Category Archives: कोकण

सिंधुदुर्ग | परतीच्या प्रवासासाठी रेल्वेचे आरक्षित तिकीट नाही? चिंता नको.. एसटी प्रशासनाने केली ‘ही’ सोय..

सिंधुदुर्ग : गणेश चतुर्थीसाठी गावी जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी एक खुशखबर आहे. चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी सिंधुदूर्ग जिल्ह्यातील ३०७ एसटी बस सोडण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक बस स्थानकातून या गाड्या सुटणार आहेत. या बसेसचे आरक्षण कुठूनही करता येणार आहे. तसेच एमएसआटीसी रिझर्व्हेशन ॲप या ॲपच्या माध्यमातूनही हे आरक्षण करता येते. सध्या आरक्षण सुरू असून ज्येष्ठ नागरीक तसेच महिला व मुलींसाठी सवलतीच्या दरात प्रवास सुविधा उपलब्ध आहे. तरी जास्तीत जास्त प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांनी केले.

पत्रकार परिषदेत बोलताना श्री. पाटील म्हणाले, गणेशोत्सवानिमित्त रा.प. महामंडळाने आगावू आरक्षण व्यवस्था उपलब्ध केली असून त्याचा लाभ चाकरमान्यांनी घ्यावा. गतवर्षी सिंधुदुर्ग विभागातून २६६ बसेस मुंबई व पुणेसाठी परतीच्या प्रवासाकरीता उपलब्ध करण्यात आलेल्या होत्या. रा.प. महामंडळाचे आरक्षण ६० दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येते. त्यानुसार परतीच्या प्रवासासाठी मुंबईकरीता १५३ व पुणेसाठी १५४ बसेस उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. दि. २३ सप्टेंबरपासून या बसेस सुटणार आहेत. याशिवाय प्रत्येक दिवशी मुंबई व पुणेला नियमित धावणाऱ्या १३ बसेसही उपलब्ध आहेत..

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या सिंधुदुर्ग विभागाने गणेशोत्सवानिमित येणाऱ्या चाकरमान्यांच्या परतीची चोख व्यवस्था केली आहे. मुंबई पुणेहून कोकणात सुमारे ५५०० गाड्या येणार आहेत. तर सिंधुदुर्गमधून परतीच्या प्रवासासाठी ३०७ बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या बसेससाठीचे आरक्षणही सुरू झाले आहे. जिल्यातील १८ बस स्थानकमधून या बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांनी दिली.आतापर्यंत परतीच्या प्रवासासाठीच्या बसेस मुख्य स्थानकांवरून सोडण्यात येत होत्या. मात्र, यावर्षी जिल्ह्यातील १८ बसस्टँडवरून या बसेस सोडण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील या विविध स्टॅडवरून मुंबई, बोरिवली, भांडूप, ठाणे, कुर्ता ने नगर, निगडी, पुणे, चिंचवड, घाटकोपर, कल्याण, पनवेल अशा ४० मार्गांवर या ३०७ बसेस सोडण्यात येणार आहेत. सन २०१९ मध्ये १५३, सन २०२१ मध्ये २२५ तर सन २०२२ मध्ये २६६ बसेस परतीच्या प्रवासासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या होत्या. दरम्यान, सिंधुदुर्ग विभागाला १५ ऑगस्टपूर्वी १४ नॉन एसी स्लीपर कोच बसेस कायमस्वरूपी उपलब्ध होणार असल्याचेही श्री. पाटील यांनी सांगितले.

 

 

वंदे भारत एक्सप्रेसला चिपळुणात थांबा मिळावा या मागणीसाठी आ. शेखर निकम यांची रेल्वे राज्यमंत्र्यांशी भेट

 

नवी दिल्ली: कोकण रेल्वे मार्गावर मुंबई ते मडगाव दरम्यान हायस्पीड वंदे भारत रेल्वे सुरू झाली आहे, पण या रेल्वेला रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी व खेड अशा दोनच ठिकाणी थांबा आहे. चिपळूण हे रत्नागिरी जिल्ह्याचे मध्यवर्ती व महत्त्वाचे ठिकाण असल्याने चिपळूण येथे वंदे भारत रेल्वेला थांबा मिळावा, यासाठी आमदार शेखर निकम यांनी सोमवारी सकाळी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली.
वंदे भारत ट्रेनला थांबा मिळावा, यासह अन्य विषयांवर या वेळी आमदार शेखर निकम यांनी ना. रावसाहेब दानवे यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

यावेळी अजितदादा पवार राष्ट्रवादीचे बाबाजीराव जाधव, जिल्हा बँक संचालक राजू सुर्वे, राष्ट्रवादीचे नेते अजित यशवंतराव, सामाजिक कार्यकर्ते संजीव अणेराव आदी उपस्थित होते. आमदार शेखर निकम यांच्या निवेदनावर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

बारसु येथील प्रस्तावित रिफायनरी पाकिस्तानात जाणार?

मुंबई :बारसु येथील प्रस्तावित रिफायनरीबाबत एक महत्वाची  बातमी  आहे. बारसु येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प पाकिस्तानला जाणार असल्याचं वृत्त समोर आले आहे . कोकणातील नाणार येथे होणारा देशातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प आपल्याला मिळावा म्हणून पाकिस्तान प्रयत्न करत आहे. या प्रकल्पात सर्वात मोठी गुंतवणूक असलेल्या सौदी अराम्कोने या तेल कंपनीने आता पाकिस्तानातील ग्वादर शहराची निवड केली आहे. 10 अब्ज डॉलर्स गुंतवणुकीच्या सामंजस्य करारावर पाकिस्तान आणि सौदी अरेबियाने स्वाक्षरी केल्याची बातमीही प्रसिद्ध झाल्याचे समजते. याबाबत भारतातील सत्ताधारी पक्षाने अधिकृतरीत्या काहीही जाहीर केले नसले तरी भाजपचे आशिष शेलार यांनी याबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे.
आशिष शेलार यांचे आरोप
कोकणात प्रस्तावित असणारी रिफायनरी पाकिस्तानात चालली आहे यासाठी आशिष शेलार यांनी विरोधी पक्षाला या बाबत जबाबदार धरले आहे. गेली सहा वर्षे नाणार येथे रिफायनरीला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी कोकण, महाराष्ट्र आणि देशाचे कोट्यवधीचे नुकसान केले आहे.  प्रकल्प भारताला मिळू नये म्हणून ज्या आंतरराष्ट्रीय शक्ती काम करतात त्या नाणार विरोधी आंदोलनात सहभागी तर नव्हत्या? देश विरोधी आंतरराष्ट्रीय शक्तींशी प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांची हातमिळवणी तर नव्हती? उद्धव ठाकरे नाणारला विरोध करुन सरळ सरळ पाकिस्तानला मदत केली?, असा आरोपच शेलार यांनी केला.

दरडीचा धोका टाळण्यासाठी एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गे वळवली आणि ४५ प्रवाशांना न घेताच पुढे गेली; नेमका प्रकार काय ?

Express Missed to Passengers : तुमच्या कडे एका गाडीचे आरक्षित तिकीट आहे. गाडी पकडण्यासाठी अर्धा किंवा एक तास आधी तुम्ही स्थानकावर पोहोचता आणि तुम्हाला समजते की तुमची गाडी दीड तास अगोदर निघून गेली. किती मनस्ताप होईल तुमचा? असाच मनस्ताप गुरुवारी मनमाड स्थानकावर 45 प्रवाशांना सहन करावा लागला. कारण त्यांची गाडी त्यांना न घेता दीड तास अगोदरच स्थानकावरून रवाना झाली होती.

वास्को-निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस (12779) वास्को येथून हुबळी, मिरज, पुणे, दौंड, मनमाडमार्गे ती दिल्लीसाठी मार्गस्थ होते. दरम्यान या गाडीची मनमाड रेल्वे स्थानकात येण्याची वेळ सकाळी 10.30 ही आहे. मात्र, गुरुवारी ही रेल्वे मनमाड रेल्वे स्थानकात सकाळी 9.30 वाजता आली व पाच मिनीटे थांबून पूढे मार्गस्थ झाली.

रेल्वे गाडी नियोजीत वेळेच्या दीड तास आधीच मार्गस्थ झाल्याने या गाडीच्या प्रवासाचे आरक्षण करणारे 45 पेक्षा अधिक प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

झालेला प्रकार लक्षात येताच रेल्वे प्रशासनाने मुंबईहून हावडाला जाणाऱ्या गितांजली एक्सप्रेसला मनमाड रेल्वे स्थानकात विशेष थांबा देवून गोवा एक्सप्रेसचे आरक्षण केलेल्या 45 हून अधिक प्रवाशांना गीतांजली एक्सप्रेसमध्ये बसविण्यात आले. यावेळी गोवा एक्सप्रेसला जळगाव रेल्वे स्थानकात थांबविण्यात आले होते. गीतांजली एक्सप्रेसने आलेल्या प्रवाशांना गोवा एक्सप्रेसमध्ये बसविण्यात आले.

दरडी कोसळत असल्याने मार्गात बदल

सतत पडणाऱ्या पावसामुळे कर्नाटकातील हुबळी भागातीलल रेल्वे मार्गावर दरडी कोसळत आहेत. त्यामुळे प्रवासी रेल्वे गाड्या नियमीत मार्गाने न जाता रत्नागिरी-रोहा-पनवेल-कल्याणमार्गे वळविण्यात आल्या आहेत. मार्ग बदलण्यात आल्यामुळे गोवा एक्सप्रेस दीड तास आधीच मनमाड रेल्वे स्थानकात पोहचली.

“गोवा एक्सप्रेस नियोजित वेळेआधीच पोचल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला. मार्ग बदलण्यात आल्याने वास्को-निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस मनमाड रेल्वे स्थानकात दीड तास आधीच पोचली. ही रेल्वेच्या संबंधित विभागाची चूक असल्याचे लक्षात आले असून याबाबत चौकशी करून कारवाई करण्यात येईल” अशी माहिती शिवराज मानसपुरे एका वृत्तवाहिनीला दिली.

Mumbai Goa Highway | कंत्राटदाराचे निकृष्ट दर्जाचे काम; परशुराम घाटातील नवनिर्मित रस्त्याला भेगा

चिपळूण | मुंबई गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे समोर येत आहे. महामार्गावरील परशुराम घाटात नव्याने केलेल्या काँक्रीटीकरणाला जागोजागी तडे गेले असून, काही ठिकाणच्या भेगाही रूंदावल्या आहेत. विशेष म्हणजे हे काँक्रीट नुकतेच घातले होते. यावरून या महामार्गावरील काम किती निकृष्ट दर्जाचे होत आहे हे समोर आले आहे

परशूराम घाट वाहतुकीसाठी खूपच धोकादायक बनत चालला आहे. रस्त्यांना पडलेल्या भेगा वाढताना दिसत आहेत. घाटातील प्रत्येक टप्प्यावर दरडी कोसळल्या आहेत.एकेरी मार्गावर मोठ्या प्रमाणात डोंगराची माती आली असून, ती अद्याप हटवलेली नाही. त्यामुळे दुसऱ्या मार्गावरून वाहतूक सुरू असून, वाहतूकदारांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

 

 

४ महीन्यांत फक्त १४ किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण; जनआक्रोश समिती ‘धरणे’ आंदोलनाचे अस्त्र बाहेर काढणार…

मुंबई | गणेश नवघरे : मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्याची फक्त आश्वासने भेटत असून त्याची पूर्तता केली जात नसल्याने जनआक्रोश समितीने सरकारला धारेवर धरण्यासाठी धरणे आंदोलन करण्याचे निश्चित केले आहे. दिनांक 2 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

खरडलेल्या मुंबई गोवा महामार्गाची एक मार्गिका दिनांक 31 मे पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित होते मात्र हे आश्वासन पाळले गेले नाही. दररोज किमान 1 किलोमीटर रस्त्याचे काम अपेक्षित असताना गेल्या 4 महिन्यात 14 किलोमीटर रस्त्याचे काम सुद्धा झालेले नाही आहे. गणेशचतुर्थी दीड महिन्यावर आली आहे पण रस्ता वाहतुकीसाठी योग्य झाला नाही आहे. अनेक ठिकाणी काम अपूर्ण आहे. त्यामुळे कोकणात गावी जाणार्‍या चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. प्रशासन याबाबत गंभीर दिसत नाही या कारणाने हे धरणे आंदोलन करण्यात येणार असून जास्तीत जास्त कोकणवासीयांनी यात प्रत्यक्ष हजर राहून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन जनआक्रोश समिती तर्फे शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आलेले आहे.

कोईमतुर-हिसार एक्सप्रेसला महिनाभरासाठी अतिरिक्त डबे

Konkan Railway News  – प्रवाशांचा प्रतिसाद वाढल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या कोईमतुर-हिसार एक्सप्रेसला गाडीला तात्पुरत्या स्वरूपात डबे वाढवण्यात आले आहेत . 

कोकण रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार हरियाणा राज्यातील हिसार जंक्शन ते तामिळनाडूमधील कोयमतुर दरम्यान धावणाऱ्या 22475/ 22476 या गाडीला सप्टेंबर पहिल्या महिन्याभरासाठी  वातानुकलीत टू टायर श्रेणीचे दोन अतिरिक्त कोच जोडले जाणार आहेत. त्यामुळे या गाडीच्या डब्यांची संख्या 21 होणार आहे. 

या संदर्भात रेल्वे कडून प्राप्त माहितीनुसार हिसार जंक्शन ते कोईमतुर या मार्गावर धावताना  गाडी क्रमांक 22475 ला 02 ऑगस्ट  ते 31 ऑगस्ट 2023 तर कोईमतुर ते हिसार जंक्शन या मार्गावर धावताना गाडी क्रमांक 22476 ला 5 ऑगस्ट ते 02 सप्टेंबर 2023 या कालावधीत गाडीला वाढीव दोन डबे जोडले जातील

 

रत्नागिरी | उद्या दिनांक 28 जुलै रोजी अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक 1 ली ते 7 वी पर्यंत विद्यालयांना सुट्टी जाहीर

रत्नागिरी:हवामान विभागाने उद्या दिनांक 28 जुलै रोजी जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये, यासाठी शाळा (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक 1 ली ते 7 वी पर्यंत) विद्यालयांना उद्या शुक्रवार दि. 28 जुलै रोजी सुट्टी जाहीर केल्याचा आदेश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी आज दिला आहे.

हवामान खात्याने जिल्ह्यात उद्या शुक्रवार दिनांक 28 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. जिल्ह्यात अनेक भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये यासाठी उद्या 28 जुलै रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

 

ब्रेकिंग | दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गा बाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई गोवा महामार्गाची वाहतुक ठप्प झाली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील निवळी येथे मोठी दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा कोणी जखमी झालेले नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, निवळी येथे दरड कोसळण्याची घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली आहे. ही दरड हटवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, दरड कोसळल्याने हा मार्ग तूर्तास वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून जिल्ह्यातील चार नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. तर खेड येथील जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट असून प्रशासनाकडून  शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

सावंतवाडी स्थानकाचे नामकरण ”प्राध्यापक मधू दंडवते टर्मिनस” करण्याच्या व ईतर मागण्यांसाठी कोकण रेल्वे प्रवासी संघाचे रेल्वे मंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्ग | सागर तळवडेकर : गेली अनेक वर्षे रेंगाळलेले सावंतवाडी टर्मिनस चे काम पूर्ण करून त्याचे “प्राध्यापक मधू दंडवते टर्मिनस” असे नामकरण करावे आणि महत्वाचा अशा रेल्वे गाड्यांना येथे थांबा द्यावा असे निवेदन कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजिस्टर) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, खासदार विनायक राऊत आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविन्द्र चव्हाण यांना पाठवले आहे.

या पत्राचा मजकूर पुढीलप्रमाणे

कोकण रेल्वे मार्गावर मुंबई ते ठोकूर असा कोकण रेल्वे मार्ग असला तरी महाशय कोकण रेल्वे प्रवासी यांचा रेल्वे प्रवास वा कोकणवासियांच्या तळ कोकणातील अत्यंत अतिमहत्वाचे स्थानक “सावंतवाडी रोड” होय. कालांतराने आता सावंतवाडी रोड रेल्वे स्थानक असे नावारूपास आले. कोकणवासियांच्या महत्त्वाच्या मेल/ एक्सप्रेस मधील जनशताब्दि एक्स., मांडवी एक्स., कोकणकन्या एक्स,. या गाड्यांव्यतिरिक्त तुतारी एक्स. व दिवा एक्स. सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात दैनंदिन प्रकारात आग कोकणवासियांना या एक्सप्रेस गाड्यांचा बराच मोठा फायदा तर होतोच आहे; परंतु दैनंदिन गाड्यांच्या तुलनेत आणि सावंतवाडी हे तळकोकण चे रेल्वे स्थानक असल्यामुळे खालील काही मुद्दे मांडत सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकासाठी अधिक थांब्यासाठी काही गाड्यांची मागणी करीत आहोत असे राजू कांबळे यांनी सांगितले.

१. सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकास टर्मिनल्स चा दर्जा मिळावा यासाठी पूरेपूर यशस्वी प्रयत्नशील राहत कार्य सिद्धीस करावे.

२. सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकास कोकण रेल्वे मार्गाचे शिल्पकार आदरणीय प्रा. मधू दंडवते साहेब यांचे नाव देवून *प्रा. मधू दंडवते टर्मिनल्स* असे नामकरण करण्यात यावे.

३. सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात आरक्षण तिकीट विक्री खिडकी सायंकाळी ७ वाजेपर्यंत चालू ठेवण्यात यावी.

३. गाडी क्र.१२६१८/१२६१७ मंगला लक्षद्विप एक्सप्रेस, निजामउद्दीम-एर्नाकूलम/ एर्नाकूलम-निजामउद्दीम. या दैनंदिन गाड्यंस सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात थांबा देण्यात यावा.

४. गाडी क्र. १६३४५/१६३४६ नेत्रावती एक्सप्रेस, लो. टिळक टर्मि.-तिरूवअनंतपूरम/तिरूवअनंतपूरम-लो. टिळक टर्मि. या दैनंदिन गाड्यांस सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकास थांबा देण्यात यावा.

५. गाडी क्र. १२६१९/१२६२० मत्स्यगंधा एक्सप्रेस, लो. टिळक टर्मि.-मेंगलोर सेन्ट्रल/मेंगलोर सेंट्रल-लो. टिळक टर्मि., या गाड्यांसही सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकास थांबा देण्यात यावा.

६. गाडी क्र. ०११३९/०११४० नागपूर-मडगांव विशेष/मडगांव-नागपूर विशेष गाडीस सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकास थांबा देण्यात यावा.

७. गाडी क्र. २२२२९/२२२३० वन्दे भारत एक्सप्रेस, मुंबई-मडगांव/मडगांव- मुंबई या वातानुकूलित गाडीस सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात थांबा देण्याची मोठ्या प्रमाणात मागणी करीत आहोत.

महोदय, कोकणवासियांच्या गर्दीचा वाढता ओघ पाहता तसेच सावंतवाडी तालुक्यात बऱ्याच गावांचा

समूह असताना तळ कोकण म्हणून सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकास टर्मिनल्स चा दर्जा मिळालाच पाहिजे. त्याचप्रमाणे सदर गाड्यांस सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात थांबे मिळाल्यास इतर गाड्यांवरील प्रवाशांचा गर्दीचा भार कमी होण्यास मदत होईल आणि जास्तीत जास्त कोकणवासियांना याचा बऱ्याच मोठ्या संख्येने लाभ घेता येईल. महोदय कृपया या निवेदनाचा प्रत्यक्षपणे सबब पाहता कार्य सिद्धीस आणावे ही समस्त कोकणवासियांची मनपेक्षा.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search