मुंबई: मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या मध्य रेल्वेच्या एसी लोकल (AC EMU) सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आणि वादात सापडल्या आहेत. रेल्वेचे उत्पन्न वाढवण्यासाठी एसी लोकलच्या डब्यांच्या बाहेरील भागावर करण्यात आलेल्या जाहिरातींमुळे प्रवाशांच्या त्रासात भर पडली आहे. विशेषतः ‘अरुण आईस्क्रीम’ (Arun Icecreams) च्या जाहिरातीसाठी वापरण्यात आलेल्या जाहिरातींच्या विनाइल रॅपिंगमुळे प्रवाशांना डब्यातून बाहेरचे काहीच दिसत नसल्याच्या तक्रारी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
नेमका प्रकार काय?
प्रसिद्ध पत्रकार आणि रेल्वे प्रवासी राजेंद्र बी. अकलेकर यांनी ट्विटरवर (X) काही फोटो शेअर करत हा गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार, सीएसएमटीहून सुटणाऱ्या रात्री २०:०० वाजताच्या कल्याण एसी लोकलच्या खिडक्यांवर इतक्या जाड थराचे विनाइल रॅपिंग करण्यात आले आहे की, खिडक्या पूर्णपणे अपारदर्शक (Opaque) झाल्या आहेत. यामुळे प्रवाशांना येणारे स्थानक किंवा प्लॅटफॉर्म ओळखणे कठीण होत आहे.
रेल्वे प्रशासनाचे स्पष्टीकरण आणि प्रवाशांचा संताप
या तक्रारीला उत्तर देताना DRM मुंबई (मध्य रेल्वे) यांनी सांगितले की, “एसी लोकलच्या डब्यांवर खिडक्यांसह विनाइल रॅपिंग करण्याची परवानगी आहे, मात्र आतून ८०% दृश्यमानता (Visibility) राखणे बंधनकारक आहे. जर दृश्यमानतेत काही अडथळा येत असेल, तर त्याची तपासणी करून दुरुस्ती केली जाईल.”
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या या तांत्रिक स्पष्टीकरणानंतर प्रवाशांमधील संताप कमी होण्याऐवजी अधिकच वाढला आहे. प्रवाशांच्या मते, रात्रीच्या वेळी परिस्थिती अत्यंत बिकट होते; दिवसा तरी प्रकाशाच्या जोरावर थोडीफार दृश्यमानता मिळते, परंतु रात्रीच्या काळोखात डब्यातून बाहेरचे स्थानक किंवा प्लॅटफॉर्म ओळखणे अशक्य होते. रेल्वेने ८० टक्के दृश्यमानतेचा जो दावा केला आहे, तो केवळ कागदावरच असून प्रत्यक्षात प्रवाशांना शून्याच्या बरोबरीने दिसत असल्याची टीका होत आहे. केवळ महसूल मिळवण्याच्या ‘लोभी’ वृत्तीपोटी प्रवाशांच्या सुरक्षिततेशी आणि सोयींशी तडजोड केली जात असल्याचा गंभीर आरोप करत, रेल्वेला प्रवाशांच्या हितापेक्षा जाहिरातींचे उत्पन्नच अधिक महत्त्वाचे वाटते का, असा सवाल संतप्त मुंबईकरांनी उपस्थित केला आहे.
प्रवाशांची मागणी
सोशल मीडियावर अनेक प्रवाशांनी “DRM साहेबांनी स्वतःच्या केबिनमधून बाहेर पडून प्रत्यक्ष पाहणी करावी,” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. जाहिरात लावणाऱ्या कंपन्यांच्या निकृष्ट कामामुळे (Poor Workmanship) सामान्य प्रवाशांना हा त्रास सहन करावा लागत आहे. ही समस्या तात्काळ सोडवून खिडक्यांवरील अडथळे दूर करावेत, अशी मागणी आता जोर धरत आहे.


