रत्नागिरी:
रत्नागिरी जिल्ह्यातील भगवती बंदर येथे अत्याधुनिक क्रूझ टर्मिनल विकसित करण्याच्या प्रकल्पाला गती देण्यात येणार आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पाळुळे कोकणातील सागरी पर्यटन, स्थानिक रोजगार आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल, असा ठाम विश्वास मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.
या प्रकल्पाबाबत मंत्रालयात एका विशेष आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये मंत्री नितेश राणे बोलत होते. या बैठकीला महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री नितेश राणे यांनी बैठकीत सांगितले की, कोकण किनारपट्टीची नैसर्गिक संपन्नता, ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन क्षमता लक्षात घेता भगवती बंदर येथे होणारे क्रूझ टर्मिनल राज्याच्या सागरी पर्यटन क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
या प्रकल्पाची अंमलबजावणी झाल्यास देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होऊ शकतील. यामुळे रत्नागिरी पर्यटन जागतिक नकाशावर अधिक ठळकपणे झळकण्यास मोठी मदत होईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन कोकणातील बंदर विकास आणि सागरी पर्यटनाला सर्वोच प्राधान्य देत आहे, असेही मंत्री नितेश राणे यांनी शेवटी सांगितले.


