सावंतवाडी: लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे सिंधुदुर्ग जिल्हा आजही कोकण रेल्वेच्या मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचा आरोप कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष सागर तळवडेकर यांनी केला आहे. कोकण रेल्वेमुळे गोवा, कर्नाटक आणि केरळ या राज्यांना विकासाचा मोठा फायदा झाला असताना महाराष्ट्रातील सिंधुदुर्गकडे मात्र दुर्लक्ष झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.
कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला सुविधांच्या बाबतीत मागे ठेवण्यात आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. गोवा आणि कर्नाटक राज्यांना आधुनिक डेमू आणि मेमू गाड्यांचे जाळे उपलब्ध झाले आहे, तर सिंधुदुर्गमधील प्रवाशांना अद्यापही मर्यादित सेवा आणि अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जिल्ह्यातील प्रवाशांना कमी तिकिट दरात सेवा मिळत असली तरी महत्त्वाच्या गाड्यांना थांबे मिळत नसल्याने स्थानिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. अनेक गाड्या जिल्ह्यातून धावत असल्या तरी त्यांचा लाभ स्थानिकांना पुरेसा मिळत नाही, ही वस्तुस्थिती असल्याचे तळवडेकर यांनी स्पष्ट केले.
सावंतवाडी टर्मिनस हा केवळ एक प्रकल्प नसून कोकणाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. या प्रकल्पामुळे पर्यटन आणि हॉटेल उद्योगाला चालना मिळून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊ शकते. मोपा विमानतळ आणि प्रस्तावित पंचतारांकित हॉटेल प्रकल्पांमुळे सावंतवाडी परिसर पर्यटनदृष्ट्या अधिक सक्षम होणार आहे.
मात्र सध्या कोकणातून धावणाऱ्या बहुतांश गाड्या गोवा किंवा दक्षिण भारताकडे वळवल्या जात असल्याने स्थानिक प्रवाशांना आरक्षणाची समस्या भेडसावत आहे. गणेशोत्सव, होळी यांसारख्या सणांच्या काळात ही अडचण अधिक तीव्र होते. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि मुंबईतील चाकरमान्यांनी एकत्र येऊन या प्रश्नावर आवाज उठवावा, असे आवाहन सागर तळवडेकर यांनी केले आहे.


