नवी दिल्ली : रेल्वे तिकीट आरक्षणात होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वे लवकरच तत्काळ तिकीट बुकिंगसाठी (Tatkal Ticket Booking) ई-आधार पडताळणीचे काम सुरू करणार आहे. यामुळे प्रवाशांना गरजेच्या वेळी कन्फर्म तिकिटे मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे. रेल्वेने असेही म्हटले आहे की, ज्या लोकांचे ओळखपत्र आधारशी जोडलेले असतील. त्यांना तत्काळ तिकीट बुकिंगच्या पहिल्या १० मिनिटांत प्राधान्य दिले जाणार आहे. आयआरसीटीसीच्या अधिकृत एजंटनाही तात्काळ विंडो उघडल्यानंतर पहिल्या १० मिनिटांत सिस्टमवर तिकिटे बुक करण्याची परवानगी आतापर्यंत नाही. अशा परिस्थितीत, ज्या लोकांचे ओळखपत्र आधारशी जोडलेले असेल त्यांना तिकिटे बुकिंग करणे अधिक सोयीस्कर ठरणार आहे, असे रेल्वेने घोषित केले आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेल्वेने स्वयंचलित साधनांचा वापर करून ऑनलाइन तिकिटे बुक करणाऱ्या तिकीट एजंटविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. रेल्वेचे असेही नमूद केले की, अकाउंट्सच्या अलीकडच्या तपासणीत २० लाख इतर खाती देखील संशयास्पद आढळली आहेत. त्यांचे आधार आणि इतर कागदपत्रे तपासली जात आहेत. सध्या, आयआरसीटीसी वेबसाइटवर १३ कोटींहून अधिक सक्रिय ग्राहक आहेत. यापैकी, आधारशी जोडलेल्या खात्यांची संख्या १.२ कोटी आहे.
आता आयआरसीटीसीने आधारशी प्रमाणित नसलेल्या या सर्व ११ कोटी ८० लाख खात्यांविरोधात सक्त भूमिका घेतली आहे. यासाठी विशेष चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संशयास्पद आढळणारी सर्व खाती ब्लॉक केली जाणार आहेत. रेल्वे तत्काळ आणि प्रीमियम तत्काळ सेवेअंतर्गत फक्त योग्य प्रवाशांनाच तिकिटे मिळावीत यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. अशा परिस्थितीत, जे खातेधारक त्यांचे खाते आधारशी लिंक करतील, त्यांना तत्काळ बुकिंगच्या पहिल्या १० मिनिटांत प्राधान्य मिळणार आहे.
Facebook Comments Box