मुंबई: २५ डिसेंबर २०२५ रोजी व्यावसायिकरीत्या सुरू झाल्यापासून अवघ्या चार महिन्यांच्या आत, अदानी समूहाद्वारे संचालित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने (NMIAL) भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. ‘ओएजी’ (OAG) या जागतिक ट्रॅव्हल डेटा संस्थेच्या आकडेवारीनुसार, एप्रिल २०२६ मध्ये ३,९३,८१९ प्रवासी क्षमतेसह हे विमानतळ देशातील ९वे सर्वात व्यस्त देशांतर्गत विमानतळ ठरले आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (CSMIA) वाढता ताण कमी करण्याच्या उद्देशाने या विमानतळाची निर्मिती करण्यात आली असून, अल्पावधीतच याने प्रवाशांची पसंती मिळवली आहे.
१९,६५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभारण्यात आलेला या विमानतळाचा पहिला टप्पा सध्या कार्यरत असून, त्यात एक धावपट्टी आणि एका टर्मिनलचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात वर्षाला २ कोटी प्रवाशा हाताळण्याची याची क्षमता आहे. विस्तारीकरणाच्या योजनेनुसार, २०३२ पर्यंत हे विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू होईल, तेव्हा त्याची क्षमता वर्षाला ९ कोटी प्रवाशांपर्यंत पोहोचेल आणि तिथे एकूण चार टर्मिनल्स असतील. विमान कंपन्यांच्या वाढत्या विस्तार योजनांमुळे हे विमानतळ आगामी काळात अधिक वेगाने प्रगती करेल, अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.











