Category Archives: मुंबई

तुकाराम मुंडे, अश्विनी भिडेसह राज्यातील १० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या…

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्र सरकारने आज, ३१ मार्च २०२६ रोजी राज्यातील दहा वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या प्रशासकीय फेरबदलात सर्वात चर्चिले जाणारे नाव आहे अश्विनी भिडे यांचे. १९९५ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भूषण गगराणी यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्या मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त म्हणून पदभार स्वीकारतील. मुंबई मेट्रोसारख्या मोठ्या प्रकल्पांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या भिडे यांना ‘नो-नॉन्सेन्स’ प्रशासक म्हणून ओळखले जाते.

या बदल्यांमध्ये तुकाराम मुंढे यांची आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भ्रष्टाचाराविरोधात कडक भूमिका घेणारे मुंढे यांची ही २१ वर्षांच्या कारकिर्दीत २४वी बदली असल्याचे सांगितले जाते. प्रेरणा देशभ्रतार यांना मत्स्यव्यवसाय आयुक्तपद, पृथ्वीराज बी. पी. यांना वसई-विरार महानगरपालिका आयुक्तपद, तर विनिता वेद सिंघल यांना मृद व जलसंधारण विभागाचे प्रधान सचिवपद देण्यात आले आहे.

याशिवाय माणिक गुरसळ यांची दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव, विकास चंद्र रस्तोगी यांची वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव, परिमल सिंह यांची कृषी विभागाचे सचिव, लहू माळी यांची शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक आणि लोकेश चंद्र यांची मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. या फेरबदलांमुळे वित्त, कृषी, आपत्ती व्यवस्थापन आणि शहरी प्रशासनासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांत नवीन गती येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने प्रशासनाला अधिक कार्यक्षम आणि सुधारित करण्याच्या दिशेने हे पाऊल उचलल्याचे मानले जाते.

 

 

 

 

अटल सेतूचा विस्तार अलिबागपर्यंत होणार; मुंबई – अलिबाग अंतर दीड तासांवर येणार

   Follow us on        

​नवी मुंबई: मुंबई आणि नवी मुंबईला जवळ आणणाऱ्या ‘अटल सेतू’चा विस्तार आता थेट अलिबागपर्यंत करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सिडकोने हाती घेतला आहे. या प्रकल्पामुळे सध्या रस्ते मार्गाने मुंबई ते अलिबाग जाण्यासाठी लागणारा ४ ते ५ तासांचा वेळ कमी होऊन अवघ्या दीड तासात हे अंतर पार करता येणार आहे. या कनेक्टिव्हिटीमुळे जेएनपीटी (JNPT) आणि नियोजित नवी मुंबई विमानतळ थेट अलिबागशी जोडले जाणार असून, प्रवाशांना आणि लॉजिस्टिक क्षेत्राला याचा मोठा फायदा होणार आहे.

​सध्या उलवे भागात ७ किमी लांबीचा सहा पदरी (सिक्स लेन) कोस्टल रोड तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या मार्गाचा पुढील टप्पा द्रोणागिरीमार्गे रेवस-करंजा खाडी पुलाशी जोडण्याचा प्रस्ताव आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर एक अखंड कोस्टल कॉरिडॉर तयार होईल, ज्यामुळे नवी मुंबई विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी अत्यंत जलद कनेक्टिव्हिटी मिळेल. या प्रकल्पासाठी अंदाजे १६०० कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित असून, विस्तारासाठी २५०० ते ४००० कोटी रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित आहे.

​पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी या प्रकल्पात विशेष काळजी घेण्यात आली आहे. खारफुटीच्या (मॅंग्रोव्हज) जंगलांचे नुकसान टाळण्यासाठी काही भागांत ‘एलिव्हेटेड’ रस्ता उभारण्यात येणार आहे. स्टिल्ट्सवर हा रस्ता बांधल्यामुळे जमिनीवरील पर्यावरणाची हानी टाळता येईल. या मार्गामुळे पाम बीच रोडसह इतर मुख्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होईल आणि अटल सेतूपासून द्रोणागिरीपर्यंतचा प्रवास ‘सिग्नलमुक्त’ झाल्याने प्रवाशांचे २० ते ३० मिनिटे वाचणार आहेत.

​या प्रकल्पामुळे केवळ वेळच वाचणार नाही, तर रेवस-करंजा पुलामुळे कोकण भाग थेट रस्त्याने जोडला जाईल. परिणामी, सध्याच्या फेरीबोटींवरील ताण कमी होईल आणि अलिबागसह संपूर्ण कोकण पट्ट्यातील पर्यटनाला मोठी चालना मिळेल.

धक्कादायक! बदलापूर लोकल ट्रेनवर दगडफेक; एक महिला प्रवासी जखमी

   Follow us on        

मुंबई, २८ मार्च २०२६: मुंबईतील लोकल ट्रेन प्रवास पुन्हा एकदा असुरक्षित ठरला आहे. शुक्रवार, २७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७:१४ च्या बदलापूर लोकल ट्रेनवर दादर रेल्वे स्थानकाच्या अगदी आधी मोठा दगड फेकण्यात आला. या घटनेत महिलांच्या डब्यात बसलेल्या एका महिलेला डोळ्याला गंभीर जखम झाली.

ही गाडी दादर स्टेशनजवळ जस्ट थांबत असताना डाव्या बाजूने (लेफ्ट साइड) जोरदार दगड आला आणि थेट महिलांच्या डब्यात घुसला. तो दगड एका महिलेच्या डोळ्याखाली लागला आणि मोठ्या प्रमाणात रक्त वाहू लागले. सहप्रवासी महिलांनी  तिची मदत केली. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली आहे.

मुंबई सेंट्रल रेल्वेचे डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर (DRM) यांनी घटनेची दखल घेतली आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) ला तातडीने चौकशीचे निर्देश दिले आहेत. मुंबईतील लोकल ट्रेनवर दगडफेकीच्या घटना गेल्या काही दिवसांत वारंवार घडत आहेत. यापूर्वी वंदे भारत एक्सप्रेससह इतर ट्रेनांवरही अशा घटना घडल्या होत्या. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाने कडक उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. अज्ञात दगडफेक करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे.

 

मुंबई–सुरत लोकल ट्रेन लवकरच सुरू होणार

   Follow us on        

मुंबई: मुंबई–सुरत दरम्यान उपनगरी (सबर्बन) रेल्वे सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण हालचाली सुरू झाल्या असून, गुजरात राज्यातील प्रवाशांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी ठरण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वे (WR) प्रशासन या मार्गावर आधुनिक नमो भारत रॅपिड ट्रान्झिट ट्रेन तसेच सुधारित मेनलाइन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट (MEMU) गाड्या चालवण्याचा विचार करत आहे.

सध्या विरार ते सुरत दरम्यान MEMU गाड्या धावतात; मात्र या गाड्या सुमारे ३० थांबे घेत असल्याने प्रवासाला ५ तासांहून अधिक वेळ लागतो. तसेच दिवसातून मर्यादित फेऱ्या असल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर गैरसोय सहन करावी लागते. यामुळे मुंबई–सुरत दरम्यान अधिक वेगवान, आरामदायी आणि वारंवार धावणारी सेवा सुरू करण्याची गरज व्यक्त केली जात होती.

याच पार्श्वभूमीवर नमो भारतसारख्या आधुनिक गाड्यांचा पर्याय समोर आला आहे. या गाड्यांमध्ये एसी आणि नॉन-एसी डबे, शौचालय सुविधा, आरामदायी आसन व्यवस्था आणि जास्त वेग अशा सुविधा उपलब्ध आहेत. सध्याच्या लोकल (EMU) गाड्यांमध्ये शौचालय नसल्यामुळे ३ तासांपेक्षा जास्त प्रवास करणे अवघड होते. त्यामुळे लांब पल्ल्याच्या उपनगरी सेवेसाठी अशा आधुनिक गाड्या अधिक उपयुक्त ठरू शकतात.

या योजनेअंतर्गत सुरत रेल्वे स्थानकावर उपनगरी गाड्यांसाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्म उभारण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. सुरत स्टेशनचा सुमारे ₹१,५०० कोटींचा पुनर्विकास प्रकल्प सुरू असून, तो डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या नव्या स्टेशनला मेट्रो, बुलेट ट्रेन आणि विमानतळाशीही जोडले जाणार आहे, ज्यामुळे एकात्मिक वाहतूक व्यवस्था तयार होईल.

जर मुंबई–सुरत उपनगरी रेल्वे सेवा प्रत्यक्षात आली, तर हजारो रोजंदारी कामगार, व्यावसायिक आणि छोट्या उद्योगांशी संबंधित प्रवाशांना मोठा फायदा होईल. प्रवासाचा वेळ कमी होईल, रेल्वेवरील ताण कमी होईल आणि रस्ते वाहतुकीवरील दबावही घटण्यास मदत होईल.

एकूणच, मुंबई–सुरत दरम्यान उपनगरी रेल्वे सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव हा भविष्यातील दळणवळणासाठी गेमचेंजर ठरू शकतो. आता या योजनेची अंमलबजावणी किती लवकर होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मनसेचा दुसरा ‘प्रहार’! बंद केलेली गाडी सुरू करण्यासाठी कोकण रेल्वे मुख्यालयावर धडक

   Follow us on        

नवी मुंबई: कोकण रेल्वेच्या प्रवाशांना सातत्याने भेडसावणाऱ्या अडचणींविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज बेलापूर येथील कोकण रेल्वे मुख्यालयावर धडक देत जोरदार निषेध नोंदवला. कोकणातील चाकरमान्यांची जीवनवाहिनी असलेल्या रेल्वे सेवेत होणारी गैरसोय, तसेच ‘दादर–रत्नागिरी पॅसेंजर’सारख्या महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्याच्या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर मनसेच्या शिष्टमंडळाने रेल्वे प्रशासनाला निवेदन सादर करून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली.

मनसेने स्पष्ट इशारा देताना सांगितले की, प्रवाशांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आणि रद्द केलेल्या गाड्या त्वरित पूर्ववत न केल्यास पक्ष आपल्या आक्रमक शैलीत आंदोलन उभे करेल.

या वेळी लहू थळे, स्वप्निल पंडित, प्रथमेश म्हात्रे, अक्षय वानखेडे, सविनय म्हात्रे, विलास घोणे, सचिन कदम यांच्यासह बेलापूर विभागातील प्रकाश कोकाटे, प्रशांत कोळी, शशी कोळी, सिद्धेश गायकवाड, ऋषिकेश पवार आणि चंद्रकांत कोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यापूर्वी मनसेच्या शिष्टमंडळाने मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मध्य रेल्वेच्या मुख्यालयात धडाक देऊन दादर रत्नागिरी गाडी दादर येथून सोडण्याची मागणी केली आणि तसे न केल्यास मनसे स्टाइलने आंदोलन करू अशा इशारा दिला होता.

कोकणवासीयांना न्याय मिळेपर्यंत आणि त्यांच्या प्रवासातील अडचणी दूर होईपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचे मनसेकडून सांगण्यात आले.

दादर – रत्नागिरी गाडी बंद होऊ देणार नाही; प्रताप सरनाईक यांची ग्वाही

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्रातील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दादर-रत्नागिरी प्रवासी गाडी बंद होणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही दिली आहे. केंद्रीय रेल्वेने या गाडीचा दादर स्टेशनवरील प्रस्थान स्लॉट रद्द करून तो दादर-गोरखपूर एक्सप्रेसला कायमस्वरूपी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे गाडी आता दिवा स्टेशनवरून सुरू होणार असल्याने कोकणातील दररोजच्या प्रवाशांना, विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या कामगार आणि विद्यार्थ्यांना मोठी गैरसोय होणार होती.

या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (एमएनएस) आज, २४ मार्च २०२६ रोजी जोरदार विरोध प्रदर्शन केले. कोकणी माणसांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी १५ दिवसांत गाडी पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी गाडी बंद होऊ देणार नाही, असे सांगितले.

कोकण रेल्वे मार्गावरील ही प्रवासी गाडी स्थानिक लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्य देण्याच्या रेल्वेच्या धोरणामुळे स्थानिक सेवांवर परिणाम होत असल्याबाबत सातत्याने वाद उफाळून येत आहेत. या मुद्द्यावरून महाराष्ट्रात राजकीय खळबळ माजली असून, जर लवकर तोडगा न निघाल्यास आंदोलने तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

”दादर-रत्नागिरी पॅसेंजरसह कोविड काळात बंद झालेल्या गाड्या सुरू करा अन्यथा…” मनसेचा रेल्वे प्रशासनाला इशारा

   Follow us on        

मुंबई: कोकणवासीयांसाठी महत्त्वाची असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर (गाडी क्र. ५०१०३/४) रद्द करून त्याऐवजी दादर-गोरखपूर गाडी सुरू करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र निषेध केला आहे. मनसे नेते आणि माजी आमदार नितीन सरदेसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन या निर्णयाचा विरोध केला आणि मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.

​स्थानिक प्रवाशांच्या अडचणींकडे दुर्लक्ष

​नितीन सरदेसाई यांनी रेल्वे प्रशासनाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, गेल्या काही काळापासून महाराष्ट्रांतर्गत धावणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करून परराज्यातील गाड्यांना प्राधान्य दिले जात आहे. कोविड काळात बंद झालेल्या मुंबई-कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस, मुंबई-मनमाड गोदावरी एक्सप्रेस आणि पुणे-भुसावळ पॅसेंजर यांसारख्या अनेक गाड्या अद्याप सुरू करण्यात आलेल्या नाहीत. अशातच आता दादर-रत्नागिरी ही कोकणवासीयांची हक्काची गाडी रद्द करून त्याऐवजी गोरखपूर गाडी सुरू करणे, हा कोकणवासीयांवर अन्याय आहे.

​प्रमुख मागण्या आणि इशारा:

​दादर-रत्नागिरी पॅसेंजर पूर्ववत दादर स्थानकावरूनच सोडण्यात यावी.

​कोविड काळात रद्द करण्यात आलेल्या महाराष्ट्रांतर्गत गाड्या पुन्हा त्वरित सुरू कराव्यात.

​स्थानिक प्रवाशांना डावलून परराज्यातील प्रवाशांना झुकते माप देणे रेल्वेने थांबवावे.

​”कोकणवासीयांना आणि महाराष्ट्रातील जनतेला डावलून परराज्यातील प्रवाशांना प्राधान्य देणे हा दुजाभाव रेल्वे प्रशासनाकडून वारंवार केला जात आहे. रेल्वेने या निर्णयाची तात्काळ दखल घेऊन कोकणवासीयांना दिलासा द्यावा, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल,” असा सज्जड दम नितीन सरदेसाई यांनी दिला आहे.

​या निवेदनाच्या प्रती रेल्वे मंत्री (नवी दिल्ली) आणि कोकण रेल्वेचे व्यवस्थापक (बेलापूर) यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे कोकणवासीय आणि मुंबईकर प्रवाशांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून, आता रेल्वे प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mumbai – Pune Connectivity: मुंबई पुणे महामार्गाचा भार कमी करण्यासाठी पर्यायी महामार्गाला मंजूरी

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्र सरकारने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा म्हणून महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील पायाभूत सुविधा समितीने नेरळ-शिरूर (उरण-शिरूर) चौपदरी महामार्ग प्रकल्पाला तत्त्वतः मंजुरी दिली आहे.

सुमारे १२०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे प्रवासासाठी एक नवीन पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. हा १२० किलोमीटर लांबीचा महामार्ग नवीन मुंबईतील नेरुळ/उरण येथून सुरू होऊन कर्जत, नेरळ, पाबळ, मलठण येथून शिरूर (पुणे-अहिल्यानगर महामार्ग) पर्यंत जाईल. यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील भार लक्षणीयरीत्या कमी होईल, इंधनाची बचत होईल आणि प्रवासाचा वेळ कमी होईल. शिवाय चाकण, तळेगाव, शिक्रापूरसारख्या औद्योगिक क्षेत्रांना चांगली जोडणी मिळेल आणि रायगड व पुणे जिल्ह्यातील रिअल इस्टेट व लॉजिस्टिक्स क्षेत्राला मोठी चालना मिळेल.

खासदार अमोल कोल्हे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा निर्णय झाल्याचे सांगितले जाते. तथापि, अनेक नागरिक सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना म्हणत आहेत की, “घोषणा तर होतात, पण प्रत्यक्षात काम कधी सुरू होईल?” अशा अनेक प्रकल्पांप्रमाणे या महामार्गाचे काम लवकरात लवकर सुरू व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास मुंबई-पुणे वाहतुकीला नवी गती मिळेल आणि महाराष्ट्राच्या एकात्मिक विकासाला हातभार लागेल.

 

 

मुंबई उपनगरीय लोकल सेवा संपूर्णपणे एसी करण्याच्या दिशेने प्रवास सुरू

   Follow us on        

मुंबई: मुंबईत उन्हाळ्याचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, घामाघूम करणाऱ्या उकाड्यामुळे मुंबईकरांचा कल आता वातानुकूलित (AC) लोकल प्रवासाकडे मोठ्या प्रमाणावर वळताना दिसत आहे. साधारणपणे मार्च महिन्यापासूनच उष्णतेने जोर धरल्याने एसी लोकलच्या प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. पश्चिम रेल्वेच्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारीत दररोज सरासरी १.५८ लाख असणारी प्रवाशांची संख्या मार्चमध्ये २.०५ लाखांच्या पार गेली आहे. एप्रिल आणि मे महिन्यापर्यंत या गर्दीत आणखी ३० ते ४० टक्क्यांनी वाढ होईल, असा अंदाज रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.

पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील फेऱ्यांचा विस्तार

प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये सातत्याने वाढ केली आहे. सध्या पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १० एसी गाड्या असून त्याद्वारे दररोज १३३ फेऱ्या चालवल्या जात आहेत. २०२३ मध्ये या फेऱ्यांची संख्या केवळ ९६ होती, ज्यामध्ये आता २८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे, मध्य रेल्वेवरही २०२३ मध्ये असणाऱ्या ६६ फेऱ्यांची संख्या २०२६ पर्यंत ९४ वर पोहोचली आहे. जसजसे नवीन रेल्वे संच उपलब्ध होतील, तसतसे या फेऱ्यांचे नियोजन आणखी वाढवण्यात येणार आहे.

मुंबईकरांच्या सेवेत येणार २३८ नवीन एसी लोकल

मुंबईची उपनगरीय रेल्वे सेवा पूर्णपणे वातानुकूलित करण्याच्या दिशेने मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (MRVC) मोठे पाऊल उचलले आहे. ‘एमयूटीपी-३’ आणि ‘३-ए’ प्रकल्पांतर्गत सुमारे १९,२९३ कोटी रुपये खर्चून एकूण २३८ नवीन एसी लोकल खरेदी करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. सध्या या गाड्यांच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरू असून, या नवीन गाड्या दाखल झाल्यामुळे भविष्यात मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर आणि गारवा देणारा होणार आहे.

एसी लोकलच्या फेऱ्या वाढवणे ही प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असली, तरी अनेक प्रवाशांनी या गाड्यांच्या वक्तशीरपणाबाबत आग्रही भूमिका मांडली आहे. फेऱ्यांची संख्या वाढवण्यासोबतच गाड्या वेळेवर धावणे गरजेचे असल्याचे मत नियमित प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. रेल्वे प्रशासन सध्या उपलब्ध संसाधनांचा वापर करून जास्तीत जास्त प्रवाशांना गारव्याचा प्रवास देण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून वाढत्या उष्णतेपासून मुंबईकरांना दिलासा मिळेल.

मुंबई विमानतळावर ६४ कोटींचे ड्रग्ज जप्त; चार जणांना अटक

   Follow us on        

मुंबई: मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने (AIU) ड्रग्ज तस्करीच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. बँकॉकमधून आणलेले सुमारे ६४ कोटी ३९४ लाख रुपये मूल्याचे ‘हायड्रोपोनिक कॅनाबिस’ (उच्च दर्जाचा गांजा) जप्त करण्यात आले असून, या प्रकरणी एका परदेशी नागरिकासह तीन भारतीय अशा एकूण चार प्रवाशांना ताब्यात घेण्यात आले आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, बँकॉकमधून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची खात्रीलायक माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, विमानतळ प्रशासनाने मंगळवारी एक विशेष शोध मोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत बँकॉकमधून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची आणि त्यांच्या सामानाची कसून तपासणी करण्यात आली. याच दरम्यान संशयास्पद हालचालींवरून चार प्रवाशांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.

​तपास अधिकाऱ्यांनी या चारही आरोपींच्या सामानाची झडती घेतली असता, त्यात ६४ किलो ३९४ ग्रॅम हायड्रोपोनिक कॅनाबिस लपवून ठेवल्याचे आढळले. चौकशीत असे समोर आले की, आरोपींनी हे अमली पदार्थ बँकॉकमध्ये मिळवले होते आणि ते मुंबईतील त्यांच्या साथीदारांपर्यंत पोहोचवणार होते. या कामाच्या बदल्यात त्यांना विमानाची तिकिटे आणि ठराविक कमिशनचे आमिष दाखवण्यात आले होते. मात्र, विमानतळाच्या आवारातून बाहेर पडण्यापूर्वीच त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

​या कारवाईनंतर चारही प्रवाशांविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या (NDPS Act) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींना बुधवारी किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे न्यायालयाने त्यांची गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊन १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचे हात गुंतले आहेत का, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search