Category Archives: महाराष्ट्र

सावधान | विश्रांती घेतलेला पाऊस परतणार; ‘या’ जिल्ह्यांना पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा

 

Heavy Rainfall Warning : बांगलादेश किनार्‍यावर बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (Deep Depression) निर्माण झाले असून ते संध्याकाळपर्यंत खेपुपाराच्या पूर्वेला बांगलादेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील २४ तासांत Gangetic WestBengal ओलांडण्याची शक्यता असल्याने पुढील ४,५ दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यताभारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान खात्याने येत्या ४ दिवसांचा राज्यातील पावसाचा अंदाज जाहीर केला असून काही विभागांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. 

आज दिनांक ०१ ऑगस्ट रोजी सातारा आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दिनांक ०२ ऑगस्ट रोजी या दोन जिल्हय़ाव्यतिरिक्त पुणे आणि रायगड जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 

दिनांक ०३ ऑगस्ट रोजी वरील चार जिल्ह्या व्यतिरिक्त ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे.

दिनांक ०४ ऑगस्ट रोजी कोणत्याही जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला गेला नाही आहे. 

अलर्ट आणि त्यांचे अर्थ 

⊗ ग्रीन अलर्ट – धोका नाही Green Alert

⊗ यलो अलर्ट – सतर्क रहा Yellow Alert

⊗ ऑरेंज अलर्ट – तयार रहा Orange Alert

⊗ रेड अलर्ट – कृतीची वेळ Red Alert

 

 

समृद्धी महामार्गाच्या कामावेळी मोठी दुर्घटना; क्रेन कोसळल्याने १७ जणांचा मृत्यू.

ठाणे : गर्डर मशिन कोसळल्याने समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी मोठी दुर्घटना घडली आहे. ठाण्याजवळ शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाच्या कामावेळी गर्डर मशिन कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे.यामध्ये १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार ते पाच जण जखमी आहेत.

समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी ही मोठी दुर्घटना घडली आहे. ठाण्याजवळ शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाच्या कामावेळी गर्डर मशिन कोसळली.घटनेची माहिती मिळताच बचाव पथक आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून मृतांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. जखमींना ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल व शहापूर मधील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून जवळपास 10 ते 15 जण तिथं अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाऊस आणि चिखलामुळे सध्या मदतकार्यात अडथळे येत असल्याचीही माहिती आहे.

हा अपघात इतक्या भीषण स्वरुपाचा होता की, त्याबाबतची माहिती मिळताच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे मालेगाव येथून अपघात स्थळी पोहचले आणि त्यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला.

आता सर्व विषयांसाठी एकच पुस्तक; विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे हलके होणार

संग्रहित छायाचित्र

मुंबई: शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तरांचं ओझं कमी व्हावं यासाठी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर एक नवीन प्रयोग हाती घेत आहेत. आता विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे एकच पुस्तक तयार करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक वर्गात दर तीन महिन्याने सेमिस्टरमध्ये 3 ते 4 पुस्तक एकत्र करुन एकच पुस्तक शाळेत आणावे लागणार आहे. प्रयोग पहिली ते सातवी पर्यंतच्या इयत्तेसाठी असणार आहे

पहिले ते पाचवीतील विद्यार्थ्यांना वर्षातून तीन महिन्याला 1 पुस्तक अशी तीन पुस्तकं असतील. यामध्ये सर्व विषयाचा अभ्यासक्रम एकत्र केला जाणार आहे. तर सहावी आणि सातवीसाठी वर्षभरात चार पुस्तकामध्ये या वर्गाचा अभ्यासक्रम पूर्ण असणार आहे. त्यामुळे वर्षात 3 ते 4 पुस्तकं दर तीन महिन्यात बदलावी जरी लागत असली तरी वर्गात मात्र शिकण्यासाठी एकच पुस्तक घेऊन जावं लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे हा विषय सातत्याने चर्चेत असतो. न्यायालयाने या मुद्द्यावरुन शिक्षण विभागाला वारंवार फटकारले आहे.

सध्या शाळेचे वेळापत्रक पाहून विद्यार्थी रोज पाच ते सहा पुस्तके , वह्या दप्तरात घेऊन जातात. आता मात्र हा प्रयोग प्रत्यक्षात आला तर विद्यार्थ्यांना दप्तरात एकच पुस्तक न्यावं लागणार आहे.

सुरुवातीला पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी काही जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर हा उपाय अमलात येणार आहे. सर्व विषयांसाठी एकच पुस्तक तयार करण्याचा प्रयोग केला जाणार असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काल नाशिक मध्ये दिली..

 

 

बारसु येथील प्रस्तावित रिफायनरी पाकिस्तानात जाणार?

मुंबई :बारसु येथील प्रस्तावित रिफायनरीबाबत एक महत्वाची  बातमी  आहे. बारसु येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प पाकिस्तानला जाणार असल्याचं वृत्त समोर आले आहे . कोकणातील नाणार येथे होणारा देशातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प आपल्याला मिळावा म्हणून पाकिस्तान प्रयत्न करत आहे. या प्रकल्पात सर्वात मोठी गुंतवणूक असलेल्या सौदी अराम्कोने या तेल कंपनीने आता पाकिस्तानातील ग्वादर शहराची निवड केली आहे. 10 अब्ज डॉलर्स गुंतवणुकीच्या सामंजस्य करारावर पाकिस्तान आणि सौदी अरेबियाने स्वाक्षरी केल्याची बातमीही प्रसिद्ध झाल्याचे समजते. याबाबत भारतातील सत्ताधारी पक्षाने अधिकृतरीत्या काहीही जाहीर केले नसले तरी भाजपचे आशिष शेलार यांनी याबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे.
आशिष शेलार यांचे आरोप
कोकणात प्रस्तावित असणारी रिफायनरी पाकिस्तानात चालली आहे यासाठी आशिष शेलार यांनी विरोधी पक्षाला या बाबत जबाबदार धरले आहे. गेली सहा वर्षे नाणार येथे रिफायनरीला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी कोकण, महाराष्ट्र आणि देशाचे कोट्यवधीचे नुकसान केले आहे.  प्रकल्प भारताला मिळू नये म्हणून ज्या आंतरराष्ट्रीय शक्ती काम करतात त्या नाणार विरोधी आंदोलनात सहभागी तर नव्हत्या? देश विरोधी आंतरराष्ट्रीय शक्तींशी प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांची हातमिळवणी तर नव्हती? उद्धव ठाकरे नाणारला विरोध करुन सरळ सरळ पाकिस्तानला मदत केली?, असा आरोपच शेलार यांनी केला.

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार; अर्ज कसा कराल? जाणून घ्या स्पर्धंच्या नियम व अटी

मुंबई : यंदा गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहेत. राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांना अनुक्रमे पाच, अडीच आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असून या स्पर्धेत अधिकाधिक मंडळांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
राज्यात सन २०२२ मधील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यात आले होते. त्या अनुषंगाने सन २०२३ मध्ये राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पारितोषिक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठीचा निधी आणि या पुरस्कारसाठीचे निकष याबाबतीत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.
या पुरस्कारासाठीच्या २४ लाख ६० हजार रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या पुरस्कारांसाठी निवड होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी विविध निकष असतील. त्यांना गुण दिले जातील. या स्पर्धेत धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल, असे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
पुरस्कार निवडीसाठी १० निकष
सहभागी होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची पुरस्कारासाठी निवड दहा निकषांच्या आधारे करण्यात येईल. १० निकषांसाठी एकूण १५० गुणांक आहेत. पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूकर सजावट, ध्वनीप्रदुषणविरहीत वातावरण, समाजप्रबोधनात्मक सजावट/देखावा, स्वातंत्र्याच्या चळवळीसंदर्भात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त सजावट,देखावा, मंडळामार्फत करण्यात येणारे सामाजिक कार्य, शैक्षणिक, आरोग्य आदीसंबंधी कार्य, पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांचे आयोजन, पारंपरिक, देशी खेळांच्या स्पर्धा, गणेश भक्तांना पुरविण्यात येणाऱ्या प्राथमिक सुविधा आदी निकषानुसार गुण देण्यात येणार आहेत.संबधित अर्जाचा नमुना पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या [email protected] या ईमेलवर ५ सप्टेंबरपर्यंत अर्ज ऑनलाईन सादर करणे अपेक्षित आहे. ८ सप्टेंबरपूर्वी अकादमीमार्फत जिल्हानिहाय अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
जिल्हास्तरीय समिती स्थापन होणार
जिल्हास्तरीय विजेत्यांची निवड करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात येणार असून उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी अध्यक्ष, जिल्हा नियोजन अधिकारी सदस्य सचिव तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, शासकीय कला महाविद्यालयातील कला प्राध्यापक, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्ह्यातील पोलीस अधिकारी हे सदस्य असतील.
प्रत्येक जिल्ह्यातून ३ गणेशोत्सव मंडळाची निवड व शिफारस समितीमार्फत राज्य शासनाकडे करण्यात येईल. राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची निवड करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय पहिल्या क्रमांकास ५ लाख रुपये, द्वितीय क्रमांकास २ लाख ५० हजार रुपये आणि तृतीय क्रमांकास १ लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झालेल्या तीन मंडळांशिवाय अन्य गणेशोत्सव मंडळांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल.

SSC बोर्डाचा शुक्रवारी (ता.२८) होणारा दहावीचा पेपर पुढे ढकलण्यात आला

मुंबई : दहावी पुरवणी परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शुक्रवारी (ता.२८) होणारा दहावीचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे.गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच काही जिल्ह्यांमध्ये येत्या २४ तासांत मुसळणार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
त्या पार्श्वभूमीवर दहावीचा शुक्रवारी होणारा सामाजिक शास्त्रे पेपर-एक, इतिहास व राज्यशास्त्र हा पेपर पुढे ढकलला आहे. आता हा पेपर आता ३ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत होईल, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे.

गणेशोत्सव विशेष गाड्यांच्या आरक्षणाची तारीख जाहीर.

संग्रहित फोटो

Konkan Railway News : कोकण रेल्वे मार्गावर अतिरिक्त गाड्यांच्या आरक्षणाची तारीख रेल्वे प्रशासनाने जाहीर केली आहे. खालील गाड्यांचे आरक्षण दिनांक २७ जुलै रोजी रेल्वेच्या सर्व तिकीट खिडक्यांवर आणि अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध करण्यात येणार आहेत.

१)गाडी क्र. ०९०१० सावंतवाडी रोड – मुंबई सेंट्रल (आठवड्यातील ६ दिवस) विशेष

२) गाडी क्र. ०९०१७ मडगाव जं. – उधना (साप्ताहिक) विशेष.

३) गाडी क्र. ०९१४९ कुडाळ – विश्वामित्री (साप्ताहिक) विशेष.

ज्येष्ठ मराठी अभिनेते जयंत सावरकर पडद्याआड

मुंबई: कोकणात मूळ असलेले ज्येष्ठ मराठी अभिनेते जयंत सावरकर यांचे आज २४ जुलै रोजी ठाणे येथे निधन झाले. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.   त्यांच्या पार्थिवावर उद्या दिनांक २५ जुलै रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत.

गेल्या चार दशकांहून अधिक काळ त्यांनी सिनेसृष्टीत आपला दबदबा निर्माण केला होता. लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत सर्वांना आपलीशी करतील अशी विविध पात्र त्यांनी साकारली. त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली असून, चाहते आणि मनोरंजन विश्वातील मंडळी या घटनेनंतर शोक व्यक्त करत आहेत.

०३ मे १९३६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये जन्मलेल्या सावरकरांनी वयाच्या विसाव्या वर्षापासून अभिनय कारकिर्दीस सुरुवात केली. त्यांनी अनेक वर्ष बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणूनही काम पाहिले होते. सावरकर यांनी शंभरहून मराठी नाटकांमध्ये भूमिका केल्या, शिवाय त्यांनी ३० हून अधिक हिंदी सिनेमातही काम केले. सावरकर ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. याकरता त्यांची निवड बिनविरोध झाली होती. त्यांच्या अलीकडच्या काही दिवसांमधील कामाविषयी बोलायचे झाल्यास ते काही महिन्यांपूर्वीच ‘आई कुठे काय करते’ मालिकेत दिसले होते. या मालिकेत त्यांनी कांचन आजींच्या भावाची भूमिका साकारली. शिवाय ‘समांतर’ या स्वप्निल जोशीच्या वेब सीरिजमध्ये त्यांनी केलेली भूमिकाही विषेश गाजली

 

ब्रेकिंग | कोल्हापुरात पंचगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा


कोल्हापूर : राज्यात अनेक ठिकाणी पावसाने धुमाकूळ घातला असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाने जोर धरला असून पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे.आता ती धोका पातळीकडे हळूहळू सरकत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. पुराचे सावट असलेल्या भागातील नागरिकांना सतर्कतेच इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे नदीची पाणी पातळी वाढत चालली आहे. रविवारी पंचगंगा नदी इशारा पातळीकडे वाटचाल करत होती. पहाटे तीन वाजता ३९ फूट ही इशारा पातळी पंचगंगेने गाठली. जिल्ह्यातील पाण्याखालील एकूण बंधाऱ्यांची संख्या ८२ इतकी झाली आहे. पुराचे पाणी आल्यामुळे शिवाजी पूल – गंगावेश रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत सुतारवाडा, उलपे मळा, कसबा बावडा येथील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर दरड कोसळली; पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तिन्ही लेन वाहतुकीसाठी बंद

Mumbai Pune Expressway Landslide |पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगद्याजवळ रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. दरम्यान, पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तिन्ही लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या आहेत.

महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील आडोशी गावाच्या हद्दीत रविवारी रात्री दरड कोसळली. त्यामुळे डोंगरभागातून मातीचा लगदा महामार्गावरील तिन्ही लेनवरती पडला. त्यामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तिन्ही लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या आहेत.

पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाताना बोगद्याजवळ दरड कोसळली आहे. पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर दररोज लाखो वाहनांची वर्दळ असते. सुदैवाने दरड कोसळली तेव्हा त्यामध्ये कोणतेही वाहन सापडले नाही. दरड बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search