



Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गाच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या दुहेरीकरणाच्या कामाला आता गती मिळत असून, भविष्यात या मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या दुप्पट होणार आहे. नैसर्गिक अडचणींवर मात करत कोकण रेल्वेने टप्प्याटप्प्याने दुहेरीकरणाचा निर्णय घेतला आहे.
रेल्वे प्रशासनाने टप्प्याटप्प्याने दुहेरीकरण करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. सपाट मार्गांवर दर किलोमीटर १५ ते २० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, तर बोगद्यांच्या भागात हा खर्च ८० ते १०० कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो. यापूर्वी रोहा ते वीर दरम्यानच्या दुहेरीकरणासाठी ५३० कोटी रुपये खर्च झाले होते.
यापुढील टप्पे कोणते?
कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार खालील तीन टप्प्यांत कोकण रेल्वे मार्गाचे दुपारदरीकरण करण्यात येणार आहे.
१)खेड–रत्नागिरी,
२) कणकवली–सावंतवाडी
३) मडगाव–ठोकुर
या तीन प्रमुख टप्प्यांमध्ये दुहेरीकरणाची योजना आहे. या टप्प्यांचा सविस्तर अहवाल लवकरच रेल्वे मंडळाकडे सादर करण्यात येणार आहे. या योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल आणि निधी मंजूर होताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
दुहेरीकरणासोबतच कोकण रेल्वे मार्गावरील ११ स्थानकांचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुमारे ९९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना अधिक सुविधा आणि सोयी-सवलती मिळण्याची शक्यता आहे.