Author Archives: Kokanai Digital

ठाणे महानगरपालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवार प्रफुल्ल कदम यांचा बोलबाला! प्रभाग क्रमांक १३, विभाग “ड” मध्ये प्रचाराची रणधुमाळी!

   Follow us on        

संदेश जिमन /ठाणे: मिळालेल्या माहितीनुसार सद्यस्थितीत महानगरपालिका निवडणूकीची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. प्रचाराची धग शिगेला पोहोचली असताना त्यात एखाद्या अपक्ष उमेदवाराने जन सेवेची अपेक्षा ठेऊन प्रचारात आघाडी घ्यावी अशीच परिस्थिती ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक १३ , “ड” विभागातील अपक्ष उमेदवार यांनी निर्माण केली आहे.

वाढता प्रतिसाद, सेवाभावी व्यक्तीमत्वाचा प्रभाव यामुळे जनतेचा प्रफुल्ल कदम यांच्यावरील विश्वास वाढतो आहे.

प्रफुल्ल कदम हे कोकणाचे सुपुत्र, त्यांनी सामाजिक कार्य करताना आजवर कोणत्याही मोठ्या पदाची अपेक्षा बाळगली नाही. शारीरिक शिक्षण , कराटे प्रशिक्षक म्हणून काम करत असताना सशक्त, जागृत समाज घडविण्यासाठी, सामान्य माणसाचा दबलेला आवाज सुस्त प्रशासना पर्यंत पोहचवण्यासाठी आपण निवडणूकीच्या रिंगणात दाखल झाल्याचे म्हटले आहे.

मुंबईत सध्यातरी मोठा प्रश्न आहे तो म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन, या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर लढाई करावी लागणार, हा काळ संघर्षाचा आहे. एकजुटीने लढलो तर विजय निश्चितच आपला आहे. म्हणून कायम सुख दुःखात खंबीरपणे पाठीशी उभा असणारा प्रतिनिधी निवडावा असे आवाहन प्रभागातील जनतेला प्रफुल्ल कदम यांनी केले आहे.

हा संघर्ष,ही लढाई सत्तेच्या मदमस्त सुखासाठी नाही तर ती हक्क, न्याय,सन्मान यासाठी आहे असा ठाम विश्वास प्रफुल्ल कदम यांनी मतदारांना दिला आहे. “केक” ही निशाणी आहे.

मतदारांनी मोठ्या संख्येने पाठींबा द्यावा असे त्यांनी नम्र आवाहन केले आहे.

निवडणूकीच्या रिंगणात नियोजित उद्देशाने येणारे , प्रचार आणि जनतेचा विश्वास यांच्या जोरावर निवडणूक जिंकतात. जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न हाताळणाऱ्या उमेदवारांचे मनोरथ पूर्ण होईल असा विश्वास वाटतो आहे.

संगमेश्वरमध्ये जनआक्रोश समितीचे रस्ता रोको आंदोलन यशस्वी; मात्र आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल 

मुंबई–गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात आक्रमक रस्ता रोको-

संगमेश्वर | ११ जानेवारी २०२६

“कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही… मुंबई–गोवा महामार्ग झालाच पाहिजे!”

“या तिरडीत झोपलाय कोण,आमदार–खासदार सगळेच चोर… ही तिरडी कशाला? प्रशासनाच्या मयताला!”

अशा तीव्र व आक्रमक घोषणांनी रविवारी संगमेश्वर येथील सोनवी पुल परिसर अक्षरशः दणाणून गेला. गेल्या तब्बल १७ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाविरोधात नागरिकांचा संयम संपल्याने जनआक्रोश समितीच्या वतीने महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

महामार्गावरील संथगतीने सुरू असलेले काम, नियोजनाचा अभाव व ठेकेदारांचा हलगर्जीपणा यामुळे सातत्याने भीषण अपघात घडत आहेत. अनेक निष्पाप नागरिक, दुचाकीस्वार, वाहनचालक तसेच मुक्या जनावरांचे प्राण गेले असून, शेकडो नागरिक गंभीर जखमी, कायमचे अपंग झाले आहेत. आर्थिक नुकसान व मानसिक त्रास हे कोकणकरांचे रोजचे वास्तव बनले आहे.

“अजून किती जीव गेल्यावर शासन व प्रशासन जागे होणार?” असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.

आंदोलनामुळे महामार्गावर चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संपूर्ण संगमेश्वर परिसर काही काळ पोलीस छावणीत रूपांतरित झाला होता.

वरिष्ठ अधिकाऱ्यांऐवजी कनिष्ठ अभियंता – जनतेचा संताप

आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांऐवजी केवळ कनिष्ठ अभियंत्याला पाठवण्यात आल्याने आंदोलनकर्त्यांचा संताप अनावर झाला.

“आमच्या प्रश्नांची दखल घ्यायची असेल तर जबाबदार वरिष्ठ अधिकारीच आले पाहिजेत. अटक झाली, जेलची हवा खावी लागली तरी माघार नाही,” असा ठाम इशारा देण्यात आला.

सुमारे तासभर महामार्ग पूर्णतः ठप्प राहिला. काही आंदोलनकर्ते सोनवी पुलावरच झोपून प्रतिकार करत होते, तर महिलांनीही महामार्गावर ठाण मांडले. प्रतीकात्मक तिरडी ठेवून जोरदार घोषणाबाजी सुरूच होती.

अखेर अधीक्षक अभियंता आंदोलनस्थळी

दीर्घ तणावानंतर महामार्ग प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता अनामिका जाधव आंदोलनस्थळी दाखल झाल्या.जनआक्रोश समितीने स्पष्ट भूमिका मांडत सांगितले की, “पोकळ आश्वासने नकोत. लेखी, ठोस व कालबद्ध हमी दिली तरच आंदोलन स्थगित करू.” अधीक्षक अभियंता अनामिका जाधव यांनी संगमेश्वर येथील उड्डाणपुलाचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करून वाहतुकीसाठी खुले केले जाईल, तसेच इतर मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतले जातील, असे आश्वासन दिले.

चार तासांचा नाट्यपूर्ण संघर्ष

सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत संपूर्ण परिसरात तणावपूर्ण वातावरण होते. परवानगीशिवाय राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको केल्याप्रकरणी काही आंदोलनकर्त्यांवर संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सुरेंद्र पवार, संजय जंगम, रुपेश दर्गे, जितेंद्र गिजे, अनिकेत मेस्त्री, संतोष आंब्रे, विशाखा खेडेकर.

राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक अडवणे हे कायद्याने गुन्हा असला तरी, सार्वजनिक सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून प्रशासन व ठेकेदारांनी केलेली दिरंगाई हीदेखील गंभीर गुन्हेगारी कसूर आहे, असा ठाम आरोप जनआक्रोश समिती व नागरिकांनी केला आहे.

या आंदोलनात जनआक्रोश समितीचे सुरेंद्र पवार, संजय जंगम, रुपेश दर्गे, जितेंद्र गिजे, अनिकेत मेस्त्री, संतोष आंब्रे, हरिश बेगावले, विशाखा खेडेकर यांच्यासह मुंबईतून आलेले ८० कोकणकर, संगमेश्वरचे युयुत्सु आर्ते, मनसेचे जितेंद्र चव्हाण, अशोक जाधव तसेच तालुक्यातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

​‘फुकटची’ बस नको, हक्काची ट्रेन द्या! मत हवे असेल तर ‘टर्मिनस’ द्या!

मत’ हवे असेल तर ‘टर्मिनस’ द्या!

   Follow us on        

​मुंबई/सावंतवाडी:

“निवडणुका आल्या की आमची आठवण येते, सणासुदीला मोफत बसचे गाजर दाखवले जाते. पण आम्हाला ही तात्पुरती मलमपट्टी नको आहे. आम्हाला सन्मानाचा आणि हक्काचा रेल्वे प्रवास हवा आहे. जर मते हवी असतील, तर आधी सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा प्रश्न मार्गी लावा,” अशा शब्दांत मुंबईतील कोकणी चाकरमान्यांनी आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींना धारेवर धरले आहे.

​सोशल मीडियावर सध्या एका व्यथित चाकरमान्याचे पत्र तुफान व्हायरल होत असून, ‘तात्पुरती बस नको, हक्काची ट्रेन हवी’ ही मागणी आता एका जनआंदोलनाचे रूप धारण करत आहे.

​बसेसच्या राजकारणापेक्षा कायमस्वरूपी उपाय हवा

​दरवर्षी गणेशोत्सव आणि शिमग्याला राजकीय पक्षांकडून ‘मोफत बस’ सोडण्याची चढाओढ लागते. मात्र, तासनतास होणारी वाहतूक कोंडी आणि बसचा प्रवास हा त्रासदायक ठरत असल्याची भावना चाकरमान्यांमध्ये आहे. “आम्ही भिकारी नाही, आम्ही कष्टाळू आहोत. आम्हाला फुकटचा प्रवास नको, तर सुरक्षित रेल्वे प्रवास हवा आहे,” असा सणसणीत टोला या पत्राद्वारे राजकीय नेत्यांना लगावण्यात आला आहे.

​‘मत’ हवे असेल तर ‘टर्मिनस’ द्या!

​”जो आमच्या हक्कासाठी लढेल, त्याच्याच पाठीशी कोकणी समाज खंबीरपणे उभा राहील,” असा इशाराही चाकरमान्यांनी दिला आहे. भावी नगरसेवकांनी केवळ वॉर्डापुरते मर्यादित न राहता, सभागृहात आणि प्रशासनासमोर सावंतवाडी टर्मिनसचा आवाज उठवावा, अशी मागणी जोर धरत आहे.

​”कोकणी बाणा हा आहे की, आम्ही कष्टाचे खातो. आम्हाला निवडणुकीपुरती मलमपट्टी नको, तर रेल्वेच्या रुळावर धावणारी कायमस्वरूपी प्रगती हवी आहे.”

— एक व्यथित कोकणी चाकरमानी

सावधान! येथे बिबट्यांचा वावर आहे; रत्नागिरीतील ‘या’ १०५ गावांना सतर्कतेचा इशारा

   Follow us on        

रत्नागिरी:रत्नागिरी जिल्ह्यातील विविध भागांत बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीची वनविभागाने गंभीर दखल घेतली असून, ज्या गावांमध्ये बिबट्याचा वावर आहे अशा १०५ गावांची अधिकृत यादी रत्नागिरी वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केली आहे.

​बिबट्यांच्या संख्येत वाढ आणि मानवी वस्तीत शिरकाव

​वनविभागाच्या अंदाजानुसार, या परिक्षेत्रात सध्या सुमारे १०० ते १२५ बिबट्ये असण्याची शक्यता आहे. पूर्वी बिबट्यांचा अधिवास १० किमी परिसरात असायचा, मात्र संख्या वाढल्याने आता हा अधिवास ५ किमीपर्यंत मर्यादित झाला आहे. यामुळे शिकारीच्या शोधात बिबट्ये आता थेट मानवी वस्त्यांमध्ये शिरत आहेत. पाळीव प्राण्यांवर आणि काही ठिकाणी माणसांवरही हल्ले होण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील बिबट्या प्रवण गावांची यादी

​१. रत्नागिरी तालुका (सर्वात जास्त बाधित)

​जाकादेवी परिसर, जयगड, सांडेलवण, कोतवडे, कर्बुडे, हातखंबा, फणसवळे, निवळी, पानवल, चाफेरी, कचरे, गणपतीपुळे, निवेंडी, भगवतीनगर, नेवरे, ओरी, वेतोशी, काळबादेवी, चाफे, उंडी, वरवडे, मालगुंड, भंडारपुळे, जांभरुण, भोके, खानू, पाली, नाणीज, उंबरे, पावस, हरचेरी, टिके, टेंभ्ये, नाचणे, जुवे, करला, फणसोप, कोळंबे, गोळप, गावखडी, मेर्वी, पूर्णगड, गावडेआंबेरे, दाभिल, आंजारी, मावळंगे, हातिस, चिंचखरी, सोमेश्वर, बाळके, केळवणे, चरवेली, डोळस, कुवारबाव, मिरजोळे, शिरगाव, आडी, साखरतर, कासारवेली.

​२. लांजा तालुका / परिसर

​धडे, वनगुळे, गावाणे, कुरुचे, पुनस, लांजा, घुडेरे, मठ, गोळवल, वाडगाव, कगडवली, विलवडे, हसोळ, आडवली, शिपोशी, वेरवली, खेरवसे, कोर्ले, शिरवली.

​३. राजापूर तालुका

​पेंढखळे, सागवे, केरवण, भू, भानवलो, नाटे, तुळसंवडे, शिवणे, वडदहसोल, कोळ्ये, ओणी, वाटूळ, आडीवरे, ताम्हाणे.

​४. संगमेश्वर तालुका / क्षेत्र

​फुणगुस, कोसुंब, शिवणे, कुरुधुंडा, साखळे, आरवली परिसर, कुंभारखाणी, राजिवली, राजवाडी, कडवई, धामणी, कजारी, साखरपा परिसर.

​महत्त्वाची सूचना: वनविभागाने या १०५ गावांमध्ये विशेष सतर्कता बाळगण्यास सांगितले आहे. बिबट्या दिसल्यास स्वतःहून त्याला पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न न करता तातडीने वनविभागाला कळवावे.

अरे बापरे! मुंबईतून हरवलेले तब्बल दोन कोटी रुपयांचे १६५० मोबाईल उत्तर प्रदेशात सापडले

   Follow us on        

मुंबई: मुंबई पोलिसांनी हरवलेल्या आणि चोरीला गेलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी राबवलेल्या एका विशेष मोहिमेअंतर्गत मोठे यश संपादन केले आहे. मुंबईतून गायब झालेले तब्बल १,६५० मोबाईल फोन पोलिसांनी उत्तर प्रदेशातील विविध भागांतून शोधून काढले आहेत. या जप्त करण्यात आलेल्या फोनची बाजारपेठीय किंमत अंदाजे २ कोटी रुपये इतकी आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या फोनचा माग काढला आणि विशेष पथकाद्वारे हे फोन पुन्हा मुंबईत आणले.

​या मोहिमेमुळे आपले महागडे फोन परत मिळतील ही आशा सोडून दिलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या विशेष मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण ३३,५१४ मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना सुरक्षितपणे परत करण्यात आले आहेत. चोरीच्या मोबाइल टोळ्यांवर वचक बसवण्यासाठी आणि नागरिकांचा कष्टाचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

 

Shaktipeeth Expressway: सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्गाच्या आराखड्यात बदल होणार?

   Follow us on        

सावंतवाडी: महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘शक्तीपीठ महामार्गा’च्या मूळ आराखड्यात बदल करण्याचे संकेत मिळाल्यानंतर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेमक्या कोणत्या गावांतून हा मार्ग जाणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुन्या मार्गात बदल करण्याचे स्पष्ट केले असले तरी, स्थानिक प्रशासनाकडे अद्याप नवीन बदलांचे कोणतेही लेखी निर्देश प्राप्त झालेले नाहीत.

​नव्या बदलांनुसार जिल्ह्यातील गावांची नेमकी स्थिती काय असेल, याबाबत खातरजमा करण्यासाठी येथील स्थानिक शासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी अद्याप नवीन सर्वेक्षण किंवा भूसंपादनाबाबत वरिष्ठांकडून कोणतेही आदेश आले नसल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी किंवा प्रांताधिकारी कार्यालयाकडून अधिकृत सूचना मिळाल्यावरच पुढील कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

​शक्तीपीठ महामार्गाचा जुना आराखडा हा पवनार (वर्धा) ते पत्रादेवी (गोवा) असा ८०२ किमीचा प्रस्तावित आहे. या जुन्या आराखड्यानुसार हा मार्ग महाराष्ट्रातील १२ जिल्हे, ३९ तालुके आणि ३७० गावांमधून जाणार आहे.​ या प्रकल्पामुळे सुपीक जमिनी आणि पर्यावरणाचे नुकसान होईल, या भीतीने स्थानिक शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी यापूर्वीच मोठा विरोध दर्शवला होता.

​महामार्गाच्या आराखड्यात बदल होणार असल्याची चर्चा सुरू झाल्यापासून सिंधुदुर्गातील गावांमधील लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. नक्की कोणत्या जमिनी संपादित केल्या जातील आणि कोणाचे घर किंवा शेती वाचेल, याबाबत स्पष्टता नसल्यामुळे लोकांची ‘धाकधूक’ वाढली आहे.

​जोपर्यंत सरकार नवीन नकाशा किंवा लेखी आदेश प्रसिद्ध करत नाही, तोपर्यंत हा संभ्रम असाच कायम राहण्याची शक्यता आहे.

Submarine Tourism Project: कोकणचा पर्यटन अनुभव आता समुद्राखालीही

   Follow us on        

मुंबई – महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीला जागतिक पर्यटन नकाशावर ठळकपणे अधोरेखित करण्यासाठी राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि नाविन्यपूर्ण प्रकल्प हाती घेतला आहे. या अंतर्गत भारतामधील पहिल्या पाणखालील (सबमरीन) पर्यटन प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे देशांतर्गत तसेच परदेशी पर्यटकांना समुद्राखालील नैसर्गिक सृष्टीचा थेट अनुभव घेता येणार आहे.

या योजनेनुसार २४ प्रवाशांची क्षमता असलेली अत्याधुनिक पॅसेंजर सबमरीन विकसित करण्यात येणार आहे. या सबमरीनद्वारे पर्यटकांना समुद्राच्या खोल भागात नेण्यात येईल, जिथे प्रवाल भित्ती (कोरल रीफ), विविध प्रकारचे मासे, सागरी वनस्पती आणि जैवविविधता जवळून पाहता येणार आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रवासात प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार आहे.

हा प्रकल्प सुमारे ₹११२ कोटी खर्चाचा असून, त्याची जबाबदारी माझॅगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) या नामांकित सार्वजनिक क्षेत्रातील संस्थेकडे सोपवण्यात आली आहे. एमडीएल ही संस्था भारतीय नौदलासाठी युद्धनौका व पाणबुड्या तयार करण्याचा मोठा अनुभव असलेली असल्याने, या पर्यटन प्रकल्पाला तांत्रिकदृष्ट्या अधिक विश्वासार्हता मिळणार आहे.

या उपक्रमाचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे EX-INS ‘गुलदार’ या पाणबुडीचे पाण्याखालील संग्रहालयात रूपांतर करणे. या पाणबुडीला समुद्रात मुद्दाम बुडवून कृत्रिम प्रवाळ भित्ती (Artificial Reef) तयार केली जाणार आहे. यामुळे एकीकडे सागरी जैवविविधतेला चालना मिळेल, तर दुसरीकडे पाण्याखालील वारसा आणि संरक्षणात्मक पर्यटन (Eco-Tourism) यांना प्रोत्साहन मिळेल.

हा प्रकल्प प्रथम २०१८-१९ च्या राज्य अर्थसंकल्पीय भाषणात जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर विविध तांत्रिक, पर्यावरणीय आणि आर्थिक बाबींचा सखोल अभ्यास करण्यात आला. केंद्र सरकारच्या सहकार्याने आवश्यक त्या परवानग्या आणि मंजुरी मिळाल्यानंतर आता हा प्रकल्प प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यावर आला आहे.

या सबमरीन पर्यटनामुळे सिंधुदुर्ग व कोकण पट्ट्यातील पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळणार असून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. हॉटेल व्यवसाय, वाहतूक, मार्गदर्शक सेवा आणि स्थानिक हस्तकला यांसारख्या क्षेत्रांनाही याचा फायदा होणार आहे.

पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते, हा प्रकल्प केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून पर्यावरणपूरक विकास, सागरी संवर्धन आणि शाश्वत पर्यटन धोरण यांचा आदर्श नमुना ठरेल. भविष्यात भारतातील इतर किनारी राज्यांसाठीही हा उपक्रम प्रेरणादायी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

सावंतवाडी – पंढरपूर दरम्यान ”माघी वारी विशेष” एक्सप्रेस चालविण्यात यावी

   Follow us on        

रत्नागिरी/सिंधुदुर्ग: आषाढी आणि कार्तिकी एकादशीप्रमाणेच कोकणात माघी एकादशीला विशेष महत्त्व आहे. या निमित्ताने कोकणातील हजारो वारकरी पंढरपूरला विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी जात असतात. मात्र, कोकणातून पंढरपूरला जाण्यासाठी थेट रेल्वे सेवा उपलब्ध नसल्याने वारकऱ्यांचे, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर, यावर्षी तरी सावंतवाडी ते पंढरपूर दरम्यान विशेष गाडी चालवावी, अशी मागणी प्रवासी संघटनांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

​रस्ते प्रवास ठरतोय त्रासदायक

​कोकणातून पंढरपूर रस्तेमार्गे जवळ असले तरी, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या कठीण घाटमार्गामुळे हा प्रवास अत्यंत वेळखाऊ आणि थकवणारा होतो. वयोवृद्ध वारकऱ्यांसाठी तासनतास बसचा किंवा खासगी वाहनाचा प्रवास शारीरिकदृष्ट्या त्रासदायक ठरतो. रेल्वेने हा प्रवास केल्यास तो अधिक आरामदायक आणि सुरक्षित होऊ शकतो, असे वारकऱ्यांचे म्हणणे आहे.

​मध्य रेल्वे दरवर्षी आषाढी-कार्तिकी एकादशीला नागपूर, अमरावती, कोल्हापूर, भुसावळ, लातूर आणि मिरज यांसारख्या विविध भागांतून विशेष गाड्यांची घोषणा करते. मात्र, दरवर्षी मागणी करूनही कोकण रेल्वे मार्गावरून पंढरपूरसाठी थेट विशेष गाडी अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. यामुळे कोकणातील भाविकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

आषाढी आणि कार्तिकी या दोन्ही महत्वाच्या एकदशा ऐन शेतीच्या हंगामात येत असल्याने वारकर्‍यांची ईच्छा असूनही कोकणकरांना पंढरपुरात जाणे शक्य होत नाही. माघी एकादशी सोयीच्या काळात येत असल्याने हा वारकरी नित्यनेमाने पंढरपूरला भेट देतो. त्यामुळे माघी वारीला मोठ्या प्रमाणात कोकणी भक्त दिसून येतात. येवढेच नाही तर या एकादशीच्या वारीला कोकणवासीयांची वारी असेही संबोधले जाते.

या महिन्याच्या अखेरीस माघी एकादशी येत असल्याने रेल्वेने तातडीने यावर निर्णय घ्यावा.

​आता रेल्वे प्रशासन या मागणीची दखल घेऊन कोकणातील वारकऱ्यांचा विठुरायापर्यंतचा प्रवास सुकर करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mumbai Local : मुंबईमध्ये लोकल ट्रेनला भीषण आग

   Follow us on        

मुंबई: मध्य रेल्वेच्या कुर्ला आणि विद्याविहार रेल्वे स्थानकांदरम्यान गुरुवारी रात्री कचरा उचलणाऱ्या ‘मक स्पेशल’ लोकलला भीषण आग लागल्याची घटना घडली. ऐन गर्दीच्या वेळी ही दुर्घटना घडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, ज्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले.

​नेमकी घटना काय?

​मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री ८:३० च्या सुमारास ही आग लागली. ही आग कचरा उचलणाऱ्या मक स्पेशल लोकलच्या पहिल्या डब्याला लागली होती. या डब्यामध्ये रेल्वे रुळांवरून गोळा केलेला कचरा आणि गाळ भरलेला होता. आग लागली तेव्हा हा डबा कुर्ल्यातील ईएमयू सायडिंगवर उभा होता.

​आग विझवण्यासाठी रेल्वे प्रशासनाला तातडीने ओव्हरहेड केबलचा वीज पुरवठा खंडित करावा लागला.विद्याविहार आणि सायन दरम्यान रात्री ८:३८ ते ८:५५ या वेळेत वीज पुरवठा बंद ठेवण्यात आला होता.वीज पुरवठा खंडित केल्यामुळे ‘अप’ धीम्या मार्गावरील लोकल सेवा पूर्णपणे थांबली होती, ज्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागला.

​सुदैवाने, रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. कचऱ्याला आग लागल्याने धुराचे लोट परिसरात पसरले होते, मात्र यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

संगमेश्वर स्थानकावर होळी विशेष एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्यावा; निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर (रेल्वे) फेसबुक ग्रुपची आग्रही मागणी

   Follow us on        

रुपेश मनोहर कदम/ सायले: संगमेश्वर तालुक्यातील रेल्वे प्रवाशांच्या सोयी सुविधांचा कायम पाठपुरावा करणाऱ्या निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर फेसबुक ग्रुप च्या सदस्यांनी आज दि. ७ जानेवारी २०२६ रोजी रत्नागिरी येथील रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी मा. श्री. शैलेश बापट यांची भेट निवेदन सादर केले. संगमेश्वर तालुक्यातील १९६ गावातील रेल्वे प्रवाशांच्या होळी उत्सवातील सुखकर प्रवासाचा विचार करून हे निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी चर्चा करताना संगमेश्वर स्थानकात प्रवाशांची वाढती संख्या ध्यानात घेऊन, उत्पन्न वाढी सोबत सुखकर प्रवास आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. यावर नाण्याची दुसरी बाजू म्हणजे फुकट्या प्रवाशांच्या बेजबाबदार वर्तनाचा रेल्वेला बसणारा फटका, त्यामुळे होणारे नुकसान कसे टाळता येईल यादृष्टीने उपाययोजना करण्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या चर्चेत ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन, रुपेश मनोहर कदम, अशोक मुंडेकर हे सहभागी झाले होते.कोकण रेल्वेच्या मार्गावर धावणाऱ्या हॉलिडे स्पेशल एक्स्प्रेसना संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात थांबा मिळाला तर दररोज हजारोंच्या संख्येने प्रवास करणाऱ्या तालुक्यातील रेल्वे प्रवाशांचा रेल्वे प्रवास नक्कीच सुखकर होणार!

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search