नवी मुंबई: कोकण रेल्वेच्या प्रवाशांना सातत्याने भेडसावणाऱ्या अडचणींविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज बेलापूर येथील कोकण रेल्वे मुख्यालयावर धडक देत जोरदार निषेध नोंदवला. कोकणातील चाकरमान्यांची जीवनवाहिनी असलेल्या रेल्वे सेवेत होणारी गैरसोय, तसेच ‘दादर–रत्नागिरी पॅसेंजर’सारख्या महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्याच्या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर मनसेच्या शिष्टमंडळाने रेल्वे प्रशासनाला निवेदन सादर करून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली.
मनसेने स्पष्ट इशारा देताना सांगितले की, प्रवाशांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आणि रद्द केलेल्या गाड्या त्वरित पूर्ववत न केल्यास पक्ष आपल्या आक्रमक शैलीत आंदोलन उभे करेल.
या वेळी लहू थळे, स्वप्निल पंडित, प्रथमेश म्हात्रे, अक्षय वानखेडे, सविनय म्हात्रे, विलास घोणे, सचिन कदम यांच्यासह बेलापूर विभागातील प्रकाश कोकाटे, प्रशांत कोळी, शशी कोळी, सिद्धेश गायकवाड, ऋषिकेश पवार आणि चंद्रकांत कोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यापूर्वी मनसेच्या शिष्टमंडळाने मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मध्य रेल्वेच्या मुख्यालयात धडाक देऊन दादर रत्नागिरी गाडी दादर येथून सोडण्याची मागणी केली आणि तसे न केल्यास मनसे स्टाइलने आंदोलन करू अशा इशारा दिला होता.
कोकणवासीयांना न्याय मिळेपर्यंत आणि त्यांच्या प्रवासातील अडचणी दूर होईपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचे मनसेकडून सांगण्यात आले.


