Category Archives: कोकण

Mumbai Goa Highway | ओसरगाव टोल वसुलीला विरोध करण्यासाठी नेते वसुली नाक्यावर दाखल; वातावरण तापणार..

Mumbai Goa Highway | मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ओसरगाव येथील टोल नाका आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. मात्र या टोलवसुली वरून येथील वातावरण तापून तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांना टोल माफी मिळाल्याखेरीज ओसरगाव टोल नाका सुरू होऊ देणार नाही, असा इशारा सर्वपक्षीय त्यांनी दिला होता. ही मागणी पूर्णपणे मान्य न करता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना 50% सुट मिळणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे या निर्णयाला विरोध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं सकाळी 10 वाजता टोलनाक्यावर आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकवटणार आहेत. टोलविरोधी कृती समिती सुद्धा या निर्णयाविरुद्ध आक्रमक झाली आहे, त्यामुळे आज ओसरगाव टोलनाक्यावर तणावाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जानवली ते पत्रादेवी या 60 किमी लांबीच्या मार्गासाठी टोल वसूल केला जाणार आहे. आता, सिंधुदुर्गवासियांसाठी संपूर्ण टोल माफी करण्याच्या मागणीवर टोलविरोधी कृती समिती आक्रमक असताना दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं टोल वसुली करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे मंगळवारी ओसरगावमध्ये तणावाची स्थिती असण्याची शक्यता आहे. ओसरगाव टोल नाका येथील वसुलीचे कंत्राट कोरल असोसिएट या राजस्थानमधील कंपनीला देण्यात आलं आहे. आतापर्यंत तीन वेळा टोल नाका सुरू करण्याचे आदेश दिले होते.

Loading

हापा मडगाव एक्सप्रेसला तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त कोच.

Konkan Railway News : कोकण रेल्वेमार्गे धावणाऱ्या हापा मडगाव एक्सप्रेस ला स्लीपर दर्जाचा एक अतिरिक्त कोच जोडण्यात येणार आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादी वरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

रेल्वेकडून प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार  कोकण रेल्वे मार्ग धावणारी हापा- मडगाव (22908 ) या एक्सप्रेस गाडीला दि. 14 जून 2023 साठी स्लीपरचा एक जादा डबा जोडला जाणार आहे. परतीच्या प्रवासात या गाडीला (22907) मडगाव येथून हापासाठी धावताना दि.16 जून रोजी जादा डबा जोडण्यात येणार आहे.

 

 

Loading

ओसरगाव येथील टोल नका उद्यापासून सुरु | असे असणार टोलचे शुल्क

सिंधुदुर्ग | मुंबई गोवा महामार्गाने प्रवास करणाऱ्या वाहन चालकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मुंबई गोवा महामार्गावरील ओसरगाव टोल नाका उद्या दिनांक १४ जूनपासून  सुरू होणार आहे  अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिली आहे. 
ओसरगाव टोल नाका येथील वसुलीचे कंत्राट कोरल असोसिएट या कंपनीला देण्यात आले आहे. सिंधुदुर्ग पासिंगच्या नोंदणीकृत व्यावसायिक वाहनांसाठी शुल्कात ५० टक्के सवलत तर अवाणिज्य वाहनांना महिन्यासाठी ३३० रुपयांचा पास असणार आहे. 
एकवेळ प्रवासासाठी  असे असणार आहेत टोल वसुलीचे नवे दर 
मोटार, जीप, व्हॅन आणि इतर हलकी वाहने : ९५ रुपये मिनी
बस आणि हलकी व्यावसायिक वाहने : १५५ रुपये
ट्रक आणि बस (२ अक्सेल) : ३२० रुपये 
व्यावसायिक वाहने ३ अक्सेलसाठी : ३५० रुपये
मल्टी अक्सेल ४ ते ६ अक्सेल वाहनांसाठी : ५०५ रुपये. 
सात किंवा त्याहून जास्त अक्सेल वाहनांसाठी : ६१५ रुपये 
अवाणिज्य प्रकारच्या वाहनांसाठी ३३० रुपये मासिक पास शुल्क राहील.
या आधी पण येथे टोल नका सुरु करण्यात आला होता. मात्र महामार्गाचे  काम अपूर्ण असल्याने टोल वसुली करण्यात येऊ नये तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना पूर्ण टोल माफी मिळावी असा आग्रह धरून या वसुलीला विरोध झाला होता. त्यामुळे उद्यापासून टोल नाका सुरू होणार असल्याने टोल विरोधकांची  कोणती भूमिका असेल याबाबत  उत्सुकता आहे. 

Loading

बारसू येथील कातळशिल्पांची नामांकित संशोधक व अभ्यासकांद्वारे आज पाहणी..

रत्नागिरी | प्रस्तावित रिफायनरी साठी होणार्‍या विरोधासाठी चर्चेत आलेल्या बारसू परिसरातील कातळशिल्पांची देशातील नामांकित संशोधक व अभ्यासक आज दिनांक 13 जून ला पहाणी करणार आहेत. ही पाहणी आज सकाळी 10 वाजता होणार असून या संशोधकांमध्ये डॉ. पार्थ चौहान, मृदुला माने, जिग्ना देसाई, डॉ. प्रबिन सुकुमारन आणि अभ्यासकांमध्ये सुधीर रिसबुड, सतीश ललित आदींचा समावेश असेल.तसेच खासदार विनायक राऊत येथील स्थानिक ग्रामस्थांसोबत सहभागी होणार आहेत.

बारसूच्या सडय़ावर असलेली काही कातळशिल्प युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ घोषित होण्याच्या मार्गावर आहेत. राजापूर तालुक्यातील बारसू ते देवाचे गोठणे येथील सडय़ावर पसरलेली कातळशिल्प संरक्षित करावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. येथील पंचक्रोशीतील सर्वच ग्रामसभांनी तसे ठरावही केले आहेत. हाच जागतिक वारसा संरक्षित करण्यासाठी येथे रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्प प्रस्तावित होऊ नये ही मागणी ग्रामस्थ करत आहेत.

Loading

गणपतीपुळे | अजूनही धोक्याची परिस्थिती कायम; पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यावर बंदी

रत्नागिरी |तीर्थक्षेत्र आणि जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथे रविवारी एका मोठ्या लाटेच्या तडाख्याने समुद्रकिनाऱ्या वरील स्थानिक व्यावसायिकांना तसेच पर्यटकांना फटका बसला सुमारे १० ते १२ पर्यटक लाटेच्या जोरदार तडाख्याने किरकोळ जखमी झाले होते.

सोमवारी देखील समुद्राच्या उधाणाचा जोर कायम होता , त्यामुळे पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेऊन गणपतीपुळे आज सोमवारी सकाळी समुद्रकिनाऱ्यावरील संरक्षण मोठा दोरखंड बांधून पर्यटकांना समुद्रावर जाण्यास मज्जाव केला आहे. तसेच अजून दोन दिवस तरी समुद्रावर जाण्यास पर्यटकांना मनाई केली जाणार आहे, असे गणपतीपुळे ग्रामपंचायत व जयगड पोलीस सांगण्यात आले आहे.

रविवारी समुद्राला मोठे उधाण येवून मोठ्या लाटा निर्माण होऊन येथील किनारपट्टीवर धडकल्याने येथील व्यावसायिकांचे पण नुकसान झाले होते. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथील नुकसानीची पाहणी करून 49 व्यावसायिकांना नुकसान भरपाई दिली जाईल असे जाहीर केले आहे. 

 

 

 

Loading

मडुरा येथे शाळेचे छप्पर कोसळले; सुदैवाने अनर्थ टळला | प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप

 

सिंधुदुर्ग | महाराष्ट्रात शिक्षण विभागाच्या ग्रामीण भागातील शाळांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. मात्र तळकोकणतील एका घटनेने ही गोष्ट अधोरेखित झाली आहे. मडुरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. ३ प्रशालेचे छप्पर काल मध्यरात्री कोसळले. सुदैवाने ही घटना रात्री घडल्याने तसेच शाळा अजून सुरू झाल्या नसल्याने अनर्थ टळला आहे. मात्र वासे व मंगलोरी कौलांचे नुकसान झाले आहे. 

प्रशासनाचे दुर्लक्ष 

दोन दिवसांनी शाळा चालू होणार होती याकाळात दिवसा हे छप्पर पडले असते तर मोठा अनर्थ घडला असता. गेली दोन वर्षे छप्पर दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र,शिक्षण विभाग अधिकार्‍यांच्या चालढकल कारभारामुळे सदर दुर्घटना झाल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला आहे. अधिकाऱ्यांच्या चालढकल कारभारामुळे सदर दुर्घटना झाल्याचा आरोप स्थानिकांनी केलाआहे.मडुरा प्राथमिक शाळा नं. ३ चे छप्पर नादुरुस्त झाले होते. त्याबाबत शाळा व्यवस्थापन समितीनेग्रामपंचायत व शिक्षण विभागाचे लक्ष वेधले होते. मात्र, अंदाजपत्रक, प्रशासकीय मान्यता अशी वेगवेगळीका रणे पुढे करुन चालढकल करण्यात येत होती.

 

 

Loading

Sawantwadi Railway Terminus | रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी तरुण वर्ग पुढे सरसावला..

सिंधुदुर्ग |सावंतवाडी टर्मिनसच्या फेज-1 चे काम पूर्ण होवून फेज-2 चे काम रखडले आहे. हे काम पूर्ण झाल्यास येथे सर्व गाड्यांना थांबा मिळणे शक्य होणार असल्याने हे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. या प्रश्नासाठी सावंतवाडी तालुक्यातील तरुण वर्ग पुढे आला आहे. रखडलेल्या रेल्वे टर्मिनसचे काम मार्गी लागावे तसेच या ठिकाणी वंदे भारत एक्सप्रेस थांबा देण्यात यावा या मागणीसाठी माजी आमदार जयानंद मठकर यांचे नातू व सावंतवाडी रोट्रॅक्ट कल्ब अध्यक्ष मिहिर मठकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज खासदार राऊत यांची भेट घेतली यावेळी त्यांना निवेदन देत त्यांच्याशी चर्चा केली.

यावेळी भावेश भिसे ,साहिल नाईक, प्रणय गावडे, रौनक रेडीज आदी उपस्थित होते. यावेळी खासदार विनायक राऊत म्हणाले, सावंतवाडी रोड रेल्वे टर्मिनस व्हावे म्हणून सतत पाठपुरावा सुरू आहे. टर्मिनस झाल्यावर विशेषतः सर्वच रेल्वेना थांबा मिळेल. तसेच रेल्वे स्टेशनवर पाणी भरण्याची सुविधा निर्माण होईल. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. 

तरुणांनी एकत्र येऊन त्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे त्याबद्दल खासदार विनायक राऊत यांनी धन्यवाद दिले. रखडलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम मार्गी लागण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत ते काम झाल्यानंतर या ठिकाणी सर्वच गाड्या थांबतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Loading

मुंबई-गोवा महामार्गामुळे ‘हे’ गाव ठरले कमनशिबी; रोजगारावर झाला परिणाम

सिंधुदुर्ग | रस्त्यांमुळे विकास होतो; गाव आणि शहर यातील अंतर कमी होऊन रोजगाराच्या संधी वाढतात हे खरे असले तरी  मुंबई-गोवा महामार्गामुळे एका गावाच्या रोजगारावर पर्यायाने येथील गावकऱ्यांच्या उत्पन्नावर नकारात्मक परिणाम झाला आहे. . मुंबई-गोवा महामार्गाच्या रूंदीकरणामुळे या गावातील अनेक शेतकऱ्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले आहे.
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर बिबवणे गाव आहे.  मुंबई-गोवा महामार्ग दोन पदरी असताना या गावातील येथील शेतकरी खुश होता. त्याचे कारण असे की या गावात मोठ्या प्रमाणात कलिंगडे पिकवली जात होती आणि ती या महार्गावर दुतर्फा विकली जात होती. महामार्गाचा विस्तार सुरू होण्यापुर्वी हे गाव हायवेलगतचे कलिंगड विक्रीचे मोठे केंद्रच बनले होते. पुर्वी रस्त्याच्या दोन्ही बाजुला झाडे होती. तसेच गावकऱ्यांनी तात्पुरती दुकाने उभी केली होती. तात्पुरती बैठक व्यवस्था कलिंगड उत्पादकांनी हायवेलगत केली होती. प्रवाशांच्या गाड्या यायच्या, येथे विसावा घ्यायच्या आणि कलिंगड खाऊन, खरेदी करून पुन्हा प्रवासाला मार्गी लागायच्या. तेव्हा येथे दुकांनांची संख्याही अधिक होती. येथील शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे रोजगार या कलिंगड विक्रीद्वारे मिळत असे.
मात्र आता चित्र पालटले आहे. गेल्या काही वर्षात हा महामार्ग चौपदरी झाला आणि तेव्हापासून या गावाचे उत्पन्नही घटू लागले. कारण आता या महामार्गावरून गाड्या सुसाट जातात. आता येथे गाड्या क्वचितच थांबतात. त्यामुळे कमी प्रतिसादामुळे अनेक दुकाने बंद करण्याची नामुष्की येथील शेतकऱ्यांवर आली आहे. आता काही मोजकीच दुकाने येथे राहिली आहेत. या शेतकऱ्यांचे उत्पन्न पण कमालीचे घसरले आहे.  

Loading

Mansoon Updates 2023 | मान्सून सोमवारी तळकोकणात दाखल होणार – भारतीय हवामान खाते..

Monsoon 2023 : बिपरजॉय चक्रीवादळ, अल निनो तसेच अन्य काही घटकांमुळे यंदा मॉन्सूनचा वेग काहीसा मंदावला होता; परंतु आता पुन्हा मॉन्सून सक्रिय झाला असून शनिवारी तो कारवारात दाखल झाला आहे.

सोमवारी मॉन्सून गोवा आणि तळकोकणात दाखल होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सायंकाळी मॉन्सूनपूर्व सरींनी जोरदार हजेरी लावल्याने उष्म्याने हैराण झालेल्या कोकणवासियांना दिलासा मिळाला.

कर्नाटकचा बहुतांश भाग व्यापला
मॉन्सून यंदा केरळमध्ये तब्बल दहा दिवस उशिरा दाखल झाला. याचदरम्यान अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ निर्माण झाले. यामुळे मॉन्सून विस्कळीत होईल की काय, अशी भीती हवामान शास्त्रज्ञांसह सर्वांनाच होती.

मात्र, या चक्रीवादळामुळे मॉन्सून गतिमान होण्याला मदत झाल्याने संपूर्ण पश्‍चिम घाटात मॉन्सूनसरी कोसळत आहेत. मॉन्सूनने शनिवारपर्यंत केरळ, कर्नाटकचा बहुतांश भाग व्यापला असून सोमवारी गोवा आणि तळकोकणात दाखल होईल, अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. 

 

https://twitter.com/Hosalikar_KS/status/1667577466855239681?s=19

Loading

खोटी बातमी पसरवून आंबोली पर्यटनस्थळाची बदनामी; ग्रामपंचायतीकडून कारवाईची मागणी

सिंधुदुर्ग | ”आंबोली घाटात शस्त्रधारी टोळीची दहशत” या मथळ्याखाली खोटी बातमी पसरवून आंबोली पर्यटन स्थळाची बदनामी केली गेली आहे असा आरोप आंबोली ग्रामपंचायतीने एका प्रसारमाध्यमावर केला आहे.

NTC  मीडिया ब्रेकिंग न्यूज या प्रसारमाध्यमाच्या वतीने दिनांक ०६/०६/२०२३ रोजी  “आंबोली घाटात शस्त्रधारी टोळीची दहशत” या मथळ्याखाली एक बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. या बातमीत कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही आहे. सदर बातमीमुळे आंबोली पर्यटन स्थळाची बदनामी झाली असून त्याचा परिणाम येणाऱ्या पावसाळी पर्यटनावर होणार आहे. या प्रसार माध्यमाची चौकशी करून त्यांच्याकडे या बातमीबद्दल काही पुरावा असल्यास सादर करण्यास सांगावे; ठोस पुरावा न सादर केल्यास या प्रसार माध्यमाविरोधात कारवाई करण्यात यावी. तसेच या बदनामीबद्दल त्या प्रसार माध्यमाच्या जबाबदार व्यक्तीने आंबोलीत उपस्थित राहून माफी मागावी व इतर माध्यमांमध्ये प्रसिद्ध करावी. अशा आशयाचे पत्र ग्रामपंचायतीने पोलीस निरीक्षक, सावंतवाडी यांना दिली आहे. 

 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search