Category Archives: कोकण
सावंतवाडी : मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपास वर एक अपघात झाला आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासवरून कणकवलीच्या दिशेने वेगात जाणारी कार ब्रिजवरून थेट महामार्गा वरून खाली कोसळली. या अपघातात रुपेश पांडुरंग तांबे ( ३५, रा. जिल्हा कारवार, कर्नाटक ) हा जखमी झाला असून त्याला उपचारार्थ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारवार येथून तो कणकवली येथे जात असताना मळगांव हायवे ब्रीज वर हा अपघात घडला.
पनवेल: पनवेल तालुक्यासह कामोठे शहरात आज सकाळी 9 वाजून 50 मिनिटांच्या आसपास सौम्य हादरे होऊन कंप झाल्याचं समोर आलं आहे. यावेळी अनेक इमारती हालल्याचं बोललं जात आहे. तसंच घरातील समानदेखील काहीसं हलताना दिसून आल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं आहे. भूकंपाच्या 2.9 रिश्टर स्केलच्या सौम्य धक्क्याने नवी मुंबई व पनवेल परिसर हादरुन गेला होता.
हादरे येण्यापूर्वी एक मोठा आवाज झाला आणि आणि काही सेकंदासाठी कंप झाल्याचं जाणवलं. मात्र हा धक्का सौम्य असल्याने कोणतंही नुकसान झालेलं नाही. अरबी समुद्रात भूकंपाचं केंद्र होतं. दुपारी वेधशाळेने माहिती दिल्यानंतर पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी हा भूकंपाचा सौम्य धक्का असल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले.
मुंबईच्या समुद्र किनारपट्टीतील भूगर्भात काही सेकंदांसाठी झालेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे नवी मुंबई व पनवेल परिसर हादरुन गेला होता. काही सेकंदासाठी भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिक घाबरले होते. काहींना हा नक्की भूकंप होता का अशी शंका आल्याने त्यांनी खिडक्याही उघडून पाहिल्या. दरम्यान प्रशासनालाही नेमकं काय झालं होतं याची माहिती मिळवण्यासाठी वेळ लागला. अखेर वेधशाळेने खात्रीशीर माहिती दिल्यानंतर पालिकेने अधिकृतपणे भूकंप आल्याचं जाहीर केलं.
सावंतवाडी :सावंतवाडी रोड स्थानकाला टर्मिनसचा दर्जा देण्यासाठी व नवीन रेल्वे गाड्यांना सावंतवाडी स्थानकात थांबा मिळण्यासाठी पुरेसे माध्यम असताना तसेच या स्थानकावरील अवलंबून प्रवासी वर्गाला, सावंतवाडीतील नागरिकांना, वेंगुर्ले व दोडामार्ग मधील नागरिकांना आणि कोकण रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विश्वासात न घेता कोकण रेल्वे प्रशासनाने वारंवार सावंतवाडी टर्मिनस (?) वर जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याने सावंतवाडीवासियांनी एकदिलाने व एकजुटीने वेळीच एकत्र येऊन कोकण रेल्वे प्रशासनाविरोधात लढ्यासाठी चर्चा आणि विचार विनिमय करून कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी, व सावंतवाडी रेल्वे टर्मिनस बचाव समिती 2.0 स्थापन करण्यासाठी सावंतवाडी टर्मिनस प्रेमी व समर्थकांची सभा रविवार दिनांक २६/११/२०१३ रोजी सकाळी ११.०० वाजता श्री राम वाचन मंदिर सावंतवाडी येथे आयोजित केली असल्याचे सावंतवाडी टर्मिनस प्रेमी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले असून या सभेस सावंतवाडी टर्मिनस प्रेमी व समर्थकांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही केले आहे.
अलीकडेच कोकण रेल्वेच्या एका बड्या अधिकाऱ्याने सावंतवाडीकरांना रेल्वेच तिकीट परवडत नाही म्हणून खिल्ली उडवली होती तोच प्रत्यय पुन्हा देखील घडला, ही अपमानास्पद वागणूक न कळतपणे सावंतवाडीकरांची आहे.या साठी सनदशीर तसेच कायदेशीर मार्गाने जाण्याची तयारी केली पाहिजे, या संदर्भात तरी या सभेला आपली उपस्थिती प्रार्थनीय असून या सभेस आपली उपस्थिती नोंदवावी असे आवाहन ॲड, श्री संदीप निंबाळकर, श्री अभिमन्यू लोंढे, श्री मिहिर मठकर आणि भूषण बांदिवडेकर यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
बांदा: पत्रादेवी चेकनाक्यावरून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्याच अनुषंगाने थेट पत्रादेवी-गोव्याच्या हद्दीत ज्या ठिकाणी मोपा हद्दीतला पत्रादेवी पोलिस चेकनाका आहे.
त्या ठिकाणी सिंधुदुर्ग पोलिस मोठ्या प्रमाणात गोव्यातून महाराष्ट्रात जाणाऱ्या वाहनांची काटेकोरपणे तपासणी करत असल्याचे चित्र शनिवारी (ता.१८) सायंकाळी दिसून आले.
मागच्या काही महिन्यांपासून गोव्यातून महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होत होती. पत्रादेवी चेकनाक्यावर न सापडणारी वाहने थेट सिंधुदुर्गातील बांदा, इन्सुली, आरोस या भागात अडवली जात होती आणि लाखो रुपयांची दारू हस्तगत करण्याची प्रक्रिया महाराष्ट्र पोलिस करत होते.
मात्र, पेडणे अबकारी विभागाकडून तशा प्रकारची कारवाई का होत नव्हती, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र पोलिसांनी गोव्याच्या हद्दीमध्ये येऊन मागच्या तीन दिवसांपासून ही नाकाबंदी सुरू केलेली आहे. केवळ दुचाकी नव्हे तर प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात असल्याचे चित्र पत्रादेवी चेकनाक्यावर प्रत्यक्ष भेट दिली असता दिसून आले.











