Konkan Railway News :गाडी नंबर 12284 / 12283 H. Nizamuddin – Ernakulam Jn. – H. Nizamuddin Duronto Weekly Express या गाडीच्या डब्यांच्या संरचनेत मोठा बदल करण्यात आला आहे. या गाडीचे स्लीपरचे ६ डबे एसी डब्यांमध्ये परावर्तीत केले जाणार आहे. ५ थर्ड एसी आणि १ सेकंड एसी डबे त्या जागी जोडले जाणार आहेत.
हा बदल दिनांक गाडी क्रमांक 12284 H. Nizamuddin – Ernakulam Jn या गाडीसाठी दिनांक 22 जुलै 2023 पासून तर 12283 H. Nizamuddin – Ernakulam Jn या गाडीसाठी दिनांक 25 जुलै 2023 पासून अंमलात आणला जाणार आहे असे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. या गाडीला पनवेल आणि रत्नागिरी येथे थांबा आहे.
सिंधुदुर्ग | जिल्ह्यातील महिलांना स्वयंरोजगाराचा पर्याय निर्माण करून देऊन त्याचे आर्थिक सबलीकरण करण्यासाठी सिंधुदुर्ग बँकेने ‘अबोली ऑटो रिक्षा’ ही महत्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. या योजनेबाबत मागील महिन्यात इच्छुक महिलांना पुढे येण्यासाठी आवाहन केले होते. या योजनेचा शुभारंभ उद्या शनिवार दिनांक १८ मार्च २०२३ रोजी दुपारी ३ वाजता सौ. निलमताई राणे यांच्या हस्ते होणार आहे.
हा समारंभ जिल्हा बँकेचे प्रधान कार्यालय ओरोस येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडला जाणार असून तेथे सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक नितेश राणे उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी ३ महिलांना अबोली रिक्षाचे वितरण करण्यात येणार आहे.
या योजनेच्या द्वारे महिला जिल्ह्यात पिंक ऑटो रिक्षा चालवताना दिसणार आहेत व त्यासाठी पुढाकार घेणाऱ्या महिलांना सवलतीच्या व्याजदरात जिल्हा बँक अर्थसहाय्य करणार असून प्रशिक्षणासह, बॅच रिशा परमिटचा खर्च आमदार नितेश राणे स्वतः करणार आहेत जिल्हा बँकेने या योजनेसाठी ९% सवलतीच्या जाहीर केला असून किमतीच्या८५% कर्ज पुरवठा जिल्हा बँक करणार आहे उर्वरित १५ टक्के कर्ज पुरवठा हा पहिल्या येणाऱ्या पाच महिलांसाठी स्वतः आमदार नितेश राणे करणार आहेत. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील बॅच, परमिट यासाठी लागणारा खर्च पहिल्या पाच महिलांसाठी आमदार नितेश राणे हे करणार आहेत.
जनमताचा कौल – सरकारने राज्यसरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी निवृत्तीयोजना पुन्हा लागू करावी का?
रत्नागिरी |आपल्या जन्मभूमीच्या विकासात आपण काही हातभार लावावा अशी प्रत्येक चाकरमान्यांची मनापासून इच्छा असते पण अनेक कारणांमुळे त्यांना सहभागी होता येत नाही. पण रत्नागिरीतील निवळी गावाच्या ग्रामपंचायतीने अशा चाकरमान्यांसाठी ‘चाकरमान्यांची ग्रामसभा’ हा उपक्रम चालू करून इतर गावांना एक नव आदर्श घालून दिला आहे.
निवळी गावचे सरपंच दैवत पवार यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.ते म्हणाले कि गावातून शिक्षण घेऊन मुंबई, पुणे आणि इतर शहरात गेलेल्या तरुण-तरुणींनी गावच्या विकासाबाबत त्यांचे व्हिजन , नवीन संकल्पना मांडता याव्यात आणि त्यांच्या सहभागातून गावाचा सर्वांगीण विकास साधता यावा यासाठी ‘चाकरमान्यांची ग्रामसभा’ हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येणार आहे. आपल्याला या सूचना गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी दिल्या होत्या त्यावर विचार करून आम्ही हा निर्णय घेतला. ही सभा सुरवातीला वर्षातून एकदा म्हणजे गणेशोत्सवाच्या सुट्टीत किंवा मे महिन्यात आयोजित केली जाणार आहे.
सुशिक्षित तरुण-तरुणी रोजगारासाठी शहरात जाण्याचे प्रमाण कोकणातील गावात जास्त आहे. त्यांच्या कल्पनाशक्तीचा, आधुनिक विचारसरणीचा आणि शिक्षणाचा फायदा घेऊन गावाचा आणि पर्यायाने जिल्ह्याचा विकास करण्यासाठी हा खूप चांगला उपक्रम खूपच कौतुकास्पद आहे. असे उपक्रम प्रत्येक गावात राबविल्यास कोकणचा सर्वांगीण विकास होईल.
Konkan Railway News | कोकण रेल्वेमार्गाचे १००% विद्युतीकरण झाले असून जवळपास सर्व गाड्या विद्युत इंजिनावर चालविण्यात येत आहेत. पण या बदलामुळे रेल्वे समोर काही नव्या समस्या निर्माण झाल्या आहे. त्यातील एक समस्या म्हणजे या मार्गावरील माकडांपासून होणारा त्रास.
कोकण रेल्वेच्या रत्नागिरी ते राजापूर या विभागातील OHE पोर्टल्स तसेच मास्ट्स यावर माकडे चढून उड्या मारू लागल्याने या विभागात विजेवर चालणाऱ्या गाड्यांच्या प्रवासात व्यत्यय निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्यावर रेल्वे गाड्या चालतात त्या रेल्वेच्या ओव्हर हेड वायरमधून अतिउच्च क्षमतेचा विद्युत प्रवाह सुरू असल्याने रत्नागिरी ते राजापूर या टप्प्यात माकडांचा वाढलेला उपद्रव कोकण रेल्वेसाठी डोकेदुखी ठरली आहे.
कोकणातील शेतकऱ्यांच्या शेतांची बागेंची नासधूस करून या माकडांनी शेतकऱ्यांना अक्षरशः रडवले आहे. आता त्यांचा त्रास कोकण रेल्वे मार्गावर होताना दिसत आहे. आता यावर उपाय म्हणून या भागात अँटी क्लाइंबिंग उपकरणे कोकण रेल्वेला बसवावी लागणार आहेत. त्यासाठी रेल्वेतर्फे निविदा देखिल काढण्यात आली आहेत. सुमारे 6 लाख 62 हजार 663 रुपये इतक्या अंदाजीत खर्चाची ही निविदा आहे
पुणे | १५/०३/२०२३ : राज्यात आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने पूर्ण राज्यात ‘येलौ’ अलर्ट जाहीर केला आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपीट होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. या पावसामुळे शेतीतील पिकांचं आणि फळांचे नुकसान होणार आहे. हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के.एस. होसालीकर यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्रात येत्या चार दिवसांसाठी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. यासाठी IMD द्वारे अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीचीही शक्यता आहे.
कोकणात पावसाचा इशारा
आज १५ मार्च आणि उद्या १६ मार्चला कोकणच्या सर्व जिल्ह्याला ‘येलौ’ अलर्ट दिला गेला आहे. तर परवा दिनांक १७ रोजी रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्हय़ाला ‘येलौ’ अलर्ट आहे.
हवामान खात्याचे इशारे Alert रेड अलर्ट – कृतीची वेळ Red Alert ऑरेंज अलर्ट – तयार रहा Orange Alert यलो अलर्ट – सतर्क रहा Yellow Alert ग्रीन अलर्ट – इशारा नाही
14 march: Alerts issued by IMD for coming 5 days in Maharashtra for Thunderstorms with lightning, Gusty winds associated with light to mod rains. At few places there is possibility hailstorm too. Warnings below are from 15-18 Mar. Today also TS warnings are issued for Maharashtra pic.twitter.com/fZluDxL7SJ
Konkan Railway News|कोकण रेल्वेच्या रोहा ते ठोकूर दरम्यान 741 किमी पूर्ण नेटवर्कवर धावणारी पहिली प्रवासीसेवा गाडी मत्स्यगंधा एक्सप्रेस येत्या मे महिन्यामध्ये २५ वर्षाची होणार आहे. ट्रेन क्रमांक १२६१९/६२० मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस-मंगळुरु सेंट्रल-मुंबई एलटीटी मत्स्यगंधा एक्सप्रेसला १ मे १९९८ रोजी हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता, तेव्हा तत्कालीन पंतप्रधान ए.बी. वाजपेयी आणि रेल्वे मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी ही गाडी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनला समर्पित केली होती.
ही गाडी मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस ते कर्नाटकातील मंगळूर स्थानकांदरम्यान रोज धावते. कोकण रेल्वेमार्गे धावणारी मत्स्यगंधा एक्सप्रेस मुंबई ते मंगळूर दरम्यानचे १,१८६ किमी अंतर १६ तासांत पूर्ण करते. महाराष्ट्रातील कोकण प्रदेशामधून जात असलेल्या ह्या गाडीला येथील मासेमारी उद्योगाशी निगडीत मत्स्यगंधा हे नाव दिले गेले आहे.
कुंदापुरा रेलू प्रयाणिकारा हितरक्षण समिती (कर्नाटक) या निमित्ताने या गाडीचा रौप्यमहोत्सव साजरा करणार आहे. त्यामध्ये अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कोकण रेल्वेचा प्रवास, सद्यस्थिती आणि भविष्यातील योजना यावर चर्चासत्रे आणि कार्यशाळा आयोजित करण्याची समितीची योजना आहे.
Mumbai Goa Highway News :मुंबई – गोवा महामार्गाबाबतची थापेबाजी संपता संपत नाही.. आज अगोदर बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कोकणातील लोकप्रतिनिधीं आणि नॅशनल हाय वे चे अधिकारी यांची बैठक घेतली.. बैठकीत चर्चा झाली, सूचना दिल्या गेल्या, पण बातमी म्हणून ठोस हाती काही लागलंच नाही..काम पूर्ण कधी होईल हे सांगायला मंत्री विसरले.. प्रश्न विधानसभेत उपस्थितीत झाला.. तीथंही तसंच..
मंत्री रवींद्र चव्हाण यांनी लांबलचक उत्तर तर दिलं पण रस्ता कधी पूर्ण होईल तेच सांगितलं नाही..”पुढील नऊ महिन्यात रस्ता पूर्ण करण्यासाठी जे जे शक्य आहे ते ते करू” असं मंत्र्यांनी वेळमारू उत्तर दिलं.. म्हणजे गॅरंटी नाहीच..
बोलताना मंत्र्यांनी “हे काम नॅशनल हाय- वेचे आहे.. आम्ही म्हणजे राज्य सरकारचे बांधकाम खाते केवळ देखरेखीचे काम करते” .असंही स्पष्ट केलं.. . तुम्ही केवळ देखरेख करीत असाल तर नऊ महिन्यात जे जे शक्य ते ते करू हे विधान कश्याच्या आधारे करता? मुंबई गोवा महामार्गाचे काम नॅशनल हाय वे च्या अखत्यारीत असेल तर राज्य सरकारने केंद्राकडे रस्ता पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा का केला नाही? रवींद्र चव्हाण यांनी या रस्त्याबाबत नितीन गडकरी यांची कधी भेट घेतल्याचं दिसत नाही.. सध्या राज्यात आणि केंद्रात एकाच पक्षाचं सरकार आहे.. मग राज्य सरकार केंद्राला हा रस्ता लवकर पूर्ण करण्याचं साकडं का घालत नाही? कोकणातील पत्रकार ही लढाई गेली १५ – १६ वर्षे लढत असताना राज्य सरकार केवळ बघ्याची भूमिका का घेतंय?
कळीचा मुद्दाय हा ..
शंभर टक्के भूसंपादन झालं नाही असं रवींद्र चव्हाण सांगतात.. का झालं नाही? त्याचं उत्तर कुठं दिलंय त्यांनी.. भूसंपादन हे राज्य सरकारचं काम आहे.. ते केलं गेलं नसेल तर सरकारची इच्छाशक्ती नाही असा आरोप करता येऊ शकेल..
सरकारला ज्या महामार्गात रस आहे तिकडचे भू संपादन झटपट होते.. जवळपास ८०० किलो मिटरचा समृध्दी महामार्ग झटपट होतो तिथं भूसंपादनाचा अडथळा येत नाही.. का? तो देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असतो म्हणून? नाशिक – पुणे आणि अन्य रस्ते तीन चार वर्षात पूर्ण झाले.. तिकडेही भूसंपादन विषयच आला नाही.. इकडे मात्र बारा वर्षे सेम तुणतुणे वाजविले जातंय..
बघा मुंबई – गोवा महामार्गासाठीचा निधी जवळपास संपला आहे.. तिथं “हात मारणयासारखं” आता काही शिल्लक नाही.. त्यामुळं हजारो कोटींच्या सागरी महामार्गाची चर्चा सुरू केलीय.. हजारो कोटीच्या निधीत हितसंबंधीय मोठी हातमारी करू शकतात.. शिवाय सागरी महामार्गाच्या दोन्ही बाजुंनी पुढारयांना हजारो एकर जमिनी खरेदी करून ठेवलेल्या आहेत..हा मार्ग झाला तर काठावरच्या जमिनीचे भाव आकाशाला भिडतील..
त्यामुळे मुंबई गोवा महामार्गाकडं दुर्लक्ष करून सागरी महामार्गाचा आग्रह धरला जातोय…एनएच ६६ चे काम पूर्ण करून सागरी महामार्ग करा की.. विरोध कोण करतंय? पण नाही अगोदर सागरी महामार्ग हवाय.. पुढारयांना
सागरी महामार्ग मुंबईहून थेट गोव्याला जाण्यासाठी जास्त उपयुक्त आहे.. कोकणासाठी त्याचा फारसा उपयोग नाही.. मुंबई – गोवा महामार्ग ही कोकणची लाईफलाईन आहे.. ही लाईफ लाईन खंडीत करण्याचा प्रयत्न होतोय.. त्याला पत्रकारांचा आणि कोकणी जनतेचा विरोध आहे.. गंमत अशी की, या विषयावर कोकणातील एकही राजकीय पक्ष बोलत नाही, आंदोलन करीत नाही, जे पत्रकार आंदोलन करतात त्यांना मदतही करीत नाही.. हा सारा आर्थिक हितसंबंधाचा खेळ आहे..
कोकणातले पत्रकार २६ मार्च रोजी पोलादपूरला भेटत आहेत.. मी देखील असेल..
टिप : सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी, विकासाला चालना देण्यासाठी या संकेतस्थळावर समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञांनी लिहिलेले लेख आणि बातम्या येथे प्रसिद्ध करण्यात येत आहेत. अशा लेखांशी संपादक सहमत असतीलच असे नाही.
देवरुख:ग्रामीण भागाच्या विकासासाठी आता सामान्य माणसाला, तरुणांना पुढाकार घ्यावा लागेल.ठेकेदार प्रवृत्तीचे लोकं ग्रामीण राजकारणात आहेत यामुळे विकासात अडथळे येत आहेत.परिणामी कोणीतरी पैसेवाला शेठ येईल आणि आपल्या गावांचा विकास करेल या मानसिकतेतून लोकांनी बाहेर पडावे असे आवाहन गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी गोताडवाडी येथे आयोजित सभेत बोलताना केले.
धनिन देवी सेवा मंडळाच्या वतीने शनिवारी शिमगोत्सव निमित्त सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सुहास खंडागळे यांनी ग्रामीण विकासाबाबत भाष्य केले.ठेकेदार प्रवृत्तीचे लोक राजकारण असल्याने गावांचा सर्वांगीण विकास होण्यात अडथळे येत असल्याचे सुहास खंडागळे यावेळी म्हणाले.ग्रामपंचायत कारभारात तरुणांनी लक्ष घातले पाहिजे. ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद यांचे सदस्य दुर्दैवाने अनेक लोकांना माहीत नसतात अशी परिस्थिती आपल्या ग्रामीण भागात आहे याकडेही खंडागळे यांनी लक्ष वेधले.कोणीतरी पैसेवाला येईल आणि आपल्या ग्रामीण भागात एखादा रस्ता पाखाडी करून देईल, अशा पद्धतीची मानसिकता आपण बदलली पाहिजे आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या गावांच्या विकासाला चालना दिली पाहिजे असे मत खंडागळे यांनी यावेळी व्यक्त केले.गावागावात असणारी गटबाजी ज्या दिवशी मोडीत निघेल त्या दिवशी गावांच्या विकासाचा मार्ग खुला झालेला असेल,ही गटबाजी मोडीत काढण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा असे खंडागळे म्हणाले. एका गावात तीन, चार राजकीय गट असल्यानेच गावाचा विकास होत नाही.याकडे त्यांनी लक्ष वेधले. तरुणांनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा असेही ते यावेळी आवर्जून म्हणाले .मोर्डे करंबेळे ग्रामपंचायत चे सदस्य असणारे नितीन गोताड यांनी मागील दोन वर्षात नळपाणी योजना,रस्ते विकासातील अडचणी, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य याबाबत खंडागळे यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले.
यावेळी व्यासपीठावर गावचे गावकर राजेश तुकाराम गोताड, अध्यक्ष उदय गोताड, गावीसचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे, डॉ. मंगेश कांगणे तसेच गोताडवतील सांगली व मुंबई मधील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
रत्नागिरी :गणेशोत्सव, होळी या सणांसाठी आणि हंगामात गावी येणाऱ्या चाकरमन्यांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारून स्थानिक रिक्षाचालकांकडून त्यांची लूट केली जात आहे. रेल्वे स्थानकापासून गावापर्यंत सार्वजनिक वाहतुकीच्या अपुऱ्या व्यवस्थेचा ते गैरफायदा घेतात अशा तक्रारी कोकणात खासकरून रेल्वेस्थानकानजीकच्या रिक्षा चालकांविरोधात सर्रास ऐकायला मिळतात.
अशा तक्रारी वाढल्याने शिमगोत्सव दरम्यान रत्नागिरी आरटीओ विभागाने अशा रिक्षा चालकांविरोधात एक विशेष कडक मोहीम राबवली आहे. ह्या मोहिमे अंतर्गत ५० पेक्षा रिक्षाचालकाविरुद्ध विविध प्रकारात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
स्थानक व परिसर येथे २४ तास विशेष तपासणी मोहीम राबवली जात आहे. प्रवाशांना नेमके भाडे कळावे यासाठी महत्वाच्या ठिकाणचे रिक्षा प्रवासाचे अधिकृत दरपत्रक आणि तक्रार करण्यासाठी आरटीओ विभागाचे दूरध्वनी क्रमांक रत्नागिरी स्थानक आणि इतर भागात लावण्यात आले आहेत. या दरांपेक्षा अतिरिक्त दर आकारणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात तशी तक्रार आल्यानंतर कारवाई करण्यात आली.
या मोहिमेत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रत्नागिरी जयंत चव्हाण व सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयातील सर्व मोटर वाहन निरीक्षक व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांनी सहभाग नोंदवला. या मोहिमेबाबत प्रवासीवर्गाकडून समाधान व्यक्त होत आहे. तसेच अशा प्रकारची मोहीम इतर रेल्वे स्थानिकांसाठी राबवावी अशी मागणी होत आहे.
KONKAN RAILWAY NEWS:रत्नागिरी ते मडगाव या स्थानकांदरम्यान चालविण्यात येणाऱ्या 10101 रत्नागिरी-मडगाव आणि 10102 मडगाव-रत्नागिरी या गाड्या अनिश्चित कालावधीसाठी रद्द केल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.
याआधी रेल्वे प्रशासनाने काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे या गाड्या दिनांक 31/03/2023 पर्यन्त रद्द असल्याचे जाहीर करण्यात आले होते. आता ती मुदत अनिश्चित कालावधीपर्यंत वाढविण्यात आलेली आहे. रत्नागिरी ते मडगाव या स्थानकांदरम्यान रेल्वे सुरक्षेच्या दृष्टीने अभियांत्रिकी कारणासाठी या गाड्या रद्द ठेवण्यात येणार आहेत असे कोंकण रेल्वेने जाहीर केले आहे.
दुपारी दिवा येथून सुटणारी दिवा – रत्नागिरी पॅसेंजर हीच गाडी पुढे रत्नागिरी येथे तासभराच्या थांब्यांने रत्नागिरी मडगाव म्हणुन चालविण्यात येत होती,त्यामुळे तळकोकणात जाणार्या प्रवाशांना ही गाडी सोयीची होती. आता ही गाडी तात्पुरत्या स्वरुपात रद्द झाल्याने त्यांची गैरसोय होत आहे.