मुंबई : दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन बंद करून त्याच वेळापत्रकात आणि प्लॅटफॉर्मवरून दादर-गोरखपूर एक्सप्रेस गाडी कायमस्वरूपी सुरू करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली आहे.
उद्या, दिनांक २४ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मनसे नेते छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक (दादर) येथे रेल्वेच्या मुख्य अधिकाऱ्यांना थेट जाब विचारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. या आंदोलनात महाराष्ट्र सैनिकांसह कोकणवासी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मनसेने केले आहे.
रेल्वे मंत्रालयाने दादर-रत्नागिरी पॅसेंजर सेवा कायमची बंद करून तिच्या जागी उत्तर प्रदेशातील गोरखपूरला जाणारी एक्सप्रेस सुरू केल्याने कोकणातील प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पूर्वी दादरहून सुटणारी ही पॅसेंजर आता दिवा जंक्शनवरून चालवली जात असल्याने कोकणवासीयांना अतिरिक्त प्रवास आणि असुविधा भोगावी लागत आहेत. हा निर्णय कोकणातील स्थानिकांच्या हक्कांवर हल्ला असल्याचे मत मनसेने व्यक्त केले आहे.
“प्रश्न जिथे जनतेचा मार्ग, तिथे मनसेचा” या घोषणेनुसार मनसे या मुद्द्यावर ठाम भूमिका घेत आहे. कोकणातील भावना लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने तातडीने दादर-रत्नागिरी पॅसेंजर पूर्ववत सुरू करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कोकणवासी आणि महाराष्ट्र सैनिकांनी या आंदोलनात सामील होऊन आपली एकजूट दाखवावी, असे मनसेने म्हटले आहे. अधिक माहितीसाठी मनसेच्या स्थानिक नेत्यांशी संपर्क साधावा.


