Category Archives: अपघात

चिरेकापणीच्या मशिनवर पडून कामगाराचा मृत्यू

   Follow us on        

देवगड:

तालुक्यातील लिंगडाळ येथील एका चिरेखाणीवर काम करणारा सुखदेव बड्डा टेकाम (३६, मूळ रा. कोडल, तेंडूखेडा, जि. दमोह, रा. मध्य प्रदेश) हा कामगार चिरे कापण्याच्या मशिनवर पडून गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना २७ जून, २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. लिंगडाळ येथील चिरेखाणीवर काम करत असताना तो अचानक मशिनवर पडल्याने त्याच्या गळ्याला गंभीर दुखापत होऊन तोंडातून रक्तस्राव झाला.

​ही बाब लक्षात येताच इतर कामगारांनी त्याला तातडीने देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचार सुरू करण्यापूर्वीच तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर त्याचा मृतदेह अंत्यविधीसाठी त्याच्या मूळ गावी नेण्यात आला.

​या प्रकरणी सुखदेव टेकाम (२६, रा. कोडल) यांनी २९ जून रोजी तेंडूखेडा पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून, सुरुवातीला तिथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडल्याने, तेंडूखेडा पोलिसांनी हे प्रकरण तपासासाठी सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत देवगड पोलीस स्थानकाकडे वर्ग केले. त्यानुसार देवगड पोलीस स्थानकात मंगळवारी रात्री उशिरा या घटनेची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक श्याम बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुले पुढील तपास करत आहेत.

सावंतवाडी: ४५ प्रवासी असलेली कदंबा बस कलंडली; मोठी दुर्घटना टळली

   Follow us on        

सावंतवाडी : गोवा राज्याची कदंबा प्रवासी बस आजगावकडून दुचाकी वाहन चालकाला वाचवताना कलंडली, ज्यामध्ये ४५ प्रवासी बालबाल बचावले असून चालकाच्या प्रसंगवधानामुळे मोठी हानी टळली आहे. गोवा येथील पणजी येथून संध्याकाळी साडेचार वाजता सुटणारी पणजी शिरोडा मार्गे वेंगुर्ला ही वस्तीची गाडी शिरोडाच्या दिशेने येत असताना आजगाव वाघबीळाजवळ आली. या वेळी मळेवाडच्या दिशेने चार चाकी गाडी जात असताना त्या घातक वळणावर दुचाकी वाहन चालकाने ओव्हर टेक करण्याचा प्रयत्न केला, आणि त्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात ही बस खोलदूरीच्या काही फूट अंतरावर कलंडली.

​या बसमध्ये एकूण ४५ प्रवासी प्रवास करत होते, ज्यांना आपत्कालीन दरवाज्यातून बाहेर काढण्यात आले. या बसचे चालक धनंजय आसोलकर व वाहक सर्वेश नाईक यांनी प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले, तसेच या वेळी परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेऊन प्रवाशांना वाचवण्यात मदत केली.

या प्रवाशांपैकी कोणालाही दुखापत झालेली नाही, परंतु काही फूट अंतरावर जर ही बस कलंडली असती तर किमान २०० फूट खोल दरीत ही बस कोसळून मोठा अपघात झाला असता. बस चालकाच्या प्रसंगवधानामुळे बस अलिकडेच कलंडली आणि दुचाकीस्वाराच्या चुकीमुळे ४५ प्रवाशांचे जीव धोक्यात जाणार होते, मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

सावंतवाडी-कुडाळ रस्त्यावर भीषण अपघात: दुचाकीवरील तरुण-तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

   Follow us on        

सामंतवाडी:

सावंतवाडी-कुडाळ रस्त्यावरील कोलगाव मियासाब दर्ग्या जवळ (समाधीजवळ) दुचाकी आणि स्विफ्ट कार यांच्यात भीषण रस्ता अपघात घडला. या अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण आणि तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आयुषी देसाई असे तरुणीचे नाव असून तिचा जागीच मृत्यू झाला, तर कार्तिक परब या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

​मिळालेल्या माहितीनुसार, कुडाळच्या दिशेने जाणारी दुचाकी (क्रमांक GA 03 AB 7501) आणि सावंतवाडीच्या दिशेने येणारी स्विफ्ट कार (क्रमांक MH 07 AG 7801) यांच्यात जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील दोघेही उडून रस्त्यावर फेकल गेले. अपघाताच्या तीव्रतेमुळे स्विफ्ट कार रस्त्याशेजारील गटारात जाऊन कोसळली आणि कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले.

​घटनेनंतर स्थानिक नागरिक महेश बांदेकर, कृष्णा धुळपनावर आणि लाडू रायका यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचारास सुरुवात केली, मात्र उपचारादरम्यान कार्तिक परब यांची प्राणज्योत मालवली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर स्विफ्ट कारच्या चालकाचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार राऊत, पोलीस हवालदार सुरेश पाटील, पोलीस हवालदार धोत्रे आणि पोलीस कॉन्स्टेबल पवन परब करत आहेत.

सायन-पनवेल महामार्गावर बेस्ट बसचा भीषण अपघात; एकाचा दुर्दैवी मृत्यू

   Follow us on        

मुंबई:

सायन-पनवेल महामार्गावर मानखुर्द येथे सोमवारी सकाळी एक दुर्दैवी आणि भीषण अपघात घडला. रस्ता ओलांडण्याच्या किंवा डिव्हायडरजवळ थांबलेल्या ६५ वर्षीय भास्कर रावसाहेब पांडे यांना एका अनियंत्रित बेस्ट (BEST) बसने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर दुखापत झाल्यामुळे पांडे यांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाला.

​प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मानखुर्द येथील महामार्गावरून जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट रस्त्याच्या डिव्हायडरवर जाऊन आदळली. त्याच वेळी तेथे उभे असलेले भास्कर पांडे हे बसच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाले. या अपघातात बसचा चालक आणि वाहक (कंडक्टर) दोघेही जखमी झाले असून त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने, दोघांचीही प्रकृती आता स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

​अपघाताची माहिती मिळताच मानखुर्द पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. स्थानिक नागरिकांनी काढलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये बसच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाल्याचे दिसत असून, यावरून अपघाताची तीव्रता स्पष्ट होते. मुंबईत बेस्ट बसच्या अपघातांमध्ये सातत्याने होत असलेली वाढ आता चिंतेचा विषय ठरत असून, मानखुर्द पोलीस या अपघातामागील नेमके कारण—चालकाचा निष्काळजीपणा की यांत्रिक बिघाड—याचा सखोल तपास करत आहेत.

समृद्धी महामार्गावर इथेनॉल टँकर आणि कारचा भीषण अपघात; ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू

   Follow us on        

वर्धा: वर्ध्यातील विरुळजवळ समृद्धी महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि काळीज पिळवटून टाकणारा अपघात घडला. नागपूरच्या दिशेने प्रवासाला निघालेल्या एका कारला मागून भरधाव येणाऱ्या इथेनॉलच्या टँकरने जोरदार धडक दिली. अपघाताची तीव्रता इतकी प्रचंड होती की, धडक बसताच महामार्गावर मोठा थरार नाट्य घडले.

​धडकेच्या भीषणतेमुळे कारने क्षणात पेट घेतला. इथेनॉल अत्यंत ज्वलनशील असल्याने आगीने काही सेकंदांतच रौद्ररूप धारण केले. कारमध्ये असलेल्या ५ प्रवाशांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी न मिळाल्याने, त्यांचा कारच्या आतच करपून दुर्दैवी मृत्यू झाला. मृत झालेले सर्व नागरिक वर्धा जिल्ह्यातीलच असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

​घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस (HSP) आणि स्थानिक प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून आणि मदतकार्य जलद गतीने व्हावे यासाठी समृद्धी महामार्गावरील नागपूर वाहिनीवरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे रोखण्यात आली होती.

​सध्या पोलिसांनी जळालेल्या वाहनांना बाजूला करून महामार्गावरील वाहतूक पुन्हा पूर्ववत केली आहे. पोलिसांनी सर्व ५ मृतदेहांचे अवशेष ताब्यात घेतले असून त्यांची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण वर्धा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

मुंबई कोस्टल रोडवर भरधाव पोर्शेचा अपघात; वेळेत एअरबॅग्स उघडल्याने जिवितहानी टळली

   Follow us on        

मुंबई:

रविवारी सकाळी मुंबईच्या कोस्टल रोडवर एका भरधाव पोर्शे कारचा भीषण अपघात झाला. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ही कार थेट रस्त्याच्या दुभाजकाला (डिवायडर) जाऊन धडकली. या अपघातात पोर्शे कारचे प्रचंड नुकसान झाले आहे; मात्र सुदैवाने वेळेत एअरबॅग्स उघडल्या गेल्यामुळे चालक मोठ्या अनर्थातून वाचला असून त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. पावसामुळे रस्ता ओला असणे आणि गाडीचा अतिवेग हे या अपघाताचे प्राथमिक कारण असल्याचे समजते.

​दुभाजकाला धडकल्यानंतर पोर्शे कार नियंत्रण सुटून विरुद्ध दिशेला गेली आणि तिने समोरून येणाऱ्या एका एर्टिगा गाडीला धडक दिली. या धडकेत एर्टिगामधील एका अल्पवयीन मुलीला किरकोळ दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला केली आणि कोस्टल रोडवरील वाहतूक पूर्ववत सुरळीत केली.

सध्या पोलिस या प्रकरणी अतिवेगाने आणि निष्काळजीपणे गाडी चालवल्याप्रकरणी तपास करत असून, या अपघातामुळे मुंबई कोस्टल रोडवरील वाहनचालकांच्या वेगावर आणि सुरक्षेच्या उपायांवर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे.

सावंतवाडी-रत्नागिरी बस आणि कारचा हुमरसजवळ भीषण अपघात

   Follow us on        

कुडाळ: सावंतवाडी आगाराच्या एका एसटी बसला शनिवार, १८ जुलै २०२६ रोजी दुपारी कुडाळ येथील हुमरस परिसरात भीषण अपघाताचा सामना करावा लागला. सावंतवाडीहून रत्नागिरीच्या दिशेने मार्गस्थ झालेली बस (MH 13 CU 8729) हुमरस बस थांब्याजवळ आली असता, समोर उभ्या असलेल्या एका रेनॉल्ट क्विड कारला (MH 07 AG 6538) बसने मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारचा मागील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला असून कारचे मोठे नुकसान झाले आहे.

या दुर्घटनेत कार चालक पांडुरंग श्रीधर नाईक (वय ५४ वर्षे, रा. लक्ष्मीनगर, सावंतवाडी, मूळ रा. नेरूर) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

​घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलीस स्टेशनच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन अपघाताचा पंचनामा केला. तसेच कुडाळ आगार व्यवस्थापक रोहित कारभारी नाईक हे या प्रकरणातील पुढील कायदेशीर कारवाई आणि परिस्थिती हाताळत आहेत. पोलीस सध्या या अपघाताच्या नेमक्या कारणांचा अधिक तपास करत आहेत.

दुर्दैवी घटना: वेंगुर्ले येथे मासेमारी करताना तरुण समुद्रात बुडाला

   Follow us on        

वेंगुर्ले:

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथील निमुसगा भागात गुरुवारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. अणसूर देऊळवाडा येथील रहिवासी असलेला सचिन सिताराम गावडे (वय ३१) हा तरुण आपल्या मित्रांसोबत समुद्रात गळ टाकून मासेमारी करण्यासाठी आला होता. सायंकाळच्या सुमारास लाईटहाऊसच्या मागील बाजूस असलेल्या खडकावर बसून तो मासेमारी करत होता. त्याच वेळी समुद्रात उठलेल्या एका प्रचंड मोठ्या लाटेने त्याला ओढले. लाटेच्या तीव्र प्रवाहामुळे त्याचा तोल सुटला आणि तो थेट समुद्राच्या पाण्यात फेकला गेला. काही क्षणातच तो खोल पाण्यात बुडाला आणि दिसेनासा झाला.

​या घटनेची माहिती मिळताच वेंगुर्ले पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक मच्छीमार आणि ग्रामस्थांच्या मदतीने समुद्रात त्याचा शोध घेण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत शोध घेऊनही सचिनचा कुठेही पत्ता लागलेला नाही. या अपघाताबाबत सचिनसोबत मासेमारीसाठी गेलेला त्याचा मित्र, अणसूर सुतारवाडी येथील रहिवासी शंकर रवींद्र मेस्त्री (वय ४०), याने वेंगुर्ले पोलीस ठाण्यात रीतसर माहिती दिली असून त्यानुसार सध्या पोलिसांत ‘नापत्ता’ म्हणून नोंद करण्यात आली आहे.

​या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल चव्हाण करत आहेत. विशेष म्हणजे, अवघ्या दोन दिवसांपूर्वीच मोचेमाड समुद्रकिनाऱ्यावर अशाच प्रकारे गळ टाकून मासेमारी करताना एक युवक बुडाल्याची घटना घडली होती. गेल्या आठ दिवसांतील ही दुसरी दुर्घटना असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, समुद्रकिनाऱ्यावर मासेमारी करताना नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Landslide in Amboli Ghat: आंबोली घाटात मोठे दगड रस्त्यावर; मोठी दुर्घटना टळली

   Follow us on        

सावंतवाडी: आंबोली घाटातील मुख्य रस्त्यावर चार नंबर धबधब्याजवळ मंगळवारी (७ जुलै) रात्री दोन ते तीन मोठे दगड थेट रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली. नेहमीप्रमाणे या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ सुरू होती, मात्र सुदैवाने दगड कोसळले त्यावेळेस तिथे कोणतेही वाहन नसल्याने मोठी जीवित व वित्तहानी टळली आहे.

घाटात पूर्वी ज्या ठिकाणी दरड कोसळली होती, त्या जागेपासून काही अंतरावरच ही घटना घडली. सध्या हे मोठे दगड रस्त्यावरच असल्यामुळे तिथून केवळ दुचाकी आणि छोट्या चारचाकी वाहनांची एकेरी (वन-वे) वाहतूक सुरू आहे.

पालकमंत्र्यांकडून तातडीने दखल:

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी या घटनेची तातडीने दखल घेतली आहे. त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रस्त्यावरील दगड तातडीने बाजूला करण्याचे आणि वाहतूक पूर्ववत करण्याचे निर्देश दिले.

यानंतर महामार्ग प्राधिकरणाचे अभियंते आणि पथक घटनास्थळी रवाना झाले असून, दगड हटवण्यासाठी जेसीबी पाचारण करण्यात आला आहे. लवकरच हे दगड बाजूला करून वाहतूक पूर्णपणे सुरळीत करण्यात येईल, अशी माहिती प्राधिकरणाच्या अभियंत्यांनी दिली आहे.

धक्कादायक! धावत्या एसटी बसचा मागचा भाग निखळला; सुदैवाने मोठा अनर्थ टळला

   Follow us on        

गडचिरोली: एटापल्ली शहरात सोमवारी संध्याकाळी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रवाशांनी भरलेली बस धावत असताना अचानक बसचा मागील भाग निखळून रस्त्यावर कोसळला. सुदैवाने या अपघातावेळी बसचा वेग कमी होता, तसेच बसच्या मागे कोणतेही इतर वाहन किंवा नागरिक नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. या घटनेमुळे मात्र एसटीच्या देखभाल आणि दुरुस्ती व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

नेमकी घटना काय?

गडचिरोलीहून मुलचेरा-बोलेपल्ली मार्गे एटापल्लीकडे येणारी अहेरी आगाराची ‘मानव विकास मिशन’ अंतर्गत चालवली जाणारी बस सोमवारी सायंकाळी एटापल्ली शहरात दाखल झाली होती. बसस्थानकाकडे जात असताना गोटूलसमोरील मुख्य रस्त्यावर अचानक बसच्या मागील भागाचा पत्रा आणि संरचना (स्ट्रक्चर) तुटून रस्त्यावर पडली. मोठा आवाज झाल्याने चालकाने तात्काळ प्रसंगावधान राखून बस थांबवली. या अचानक झालेल्या प्रकारामुळे बसमधील सुमारे ३० प्रवासी प्रचंड घाबरले आणि तातडीने खाली उतरले.

नागरिकांचा संताप आणि प्रशासनाची कारवाई

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. प्रत्यक्षदर्शिनी दिलेल्या माहितीनुसार, बसच्या मागील भागावरील पत्रा अत्यंत जुना, कमकुवत आणि तात्पुरत्या स्वरूपात जोडलेला होता. एसटी महामंडळाच्या या भोंगळ आणि जीर्ण कारभारावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

या घटनेची गंभीर दखल घेत राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली विभागीय कार्यालयाने तातडीने चौकशीचे आदेश दिले. प्राथमिक तपासणीमध्ये बसच्या देखभाल-दुरुस्तीत हलगर्जीपणा झाल्याचे समोर आल्याने, अहेरी आगारातील संबंधित सहाय्यक कारागिराला (Assistant Artisan) तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.

सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

गडचिरोली जिल्ह्यात एसटीच्या दुरवस्थेबाबत प्रश्न निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी गडचिरोली-घोट मार्गावरील बसच्या छतामधून पावसाचे पाणी गळल्याने प्रवाशांचे हाल झाले होते, तर अहेरी आगाराच्याच एका धावत्या बसचे छत उडाल्याची घटनाही घडली होती. या सातत्याने होणाऱ्या घटनांमुळे प्रवाशांच्या जिवाशी खेळून अशा जीर्ण बस रस्त्यावर का उतरवल्या जात आहेत, असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे.

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search