Category Archives: अपघात

हिवाळी पर्यटन जीवावर बेतले; गुहागरच्या समुद्रात बुडून एकाचा दुर्दैवी मृत्यू; आई आणि मुलाला वाचविण्यात यश

   Follow us on        

गुहागर: नाताळ आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी कोकणात पर्यटनासाठी आलेल्या एका मुंबईकर कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर पोहण्यासाठी उतरलेल्या एकाच कुटुंबातील तिघेजण समुद्रात बुडू लागले. स्थानिक जीवरक्षक आणि नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे माय-लेकाचे प्राण वाचले असले, तरी कुटुंबप्रमुखाचा मात्र बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

नेमकी घटना काय?

मुंबईतील पवई परिसरात राहणारे अमोल मुथ्या (४२) हे आपल्या कुटुंबासह नाताळच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गुहागर येथे आले होते. शनिवारी (२७ डिसेंबर) दुपारी १२:३० च्या सुमारास अमोल, त्यांची पत्नी आणि १४ वर्षांचा मुलगा समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारत असताना पोहण्याचा मोह न आवरल्याने ते पाण्यात उतरले. मात्र, समुद्रातील पाण्याचा आणि लाटांच्या वेगाचा अंदाज न आल्याने हे तिघेही किनाऱ्यापासून दूर ओढले गेले आणि बुडू लागले.

जीवरक्षकांचे शर्थीचे प्रयत्न

तिघेजण समुद्रात बुडत असल्याचे लक्षात येताच समुद्रकिनाऱ्यावर तैनात असलेले गुहागर नगरपंचायतीचे जीवरक्षक आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ समुद्रात उड्या घेतल्या.. जीवरक्षकांनी अत्यंत वेगाने हालचाली करत अमोल यांची पत्नी आणि मुलाला सुखरूप बाहेर काढले. अमोल मुथ्या यांनाही बाहेर काढून त्यांना वाचवण्यासाठी ‘सीपीआर’ (CPR) सारखे प्रथमोपचार देण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

पर्यटकांना खबरदारीचे आवाहन

सध्या वर्षाखेरच्या सुट्ट्यांमुळे कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. समुद्राचा अंदाज न येणे किंवा खोल पाण्यात जाणे जीवावर बेतू शकते. त्यामुळे पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यावरील सूचनांचे पालन करावे आणि समुद्राची भरती-ओहोटी पाहूनच पाण्यात उतरावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


रेल्वे रुळांवरील प्राण्यांचे अपघात टाळण्यासाठी AI चा आधार; ‘गजराज’ अधिक मजबूत होणार

   Follow us on        

नवी दिल्ली: रेल्वे रुळांवर होणारे हत्ती आणि इतर वन्यजीवांचे अपघात रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित यंत्रणा अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे रुळांवरून जाणाऱ्या वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी ‘गजराज’ सारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा विस्तार केला जात आहे.

​काय आहे ही नवीन प्रणाली?

​भारतीय रेल्वेने विकसित केलेली ही AI-आधारित यंत्रणा प्रामुख्याने ‘इंट्र्यूजन डिटेक्शन सिस्टम’ (IDS) वर आधारित आहे. ही प्रणाली खालीलप्रमाणे काम करते:

​सेन्सर्सचा वापर: रेल्वे रुळांच्या कडेला बसवलेले ऑप्टिकल फायबर सेन्सर्स वन्यजीवांच्या हालचालींमुळे होणारी कंपने (Vibrations) ओळखतात.

​त्वरित इशारा: जर एखादा हत्ती किंवा मोठा प्राणी रुळांच्या जवळ आला, तर ही प्रणाली तात्काळ लोको पायलट (रेल्वे चालक) आणि स्टेशन मास्टरला अलर्ट पाठवते.

​वेग मर्यादा: इशारा मिळताच चालक ट्रेनचा वेग कमी करू शकतो किंवा थांबवू शकतो, ज्यामुळे अपघात टळतात.

ही यंत्रणा हवामानातील बदल आणि काही अपवाद वगळता  प्राण्यांच्या हालचालींची अचूक ओळख पटवते. सुरुवातीला आसाम आणि पश्चिम बंगालच्या काही भागांत यशस्वी चाचणी झाल्यानंतर, आता ही यंत्रणा झारखंड, ओडिसा आणि तामिळनाडू यांसारख्या राज्यांतील ७०० किलोमीटरपेक्षा जास्त रेल्वे मार्गांवर लागू केली जाणार आहे. यामुळे जंगलातून जाणाऱ्या रेल्वे मार्गांवर वन्यजीवांचा जीव वाचवण्यास मोठी मदत होणार आहे.

​भारतीय रेल्वेचे हे पाऊल आधुनिक तंत्रज्ञान आणि निसर्ग संवर्धन यांचा उत्तम मेळ घालणारे आहे. यामुळे ‘रेल्वे-हत्ती संघर्ष’ कमी होऊन वन्यजीवांचे प्राण वाचण्यास मदत होईल.

Mumbai Goa Highway Accident: महामार्गावरील अपघातप्रकरणी अधिकारी व ठेकेदारांना सहआरोपी करा; जनआक्रोश समितीची मागणी

   Follow us on        माणगाव : मुंबई–गोवा महामार्गावरील माणगाव येथे झालेल्या अलीकडील अपघातानंतर अधिकारी व ठेकेदारांना सहआरोपी करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी जनआक्रोश समितीने माणगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा. श्री. निवृत्ती बोऱ्हाडे साहेब यांची भेट घेतली.

समितीने यावेळी गेल्या १७ वर्षांतील अपघातांचे आकडे समोर ठेवत सांगितले की, महामार्गावरील रखडलेल्या कामामुळे आजपर्यंत ४५०० पेक्षा जास्त कोकणकरांचा मृत्यू, तर १० हजारांहून अधिक जखमी झाले आहेत. “अनेक दुर्घटनांमध्ये रस्त्यावरील त्रुटी स्पष्ट असतानाही ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई झाली नाही; प्रत्येकवेळी चालकांवरच गुन्हे दाखल करण्यात आले,” अशी नाराजी समितीने व्यक्त केली.

अपघातात शिवशाही बस चालकाची चूक असल्याचे प्राथमिक मत स्थानिक प्रत्यक्षदर्शी व पोलिसांनी नोंदवले असले, तरी महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर अचानक दुपदरी रस्ता होणे, इशारा फलकांचा अभाव, धोकादायक ठिकाणांचा सूचना ही प्रशासकीय व ठेकेदारांची गंभीर चूक असल्याचे समितीने स्पष्ट केले. अशा परिस्थितीत अधिकारी व ठेकेदार यांनाही जबाबदार धरणे आवश्यक असल्याची भूमिका समितीने मांडली.

यावर बोऱ्हाडे साहेबांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून कायदेशीर बाजू तपासण्याचे आश्वासन दिले. तसेच माणगाव परिसरातील धोकादायक ठिकाणांची तातडीने पाहणी करण्याचे आदेश त्यांनी तत्काळ दिले. या पाहणी अहवालाच्या आधारे NHAI व PWD यांसारख्या संबंधित यंत्रणांना निर्देशित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यापुढे महामार्गावरील त्रुटींमुळे अपघात झाल्यास अधिकारी व ठेकेदारांवर गुन्हे नोंदवले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीस स्थानिक माणगावकर, जनआक्रोश समितीचे सदस्य तसेच माणगावमधील सर्व पक्षीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व समाजघटक एकत्र आल्यास महामार्गावरील दुर्लक्षाविरुद्धचा आवाज आणखी बुलंद होईल, असा विश्वास जन आक्रोष समितीने व्यक्त केला.

गणपतीपुळे समुद्रात पोहताना पुण्याचा तरुण बुडाला

   Follow us on    

 

 

गणपतीपुळे : गणपतीपुळे समुद्रात पोहत असताना खोल पाण्यात ओढला गेल्याने पुण्यातील १८ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. निखिल शिवाजी वाघमारे असे या तरुणाचे नाव असून, त्याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी मालगुंड येथील समुद्रकिनाऱ्यावर सापडला.

जयगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल वाघमारे (वय १८, रा. केशवनगर, मुंढवा, पुणे) हा २४ ऑक्टोबर २०२५ रोजी गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आला होता. सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास तो समुद्रात पोहण्यासाठी उतरला. पोहत असतानाच अचानक आलेल्या प्रचंड लाटेमुळे तो खोल पाण्यात ओढला गेला आणि बेशुद्ध झाला.

त्याच्या शोधासाठी स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी प्रयत्न सुरू केले होते. अखेर दुसऱ्या दिवशी, म्हणजेच २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे चार वाजता मालगुंड समुद्रकिनाऱ्यावर त्याचा मृतदेह सापडला.

स्थानिकांनी तातडीने त्याला वादळ-खांडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले; मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

Railway Accident : रील बनवण्याच्या नादात दोन तरुणांचा रेल्वेखाली येऊन मृत्यू

No block ID is set

जळगाव: जळगाव जिल्ह्यातील सुरत-भुसावळ मार्गावर पाळधी येथील स्थानकाजवळ रेल्वे रुळांवर धोकादायक पद्धतीने ‘रील’ (Reel) बनवण्याचा प्रयत्न करत असलेल्या दोन समवयस्क तरुणांचा धावत्या रेल्वेखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.

अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे प्रशांत पवन खैरनार (१८) आणि हर्षवर्धन महेंद्र ननवरे (१८) (दोन्ही रा. महात्मा फुले नगर, पाळधी, जि. जळगाव) अशी आहेत.

रविवारी सुट्टी असल्याने हे दोघे पाळधी स्थानकापासून जवळच असलेल्या पथराड गावाकडील गेटजवळ सकाळी ११ च्या सुमारास रेल्वे मार्गावर उभे राहून रील बनवत होते. त्याच वेळी धरणगावच्या दिशेकडून जळगावकडे जाणारी ‘अहमदाबाद-हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस’ आली.

प्रशांत आणि हर्षवर्धन यांनी कानावर हेडफोन लावलेले असल्याने, रेल्वे रुळांजवळ आलेल्या या वेगातल्या गाडीकडे त्यांचे अजिबात लक्ष नव्हते. यामुळे रेल्वे अगदी जवळ आल्यानंतर त्यांना जीव वाचवण्याची कोणतीही संधी मिळाली नाही आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेमुळे पाळधी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. धोकादायक ठिकाणी रील बनवण्याच्या फॅडमुळे तरुणांचे जीव जात असल्याच्या घटना पुन्हा एकदा अधोरेखित झाल्या आहेत.

 

 

गुहागर : मच्छी वाहतूक करणारा टेम्पो उलटला, क्लिनर जखमी

   Follow us on    

 

 

गुहागर: चिपळूण महामार्गावरील चिखली येथे सोमवारी दुपारी सुमारास चारच्या दरम्यान अंजनवेल ते रत्नागिरी या मार्गावर मच्छी वाहतूक करणारा टेम्पो उलटल्याची घटना घडली. या अपघातात टेम्पोचा क्लिनर जखमी झाला असून त्याला तात्काळ उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंजनवेलकडून रत्नागिरीच्या दिशेने मच्छी घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा चालक चिखली परिसरात वाहनावरील नियंत्रण गमावून बसला आणि टेम्पो रस्त्याच्या कडेला उलटला. अपघातामुळे टेम्पोत असलेली मच्छी रस्त्यावर विखुरली गेली, तर टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. जखमी क्लिनरला स्थानिकांनी प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. नंतर अपघातग्रस्त टेम्पो बाजूला हटवण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

पीएसआय परिक्षेत अव्वल ठरलेल्या अश्विनी केदारीचा दुर्दैवी मृत्यू; पुण्यात हळहळ

   Follow us on    

 

 

पुणे : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पाळू येथील रहिवासी अश्विनी केदारी (वय ३०) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेतलेल्या २०२३ च्या पीएसआय परीक्षेत मुलींत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या अश्विनीचा २८ ऑगस्ट रोजी झालेल्या अपघातात गंभीर भाजल्याने मृत्यू झाला.

२८ ऑगस्टच्या सकाळी अभ्यास करताना तिने बाथरूममधील गिझर सुरू करून पाणी गरम केले होते. पाण्याचे तापमान पाहण्यासाठी गेल्यावर तिला विजेचा धक्का बसला आणि अंगावर उकळते पाणी ओतले गेले. यात ती ८० टक्क्यांहून अधिक प्रमाणात भाजली.

तिला तात्काळ पिंपरी-चिंचवड येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या उपचारासाठी समाजातील अनेकांनी आर्थिक मदतही केली. मात्र, काही दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

शेतकरी कुटुंबातील अश्विनीने स्वतःच्या कष्टावर यश मिळवले होते. जिल्हाधिकारी होण्याचे तिचे स्वप्न होते. तिच्या निधनाने खेड तालुक्यासह तिचे कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवार आणि स्पर्धा परीक्षेतील अभ्यासकांवर दुःखाचे सावट पसरले आहे

वैभववाडी: देव तरी त्याला कोण मारी! करूळ घाटातील अपघातात दोघेजण थोडक्यात वाचले

   Follow us on    

 

 

वैभववाडी : घाटातील दाट धुक्यामुळे चालकाला अंदाज न आल्याने एक आयशर टेम्पो कोसळून गंभीर अपघात झाला. कोल्हापूरहून सिमेंटचे पत्रे घेऊन सावंतवाडीच्या दिशेने जाणारा हा टेम्पो बुधवारी रात्री सुमारे ९ वाजता करुळ घाटात पलटी होऊन दरीत पडता पडता वाचला.

अपघातग्रस्त टेम्पो (एमएच ०९-एक्स ४७४७) अभिजित कांबळी चालवत होते . घाटात धुक्यामुळे एका वळणावर नियंत्रण सुटल्याने त्याने ब्रेक मारला पण टेम्पो थेट भिंतीवर आदळला आणि पलटी झाला. केवळ दैव बलवत्तर म्हणून हा टेम्पो अगदी टोकावर लटकून राहिला आणि मोठी हानी टळली.  टेम्पोचा पुढचा भाग भिंतीवर आदळून निकामी झाला असून काही भाग दरीत विखुरलेला आहे. सिमेंटचे पत्रे दरीत कोसळले आहेत.

 

 

सुदैवाने या भीषण अपघातातून चालक आणि क्लिनर दोघेही थोडक्यात बचावले असून मोठ्या शिताफीने ते बाहेर पडले.  चालक किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर गगनबावडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून टेम्पो हटविण्याचे काम सुरू आहे. या अपघातामुळे घाटातील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती.

 

Khed: उतारावर बसचा ब्रेक फेल; चालकाच्या सतर्कतेमुळे २५ विद्यार्थ्यांचे प्राण वाचले

   Follow us on    

 

 

भोसते, खेड (ता. खेड)

खेड तालुक्यातील भोसते गावातून विद्यार्थ्यांना घेऊन शहराकडे येणाऱ्या एका खासगी शाळेच्या बसचे ब्रेक अचानक फेल झाल्याची घटना घडली. मात्र बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे एक मोठा अपघात टळला असून, सुमारे २० ते २५ विद्यार्थ्यांचे प्राण वाचले आहेत. ही घटना शहरातील जगबुडी नदीच्या किनारी घडली असून नागरिकांमध्ये मोठा हलकल्लोळ उडाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, भोसते गावातून खेडकडे येणारी शाळेची बस अचानक ब्रेक फेल झाल्याने एका उतारावरून वेगात खाली येत होती. या ठिकाणी विद्युत महामंडळाचा मोठा ट्रान्सफॉर्मर असून, शेजारीच भोसते पूल आहे. या पुलावरून नेहमीच दुचाकी, चारचाकी वाहने आणि पादचाऱ्यांची मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत अपघात घडल्यास मोठ्या जिवितहानीची शक्यता होती.

ब्रेक फेल झाल्याचे लक्षात येताच चालकाने विलक्षण संयम राखत आणि प्रसंगावधान राखत, वाहन एका बाजूला वळवले आणि झाडांमध्ये अडवले. त्यामुळे बसची गती कमी झाली आणि ती थांबली. जर चालकाने योग्य वेळी निर्णय घेतला नसता, तर बस पुलावरून सरळ वाहतुकीतून येणाऱ्या वाहनांना धडकली असती आणि मोठा अपघात झाला असता.

या बसमध्ये सुमारे २० ते २५ विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी प्रवास करत होते. चालकाच्या सतर्कतेमुळे त्यांच्या जीवाला धोका टळला आहे. नागरिकांनी “देव तारी त्याला कोण मारी” अशा भावना व्यक्त करत चालकाचे कौतुक केले आहे.

 

मुंबई-गोवा महामार्गावर अपघातात युवती गंभीर जखमी

   Follow us on    

 

 

मुंबई-गोवा महामार्ग | ३० जुलै: मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली खामदेव नाका येथे एका भरधाव ट्रकने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात दिशा ज्ञानेश्वर नारुजी (वय २६, रा. बांदा पानवळ) या तरुणी गंभीररीत्या जखमी झाली.

संतप्त ग्रामस्थांनी घटनास्थळी एकत्र येत वाहतूक रोखून धरली. अपघातग्रस्त ट्रकला घेराव घालण्यात आला आणि चालकाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. स्थानिक पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

दरम्यान, अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. जखमी युवतीला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्थानिक नागरिकांनी महामार्गावरील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक गस्त आणि वेगमर्यादा काटेकोरपणे पाळण्याची मागणी केली आहे.

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search