Author Archives: Kokanai Digital

Mumbai-Goa Highway | पावसाळ्यात परशूराम घाटातील वाहतुक धोकादायक बनण्याची शक्यता

खुद्द राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनीही व्यक्त केली भीती


Mumbai-Goa Highway |परशुराम घाटातील चौपदरीकरण करण्यासाठी केले जात असलेले डोंगर कटाईचे काम अजून अपूर्ण आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असले तरी पावसाळ्यापूर्वी येथील काम पूर्णत्वास जाण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या घाटातील वाहतूक पावसाळ्यात हे काम चालू असेपर्यंत धोकादायक बनून येथे दरड कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. खुद्द राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनीही अशी भीती व्यक्त केली आहे.

डोंगर कटाईचे काम चालू असल्याने येथील काही भाग धोकादायक बनून पहिल्या पावसात केव्हाही दरड कोसळू शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. कंत्राटदार कंपनीस येथील काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. काम जलद गतीने होण्यासाठी मध्ये घाट काही काळासाठी बंद ठेवण्यात आला होता. मात्र डोंगर कटाई करताना मध्येच कठीण कातळ लागले होते. पायथ्याशी असलेल्या लोकवस्तीमुळे सुरक्षिततेच्या कारणाने या कातळ भागात सुरुंग लावण्याची परवानगी पण नाकारली गेली होती. यामुळे कामाचा वेग मंदावला होता. त्यामुळे दिलेल्या अवधीत हे काम पूर्ण झाले नाही.

पावसाळ्यात काम चालू असताना सावधानता म्हणुन कंत्राटदार कंपनीला योग्य ती खबरदारी घेण्यात यावी अशा सूचना देण्यात येतील. मात्र यावर्षीच्या पावसाळ्यातही वाहनधारकांसह प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊनच घाटातून प्रवास करावा लागणार आहे असे दिसत आहे.

दहावीचा निकाल उद्या दिनांक ०२ जूनला जाहीर होणार; ‘या’ वेबसाइटवर उपलब्ध होणार

SSC Result 2022-23| यंदा दहावीत बसलेल्या विद्यार्थी आणि पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण  मंडळाने घेतलेल्या दहावीचा SSC निकाल उद्या दिनांक ०२ जूनला जाहीर होणार आहे.

दहावीच्या मार्च – एप्रिल २०२३ परीक्षेत बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होणार आहेत.

कुठे पाहाल निकाल?

पुढील वेबसाइटवर पाहता येईल निकाल –

या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

असा पाहा निकाल

स्टेप १) दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा.
स्टेप २) दहावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा

स्टेप ३) तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरा.
स्टेप ४) दहावीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

राज्य राज्यातून एकूण १५,७७ लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली असून ५३३ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. माध्यमिक बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यामध्ये ८४ हजार ४१६ मुले असून ७३ हजार ६२ मुली आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च – एप्रिल २०२३ मध्ये या परीक्षा घेण्यात आल्या होत्या.

Mumbai Goa Highway | सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. श्री. रवींद्र चव्हाण यांना मुंबई-गोवा महामार्ग जन आक्रोश समितीतर्फे सविस्तर निवेदन

समितीच्या चिपळूण प्रतिनिधी ऍडव्होकेट स्मिता कदम यांनी महामार्गाची सद्य दुरावस्था व्यक्तिशः मांडली.  

 

Mumbai Goa Highway | सार्वजनिक बांधकाम मंत्रीमहोदय मा. श्री. रवींद्र चव्हाण यांच्या अलीकडच्या चिपळूण भेटीत मुंबई गोवा महामार्ग जन आक्रोश समितीच्या चिपळूण प्रतिनिधी ऍडव्होकेट स्मिता कदम यांनी भेट घेऊन सविस्तर निवेदनाचे पत्र दिले. मा. मंत्री महोदयांना भेटण्यापूर्वी ऍडव्होकेट स्मिता कदम यांनी  सार्वजनिक बांधकाम विभागाचे चिपळूण येथील शाखा अभियंता श्री. मराठे साहेब यांची भेट घेऊन समितीच्या पत्रामधील विषयावर सविस्तर चर्चा करून विषयाचे गांभीर्य समजवून सांगितले.  त्यामुळे मा. मंत्रीमहोदय हे सिंधुदुर्ग जिल्हयाचा दौरा करून चिपळूणला पोचल्यावर व्यस्त असूनही  केवळ समितीच्या प्रतिनिधी ऍडव्होकेट स्मिता कदम मॅडम आणि मीडियाचे प्रतिनिधीी  यांना वेळ दिला. ऍडव्होकेट स्मिता कदम यांनी  मा. मंत्रीमहोदयांना थोडक्यात विषयाचे गांभीर्य सांगताना समितीने केलेल्या पाठपुराव्यामुळे महामार्गाची प्रत्यक्ष परिस्थिती समजून आली आहे . मागील १३ वर्ष महामार्गाचे कामं रखडलं आहे आणि दरवेळी नवनवीन तारखाचे वायदे मिळत आहेत व ते वायदेही पाळले जात नाहीत. ३१ मे पूर्वी एक मार्गिका उपलब्ध करण्याचे आश्वासनही पूर्ण केलेले नाही. त्यामुळे या बाबतीत कोकणी जनतेच्या भावना तीव्र होत असून कोकणातील जनता नाराज आहे. समितीच्या पत्रात व सोबत जोडलेल्या जोडपत्रात निवड्क टप्प्यातील सत्य परिस्थिती सविस्तर मांडली आहे. या बाबतीत सर्व मुद्दे चर्चा करण्यासाठी संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्या बरोबर आपल्या उपस्थितीमध्ये मंत्रालयात मिटिंग लावली तर समितीचे प्रतिनिधी येऊन सविस्तर सांगतील, असे प्रतिपादन केले. ऍडव्होकेट स्मिता कदम यांच्या प्रश्नांना प्रतिसाद देताना मा. मंत्रिमहोदयांनी महामार्गाचे काम नोव्हेंबर मध्ये पूर्ण होईल आणि गणपतीपूर्वी किमान एक मार्गिका उपलब्ध होईल असे आश्वासन दिले.

मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसचे अंतिम वेळापत्रक जाहीर; ‘या’ स्थानकांवर मिळणार थांबा..

Mumbai Goa Vande Bharat Express |मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे हे निश्चित झाल्यापासून या एक्सप्रेसच्या वेळापत्रकाबाबत, थांब्यांबाबत या मार्गावरील प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उत्सुकता लागून राहिली होती. खासकरून या गाडीला कोणत्या स्थानकांवर थांबा मिळणार आहे याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मध्य रेल्वे प्रशासनाने एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केले असून त्यात या गाडीचे थांबे आणि वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे या गाडीच्या थांब्या बाबत असलेल्या प्रश्नांस उत्तर मिळाले आहे. 

या गाडीला दादर, ठाणे,पनवेल, रोहा, खेड, रत्नागिरी, कणकवली, थिवी ही स्थानके मिळाली आहेत.

नॉन मान्सून वेळापत्रकानुसार ही गाडी सकाळी 5 वाजून 25 मिनिटांनी ही एक्सप्रेस सिएसएमटी स्थानकावरून सुटणार आहे ती दुपारी 13.15 वाजता मडगाव या स्थानकावर पोहोचेल.

परतीच्या प्रवासात ती मडगाव स्थानकावरून दुपारी 14:35 वाजता सुटून सिएसएमटी स्थानकावर रात्री 22:25 वाजता पोहोचणार आहे.

कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस शुक्रवार वगळता सर्व दिवशी धावणार आहे

 

Block "ad1" not found

 

   

 

वंदे भारत एक्सप्रेसला खेड स्थानकावर थांबा मिळण्याचे संकेत…

Mumbai-Goa Vande Bharat Express |वंदे भारत एक्सप्रेसला खेड स्थानकावर थांबा देण्यात यावा यासाठी जल फाऊंडेशन आणि कोकण विकास समितीने कंबर कसली होती. या एक्सप्रेसला खेड तालुक्यात थांबा न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा पण या संघटनांनी दिला होता. त्याचा पाठपुराव्याला यश मिळणार असल्याचे दिसत आहे, कारण वंदे भारत एक्सप्रेसला या स्थानकावर थांबा मिळण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यादृष्टीने मंगळवारी खेड स्थानकावर रंगरंगोटी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

दिनांक ३ जून रोजी या गाडीला हिरवा कंदील दाखविला जाणार आहे. वंदे भारत एक्स्प्रेस CSMT हून सुटणार असून ती ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कुडाळ आणि त्यानंतर मडगाव अशी जाणार आहे. सिंधुदुर्गमध्ये जाणाऱ्यांसाठी कुडाळ तर रत्नागिरी आणि चिपळूणला जाणाऱ्यांसाठी रत्नागिरी खेड दोन थांबे आहेत अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. याबाबत अधिकृत माहिती रेल्वे मंत्रालयाकडून लवकरच देण्यात येईल अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

 

Mumbai Goa Vande Bharat : रेल्वे प्रशासनातर्फे उद्घाटनाची नवीन तारीख जाहीर

Mumbai-Goa Vande Bharat : सर्व कोकणवासीयांना उत्सुकता लागून राहिलेल्या मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेस च्या उद्घाटनाची  नवीन तारीख रेल्वे प्रशासनाने जाहीर केली आहे. शनिवारी दिनांक ३ जून रोजी मडगाव स्थानकावरून या गाडीला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले जाणार आहे. 
“आमच्याकडे या आधीच आठ डब्यांचा नवा कोरा रेक चेन्नई वरून आला आहे. उद्घाटनाची सर्व तयारी झाली असून शनिवार दिनांक ३ जून रोजी मडगाव स्थानकावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून उदघाटन करतील. या प्रसंगी गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित राहणार आहेत. मुंबई ते गोवा दरम्यान वंदे भारत गाडी सर्वात जलद गाडी ठरणार आहे. हे अंतर कापण्यास तिला फक्त ७ तास लागणार आहेत. या गाडीचे वेळापत्रक आणि थांबे लवकरच जाहीर होणार असून दिनांक ५ जूनपासून ही गाडी या मार्गावर नियमित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जात आहे.” असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. 
या आधी २९ मे रोजी वंदे भारत एक्सप्रेस ला हिरवा झेंडा दाखविला जाणार असल्याची माहिती समोर आली होती. दिनांक २८ मे रोजी नवा कोरा रेक मडगाव स्थानकावर दाखल झालाही होता, मात्र काही कारणाने ही तारीख पुढे ढकलण्यात आली असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले होते. मात्र आता पुढे आलेली नवीन तारीख रेल्वेतर्फे पाळली जाईल अशी आशा आहे. 

शेतमाल तारण योजना; काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी योजना

रत्नागिरी : ऐन हंगामात कोणतेही कृषी उत्पादन एकाचवेळी मोठ्या प्रमाणात बाजारात आल्यास दर कोसळतात, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. पैशाची निकड असल्याने कमी बाजारभावात उत्पादन विकून त्याला मोठा होतो. यावर उपाय म्हणून रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती Ratnagiri District Agricultural Produce Market Committee व महाराष्ट्र कृषी पणन मंडळ यांच्या संयुक्तपणे दर वर्षी जिल्ह्यात काजू बी Cashew Nut Mortgage Scheme शेतमाल तारण योजना राबवित असते.

ज्या शेतकऱ्यांना पडलेल्या भावात काजू न विकता तारण ठेवायचे आहेत त्यांना हे काजू तारण ठेवून वार्षिक सहा टक्के व्याजदराने कर्ज बाजारभावाच्या कमाल ७५ टक्के रक्कम तारण कर्ज दिले जाते. यासाठी कालमर्यादा सहा महिने (१८० दिवस) एवढी आहे. शेतमाल तारण योजनेत सहभागी होण्यासाठी पीक नोंदणीचा सातबारा, आधारकार्ड, बँक खात्याचा तपशील जोडणे अनिवार्य आहे. तसेच काजू बीची आर्द्रता ५ टक्के असणे अपेक्षित आहे. या योजनेंतर्गत यावर्षी आतापर्यंत १७.५ टन काजू बी तारण ठेवण्यात आला असून, १३ लाखांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे.

सध्या ९० रुपये दर सुरू आहे. पावसाळा तोंडावर असल्याने भाव आणखी गडगडण्याची शक्यता आहे. अशावेळी शेतमाल तारण योजना फायदेशीर ठरते. हंगामाच्या प्रारंभी काजूला चांगला दर मिळतो; मात्र जसजशी आवक वाढते, तसेतसे भाव गडगडतात. आता तर हंगाम संपत आला आहे. त्यामुळे दरात घसरण सुरू झाली आहे. आधीच उत्पादन कमी आहे. त्यातच काजू कमी किमतीत विकणे परवडणारे नाही. त्याऐवजी तारण ठेवणे शक्यआहे

प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना कन्फर्म तिकीट द्या – खा. विनायक राऊत.

मुंबई – गणेशोत्सवानिमित्त मुंबई, ठाणे, नवी मुंबईतून गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वे मार्गावर 350 जादा गाड्या सोडण्याची मागणी काल शिवसेनेच्या (उबाठा) शिष्टमंडळाने मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेऊन केली आहे.
गणेशोत्सव काळात मुंबई, ठाणे या ठिकाणावरून चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणात गावी जातात, मात्र अनेक भाविकांच्या हाती रेल्वेचे तिकीट लागले नाही आहे. अनेकांची प्रतीक्षा यादी मध्ये आरक्षण केले नाही आहे अशा प्रवाशांच्या सोयीसाठी ३५० जादा गाड्या सोडून  मध्ये सध्या प्रतीक्षा यादीत असलेल्या प्रवाशांना कन्फर्म तिकीट द्या अशी मागणी या शिष्टमंडळाने यावेळी केली. शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश ललवाणी यांची भेट घेत चाकरमान्यांना रेल्वेचे तिकीट काढताना येणाऱ्या आडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आणले. तसेच दलालांच्या रॅकेटमुळे गाडीचे बुकिंग सुरू होताच फुल होत असल्याची बाब निदर्शनास आणत कारवाईची मागणी केली. 

आरपीएफची अवैध तिकीट आरक्षणाविरोधात मोठी कारवाई | ७१ तिकीट दलालांवर गुन्हे दाखल; २६ लाख रुपयांची तिकिटे जप्त

मुंबई : पश्चिम रेल्वेच्यारेल्वे सुरक्षा दलाने मे महिन्यात ७१ तिकीट दलालांना पकडले आहे. त्यांच्याकडून २६ लाखांची तिकिटे जप्त केली आहेत. अनधिकृत दलालांकडून लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मोठ्या प्रमाणात आरक्षण केले जाते. त्यामुळे सामान्य प्रवाशांना तिकीट उपलब्ध होत नाही.

ई-तिकीट आणि खिडकी तिकिटांच्या विरोधात विशेष मोहिमेत अंधेरी येथे एका दलालाला अटक केली. तसेच साकी नाका परिसरात रेल्वे तिकिटांची अवैध विक्री होत असल्याची माहिती आरपीएफला मिळाली. १५ मे रोजी आरपीएफ आणि दक्षता विभागाचे संयुक्त पथक तयार केले. या पथकाने अलीम खान याच्याकडून १ लाख ३ हजार ९८५ किमतीची १४ जर्नी कम रिझर्व्हेशन तिकिटे ताब्यात घेऊन अंधेरी आरपीएफ ठाण्यात गुन्हा दाखल केला. अधिक चौकशी केली असता अलीम खानने सोबत अफजल नफीस खान काम करीत असल्याचे सांगितले. अफजल नफीस खान खास २२ मे रोजी आरपीएफने ताब्यात घेतल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली.

६३ गुन्हे दाखल

दलालांमुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होते. हीच बाब निदर्शनास आल्याने १ ते २७ मेदरम्यान आरपीएफने ७१ तिकीट दलालांवर ६३ गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून २६ लाख ६१ हजार ३१० रुपयांची ई-तिकिटे जप्त केली.

वंदे भारत एक्सप्रेसला सावंतवाडी टर्मिनस येथे थांबा देण्यात यावा – अर्चना घारे, राष्ट्रवादी काँग्रेस कोकण महिलाध्यक्ष

सिंधुदुर्ग | सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे मुंबई – गोवा वंदे भारत एक्सप्रेसला थांबा मिळावा तसेच सावंतवाडी टर्मिनसच्या रखडलेल्या कामात लक्ष घालण्याची मागणी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस कोकण महिलाध्यक्ष अर्चना घारे यांनी केली आहे. 
सीएसएमटी ते मडगाव या मार्गावर नव्याने वंदे भारत एक्सप्रेस सुरू होत आहे. कोकण रेल्वेच्या वतीने सुरू करण्यात येणाऱ्या या वंदे भारत एक्सप्रेसमुळे मुंबई ते गोवा हा प्रवास अवघ्या ७ तासात पूर्ण करता येणार आहे. या वंदे भारत एक्सप्रेसला ठाणे,चिपळूण ,रत्नागिरी व कुडाळ हेच थांबे देण्यात आले आहेत. मात्र सावंतवाडी सारख्या तळकोकणातील महत्त्वाच्या स्थानकावर मात्र या गाडीला थांबा देण्यात आलेला नाही.आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ही बाब आदरणीय रेल्वेमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिल्यास सावंतवाडी परिसरातील नागरिकांची होणारी गैरसोय टळणार आहे.तसेच सावंतवाडी हे या रेल्वे मार्गातील प्रमुख स्टेशन असून, परिसरातील पर्यटन स्थळाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे.परंतु सावंतवाडी येथील रेल्वे टर्मिनसचे काम गेल्या ५-६ वर्षांपासून प्रलंबित आहे.तसेच टर्मिनस 2 चे विस्तारीकरणाचे काम देखील प्रलंबित आहे.परिणामी या मार्गावर धावणाऱ्या २५-३० रेल्वे गाड्यांपैकी अवघ्या ९-१० गाड्या सध्या येथे थांबत आहे यामुळे लांबच्या प्रवाशांची संख्या कमी होत असून यामुळे स्थानकाचा दर्जा देखील कमी होण्याची भीती आहे.तरी संबंधित प्रश्नाबाबत आपण सन्माननीय रेल्वे मंत्र्यांना समवेत चर्चा केल्यास सावंतवाडी रेल्वे स्टेशनचे काम पुन्हा पूर्ववत सुरू होऊ शकेल व सावंतवाडी परिसरातील नागरिकांची, पर्यटकांची मोठी गैरसोय दूर होईल , अशी मागणी देखील केली आहे. 
यावेळी बोलताना आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,” सावंतवाडी रेल्वे स्टेशनचे टर्मिनल दुरुस्तीचे काम तसेच वंदे भारत एक्सप्रेसला थांबा मिळण्याची मागणी हे दोन्ही अत्यंत आवश्यक व तातडीचे कामे आहेत. याबाबत आपण स्वतः सन्माननीय रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असून लवकरच सावंतवाडी परिसरातील नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी मी प्रयत्न करणार आहे”.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search