सावंतवाडी :भारतातील पहिलंवहिलं फिश थीम पार्क उभारण्याचा मान सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला आहे. या फिश थीम पार्कमध्ये नागरिकांना देशाविदेशातील विविध प्रकारचे मासे आणि पक्षी पाहायला मिळणार आहेत. सावंतवाडी तालुक्यातील दाणोली गावाजवळ असणाऱ्या केसरी-फणसवडे येथे हे केएसआर ॲक्वेरिअम उभारण्यात आले असून येत्या सोमवारी म्हणजेच दिनांक ११ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येत असल्याची माहिती मंत्री रविन्द्र चव्हाण यांनी काल पत्रकार परिषदेत दिली आहे.
या फिश थीम पार्कमध्ये माशांना फीडिंग करण्याची व्यवस्था तसेच छोटेखानी तळेही निर्माण करण्यात आले आहे. या तळ्यामध्ये मत्स्यप्रेमींना फिशिंगचा अनुभव मिळणार आहे. या फिश थीम पार्कमध्ये सुमारे तीन हजार पाचशे विविध जातीचे मासे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. गोड्या आणि खाऱ्या पाण्यातील मासे तसेच खाडीच्या पाण्यातील मासे पाहायला मिळणार आहेत.
पावसाळी पर्यटनस्थळ आणि थंड हवेचे ठिकाण असलेल्या आंबोलीच्या तळाशी असलेल्या केसरी-फणसवडे येथे हे फिश थीम पार्क उभारले आहे. येथील जंगल भागात असलेले करलाई स्वयंभू मंदिर प्रसिद्ध आहे. हा संपूर्ण परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. जवळच दाणोली येथे अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सदगुरु साटम महाराज यांचा मठ आहे. या फिश थीम पार्कमुळे या भागातील पर्यटनाला चांगले दिवस येणार आहेत.
Konkan Railway News : कोकण रेल्वे मार्गावर गुरुवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी मडगाव ते कुमठा दरम्यान रेल्वेच्या मालमत्ता देखभालीच्या कामासाठी सकाळी ११:०० ते दुपारी ०२:०० असा तीन तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहेत. कोकण रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या मेगाब्लॉकमुळे मडगाव पर्यंत धावणाऱ्या गाड्यांपैकी एका गणपती स्पेशल गाडीच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
खालील गाडी या दिवशी उशिराने धावणार आहे.
Train no. 09057 Udhna – Mangaluru Jn. Special दिनांक 13 सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी रत्नागिरी ते मडगाव दरम्यान १०५ मिनिटे उशिराने धावणार आहे.
कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना याची नोंद घेण्याची विनंती केली असून प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.
मुंबई : गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. चाकरमान्यांची गावी जाण्यासाठी लगबग सुरू झाली. जसजसा चतुर्थी सण जवळ येत आहे तसतसा उत्साह वाढत चालला आहे. मात्र चाकरमान्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. ऐन गणेश चतुर्थी सणाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची घोषणा केली आहे.
राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ केली असली तरी त्यामध्ये अजून चार टक्के वाढ करावी, एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा यासह प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी 11 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर (ST Worker Protest) जाणार आहेत. येत्या 11 तारखेपासून मुंबईतील आझाद मैदानावर हा संप करण्यात येणार असून त्याची प्रशासनाने दखल घेतली नाही तर 13 सप्टेंबरपासून राज्यभर संप करण्याचा इशाराही महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
राज्य सरकारने नुकताच एक जीआर काढून एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ केली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 34 टक्क्यांवरून 38 टक्क्यांवर पोहोचला आहे. पण शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 42 टक्के असून एसटी कर्मचाऱ्यांनाही 42 टक्के महागाई भत्ता मिळावा अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने केली आहे. तसेच कामगारांच्या मूळ वेतनामध्ये वाढ करावी आणि एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा अशी मागणीही करण्यात आली आहे. या मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने 11 सप्टेंबरपासून संप करण्यात येणार आहे.
राज्य सरकारने या मागण्या मान्य केल्या नाहीत तर 13 सप्टेंबरपासून राज्यातील सर्व जिल्हास्तरावर हे आंदोलन (ST Worker Protest) करण्यात येणार असल्याचं परिपत्रक महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेच्या वतीनं काढण्यात आलं आहे.
मुंबई :पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल/वांद्रे टर्मिनस येथून सावंतवाडी/मडगावसाठी थेट गाडी सुरू करण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या व गेला दशकभरपेक्षा जास्त काळ चर्चेत असलेल्या नायगाव जुचंद्र जोड मार्गिका प्रकल्पाला गती देऊन काम लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने पावले टाकण्याची विनंती करण्यासाठी कोंकण विकास समिती आणि जल फाउंडेशन यांच्या शिष्टमंडळाने उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांची आज शनिवार दि. ९ सप्टेंबर, २०२३ सकाळी १० वाजता कांदिवली येथील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली.
यावेळी सर्वप्रथम शिष्टमंडळाच्या सदस्यांनी खेड स्थानकात मंगला एक्सप्रेस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस कोचुवेली एक्सप्रेस थांबवण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी त्यांचे आभार मानले.
नायगाव जुचंद्र जोड मार्गिकेला रेल्वे बोर्डाने मान्यता दिली असली तरी कालबद्ध कार्यक्रम देऊन सदर काम पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे लवकरात लवकर भूसंपादन पूर्ण करून त्यानंतर साधारण एका वर्षाच्या कालावधीत हे काम करण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनातील संबंधित विभागांकडे पाठपुरावा करण्याची विनंती शिष्टमंडळाच्या सदस्यांनी खासदार गोपाळ शेट्टी यांना केली . तसेच, काम पूर्ण होण्याची वाट न पाहता तत्पूर्वीच लवकरात लवकर मुंबई सेंट्रल किंवा वांद्रे टर्मिनसयेथून सावंतवाडीला जाणारी नियमित गाडी सुरु करणे आवश्यक असल्याचे त्यांना सांगण्यात आले.
त्याचबरोबर कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण, दादर चिपळूण रेल्वे, रत्नागिरी दिवा पॅसेंजर आणि सावंतवाडी दिवा एक्सप्रेस दादरवरून चालवणे, दिवा रत्नागिरी मेमू केवळ गणपती सणापुरती न चालवता कायमस्वरुपी करणे, अनेक थांबे कमी करून दिवा सावंतवाडी पॅसेंजरची एक्सप्रेस केल्यानंतरही प्रवास वेळेत काहीही फरक पडलेला नसल्यामुळे दिवा सावंतवाडी एक्सप्रेसला रोहा ते रत्नागिरी दरम्यान सर्व थांबे देणे, तेजस एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव एक्सप्रेस, गांधीधाम नागकोईल एक्सप्रेस व मारुसागर एक्सप्रेस गाड्यांना वैभववाडी स्थानकात थांबा देण्यासंबंधीची निवेदने खासदारांना यावेळी देण्यात आली .
खासदार गोपाळ शेट्टी यांनी या विषयात लक्ष घालून कामे पूर्ण करून घेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी कोंकण विकास समितीचे संस्थापक – अध्यक्ष श्री. जयवंत शंकरराव दरेकर, जल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. नितीन सखाराम जाधव, रेल्वे अभ्यासक श्री. अक्षय मधुकर महापदी, ॲड. श्री. प्रथमेश रावराणे, श्री. रविंद्र वसंतराव मोरे, श्री. विनोद भगवंत भोसले, ॲड. श्री. चंद्रकांत सकपाळ, श्री. वसंत रामचंद्र मोरे, श्री. सचिन काते, श्री. रविंद्र मोरे, श्री. निवृत्ती निकम इ. उपस्थित होते.
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील भजनी मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना साहित्य पुरविणे या जि. प. च्या योजनेची काल दिनांक ७ सप्टेंबर रोजी जि. प. च्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात याची सोडत काढण्यात आली. या सोडतीत तालुक्यातील गावांचे गट पाडून प्रत्येक गटातून चार मंडळाची निवड करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील भजनी मंडळांच्या कलेला प्रोत्साहन मिळावे, यासाठी प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी भजनी मंडळांना साहित्य पुरविणे ही योजना सुरू केली आहे. एक पखवाज, एक चकी आणि पाच टाळ असे साहित्य प्रत्येक निवड झालेल्या भजनी मंडळाला दिले जाणार आहे. यासाठी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली दरम्यान, या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त भजनी मंडळांनी घ्यावा, यासाठी अर्ज करण्याचे आवाहन जि. प. कडून करण्यात आले होते. त्या आवाहनाला अनुसरून आतापर्यंत जि. प. कडे ३२०६ अर्ज प्राप्त झाले होते. एवढ्या मंडळांना साहित्य देणे शक्य नसल्याने विभागवार लकी ड्रॉ पद्धतीने मंडळांची निवड केली गेली.या लकी ड्रॉ पद्धतीत निवडलेल्या २५० मंडळांना याचा लाभ दिला जाणार आहे.
अक्षय महापदी | मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेसमधील एसी चेअर कारचा रत्नागिरीपासूनचा आरक्षण कोटा दुपटीने वाढवून आधीच्या २२ ऐवजी ४४ केला आहे.
रेल्वे मंत्रालयाने दि. २८ जून, २०२३ पासून मुंबई आणि मडगाव दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसची सेवा सुरु केली. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिवी येथे थांबे दिले गेले. कोकण रेल्वेने २२२३० मडगाव मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला मडगाव, थिवी आणि कणकवलीसाठी एसी चेअर कार साधारण ३५० व एक्सिक्युटीव्ह क्लास ३० अशा एकूण ३८० जागा तर रत्नागिरी आणि खेडसाठी एसी चेअर कार २२ व एक्सिक्युटीव्ह क्लास ४ अशा केवळ २६ जागांचा आरक्षण कोटा निश्चित केला केला होता. यामुळे रत्नागिरी व खेड या दोन्ही स्थानकातून वंदे भारतला अपेक्षित उत्पन्न मिळण्यास अडथळा निर्माण झाला होता.
ही तफावत लक्षात घेता कोंकण विकास समितीने पहिल्या दिवसापासून मुंबईकडे येणाऱ्या २२२३० मडगाव मुंबई वंदे भारत एक्सप्रेसमधील एसी चेअर कारचा रत्नागिरीपासूनचा आरक्षण कोटा वाढवण्याची मागणी लावून धरली होती. ऑगस्ट महिन्यात यासाठी पुन्हा पाठपुरावा केला होता.
याचीच दखल घेऊन कोकण रेल्वेने १२० दिवसांच्या आगाऊ आरक्षण कालावधीपासून आरक्षण कोटा वाढवलेला आहे. त्यानुसार, दि. ३ जानेवारी, २०२४ पासून २२२३० मुंबई वंदे भारत एक्सप्रेसमधील एसी चेअर कारचा रत्नागिरीपासूनचा आरक्षण कोटा दुपटीने वाढवून आधीच्या २२ ऐवजी ४४ केला आहे. त्यामुळे जानेवारीपासून रत्नागिरी व खेडसाठी एसी चेअर कार ४४ व एक्सिक्युटीव्ह क्लास ४ अशा एकूण ४८ जागांचा आरक्षण कोटा उपलब्ध असेल. रत्नागिरी व खेडमधील प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा कोंकण असे आवाहन विकास समितीने केले आहे.
मुंबई: मुंबई आणि नागपुरकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबई ते नागपूर हा प्रवास आता अवघ्या साडेतीन तासांत करता येणं भविष्यात शक्य होईल. मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेनचा प्रकल्प अहवाल रेल्वे मंत्रालयाला सादर झालाय अशी सूत्रांची माहिती आहे.
प्रस्ताव फेब्रुवारीतच सादर झाल्याची माहिती समोर येत आहे. ताशी 350 किमी वेगाने ही बुलेट ट्रेन धावणार आहे. बुलेट ट्रेनचा 68 टक्के भाग हा समृद्धी महामार्गाला समांतर असणार आहे. प्रकल्पाचा खर्च 1 लाख 70 हजार कोटींच्या घरात जाण्याचा अंदाज आहे. 766 किमी लांबीचा हा मार्ग असून प्रत्येक किलोमीटरचा खर्च 232 कोटी रूपये असेल.
एकूण 13 स्टेशनं या मार्गावर असतील. नागपूर, वर्धा, खापरी, पुलगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, करंजा लाड, मालेगाव, मेहकर, शिर्डी, नाशिक, इगतपुरी, शहापूर अशी स्टेशनं असणार आहेत.
रत्नागिरी: हंगामात खाजगी बस वाहतूकदारनकडून प्रवाशांची होणारी लूट थांबविण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या RTO राज्य परिवहन प्राधिकरणने पाउले उचलली आहेत. मुंबई-पुण्यासाठीच्या खाजगी बसेसचे दरपत्रक ठरवून देण्यात आले असुन बस वाहतूकदारांना या दरांच्या ५०% जास्त भाडे आकारण्यास परवानगी दिली आहे. या दरांपेक्षा जर कोणी बस व्यावसायिक अतिरिक्त दर आकारत असेल तर त्याची तक्रार करण्यासाठी एक हेल्पलाइन नंबर सुद्धा जाहीर करण्यात आला आहे.
सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या मजबुरीचा फायदा घेऊन कमी अंतराला अव्वाच्या सव्वा भाडे आकारण्याचे प्रकार हमखास घडत असतात. हे प्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरणने मुंबई,ठाणे आणि पुण्यासाठीच्या बसेसच्या भाड्याचे दरपत्रक ठरवून जाहीर केले आहे. या दरापेक्षा अधिक दर एखादा वाहतूकदार आकारत असल्यास त्याच्या विरोधात तक्रार 02352 – 225444 या व्हॉटस् ॲप क्रमांकावर नोंदविण्यात यावी असे आवाहन प्राधिकरणाने केले आहे. तक्रार नोंदविताना वाहनाचा नोंदणी क्रमांक व भाडे आकारणी तिकीट यांच्या फोटोसह तक्रार नोंदवावी, असे आवाहन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांनी केले आहे.
सावंतवाडी :मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ आणि सावंतवाडी या दरम्यान असलेल्या झाराप येथे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून शहरातून येणार्या गणेशभक्त व वाहन चालकांकरता मोफत चहा, पाणी व बिस्कीट स्टॉलची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविन्द्र चव्हाण यांनी आज दिली.
गणेशभक्तांसाठी हा स्टॉल गणपतीपर्यंत चालू राहणार आहे. आज या स्टॉलची पाहणी करून, उपस्थितांकडून स्टॉलच्या व्यवस्थेची माहिती घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री रविन्द्र चव्हाण हे आज मुंबई गोवा पाहणी दौर्यावर होते. मुंबई-गोवा महामार्गाची सिंगल लेन गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्यासाठी गेल्या वर्षभरात प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत. यामुळेच लवकरच ही सिंगल लेन कोकणवासीयांच्या सेवेत खुली होईल. यामुळेच जो प्रवास करायला पूर्वी १२ तास लागत होते, ते अंतर आता जवळपास ८ तासातच गाठता येईल. असं असलं तरीही कोकणवासीयांनी या रस्त्यावरून प्रवास करताना सुरक्षिततेचे सर्व नियम पाळणे आवश्यक आहे. ओव्हरटेकिंग आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक असलेले इतर प्रकार करू नयेत असे त्यांनी कोकणवासीयांना आवाहन केले आहे.