श्री क्षेत्र टेरव येथे २ एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेला रंगणार वार्षिक जत्रोत्सव.

   Follow us on        

चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागातील निसर्गरम्य श्री क्षेत्र टेरव या पुरातन व सुप्रसिद्ध देवस्थानचे ग्रामदैवत श्री वाघजाई देवी आणि कुलदैवत श्री कुलस्वामिनी भवानी देवी आहे. श्री काळकाई देवी ही माहेरवाशिणींची रक्षणकर्ती देवी म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच जागृत आणि नवसाला पावणाऱ्या देवता असा या देवतांचा लौकीक आहे. शक्ती, युक्ती, बुद्धी व भक्ती यांचा अजोड मिलाप असलेल्या महाबली श्री हनुमान जन्मोत्सव चैत्र पौर्णिमेला साजरा करण्यात येतो, यंदा हा उत्सव गुरूवार दिनांक २ एप्रिल रोजी मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे. श्री भवानी वाघजाई व हनुमान मंदिराची अप्रतिम रंगरंगोटी करून मंदिर यात्रोत्सवासाठी सजविण्यात आले आहे. सदर रंगकाम ज्येष्ठ आर्किटेक्ट श्री सतीश राव, सीपीएमसी, मुंबई यांच्या सल्ल्याने व देखरेखीखाली ठेकेदार श्री अमित पारकर, आकार आविष्कार इन्फ्रा, मुंबई यांनी केले आहे.

चैत्र पौर्णिमेला रुढी परंपरेनुसार सूर्योदय झाल्यावर ब्राम्हण, मानकरी, ग्रामस्थ आणि पुजारी यांच्या उपस्थितीत मंदिरात हनुमान जन्मोत्सव साजरा करतील. दुपारी १२ वाजता ग्रामस्थांच्या उपस्थितीत दोन्ही मानकरी श्रीफळाच्या तीन जोड्या श्री कुलस्वामिनी भवानी मातेसमोर ठेवून व गाऱ्हाणे घालून पुजारी ते श्रीफळ वाढवतील व प्रसाद म्हणून मानाप्रमाणे त्याचे वाटप करतील. तसेच मंदिराच्या पोवळीबाहेर पूर्व दिशेस देवीचे देणे मागणे दिले जाईल. मंदिराच्या बाहेर पावट्याच्या घुगऱ्या व देवीच्या देण्या मागण्याचा प्रसाद दिला जाईल. रुढी परंपरेनुसार पूजाविधी संपन्न झाल्यावर, पुजारी पालखीत *कुलदैवत श्री भवानी, ग्रामदैवत श्री वाघजाई, भैरी, केदार, महालक्ष्मी व कुलस्वामिनी* या देवतांची रुपी लावतील. शतकाच्या दिशेने वाटचाल करणारा टेरव गावचा चैत्रपौर्णिमा जत्रोत्सव म्हणजेच ग्रामस्थ, माहेरवाशिणी, चाकरमानी आणि भक्तांच्या आनंदाला उधाण आणणारा दिवस असतो. चैत्र पौर्णिमे निमित्त पंचक्रोशीतील मौजे कामथे व चिंचघरी येथील पालख्यांचे मिरवणुकीने वाजतगाजत रात्रौ टेरव येथे आगमन होईल. पालख्या विद्युत रोषणाईंनी तसेच विविध प्रकारच्या फुलांनी सजविलेल्या जातील. ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळीत तिन्ही पालख्यांची मिरवणूक मंदिराकडे मार्गस्थ होईल. तिन्ही पालख्या नाचत उंचावून एकमेकींना भेटतात ते दृश्य विलोभनीय असते. मंदिरात तिन्ही पालख्या स्थानापन्न झाल्यावर दर्शनासाठी आणि ओटी भरण्यासाठी प्रचंड गर्दी होते. त्या नंतर सालाबादप्रमाणे रात्रौ मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल.

दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्ही पालख्यांची पूजा व सन्मान केल्यावर आपआपल्या गावी मार्गस्थ होतील. सदर वेळी श्री क्षेत्र टेरवची पालखी मंदिराच्या उत्तरेच्या प्रवेशद्वारापर्यंत निरोप देण्यासाठी नेली जाईल आणि अशाप्रकारे जत्रोत्सवाची सांगता होईल.

तरी सर्व भाविक, चाकरमानी, माहेरवाशिणी व हितचिंतक यांनी वार्षिक जत्रोत्सवानिमित्त दर्शनाचा लाभ घ्यावा अशी विनंती ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search