संदेश सुरेश जिमन: या काळात स्वार्थ, संशय आणि बेपर्वाई वाढत असताना, संगमेश्वर तालुक्यातील फणसवणे परिसरात घडलेली एक छोटीशी घटना माणुसकीवरचा विश्वास पुन्हा जागा करणारी ठरली आहे.
अंत्रवली मालपवाडी गावातील नितेश गंगाराम मालप हे कलंबस्ते येथे प्रवास करत असताना त्यांचे पाकीट हरवले. त्या पाकिटात केवळ पैसे नव्हते, तर त्यांच्या ओळखीचा आधार असलेली लायसन्स, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड आणि गाडीची मूळ कागदपत्रे होती. पाकीट हरवल्याचे लक्षात येताच चिंता, अस्वस्थता आणि भीती स्वाभाविकच होती.
मात्र हे पाकीट तेलेवाडी येथील ग्रामस्थ सुरेश उर्फ बाबू बावधाणे यांना सापडले आणि इथूनच माणुसकीचा खरा चेहरा समोर आला. कोणताही लोभ न धरता, कुठलीही अपेक्षा न ठेवता, त्यांनी प्रामाणिकपणाने ते पाकीट मूळ मालक नितेश मालप यांना शोधून काढून सुरक्षितपणे परत केले.
आज जिथे अनेकदा हरवलेली वस्तू परत मिळेल याची आशा मावळते, तिथे सुरेश उर्फ बाबू बावधाणे यांच्या या स्तुत्य कृतीने समाजाला प्रामाणिकपणाचा आणि माणुसकीचा दीप उजळून दाखवला आहे. त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांनी समाजासमोर एक सकारात्मक आणि प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे.


