रायगड: रायगड आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमेवरील अत्यंत धोकादायक समजल्या जाणाऱ्या आंबेनळी घाटात रविवारी रात्री एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. महाबळेश्वर ते पोलादपूर दरम्यानच्या मार्गावर एका स्कॉर्पिओ गाडीचे नियंत्रण सुटल्याने ती जवळपास ५०० ते ७०० फूट खोल दरीत कोसळली. या अत्यंत भीषण दुर्घटनेत गाडीतील आठ प्रवाशांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. हे सर्व मृत प्रवासी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील रहिवासी असल्याचे समजते. हे सर्वजण कोकण किंवा महाबळेश्वर परिसरात फिरण्यासाठी आले असावेत, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
अपघाताची माहिती मिळताच रविवारी रात्री १० वाजल्यापासून पोलीस प्रशासन, महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेतली. दरी अत्यंत खोल आणि येथील भूप्रदेश कठीण असल्यामुळे बचावकार्यात अनेक अडचणी येत आहेत. मृतदेह वर काढण्यासाठी बचाव पथकांना मोठे कष्ट घ्यावे लागत आहेत. सध्या दोरीला स्ट्रेचर बांधून दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ते रुग्णवाहिकेने पोलादपूरमधील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अपघातातील मृतांची नावे:
१. महेश अनिल पवार (वय २५)
२. आदित्य अशोक साळुंखे (वय २१)
३. रितेश राजेंद्र लोखंडे (वय २५)
४. सुहास जितेंद्र लोखंडे (वय २०)
५. अंश समीर चव्हाण (वय १८)
६. उत्कर्ष आनंद शिंगटे (वय २१)
७. अनिल अभिमन्यू शिंगटे (वय २५)
८. नितीन किसन नायकॉंडे (वय ३५)











