सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सीमाभागात सध्या वन्य हत्तींचा वावर चिंतेचा विषय ठरत असतानाच, गोवा वनविभागाच्या एका धक्कादायक मोहिमेमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ‘ओंकार’ नावाचा वन्य हत्ती गोव्याच्या हद्दीत येऊ नये, यासाठी गोव्याचे वन कर्मचारी चक्क महाराष्ट्राच्या हद्दीत येऊन त्याला गुळ, केळी आणि विविध फळे खाऊ घालत असल्याचे समोर आले आहे.
गोव्याने आपल्या राज्याच्या संरक्षणासाठी ही विशेष मोहीम हाती घेतली असली, तरी यामुळे महाराष्ट्रातील शेती आणि बागायती धोक्यात आल्याने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार उघडपणे सुरू असताना महाराष्ट्र आणि सावंतवाडी वनविभागाचे अधिकारी मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. वन्य हत्तीला अशा प्रकारे खाद्य देऊन एकाच भागात रोखून धरले जात असताना स्थानिक वनाधिकाऱ्यांनी याला ‘मूक संमती’ दिल्याचे चित्र दिसत आहे. डोळे उघडे असूनही गांधारीची भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्र वनविभागाच्या या उदासीनतेमुळे सीमाभागातील नागरिक संतप्त झाले असून, हत्तीच्या या कायमस्वरूपी वास्तव्यामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीला जबाबदार कोण, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
Photo Credit – AI


