Tatkal Ticket: रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. जुलै महिन्यापासून तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये बदल केला जाणार आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, 15 जुलैपासून आधार व्हेरिफिकेशन झालेल्या प्रवाशांनाच केवळ तत्काळ तिकीटचे बुकिंग करता येईल. तर रेल्वेचे एजंट अर्ध्या तासानंतर तिकीट बुक करू शकतील. आतापर्यंत तत्काळ तिकिटे आरक्षणात मोठे गैरव्यवहार होत होते.मात्र, रेल्वेच्या या नवीन नियमामुळे नागरिकांची सोय होणार आहे.
रेल्वेचे प्रसिद्धी पत्रक
रेल्वे मंत्रालयाने 10 जून 2025 रोजी एक पत्रक प्रसिद्ध केले. या पत्रकानुसार सर्व झोन्सना यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. तसेच, तत्काळ सुविधेचा लाभ सामान्य नागरिकाला मिळेल, याची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे. रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे की, ज्यांचे आधार कार्डाचे व्हेरिफिकेशन झाले आहे, असे प्रवाशीच 1 जुलै 2025 पासून आयआरसीटीसी संकेतस्थळ किंवा ऍपच्या माध्यमातून तिकीट बुक करू शकतील. यासोबतच 15 जुलै 2025 पासून तत्काळ बुकिंगसाठी आधारवर आधारित ओटीपी देखील अनिवार्य करण्यात आला आहे.
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, भारतीय रेल्वेच्या संगणकीकृत पीआरएस काऊंटर्स तसेच अधिकृत एजंट्सच्या माध्यामातून आरक्षणासाठी तेव्हाच उपलब्ध होतील, जेव्हा यंत्रणेने दिलेल्या ओटीपीचे व्हेरिफिकेशन होईल. प्रवाशांना आरक्षण अर्जात मोबाईल आधार कार्डशी लिंक असलेला नंबर देणे बंधनकारक असणार आहे. काउंटर वरून आरक्षित तिकिटे बुक करताना या नंबर वर ओटीपी येणार आहे. हा ओटीपी काउंटर वर तिकीट बुक करण्यासाठी बसलेल्या कर्मचाऱ्याला द्यावा लागणार आहे. या ओटीपीची पडताळणी झाल्यावरच तिकीट बुक होणार आहे.
तत्काळ रेल्वे तिकीटसाठी सकाळी 10 वाजेपासून आरक्षण करता येते. यावेळी केवळ एसी तिकिटांचे बुकिंग होते. तर 11 वाजेपासून अन्य तिकिटांचे बुकिंग करता येते. या सगळ्या प्रक्रियेत सामान्य प्रवाशाला हमखास तिकीट मिळणे कठीण होते.
तत्काळ बुकिंगसाठी सामान्य प्रवाशांना सर्वाधिक त्रास होतो. तर दुसरीकडे एजंट आरामात तिकीट बुक करू शकतात. आणि त्यानंतर एजंट या तिकिटांची विक्री करताना ग्राहकांकडून अवाच्या सवा किंमत वसूल करतात. आता रेल्वेच्या या नवीन पत्रकानुसार, एजंट्स सकाळी 10 ते 10.30 पर्यंत एसी आणि सकाळी 11 ते 11.30 पर्यंत स्लीपर तिकिटे काढण्यास मनाई करण्यात आली आहे. यामुळे प्रवासी या वेळेत तिकीट काढू शकतात.
Facebook Comments Box