तात्काळ तिकिटांसाठी कंटाळवाण्या रांगेची झंझट मिटली! बुकिंगसाठी ‘Q-Mitra’ डिजिटल प्रणाली कार्यान्वित

   Follow us on        

मुंबई:रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. तात्काळ तिकीट बुकिंगदरम्यान रेल्वे स्थानकांवर होणारी प्रचंड गर्दी, तिकिटांचा काळाबाजार करणारे दलाल आणि फेक आयडीचा (बनावट ओळखपत्र) होणारा गैरवापर यामुळे सामान्य प्रवासी नेहमीच त्रस्त असायचे. या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी भारतीय रेल्वेने आता ऑफलाइन तात्काळ तिकीट बुकिंग अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि दलालमुक्त करण्यासाठी ‘Q-Mitra’ नावाची एक आधुनिक डिजिटल प्रणाली सुरू केली आहे. या नवीन आणि प्रगत सिस्टीममुळे आता फक्त खऱ्या आणि गरजू प्रवाशांनाच तात्काळ तिकीट मिळवणे शक्य होणार आहे.

​दलालांच्या नवीन युक्त्यांवर रेल्वेचा कडक प्रहार

​भारतीय रेल्वेने यापूर्वी ऑनलाइन तात्काळ तिकीट बुकिंगमधील गैरप्रकार रोखण्यासाठी ‘आधार आधारित ओटीपी’ (Aadhaar-based OTP) प्रणाली लागू केली होती. यामुळे ऑनलाइन तिकीट बुकिंग अधिक सुरक्षित झाले आणि फेक अकाउंट्सद्वारे मोठ्या प्रमाणावर तिकिटे बुक करणाऱ्या दलालांवर काही प्रमाणात आळा बसला. मात्र, ऑनलाइन सिस्टीम कडक होताच अनेक दलालांनी आपला मोर्चा ऑफलाइन तिकीट काउंटरकडे वळवला होता. काउंटरवर बनावट ओळखपत्रांच्या आधारे तात्काळ तिकीट मिळवण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढू लागले होते. याच पार्श्वभूमीवर रेल्वेने ऑफलाइन काउंटरवरील गैरव्यवहार पूर्णपणे संपवण्यासाठी हे ‘Q-Mitra’ नावाचे मोठे पाऊल उचलले आहे. सध्या या प्रणालीची प्रायोगिक तत्त्वावर चाचणी (Testing) बिहारमधील ‘बेगुसराय’ रेल्वे स्थानकावर सुरू करण्यात आली आहे. हे स्थानक पूर्व मध्य रेल्वेच्या सोनपूर विभागांतर्गत येते. तेथे ऑफलाइन तात्काळ तिकीट बुकिंगसाठी ‘Q-Mitra’ प्रणाली लागू करण्यात आली असून, दलालांना रोखण्यात मोठे यश मिळत असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

​नेमकी काय आहे ‘Q-Mitra’ सिस्टीम आणि ती कशी काम करणार?

​’Q-Mitra’ ही एक स्मार्ट डिजिटल टोकन प्रणाली आहे. तात्काळ काउंटरवर होणारी अव्यवस्थित गर्दी नियंत्रित करणे आणि प्रवाशाची खरी ओळख पडताळूनच तिकीट देणे हा या सिस्टीमचा मुख्य उद्देश आहे.

​नोंदणी प्रक्रिया: या प्रणाली अंतर्गत तात्काळ तिकीट हवे असलेल्या प्रवाशाला सर्वप्रथम आपला वैध मोबाईल नंबर आणि आधार कार्ड वापरून नोंदणी करावी लागेल. विशेष म्हणजे, एका आधार कार्ड आणि एका मोबाईल नंबरवर केवळ एकच टोकन दिले जाणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तिकिटे बुक करणाऱ्या दलालांसमोर आता मोठा अडथळा निर्माण होणार आहे.

​डिजिटल टोकन वितरण: तात्काळ तिकीट काउंटर सुरू होण्याच्या काही वेळ आधी प्रवाशाच्या नोंदणीकृत मोबाईलवर एक क्यूआर कोड (QR Code) असलेले ‘डिजिटल टोकन’ पाठवले जाईल.

​बायोमेट्रिक आणि फेस ऑथेंटिकेशन: हे डिजिटल टोकन घेऊनच प्रवाशाला तिकीट काउंटरवर जावे लागेल. तिथे मशीनद्वारे प्रवाशाचे बायोमेट्रिक आणि फेस ऑथेंटिकेशन (चेहरा पडताळणी) केले जाईल. आधार कार्डवरील फोटो आणि काउंटरवर उभ्या असलेल्या प्रत्यक्ष व्यक्तीचा चेहरा तंतोतंत जुळल्यानंतरच तिकीट दिले जाईल. या कडक प्रणालीमुळे फेक आयडी, बनावट नाव किंवा इतरांच्या कागदपत्रांवर तिकीट लाटण्याचे प्रकार आता जवळपास अशक्य होणार आहेत.

​प्रवाशांना मिळणारे इतर मोठे फायदे

​सामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी ‘Q-Mitra’ सिस्टीममध्ये हिंदी आणि इंग्रजीसह अनेक प्रादेशिक भाषांचा सपोर्ट देण्यात आला आहे, जेणेकरून प्रत्येकाला ही सिस्टीम सहज समजेल. याशिवाय, वातानुकूलित (AC) आणि विना-वातानुकूलित (Non-AC) तिकिटांसाठी स्वतंत्र टोकन व स्वतंत्र रांगेची (Queue) व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रणालीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही सिस्टीम इंटरनेटशिवायही कार्य करू शकते, ज्यामुळे तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही. रेल्वेच्या या नव्या उपक्रमामुळे सामान्य प्रवाशांना तिकिटासाठी तासन्तास रांगेत उभे राहण्याच्या त्रासातून मोठी सुटका मिळणार असून, तात्काळ तिकीट बुकिंग प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.

Facebook Comments Box

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५३ पूरबाधित आणि ११० दरडप्रवण गावे; आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज

   Follow us on        

कणकवली:यंदाच्या पावसाळ्यात संभाव्य आपत्ती निवारणासाठी सिंधुदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ, दरड कोसळणे, वीज पडणे आणि आग यांसारख्या संभाव्य धोक्यांच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत-परूळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाळ्यातील संभाव्य आपत्तींचा सामना करण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींसह सर्व विभागांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक विभाग, तालुकास्तर आणि ग्रामपातळीवर आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्यात आले असून जिल्ह्यातील एकूण ८९९ इतके मनुष्यबळ तैनात ठेवण्यात आले आहे.

​सिंधुदुर्ग जिल्ह्यात १४ वर्षांचे सरासरी पर्जन्यमान ३,४६८.३८ मी.मी. असून दरवर्षी पावसाळ्यात येथील नागरिकांना विविध नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. यंदा जिल्ह्यात एकूण ५३ पूरबाधित गावे निश्चित करण्यात आली आहेत, ज्यामध्ये दोडामार्ग-११, वेंगुर्ले-६, सावंतवाडी-९, कुडाळ-५, मालवण-६, देवगड-४, कणकवली-६ आणि वैभववाडी-६ अशी गावे समाविष्ट आहेत. तसेच ११० गावे दरडप्रवण (दरड कोसळण्याची शक्यता असलेली) म्हणून घोषित करण्यात आली असून, यात दोडामार्ग १३, सावंतवाडी-१५, वेंगुर्ले-१२, मालवण-९, कणकवली-१३, देवगड-१७ आणि वैभववाडी-१२ गावांचा समावेश आहे. या सर्व गावांना आधीच सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

​या आपत्ती व्यवस्थापनासाठी ८९९ प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध असून, त्यात एनडीआरएफ पथक-२० (१ जुलै ते ३० सप्टेंबर), आपदा मित्र-२००, युवा आपदा मित्र-६६, गृहरक्षक-१३९, नागरी संरक्षण स्वयंसेवक-४३४ आणि विविध स्थानिक रेस्क्यू ग्रुप जसे की आंबोली व सांगेली रेस्क्यू ग्रुप-२०, सह्याद्री जीव रक्षक करूळ-२० आणि जय बालाजी रेस्क्यू ग्रुप मालवण-१० यांचा समावेश आहे. याशिवाय, जिल्हा प्रशासनाने बचावासाठी १०१८ लाईफ जॅकेट्स, ६१३ लाईफ बोया, ३७ बोट, १३ रोबोटिक वॉटरक्राफ्ट, १२६ स्ट्रेचर, ८७ सेफ्टी रोप्स, १३ टेंट, १५ सॅटेलाईट फोन आणि ६८ वॉकी टॉकी अशी अत्याधुनिक उपकरणे देखील सज्ज ठेवली आहेत.

Facebook Comments Box

वसई-विरार मेट्रो लाइन १३ च्या संरेखनाला विरोध

   Follow us on        

विरार: वसई-विरार क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र सरकारला पत्र लिहून प्रस्तावित मेट्रो लाइन १३ च्या संरेखनाचा निषेध व्यक्त केला आहे. कार्यकर्त्यांचा मुख्य आक्षेप असा आहे की, सदर संरेखनामुळे पश्चिम पट्ट्याकडे (वेस्टर्न बेल्ट) पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले असून, केवळ पूर्वेकडील भागांना प्राधान्य दिले जात आहे.

कार्यकर्त्यांनी सरकारला दोन टप्प्यातील सुधारित मार्गाचा प्रस्ताव सादर केला आहे. पहिल्या टप्प्यात भाईंदर ते नायगाव वेस्ट, नालासोपारा, विरार वेस्ट आणि ग्लोबल सिटीपर्यंत मार्गिका प्रस्तावित करण्यात आली आहे. तर दुसऱ्या टप्प्यात विरार पूर्व आणि नायगाव पूर्व भाग जोडण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण क्षेत्राला संतुलित आणि न्याय्य जोडणी मिळेल, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, भाईंदर-विरार मेट्रो प्रकल्पाची एकूण किंमत १७,७२४ कोटी रुपये इतकी आहे. रहिवाश्यांच्या विस्थापना कमी करण्यासाठी ३.२५ किलोमीटर लांबीचा भूमिगत (अंडरग्राउंड) भाग समाविष्ट करून सुधारित डीपीआर (Detailed Project Report) तयार करण्यात आला आहे. सध्या या प्रस्तावावर सरकार विचार करत असताना कार्यकर्त्यांचा हा विरोध प्रकल्पाच्या अंतिम स्वरूपावर परिणाम करणारा ठरू शकतो.

🌏 आपली जाहिरात लाखो वाचकापर्यंत पोहोचवा. जाहिरातीचा स्लॉट बूक करण्यासाठी संपर्क – 9356968462

 

 

 

 

 

Facebook Comments Box

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाडीच्या ४ फेऱ्या; परतीच्या प्रवाशांना मोठा दिलासा

   Follow us on        

रत्नागिरी:उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने मडगाव ते पनवेल दरम्यान विशेष साप्ताहिक ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी संख्या ०११०६/०११०५ मडगाव-पनवेल-मडगाव साप्ताहिक विशेष (TOD) या गाडीच्या दोन्ही दिशांनी मिळून एकूण ४ फेऱ्या होणार आहेत. या विशेष गाडीमुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

​या वेळापत्रकानुसार, गाडी संख्या ०११०६ मडगाव-पनवेल विशेष ट्रेन मडगाव येथून रविवार, दिनांक २४ मे २०२६ आणि ३१ मे २०२६ रोजी दुपारी १६:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी (सोमवारी) पहाटे ०४:०० वाजता पनवेल येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात, गाडी संख्या ०११०५ पनवेल-मडगाव विशेष ट्रेन सोमवार, दिनांक २५ मे २०२६ आणि ०१ जून २०२६ रोजी पनवेल येथून पहाटे ०५:४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी १८:१० वाजता मडगाव येथे पोहोचेल.

​ही ट्रेन २३ आयसीएफ (ICF) कोचच्या संरचनेसह धावणार असून, यामध्ये ११ स्लीपर क्लास, ३ थर्ड एसी (3A), ७ जनरल आणि २ एसएलआर (SLR) डब्यांचा समावेश असेल. मध्य रेल्वे (CR) क्षेत्रात या गाडीला रोहा, पेण आणि पनवेल या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. याशिवाय करमळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड आणि माणगाव या स्थानकांवरही ही ट्रेन थांबणार आहे. या विशेष गाड्यांमुळे कोकणात जाणाऱ्या आणि मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे

 

Facebook Comments Box

Mumbai Goa Highway: “अपूर्ण रस्त्यावर पूर्ण टोल वसुली”

   Follow us on        

रायगड, २१ मे २०२६: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (NH-66) चे काम १७-१८ वर्षांपासून रखडले असताना आणि अनेक भाग अजूनही अपूर्ण असताना खारपाडा टोल प्लाझावर टोल वसुली सुरू करण्यात आल्याने कोकणवासीयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अपूर्ण रस्ते, खड्डे आणि खराब गुणवत्तेमुळे होणारे अपघात या पार्श्वभूमीवर ही टोल वसुली अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

रायगड जिल्ह्यातील खारपाडा टोल प्लाझावर १७ मे २०२६ पासून टोल वसुली सुरू झाली. फास्टॅगद्वारे वाहनांमधून पैसे कापले जाऊ लागले आहेत. मात्र, पेन ते माणगाव, इंदापूर बायपास, उड्डाणपुल, सर्व्हिस रोड्स आणि इतर अनेक महत्त्वाचे भाग अजूनही अपूर्ण आहेत. प्रवाशांना खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांवरून, डाव्हर्सनमधून आणि अपूर्ण बायपासवरून प्रवास करावा लागत आहे.

अपघातांची मालिकारायगड विभागातील NH-66 वर २०२२ ते २०२४ दरम्यान झालेल्या अपघातांच्या आकडेवारीनुसार अनेक जीव गमावले गेले आहेत. अपूर्ण रस्ते, अचानक डाव्हर्सन, खराब पृष्ठभाग आणि रात्रीच्या वेळी अपुरी प्रकाश व्यवस्था यामुळे अपघात वाढले आहेत. कोकणातील अनेक कुटुंबे या महामार्गामुळे वेदनेत आहेत. गेल्या काही वर्षांत २४०० हून अधिक लोकांचा या महामार्गावर अपघातात मृत्यू झाल्याचे आकडे उपलब्ध आहेत.

रायगड प्रेस क्लबने या टोल वसुलीला “अन्यायकारक” ठरवत त्वरित स्थगित करण्याची मागणी केली आहे. उद्या आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. स्थानिक कार्यकर्ते चैतन्य पाटील यांनी कवींना आवाहन करत कवितेद्वारे या मुद्द्यावर विरोध व्यक्त करण्याचे आवाहन केले आहे. “रस्ता अपूर्ण, तरी टोल पूर्ण?” असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या कविता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सरकारचे आश्वासन आणि वास्तवकेंद्र आणि राज्य सरकारने महामार्गाचे पूर्ण काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात काम ९३% पूर्ण झाले असल्याचे सांगितले जात असले तरी रायगड आणि रत्नागिरीतील अनेक गंभीर भाग अजूनही बाकी आहेत. आता पूर्णत्व २०२७ पर्यंत ढकलले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रवासी आणि स्थानिक व्यापारी म्हणतात, “प्रथम पूर्ण रस्ता द्या, मग टोल घ्या.” अपूर्ण महामार्गावर पूर्ण टोल आकारणी ही प्रवाशांची लूट असल्याची भावना व्यक्त होत आहे. गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी ही परिस्थिती अधिकच कठीण ठरणार आहे.

कोकणवासीयांकडून आंदोलन, सोशल मीडियावर तीव्र विरोध आणि कविता-प्रतिबंध यांचा मेळ घालून हा मुद्दा अधिक तीव्र होत चालला आहे. NHAI आणि संबंधित विभागाकडून लवकरात लवकर स्पष्टीकरण आणि अपूर्ण काम पूर्ण करण्याची मागणी जोर धरत आहे.


 

 

 

 

 

 

Facebook Comments Box

‘आयएनएस गुलदार’ अरबी समुद्रात विसावली; सिंधुदुर्गात साकारणार देशातील पहिले पाण्याखालील संग्रहालय आणि पर्यटन केंद्र

   Follow us on        

सिंधुदुर्ग:भारतीय नौदला सेवेतून निवृत्त झालेली ‘आयएनएस गुलदार’ (INS Guldar) ही युद्धनौका महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विकास महामंडळाने (MTDC) सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील निवती रॉक जवळ यशस्वीरित्या समुद्रात बुडवली आहे. सुमारे २० ते २२ मीटर खोल समुद्राच्या तळाशी ही नौका आता विसावली असून, याद्वारे भारतात पहिल्यांदाच पाण्याखालील युद्धनौका संग्रहालय, कृत्रिम प्रवाळ (Artificial Coral Reef) आणि पाणबुडी (Submarine) पर्यटनाचा अनोखा प्रकल्प साकारला जात आहे. १९ मे रोजी विजयदुर्गजवळ अत्यंत काळजीपूर्वक आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली तब्बल ३६ तासांच्या अथक परिश्रमानंतर ही मोहीम फत्ते करण्यात आली. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे नौदल वारशाचे जतन करत सागरी पर्यटनाला चालना देणारा हा केवळ भारतातीलच नव्हे, तर संपूर्ण आशियातील पहिलाच अभिनव उपक्रम ठरला आहे.

​जवळपास चार दशके भारतीय नौदलात शौर्य गाजवणारी कुंभीर-श्रेणीतील ही लँडिंग शिप १२ जानेवारी २०२४ रोजी सेवेतून निवृत्त झाली होती. त्यानंतर फेब्रुवारी २०२५ मध्ये नौदलाने ही नौका महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे विनामूल्य सुपूर्द केली. नौका समुद्रात विलीन करण्यापूर्वी तिची पूर्णपणे स्वच्छता करण्यात आली आणि सागरी पर्यावरणाला तसेच जलचरांना कोणताही धोका पोहोचू नये म्हणून त्यातील सर्व घातक व रासायनिक पदार्थ काढून टाकण्यात आले. मुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या सहकार्याने MTDC चे व्यवस्थापकीय संचालक निलेश गथाणे आणि त्यांची टीम या प्रकल्पावर काम करत आहे.

​हा प्रकल्प पुढील दीड वर्षात पर्यटकांसाठी पूर्णपणे खुला होण्याची शक्यता आहे. एकदा हा प्रकल्प सुरू झाला की, पर्यटकांना ‘पॅडी’ (PADI) प्रमाणित डायव्हर्सच्या मार्गदर्शनाखाली समुद्रात स्कुबा डायव्हिंग करून या खऱ्याखुऱ्या युद्धनौकेचा थरार जवळून अनुभवता येईल. तसेच ज्यांना पाण्यात उतरणे शक्य नाही, त्यांच्यासाठी विशेष पाणबुडी (Submarine) पर्यटनाची सोय केली जाणार आहे, जेणेकरून सुरक्षितपणे या ऐतिहासिक नौकेचे दर्शन घेता येईल. या जहाजाच्या अवशेषांवर हळूहळू वनस्पती, मासे आणि प्रवाळांची वाढ होऊन त्याचे रूपांतर एका मोठ्या कृत्रिम बेटासारख्या परिसंस्थेत होईल, ज्यामुळे सागरी जीवनाला मोठा फायदा होईल. या ऐतिहासिक आणि साहसी प्रकल्पामुळे कोकण किनारपट्टीवरील पर्यटनाला मोठी गती मिळणार असून, स्थानिक कोळी बांधव आणि तरुणांसाठी रोजगाराच्या अनेक नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

🌏 आपली जाहिरात लाखो वाचकापर्यंत पोहोचवा. जाहिरातीचा स्लॉट बूक करण्यासाठी संपर्क – 9356968462

Facebook Comments Box

​कोकण रेल्वेकडून मान्सूनपूर्व कामांना सुरुवात; गाड्यांच्या वक्तशीरपणावर परिणाम होण्याची शक्यता

   Follow us on        

मंगळूर:कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (KRCL) प्रवाशांची सुरक्षा आणि रेल्वे सेवा सुरळीत ठेवण्याच्या उद्देशाने मान्सूनपूर्व ट्रॅक तपासणी तसेच प्रतिबंधात्मक कामांना सुरुवात केली आहे. कोकण रेल्वेचा मार्ग एकेरी (सिंगल-लाईन) असून या मार्गावर गाड्यांची वर्दळ खूप जास्त असते, त्यामुळे याचे व्यवस्थापन अत्यंत काटेकोरपणे करावे लागते. हा रेल्वे मार्ग अत्यंत खडतर भूप्रदेश आणि मुसळधार पावसाच्या क्षेत्रातून जात असल्याने, रेल्वेच्या पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यासाठी सध्या विविध तांत्रिक व अभियांत्रिकी कामे वेगाने केली जात आहेत.

​या मान्सूनपूर्व कामांमध्ये कटिंग लोअरिंग (डोंगराचे कडे कमी करणे), बीएलटी (BLT) दुरुस्ती, ट्रॅक लिफ्टिंग, डीप स्क्रीनिंग, थ्रू-ट्रॅक नूतनीकरण आणि पीक्यूआरएस (PQRS) देखभालीचा समावेश आहे. ट्रॅकची क्षमता आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी ही कामे केली जात आहेत. या दुरुस्तीच्या कामांमुळे मार्गावर तात्पुरते गती निर्बंध (स्पीड रिस्ट्रिक्शन्स) आणि ब्लॉक घेतले जाऊ शकतात, ज्यामुळे गाड्यांना काही प्रमाणात उशीर होण्याची शक्यता आहे. कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश मान्सूनपूर्व कामे मे महिन्याच्या अखेरीस पूर्ण केली जातील, त्यानंतर गाड्यांच्या वक्तशीरपणात सुधारणा होईल. प्रवाशांनी वेळापत्रकातील बदलांची माहिती मिळवण्यासाठी स्टेशनवरील घोषणा, इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले, अधिकृत वेबसाइट आणि मोबाईल ॲप्सचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Facebook Comments Box

“जीव गेला तरी जमीन विकणार नाही” शिरशिंगेवासीयांनी जमीन मोजणी हाणून पाडली

   Follow us on        

सावंतवाडी:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील, कोकणाचे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरशिंगे गावात सामूहिक जमिनी हडप करण्याचा बाहेरच्या धनदांडग्यांचा कुटील डाव ग्रामस्थांनी एकजुटीने हाणून पाडला आहे. गावातील श्रीदेवी पाहुणाई रवळनाथ मंदिरामध्ये गावातील सर्व मानकरी, ग्रामस्थ आणि सरपंच एकत्र आले होते. या ठिकाणी महसूल आणि भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीने मंगेश तारकर आरोसकर यांच्या जागेसंदर्भात लावण्यात आलेली जमिनीची मोजणी सर्व गावकऱ्यांनी तीव्र विरोध करत आणि प्रशासनाला जाब विचारत पूर्णपणे उधळून लावली. ‘जीव गेला तरी चालेल, पण आपली वडिलोपार्जित जमीन कोणत्याही परप्रांतीय किंवा बाहेरच्या व्यक्तीला कवडीमोल भावाने विकणार नाही’, असा पक्का निर्धार या सभेमध्ये सर्व शिरशिंगेवासीयांनी एकमुखाने केला.

​गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरशिंगे गावातील ३२ एकर हे सामायिक (सामूहिक) क्षेत्र असून त्यावर संपूर्ण गावाचा समहक्क आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही एका व्यक्तीला संमतीशिवाय किंवा धडेवाटप न करता जमिनीचा तुकडा देता येणार नाही. गावातील काही एजंट आणि महसूल विभागातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या या जमिनी काही हजारांत बळकावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे गावात एकीचा नवा इतिहास रचत भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांना जागेवरच मोजणी स्थगितीचा पंचनामा करण्यास भाग पाडण्यात आले.

​याप्रसंगी शिरशिंगे गावाचे सरपंच दीपक शांताराम राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आमच्या पूर्वजांनी जशी सामायिक जमीन एकत्र ठेवली, तशीच ती पुढेही कायम राखण्यासाठी संपूर्ण गावाने एकत्र येऊन या मोजणीला आणि जमीन विक्रीला पूर्ण विरोध केला आहे. जमीन राहिली तरच गाव आणि गावाचे अस्तित्व टिकून राहील, त्यामुळे गावकऱ्यांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. तसेच चुकीच्या पद्धतीने मोजणीचे घाट घालू नका, असा इशारा त्यांनी प्रशासनालाही दिला आहे. गावाच्या या एकजुटीमुळे धनदांडग्यांचे मनसुबे धुळीस मिळाले असून हा शिरशिंगेवासीयांच्या एकीचा मोठा विजय मानला जात आहे.

Facebook Comments Box

खाजगी ट्रॅव्हल्स बसेसना मुंबईत ‘नो एंट्री’! पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचा मोठा निर्णय

   Follow us on        

मुंबई: मुंबई शहरात दररोज राज्याच्या विविध जिल्ह्यांतून आणि देशभरातून हजारो खाजगी ट्रॅव्हल्स व पॅसेंजर गाड्या येत असतात. या वाहनांमुळे शहरात होणारी प्रचंड वाहतूककोंडी फोडण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने (BMC) एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता देशभरातून येणाऱ्या या खाजगी प्रवासी गाड्यांना मुंबईच्या वेशीवर म्हणजेच दहिसर आणि मानखुर्द जकात नाक्यांवरच थांबवले (रेड सिग्नल दिला) जाईल. या गाड्या या ठिकाणी थांबून प्रवाशांना सोडतील आणि तिथूनच पुन्हा माघारी परततील. यामुळे मुंबई शहरातील मुख्य रस्त्यांवरील अंतर्गत वाहतूककोंडी आणि खाजगी बसच्या पार्किंगचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटणार आहे.

​या नवीन व्यवस्थेमुळे बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी त्यांना मुंबईच्या विविध भागात जाण्यासाठी जकात नाक्यांवरूनच मेट्रो, बेस्ट (BEST) बसेस आणि टॅक्सी/कॅबची उत्तम कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच, प्रवाशांच्या सोयीसाठी दहिसर आणि मानखुर्द या दोन्ही ठिकाणी आधुनिक सोयी-सुविधांनी युक्त असे मल्टिप्लेक्स, थ्री-स्टार व फाईव्ह-स्टार हॉटेल्स, भव्य शॉपिंग सेंटर्स, पार्किंग हब आणि फूड प्लाझा उभारण्यात येणार आहेत. याशिवाय, वाहनांसाठी सीएनजी, पेट्रोल पंप आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EV) चार्जिंग स्टेशन्स यांसारख्या आवश्यक इंधनाच्या सुविधाही या ठिकाणी उपलब्ध असतील.

​सन २०१७ मध्ये जकात (Octroi) बंद झाल्यापासून दहिसर आणि मानखुर्द येथील हे जकात नाके ओस पडले होते. सध्या दहिसर येथे १८,८६९ चौरस मीटर आणि मानखुर्द येथे २९,७७४ चौरस मीटर अशी मोक्याची जागा उपलब्ध असून पालिकेला त्याचा कोणताही उपयोग होत नव्हता. या जागेचा पुनर्विकास करण्यासाठी पालिका एकूण १२३२ कोटी रुपयांचा खर्च करणार आहे; ज्यामध्ये दहिसर जकात नाक्यासाठी ९९२ कोटी रुपये आणि मानखुर्द जकात नाक्यासाठी २४० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या भव्य प्रकल्पामुळे मुंबईतील वाहतूककोंडी तर फुटणार आहेच, शिवाय या सुविधांमुळे पालिकेच्या महसुलातही मोठी वाढ होणार असल्याची माहिती पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली आहे.

Facebook Comments Box

Video: आता तर कहरच झाला! मुंबईमध्ये नालेसफाई करताना पूर्ण रिक्षाच सापडली

   Follow us on        

मुंबई: मानसूनपूर्व नाला सफाई अभियानात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) कामगारांना साकी नाका परिसरातील मुख्य नाल्यातून पूर्ण ऑटो रिक्षाचा सांगाडा बाहेर काढावा लागला. १८ मे रोजी साकी नाक्यातील सांगाडा लोखंडी कचरापेटी परिसरात क्रेन आणि यंत्रांच्या सहाय्याने हा प्रचंड अवजड कचरा बाहेर काढण्यात आला.नाल्याच्या आत पूर्णपणे बुडालेला आणि चिखल, प्लास्टिक व इतर कचऱ्याने झाकलेला हा ऑटो रिक्षा बाहेर काढताना बीएमसीच्या कर्मचाऱ्यांना बराच वेळ आणि मेहनत घ्यावी लागली.

व्हिडिओत स्पष्ट दिसते की, रिक्षाचा संपूर्ण फ्रेम, चाके आणि इतर भाग एकत्रितपणे नाल्यात अडकले होते. यासोबत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, टायर आणि इतर घनकचराही काढण्यात आला.बीएमसीने यानिमित्त मुंबईकर नागरिकांना नद्या, नाले आणि जलप्रवाहात घनकचरा, तरंगता कचरा किंवा अवजड साहित्य टाकू नये, असे नम्र आवाहन केले आहे.

मात्र, नागरिकांच्या प्रतिक्रियांमध्ये अनेकजण म्हणत आहेत की, “केवळ आवाहन पुरेसे नाही, कचरा टाकणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई व्हायला हवी.”या प्रकारच्या घटनांमुळे मुंबईतील नाल्यांच्या सफाईचा खर्च आणि मेहनत वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे.

 

 

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search