Category Archives: सिंधुदुर्ग

सावंतवाडी: आंबोली घाटरस्त्यात कोसळला भला मोठा दगड; रस्ता खचण्याची शक्यता

सावंतवाडी, दि. १७ जुलै: :  आंबोलीत काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. दरम्यान आज (दि.17) सकाळी आंबोली घाटमार्गात दरडीतील भला मोठा दगड कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणालाही हानी झाली नाही. ही घटना  सकाळी ७ च्या सुमारास घडली. .या घटनेमुळे सद्या घाटमार्गातून एकेरी वाहतूक सुरू आहे. तर दगड कोसळलेल्या ठिकाणी लहान – मोठे धबधबे असून नेहमी तेथे पर्यटकांची रेलचेल असते. त्यावेळी अशी घटना घडली असती तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती, मात्र, सकाळी ७ वा. सुमारास सदर घटना घडल्याने कोणतीही जीवीत हानी झालेली नाही. तर भला मोठा दरडीतील दगड थेट घाटमार्गात कोसळल्याने रस्त्याला मोठा खड्डा पडत भेग पडली आहे. त्यामुळे रस्ता खचण्याची शक्यता आहे.



वाहन चालकांनी याबाबतची माहिती आंबोली दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई यांना दिली. त्यानंतर त्यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला माहिती दिली. सध्या जेसीबीच्या सहाय्याने हा दगड हटविण्याचे काम सुरु आहे. सुदैवाने या घटनेवेळी त्या ठिकाणी कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. सद्यस्थितित या भागातून एकेरी वाहतूक सुरू असल्याची माहिती दत्तात्रय देसाई यांनी दिली आहे.

आंबोली: हुल्लडबाजीच्या सर्व मर्यादा पार, जिल्हा परिषद शाळेतच पर्यटकांची मद्य पार्टी

सावंतवाडी : आंबोलीत पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांकडून हुल्लडबाजी केल्याच्या बर्‍याच तक्रारी येत आहेत. आता तर काही पर्यटकांनी चक्क विद्येचे माहेरघर असलेल्या शाळेतच मद्याची पार्टी करून हद्दच पार केली आहे. आंबोली गावठणवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत मद्यधुंद अवस्थेत असलेल्या हुल्लडबाज लोकांकडून विद्येचे मंदीर असणाऱ्या शाळेत मद्यपानास बसल्याची घटना घडली. भाजप माजी तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. देवस्थान, मंदीर परिसरात असे प्रकार घडता नये याची काळजी पोलिसांकडून घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा जनतेला यात लक्ष घालावे लागेल असा इशारा श्री. गावडे यांनी दिला आहे‌.





आंबोली गावठणवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार घडला. माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे येथील शाळेत वह्या वाटपाच्या कार्यक्रमासाठी गेले असता पालकांनी संबंधितांचा व्हिडिओ दाखवत आपली कैफियत त्यांच्यासमोर मांडली. यानंतर पोलिस निरिक्षकांच संदीप गावडे यांनी लक्ष वेधल‌. श्री गावडे म्हणाले, अशा लोकांना पर्यटक म्हणणार नाही. केवळ मद्य पिऊन मजा करायला येणारी ही लोक आहेत. शाळेत केलेला हा प्रकार निंदनीय आहे. शाळेत वह्या वाटपाच्या कार्यक्रमासाठी गेलो असता तिथल्या पालकांनी ही व्यथा मांडली. मन हेलावून टाकणारा हा प्रकार आहे. पर्यटनाच्या नावाखाली होणारा त्रास कमी झाला पाहिजे. शाळा, देवस्थान असतील अशा ठिकाणी असे प्रकार घडता नयेत. बाहेरून येणारे पर्यटक या ठिकाणी हुल्लडबाजी करतात. हे प्रकार बंद झाले पाहिजेत. याबाबत पोलिसांनी माहिती देऊन त्याप्रकारचं निवेदन दिले आहे. आंबोली, चौकुळ भागात ज्या ठिकाणी असे प्रकार होतात त्याबद्दल पोलिसांना कल्पना दिली आहे. ताबडतोब कारवाईची मागणी केली आहे. विशेषतः शनिवारी, रविवारी असे प्रकार घडतात. त्याला आळा घालण्याची गरज आहे. पोलिसांनी याबाबत दक्षता घेणार असल्याचे सांगितले. यापुढे असे प्रकार दिसल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तशी कारवाई न झाल्यास एक नागरिक म्हणून प्रतिकार आम्ही करू, स्थानिकांच्या बाजून आम्ही राहू. या अशाच गोष्टींमुळे मारहाणीसारखे प्रकार घडतात. त्यामुळे पोलिसांनी योग्य उपाययोजना करावी, अशा लोकांवर कारवाई न केल्यास जनता म्हणून आम्हाला त्यात लक्ष घालावं लागेल असं मत त्यांनी व्यक्त केल. यावेळी आंबोली प्रमुख गांवकर तानाजी गावडे, गेळे सरपंच सागर ढोकरे आदी उपस्थित होते.

कुडाळ: शाळकरी मुलांकडून साळगाव जांभरमळा प्राथमिक शाळेतील मुलांना वह्या वाटप

क्रिकेट व भजन मंडळाच्या माध्यमातून प्राप्त रक्कमेचा समाजोपयोगी विनियोग

   Follow us on        

साळगाव जांभरमळा येथील श्री पाटेकर बालगोपाल भजन व क्रीडा मंडळाने मे 2024 मध्ये क्रिकेट सामने आयोजित केले होते. जमा झालेल्या निधीतून या मंडळातील शाळकरी मुलांनी शैक्षणिक उपक्रम हाती घेतला. साळगाव जांभरमळा प्राथमिक शाळेतील मुलांना वह्या वाटप करून या मंडळातील शाळकरी मुलांनी सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे. साळगाव पंचक्रोशी मध्ये या उपक्रमाचे कौतुक होत आहे. या मंडळातील कु. चैतन्य हळदणकर, कु. स्वप्नील सामंत, कु. सर्वेश हळदणकर, कु. तुकाराम हळदणकर, कु. कुणाल पारकर, कु. अजिंक्य हळदणकर, कु. शंकर नागडे, कु. प्रथमेश डिचोलकर, कु. सोहम हळदणकर, कु. साहिल हळदणकर, कु. शुभम धुरी यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.

वह्या वाटप कार्यक्रम प्रसंगी पालकवर्गातून श्री. सुखानंद हळदणकर, श्री.निलेश सावंत, श्री.शुभम धुरी उपस्थित होते. मुख्याध्यापक श्री. प्रशांत वेंगुर्लेकर सर, शिक्षक श्री. विनेश जाधव सर यांनी साळगाव जांभरमळा शाळेच्या वतीने श्री पाटेकर बालगोपाल भजन व क्रीडा मंडळाचे आभार व्यक्त केले

सावंतवाडी: गरिबरथ एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या ७०० प्रवाशांच्या मदतीसाठी धावली रेल्वे प्रवासी संघटना

 

   Follow us on        

सावंतवाडी, दि. १५ जुलै :काल नातुवाडी (खेड) बोगद्याजवळ दरड कोसळल्याने पूर्ण कोकण रेल्वे ठप्प झाल्याने या मार्गावरील रेल्वे गाड्या ह्या विविध स्थानकावर थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. या गाड्यांत कित्येक प्रवासी अडकून पडले होते. १२२०२ गरीब रथ एक्स्प्रेस ही सावंतवाडी स्थानकात थांबवली होती. त्या गाडी ने प्रवास करणारे प्रवासी (एकूण प्रवासी ७०० पेक्षा अधिक) हे स्थानकावर असलेल्या अपुऱ्या खान -पानाच्या सुविधेमुळे त्रस्त झालेले होते, ट्रेन मधले पाणी देखील संपले होते, अशातच कोकण रेल्वे प्रवासी संघटना त्यांच्या मदतीला आली.

 

कोकण रेल्वे संघटना, सावंतवाडीचे  पदाधिकारी आणि कार्यकर्ते सावंतवाडी स्थानकावर पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. लगेचच त्यांनी कोकण रेल्वेच्या जन संपर्क अधिकाऱ्याला फोन करून गरीब रथ एक्स्प्रेस मधे पाणी भरायला लावले. लगेच अँब्युलन्सची देखील व्यवस्था संघटनेने केली. आणि सर्व लोकांना या प्रवाशांचा मदतीसाठी धावून या असे आवाहन देखील केले, त्या आवाहनाला लोकांनी चांगला प्रतिसाद देऊन जेमतेम रक्कम १०,००० रुपये जमा झाले.या  रक्कमेतून गरीबरथ एक्स्प्रेस मधील प्रवाशांसाठी ६०० पेक्षा जास्त पाण्याच्या बॉटल्स (१ लिटर), बिस्किटे, आदी असे सुमारे ७०० लोकांना पुरणारे समान स्थानकावर जाऊन कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी च्या पदाधिकाऱ्यांनी वाटप केले, त्यावेळी प्रवाशांना धीर देण्यात आला, संघटनेच्या कामाबाबत माहिती देण्यात आली.

यावेळी संघटनेचे सचिव मिहिर मठकर, संपर्क प्रमुख भूषण बांदिवडेकर, खजिनदार विहंग गोठोसकर,राज पवार आदी उपस्थित होते.

परिपूर्ण सावंतवाडी टर्मिनससाठी राबवलेल्या “हर घर टर्मिनस” मोहिमेला कोकणवासियांचा अभूतपूर्व प्रतिसाद

आतापर्यंत २००० पेक्षा जास्त संख्यने ई-मेल पाठवले गेले– फेसबुक वरील रील मोठ्याप्रमाणात व्हायरल –व्हाट्सअँप ग्रुप एका दिवसात फुल्ल
   Follow us on        
सावंतवाडी:दि. १४ जुलै: कोकण रेल्वे येण्यासाठी कोणताही विरोध न करता आपल्या जमिनी या प्रकल्पाला देणाऱ्या कोकणकरांच्या हाती दोन ते तीन गाड्या सोडल्या तर काही लागले नाही. अनेकवर्षे प्रवासी संघटनेने केलेल्या वसई-सावंतवाडी, कल्याण-सावंतवाडी, बोरिवली/सावंतवाडी या मार्गावर गाड्यांच्या केलेल्या मागण्या अपूर्ण आहेत. या गाड्या चालविण्यासाठी सावंतवाडी टर्मिनस चे काम पूर्ण होणे महत्वाचे आहे. होळी- गणेशचतुर्थीला कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या चालविण्यात येतात. मात्र सावंतवाडी टर्मिनस च्या अपूर्ण कामामुळे त्या गाड्या दक्षिणेकडील राज्यात पाठवल्या जातात आणि ज्यांच्यासाठी या गाड्या सोडल्या त्यांनाच रेल्वे आरक्षणापासून वंचित राहावे लागते. चार दिवसांपूर्वी पेडणे येथील बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात साचलेल्या पाण्यामुळे कोकणरेल्वे पूर्णपणे विस्कळीत झाली होती. या घटनेने मागील ९ वर्षे विनाकारण रखडलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनसची गरज पुन्हा एकदा जाणवली आणि कोकण रेल्वे प्रवासी संघटना,सावंतवाडी या संघटनेद्वारे कोकणकर पुन्हा एकदा या प्रश्नावरून आक्रमक झाला. सावंतवाडी टर्मिनस च्या रखडल्या कामाविरोधात  आणि अन्य प्रश्नांसाठी संघटनेने  “हर घर टर्मिनस” ही मोहीम राबवली असून मागील दोन दिवसांत समस्त कोकणकरांचा या मोहिमेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.
हर घर टर्मिनस मेल मोहिम
संघटनेने “हर घर टर्मिनस मेल मोहिम ” राबवली असून समस्त कोकणवासीयांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आपल्या हक्कासाठी, कोकणकरांच्या सुखकर व निर्विघ्न प्रवासासाठी संवैधानिक हक्कासाठी,  भुमीपुत्रांच्या विकासासाठी कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत तत्काळ विलीनीकरण व्हावे, सांवतवाडी येथे रेल्वे टर्मिनस व्हावे, फक्त व फक्त कोकणासाठी नवीन गाड्या किंवा वाढीव थांबे मिळावे या आपल्या मागण्यांसाठी रेल्वे प्रशासन, केन्द्र सरकार व राज्य सरकारला जाग येण्यासाठी शेकडोच्या संख्येने ईमेल पाठवायचे आहेत.  सोबत मेलचा मायना दिला आहे तो आपल्या ईमेल ने सन्माननीय रेल्वे मंत्री, रेल्वे राज्यमंत्री, रेल्वे बोर्ड, रेल्वे विभाग व कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक आणि महाराष्ट्र शासनाचे मंत्री यांना पाठवायचे आहेत हजारोंच्या संख्येने ईमेल सर्व बांधव, भगिनी, कोकणवासी, सार्वजनिक मंडळ, कोकण विकास समित्या, समाजिक संस्था व कार्यकर्त्यांच्या घराघरातून सर्वानी वैयक्तिक पाठवायचे आहेत. फक्त एका टिचकीवर किंवा वरील QR Code द्वारे हे निवेदन आपल्या जिमेल मध्ये उघडेल तेथून फक्त आपल्याला सेंड बटन दाबून पाठवायचे आहे असे आवाहन संघटनेद्वारे करण्यात आले आहे.
या मोहिमेत आतापर्यंत २००० पेक्षा जास्त संख्यने ई-मेल पाठवले गेले असून या मोहिमेस खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याची संघटनेतर्फे श्री. सागर तळवडेकर यांनी दिली आहे.
‘ती’ पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल 

सावंतवाडी टर्मिनसच्या सुशोभणीकरणादरम्यान प्रवशेद्वारावर लावण्यात आलेल्या “सावंतवाडी रोड” फलकाच्या निषेधार्थ फलकाच्या समोरच संघटनेतर्फे नाराजीचे फलक लावण्यात आले आहेत. या संबंधित पोस्ट केलेली एक रील समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून आतापर्यंत ७ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूव्स Views आले तर हजारो कोकणकरांनी तिला लाईक केले आहे. संघटनेतर्फे बनविण्यात आलेल्या व्हाट्सअँपग्रुपला पण खूप मोठा प्रतिसाद लाभत असून फक्त एक दिवसात ग्रुप फुल्ल झाला आहे. तर अन्य ग्रुप ची लिंक या बातमीत खाली दिली आहे.

संकेश्वर- बांदा राष्ट्रीय महामार्ग सावंतवाडी शहरातूनच बांद्याकडे जाणार; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दुजोरा

   Follow us on        
सिंधुदुर्ग, दि.१३ जुलै: आंबोली घाटातून जाणारा संकेश्वर- बांदा राष्ट्रीय महामार्गाचे काम आता वेगाने होणार आहे. या मार्गाची आंबोली ते सावंतवाडी व तेथून इन्सुली ते बांदा हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्याकरिता ४२ कोटी रकमेची निविदाही काढण्यात आली आहे.
आंबोली घटवून येणार हा महामार्ग दुपदरी असून सिमेंट – काँक्रीटचा असणार आहे. तो आंबोली घाटातून पुढे सावंतवाडी शहरातूनच बांद्याकडे जाणार आहे. याबाबत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दुजोरा देण्यात आला आहे. अधिकृत माहितीसाठी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता,आताच या महामार्गाची  हस्तांतरण प्रक्रिया चालू झाली आहे. त्यामुळे अधिकृत माहिती देवू शकत नाही. असे त्यांचे म्हणणे आहे.
केंद्राकडून जाहीर करण्यात आलेला संकेश्वर-बांदा हा महामार्ग सावंतवाडी शहरातून जाणार की दाणोली, बावळाट येथून जाणार हा गेले अनेक दिवस प्रश्न होता. परंतु या प्रश्नाला आता पूर्णविराम मिळणार आहे.
हा महामार्ग संकेश्वर, गडहिंग्लज, आजरा, आंबोली माडखोल ते सावंतवाडी गवळीतिठा आणि तेथून इन्सुली ते बांदा असा जाणार आहे. याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून ४२ कोटीची निविदा काढण्यात आली आहे. मात्र अद्याप पर्यंत कोणाला वर्कऑर्डर देण्यात आलेले नाही. सद्यस्थितीत संकेश्वर पासून आजरा फाटा येथे पर्यंत हे काम सुरू आहे. आंबोली ते सावंतवाडी हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेला भाग राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्या संदर्भातले पत्र संबंधित विभागाला लवकरच देण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले आहे.

खळबळजनक: खासदार नारायण राणे यांच्यापासून जीवितास धोका; पोलीस महासंचालकांकडे कारवाईची मागणी, वाचा कोणी केली ही मागणी

   Follow us on        

रत्नागिरी, दि. १२ जुलै:भाजपचे खासदार नारायण राणे हे आपल्या एका वक्तव्यामुळे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बारसु रिफायनरी आंदोलकांनी पोलीस महासंचालक ,महाराष्ट्र राज्य यांना एका पत्राद्वारे भाजपाचे खासदार नारायण राणे यांच्यापासून जीवास धोका असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

मंगळवारी (ता. ९) खासदार नारायण राणे यांनी राजापूर येथे केलेल्या या वक्तव्यानुसार ‘’बारसू रिफायनरी विरोधकांना रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येवू दिले जाणार नाही आणि आले तर बाकीची जबाबदारी आमची, पोलिसांची नाही” , अशी गंभीर धमकी दिली आहे. या धमकीची आपण गांभीर्याने दखल घ्यावी व त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून आम्हा सर्वांच्या जीविताचे रक्षण करावे, असे या पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

नारायण राणे यांची गुन्हेगारी वृत्तीचा पूर्वइतिहास पाहता रिफायनरीला विरोध करणार्‍या स्थानिक ग्रामस्थांचे प्रतिनिधी यांच्या जीवितास धोका आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. रिफायनरीला विरोध करणाऱ्या आम्हा सर्वांच्या जीविताचे रक्षण करावे, असेही या निवेदनात म्हंटले आहे.

सावंतवाडी: रेल्वेच्या ‘त्या’ फलकाच्या समोरच झळकले निषेधाचे बॅनर

   Follow us on        

सावंतवाडी, दि. ११ जुलै |सावंतवाडी टर्मिनसच्या प्रवेशद्वारावर रेल्वे प्रशासनाने चुकीचा फलक लावल्याने येथील प्रवासी संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी आपला निषेध विविध मार्गांनी नोंदवायला सुरवात केली आहे. सुशोभीकरण करण्यात आलेल्या सावंतवाडी टर्मिनसच्या त्या चुकीच्या फलका समोरच कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, सावंतवाडी च्या कार्यकर्त्यांनी निषेधाचे बॅनर लावून आपली नाराजी व्यक्त केली आहे.

सावंतवाडी स्थानकाचे टर्मिनस म्हणुन भूमिपूजन ९ वर्षापूर्वीच झाले होते. त्यामुळे सावंतवाडी स्थानकाच्या नावापुढे टर्मिनस लावणे अपेक्षित होते. एकीकडे टर्मिनसचे काम रखडवले जात आहे तर दुसरीकडे स्थानकाच्या नावातून टर्मिनस हा शब्द गायब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्थानकाच्या सुशोभीकरणादरम्यान नवीन फलकावरही टर्मिनस हा शब्द न आल्याने कोकण रेल्वे प्रवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

 

सावंतवाडी टर्मिनसच्या प्रवेशद्वारावर स्थानकाच्या नावाचा चुकीचा फलक; प्रवासी संघटना आक्रमक

   Follow us on        
सिंधुदुर्ग: सावंतवाडी टर्मिनसच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र सुशोभीकरणात प्रवेशद्वारावर स्थानकाच्या नावाचा चुकीचा बोर्ड लावल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. प्रवेशद्वारावर “सांवतवाडी टर्मिनस” असा बोर्ड न लावता “सावंतवाडी रोड” असा बोर्ड लावल्याने तळकोकणातील जनतेत संतापाची लाट उसळली आहे. या प्रकाराबद्दल प्रवासी रेल्वे संघटना देखील सक्रिय झाल्या असून याबद्दल त्यांनी आपला निषेधही नोंदविला आहे. प्रशासनाने त्वरीत हा बोर्ड हटवून सावंतवाडी टर्मिनस असा बोर्ड लावावा अशी मागणी केली आहे.
सावंतवाडी रेल्वे टर्मिनस चे भूमिपूजन 9 वर्षापूर्वी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते झाले होते. मात्र मा. सुरेश प्रभू यांचा केंद्रीय रेल्वेमंत्रिपदावरून पायउतार होताच हे काम रखडले ते आजतायगत पूर्ण झाले नाही. रेल्वे प्रवासी संघटनांनी या दरम्यान कित्येकदा आवाज उठवला, मात्र त्याच्या हाती पोकळ आश्वासनांशिवाय काहीच आले नाही. आता तर स्थानकाच्या नावातून “टर्मिनस” हा शब्द कायमचा हटवण्याचा प्रयत्न होत आहे. विशेष म्हणजे सावंतवाडी टर्मिनस चे भूमिपूजन ज्या सरकारच्या कार्यकाळात झाले होते तेच सरकार आता सत्तेत असताना हा प्रकार होत असल्याने तळकोकणातील प्रवाशांच्या मनात सरकारविषयी आणि  लोकप्रतिनिधींविषयी चीड निर्माण होत आहे.
टर्मिनस समस्त कोकणकरांसाठी फायद्याचे
सावंतवाडी टर्मिनस होणे हे फक्त सावंतवाडी पंचक्रोशीतील प्रवाशांसाठीच नाही तर समस्त कोकण प्रवाशांसाठी फायद्याचे ठरणार आहे. कारण हे टर्मिनस झाले तर वसई/बोरिवली  – सावंतवाडी, पुणे – सावंतवाडी, कल्याण – सावंतवाडी या महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी सोयीच्या ठरणाऱ्या गाड्या सोडणे शक्य होणार आहे . त्याचबरोबर गणेश चतुर्थी, होळी या सारख्या सणांसाठी कोकणात सोडण्यात येणाऱ्या विशेष गाड्या दक्षिणेकडे न पाठवता सावंतवाडी पर्यंत मर्यादित करणे शक्य झाले असते. त्यामुळे सध्या गुरं ढोरांसारखा प्रवास करण्याऱ्या कोकणकरांचा प्रवास चांगल्या प्रमाणात सुखकर झाला असता.
   Follow us on        

सिंधुदुर्ग: जिल्ह्यात मुसळधार पाऊस, रस्त्यावर पाणीच पाणी, शाळांना सुट्टी जाहीर. आंबोली धबधब्यावर प्रशासनाची खबरदारी

   Follow us on        

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात धुवांधार कोसळत असलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून आंबोलीत धबधब्यातील पाण्याचा प्रवाह वाढला आहे. वाढत्या प्रवाहामुळे आज येथील आलेल्या पर्यटकांना खबरदारी म्हणून खाली उतरविण्यात आले आणि प्रवेश बंद करण्यात आला. वेंगुर्ला बेळगाव मार्गावर माडखोल बाजारात चार फूट पाणी आल्याने येथील रस्ताही काही कालावधी साठी बंद होता.

हवामान खात्याने आज सिंधदुर्गला दक्षतेचा ‘रेड’ अलर्ट दिला होता. हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला आहे. सिंधुदुर्गात आज मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असून अनेक ठिकाणी रस्त्यावर आणि तसेच बाजारात पाणी साचल्याने येथील नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले आहे. सावंतवाडी शहरातही मुसळधार पाऊस झाल्याने बाजारपेठ तसेच रस्ते पाण्याने भरले आहेत. खारबारदारी म्हणून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

जिल्ह्यात उद्याही पावसाचा जोर कायम
हवामान खात्याने पुढील चार दिवसांचा पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजानुसार उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार असून त्यानंतर पावसाचा जोर ओसरणार आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search