मुंबई: उपनगरीय रेल्वे मार्गावर होणारे धोकादायक ट्रॅक ओलांडणे आणि कुंपण उडी मारण्याच्या घटना रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेने एक नामी शक्कल लढवली आहे. चर्चगेट–विरार या सुमारे ६० किमी लांबीच्या मार्गावरील ट्रॅकलगतच्या कुंपणांवर औद्योगिक ग्रीस लावण्यास सुरुवात केली आहे. या उपाययोजनेचा उद्देश अपघात, मृत्यू आणि रेल्वे सेवेत होणारे अडथळे कमी करणे हा आहे.
चर्चगेट ते विरार दरम्यानच्या एकूण २९ स्थानकांवर ही कारवाई राबवली जात असून, गर्दीच्या वेळेत बेकायदेशीर ट्रॅक ओलांडणे ही मोठी सुरक्षा समस्या ठरत होती. कुंपणांवर ग्रीस लावल्यामुळे त्यावर चढणे किंवा पकड मिळवणे कठीण होते, त्यामुळे कोणताही अडथळा न आणता हा एक प्रभावी प्रतिबंधक उपाय ठरेल, असे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
२०२५ मध्ये मुंबईच्या उपनगरीय रेल्वे जाळ्यावर ट्रॅक ओलांडण्याच्या १,२९८ घटना नोंदल्या गेल्या असून, त्यात १,०६३ प्रवाशांचा मृत्यू तर २३५ जण जखमी झाले होते. “ग्रीस कोटिंगमुळे कुंपणांवर चढणे अवघड होते. ही व्यापक सुरक्षा मोहिमेचा भाग असून, यासोबतच वाढीव देखरेख, इशारा फलक आणि जनजागृती घोषणा केल्या जातील,” असे पश्चिम रेल्वेच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.
प्रवासी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. “कपडे मळतील आणि हात घाण होतील, याच भीतीने अनेकजण कुंपण उडी मारणे टाळतील. गर्दी व्यवस्थापन आणि स्थानकांवरील प्रवेश व्यवस्था सुधारली, तर मृत्यूचे प्रमाण नक्कीच घटेल,” असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
ग्रीस सुकते का?
रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, वापरण्यात येणारे औद्योगिक ग्रीस लवकर सुकत नाही. गरज भासल्यास देखभाल पथके नियमितपणे पुन्हा ग्रीस लावतील.


