Category Archives: अपघात

आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ ७०० फूट खोल दरीत कोसळली; ८ तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

   Follow us on        

रायगड: रायगड आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमेवरील अत्यंत धोकादायक समजल्या जाणाऱ्या आंबेनळी घाटात रविवारी रात्री एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. महाबळेश्वर ते पोलादपूर दरम्यानच्या मार्गावर एका स्कॉर्पिओ गाडीचे नियंत्रण सुटल्याने ती जवळपास ५०० ते ७०० फूट खोल दरीत कोसळली. या अत्यंत भीषण दुर्घटनेत गाडीतील आठ प्रवाशांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. हे सर्व मृत प्रवासी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील रहिवासी असल्याचे समजते. हे सर्वजण कोकण किंवा महाबळेश्वर परिसरात फिरण्यासाठी आले असावेत, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

​अपघाताची माहिती मिळताच रविवारी रात्री १० वाजल्यापासून पोलीस प्रशासन, महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेतली. दरी अत्यंत खोल आणि येथील भूप्रदेश कठीण असल्यामुळे बचावकार्यात अनेक अडचणी येत आहेत. मृतदेह वर काढण्यासाठी बचाव पथकांना मोठे कष्ट घ्यावे लागत आहेत. सध्या दोरीला स्ट्रेचर बांधून दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ते रुग्णवाहिकेने पोलादपूरमधील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

​अपघातातील मृतांची नावे:

१. महेश अनिल पवार (वय २५)

२. आदित्य अशोक साळुंखे (वय २१)

३. रितेश राजेंद्र लोखंडे (वय २५)

४. सुहास जितेंद्र लोखंडे (वय २०)

५. अंश समीर चव्हाण (वय १८)

६. उत्कर्ष आनंद शिंगटे (वय २१)

७. अनिल अभिमन्यू शिंगटे (वय २५)

८. नितीन किसन नायकॉंडे (वय ३५)

वेंगुर्ले: शिरोडा समुद्रात नौका उलटली; दोघांना वाचविण्यात यश, एकाचा शोध सुरू

   Follow us on        

वेंगुर्ले: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला जवळील शिरोडा समुद्रात आज २४ मे २०२६ रोजी सकाळी अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्या आणि पावसामुळे एक मासेमारी नौका उलटली. या दुर्घटनेत नौकेवरील तीन मच्छिमार समुद्रात पडले. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत दोघांना वाचवले, तर शिरोडा केरवाडी येथील राजन सारंग यांचा अद्याप शोध सुरू आहे.

दुर्घटना घडल्यानंतर स्थानिक मच्छिमार आणि बचाव पथकांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली आहे. समुद्रात अजूनही खवळलेले पाणी आणि वादळी स्थिती असल्याने शोधकार्य आव्हानात्मक बनले आहे. प्रशासनाने देखील मदत कार्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या प्रकारची घटना सिंधुदर्ग किनारपट्टीवर अधूनमधून घडत असल्याने छोट्या नौकांमधून मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांनी हवामान पूर्वसूचना लक्षात घेऊन समुद्रात जाण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे. राजन सारंग यांचा शोध लवकरात लवकर लागावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Photo Credit – Google

पोलिसांची सतर्कता आणि बचावाच्या आधुनिक तंत्रज्ञानाने वाचवले पती पत्नीचे प्राण

   Follow us on        

मुरुड:पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या मुरुड तालुक्यातील काशिद बीचवर काल, शुक्रवारी (२२ मे २०२६) रायगड पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि तत्परतेमुळे एक मोठा अनर्थ टळला. समुद्रात आंघोळ करताना लाटांच्या तीव्र प्रवाहामुळे बुडणाऱ्या एका पती-पत्नीचे प्राण वाचवण्यात पोलिसांना यश आले आहे.

हे दांपत्य पुणे जिल्ह्यातील खेड येथील रहिवासी असून, काशिद बीचवर पर्यटनासाठी आले होते. समुद्रात आंघोळ करत असताना अचानक आलेल्या जोरदार लाटा आणि पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे हे दोघेही समुद्रात खोलवर खेचले गेले. स्वतःला सावरणे कठीण झाल्याने दोघेही बुडू लागले आणि त्यांनी मदतीसाठी एकच टाहो फोडला.

​त्याच वेळी किनाऱ्यावर तैनात असलेल्या रायगड पोलिसांच्या बचाव पथकातील सुरक्षा रक्षकांनी आणि अधिकाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्वरित हालचाली केल्या. कोणतीही वेळ वाया न घालवता पोलिसांनी ‘वॉटर रेस्क्यू क्राफ्ट’च्या (जीवरक्षक नौका) सहाय्याने समुद्रात धाव घेतली.

अतिशय प्रतिकूल परिस्थितीत, वेगवान लाटांचा सामना करत पोलिसांनी कुशलतेने आणि वेगाने बचाव मोहीम राबवून या पती-पत्नीला सुखरूप पाण्यातून बाहेर काढले. पोलिसांच्या या धाडसी आणि कौतुकास्पद कामगिरीमुळे दोन निष्पाप जीवांना जीवदान मिळाले आहे. या घटनेनंतर रायगड पोलिसांनी पर्यटकांना सुरक्षेचे आवाहन केले असून, समुद्रात उतरताना पर्यटकांनी गाफील न राहता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि केवळ अधिकृत व सुरक्षित ठिकाणीच आंघोळ करावी, असे म्हटले आहे.

सुरक्षित मानल्या जाणाऱ्या LHB डब्यांची पोलखोल! ऋषिकेशमधील अपघाताने प्रवासी सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

   Follow us on        

ऋषिकेश: योग नागरी ऋषिकेश रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. येथील खंड गाव परिसरामध्ये रात्री ९:३० वाजेच्या सुमारास उज्जैनी एक्सप्रेसचे तीन आधुनिक ‘एलएचबी’ (LHB) डबे अचानक पटरीवरून उतरले. या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसर आणि प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

​रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही दुर्घटना रेल्वे यार्डमध्ये डब्यांच्या शंटिंगदरम्यान घडली. शंटिंग म्हणजेच डबे जोडण्याच्या किंवा ते बाजूला करण्याच्या प्रक्रियेदरम्यान अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने हे डबे रुळावरून घसरले. सुदैवाने, हे सर्व डबे पूर्णपणे रिकामे होते आणि त्यात एकही प्रवासी नव्हता. त्यामुळे या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, तसेच कोणीही जखमी झाले नाही.

​घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, तंत्रज्ञ आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त डबे पुन्हा रुळावर आणण्यासाठी आणि विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत करण्यासाठी यंत्रणेकडून युद्धपातळीवर पुनर्स्थापना कार्य सुरू करण्यात आले आहे. या मार्गावरील इतर गाड्यांवर याचा मोठा परिणाम होऊ नये, याची काळजी घेतली जात आहे.

​या संपूर्ण अपघातात सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे, डब्यांचा वेग अत्यंत कमी असतानाही त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षित आणि गतिमान प्रवासासाठी पारंपरिक डब्यांऐवजी या आधुनिक एलएचबी (Linke Hofmann Busch) डब्यांचा मोठ्या प्रमाणावर अवलंब केला आहे. हे डबे अपघाताच्या वेळी एकमेकांवर चढत नाहीत आणि अत्यंत सुरक्षित मानले जातात. मात्र, इतक्या कमी वेगात झालेल्या घटनेत डब्यांचे झालेले नुकसान पाहून तंत्रज्ञही चक्रावले आहेत.

​या अपघातामुळे रेल्वेच्या अंतर्गत देखभालीवर आणि तांत्रिक सुरक्षेवर पुन्हा एकदा नवीन चर्चा सुरू झाली आहे. अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या यंत्रणेत कुठे त्रुटी राहिली, याचा शोध आता घेतला जात आहे. रेल्वे प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, अपघाताच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपशील लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.

​दांडी समुद्रात वॉटरस्पोर्ट्सदरम्यान दुर्घटना; अंबरनाथमधील महिला पर्यटकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू

   Follow us on        

मालवण: मालवण येथील प्रसिद्ध दांडी समुद्रकिनाऱ्यावर वॉटरस्पोर्ट्सचा आनंद घेताना एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. बनाना राईड (Banana Ride) करत असताना समुद्राच्या पाण्यात पडल्यामुळे मुंबईजवळील अंबरनाथ येथील रहिवासी असलेल्या शीतल शशिकांत मठकर (वय ४५) या महिला पर्यटकाचा मृत्यू झाला. ही दुर्घटना रविवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण मालवण परिसरात आणि पर्यटन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, सौ. शीतल मठकर या आपल्या पती, मुलगा, दीर आणि भावजय यांच्यासह एकूण नऊ जणांच्या कुटुंबासोबत शुक्रवारी मालवण-देवबाग येथे पर्यटनासाठी आल्या होत्या. देवबाग येथील एका कॉटेजमध्ये त्यांचा मुक्काम होता. दोन दिवस विविध पर्यटन स्थळांचा आनंद घेतल्यानंतर, शनिवारी त्यांनी आपल्या दिराचा वाढदिवसही उत्साहात साजरा केला होता. त्यानंतर रविवारी सकाळी सर्व कुटुंब दांडी किनारपट्टीवर वॉटरस्पोर्ट्सचा आनंद घेण्यासाठी गेले होते.

​दांडी समुद्रात बनाना राईड करत असताना अचानक शीतल या समुद्राच्या पाण्यात पडल्या आणि त्यांची प्रकृती खालावली. त्या पाण्यात पडल्याचे लक्षात येताच स्थानिक यंत्रणा आणि कुटुंबियांनी त्यांना तातडीने पाण्याच्या बाहेर काढले. तिथे उपस्थित असलेल्या एका डॉक्टर पर्यटकाने त्यांच्यावर तात्काळ प्राथमिक उपचार (First Aid) केले. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांना तातडीने मालवण येथील एका खाजगी रुग्णालयात आणि त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

​ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांनी शीतल यांची तपासणी केली, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी घोषित केले. आनंद घेण्यासाठी आलेल्या कुटुंबावर अचानक ओढवलेल्या या दुर्दैवी प्रसंगामुळे मठकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी मालवण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पोलीस हवालदार जनार्दन रेवंडकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर भीषण अपघात; रिक्षाचालकांचा दुर्दैवी मृत्यू, दोन महिला गंभीर जखमी

   Follow us on        

संगमेश्वर: रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर सध्या सुरू असलेल्या रुंदीकरणाच्या कामामुळे अपघातांचे सत्र सुरूच असून, सोमवारी सायंकाळी नाणीज येथील जुन्या मठाजवळ एक भीषण अपघात घडला. या अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन महिला प्रवासी गंभीर जखमी झाल्या आहेत. प्रकाश शांताराम कांबळे (वय ४५, रा. दाभोळे बौद्धवाडी, ता. संगमेश्वर) असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी ४.१५ वाजण्याच्या सुमारास दाभोळे परिसरातून रत्नागिरीच्या दिशेने रिक्ष (एमएच-०८ एक्यू ८८६६) जात होती. याच वेळी समोरून जाणाऱ्या एका ट्रॅक्टरचे टायर फुटल्याने चालकाने अचानक ब्रेक लावले. मागून भरधाव वेगाने येणारी रिक्षा या ट्रॅक्टरवर थेट जाऊन आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की, रिक्षेचा चक्काचूर झाला आणि चालक प्रकाश कांबळे यांचा जागीच प्राण गेला.

​या भीषण अपघातात रिक्षेतील दोन महिला प्रवासी देखील गंभीर जखमी झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच त्यांना मोफत रुग्णवाहिका सेवेमार्फत तातडीने पाली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. महामार्गाच्या कामामुळे आणि वाहनांच्या वेगामुळे झालेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कणकवलीत भीषण कार अपघात; एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू, दोन गंभीर जखमी

   Follow us on        

कणकवली: मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका कारचा आज, ९ मे रोजी सकाळी साडेऊ नऊ वाजता नांदगाव ओटव पुलावर (ब्रिजवर) भीषण अपघात झाला. ही कार वेगात असताना अचानक दुभाजकाला (डिव्हायडरला) जोरात धडकली. या भीषण धडकेत कारच्या मागील सीटवर बसलेल्या एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.

​या अपघातात कार चालकासह पुढच्या सीटवर बसलेली मुलगी देखील गंभीररीत्या जखमी झाली आहे. मुलगी कारमध्ये अडकून पडली होती, तिला स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत

अखेरपर्यंत सुटली नाही मायेची मिठी; जबलपूर दुर्घटनेत आई-मुलाचा करुण अंत, हृदयद्रावक फोटोने देश हळहळला

   Follow us on        

जबलपूर:निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी निघालेल्या पर्यटकांवर काळाने घाला घातला. ३० एप्रिल रोजी जबलपूरच्या बर्गी धरणात एमपी टुरिझमची क्रूझ बोट उलटून झालेल्या भीषण अपघातात आतापर्यंत ९ निष्पाप जीवांचा बळी गेला आहे. मात्र, या दुर्घटनेच्या १५ तासांनंतर समोर आलेल्या एका छायाचित्राने संपूर्ण देशाच्या काळजाचा ठोका चुकला आहे. मृत्यू समोर दिसत असतानाही एका आईने आपल्या काळजाच्या तुकड्याला मिठीत घट्ट धरून ठेवल्याचे पाहायला मिळाले.

​नर्मदा नदीच्या संथ पात्रात अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने पर्यटकांच्या आनंदाचे रूपांतर किंकाळ्यांमध्ये केले. सुमारे ३० प्रवाशांना घेऊन जाणारी बोट खमरिया बेटाजवळ वादळात सापडली आणि पाहता पाहता उलटली. बचाव पथकाने १५ जणांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले, तर ९ जणांचे मृतदेह हाती लागले. अद्यापही काही जण बेपत्ता असून शोधकार्य सुरू आहे.

​मरणानेही ज्यांना वेगळे केले नाही…

बचाव कार्यादरम्यान समोर आलेल्या एका दृश्याने उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे डोळे पाणावले. पाण्यात तरंगणाऱ्या एका माऊलीने आपल्या लहान मुलाला छातीशी इतके घट्ट धरून ठेवले होते की, मृत्यूनेही त्यांची ती मिठी सोडवली नव्हती. दोघांनीही लाईफ जॅकेट घातले होते, पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. “आई” काय असते, हे त्या फोटोने पुन्हा एकदा सिद्ध केले. शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मुलाला वाचवण्याचा त्या माऊलीचा प्रयत्न आणि ती मायेची ओढ पाहून संपूर्ण सोशल मीडियावर हळहळ व्यक्त होत आहे.

​प्रशासनाने तातडीने बचाव कार्य राबवले असले तरी, या घटनेने पर्यटनाच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. निसर्गाच्या लहरीपणापुढे मानवी प्रयत्न तोकडे पडले, पण त्या आई-मुलाच्या अमर प्रेमाची कहाणी आता प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी आणत आहे. जखमींवर उपचार सुरू असून, बेपत्ता व्यक्ती सुखरूप मिळाव्यात यासाठी प्रार्थना केली जात आहे.

कशेडी घाटात एसटी बसचा भीषण अपघात; १२ ते १३ प्रवासी जखमी

   Follow us on        

खेड: मुंबई-गोवा जुन्या महामार्गावरील कशेडी घाटात गुरुवारी उशिरा रात्री एक भीषण अपघात घडला. खेड डेपोची खेड-बोरीवली एसटी बस रात्री १० वाजता मार्गस्थ झाली होती. रात्री ११:३० ते १२ च्या सुमारास रायगड जिल्ह्यातील भोगाव परिसरात पोहोचली असता, बसचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. परिणामी, या बसने समोर असलेल्या एका बल्कर ट्रकला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ट्रक चालकासह बसमधील सुमारे १२ ते १३ प्रवासी जखमी झाले असून, त्यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

​अपघाताचे ठिकाण हे अत्यंत धोकादायक असून एका बाजूला खोल दरी आहे. सुदैवाने, धडक बसल्यानंतर बस दरीच्या टोकावर थांबली, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि अनेक प्रवाशांचे प्राण वाचले. घटनेची माहिती मिळताच शिवसेना खेड तालुकाप्रमुख सचिन धाडवे, तसेच मदत ग्रुपचे प्रसाद गांधी, अक्षय भोसले, निखिल चौधरी, समीर मोरे आणि दर्पण दरेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. पोलादपूर पोलिसांनीही तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

​कशेडी घाटात सध्या बोगद्याचे काम पूर्ण झाले असले, तरी स्थानिक गावांसाठी काही एसटी बसेस अजूनही जुन्या घाटातूनच धावतात. भोगाव परिसरात सध्या रस्त्याचे काम सुरू असून, त्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना केल्या जात नसल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे घाटातील रस्ते सुरक्षा आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मुंबई – सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस रुळांवरून घसरली

   Follow us on        

पुणे: पुणे रेल्वे स्थानकात प्रवेश करताना आज संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास २२२२५ सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसचा एक डबा रुळावरून घसरल्याची घटना घडली. रेल्वे स्थानकातील ‘डायमंड क्रॉसिंग’वर ही दुर्घटना घडली असून, गाडीचा चौथा कोच डिरेल झाला. या कोचच्या ट्रॉलीचे (चाकांचे संयोजन) रुळावरून खाली उतरल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, गाडीचा वेग कमी असल्याने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

​या घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि तांत्रिक पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पुणे स्थानकाच्या यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पांतर्गत संबंधित डायमंड क्रॉसिंगचे अपग्रेडेशन करण्याचे काम आधीच नियोजित होते, त्याच ठिकाणी हा अपघात झाल्याने तांत्रिक कारणांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेने तातडीने पर्यायी रेकची व्यवस्था केली. या अपघातामुळे पुणे विभागातील रेल्वे वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासन आता या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून, मुख्य स्थानकांवरील पायाभूत सुविधांच्या देखभालीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

 

View this post on Instagram

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search