Category Archives: कोकण

Mumbai konkan Ro Ro Service: विजयदुर्ग बंदरात ‘एम-२-एम प्रिन्सेस’ फेरीत ‘विघ्न’!

   Follow us on        

विजयदुर्ग: कोकणातील महत्त्वाच्या मुंबई–विजयदुर्ग रो-रो सेवेत धावणाऱ्या ‘एम-२-एम प्रिन्सेस’ या फेरीबोटला गुरुवारी विजयदुर्ग बंदरात किरकोळ अपघात झाला. बंदरात उभ्या असलेल्या या फेरीबोटला एका टगबोटीची धडक लागल्याने बोटीचे थोडे नुकसान झाले.

ही रो-रो सेवा २ मार्चपासून सुरू झाली असून बुधवारी विजयदुर्ग येथे तिची दुसरी फेरी दाखल झाली होती. गुरुवारी दुपारी ही बोट पुन्हा मुंबईकडे रवाना होणार असतानाच बंदरातील एका टगबोटीने फेरीबोटला धडक दिली. या धडकेत बोटीचे काही प्रमाणात नुकसान झाले.

प्रशासनाने तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेतले. मात्र या प्रक्रियेला वेळ लागणार असल्याने प्रवाशांच्या प्रवासाचा प्रश्न निर्माण झाला. गुरुवारी मुंबईला जाण्यासाठी एकूण ३० प्रवाशांनी बुकिंग केले होते.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कंपनीने सर्व प्रवाशांचे तिकीट पैसे तत्काळ परत केले. तसेच बोटीवरील काही कर्मचाऱ्यांना देवगडमार्गे खासगी ट्रॅव्हल्सने मुंबईला पाठविण्यात आले. दिवसभर दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर सुरक्षा तपासणी करून ‘एम-२-एम प्रिन्सेस’ ही फेरीबोट प्रवाशांविना मुंबईकडे रवाना झाली.

या किरकोळ अपघातामुळे नव्याने सुरू झालेल्या या जलवाहतूक सेवेला तात्पुरता खंड पडला असला, तरी प्रवाशांच्या हिताचा विचार करून कंपनीने घेतलेल्या निर्णयाचे कौतुक होत आहे.

सर्व बाबी अनुकूल, तरीही विलंब का? २० डब्यांच्या मुंबई–गोवा वंदेभारत एक्सप्रेसची प्रतीक्षा कायम

   Follow us on        

मुंबई: मुंबई–मडगाव वंदे भारत एक्सप्रेस (गाडी क्र. २२२२९/२२२३०) या अत्यंत लोकप्रिय गाडीची क्षमता तातडीने वाढवून ती २० डब्यांची करण्याची मागणी पुन्हा एकदा पुढे आली आहे. मध्य रेल्वेअंतर्गत सर्वाधिक प्रवासी प्रतिसाद मिळणारी ही वंदे भारत सेवा सध्या केवळ ८ डब्यांसह चालवली जात असून, सुरुवातीपासूनच सातत्याने उच्च प्रवासी गर्दी असूनही क्षमतेत वाढ न होणे आश्चर्यकारक आणि अन्यायकारक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.

भारतीय रेल्वेतील अनेक वंदे भारत गाड्या ९० टक्क्यांहून अधिक प्रवासी भराव नोंदवताच १६ किंवा २० डब्यांपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत, त्यामुळे मुंबई–मडगाव मार्गालाही त्याच धर्तीवर वाढ मिळावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, नांदेड–मुंबई आणि सोलापूर–मुंबई वंदे भारत गाड्यांची मालकी व देखभाल जबाबदारी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडे वर्ग झाल्याने मुंबईतील देखभाल सुविधा व पिट लाईनची क्षमता मोठ्या प्रमाणात मोकळी झाली आहे. त्यामुळे मुंबई–मडगाव वंदे भारतला कायमस्वरूपी २० डब्यांची रचना देण्यासाठी सध्या अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

उच्च मागणी असलेल्या या महत्त्वाच्या मार्गावर अजूनही कमी क्षमतेची गाडी चालवली जाणे योग्य नसल्याचे सांगत रेल्वे बोर्ड तसेच संबंधित विभागांनी तातडीने निर्णय घेऊन ही वाढ प्राधान्याने लागू करावी, अशी मागणी कोकण विकास समितीचे जयवंत शंकर दरेकर यांनी संबधित आस्थापना आणि लोकप्रतिनिधींना ईमेल द्वारे केली आहे. कोकणातील प्रवासी या दीर्घकालीन आणि रास्त मागणीच्या निर्णयाची प्रतीक्षा करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सावंतवाडी येथे थांबा देणे गरजेचे

या गाडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात फक्त एका स्थानकावर, म्हणजे कणकवली येथेच थांबा आहे. राज्यातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेल्या या जिल्ह्यात अशा प्रीमियम गाड्यांना पुरेसे थांबे न देणे हा मोठा विरोधाभास म्हणावा लागेल. तळकोकणातील सावंतवाडी येथे या गाडीला थांबा मिळावा, अशी मागणी गाडी सुरू झाल्यापासून सातत्याने होत आहे. तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी वंदे भारत एक्स्प्रेससाठी सावंतवाडी थांब्याबाबत आश्वासन दिले होते. मात्र, आजतागायत हा थांबा मिळालेला नाही. ही गाडी २० डब्यांची करून तिला सावंतवाडी येथे थांबा मिळावा, यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना (सावंतवाडी) प्रयत्नशील आहे.

मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवा: सामान्यांसाठी “चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला”!

   Follow us on        

मुंबई: कोकणच्या विकासाच्या गप्पा मारणाऱ्या राज्यकर्त्यांनी मुंबई ते विजयदुर्ग अशी ‘M2M’ रो-रो सेवा नुकतीच थाटामाटात सुरू केली. मात्र, या सेवेचे भाडेपत्रक पाहिल्यावर सामान्य कोकणी माणसाच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. “चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला” अशी या प्रवासाची अवस्था झाली असून, या भाडेवाढीमुळे कोकणचा सामान्य चाकरमानी पुन्हा एकदा वाऱ्यावर सोडला गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

गणिताचा ‘झोल’: रस्ते प्रवास स्वस्त, जलप्रवास महाग!

कोकण रेल्वेचे संस्थापक सदस्य सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर यांनी या भाडेवाढीचे वाभाडे काढताना एक बोलके गणित मांडले आहे. जर एखादा मध्यमवर्गीय माणूस स्वतःच्या कारने (४ प्रवाशांसह) मुंबईहून कोकणात गेला, तर त्याचे गणित खालीलप्रमाणे बसते:

प्रवास साधन इंधन (Fuel) टोल (Toll) एकूण खर्च
खाजगी कार (रस्त्याने) ₹ ४,५०० (10kmpl) ₹ १,००० ₹ ५,५००/-

म्हणजेच, रस्त्याने जाण्यापेक्षा जलमार्गाने जाण्यासाठी कोकणी माणसाला तब्बल १०,५०० रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत. हा कुठल्या प्रकारचा विकास आहे? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.

“सामान्य माणूस केंद्रस्थानी की फक्त श्रीमंत पर्यटक?”

विजयदुर्गला पोहोचल्यानंतर तिथून आपल्या मूळ गावी जाण्यासाठी पुन्हा खाजगी वाहन किंवा एसटीचा खर्च वेगळाच. तसेच मुंबईत घरून भाऊच्या धक्क्यापर्यंत पोहोचण्याचा खर्च धरला, तर हे बजेट सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाते. मंत्र्यांनी हे दर ठरवताना नेमका कोणाचा विचार केला? केवळ आलिशान गाड्यांमधून फिरणाऱ्या पर्यटकांचा की घाम गाळून कोकण जिवंत ठेवणाऱ्या चाकरमान्यांचा?

“कोकणवासीयांची परवड कधी थांबणार? विजयदुर्गला उतरल्यावर पुढे घरापर्यंतचा प्रवास खर्च जोडला तर हे आर्थिक गणित कोलमडते. ही सेवा सामान्यांसाठी नसून केवळ श्रीमंतांच्या चोचल्यांसाठी आहे असे वाटते.”सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर, संस्थापक सदस्य, कोकण रेल्वे.

त्यापेक्षा ‘वसई ते सावंतवाडी पॅसेंजर’ सुरू करा

कोकणच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून सामान्यांना न परवडणारी ‘रो-रो’ सेवा सुरू करण्यापेक्षा, रेल्वे प्रशासनाने ‘वसई ते सावंतवाडी पॅसेंजर’ सुरू करणे हाच खरा आणि व्यवहार्य तोडगा ठरेल, असे प्रतिपादन सुरेंद्र नेमळेकर यांनी केले आहे. या प्रस्तावानुसार, ही गाडी रात्री १० वाजता वसईवरून सुटावी, ज्यामुळे नोकरी-धंद्यावरून सुटलेला चाकरमानी सुखाने प्रवास करू शकेल. भिवंडी आणि कोपर रोडसह कोकणातील सर्व प्रमुख स्थानकांवर या गाडीला थांबा दिल्यास ठाणे, पालघर आणि मुंबई उपनगरातील प्रवाशांची मोठी सोय होईल. महत्त्वाचे म्हणजे, अवघ्या २२५ रुपयांत प्रवासी सकाळी सावंतवाडीपर्यंत पोहोचू शकतील आणि तिथून एसटीने आपापल्या घरी जाणे त्यांना अत्यंत स्वस्त पडेल. सकाळी तिथूनच ही गाडी परतीच्या प्रवासाला निघून रात्री १० वाजेपर्यंत पुन्हा वसईला पोहोचू शकते. ही साधी पण प्रभावी योजना राबवल्यास कोकणवासीयांची वर्षानुवर्षांची आर्थिक परवड खऱ्या अर्थाने थांबेल.

मागणी पूर्ण! सावंतवाडी–रेल्वे स्थानक–बांदा बससेवा सुरू; बस फेऱ्यांचे वेळापत्रक असे असेल

   Follow us on        

बांदा :सावंतवाडी रेल्वे स्टेशन–निगुडे–सोनूर्ली–बांदा या मार्गावर नवीन बससेवा सुरू करण्यात आली आहे. या मार्गावर नियमित बसफेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून सातत्याने करण्यात येत होती. अखेर प्रशासनाने याची दखल घेत बससेवा सुरू केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

निगुडे येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नव्या सेवेचा लाभ विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी तसेच व्यापाऱ्यांना होणार असून रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचणे आता अधिक सोयीचे होणार आहे.

नवीन बससेवेअंतर्गत दिवसातून एकूण ११ फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. सकाळपासून सायंकाळपर्यंत नियमित वेळापत्रकानुसार बस धावणार असून सावंतवाडी रेल्वे स्टेशन, निगुडे, सोनूर्ली आणि बांदा या प्रमुख ठिकाणी थांबे असणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना शहराशी थेट जोडणी मिळाली आहे.

ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत करत प्रशासनाचे आभार मानले असून भविष्यात फेऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. नवीन बससेवा सुरू झाल्याने या भागातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

नवीन बस फेरीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:

१) बांदा – सकाळी ७:१५ (मार्गे: निगुडे, सोनूर्ली, रेल्वे स्टेशन) ➡️ सावंतवाडी – सकाळी ८:००

२) सावंतवाडी – सकाळी ९:०० (मार्गे: रेल्वे स्टेशन, सोनूर्ली, निगुडे) ➡️ बांदा – सकाळी ९:४५

३) बांदा – सकाळी ९:५० (मार्गे: निगुडे, सोनूर्ली, रेल्वे स्टेशन) ➡️ सावंतवाडी – सकाळी १०:३५

४) सावंतवाडी – सकाळी ११:३० (मार्गे: रेल्वे स्टेशन, सोनूर्ली, निगुडे) ➡️ बांदा – दुपारी १२:१५

५) बांदा – सकाळी ११:३० (मार्गे: निगुडे, सोनूर्ली, रेल्वे स्टेशन) ➡️ सावंतवाडी – दुपारी १२:१५

६) सावंतवाडी – दुपारी १२:२५ (मार्गे: रेल्वे स्टेशन, सोनूर्ली, निगुडे) ➡️ बांदा – दुपारी १३:१० (१:१०)

७) बांदा – दुपारी १३:२० (१:२०) (मार्गे: निगुडे, सोनूर्ली, रेल्वे स्टेशन) ➡️ सावंतवाडी – दुपारी १३:४५ (१:४५)

८) सावंतवाडी – दुपारी १४:०० (२:००) (मार्गे: रेल्वे स्टेशन, सोनूर्ली, निगुडे) ➡️ बांदा – दुपारी १४:४५ (२:४५)

९) बांदा – दुपारी १४:५५ (२:५५) (मार्गे: निगुडे, सोनूर्ली, रेल्वे स्टेशन) ➡️ सावंतवाडी – दुपारी १५:४० (३:४०)

१०) सावंतवाडी – सायं. १७:०० (५:००) (मार्गे: रेल्वे स्टेशन, सोनूर्ली, निगुडे) ➡️ बांदा – सायं. १७:४५ (५:४५)

११) बांदा – सायं. १७:५५ (५:५५) (मार्गे: निगुडे, सोनूर्ली, रेल्वे स्टेशन) ➡️ सावंतवाडी – सायं. १८:४० (६:४०)

 

 

 

विजयदुर्ग–मुंबई M2M रो-रो परतीचा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण!

   Follow us on        

मुंबई: मुंबई आणि कोकणाला समुद्रमार्गे जोडणाऱ्या ऐतिहासिक M2M Princess रो-रो फेरीचा परतीचा प्रवास आज (२ मार्च २०२६) यशस्वीरित्या पूर्ण झाला. १ मार्च रोजी मुंबईच्या भाऊचा धक्का येथून रवाना झालेली ही आशियातील सर्वात जलद रो-पॅक्स सेवा, विजयदुर्गहून परत येताना संध्याकाळी भाऊचा धक्का येथे सुखरूप पोहोचली.

या सेवेमुळे मुंबई ते विजयदुर्ग (सिंधुदुर्ग) दरम्यानचा प्रवास आता फक्त ६-७ तासांत होऊ शकतो, जे रस्त्याने १०-१२ तासांपेक्षा खूप कमी आहे. फेरीमध्ये ६२६ प्रवासी आणि कार, दुचाकी यांसारखी वाहने नेण्याची क्षमता आहे. या प्रकल्पामुळे कोकणातील पर्यटन, व्यापार आणि सांस्कृतिक संबंधांना नवे बळ मिळणार आहे.महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री आदरणीय नितेश राणे यांनी या यशस्वी परतीच्या प्रवासाबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी म्हटले आहे की, हा केवळ प्रवास नव्हता तर मुंबई-कोकण नात्याला लाटांवरून नव्याने जोडणारा भावनिक सेतू होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र मरीटाइम बोर्ड आणि M2M Ferries यांनी हे स्वप्न साकार केले.

रात्रीच्या वेळी भाऊचा धक्का येथे उतरलेले प्रवासी, त्यांच्या सूटकेसेस आणि वाहनांसह दिसलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा प्रकल्प महाराष्ट्राच्या ब्लू इकॉनॉमीला चालना देणारा ठरणार असून, होळी आणि उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांसाठी हा उत्तम पर्याय ठरला आहे.

 

 

 

Konkan Railway: तिरुवनंतपुरम – मदार होळी विशेष गाडीची घोषणा

   Follow us on        

Konkan Railway: होळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तिरुवनंतपुरम सेंट्रल – मदार जंक्शन – तिरुवनंतपुरम सेंट्रल साप्ताहिक विशेष गाडी (क्र. 06013 / 06014) अशी ही सेवा राहणार आहे.

गाडी क्र. 06013 तिरुवनंतपुरम सेंट्रल – मदार जंक्शन साप्ताहिक विशेष ४ मार्च २०२६ आणि ११ मार्च २०२६ (बुधवार) रोजी सकाळी ७:४५ वाजता तिरुवनंतपुरम सेंट्रल येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ११:०० वाजता मदार जंक्शन येथे पोहोचेल.

गाडी क्र. 06014 मदार जंक्शन – तिरुवनंतपुरम सेंट्रल साप्ताहिक विशेष ७ मार्च २०२६ आणि १४ मार्च २०२६ (शनिवार) रोजी रात्री ९:४० वाजता मदार जंक्शन येथून सुटेल आणि चौथ्या दिवशी रात्री १२:४५ वाजता तिरुवनंतपुरम सेंट्रल येथे पोहोचेल.

ही विशेष गाडी कोल्लम, कायमकुलम, मावेलिकरा, चेंगन्नूर, तिरुवल्ला, कोट्टायम, एर्नाकुलम टाउन, अलुवा, त्रिशूर, शोरनूर, कोझिकोड, कन्नूर, कासरगोड, मंगळुरू, उडुपी, मुरुडेश्वर, कुमटा, करवार, मडगाव, सावंतवाडी रोड, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, खेड, पनवेल, वसई रोड, सूरत, वडोदरा, रतलाम, चित्तौडगड, भिलवाडा, बिजैनगर आणि अजमेर या स्थानकांवर थांबा घेणार आहे.

या गाडीमध्ये एकूण २२ डबे असतील. त्यात २० स्लीपर कोच आणि २ एसएलआर/डी डबे समाविष्ट आहेत.

Konkan Railway Updates 02/03/26: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! होळीसाठी मुंबई – मडगाव मार्गावर धावणार विशेष गाड्या

   Follow us on        

मुंबई: होळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई–मडगाव मार्गावर विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे कोकण मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबई CSMT – मडगाव – मुंबई CSMT विशेष (द्विसाप्ताहिक)

गाडी क्रमांक ०१०४९ मुंबई CSMT–मडगाव विशेष ही ३ मार्च २०२६ (मंगळवार) आणि ६ मार्च २०२६ (शुक्रवार) रोजी मुंबई CSMT येथून पहाटे ००:३० वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी १३:३० वाजता मडगाव येथे पोहोचेल.

परतीची ०१०५० मडगाव–मुंबई CSMT विशेष ही ३ व ६ मार्च रोजी मडगावहून १६:३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ०५:२० वाजता मुंबई CSMT येथे पोहोचेल.

या गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम व करमळी या स्थानकांवर थांबा असेल.

या गाडीची रचना एकूण २० डबे असून त्यात ३ टियर एसी (इकॉनॉमी) – १८ डबे आणि जनरेटर कार – २ डबे असतील.


लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष

गाडी क्रमांक ०१०४७ लोकमान्य टिळक टर्मिनस–मडगाव विशेष ही ७ मार्च २०२६ (शनिवार) रोजी रात्री २२:१५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी १२:०० वाजता मडगाव येथे पोहोचेल.

परतीची ०१०४८ मडगाव–लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष ही ८ मार्च २०२६ (रविवार) रोजी सायंकाळी १८:०० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ०६:५० वाजता एलटीटी येथे पोहोचेल.

या गाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम व करमळी येथे थांबा असेल.

या गाडीची रचना २२ डबे अशी असून त्यात २ टियर एसी – १, ३ टियर एसी – ६, स्लीपर – ९, जनरल – ४, जनरेटर कार – १ आणि एसएलआर – १ डबा असेल.

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांची ‘लेट लतीफी’ संपेना! होळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

   Follow us on        

ठाणे: कोकणातील लाडक्या ‘शिमगा’ म्हणजेच होळीच्या सणासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास यंदा अत्यंत खडतर ठरला. रविवारी सकाळी मुंबई सीएसएमटी स्थानकातून सुटणारी तेजस एक्स्प्रेस तब्बल सात तास उशिराने धावल्यामुळे मुंबई, ठाणे आणि पनवेल रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी रखडपट्टी झाली. सकाळी ५:४० वाजता सुटणारी ही गाडी प्रत्यक्षात दुपारी १२ वाजून ५८ मिनिटांनी सुटली.

रेल्वे प्रशासनाकडून गाडी उशिरा असल्याची पूर्वसूचना वेळेवर न मिळाल्याने, अनेक प्रवासी पहाटेच स्थानकावर पोहोचले होते. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांचे प्रचंड हाल झाले. विशेषतः ठाणे रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ५ वर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती, मात्र तिथे स्वच्छतागृहे किंवा विश्रांतीगृहांची कोणतीही सोय नसल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

​या विलंबाबाबत रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती वेळेत देण्यात आली नाही. सुरुवातीला गाडी १०:५० ला सुटेल असे सांगण्यात आले, पण प्रत्यक्षात तिला सात तास उशीर झाला. कोकण रेल्वेच्या मार्गावरील दुहेरीकरणाच्या कामामुळे हा उशीर झाल्याची चर्चा प्रवाशांमध्ये होती.

तेजस, जनशताब्दी आणि मांडवी यांसारख्या गाड्यांना होणारा उशीर आता नित्याचीच बाब झाली असून, सण-उत्सवाच्या काळात रेल्वेच्या या ढिसाळ नियोजनामुळे संतप्त प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या नावाने अक्षरशः ‘शिमगा’ केला. एका दिवसाच्या या खोळंब्याचा परिणाम परतीच्या प्रवासावरही होण्याची भीती प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, कोकणातील रेल्वे समस्यांकडे राज्य सरकारनेही लक्ष देण्याची मागणी होत आहे. अलीकडेच बोट सेवेचा शुभारंभ करताना कोकणाच्या विकासाचा उल्लेख झाला असला, तरी रेल्वे प्रवासातील अडचणींचाही गांभीर्याने विचार करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समस्यांची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाला सुधारणा करण्यास भाग पाडावे, अशी मागणी प्रवासी करत आहेत.

कोकण–कोल्हापूर कनेक्टिव्हिटीला बूस्ट! एक-दोन नव्हे, तर तब्बल तीन नवे घाट मार्ग प्रस्तावित

   Follow us on        

वारणानगर: कोल्हापूर जिल्हा, शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यातील दळणवळण तसेच पर्यटनाला मोठी चालना देण्यासाठी तीन नवीन घाट रस्ते निर्माण करण्यात येणार आहेत. हे नवीन मार्ग कोल्हापूरला थेट कोकणाशी जोडणार असून, यामुळे दोन्ही विभागांच्या विकासाला मोठी गती मिळणार असल्याची माहिती आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली आहे.

या संदर्भात आमदार कोरे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन चर्चा केली. या प्रस्तावित कामांना लवकरच मंजुरी देण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले आहे.

प्रस्तावित नवीन घाट रस्ते खालीलप्रमाणे आहेत:

१. पावनखिंड ते देवडे-भोवडे मार्ग: शाहूवाडी तालुक्यातील पावनखिंड-गजापूर-विशाळगड पायथा ते रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवडे-भोवडे यांना जोडणारा नवीन घाट मार्ग तयार करणे.

२. अणुस्कुरा ते भांबेड मार्ग: शाहूवाडी तालुक्यातील अणुस्कुरा-गावडवाडी (कोल्हापूर जिल्हा हद्द) ते रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील भांबेड-धनगरवाडी या दोन जिल्ह्यांना जोडणारा घाट रस्ता बांधणे.

३. वाशी-पडसाळी ते काजिर्डा मार्ग: पन्हाळा तालुक्यातील वाशी-पडसाळी ते रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील काजिर्डा यांना जोडणाऱ्या नवीन घाट रस्त्याचे काम करणे.

या बैठकीप्रसंगी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती. यामध्ये करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रदीप नरके, राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत, तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती सर्जेराव पाटील यांचा प्रामुख्याने समावेश होता. या मान्यवरांसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे विविध वरिष्ठ अधिकारीदेखील या चर्चेत सहभागी झाले होते.

थोडक्यात सांगायचे तर: या तीनही नवीन घाट रस्त्यांच्या कामांमुळे कोल्हापूर आणि कोकणातील अंतर कमी होणार असून, दुर्गम भागातील दळणवळणाची समस्या सुटण्यास मदत होईल. विशेषतः विशाळगड आणि पावनखिंड परिसरातील ऐतिहासिक पर्यटनाला यामुळे मोठी उभारी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


Video: मुंबई-विजयदुर्ग रो-रो फेरी सेवेचा शुभारंभ! पहिली बोट कोकणच्या दिशेने रवाना

   Follow us on        

मुंबई: मुंबई ते कोकणातील विजयदुर्ग दरम्यान M2M फेरीज ची रो-रो (Ro-Ro) सेवा आज, १ मार्च २०२६ पासून सुरू झाली आहे. मुंबईतील भाऊचा धक्का येथे सकाळी ८ वाजता मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या सेवेचा  उद्घाटन सोहळा पार पडला.

रो-पॅक्स सेवेमुळे मुंबई ते विजयदुर्गचा प्रवास रस्त्याने १०-१२ तासांऐवजी केवळ ५ ते ७ तासांत पूर्ण होऊ शकतो. ही सेवा शिमगा (होळी) सणाच्या पार्श्वभूमीवर सुरू झाली असून, कोकणवासीयांना रस्त्यावरील वाहतूक कोंडीपासून मुक्ती मिळाली आहे. M2M Princess ही उच्च गतीची फेरी वापरली जात असून, यात प्रवासींसह दुचाकी आणि चारचाकी वाहनेही नेण्याची सुविधा उपलब्ध आहे.

उद्घाटन फेरीच्या पहिल्याच दिवशी बुकिंगला जबरदस्त प्रतिसाद मिळाला असून, अनेक प्रवासी या नव्या समुद्री मार्गाचा आनंद घेण्यासाठी उत्सुक आहेत. ही सेवा कोकणातील पर्यटन, व्यापार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ही १६ दिवसांच्या पायलट टप्प्यातील सेवा असून, भविष्यात नियमित आणि विस्तारित स्वरूपात चालवली जाणार आहे.

 

 

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search