग असल्याने प्रवाशांवर आर्थिक ताण वाढला. परिणामी, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने ही सेवा बंद करावी लागली. यावर माजी आमदार परशुराम उपरकर यांनी टीका करत, सुरू केलेले प्रकल्प अल्पावधीत बंद पडणे ही चिंतेची बाब असल्याचे म्हटले.
उपरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ही सेवा १९ रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी थांबवण्यात आली. बोटीचे तिकीट महाग असल्यामुळे सर्वसामान्य प्रवासी या सेवेपासून दूर राहिले. तसेच, बोट मुंबईहून सुटत असताना विजयदुर्ग येथे पोहोचल्यानंतर पुढील प्रवासासाठी योग्य व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. बोटीत शौचालय आणि विश्रांतीसाठी आवश्यक सुविधा नसल्याचीही तक्रार करण्यात आली.
याशिवाय, बोटीत खाद्यपदार्थांच्या किंमतीही जास्त असल्याचे समोर आले. उदाहरणार्थ, पोहे १५० रुपये तर पाण्याची बाटली ९० रुपयांना विकली जात होती, ज्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी निर्माण झाली. त्यामुळेच या सेवेचा वापर कमी झाला आणि एका दिवशी ५० पेक्षा जास्त प्रवासीही मिळाले नाहीत, असे उपरकर यांनी नमूद केले


