लोकसभेत खासदार अरविंद सावंत यांचा रेल्वे प्रश्नांवर जोरदार आवाज; कोकण रेल्वे दुहेरीकरणाची मागणी

   Follow us on        

नवी दिल्ली: लोकसभेत रेल्वे मंत्रालयाच्या २०२६-२७ च्या अनुदान मागण्यांवरील चर्चेदरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी मुंबईसह महाराष्ट्रातील प्रलंबित रेल्वे प्रश्नांवर जोरदार आवाज उठवला. सरकार एकीकडे बुलेट ट्रेन आणि हाय-स्पीड कॉरिडॉरच्या योजना जाहीर करत असताना सामान्य रेल्वे प्रवाशांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रातील विविध प्रलंबित प्रश्नांकडे रेल्वे मंत्रालयाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

भाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राजसिंहासनावर बसलेला पुतळा उभारण्यास प्रशासनाने नकार दिल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. केवडिया रेल्वे स्थानकावर सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारला जाऊ शकतो, तर सीएसएमटी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यास ‘नीती’चे कारण देऊन नकार का दिला जातो, असा सवाल करत प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेवर त्यांनी टीका केली.

तसेच मुंबईतील काही रेल्वे स्थानकांची ब्रिटीशकालीन नावे बदलण्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. निवडणुकीच्या काळात सँडहर्स्ट रोड, मरीन लाईन्स आणि चर्नी रोड या स्थानकांची नावे बदलल्याचे बॅनर लावण्यात आले होते; मात्र प्रत्यक्षात आजही ही नावे बदललेली नाहीत. याबाबत सरकार प्रत्यक्ष कृती कधी करणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

याशिवाय मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला भारतीय रेल्वेचे जनक नाना शंकरशेठ यांचे नाव देण्याची मागणी त्यांनी पुन्हा केली. तसेच मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेचे मुख्यालय असतानाही मुंबईकरांना अपेक्षित सुविधा मिळत नसल्याचे सांगत लोकल रेल्वेची वाढती गर्दी कमी करण्यासाठी ४ मार्गिकांचे ६ मार्गिकांमध्ये रूपांतर आणि ‘एलिव्हेटेड ट्रेन’ प्रकल्पावर गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

कोकण रेल्वेबाबतही त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. कोकण रेल्वे मार्गावर गाड्यांचा वारंवार होणारा विलंब आणि सणासुदीच्या काळात प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेता कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करावे आणि संपूर्ण मार्गाचे दुहेरीकरण करावे, अशी ठाम मागणी त्यांनी केली. कोकणच्या विकासासाठी बुलेट ट्रेनपेक्षा रेल्वे दुहेरीकरण अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे पालघर जिल्ह्यातील सपाडे परिसरातील घरांना तडे गेल्याचा मुद्दाही त्यांनी लोकसभेत मांडला. टनलसाठी होणाऱ्या स्फोटांमुळे १०० ते १५० घरांना मोठ्या भेगा पडल्या असून कंत्राटदारांकडून मिळणारी मदत अपुरी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच इंदूर-मनमाड रेल्वे प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला आणि त्यांच्या कुटुंबीयांना रेल्वेत नोकरी देण्याची मागणीही त्यांनी केली.

याशिवाय रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडेही त्यांनी लक्ष वेधले. मुंबईतील मोटरमन मोठ्या मानसिक तणावाखाली काम करत असून अनेक जण राजीनामे देत असल्याचे सांगत त्यांच्या केबिनमधील आवाजाची समस्या, कामाचे तास आणि कामाचा ताण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच रेल्वे ट्रॅकची सुरक्षा राखणाऱ्या गँगमन आणि खलाशी यांच्या समस्यांकडेही सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, असे त्यांनी नमूद केले.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search