मुंबई: कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे मंत्रालयाने ‘गाडी क्रमांक २२६२९/२२६३० तिरुनेलवेली-दादर एक्स्प्रेस’चे टर्मिनल बदलून ते लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे कोकण विकास समितीने स्वागत केले असून, आता ही गाडी २२ किंवा २४ डब्यांची (LHB कोच) करावी, अशी आग्रही मागणी रेल्वे बोर्डाकडे केली आहे.
१५ एप्रिल २०२६ पासून तिरुनेलवेली येथून आणि १६ एप्रिल २०२६ पासून मुंबईतून सुटणारी ही गाडी दादरऐवजी एलटीटीवरून धावेल. दादर स्थानकातील तांत्रिक अडचणींमुळे या गाडीचे डबे वाढवता येत नव्हते त्यामुळे ती १६ डब्यांसह चालविण्यात येत असे, आता तो अडथळा आता दूर झाला आहे. कोकण विकास समितीचे जयवंत दरेकर आणि अक्षय महापदी यांनी या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला होता. या मार्गावर प्रवाशांची सतत मोठी गर्दी आणि प्रतीक्षा यादी असते, त्यामुळे डब्यांची संख्या वाढवल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल आणि रेल्वेची क्षमता अधिक कार्यक्षमतेने वापरता येईल, असा विश्वास समितीने व्यक्त केला आहे
तसेच ही डबेवाढ वेळेबद्ध पद्धतीने अंमलात आणून प्रवाशांना लवकरात लवकर त्याचा लाभ मिळावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. या निर्णयाबद्दल रेल्वे मंत्रालय, रेल्वे बोर्ड, मध्य रेल्वे आणि संबंधित सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानत, कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या गरजांकडे भविष्यातही सकारात्मक लक्ष दिले जाईल, अशी आशा कोकण विकास समितीने व्यक्त केली आहे.


