सिंधुदुर्ग : इन्सुली खामदेव नाका येथील शिवदुर्ग कॅश्यु फॅक्टरी अज्ञात चोरट्याने आज पहाटेच्या सुमारास फोडली. यात ४८ हजार रुपयांची रोकड व ८ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ५६ हजारांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला. याबाबतची फिर्याद मालक दिगंबर सदाशिव बोंद्रे यांनी बांदा पोलीसात दाखल केली आहे. ही घटना पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान घडली असावी असा पोलीसांचा अंदाज आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, इन्सुली खामदेव नाक्यावर श्री गणेश मंदिर समोरील शिवदुर्ग कॅश्यु फॅक्टरी फोडल्याचे आज सकाळी निदर्शनास आले. चोरट्याने खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून आत प्रवेश केला. कपाटातील तीन काऊंटरमध्ये ठेवलेली सुमारे ४८ हजार रुपयांची रोकड चोरट्याने लंपास केली. तसेच सुमारे ८ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरुन नेला.
आज सकाळी बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी सहकार्यां समवेत घटनास्थळाची पाहणी केली. मालक दिगंबर बोंद्रे व फॅक्टरीमधील कामगार यांच्याकडून आवश्यक माहिती घेतली. तसेच कॅश्यु फॅक्टरीमध्ये असलेले सीसीटीव्ही कॅमेरातील फुटेज तपासण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले. एलसीबी तसेच श्वान पथक व ठसेतज्ञांनाही पाचारण करण्यात आल्याची माहिती एपीआय शामराव काळे यांनी दिली.
लेख |सई परब: काल सहजच सोशल मीडियावर वेळ घालवत असताना एक विडिओ नजरेस पडला. धान्याची साठवणूक करण्याची एक पारंपरिक पद्धत म्हणजे ‘मुडी’ किंवा ‘बिवळा’ बांधण्याचा तो विडिओ होता. हा विडिओ पाहताना काही जुन्या आठवणी जाग्या झाल्यात.
पूर्वी कोकणात भातशेती मोठ्या प्रमाणात केली जात असे. पिक हातात आल्यानंतर त्याची साठवणूक करणे हे सुद्धा शेती करून धान्य मिळवण्याइतकेच महत्वाचे काम असे. धान्याच्या साठवणुकीसाठी गवताची ‘मुडी’ बांधून धान्याची साठवणूक केली असे.
मुडी म्हणजे गवत आणि दोरी वापरून धान्याची नैसर्गिकरीत्या साठवण करून ठेवण्याचं एक साधन. मुडी ही भाताची मळणी केल्यावर मिळणाऱ्या गवताची बांधली जायची. हे मोठं कौशल्याचं आणि ताकदीचंही काम असायचं. मोठय़ात मोठी मुडी ही दहा कुढवांची बांधली जायची. अगदी लहान म्हणजे दोन-तीन कुडू धान्याच्या मुडीला ‘बिवळा’ म्हणायचे. आमच्या बालपणीच्या काळात कोकणातल्या प्रत्येक घरात धान्याच्या अशा मुड्या एकावर एक रचून ठेवलेल्या दिसत.
बालपणीची काही वर्षं आम्ही अशा मुड्या पाहिल्या. एकाही वर्षी अशा मुडीतलं बियाण्यासाठीचं धान्य खराब झालेलं कधी पाहिलं नाही. त्या काळात खरिपाच्या सुरुवातीला बाजारातली आताच्या सारखी पिशवीबंद बियाणी विकत आणण्याची प्रथा नव्हतीच. शेतकरी वर्षभरासाठी लागणारं धान्य आणि मिरगात पेरायचं बियाचं धान्य अशा मुड्यांमध्ये ठेवत असत.
मुड्या या भाताच्या, भुईमुगाच्या व नाचणीच्या बांधल्या जात असत. धान्य टिकण्यासाठी त्यात त्रिफळ आणि लिंबाची पानेही टाकली जात असत. त्या काळात आजच्या सारखी बियाणी बाजारातही नव्हती. ‘वालय’ आणि ‘बेळणा’ ह्या भाताच्या पारंपरिक जाती खूप लोकप्रिय होत्या. ह्या दोन्ही जाती ‘महान’ प्रकारातल्या होत्या आणि जास्त उत्पादन देणाऱ्या होत्या. या जातीच्या भाताच्या पाच पायली, दहा पायली, एक मण, दीड मण अशा प्रमाणात मुड्या बांधत असत. साधारणपणे एक मणापासून पुढची मुडी बांधण्यासाठी खूप ताकद लागत असे. एखाद्या मुडीतलं भात दोन-अडीच वर्षांपर्यंतही उत्तम स्थितीत राहत असे.
पूर्वी कोणत्याही घराच्या श्रीमंतीचा अंदाज हा त्या घरात किती ‘मुड्या’ आहेत यावरून लावला जात असे. जेवढ्या जास्त ‘मुड्या’ तेव्हडा तो शेतकरी सधन असे मानले जायचे. एवढेच नव्हे तर जेव्हा लग्न ठरव्यासाठी मुलीकडील लोक मुलाकडे जायचे तेव्हा त्या घरातील ‘मुड्या’ मोजून लग्नाला होकार द्यायचा कि नाही ते ठरवायचे. काहीशी अतिशोयक्ती वाटल्यास तुम्ही वाडीतील जुन्या शेतकऱ्यांना अजूनही या गोष्टी विचारून या गोष्टीतील सत्यता जाणून घेऊ शकता.
आता अशा घरगुती मुड्या कुठे औषधालाही दिसत नाहीत. आता धान्य साठवण करून ठेवण्याइतपत शेतीही कुणी करत नाही. दीड-दोन खंडी भात पिकवणारा शेतकरी आज ‘मोठा’ शेतकरी समजला जातो. याशिवाय गावोगावी भात भरडण्याच्या मोठमोठ्या गिरण्या उपलब्ध असल्याने धान्याची साठवणही कुणी करत नाही.
रायगड | २७ ऑगस्ट: मुंबई गोवा महामार्गासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रेला सुरुवात झाली आहे. महामार्गावर पळस्पे फाटा येथून या यात्रेस सुरवात झाली आहे.
संपूर्ण कोकणात एकूण सात टप्प्यात पदयात्रा निघणार असून प्रत्येक टप्प्यात १५ किलोमीटरची पदयात्रा असणार आहे. विविध टप्प्यात शालिनी ठाकरे, बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील, नितीन सरदेसाई, विनोद खोपकर, संदीप देशपांडे, वैभव खेडेकर हे पदयात्रेचे नेतृत्व करणार आहेत. संध्याकाळी 6 वाजता कोलाड नाका येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभेने यात्रेची सांगता होईल.मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या खड्ड्यांमुळे आज मनसे रस्त्यावर उतरली आहे.
Konkan Hearted Girl म्हणून प्रसिद्ध असेलेली अंकिता प्रभू वालावलकर सुद्धा या यात्रेत अमित ठाकरे यांच्यासोबत सामील झाल्याचे दिसत आहे.
यात्रेत ‘यमराज’ सामील.
मुंबई गोवा महामार्गाच्या दुरवस्थेमुळे कित्येक जणांनी आपले प्राण गमावले आहेत त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी यमराजाची वेशभूषा केलेला एक कार्यकर्ता सुद्धा या पदयात्रेत सामील झाला आहे.
Mumbai Goa Highway :मुंबई गोवा महामार्गा संबधी एक महत्त्वाची बातमी आहे. गणेशोत्सवासाठी महामार्गावर अवजड वाहतूकीवर बंदी आणण्याचे सरकारने ठरवले आहे. उद्या दिनांक उद्या २७ ऑगस्ट २०२३ पासून २८ सप्टेंबर २०२३ पर्यंत ही बंदी असणार आहे.
गणेशोत्सवा तीन आठवड्यावर येऊन ठेपला असून मुंबई गोवा महामार्गाच्या विविध टप्प्यावर अहोरात्र काम सुरु असताना अवजड वाहनांच्या वाहतुकीचा प्रचंड ताण विशेषतः रायगड जिल्ह्यातील रस्ते कामावर येतोय म्हणून उद्या २७ ऑगस्ट २०२३ पासून २८ सप्टेंबर २०२३ पर्यंत या महामार्गावर अवजड वाहतूकीवर बंदी आणण्याचे सरकारने ठरवले आहे असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) रविन्द्र चव्हाण यांनी जाहीर केले आहे.
माझ्या कोकणी चाकरमान्यांसाठी मुंबई-गोवा महामार्गाला प्राधान्यक्रम देण्यात आला आहे. पळस्पे ते वाकण फाटा या दरम्यान अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या ठिकाणी जायचे असल्यास पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला आहे असे ते पुढे म्हणाले
Mumbai Goa Highway |दि.२६.०८.२०२३ :आज सकाळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या कामाचा पाहणी दौरा केला. ज्या गतीने काम होत आहे ते पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. दिनांक 10 सप्टेंबर पूर्वी या मार्गावरील सिंगल लेन चालू करणार हा आपण दिलेला शब्द आपण नक्किच पूर्ण करू असे त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.
त्याचप्रमाणे आज त्यांनी ट्विटर च्या माध्यमातून आपला शब्द पूर्ण करणार असल्याची ग्वाही दिली. ते म्हणाले…
एरवी पोटापाण्यासाठी मुंबई, ठाणे यासारख्या महानगरात राहणारे हजारो कोकणवासी गणेशोत्सवात न चुकता आपल्या मूळ गावी जातात आणि सगळ्यांसोबत एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात. त्यांचा प्रवास सुखाचा करणारच हा ध्यास आहे. यातूनच १० सप्टेंबर पर्यंत मुंबई-गोवा महामार्गाची सिंगल लेन पूर्ण करणारच हा जनतेला दिलेला शब्द आहे. त्यादिशेने झपाट्याने काम सुरु आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या कासू ते इंदापूर या दुसऱ्या टप्प्यातील काम युद्धपातळीवर सुरु आहे. आज पुन्हा एकदा मुंबई-गोवा महामार्गाच्या पाहणी दौऱ्यावर आहे, या दौऱ्यादरम्यान पांडापूर येथील कामाची पाहणी केली.
यावेळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांकडून या कामासाठी मागवण्यात आलेल्या अत्याधुनिक मशिनरीजची माहिती घेतली. तसंच हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने युद्धपातळीवर प्रयत्न करावेत असे निर्देश दिले.
दिलेला शब्द पूर्ण करायचा हा निर्धार करून सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. महामार्गाचं काम पूर्ण होत आलं, हे बघून कोकणवासीयांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे. हा आनंद हीच आमच्या कामाची पोचपावती आहे.
Mumbai Goa Highway : मुंबई गोवा महामार्गावरील बहादूर शेखनाक्यातील उड्डाणपुलाचा गर्डर लॉन्चर तुटण्याचा प्रकार घडला आहे;सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही. मात्र महाकाय लाँचर चे काही भाग तुटल्याने मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील बहादूर शेखनाक्यातील उड्डाणपुलाचा गर्डर लॉन्चर तुटला आहे, जास्तीच्या वजनामुळे गर्डर लाँचर खाली कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे दुर्घटना टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाची जास्तीची कुमक घटनास्थळी तैनात झाली आहे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चिपळूण पोलिसांची घटनास्थळी धाव घेतली धोका टाळण्यासाठी ठेकेदाराकडून क्रेन मागवण्यात आली असून क्रेन च्या मदतीने लॉन्चर चा समतोल राखला जाणार आहे तूर्तास कोणताही धोका नसल्याचा कंपनी कडून निर्वाळा देण्यात आला आहे
मदुराई : तामिळनाडूच्या (Tamilnadu) मदुराईमध्ये पुनालूर-मदुराई एक्स्प्रेस या रेल्वे गाडीला भीषण आग (Train Fire) लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर २५ प्रवाशी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
दक्षिण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी मदुराई यार्ड जंक्शनवर गाडी थांबवली तेव्हा आग लागल्याचे निदर्शनास आले. ट्रेनला लागलेल्या आगीचा एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये डब्यात भीषण आग दिसत आहे. त्याचवेळी आजूबाजूला काही लोक ओरडत आहेत. आग लागल्यानंतर मोठा आवाज देखील येत आहे. अग्निशामनक दलाने घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.
रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुनालूर-मदुराई एक्स्प्रेसच्या एका खासगी डब्यात आज पहाटे सव्वा पाच वाजता मदुराई यार्डमध्ये आग लागल्याची घटना घडली.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.
#WATCH | Tamil Nadu: Fire reported in private/individual coach at Madurai yard at 5:15 am today in Punalur-Madurai Express. Fire services have arrived and put off the fire and no damage has caused to another coaches. The passengers have allegedly smuggled gas cylinder that caused… pic.twitter.com/5H7wQeGu93
आंबोली :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीमध्ये गुरुवार दि. २४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५:४५ वाजता काळ्या बिबट्याचे दर्शन झाले. मिलिंद गडकरी यांना संध्याकाळी फेरफटका मारत असताना या काळ्या बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यांनी तात्काळ वन विभागाला या नोंदीबद्दल कळवले आहे.
यापूर्वीही अशा काळ्या बिबट्याच्या आंबोलीमधून नोंदी झाल्या आहेत. २०१४ साली आजऱ्यामध्ये काळ्या बिबट्याची नोंद झाली होती. तसेच २०१६ मध्ये तिलारीमधूनही काळ्या बिबट्याची नोंद करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी कुडाळ तालुक्यात काळ्या बिबट्याच्या बछड्याला पकडण्यात आले होते. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात काळ्या बिबटय़ाचा वावर असल्याचे सिद्ध झाले आहे. काळा बिबट्या हा सामान्य बिबट्यांसारखाच असतो मात्र त्यात मेलानिनचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्वचेचा रंग काळा झालेला पहायला मिळतो. सह्याद्रीमध्ये ब्लॅक पँथर आहेत ही एक सकारात्मक गोष्ट असल्याचे तज्ञ सांगतात. मेलानिस्टीक बिबटे साधारणतः घनदाट जंगलांमध्ये आढळतात.
रत्नागिरी : ‘देवरुख एसटी आगाराच्या देवरुख-पुणे आणि देवरुख-अर्नाळा या बसमधून प्रवास करू नका आणि स्वत:चा जीव वाचवा,’ असे खळबळजनक आवाहन एका व्हिडिओद्वारे करणाऱ्या या आगारातील चालक अमित आपटे यांच्यावर एसटी प्रशासनाने निलंबनाची कारवाई केल्याने रत्नागिरी एसटी प्रशासन चर्चेत आले आहे.
गाडय़ांची योग्य देखभाल न केल्याने आगारप्रमुख आमच्या आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहेत, असा थेट आरोप करून आपटे यांनी या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, या दोन्ही गाडय़ा सतत ब्रेक डाऊन होत असतात. गेल्या २५ दिवसांत त्याबाबत आम्ही चालकांनी अनेकदा तक्रार नोंदवली आहे. पण त्यांची दखल न घेता आमच्यावरच कारवाई केली जाते.आपण हा व्हिडीओ व्हायरल केल्यामुळे कारवाई होऊन घरी बसवले जाईल, याची जाणीव आहे. पण अपघात होऊन घरी बसण्यापेक्षा असे घरी बसलेले बरे, अशी टिप्पणी आपटे यांनी केली आहे. प्रवाशांनी या परिस्थितीची गंभीरपणे नोंद घेऊन या बसगाडय़ांनी प्रवास टाळावा, तसेच राज्यकर्त्यांनी या समस्येची गंभीरपणे दखल घ्यावी, असेही आवाहन त्यांनी केले आहे. समाजमाध्यमांवर हा व्हिडीओ प्रसारित झाल्यावर अनेक नागरिकांनीही एसटीच्या कारभाराचे छायाचित्रांसह वाभाडे काढले. देवरुखमधील सर्वच राजकीय पक्षाच्या लोकांनी आगारप्रमुखांची भेट घेऊन याबाबत वस्तुस्थितीची विचारणा केली.
एसटी प्रशासनाचे या सर्वावर उत्तर
दरम्यान बस चालकाने व्हिडीओत दावा केलेल्या प्रत्येक गोष्टीची चौकशी करण्याचे आदेश विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिले आहेत. शिवाय एस टी महामंडळाची बदनामी करीत प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत या चालकाचे निलंबन देखील करण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक बोरसे यांनी दिली आहे. या चालकाने कोरोना काळात देखील असे खोडसाळ व्हिडीओ केले होते असेही ते म्हणाले.
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर संगमेश्वर रोड ते रत्नागिरी सेक्शन दरम्यान मार्गाच्या देखभाल दुरुस्तीसाठी मंगळवार दि. २९ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ७.३० ते १०.३० असा तीन तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ‘मेगा ब्लॉकच्या कालावधीत या मार्गावरुन धावणाऱ्या दोन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
1) दिनांक २८ ऑगस्ट रोजी सुटणार्या गाडी क्र. १९५७७ – तिरुनेलवेली – जामनगर एक्सप्रेस ठोकूर ते रत्नागिरी दरम्यान सुमारे अडीच तास उशिराने धावणार आहे.
2) दिनांक २८ ऑगस्ट रोजी सुटणार्या गाडी क्र. 16346 तिरुवनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक (टी) एक्स्प्रेसला ठोकूर – रत्नागिरी दरम्यान सुमारे एक तास उशिराने धावणार आहे.
या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना होणाऱ्या तसदीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे