Category Archives: कोकण

कुडाळमध्ये अवैध बंदूक निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई

   Follow us on        

कुडाळ: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील निरुखे – सुतारवाडी येथे अत्यंत गोपनीय पद्धतीने आणि बेकायदेशीरपणे चालविल्या जाणाऱ्या बंदूक निर्मितीच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी हा कारखाना पूर्णपणे उद्ध्वस्त केला असून, घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात अवैध अग्निशस्त्रांचा साठा आणि साहित्य जप्त केले आहे. या कारवाईने संपूर्ण निरुखे पंचक्रोशीत मोठी खळबळ उडाली आहे.

​जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या ‘ऑल आऊट ऑपरेशन’ अंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला निरुखे – सुतारवाडी येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये अवैध शस्त्रांची निर्मिती होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास नियोजित पद्धतीने छापा टाकला. अंधाराचा फायदा घेत सुरू असलेला हा काळा धंदा पोलिसांनी उघडकीस आणला.

​या छाप्यात पोलिसांनी १ लाख १४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये ३ तयार बंदुका, ६ लोखंडी बॅरल, बंदुकीचे ४ लाकडी बट आणि शस्त्रे तयार करण्यासाठी लागणारे वेल्डिंग मशीन, ग्राइंडर व इतर तांत्रिक साहित्याचा समावेश आहे. ही सर्व हत्यारे आणि साहित्य पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतले असून, हा साठा पुढील तपासासाठी जप्त करण्यात आला आहे.

​याप्रकरणी संशयित जगन्नाथ शंकर मेस्त्री (६५, रा. निरुखे – सुतारवाडी) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम ३, ५ आणि २५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या थेट सूचनेनुसार ही यशस्वी कारवाई करण्यात आली. या पथकात उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सुधीर सावंत यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

​दरम्यान, अटक करण्यात आलेल्या मेस्त्री याने यापूर्वी अशा प्रकारे किती बंदुका तयार केल्या आणि त्या कोणाकोणाला विकल्या, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. या कारखान्यातून यापूर्वी अनेक बंदुकांची विक्री झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध शस्त्रे बनविणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, या प्रकरणाचे धागेदोरे कोठपर्यंत पसरले आहेत, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सीएसएमटी स्थानकावर फलाट विस्तारीकरणाचे काम; कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या दोन गाड्यांवर परिणाम

   Follow us on        

मुंबई : मुंबई सीएसएमटी स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १६ व १७ च्या विस्तारकामामुळे काही गाड्यांचे अंतिम थांबे तात्पुरते बदलण्यात आले असून ही मुदत आता २७ एप्रिल २०२६ ते १९ मे २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना काही दिवस पर्यायी व्यवस्था लक्षात घेऊन प्रवास करावा लागणार आहे.

या निर्णयानुसार मडगाव जंक्शन–मुंबई सीएसएमटी तेजस एक्सप्रेस (गाडी क्र. २२१२०) ही २६ एप्रिल ते १७ मे २०२६ दरम्यान दादर स्थानकावरच शॉर्ट टर्मिनेट होणार आहे. तसेच मंगळुरू जंक्शन–मुंबई सीएसएमटी एक्सप्रेस (गाडी क्र. १२१३४) ही २६ एप्रिल ते १८ मे २०२६ या कालावधीत ठाणे स्थानकावरच प्रवास समाप्त करणार आहे.

या बदलांमुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असून, प्रवाशांनी याची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मडगाव-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये मोठी कारवाई; १९१ दारूच्या बाटल्यांसह दोन जणांना अटक

   Follow us on        

रत्नागिरी: रत्नागिरी रेल्वे स्थानकावर कोकण रेल्वे पोलिसांनी अवैध दारू वाहतुकीविरोधात मोठी कारवाई केली आहे. मडगाव ते मुंबई सीएसएमटी दरम्यान धावणाऱ्या १२०५२ जनशताब्दी एक्सप्रेसची नियमित तपासणी सुरू असताना हा प्रकार उघडकीस आला. या कारवाईमुळे रेल्वेने प्रवास करून छुप्या पद्धतीने दारूची तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

​रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि सी अँड आय स्टाफच्या संयुक्त पथकाने ही मोहीम राबवली. गाडी रत्नागिरी स्थानकावर उभी असताना संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोन व्यक्तींची झडती घेण्यात आली. त्यांच्याकडे असलेल्या साहित्याची तपासणी केली असता, त्यात एकूण १९१ दारूच्या बाटल्या आढळून आल्या. या सर्व बाटल्या पोलिसांनी तातडीने जप्त केल्या आहेत.

​कोकण रेल्वेच्या अधिकृत माहितीनुसार, गोव्याहून महाराष्ट्राच्या दिशेने येणाऱ्या या मार्गावर सध्या दारूविरोधी कायद्यांची अत्यंत कडक अंमलबजावणी केली जात आहे. या दोन्ही आरोपींना प्रतिबंधित वस्तूंसह प्रवास करताना रंगेहात पकडण्यात आले असून, त्यांच्यावर रेल्वे कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यात येत आहे.

​प्रशासनाने या निमित्ताने सर्व प्रवाशांना कडक सूचना दिल्या आहेत. प्रवाशांनी प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारच्या प्रतिबंधित वस्तूंची ने-आण करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. रेल्वेचा प्रवास सुरक्षित, निर्विघ्न आणि सुरळीत पार पडावा यासाठी प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, अशी विनंतीही यावेळी करण्यात आली आहे.

संगमेश्वर स्थानकावर ५ गाड्यांना थांबा मिळण्याची शक्यता

   Follow us on        

संगमेश्वर:कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी आणि विशेषतः संगमेश्वरवासीयांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक (CMD) श्री. संतोष कुमार झा यांनी संगमेश्वर रेल्वे स्थानकाच्या प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक आश्वासन दिले आहे. पद्मश्री गजानन माने यांच्या पुढाकारातून ही बैठक पार पडली असून, यावेळी संगमेश्वरसाठी ५ महत्त्वाच्या गाड्यांच्या थांब्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

​या बैठकीत प्रामुख्याने ९ साप्ताहिक गाड्यांच्या थांब्याची मागणी करण्यात आली होती, ज्यापैकी ५ गाड्यांबाबत लवकरच अनुकूल निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच मदार जंक्शन–तिरुवनंतपुरम स्पेशल गाडीला देखील संगमेश्वर येथे थांबा देण्याबाबत प्रशासनाने सकारात्मकता दर्शवली आहे. गाड्यांच्या थांब्यासोबतच प्रवाशांच्या तांत्रिक सोयीसाठी स्थानकावरील फलाट क्रमांक १ व २ वर ‘डिजिटल कोच पोजिशन इंडिकेटर’ बसवण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना आपला डबा नेमका कुठे येईल, याची अचूक माहिती मिळणे सोपे होणार आहे.

​केवळ स्थानकाचा विकासच नव्हे, तर प्रवासातील शिस्त आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी स्थानकावर दररोज तिकीट तपासनीस (TC) नेमण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, पद्मश्री गजानन माने यांनी मांडलेल्या कोकण रेल्वेच्या शिल्पकारांच्या नावाचा फलक स्थानकावर लावण्याच्या मागणीला तात्काळ मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय मांडवी एक्सप्रेसला दिवा स्थानकावर थांबा देण्याबाबतही चर्चा करण्यात आली. या बैठकीला श्री. गंगाराम टोपरे, श्री. मुकुंद सनगरे आणि ‘निसर्गरम्य चिपळूण व संगमेश्वर’ फेसबुक ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या निर्णयामुळे संगमेश्वर परिसरातील रेल्वे सुविधांचा कायापालट होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे

दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नांत कार घुसली थेट काजू स्टॉलमध्ये.

   Follow us on        

सावंतवाडी: मुंबई-गोवा महामार्गावरील झारप ते पत्रादेवी बायपासवर असलेल्या मळगाव सुतारवाडी सर्कल येथे आज दुपारी एक भीषण अपघात घडला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने परतणाऱ्या पर्यटकांची कार एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात ररस्त्याकडेला असलेल्या काजू विक्रीच्या स्टॉलमध्ये शिरली. या अपघातात कारमधील तीन युवक किरकोळ जखमी झाले असून, सुदैवाने स्टॉल मालक जेवणासाठी घरी गेले असल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील एका खाजगी कंपनीत कामाला असलेले आणि मूळचे उज्जैन (मध्य प्रदेश) येथील चार युवक सुट्टीनिमित्त गोव्याला पर्यटनासाठी आले होते. आपली सहल संपवून ते त्यांच्या होंडा अमेझ कारने (MH 23 BH 8533 A) मुंबईकडे परतत असताना, मळगाव सुतारवाडी सर्कलजवळ एक दुचाकीस्वार अचानक महामार्ग ओलांडू लागला. त्याला वाचवण्यासाठी कार चालकाने तातडीने ब्रेक मारला, ज्यामुळे कारवरील ताबा सुटला. कार प्रथम दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर विरुद्ध दिशेने फिरून रस्त्याच्या कडेला असलेल्या मंगेस राऊळ यांच्या काजू स्टॉलमध्ये जोरात शिरली.

​ज्यावेळी हा अपघात झाला, त्यावेळी योगायोगाने स्टॉल मालक मंगेस राऊळ जेवण करण्यासाठी घरी गेले होते. ते जेवण करून दुकानाच्या दिशेने येत असतानाच त्यांच्या डोळ्यांदेखत हा थरार घडला. जर ते दुकानात असते, तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. मात्र, या धडकेत त्यांच्या दुकानाचे आणि साहित्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. अपघातातील जखमी युवकांना तातडीने सावंतवाडी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

​घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ आणि सावंतवाडी पोलीस ठाण्याचे हवालदार मनोज राऊत, दीपक शिंदे, वाहतूक पोलीस गुरुनाथ नाईक व त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सायंकाळपर्यंत या अपघाताबाबत कोणतीही अधिकृत तक्रार नोंदवण्यात आली नव्हती. महामार्गावरील अशा धोकादायक वळणांवर वाहनचालकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

३५ संघटना आणि २ आजी-माजी खासदारांच्या उपस्थितीत दादरमध्ये ‘महाराष्ट्र रेल्वे परिषद’ मोठ्या उत्साहात संपन्न

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि राज्यातील रेल्वेच्या विकासाला गती देण्यासाठी दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात ‘महाराष्ट्र रेल्वे परिषद’ नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली. ‘गतिमान महाराष्ट्र, समृद्ध कोकण’ हे महत्त्वपूर्ण ब्रीदवाक्य घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत राज्यातील रेल्वे अभ्यासक, प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी आणि मान्यवरांनी एकत्र येत प्रवाशांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर मंथन केले.

परिषदेतील प्रमुख घडामोडी आणि चर्चा:

चतुःसूत्रीवर आधारित थेट संवाद 

संपर्क, सुसंवाद, सतर्कता आणि समस्या निवारण या सूत्रांवर आधारित या परिषदेत प्रामुख्याने मुंबई-कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आदी भागातील रेल्वे प्रवासातील तांत्रिक अडचणी, गाड्यांची संख्या वाढवणे आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

 एकजुटीचा निर्धार

रेल्वे प्रवाशांना येणाऱ्या दैनंदिन अडचणींचे निवारण करण्यासाठी सर्व प्रवासी संघटनांनी एकत्र येऊन लढा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्धार यावेळी करण्यात आला.

परिषदेत प्रशासनासमोर मांडण्यात आलेल्या प्रमुख मागण्या:

बंद गाड्या तातडीने पूर्ववत करणे:

कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या रत्नागिरी-दादर पॅसेंजर, कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्सप्रेस, भुसावळ-मुंबई पॅसेंजर, मुंबई-विजापूर पॅसेंजर, पुणे-पनवेल पॅसेंजर यांसह इतर ३० गाड्या त्वरित पूर्ववत कराव्यात. नांदेड व हरंगुळ (लातूर) एक्सप्रेस पुणे स्थानकापर्यंत वाढवणे, आदी.

प्रलंबित प्रकल्प पूर्ण करणे:

कोकणासाठी प्रस्तावित सावंतवाडी येथील स्वतंत्र टर्मिनस सुविधा गेली १० वर्षे रखडले, ते प्राधान्याने मार्गी लावावे.

तातडीने कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करणे तसेच संपूर्ण कोकण रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करणे.

नव्या मार्गांना प्राधान्य:

सावंतवाडी-बेळगाव, छत्रपती संभाजीनगर-बीड-धाराशिव, मानवत रोड – परळी आणि जालना-जळगाव यांसारख्या रेल्वे मार्गांची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत.

प्रवासी सुरक्षा आणि सुविधा:

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुलभ प्रवासासाठी विशेष उपाययोजना राबवण्यात याव्यात.

तांत्रिक मागण्यांचा पाठपुरावा 

रेल्वे प्रशासनाकडे प्रलंबित असलेल्या तांत्रिक मागण्यांचा त्वरित पाठपुरावा करून त्या मार्गी लावाव्यात.

मान्यवरांची उपस्थिती आणि फलश्रुती

या परिषदेसाठी राज्याच्या विविध भागांतून रेल्वे प्रेमी आणि अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दादर येथील सभागृहात पार पडलेल्या या बैठकीत रेल्वेच्या भविष्यातील वाटचालीवर अनेक महत्त्वपूर्ण ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.

या परिषदेमुळे रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांना आता एक प्रबळ व्यासपीठ मिळाले असून, आगामी काळात रेल्वे प्रशासनाकडून या रास्त मागण्यांवर सकारात्मक निर्णयांची अपेक्षा सर्वच स्तरांतून व्यक्त केली जात आहे.

सदर परिषदेला माजी खासदार विनायक राऊत व खासदार अरविंद सावंत यांची विशेष उपस्थिती लाभली. दोघांनीही वरील सर्व मागण्यांना पाठिंबा दर्शवला असून रेल्वे मंत्री व मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे मान्य केले आहे. तसेच. श्री. अरविंद सावंत यांनी दादर रत्नागिरी, मुंबई सावंतवाडी, मुंबई पंढरपूर, नांदेड पुणे या गाड्यांसाठी मध्य रेल्वेला १० दिवसांची मुदत दिली असून ३ मे नंतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिल्याचा पुनरुच्चार केला.

सदर परिषदेला कोंकण विकास समिती, कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती महाराष्ट्र, कोल्हापूर जिल्हा रहिवासी सामाजिक प्रवासी संघ, मराठा ऑर्गनायझेशन, कोकण कृती समूह, जल फाउंडेशन, मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघ, गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघ मुंबई, रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था कल्याण सावंतवाडी, वैभववाडी तालुका विकास मंच, रेल्वे प्रवासी संघटना बदलापूर, गडगडी धरण कृती समिती, मुंबई गोवा महामार्ग जन आक्रोश समिती, रत्नागिरी सुवर्णदुर्ग विकास परिषद, राजापूर तालुका शेतकरी, मराठवाडा रेल्वे संघर्ष समिती परभणी, रेल्वे प्रवासी मित्रमंडळ बदलापूर, सिंधुदुर्ग रहिवाशी हितवर्धक संघ पनवेल, आधार इंडिया, मराठी अभ्यास केंद्र, निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर, महाराष्ट्र राज्य प्रवासी प्रकोष्ठ, रेल्वे विकास समिती, गौरी गणपती उत्सव ठाणे, सिंधुदुर्ग मराठा विकास मंडळ ठाणे, नाना शंकरशेठ संघर्ष समिती, रेल्वे प्रवासी सेल बार्शी, कोल्हापूर जिल्हा प्रवासी संघ, शहीद अशोक कामटे बहुद्देशीय संस्था सांगोला, हिंद मजदूर किसान पंचायत, सिंधुदुर्ग जिल्हा सेवा समिती, कोकण रेल्वे प्रवासी संघटना वैभववाडी, कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ ठाणे, पश्चिम महाराष्ट्र रेल्वे, श्री समर्थ शक्ती प्रतिष्ठान या संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

कोकणवासीयांना दिलासा! ओसरगाव टोलनाक्यावर ‘या’ गाड्यांना टोलमाफी मिळणार

   Follow us on        

सावंतवाडी:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव येथील टोलनाक्यावरून प्रवास करणाऱ्या स्थानिक वाहनधारकांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. ओसरगाव टोलनाक्यावर ‘MH 07’ पासिंग असलेल्या (सिंधुदुर्ग जिल्ह्यातील) गाड्यांना कोणत्याही प्रकारचा टोल आकारला जाणार नाही, अशी महत्त्वाची घोषणा पालकमंत्री नितेश राणे यांनी केली आहे. सावंतवाडी येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

​पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी आपल्या जुन्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, “मी आमदार असताना ओसरगाव येथील टोल बंद पाडला होता. आता मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, त्यामुळे सिंधुदुर्गवासीयांना कोणत्याही परिस्थितीत टोल भरावा लागणार नाही याची मी दक्षता घेतली आहे. ओसरगाव टोलनाका जरी सुरू झाला, तरी या टोलनाक्यावरून ‘MH 07’ पासिंग असलेल्या एकाही वाहनाला टोल लागू होणार नाही, हा माझा शब्द आहे. त्यामुळे जिल्हावासीयांनी काळजी करण्याची गरज नाही.”

​या पत्रकार परिषदेला आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्षा श्रद्धा राणे, लखमराजे भोसले, विक्रांत सावंत यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष उपस्थित होते. व्यापारी महासंघाने स्थानिक वाहनांना टोलमाफी मिळावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती, ज्यावर पालकमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेतला आहे.

​यासोबतच, पालकमंत्र्यांनी इतर विषयांवरही भाष्य केले. “भाजपचे सरकार सत्तेत असताना हिंदूंना धमकावण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. सर्वांनी सरकारच्या नियमांचे पालन करावे आणि ज्यांना मराठी येत नाही त्यांनी ती शिकावी, त्यासाठी लागेल ती मदत करू,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

शक्तीपीठ महामार्ग रेडी बंदराला जोडला जाणार- नितेश राणे

   Follow us on        

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात एक महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, या महामार्गाचा जुना आराखडा बदलण्यात आला असून आता हा मार्ग थेट रेडी पोर्टशी (Redi Port) जोडला जाणार आहे. जुन्या आराखड्यामुळे महाराष्ट्रापेक्षा गोव्याला अधिक फायदा होत होता, ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने हा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.

​नितेश राणे यांनी सांगितले की, नवीन आराखड्यानुसार जिल्ह्याचा विकास डोळ्यासमोर ठेवण्यात आला आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विकासाची द्वारे उघडली जातील. तसेच, बांदा आणि देगवे सारखी गावे या प्रकल्पामुळे बाधित होणार नाहीत, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे. “आम्ही मंत्रालयात बसतो, या संदर्भात बैठका घेतल्या आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसारच हा बदल करण्यात आला आहे,” असे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

​शेवटी, त्यांनी नागरिकांना आवाहन केले की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. “पालकमंत्री म्हणून मी स्वतः ही माहिती देत आहे, त्यामुळे जनतेने निश्चिंत राहावे,” असे सांगत त्यांनी या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा सरकारचा मानस असल्याचे अधोरेखित केले.

 

Mumbai Goa Highway: मुंबई -गोवा महामार्गाच्या कामात आता कोकण रेल्वेचा ‘अडथळा’

   Follow us on        

मुंबई: मुंबई-गोवा महामार्गाचे काम कोकण रेल्वेच्या तांत्रिक अडचणींमुळे पुन्हा एकदा रखडले असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेली ३१ मेची डेडलाईन पूर्ण होणे आता कठीण दिसत आहे. विशेषतः माणगाव आणि इंदापूर बायपासच्या कामात कोकण रेल्वेचे विद्युत खांब मुख्य अडथळा ठरत असल्याचे समोर आले आहे. यामुळे पावसाळ्यापूर्वी हा मार्ग पूर्ण होण्याच्या आशेवर असलेल्या कोकणवासीयांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या महामार्गाच्या कामासाठी आतापर्यंत तीन ठेकेदार बदलण्यात आले आहेत. सध्या हे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी, तांत्रिक पेच सुटत नसल्याने प्रगती खुंटली आहे. माणगाव आणि इंदापूर येथील बायपासचे काम जूनपर्यंत वाहतुकीसाठी खुले होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाच्या बांधकामात विजेचे खांब आडवे येत असल्याने या भागातील काम पूर्णपणे थांबले आहे.

या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी दिल्लीत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन रखडलेल्या कामांची सविस्तर माहिती दिली. या भेटीनंतर अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत एक संयुक्त बैठकही पार पडली. या बैठकीत रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी अडथळा ठरणारे विद्युत खांब हटवण्यास मान्यता दिली असली, तरी प्रत्यक्षात या कामात मोठी चालढकल होत असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा हा प्रकल्प आता थट्टेचा विषय बनला आहे. २०११ मध्ये सुरू झालेल्या पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्याचे आणि २०१४ पासून सुरू असलेल्या इंदापूर ते झारप या दुसऱ्या टप्प्याचे काम तब्बल १४ वर्षे उलटूनही पूर्ण झालेले नाही. या विलंबाबद्दल कोकणवासीयांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासनाकडून वारंवार तारखा दिल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात काम पूर्ण होताना दिसत नाही.

सध्या नागोठणे आणि कोलाड परिसरातील पुलांचे बांधकामही अत्यंत संथ गतीने सुरू आहे, ज्यामुळे दररोज मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. याचा सर्वाधिक फटका स्थानिक नागरिक, नोकरदार आणि पर्यटकांना बसत आहे. पावसाळा तोंडावर आला असताना जर हे बायपास आणि उड्डाणपूल खुले झाले नाहीत, तर प्रवाशांना पुन्हा एकदा खड्डे आणि वाहतूक कोंडीच्या भीषण संकटाचा सामना करावा लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर १ मे पासून धावणार ‘विशेष मेमू’; अपुरे डबे व आरंभ स्थानकावरून प्रवासी नाराज

   Follow us on        

चिपळूण:कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने दिवा ते चिपळूण दरम्यान ‘अनारक्षित विशेष मेमू’ ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही विशेष सेवा १ मे २०२६ ते ७ जून २०२६ या कालावधीत दर शुक्रवार, शनिवार आणि रविवारी उपलब्ध असणार आहे. सुट्ट्यांच्या काळात होणारी प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे नोकरदार आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

​गाडी क्र. ०११५९ (दिवा ते चिपळूण):

दिवा स्थानकावरून ही गाडी रात्री २३:२५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०६:३० वाजता चिपळूणला पोहोचेल.

​गाडी क्र. ०११६० (चिपळूण ते दिवा):

परतीच्या प्रवासासाठी चिपळूण येथून ही गाडी दुपारी १५:३० वाजता सुटेल आणि त्याच रात्री २३:१० वाजता दिवा स्थानकावर पोहोचेल.

या गाडीचे थांबे: निळजे, तळोजे, कळंबोली, पनवेल, सोमटणे, आपटा, जिते, पेण, कासू, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामने, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजनी

​ही गाडी पूर्णपणे ‘अनारक्षित’ असल्याने प्रवाशांना आगाऊ आरक्षणाची गरज भासणार नाही, ज्यामुळे ऐनवेळी प्रवास करणाऱ्यांना ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरेल. तरी प्रवाशांनी या विशेष मेमू गाडीच्या वेळापत्रकाची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण रेल्वे प्रवाशांची नाराजी 

मात्र गाडीच्या डब्यांची संख्या आणि सुरुवातीचे स्थानक यावरून रेल्वे प्रशासनावर सडकून टीका केली जात आहे.

​”ही प्रवाशांची चेष्टा आहे” – अक्षय महापदी

या निर्णयावर प्रतिक्रिया देताना ‘अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती’चे सचिव अक्षय महापदी यांनी रेल्वे प्रशासनावर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. ते म्हणाले की, “मुंबई-कल्याण मार्गावर १५ डब्यांच्या लोकल्स अपुऱ्या पडत असताना, एवढ्या लांब पल्ल्याच्या मार्गावर ही ८ डब्यांची खेळण्यातली गाडी नक्की कोणासाठी सोडली आहे? ८ डब्यांची मेमू सोडून प्रशासनाने कोकणी प्रवाशांची क्रूर चेष्टा केली आहे.”

​दिवा स्थानकावरून गाडी सोडण्यास विरोध

प्रवाशांनी केवळ डब्यांच्या संख्येवरच नाही, तर गाडी सुटण्याच्या ठिकाणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मुंबईतील बहुतांश प्रवाशांना दिवा स्थानक सोयीचे नाही, ही बाब वारंवार निदर्शनास आणून देऊनही रेल्वे प्रशासन मुद्दाम दिव्यातून गाड्या सोडून प्रवाशांना डिवचत आहे का, असा संतप्त सवाल महापदी यांनी उपस्थित केला आहे.

सुट्ट्यांच्या काळात कोकणात जाणाऱ्यांची गर्दी प्रचंड असते. अशा वेळी ८ डब्यांची गाडी म्हणजे ‘उंटाच्या तोंडात जिरे’ अशी अवस्था असून, या गाडीला डबे वाढवून मिळावेत आणि ती मुंबईतील मुख्य स्थानकावरून सोडावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search