Author Archives: Kokanai Digital

खेड, संगमेश्वरला थांबे; सावंतवाडीच्या पदरी मात्र उपेक्षाच

 

सिंधुदुर्ग | सागर तळवडेकर :रेल्वे बोर्डाने देशभरातील विविध मार्गांवर धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांना काही थांबे प्रायोगिक तत्त्वावर मंजूर केले आहेत. त्यात कोकण रेल्वे मार्गावरील खेड स्थानकावर मंगला तसेच एलटीटी कोचुवली एक्सप्रेसला तर संगमेश्वरवासियांची दीर्घ काळ मागणी असलेल्या नेत्रावती एक्सप्रेसला रेल्वे बोर्डाने प्रायोगिक तत्त्वावर थांबा मंजूर केला आहे, या मधे सावंतवाडीकरांची मागणी असलेली मंगला,मंगलोर,वंदे भारत,नागपूर – मडगाव,मत्स्यगंधा,नेत्रावती आणि कोरोना काळात काढून घेण्यात आलेल्या त्रिवेंद्रम राजधानी आणि गरीब रथ एक्सप्रेस संदर्भात काहीच निर्णय झाले नसल्याचे उघड झाले आहे.एकंदरीत सावंतवाडीकरांचा मागण्यांना केराची टोपली दाखवली असेच दिसते.

कोकण रेल्वेच्या संगमेश्वर स्थानकावर नेत्रावती एक्सप्रेसला थांबा मिळावा यासाठी चिपळूण संगमेश्वर फेसबुक समूहा च्या माध्यमातून संगमेश्वरवासियांना सोबत घेऊन पत्रकार संदेश जिमन यांनी वेळोवेळी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. संगमेश्वरवासियांच्या या दीर्घ लढ्याला अखेर यश आले आहे. रेल्वे बोर्डाने देशभरातील विविध मार्गांवरील गाड्यांना जे काही प्रायोगिक थांबे दिले आहेत त्यात संगमेश्वरवासियांच्या नेत्रावती एक्सप्रेसला थांबा देण्याच्या मागणीचाही समावेश झाला आहे.

याचबरोबर मुंबई ते मडगाव या मार्गावर अलीकडेच वंदे भारत एक्सप्रेसचा थांबा मिळालेल्या खेड स्थानकाला रेल्वेने आणखी एक भेट दिली आहे. एर्नाकुलम -हजरत निजामुद्दीन मार्गावर धावणारी मंगला एक्सप्रेस तसेच एलटीटी ते कोचुवेली दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेस गाडीला खेड थांबा मंजूर करण्यात आला आहे. यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर खेडवासीयांना आणखीन दोन गाड्यांचा पर्याय उपलब्ध झाला आहे या साठी जल फाउंडेशच्या अक्षय महापदी यांनी विशेष प्रयत्न केले होते.

रेल्वे बोर्डाने त्या त्या झोनला पाठवलेल्या पत्रात प्रायोगिक थांबा मंजूर केलेल्या गाड्यांना नवीन थांब्यावर थांबवण्याची अंमलबजावणी त्या त्या ठिकाणच्या सोयीनुसार शक्य तितक्या लवकर करण्याबाबत सूचित केले आहे.

सावंतवाडीकरांच्या पदरी मात्र उपेक्षाच.

अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न आणि प्रवासी संख्या असूनही सावंतवाडीकरांवर अन्याय सुरूच आहे. पहिल्यांदा झीरो टाईम टेबलच कारण देऊन त्रिवेंद्रम राजधानी एक्सप्रेस आणि एलटीटी कोचुवेली गरीबरथ एक्सप्रेसचे थांबे काढून घेण्यात आले, त्यानंतर नागपूर मडगाव या स्पेशल गाडीचा थांबा देखील या स्थानकातून काढून घेण्यात आला.या स्थानकात दोन महिन्यापूर्वी वंदे भारत एक्सप्रेसचा थांबा देखील नाकारण्यात आला होता, येथील टर्मिनसच काम देखील ठप्प आहे, या सर्व बाबींवर अलीकडेच काही प्रवासी संघटनांनी देखील पाठपुरावा केला होता परंतु रेल्वे बोर्डाने त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. स्थानिक लोकप्रतिनिधीही याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत असेच चित्र येथे पाहायला मिळते. या स्थानकात स्वर्गीय डी के सावंत यांचा पुढाकाराने मंगला आणि मंगलोर एक्सप्रेसला थांबा कोकण रेल्वे चे संचालक श्री गुप्ता यांनी तत्वतः मान्य केला होता, तसेच येथे वंदे भारत, नेत्रावती, मत्स्यगंधा, नागपूर मडगाव, मंगलोर, मंगला या एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा म्हणून सर्वजण प्रयत्नशील आहेत आणि त्यासाठी आवश्यक पाठपुरावा देखील सुरू आहे परंतु प्रवासी आणि प्रवासी संघटनांची उदासीनता देखील या थांब्याना येथे मंजुरी न मिळणे कारणभूत असू शकते असेच दिसते.

यापुढे बोर्डाची परीक्षा वर्षातून दोनदा; ११वी आणि १२वीच्या अभ्यासक्रमातही बदल

नवी दिल्ली:देशभरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने शालेय शिक्षणाबाबत मोठे बदल जाहीर केले आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील तरतुदींची अंमलबजावणी करताना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने शालेय शिक्षण-परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत.शिक्षण मंत्रालयाने बुधवार ही महत्वाची माहिती दिली.
शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार , बोर्डाच्या परीक्षा आता वर्षातून दोनदा घेतल्या जातील. त्याचसोबत ११वी आणि १२वीच्या अभ्यासक्रमातही बदल करण्यात आले आहेत. तसंच, विद्यार्थ्यांना दोन्ही सेमिस्टरचे सर्वोत्तम गुण निवडण्याची परवानगी दिली जाईल.
पीटीआय या वृत्तसंस्थाने दिलेल्या माहितीनुसार, शिक्षण मंत्रालयाच्या नवीन परीक्षा पॅटर्नवर आधारित बोर्ड परीक्षा विद्यार्थ्यांच्या विषयांचे आकलन आणि त्यांच्या स्पर्धात्मक कामगिरीचे (अचिव्हमेंट ऑफ कॉम्पिटेंसीज) मूल्यांकन करेल. मंत्रालयाने हे मान्य केले आहे की, सध्या बोर्डाच्या परीक्षा या केवळ महिन्यांपर्यंत कोचिंगद्वारे केलेली तयारी आणि विद्यार्थ्यांची लक्षात ठेवण्याची क्षमता यावरच आधारित असते.
शिक्षण मंत्रालयाने केलेल्या महत्त्वाच्या बदलांनुसार आता इयत्ता 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना स्ट्रीम निवडण्याची सक्ती आता काढून टाकण्यात आली आहे. अशा स्थितीत या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे विषय निवडण्यास मोकळेपणा मिळेल. सध्या सर्वच मंडळांच्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना विज्ञान, वाणिज्य, कला, व्यावसायिक इत्यादींपैकी एकाची निवड करावी लागते.
तसंच, २०२४ च्या शैक्षणिक अभ्यासक्रामासाठी त्याप्रमाणेच पाठ्यपुस्तके विकसित केली जातील असे देखील शिक्षण मंत्रालयाने सांगितले आहे. ११वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांना दोन भाषांचा अभ्यास करणं आवश्यक आहे. त्यापैकी किमान एक भाषा भारतीय असणं आवश्यक असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

अभिमानास्पद | इस्रोच्या चांद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग

 

चांद्रयान ३: भारताच्या इतिहासातली सर्वात मोठी, सर्वात अभिमानाची आणि सर्वात मोठ्या गौरवाची बातमी आहे. इस्रोच्या (ISRO) चांद्रयान-3 (Chandrayaan-3 Mission) चं चंद्रावर यशस्वी लँडिंग झालं आहे. इस्रोचं चांद्रयान-3 आज 23 ऑगस्ट रोजी 06 वाजून 04 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरलं आहे. भारतातील 140 कोटी जनतेची मान आज अभिमानाने वर गेली आहे.

भारत चंद्रावर पोहोचला भारताच्या यशाचा सूर्य थेट चंद्रावर उगवला आहे. भारतासह जगातील प्रत्येकाच्या नजरा या ऐतिहासिक घटनेकडे लागल्या होत्या. जसजसा लँडिंगचा क्षण जवळ येत होता, तसतशी धाकधूक वाढत गेली, श्वास रोखले गेले, हात जोडले गेले आणि डोळे मिटले गेले आणि बातमी आली. चांद्रयान-3 मोहीम फत्ते झाली. प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यांत आनंदाश्रू तराळले आणि मनात आनंदाचे धबधधबे फुलून गेले. आपल्याच घरातलं कुणीतरी परीक्षेत फर्स्ट क्लासने उत्तीर्ण झाल्याची भावना निर्माण झाली. भारताच्याच नाही तर संपूर्ण जगाच्या इतिहासात, जिथं जगातलं कुणीच गेलेलं नाही, अशा दक्षिण ध्रुवाच्या उंबरठ्याला भारताने गवसणी घातली आहे.

शेवटची काही मिनिटेच शिल्लक; चांद्रयान-3 ची चंद्रावर लँडिंगचे थेट प्रक्षेपण येथे पहा…

शेवटची काही मिनिटेच शिल्लक; चांद्रयान-3 ची चंद्रावर लँडिंगचे थेट प्रक्षेपण येथे पहा…

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त डबे


Konkan Railway News :
कोकण रेल्वे मार्गावरील काही गाडयांना तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त डबे जोडण्यात येणार आहेत.

कोकण रेल्वेच्या माहितीनुसार, हापा-मडगाव एक्स्प्रेस (२२९०८) या गाडीला दि. २३ ऑगस्ट २०२३ च्या फेरीसाठी, तर मडगाव- हापा (२२९०७) या गाडीला दि. २५ ऑगस्टच्या फेरीकरिता स्लिपर श्रेणीतील प्रत्येकी एक जादा डबा जोडण्यात येणार आहे. याचबरोबर पोरबंदर- कोचुवेली ( २०९१०) या गाडीला दि. २४ ऑगस्ट रोजीच्या फेरीसाठी, तर कोचुवेली – पोरबंदर (२०९०९) या गाडीला दि. २७ ऑगस्ट रोजीच्या फेरीसाठी स्लिपर श्रेणीचा एक जादा कोच असेल.

नागरकोईल – पनवेल (०६०७१) साप्ताहिक विशेष गाडीच्या रोहा स्थानकातील वेळेत बदल

याचबरोबर नागरकोईल – पनवेल (०६०७१) साप्ताहिक विशेष गाडीच्या रोहा स्थानकातील वेळेत बदल करण्यात आला आहे. आधी ही गाडी रात्री ९ वा. ५० मिनिटांनी रोहा येथे येणार होती. मात्र, सुधारित वेळेनुसार ती रात्री ९ वा. ४० मिनिटांनी रोहा स्थानकावर येणार आहे. ओणम सणासाठी ही गाडी दि. २२ ऑगस्टपासून सुरू झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हाच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांची कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती

 

कोल्हापुर :सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या  के. मंजुलक्ष्मी यांची कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. उद्या बुधवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी ते कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. तर किशोर तावडे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी म्हणुन नेमणूक करण्यात आली आहे.

के. मंजूलक्ष्मी हे सध्या सिंधुदुर्ग येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असून ते सिंधुदुर्ग मध्ये सर्वाधिक प्रशासकीय कारभार सांभाळणाऱ्या जिल्हाधिकारी ठरल्या आहेत. ते सिंधुदुर्ग येथे दोन वर्ष जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व तीन वर्ष जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.के.मंजुलक्ष्मी ह्या ९ फेब्रुवारी २०१८ ला सिंधुदुर्ग मध्ये जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी रुजू झाल्या त्यानंतर दोन वर्षानी २० मे २०२० रोजी त्यांची जिल्हाधिकारी पदी शासनाने नियुक्ती केली होती. कोरोना काळात त्यांनी जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट काम केले होते.तर सिंधुदुर्ग जिल्हा स्वच्छ भारतमध्ये देशात पहिल्या क्रमांकावर आला होता यामुळे त्यांचा दिल्लीत सत्कार ही झाला होता .

वंदे भारत एक्सप्रेसला अफाट प्रतिसाद; मुंबई ते ‘या’ शहरा दरम्यान आता धावणार दोन वंदेभारत एक्सप्रेस

Vande Bharat Express : देशात वंदे भारत एक्सप्रेस ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवासी संख्या वाढल्याने आता तिकिटे मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे आता काही मार्गावर दुसरी वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्याचा विचार केला जात आहे.
प्रमुख भारतीय शहरांमधील कनेक्टिव्हिटी मजबूत करण्याच्या उद्देशाने, पश्चिम रेल्वेने गजबजलेल्या मुंबई-अहमदाबाद मार्गावर दुसरी सेमी हाय-स्पीड ट्रेन सुरू करण्याची तयारी केली आहे. मुंबई-गांधीनगर वंदे भारत एक्सप्रेसच्या उल्लेखनीय यशानंतर, आता मुंबई-अहमदाबाद अशी नवी वंदे भारत एक्सप्रेस पुढील महिन्यापासून चालू करण्यात येणार असल्याची माहिती पाश्चिम रेल्वेने दिली आहे.
दररोज 30,000 पेक्षा जास्त प्रवासी मुंबई-अहमदाबाद रेल्वेमार्गावर अवलंबून आहेत,  सध्या या मार्गावर सुमारे 24 गाड्या चालतात, ज्यात नियमित आणि साप्ताहिक सेवा समाविष्ट आहेत. दुसरी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचे उद्दिष्ट ही गर्दीची अडचण दूर करणे आणि आरामदायक प्रवास पर्यायांची वाढती मागणी पूर्ण करणे हा आहे.

पश्चिम घाटमाध्यावरील परिसरात तेजस ठाकरेंना सापडली सापाची नवी प्रजाती

मुंबई :ठाकरे कुटुंबातील सर्वाल धाकटे सदस्य अर्थात उद्धव आणि रश्मी ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे मात्र सध्या निसर्गात रमल्याचं पाहायला मिळत आहे.पर्यावरण, निसर्ग आणि जीवसृष्टीचा जवळून अभ्यास करणाऱ्या तेजस ठाकरे यांच्या टीमनं एक किमया केली आहे.
पश्चिम घाटमाध्यावरील परिसरात तेजस ठाकरे यांच्या टीमला एक साप आढळला असून, त्याला ‘सह्याद्रीओफिस’ असं नाव देण्यात आलं आहे. टीमला मिळालेल्या या यशामुळं ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या च्या नावे आणखी एका यशस्वी मोहिमेची नोंद झाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार ठाकरे वाईल्ड लाईफ फाऊंडेशननं लंडन येथील नॅचरल हिस्ट्री म्युझियम, जर्मनीतील मॅक्स प्लॅन्क इन्स्टीट्युट यांच्यासह हर्षित पटेल आणि तेजस ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली ही मोहिम यशस्वीरित्या पार पाडली.

Mumbai Goa Highway : “दगड फोडला तर कलाकृती उभी राहते आणि दगड फेकला विध्वंस होतो..” रवींद्र चव्हाण यांचे मनसेला तोडफोडीवर पत्रातून खडे बोल….

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पनवेल येथील निर्धार मेळाव्यानंतर कोकणातील मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांचाकडून टोलनाके आणि कंत्राटदारांची कार्यालये फोडण्याचे प्रकार घडले आहेत. मात्र या प्रकारानंतर राज्याचे सार्वजनिक मंत्री रवींद्र चव्हाण भलतंच नाराज झाले आहेत. या विषयावर त्यांनी एक पत्र लिहून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि कार्यकर्त्यांना खडे बोल  सुनावले आहेत.
पत्रात ते लिहितात 
दगड फोडला तर कलाकृती उभी राहते आणि दगड फेकला विध्वंस होतो याची कोणीतरी कधीतरी आठवण करून द्यावी म्हणून आज हे पत्र लिहीत आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात अतिशय वेगाने सुरु आहे आणि त्यात ही सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड महाराष्ट्र विरोधी आणि विनाशकारी मानसिकतेची आहे.
जे कार्यकर्ते स्वतःला महाराष्ट्र सैनिक म्हणवतात त्यांनी स्वतःला प्रश्न विचारायला हवा की कुठला सैनिक आपल्या देशाचे आणि आपल्या राज्याच्या मालमत्तेचे तोडफोड करून नुकसान करतो…. ? तो कसा काय महाराष्ट्र सैनिक….. ? आम्हीही रस्त्यावर आंदोलन करून इथपर्यंत पोहोचलो पण आमची निष्ठा सर्वप्रथम देश नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः हीच आहे…. त्यात अशी तोडफोड करून विघ्न आणण्याचं कारण समजण्यापलीकडे आहे.
मुंबई गोवा महामार्ग आता खरोखरी दृष्टीपथात येत आहे. येत्या गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात जाण्यापूर्वी सिंगल लेन पूर्ण झालेली असेल याचा मी अत्यंत जबाबदारीने पुनरुच्चार करतो आणि डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण मुंबई गोवा महामार्ग देशसेवेसाठी तयार होईल हा शब्द देतो. म्हणून … दगड भिरकावून तोडफोड करणारी विनाशकारी विचारसरणी नको आता त्या ऐवजी दगड रचून नवा इतिहास रचणारी प्रगतिशील कामं करणारी तरुणाईची साथ हवी आहे…. अवघ्या महाराष्ट्राला….
कोकणचा सुपुत्र म्हणून अनेक लहान-मोठ्या समस्या जवळून बघितल्या होत्या. यातल्या अनेक समस्यांचं मूळ मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरण हेच आहे, याची देखील जाणीव आहे. केंद्रात मोदीजी आणि राज्यात त्रिशुळ सरकार गतिमान पद्धतीने काम करत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचा मंत्री या नात्याने पनवेल ते झाराप मुंबई गोवा महामार्गावर रस्त्यावर कडक उन्हात आणि भर पावसात उतरून रस्ते कामाची सलग आठ वेळा पाहणी केलेला मी कोकणी माणूस आहे. भाजपाचा एक निष्ठावान कार्यकर्ता आहे.
खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर हा रखडलेला प्रश्न कायमस्वरूपी सोडवणं ही स्वाभिमानी प्रतिज्ञा केली होती ती कार्यसिद्धी झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हे व्रत म्हणून स्वीकारलं आहे.
या कामात असणाऱ्या असंख्य अडचणी सोडवणं हे शिवधनुष्यच होतं. पण कार्यभार स्वीकारताच कोकणवासियांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने एकेक पाऊल उचलू लागलो. या कामातील सर्व अडचणी आता दूर झाल्या आहेत. केवळ खड्डे न बुजवता CTB टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून समस्येला कायमस्वरूपी पूर्णविराम दिला जातो आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यालयं फोडण्यापर्यंत या श्रेयजीवींची मजल गेली आहे. या तोडाफोडीमुळे महामार्गाचे काम करणाऱ्या कामगारांमध्ये दहशत पसरत आहे, अनेक अडचणी निर्माण होत आहेत. सुरु असलेल्या कामांना हातभार लावण्याऐवजी अशाप्रकारे आडकाठी आणून यांना नेमकं काय साध्य करायचं आहे ? हा प्रश्नच आहे. गणेशोत्सवापूर्वी सिंगल लेन आणि वर्षाअखेरपर्यंत पूर्ण महामार्ग पूर्ण करणारच या निश्चयातूनच आपला विभाग काम करत आहे.
ज्या आदरणीय मोदीजींनी काश्मीर मधल्या दगडफेकू तरुणांच्या हाती रोजगार दिला तेव्हाच त्यांची अनेक दशकांची विनाशकारी विचारसरणी बदलली आणि बदलली काश्मीरची अर्थव्यवस्था….त्याचप्रमाणे मोदीजींचा कट्टर अनुयायी म्हणून एक दिवस हीच मंडळी तोडफोडप्रेमी विनाशकारी विचारधारा सोडून कोकणच्या विकासाची आणि प्रगतीची विचारसरणी फॉलो आणि लाईक करतील ही आशा बाळगून आहे…..
आपला,
रविंद्र चव्हाण

कुणकेश्वर मंदिर : उत्तेजक व तोकडे कपडे घालून येणाऱ्यांना मंदिरात प्रवेश बंद

सिंधुदुर्ग : दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरामध्ये श्रावणी सोमवारचे औचित्य साधून येणाऱ्या भाविकांसाठी वस्त्र संहिता लागू करण्यात आली आहे. याबाबतची माहिती देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष दिनेश धुवाळी यांनी दिली.
कुणकेश्वर येथील देवस्थान ट्रस्ट कार्यालय मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांना वस्त्र संहिता लागू करण्यात आली आहे. भारतीय हिंदू संस्कृतीचे नीट पालन होण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. येणारे भाविक अंग प्रदर्शन, उत्तेजक, असभ्य, अशोभनीय व तोकडे वस्त्र तसेच अवास्तविक वेशभूषा करून मंदिरात प्रवेश करत होते. परंतु आता अशा वस्त्र परिधान करणाऱ्या व्यक्तींना मंदिरामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तसेच येणाऱ्या भाविकांसाठी पंचा-उपर्णे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.यासाठी भाविकांनी नियमाचे पालन करून मंदिर प्रशासनात सहकार्य करावे आणि संस्कृतीचे पालन करावे असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष दिनेश धुवाळी यांनी केले आहे. यावेळी माजी सरपंच गोविंद घाडी, संजय आचरेकर, संतोष लाड गणेश वाळके, व्यवस्थापक रामदास तेजम अजय नाणेरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search