Konkan Railway News : स्लीपर डब्यांना मोठी मागणी असूनही या डब्यांचे रूपांतर replacement एसी कोच मध्ये करत असल्याचा आरोप रेल्वे प्रशासनवर होत असताना सामान्य प्रवाशांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या 16336 /16335 नागरकोईल – गांधीधाम एक्सप्रेस या गाडीच्या स्लीपर कोच मध्ये वाढ करण्यात आलेली आहे. ही गाडी सध्या एकूण 11 स्लीपर कोचसहित धावत आहे त्यामध्ये एका स्लीपर कोचची वाढ करून 12 एवढी करण्यात आली आहे.
गाडी क्रमांक 16336 नागरकोईल – गांधीधाम एक्सप्रेस ही गाडी दिनांक 19 मार्च 2024 तर गाडी क्रमांक 16335 गांधीधाम नागरकोईल एक्सप्रेस दिनांक 22 मार्च 2024 रोजीपासून या बदलासह चालविण्यात येणार आहे.
ही गाडी कोकणात वसई, भिवंडी, पनवेल , माणगाव, चिपळूण, रत्नागिरी या स्थानकावर थांबे घेते.
Absenceof FOB :कोकण रेल्वे मार्गावरील वैभववाडी रेल्वे स्थानकावर पादचारी पूल नसल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पूल नसल्याने दोन प्लॅटफॉर्म च्या मधील रुळावरून जीव मुठीत पलीकडे जावे लागत आहे. खासकरून वरिष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती आणि लहानमुले आणि स्त्रियांना रेल्वे रूळ ओलांडताना मोठी पराकाष्टा करावी लागत आहे. सध्याच्या परिस्थितीवरून येथे मोठा अपघात घडण्याची दाट शक्यताही वर्तविली जात आहे. मात्र येथे प्रवासी संख्या आणि चांगले उत्पन्न मिळत असूनही तसेच अनेक वर्ष मागणी करूनही येथे पादचारी मंजूर होत नसल्याने येथे अपघात घडल्यावरच प्रशासनाचे डोळे उघणार का असा संतप्त प्रश्न विचारला जात आहे.
सध्या वैभववाडी मांडवी एक्सप्रेस, कोकणकन्या एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस आणि दिवा सावंतवाडी एक्सप्रेस स्थानकावर सध्या ४ नियमित गाड्या थांबा घेतात. तसेच सणावारीआणि हंगामात चालविण्यात येणाऱ्या जवळपास सर्वच गाडयांना येथे थांबा देण्यात येतो. या स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढत आहे. मागील वर्षी उत्पन्नाच्या बाबतीत वैभववाडी स्थानक रत्नागिरी विभागातून सातव्या स्थानावर तर संपूर्ण कोकण रेल्वेच्या स्थानकांचा विचार करता ७२ स्थानकामध्ये १४ व्या स्थानावर आहे. हे वास्तव असूनही या स्थानकावर एक पादचारी पूल का मंजूर होत नाही हा पण एक मोठं प्रश्च म्हणावा लागेल
Video | रूळ ओलांडण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी; रेल्वे प्रशासन दुर्घटनेच्या प्रतीक्षेत? – Kokanai
देवगड: देवगड तालुक्यातील मुणगे आडबंदर येथील सडा भागात दोन मानवाकृती कातळचित्रे सापडली आहेत. येथील देवगड इतिहास संशोधन मंडळाच्या वतीने त्याची पाहणी करण्यात आली. सापडलेल्या कातळचित्राच्या परिसराची जागा स्वच्छ करून चित्र खुले करण्यात आले. या परिसरात आणखी काही कातळचित्रे मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली.
कोकण इतिहास परिषद व देवगड इतिहास संशोधन मंडळ सातत्याने गेली काही वर्षे कातळचित्र शोधमोहीम राबवत आहे. याच मोहिमेतंर्गत तालुक्यातील मुणगे आडबंदर येथील सडा भागात दोन मानवाकृती कातळचित्रे सापडली. याची माहिती मिळताच प्राच्यविद्या अभ्यासक रणजित हिर्लेकर व अजित टाककर यांनी या कातळी चित्रांचा शोध घेतला. त्यावेळी तेथे पुसटशा मानवाकृती रेषा दिसत होत्या.
या दोन उलट सुलट साडेपाच फूट उंचीच्या मानवाकृती आहेत. उत्तर-दक्षिण अशी इथे जर मध्य रेषा काढली तर यातील एक आकृती पूर्वेकडे पाय सोडून व दुसरी आकृती पश्चिमेकडे पाय सोडून आहे. दोन्ही आकृत्यांची डोकी जवळ जवळ काढलेली नसावीत असे दिसते. डोक्याच्या जागी फक्त एक एक खळगे कोरलेले दिसते. या कातळचित्राच्या रेषा अतिशय सफाईने काढलेल्या दिसतात. खांदे, हात, कंबर, पायाच्या पोटऱ्या दर्शविणाऱ्या बाह्यरेषा सराईतपणे कोरलेल्या दिसतात. अन्यत्र आढळणाऱ्या मानवाकृती इतक्या सफाईने कोरलेल्या दिसत नाहीत.
कातळचित्राचे “मामा भाचे” नामकरण
येथील काही ग्रामस्थ या कातळचित्रांना “मामा भाचे” असे संबोधतात. या मागे एक ऐकिव कथा पण आहे. एके काळी मामा आणि भाचा येथे शिकारीला आले होते. हे दोघे कातळावर शिकारीसाठी फिरत असताना त्यांना शिकार न मिळाल्यामुळे येथे थकून बसले होते. इतक्यात एक कुठला तरी जंगली प्राणी या दोघांच्या मधून पळून जाताना त्यांना दिसला. दोघांनी तात्काळ त्या प्राण्याच्या दिशेने आपल्या बंदुकीतून गोळ्या झाडल्या. पण तो प्राणी शिफाईने पळून गेला व बंदुकीच्या गोळ्या लागून दोन्ही मामा भाचे ठार झाले. या मानवाकृतीच्या डोक्याच्या जागी जे दोन खळगे दिसतात त्या त्यांना लागलेला गोळ्या आहेत असे येथील गाववाले समजतात. (या कथेस कोकणाई दुजोरा देत नाही. फक्त वाचकांच्या माहितीसाठी हे येथे लहिण्यात आले आहे.)
सिंधुदुर्ग :दोडामार्ग तालुक्यातील तळकट-खडपडे-कुभंवडे रस्त्यावर शनिवारी सकाळी नागरिकांना वाघाचे दर्शन झाले या भागात पूर्वीपासून वाघाचे अस्तित्व आहे . दोडामार्ग तालुक्याचे जैवविविधतेच्या दृष्टीने असलेले महत्त्व यापूर्वी देखील अधोरेखित झाले आहे.
दोडामार्ग तालुक्याला सावंतवाडी तालुक्याशी जोडण्यासाठी तळकट येथून चौकुल येथे जाणारा कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्याला लागून राखीव जंगलाचे काही क्षेत्र आहे. रात्री-अपरात्री या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांना वन्यजीवांचे दर्शन होत असते. शनिवारी सकाळी या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांना पट्टेरी वाघाचे दर्शन झाले. त्यांनी लागलीच या वाघाचे छायाचित्र आणि व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपले. वन विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार छायाचित्रित झालेल्या वाघाचे लिंग हे मादी असून पूर्वीपासून या मादीचा वावर या परिसरात आहे.
तळकट पंचक्रोशीत समृद्ध जंगल आहे; मात्र या भागात खनिज प्रकल्पांसाठी गेली अनेक वर्षे मायनिंग लॉबी प्रयत्न करत आहे. पश्चिम घाट अभ्यास समितीचे अध्यक्ष माधव गाडगीळ यांनी या भागाचा दौरा करून आपल्या अहवालात हा भाग पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असून त्याच्या संवर्धनासाठी उपाय योजण्याची शिफारस केली होती; मात्र नंतर आलेल्या कस्तुरीरंगन समितीने हा अख्खा दोडामार्ग तालुकाच पर्यावरण निर्बंध अर्थात इकोसेन्सिटीव्हमधून वगळला होता.
Mumbai Goa Highway :मुंबई-गोवा महामार्ग सप्टेंबर 2024 पासून वाहतुकीस खुला करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ‘ग्रीनफिल्ड कोकण एक्स्प्रेस वे’ असे नाव त्या महामार्गास देण्यात आले असून तो मुंबईसह रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग, गोवा राज्यात जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. गोवा, कर्नाटक, केरळ या राज्यांना जोडणाऱ्या एनएच-66 या महामार्गाचा भाग असून तो पनवेलपासून सुरू होतो.
हाच मार्ग गोव्यातील राजधानी पणजीमधून तो केरळमधील कन्याकुमारीपर्यंत जातो. या महामार्गाची अंतिम तारीख न्यायालयाने देखील सरकारला विचारली होती. तेव्हा राज्य सरकारने व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तो 31 डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. तथापि एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर 2024 मध्ये महमार्गाचे काम पूर्ण होईल आणि तो चाकरमान्यांसाठी खुला करण्याचे आश्वासन दिले आहे. सिंधुदुर्ग ते गोवा असा ग्रीनफिल्ड कॉरिडॉर रस्ता या महामार्गात तयार करण्यात येणार असून संपूर्ण कामे 31 डिसेंबर 2024 पूर्वी संपवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. यंदा गणेश चतुर्थीला मुंबई-गोवा महामार्गाने प्रवास करायला मिळेल, असा दिलासा जनतेला मिळाला आहे.
सावंतवाडी, दि. १६ मार्च: सावंतवाडी शहराचे वैभव असणाऱ्या व जैवविविधतेने समृद्ध असलेल्या नरेंद्र डोंगरावर पर्यटकांना उद्यापासून नरेंद्र वन उद्यान निसर्ग पर्यटन सफारी वाहन, सावंतवाडी दर्शन मनोरा, निसर्गमाहिती केंद्र अशा सुविधा अनुभवता येणार आहेत. सावंतवाडी वन विभागांतर्गत येणाऱ्या नरेंद्र वन उद्यान येथे सिंधुरत्न योजनेतून पर्यटनवाढीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या विविध निसर्गपर्यटन सुविधांचा अनुभव घेण्यासाठी सर्व सावंतवाडीकरांना आवाहन करण्यात येत आहे.
पर्यटकांना मोती तलावा शेजारी असलेल्या जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान ते नरेंद्र वन उद्यानापर्यंत जाण्यासाठी सफारी वाहनाने प्रवास करता येईल. नरेंद्र वन उद्यानामध्ये पोहोचल्यावर तिथे असलेला सावंतवाडी दर्शन मनोरा, निसर्ग माहिती केंद्र हे देखील पर्यटकांसाठी उपलब्ध असणार आहे.
सफारीचा मार्ग
येणार्या पर्यटकांना सावंतवाडी भोसले उद्यान ते नरेंद्र डोगर असे फिरविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे त्या ठिकाणी जाताना सावंतवाडीच्या मोती तलाव तसेच राजवाडा आदींची माहिती देवून शहराला वळसा घालून ही सफर थेट सालईवाडा गणपती मंदिर हॉलकडुन नरेंद्र डोंगरावर नेण्यात येणार आहे. त्या ठिकाणी जाताना सर्व झाडांची स्थानिक स्तरावर आढणारे प्राणी, पक्षी, बुरशी आदींची माहिती देण्यात येणार आहे. त्याच बरोबर त्या ठिकाणी जावून निसर्ग माहिती केंद्रांत सिंधुदुर्गात आणि सह्याद्री पट्ट्यात आढळून येणार्या प्राणी, पक्षी व फुले, फळे आदींची माहिती देण्यात येणार आहे.
वेळापत्रक
जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान ते नरेंद्र डोंगर प्रवास करण्यासाठी उपलब्ध असलेले सफारी वाहन प्रत्येक 2 तासाच्या अंतराने सकाळी 8 वाजता, 10 वाजता, 12 वाजता, दुपारी 2 वाजता, सायंकाळी 4 वाजता व शेवटची फेरी सायंकाळी 6 वाजता या वेळापत्रकानुसार सोडले जाईल.
शुल्क
या नरेंद्र डोंगर सफारीसाठी भोसले उद्यान ते नरेंद्र डोंगर सफारी चार्जेस, गाईड चार्जेस व निसर्ग माहिती केंद्र प्रवेश फी हे सर्व मिळून एकत्रितरित्या प्रौढांसाठी 100 रु. प्रति व्यक्ती तर 14 वर्षांखालील लहान मुलांसाठी 50 रु. शुल्क करण्यात येणार आहे. तरी सावंतवाडीकरांनी या निसर्ग पर्यटनाचा नक्की अनुभव घ्यावा असे सावंतवाडी वन विभागाकडून आवाहन करण्यात येत आहे.
कुडाळ:कोकणातील पारंपरिक दशवतार लोककलेस बळ मिळावे यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ३० दशावतार नाटक कंपन्यांना शासनातर्फे अनुदान देण्यात येणार आहे. सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून कंपन्यांना साहित्य आणि वाहन खरेदीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. याबाबतची मागणी शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी योजनेचे अध्यक्ष तथा मंत्री दीपक केसरकर आणि संचालक किरण उर्फ भैय्या सामंत यांच्याकडे केली होती. त्यानुसार संबधितांना अनुदान प्राप्त होणार आहे. याबाबतची माहिती श्री. पावसकर यांनी दिली आहे. त्यांनी हे अनुदान देणार्या योजनेच्या सर्व पदाधिकार्यांचे आभार मानले आहेत.
शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांच्याकडे दशावतार मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र नाईक यांनी दशावतार मंडळांसाठी साहित्य आणि वाहन खरेदीसाठी अनुदान मिळण्यासंदर्भात मागणी केली होती. श्री. पावसकर यांनी तातडीने या मागणीचे पत्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर व सिंधुरत्न समिती संचालक किरण सामंत यांच्या जवळ केली.
मंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हा प्रशासनाला ही मागणी तातडीने पूर्ण करण्यास सांगितले. जिल्हा प्रशासनाने याबाबतची अंमलबजावणी करून तत्काळ प्रस्ताव तयार करून मंजुरी देखील मिळाली
पनवेल : पनवेल स्थानक गर्दीचे स्थानक बनले आहे. या रेल्वेस्थानकात कधीही दुर्घटना घडू शकते अशी स्थिती निर्माण झाली आहे. हे वास्तव सध्या पनवेलच्या रेल्वे स्थानकामधील आहे. प्रवाशांना दररोज जिवमुठीत घेऊन या पादचारी पुलावरुन जावे लागते. गावी जाणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांसाठी आणि लोकलसाठी येथे वापरात असलेल्या पादचारी पुलांचे योग्य नियोजन केलेले नसल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन चेंगरा चेंगरी होण्याचा धोका आहे.
पनवेल रेल्वेस्थानक हे जंक्शन होत आहे. दररोज या स्थानकातून सूमारे सव्वा लाख प्रवासी प्रवास करतात. यातील पन्नास हजार प्रवासी नवीन पनवेल परिसरातून मुंबई, ठाणे व इतर उपनगरीय रेल्वे गाड्या पकडण्यासाठी या पादचारी पुलाचा वापर करतात. नवीन पनवेल व रेल्वेस्थानक जोडण्यासाठी सध्या हाच एक पुल प्रवाशांसाठी शिल्लक आहे. सध्या स्थानकात विस्तारीकरणाचे काम सूरु आहे. प्रवाशांना दररोज जिवमुठीत घेऊन या पादचारी पुलावरुन जावे लागते. एक्सप्रेसमधून उतरणा-या प्रवाशांना गर्दीतून पाठीवरील बोजा घेऊन मार्ग काढावा लागतो. या गर्दीचा भयानक अनुभव सध्या पनवेलचे रेल्वे प्रवासी घेत आहेत. पादचारी पुलावरील ही गर्दी टाळण्यासाठी हताश झालेल्या प्रवाशांनी रेल्वे रुळ ओलांडून बेकायदा व जिवघेणा प्रवास करत आहेत.
अशा वेळी दुर्घटना होण्याची शक्यता
पनवेल स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांसाठी सध्या ३ प्लॅटफॉर्म आहेत. कोणत्याही गाडीसाठी निश्चित असा प्लॅटफॉर्म नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. कित्येक प्रवासी बाहेरच्या प्लॅटफॉर्मवर किंवा पादचारी पुलावर गाडी येण्याची वाट पाहत असतात. अशा वेळी अचानक गाडीची घोषणा झाल्यावर चेंगरा चेंगरी होऊन दुर्घटना घडण्याची मोठी शक्यता आहे.
पनवेल रेल्वे स्थानकावर सायंकाळच्या वेळेला नोकरदार वर्गाची पादचारी पूल ओलांडण्यासाठी मोठी गर्दी होते. pic.twitter.com/3aQCT9xsMz
Mumbai Goa Highway: शिमग्याला गावाची ओढ ही प्रत्येकालाच आहे.पालखी नाचवायला , दारी येणाऱ्या देवाला साकडं घालयला कोकणकर सदैव आतुर असून गावाला जातोच. यंदाही मोठ्या प्रमाणात चाकरमानी सोयीचे पडेल त्या वाहतुकीच्या साधनाने गावी जायला निघेल. त्यात मुंबई गोवा महामार्गाने जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्याही खूप असेल. मात्र या महामार्गाने जाताना सावधपणे आणि काळजीपूर्वक वाहने चालवून आपल्या गावी जा असे आवाहन मुंबई गोवा महामार्गासाठी झटणाऱ्या जन आक्रोश समितीने चाकरमान्यांना केले आहे.
आजचा जमाना हा वेळची किंमत व भान ही बाळगतो . सुसाट प्रवास करणाऱ्या वाहनांचा महामार्गावर मोठया संख्येने वाढ झाल्याचे आपल्या निर्दशनास येत असेलचं. पूर्वीपेक्षा वाहतुकीचे प्रमाण वाढले असल्याने दळणवळण करणे जरी सोपे असले तरी यातून दुर्घटनेची एक मोठी समस्या निर्माण झाली आहे असे म्हणने चुकीचे ठरणार नाही. एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करण्यासाठी आपण आज मोटार वाहनाचा वापर करत असतो. त्यामुळे दळणवळण करणे सोपे झाले, परंतु काही लोक गाडी चालविताना वाहतुकीच्या नियमांचे उल्लघन करतात परिणामी दुर्घटना ही घडते
महामार्गाची सध्याची स्थिती
महामार्गावरील वाहतूकीचे प्रमाण वाढतच चालले आहे त्या अनुषंगाने वाहतुकीची समस्या देखील तितकीच भेडसावत आहे. मुंबई गोवा महामार्ग अजुन निर्माणधीण आहे त्यामुळे अजुनही हव्या त्या प्रमाणात जागोजागी वाहतुकी संबंधी नियम लिहिलेल्या पाट्या दिशादर्शक / दिशा परिवर्तन फलक उभारलेले नाहीत. जेणेकरून वाहकाचालकांना वाहन चालवितांना अडचणीचां सामना करवा लागतोय रात्रीच्या वेळेला वाहकाला रस्त्यावरील वळण कोणत्या दिशेला आहे ते समजण्यासाठी प्रयास करावे लागतात बोर्ड नसल्याने गाव किंवा ठिकाणे शोधावी लागत आहेत. तरी यावर उपाय म्हणजे आपण सर्वांनी मिळून जर वाहतुकीचे नियम योग्य प्रकारे अंमलात आणले तर दुर्घटनेचे प्रमाण कमी होईल.
तरी यावर उपाय म्हणजे आपण सर्वांनी मिळून जर वाहतुकीचे नियम योग्य प्रकारे अंमलात आणले तर दुर्घटनेचे प्रमाण प्रमाणत कमी होईल. त्यासाठी समितीने पुढाकार घेत रस्ते सुरक्षा अभियान करण्याचे ठरवले व त्याअभियानात वाहतुकीचे नियम पाळण्यास घोषवाक्य फलकांद्वारे जागृती करण्याचे योजले आहे जणे करून कोकणवासीय प्रवास करताना वेगमर्यादा व वाहतुक नियंमांचे पालन करत अपघातशुन्य व वाहतुक कोंडी न होता प्रवास करत शिमगा उत्साहात व धुमधडाक्यात साजरा करून मुंबई परतेल तरी जनआक्रोश समितीतर्फे आयोजित रस्ते सुरक्षा अभियानास सढळहस्ते सहकार्य करत एक फलक किमान आपल्या गावात महामार्गवर लावत जनजागृतीस सहयोग द्या असे आवाहन समिती मार्फत करण्यात आले आहे
Coastal Highway Updates :रेवस रेड्डी सागरी मार्गावरील सहा मोठ्या पुलांची कामे लवकरच सुरू होणार आहेत, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या पूलांच्या निविदा प्रसिध्द केल्या आहेत. यामुळे चार दशकांपासून रखडलेल्या पुलांच्या कामांना गती मिळणार असून सागरी मार्गही दृष्टीक्षेपात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून उभारण्यात येत असलेल्या रेवस-रेडी या सागरी मार्गावरील सुमारे १६५ किलोमीटरच्या रस्त्याचे चौपदरीकरण केले जाणार आहे. उर्वरित रस्ता दुपदरी असेल, तर शहरांच्या ठिकाणी बाह्य वळणे घेण्यात येणार आहेत. सागरी मार्गाला सलगता येण्यासाठी या सहा ठिकाणी नव्याने पूल उभारले जाणार आहेत. खालील ठिकाणे असे पूल उभारण्यात येणार असून त्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या पूलांच्या निविदा मागवल्या आहेत.
• कुंडलिका खाडीवरील रेवदंडा-सालाव – 3.8 किमी
• बाणकोट खाडीवर कोलमांडिया-वेश्वी – 1.7 किमी
• दापोली-गुहागर दाभोळ खाडीवर – 2.9 किमी
• जयगड खाडीवर तवसाळ-जयगड – 4.4 किमी
• काळबादेवी खाडीवरील पूल, रत्नागिरी – 1.8 किमी
• कुणकेश्वर, सिंधुदुर्गवरील पूल – 1.6 किमी
कोकणातील समुद्र किनाऱ्यांवरील गावे आणि शहरांना जोडणारा एक महामार्ग असावा, ज्यामुळे कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, यातून रोजगार निर्मिती होईल आणि आर्थिक सुबत्ता वाढेल. मुंबईतून तळ कोकणात जाण्याचे अंतर कमी होईल. हा मार्ग मुंबई गोवा महामार्गाला पर्यायी मार्ग ठरू शकेल. यासाठी बॅरीस्टर ए. आर. अंतुले यांनी १९८० मध्ये रेवस रेड्डी सागरी मार्गाची संकल्पना मांडली होती. मात्र या मार्गावरील मोठ्या पूलांची कामे रखडल्याने हा सागरी मार्ग पुर्णत्वास जाऊ शकला नाही.
आता मात्र या सागरी मार्गावरील पूलांची कामे मार्गी लागणार आहेत. राज्य सरकारने यासंदर्भातली पाऊले टाकण्यास सुरूवात केली आहे.