Author Archives: Kokanai Digital

सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या ताफ्यात नवीन वाहने दाखल

   Follow us on        

सिंधुदुर्ग: जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला मोठी चालना मिळाली असून, पोलीस दलासाठी प्राप्त झालेल्या नवीन वाहनांचा हस्तांतरण सोहळा आज, १९ मार्च २०२६ रोजी पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे आणि गृहराज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्यासह जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​कार्यक्रमादरम्यान नवीन वाहनांची पारंपरिक पद्धतीने पूजा करून ती पोलीस दलाच्या सेवेत समर्पित करण्यात आली. या नवीन वाहनांमुळे पोलिसांची गस्त अधिक प्रभावी होणार असून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देणे शक्य होणार आहे. यामुळे जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होईल.

 

पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले की, या वाहनांमुळे स्थानिक पोलिसांच्या कामाला अधिक गती मिळेल आणि सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. पोलीस दलाच्या सुसज्जतेसाठी जिल्हा प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.

Konkan Railway: मडगाव – मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेसच्या चिपळूण स्थानकावरील वेळेत बदल

   Follow us on        

चिपळूण: कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांच्या मान्सूनपूर्व (Non-Monsoon) वेळापत्रकात काहीसा बदल करण्यात आला असून, याची अंमलबजावणी त्वरित  लागू करण्यात आली आहे. यामध्ये गाडी क्रमांक १२०५२ मडगाव जंक्शन – मुंबई सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेसच्या चिपळूण स्थानकावरील वेळेत सुधारणा करण्यात आली आहे.

या सुधारित वेळापत्रकानुसार, चिपळूण स्थानकावर या गाडीची जुनी वेळ १९:४६ / १९:४८ अशी होती. आता ही गाडी चिपळूण स्थानकावर ६ मिनिटे आधी म्हणजे १९:४० वाजता पोहोचेल आणि १९:४२ वाजता सुटेल. प्रवाशांनी या बदललेल्या वेळेची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

रेल्वे प्रशासनाने आवाहन केले आहे की, प्रवाशांनी इतर स्थानकांवरील अधिकृत वेळापत्रकासाठी ‘नॅशनल ट्रेन एन्क्वायरी सिस्टम’च्या (NTES) संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच अधिकृत अपडेट्ससाठी ‘कोकण रेल्वे मिरर’ (KR Mirror) या ॲपचा वापर करावा जेणेकरून प्रवासादरम्यान कोणतीही अडचण येणार नाही.

Mumbai Local: मुंबईकरांना रेल्वेकडून गुढीपाडव्याची भेट! पश्चिम रेल्वेच्या १६ लोकल सेवा आता १५ डब्यांच्या!

   Follow us on        

मुंबई: मुंबईतील लाखो लोकल प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेने एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला असून, १९ मार्च २०२६ म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तापासून १६ उपनगरीय लोकल सेवांचा विस्तार करण्यात येणार आहे. सध्या १२ डब्यांच्या असलेल्या या १६ सेवा आता १५ डब्यांच्या करण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेच्या या निर्णयामुळे चर्चगेट-विरार-डहाणू मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.

​या नवीन बदलामुळे पश्चिम रेल्वेवरील १५ डब्यांच्या एकूण फेऱ्यांची संख्या आता २११ वरून २२७ वर पोहोचणार आहे. विशेष म्हणजे, एकूण उपनगरीय सेवांची संख्या १,४१४ इतकीच राहणार असली, तरी डब्यांच्या वाढीमुळे एकाच वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची क्षमता लक्षणीयरीत्या वाढणार आहे. प्रत्येक १५ डब्यांच्या ट्रेनमुळे साधारणपणे २० ते २५ टक्के अतिरिक्त प्रवाशांना सामावून घेता येईल, जे विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी ऑफिसच्या वेळेत (पीक आवर्स) प्रवाशांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल.

​एकीकडे पश्चिम रेल्वेने आपल्या ताफ्यात सुधारणा केल्याने समाधान व्यक्त होत असताना, दुसरीकडे मध्य रेल्वेच्या प्रवाशांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. मध्य रेल्वेवर अद्यापही १५ डब्यांच्या गाड्यांची संख्या कमी असून प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम धीम्या गतीने सुरू असल्याकडे प्रवाशांनी लक्ष वेधले आहे. मात्र, पश्चिम रेल्वेच्या या महत्त्वाच्या पावलामुळे मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रवासात प्रवाशांना अधिक मोकळी जागा आणि सुखकर प्रवास मिळणार आहे.

“… जर गाड्याच थांबत नसतील, तर पर्यटक कोकणात येणार कसे?” – दीपक केसरकर

   Follow us on        

मुंबई: कोकण रेल्वेच्या प्रलंबित प्रश्नांवर आणि सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या दुरवस्थेवर आमदार दीपक केसरकर यांनी विधानसभेत आवाज उठवत राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे. सावंतवाडी रेल्वे टर्मिनस पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच, कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेमध्ये लवकरात लवकर विलिनीकरण करावे, जेणेकरून या भागातील रेल्वे प्रश्नांचा कायमस्वरूपी मार्ग मोकळा होईल, असेही त्यांनी ठामपणे मांडले.

​केसरकर यांनी भाषणादरम्यान नमूद केले की, माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून रेल्वे स्थानकांच्या बाह्य सुशोभीकरणाचे काम झाले असले, तरी अंतर्गत प्रवासी सुविधा अद्यापही अपूर्ण आहेत. जोपर्यंत कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण होत नाही, तोपर्यंत राज्य सरकारने पुढाकार घेऊन या सुविधांसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करावी. या गंभीर विषयावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि रेल्वेमंत्र्यांच्या उपस्थितीत तातडीने एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्याची विनंतीही त्यांनी सभागृहात केली.

​कोकणच्या पर्यटनावर भाष्य करताना केसरकर यांनी रेल्वे थांब्यांचा मुद्दा अत्यंत प्रभावीपणे मांडला. “जर गाड्या स्थानकांवर थांबणारच नसतील, तर पर्यटक कोकणात कसे येणार?” असा थेट सवाल त्यांनी प्रशासनाला विचारला. कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन प्रमुख स्थानकांवर सध्या न थांबणाऱ्या जलद गाड्यांना थांबा देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. केसरकर यांच्या या पाठपुराव्यामुळे आतातरी कोकणचे हक्काचे सावंतवाडी टर्मिनस पूर्णपणे कार्यान्वित होईल आणि प्रवाशांचे हाल थांबतील, अशी आशा कोकणवासीयांकडून व्यक्त केली जात आहे.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर रविवारी धावणार ‘विकेंड स्पेशल’ एक्सप्रेस

   Follow us on        

मडगाव: आठवडा अखेरीस होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या सहकार्याने मडगाव आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) दरम्यान विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांचे वेळापत्रक आणि थांबे खालीलप्रमाणे आहेत:

​गाडी क्र. ०१००४ / ०१००३ मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव विशेष

​गाडी क्र. ०१००४ (मडगाव – LTT): ही गाडी २२ मार्च २०२६ (रविवार) रोजी मडगाव जंक्शन येथून दुपारी १६:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०६:२० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

​गाडी क्र. ०१००३ (LTT – मडगाव): ही गाडी २३ मार्च २०२६ (सोमवार) रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी ०८:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २२:४० वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचेल

थांबे: मडगाव जंक्शन, करमळी, थिविम, सावंतवाडी टर्मिनस, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल, ठाणे आणि लोकमान्य टिळक टर्मिनस.

​डब्यांची रचना: एकूण २० डबे (१८ स्लीपर क्लास आणि २ एसएलआर).

​आरक्षण: गाडी क्र. ०१००४ साठीचे आरक्षण १९ मार्च २०२६ पासून सर्व आरक्षण केंद्रांवर (PRS), इंटरनेट आणि IRCTC च्या संकेतस्थळावर सुरू होईल.

​कोकण रेल्वेच्या या निर्णयामुळे सुट्टीच्या काळात प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दादर – रत्नागिरी पॅसेंजरने ‘स्लॉट’ गमावला! मुंबई-कोकणातील लाखो प्रवाशांच्या नाकावर टिच्चून दादर-गोरखपूर एक्सप्रेस कायमस्वरूपी

   Follow us on        

मुंबई : मुंबई आणि कोकणातील लाखो प्रवाशांच्या नाकावर टिच्चून मध्य रेल्वेने दादर-रत्नागिरी पॅसेंजरच्या स्लॉटवर आता दादर-गोरखपूर एक्सप्रेस कायमस्वरूपी चालवण्यास मंजुरी दिली आहे. हा मोठा धक्का देणारा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या मुंबईकर चाकरमान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी खासदार रवी किशन यांना दिलेल्या अधिकृत पत्रातून ही माहिती समोर आली आहे. विशेष गाडी क्रमांक ०१०२७/०१०२८ ला नियमित दर्जा देऊन ती आता ११०४७/११०४८ दादर-गोरखपूर एक्सप्रेस म्हणून चालवली जाणार आहे. या निर्णयामुळे उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठी सुविधा मिळेल, असा दावा करण्यात आला आहे.

या निर्णयावर माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी कोकणातील प्रवाशांच्या अडचणींचा मुद्दा उपस्थित करत तात्काळ सुधारणा करण्याची मागणी केली आहे. विशेषतः कामगार वर्ग आणि स्थानिक प्रवाशांना याचा सर्वाधिक फटका बसणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, दादर-रत्नागिरी गाडीचा मार्ग पूर्णपणे बंद झाल्याने आता ही सेवा दिवा कायमस्वरूपी स्थानकावरून चालवली जाणार आहे. ही गाडी दादर पर्यंत पूर्ववत होण्याची आशाही आता नष्ट झाली आहे.

दादर-रत्नागिरी पॅसेंजर कोरोनापूर्वी दादर ते रत्नागिरी दरम्यान चालविण्यात येत होती. मात्र कोरोना काळात ‘झिरो टाइमटेबल’ च्या नावाखाली दिवा स्थानकापर्यंत मर्यादित करण्यात आली. मात्र त्यानंतर प्रवासी संघटनांनी वारंवार मागणी करूनही आजतागायत तिची सेवा पूर्ववत करण्यात आली नव्हती. ही गाडी दादर पर्यंत नेण्यासाठी स्लॉट उपलब्ध नसल्याचे कारण यासाठी देण्यात येत होते. मात्र त्याच स्लॉटवर विशेष गाडी ०१०२७/०१०२८ दादर-गोरखपूर ही चालविण्यात आली. याविरोधात प्रवासी संघटना आक्रमक झाल्या होत्या. या विरोधात मोर्चाही काढण्यात आला होता आणि दादर – रत्नागिरी पॅसेंजर गाडी पूर्ववत करण्यात यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली होती. मात्र आता हा स्लॉट कायमस्वरूपी दादर-गोरखपूर एक्सप्रेसला दिल्याने त्या मागणीला केराची टोपली दाखविली गेल्याचे दिसत आहे.

या बदलामुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. रेल्वेने ऑपरेशनल कार्यक्षमतेचा दाखला देत हा निर्णय घेतला असला, तरी स्थानिक प्रवाशांच्या सोयींचा विचार न केल्याची टीका होत आहे. आपली हक्काची गाडी मुंबई बाहेर नेवून त्याजागी ही लांब पल्ल्याची गाडी कायम केल्याने प्रवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

कोकण रेल्वे विलीनीकरणाचा चेंडू कर्नाटक आणि केरळ सरकारच्या कोर्टात

नवी दिल्ली: महाराष्ट्र आणि गोवा सरकारने कोकण रेल्वे भारतीय रेल्वे मध्ये विलिनीकरण करण्याच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र, कर्नाटक आणि केरळ सरकारने अद्याप यावर आपली स्पष्ट भूमिका मांडलेली नाही किंवा संमती दिलेली नाही. जोपर्यंत ही दोन राज्ये सहकार्य करत नाहीत, तोपर्यंत विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही असे विधान लोकसभेत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान केले.

लोकसभेत आज अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान कोकण रेल्वेच्या सद्यस्थितीवर आणि भविष्यातील विस्तार योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांनी कोकण रेल्वेच्या प्रलंबित प्रकल्पांबाबत केंद्र सरकारला प्रश्न विचारले. त्यांनी विशेषतः कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचा (Doubling) सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) कधी पूर्ण होईल आणि या मार्गावर प्रवाशांच्या सुविधेसाठी अतिरिक्त वंदे भारत गाड्या कधी सुरू होतील, याकडे सभागृहाचे लक्ष वेधले.

खासदार वायकर यांच्या प्रश्नांना उत्तर देताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) मधील तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी स्पष्ट केल्या. त्यांनी सांगितले की, कोकण रेल्वे ही भारतीय रेल्वेच्या इतर विभागांप्रमाणे नसून ती एक स्वतंत्र कॉर्पोरेशन आहे, ज्यामध्ये भारत सरकारसह महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ ही चार राज्ये भागधारक (Shareholders) आहेत. यामुळे कोणताही मोठा निर्णय घेताना या सर्व राज्यांची संमती आवश्यक असते.

कोकण रेल्वेच्या भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरणाबाबत बोलताना रेल्वे मंत्र्यांनी माहिती दिली की, महाराष्ट्र आणि गोवा सरकारने या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र, कर्नाटक आणि केरळ सरकारने अद्याप यावर आपली स्पष्ट भूमिका मांडलेली नाही किंवा संमती दिलेली नाही. जोपर्यंत ही दोन राज्ये सहकार्य करत नाहीत, तोपर्यंत विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. त्यांनी या राज्यांना वैयक्तिक हित बाजूला ठेवून देशाच्या विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.

रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाबाबत त्यांनी स्पष्ट केले की, ७४० किमी लांबीच्या या मार्गावरील काही महत्त्वाच्या ‘चोक पॉइंट्स’ (जिथे वाहतूक कोंडी होते) च्या दुपदरीकरणासाठी डीपीआर तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १० वर्षांत रेल्वेचे बजेट लक्षणीयरीत्या वाढवण्यात आले असून, तांत्रिक बाबींची पूर्तता होताच या कामाला गती दिली जाईल. तसेच सुरक्षितता आणि वेग वाढवण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी नमूद केले.

शेवटी, वंदे भारत सारख्या आधुनिक गाड्यांच्या मागणीवर बोलताना त्यांनी आश्वासन दिले की, रेल्वे नेटवर्कच्या विस्तारासोबतच प्रवाशांची गरज लक्षात घेऊन नवीन गाड्यांचे नियोजन केले जाईल. कोकण रेल्वे हा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या दळणवळणाचा कणा आहे, त्यामुळे या मार्गावरील पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करणे हे सरकारचे प्राधान्य आहे.

कोकण रेल्वे संबधित प्रलंबित मागण्यांसाठी १ मे रोजी आमरण उपोषणाचा इशारा

   Follow us on        

नवी मुंबई: कोकण रेल्वे प्रवाशांच्या प्रलंबित मागण्यांकडे रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने होणाऱ्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ ‘जल फाउंडेशन कोकण विभाग’ आणि ‘अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती’ आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. येत्या ३० एप्रिल २०२६ पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास, १ मे २०२६ (महाराष्ट्र दिन) रोजी कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील कॉर्पोरेट कार्यालयासमोर धरणे आंदोलन आणि आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

​प्रशासकीय दिरंगाईचा प्रवाशांना फटका

​या संदर्भात १० सप्टेंबर २०२५ रोजी बेलापूर कार्यालयात जल फाउंडेशनच्या प्रतिनिधींची रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली होती. या बैठकीत समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक आश्वासन देण्यात आले होते, मात्र आजपर्यंत त्यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे कोकणवासीयांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

​”आम्ही गेल्या सहा वर्षांपासून रेल्वेकडे विविध मागण्या केल्या आहेत. संपूर्ण कोकण रेल्वे मार्गावरील गर्दी विभाजनासाठी काही उपायही सुचवले आहेत. परंतु रेल्वेकडून दाद मिळत नसल्यामुळे उपोषणाचा मार्ग अवलंबण्यात येत आहे.”

— अक्षय महापदी, सचिव, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, महाराष्ट्र.

​प्रमुख मागण्या:

​रत्नागिरी पॅसेंजर (५०१०३/०४): या गाडीतील आरक्षित डबे पुन्हा सुरू करणे.

​मुंबई-चिपळूण नवीन गाडी: मुंबई (CSMT/दादर/LTT) ते चिपळूण दरम्यान सर्व स्थानकांवर थांबा देणारी दैनंदिन गाडी सुरू करणे.

​खेड रेल्वे स्थानक थांबा: जनशताब्दी, गरीब रथ, गोवा संपर्क क्रांती यांसारख्या महत्त्वाच्या गाड्यांना खेड येथे थांबा देणे.

​कोटा (GN Quota): मडगाव-एलटीटी एक्सप्रेस आणि मांडवी एक्सप्रेसमधील सर्व स्थानकांसाठी असलेला मूळ स्टेशन कोटा पूर्ववत करणे.

​गाड्यांचे पुनरुज्जीवन: रत्नागिरी-दादर पॅसेंजर ही गाडी कोविडपूर्व स्थितीप्रमाणे पुन्हा सुरू करणे.

​अंतिम इशारा

​जल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन जाधव यांनी स्पष्ट केले की, १० सप्टेंबरच्या बैठकीनंतर रेल्वेकडून कोणतेही अधिकृत पत्र प्राप्त झालेले नाही. जर ३० एप्रिलपर्यंत ठोस निर्णय झाला नाही, तर १ मे रोजी नाईलाजाने उपोषण सुरू करावे लागेल. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला सर्वस्वी कोकण रेल्वे प्रशासन जबाबदार असेल.

Mumbai Local: ठाणे स्थानकावरील गर्दीवर तोडगा; ठाणेकरांना मिळणार अजून एक रेल्वे स्थानक

नवीन रेल्वे स्थानकाला शिवसेना नेते दिवंगत धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्याची आग्रही मागणी

   Follow us on        

ठाणे : ठाणे आणि मुलुंड या दोन स्थानकांमधील वाढती गर्दी आणि प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून एका नवीन स्थानकाची निर्मिती केली जात आहे. हे नवीन स्थानक ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जागेवर उभारले जात असून, यामुळे ठाणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची गर्दी विभागली जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे घोडबंदर रोड, वागळे इस्टेट आणि आसपासच्या परिसरातील लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

​या पार्श्वभूमीवर, शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी या नवीन रेल्वे स्थानकाला शिवसेना नेते दिवंगत धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्याची आग्रही मागणी केली आहे. आनंद दिघे यांनी ठाणे जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत मोलाचे योगदान दिले असून, ते आजही जनमानसात अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून या स्थानकाला त्यांचे नाव देणे ही त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे मत म्हस्के यांनी व्यक्त केले आहे.

​खासदार नरेश म्हस्के यांनी या मागणीबाबत रेल्वे मंत्रालयाकडे आणि राज्य सरकारकडे औपचारिक पाठपुरावा सुरू केला आहे. या संदर्भात त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रस्तावावर वेगाने कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. ठाणे शहराच्या अस्मितेशी जोडले गेलेले हे नाव प्रवाशांच्या भावनांशी देखील जुळलेले असल्याचे त्यांनी नमूद केले असून, या प्रस्तावामुळे स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

​हे नवीन स्थानक कार्यान्वित झाल्यानंतर केवळ प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार नाही, तर परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या देखील सुटण्यास मदत होईल. सध्या या स्थानकाचे काम वेगाने सुरू असून, त्याला ‘आनंद दिघे’ यांचे नाव मिळाल्यास ठाणेकरांसाठी हे स्थानक ऐतिहासिक महत्त्वाचे ठरेल. आता या प्रस्तावावर रेल्वे बोर्ड आणि केंद्र सरकार काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बदलापूर – नवी मुंबई रेल्वेने जोडण्याच्या हालचालींना वेग

   Follow us on        

ठाणे: बदलापूर आणि वांगणी रेल्वे स्थानकांच्या दरम्यान ‘कासगाव’ (चामटोली) येथे नवीन रेल्वे स्थानक उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. रेल्वे प्रशासनाने यासंदर्भात प्रस्ताव मागविला असून, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या नवीन स्थानकापासून नवी मुंबईतील कामोठेपर्यंत थेट रेल्वे मार्ग टाकण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास बदलापूर परिसरातील नागरिक थेट लोकलने नवी मुंबईला जो़डले जातील.

​वाढत्या प्रवासी संख्येवर उपाय आणि टर्मिनसचा दर्जा

बदलापूर आणि आसपासच्या भागात नागरी वस्ती झपाट्याने वाढत असल्याने रेल्वे प्रवाशांची संख्या मोठी आहे, ज्यामुळे सध्याचा प्रवास जीवघेणा ठरत आहे. या पार्श्वभूमीवर, कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन बदलापूर स्थानकाला ‘टर्मिनस’चा दर्जा देण्याची मागणी केली. या मागणीला रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून संबंधित अधिकाऱ्यांना त्याबाबतचा तांत्रिक अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

​कासगाव स्थानकाचे महत्त्व आणि प्रवाशांना दिलासा

बदलापूर शहराच्या वेशीवरील ग्रामपंचायतींमध्ये लोकसंख्या वाढत आहे, मात्र मुंबईकडे जाण्यासाठी या प्रवाशांना बदलापूर किंवा वांगणी स्थानकावर अवलंबून राहावे लागते. वांगणीतून लोकलची संख्या कमी असल्याने प्रवाशांचे हाल होतात. अशा वेळी बदलापूर आणि वांगणीच्या दरम्यान कासगाव येथे नवीन स्थानक झाल्यास स्थानिकांचा प्रवास सोपा होईल. तसेच, येथून कामोठेपर्यंत नवा मार्ग झाल्यास नवी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे.

​भविष्यातील सुविधा आणि वंदे भारत एक्सप्रेस

रेल्वेच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर बदलापूर स्थानकात अतिरिक्त फलाट उपलब्ध होणार आहेत. यामुळे बदलापूर ते पुणे दरम्यान ‘वंदे भारत एक्सप्रेस’ सुरू करण्याबाबत अभ्यास करण्याच्या सूचनाही रेल्वेमंत्र्यांनी दिल्या आहेत. तसेच, फलाटांची लांबी वाढल्यामुळे भविष्यात अनेक लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांना बदलापूर स्थानकात थांबा मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून, रेल्वे व्यवस्थापकांना या सर्व बाबींची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search