Category Archives: कोकण

संगमेश्वरमध्ये जनआक्रोश समितीचे रस्ता रोको आंदोलन यशस्वी; मात्र आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल 

मुंबई–गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात आक्रमक रस्ता रोको-

संगमेश्वर | ११ जानेवारी २०२६

“कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही… मुंबई–गोवा महामार्ग झालाच पाहिजे!”

“या तिरडीत झोपलाय कोण,आमदार–खासदार सगळेच चोर… ही तिरडी कशाला? प्रशासनाच्या मयताला!”

अशा तीव्र व आक्रमक घोषणांनी रविवारी संगमेश्वर येथील सोनवी पुल परिसर अक्षरशः दणाणून गेला. गेल्या तब्बल १७ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाविरोधात नागरिकांचा संयम संपल्याने जनआक्रोश समितीच्या वतीने महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

महामार्गावरील संथगतीने सुरू असलेले काम, नियोजनाचा अभाव व ठेकेदारांचा हलगर्जीपणा यामुळे सातत्याने भीषण अपघात घडत आहेत. अनेक निष्पाप नागरिक, दुचाकीस्वार, वाहनचालक तसेच मुक्या जनावरांचे प्राण गेले असून, शेकडो नागरिक गंभीर जखमी, कायमचे अपंग झाले आहेत. आर्थिक नुकसान व मानसिक त्रास हे कोकणकरांचे रोजचे वास्तव बनले आहे.

“अजून किती जीव गेल्यावर शासन व प्रशासन जागे होणार?” असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.

आंदोलनामुळे महामार्गावर चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संपूर्ण संगमेश्वर परिसर काही काळ पोलीस छावणीत रूपांतरित झाला होता.

वरिष्ठ अधिकाऱ्यांऐवजी कनिष्ठ अभियंता – जनतेचा संताप

आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांऐवजी केवळ कनिष्ठ अभियंत्याला पाठवण्यात आल्याने आंदोलनकर्त्यांचा संताप अनावर झाला.

“आमच्या प्रश्नांची दखल घ्यायची असेल तर जबाबदार वरिष्ठ अधिकारीच आले पाहिजेत. अटक झाली, जेलची हवा खावी लागली तरी माघार नाही,” असा ठाम इशारा देण्यात आला.

सुमारे तासभर महामार्ग पूर्णतः ठप्प राहिला. काही आंदोलनकर्ते सोनवी पुलावरच झोपून प्रतिकार करत होते, तर महिलांनीही महामार्गावर ठाण मांडले. प्रतीकात्मक तिरडी ठेवून जोरदार घोषणाबाजी सुरूच होती.

अखेर अधीक्षक अभियंता आंदोलनस्थळी

दीर्घ तणावानंतर महामार्ग प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता अनामिका जाधव आंदोलनस्थळी दाखल झाल्या.जनआक्रोश समितीने स्पष्ट भूमिका मांडत सांगितले की, “पोकळ आश्वासने नकोत. लेखी, ठोस व कालबद्ध हमी दिली तरच आंदोलन स्थगित करू.” अधीक्षक अभियंता अनामिका जाधव यांनी संगमेश्वर येथील उड्डाणपुलाचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करून वाहतुकीसाठी खुले केले जाईल, तसेच इतर मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतले जातील, असे आश्वासन दिले.

चार तासांचा नाट्यपूर्ण संघर्ष

सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत संपूर्ण परिसरात तणावपूर्ण वातावरण होते. परवानगीशिवाय राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको केल्याप्रकरणी काही आंदोलनकर्त्यांवर संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सुरेंद्र पवार, संजय जंगम, रुपेश दर्गे, जितेंद्र गिजे, अनिकेत मेस्त्री, संतोष आंब्रे, विशाखा खेडेकर.

राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक अडवणे हे कायद्याने गुन्हा असला तरी, सार्वजनिक सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून प्रशासन व ठेकेदारांनी केलेली दिरंगाई हीदेखील गंभीर गुन्हेगारी कसूर आहे, असा ठाम आरोप जनआक्रोश समिती व नागरिकांनी केला आहे.

या आंदोलनात जनआक्रोश समितीचे सुरेंद्र पवार, संजय जंगम, रुपेश दर्गे, जितेंद्र गिजे, अनिकेत मेस्त्री, संतोष आंब्रे, हरिश बेगावले, विशाखा खेडेकर यांच्यासह मुंबईतून आलेले ८० कोकणकर, संगमेश्वरचे युयुत्सु आर्ते, मनसेचे जितेंद्र चव्हाण, अशोक जाधव तसेच तालुक्यातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

​‘फुकटची’ बस नको, हक्काची ट्रेन द्या! मत हवे असेल तर ‘टर्मिनस’ द्या!

मत’ हवे असेल तर ‘टर्मिनस’ द्या!

   Follow us on        

​मुंबई/सावंतवाडी:

“निवडणुका आल्या की आमची आठवण येते, सणासुदीला मोफत बसचे गाजर दाखवले जाते. पण आम्हाला ही तात्पुरती मलमपट्टी नको आहे. आम्हाला सन्मानाचा आणि हक्काचा रेल्वे प्रवास हवा आहे. जर मते हवी असतील, तर आधी सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा प्रश्न मार्गी लावा,” अशा शब्दांत मुंबईतील कोकणी चाकरमान्यांनी आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींना धारेवर धरले आहे.

​सोशल मीडियावर सध्या एका व्यथित चाकरमान्याचे पत्र तुफान व्हायरल होत असून, ‘तात्पुरती बस नको, हक्काची ट्रेन हवी’ ही मागणी आता एका जनआंदोलनाचे रूप धारण करत आहे.

​बसेसच्या राजकारणापेक्षा कायमस्वरूपी उपाय हवा

​दरवर्षी गणेशोत्सव आणि शिमग्याला राजकीय पक्षांकडून ‘मोफत बस’ सोडण्याची चढाओढ लागते. मात्र, तासनतास होणारी वाहतूक कोंडी आणि बसचा प्रवास हा त्रासदायक ठरत असल्याची भावना चाकरमान्यांमध्ये आहे. “आम्ही भिकारी नाही, आम्ही कष्टाळू आहोत. आम्हाला फुकटचा प्रवास नको, तर सुरक्षित रेल्वे प्रवास हवा आहे,” असा सणसणीत टोला या पत्राद्वारे राजकीय नेत्यांना लगावण्यात आला आहे.

​‘मत’ हवे असेल तर ‘टर्मिनस’ द्या!

​”जो आमच्या हक्कासाठी लढेल, त्याच्याच पाठीशी कोकणी समाज खंबीरपणे उभा राहील,” असा इशाराही चाकरमान्यांनी दिला आहे. भावी नगरसेवकांनी केवळ वॉर्डापुरते मर्यादित न राहता, सभागृहात आणि प्रशासनासमोर सावंतवाडी टर्मिनसचा आवाज उठवावा, अशी मागणी जोर धरत आहे.

​”कोकणी बाणा हा आहे की, आम्ही कष्टाचे खातो. आम्हाला निवडणुकीपुरती मलमपट्टी नको, तर रेल्वेच्या रुळावर धावणारी कायमस्वरूपी प्रगती हवी आहे.”

— एक व्यथित कोकणी चाकरमानी

सावधान! येथे बिबट्यांचा वावर आहे; रत्नागिरीतील ‘या’ १०५ गावांना सतर्कतेचा इशारा

   Follow us on        

रत्नागिरी:रत्नागिरी जिल्ह्यातील विविध भागांत बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीची वनविभागाने गंभीर दखल घेतली असून, ज्या गावांमध्ये बिबट्याचा वावर आहे अशा १०५ गावांची अधिकृत यादी रत्नागिरी वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केली आहे.

​बिबट्यांच्या संख्येत वाढ आणि मानवी वस्तीत शिरकाव

​वनविभागाच्या अंदाजानुसार, या परिक्षेत्रात सध्या सुमारे १०० ते १२५ बिबट्ये असण्याची शक्यता आहे. पूर्वी बिबट्यांचा अधिवास १० किमी परिसरात असायचा, मात्र संख्या वाढल्याने आता हा अधिवास ५ किमीपर्यंत मर्यादित झाला आहे. यामुळे शिकारीच्या शोधात बिबट्ये आता थेट मानवी वस्त्यांमध्ये शिरत आहेत. पाळीव प्राण्यांवर आणि काही ठिकाणी माणसांवरही हल्ले होण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील बिबट्या प्रवण गावांची यादी

​१. रत्नागिरी तालुका (सर्वात जास्त बाधित)

​जाकादेवी परिसर, जयगड, सांडेलवण, कोतवडे, कर्बुडे, हातखंबा, फणसवळे, निवळी, पानवल, चाफेरी, कचरे, गणपतीपुळे, निवेंडी, भगवतीनगर, नेवरे, ओरी, वेतोशी, काळबादेवी, चाफे, उंडी, वरवडे, मालगुंड, भंडारपुळे, जांभरुण, भोके, खानू, पाली, नाणीज, उंबरे, पावस, हरचेरी, टिके, टेंभ्ये, नाचणे, जुवे, करला, फणसोप, कोळंबे, गोळप, गावखडी, मेर्वी, पूर्णगड, गावडेआंबेरे, दाभिल, आंजारी, मावळंगे, हातिस, चिंचखरी, सोमेश्वर, बाळके, केळवणे, चरवेली, डोळस, कुवारबाव, मिरजोळे, शिरगाव, आडी, साखरतर, कासारवेली.

​२. लांजा तालुका / परिसर

​धडे, वनगुळे, गावाणे, कुरुचे, पुनस, लांजा, घुडेरे, मठ, गोळवल, वाडगाव, कगडवली, विलवडे, हसोळ, आडवली, शिपोशी, वेरवली, खेरवसे, कोर्ले, शिरवली.

​३. राजापूर तालुका

​पेंढखळे, सागवे, केरवण, भू, भानवलो, नाटे, तुळसंवडे, शिवणे, वडदहसोल, कोळ्ये, ओणी, वाटूळ, आडीवरे, ताम्हाणे.

​४. संगमेश्वर तालुका / क्षेत्र

​फुणगुस, कोसुंब, शिवणे, कुरुधुंडा, साखळे, आरवली परिसर, कुंभारखाणी, राजिवली, राजवाडी, कडवई, धामणी, कजारी, साखरपा परिसर.

​महत्त्वाची सूचना: वनविभागाने या १०५ गावांमध्ये विशेष सतर्कता बाळगण्यास सांगितले आहे. बिबट्या दिसल्यास स्वतःहून त्याला पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न न करता तातडीने वनविभागाला कळवावे.

Shaktipeeth Expressway: सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्गाच्या आराखड्यात बदल होणार?

   Follow us on        

सावंतवाडी: महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘शक्तीपीठ महामार्गा’च्या मूळ आराखड्यात बदल करण्याचे संकेत मिळाल्यानंतर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेमक्या कोणत्या गावांतून हा मार्ग जाणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुन्या मार्गात बदल करण्याचे स्पष्ट केले असले तरी, स्थानिक प्रशासनाकडे अद्याप नवीन बदलांचे कोणतेही लेखी निर्देश प्राप्त झालेले नाहीत.

​नव्या बदलांनुसार जिल्ह्यातील गावांची नेमकी स्थिती काय असेल, याबाबत खातरजमा करण्यासाठी येथील स्थानिक शासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी अद्याप नवीन सर्वेक्षण किंवा भूसंपादनाबाबत वरिष्ठांकडून कोणतेही आदेश आले नसल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी किंवा प्रांताधिकारी कार्यालयाकडून अधिकृत सूचना मिळाल्यावरच पुढील कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

​शक्तीपीठ महामार्गाचा जुना आराखडा हा पवनार (वर्धा) ते पत्रादेवी (गोवा) असा ८०२ किमीचा प्रस्तावित आहे. या जुन्या आराखड्यानुसार हा मार्ग महाराष्ट्रातील १२ जिल्हे, ३९ तालुके आणि ३७० गावांमधून जाणार आहे.​ या प्रकल्पामुळे सुपीक जमिनी आणि पर्यावरणाचे नुकसान होईल, या भीतीने स्थानिक शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी यापूर्वीच मोठा विरोध दर्शवला होता.

​महामार्गाच्या आराखड्यात बदल होणार असल्याची चर्चा सुरू झाल्यापासून सिंधुदुर्गातील गावांमधील लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. नक्की कोणत्या जमिनी संपादित केल्या जातील आणि कोणाचे घर किंवा शेती वाचेल, याबाबत स्पष्टता नसल्यामुळे लोकांची ‘धाकधूक’ वाढली आहे.

​जोपर्यंत सरकार नवीन नकाशा किंवा लेखी आदेश प्रसिद्ध करत नाही, तोपर्यंत हा संभ्रम असाच कायम राहण्याची शक्यता आहे.

Submarine Tourism Project: कोकणचा पर्यटन अनुभव आता समुद्राखालीही

   Follow us on        

मुंबई – महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीला जागतिक पर्यटन नकाशावर ठळकपणे अधोरेखित करण्यासाठी राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि नाविन्यपूर्ण प्रकल्प हाती घेतला आहे. या अंतर्गत भारतामधील पहिल्या पाणखालील (सबमरीन) पर्यटन प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे देशांतर्गत तसेच परदेशी पर्यटकांना समुद्राखालील नैसर्गिक सृष्टीचा थेट अनुभव घेता येणार आहे.

या योजनेनुसार २४ प्रवाशांची क्षमता असलेली अत्याधुनिक पॅसेंजर सबमरीन विकसित करण्यात येणार आहे. या सबमरीनद्वारे पर्यटकांना समुद्राच्या खोल भागात नेण्यात येईल, जिथे प्रवाल भित्ती (कोरल रीफ), विविध प्रकारचे मासे, सागरी वनस्पती आणि जैवविविधता जवळून पाहता येणार आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रवासात प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार आहे.

हा प्रकल्प सुमारे ₹११२ कोटी खर्चाचा असून, त्याची जबाबदारी माझॅगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) या नामांकित सार्वजनिक क्षेत्रातील संस्थेकडे सोपवण्यात आली आहे. एमडीएल ही संस्था भारतीय नौदलासाठी युद्धनौका व पाणबुड्या तयार करण्याचा मोठा अनुभव असलेली असल्याने, या पर्यटन प्रकल्पाला तांत्रिकदृष्ट्या अधिक विश्वासार्हता मिळणार आहे.

या उपक्रमाचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे EX-INS ‘गुलदार’ या पाणबुडीचे पाण्याखालील संग्रहालयात रूपांतर करणे. या पाणबुडीला समुद्रात मुद्दाम बुडवून कृत्रिम प्रवाळ भित्ती (Artificial Reef) तयार केली जाणार आहे. यामुळे एकीकडे सागरी जैवविविधतेला चालना मिळेल, तर दुसरीकडे पाण्याखालील वारसा आणि संरक्षणात्मक पर्यटन (Eco-Tourism) यांना प्रोत्साहन मिळेल.

हा प्रकल्प प्रथम २०१८-१९ च्या राज्य अर्थसंकल्पीय भाषणात जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर विविध तांत्रिक, पर्यावरणीय आणि आर्थिक बाबींचा सखोल अभ्यास करण्यात आला. केंद्र सरकारच्या सहकार्याने आवश्यक त्या परवानग्या आणि मंजुरी मिळाल्यानंतर आता हा प्रकल्प प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यावर आला आहे.

या सबमरीन पर्यटनामुळे सिंधुदुर्ग व कोकण पट्ट्यातील पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळणार असून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. हॉटेल व्यवसाय, वाहतूक, मार्गदर्शक सेवा आणि स्थानिक हस्तकला यांसारख्या क्षेत्रांनाही याचा फायदा होणार आहे.

पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते, हा प्रकल्प केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून पर्यावरणपूरक विकास, सागरी संवर्धन आणि शाश्वत पर्यटन धोरण यांचा आदर्श नमुना ठरेल. भविष्यात भारतातील इतर किनारी राज्यांसाठीही हा उपक्रम प्रेरणादायी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

सावंतवाडी – पंढरपूर दरम्यान ”माघी वारी विशेष” एक्सप्रेस चालविण्यात यावी

   Follow us on        

रत्नागिरी/सिंधुदुर्ग: आषाढी आणि कार्तिकी एकादशीप्रमाणेच कोकणात माघी एकादशीला विशेष महत्त्व आहे. या निमित्ताने कोकणातील हजारो वारकरी पंढरपूरला विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी जात असतात. मात्र, कोकणातून पंढरपूरला जाण्यासाठी थेट रेल्वे सेवा उपलब्ध नसल्याने वारकऱ्यांचे, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर, यावर्षी तरी सावंतवाडी ते पंढरपूर दरम्यान विशेष गाडी चालवावी, अशी मागणी प्रवासी संघटनांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

​रस्ते प्रवास ठरतोय त्रासदायक

​कोकणातून पंढरपूर रस्तेमार्गे जवळ असले तरी, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या कठीण घाटमार्गामुळे हा प्रवास अत्यंत वेळखाऊ आणि थकवणारा होतो. वयोवृद्ध वारकऱ्यांसाठी तासनतास बसचा किंवा खासगी वाहनाचा प्रवास शारीरिकदृष्ट्या त्रासदायक ठरतो. रेल्वेने हा प्रवास केल्यास तो अधिक आरामदायक आणि सुरक्षित होऊ शकतो, असे वारकऱ्यांचे म्हणणे आहे.

​मध्य रेल्वे दरवर्षी आषाढी-कार्तिकी एकादशीला नागपूर, अमरावती, कोल्हापूर, भुसावळ, लातूर आणि मिरज यांसारख्या विविध भागांतून विशेष गाड्यांची घोषणा करते. मात्र, दरवर्षी मागणी करूनही कोकण रेल्वे मार्गावरून पंढरपूरसाठी थेट विशेष गाडी अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. यामुळे कोकणातील भाविकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

आषाढी आणि कार्तिकी या दोन्ही महत्वाच्या एकदशा ऐन शेतीच्या हंगामात येत असल्याने वारकर्‍यांची ईच्छा असूनही कोकणकरांना पंढरपुरात जाणे शक्य होत नाही. माघी एकादशी सोयीच्या काळात येत असल्याने हा वारकरी नित्यनेमाने पंढरपूरला भेट देतो. त्यामुळे माघी वारीला मोठ्या प्रमाणात कोकणी भक्त दिसून येतात. येवढेच नाही तर या एकादशीच्या वारीला कोकणवासीयांची वारी असेही संबोधले जाते.

या महिन्याच्या अखेरीस माघी एकादशी येत असल्याने रेल्वेने तातडीने यावर निर्णय घ्यावा.

​आता रेल्वे प्रशासन या मागणीची दखल घेऊन कोकणातील वारकऱ्यांचा विठुरायापर्यंतचा प्रवास सुकर करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संगमेश्वर स्थानकावर होळी विशेष एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्यावा; निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर (रेल्वे) फेसबुक ग्रुपची आग्रही मागणी

   Follow us on        

रुपेश मनोहर कदम/ सायले: संगमेश्वर तालुक्यातील रेल्वे प्रवाशांच्या सोयी सुविधांचा कायम पाठपुरावा करणाऱ्या निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर फेसबुक ग्रुप च्या सदस्यांनी आज दि. ७ जानेवारी २०२६ रोजी रत्नागिरी येथील रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी मा. श्री. शैलेश बापट यांची भेट निवेदन सादर केले. संगमेश्वर तालुक्यातील १९६ गावातील रेल्वे प्रवाशांच्या होळी उत्सवातील सुखकर प्रवासाचा विचार करून हे निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी चर्चा करताना संगमेश्वर स्थानकात प्रवाशांची वाढती संख्या ध्यानात घेऊन, उत्पन्न वाढी सोबत सुखकर प्रवास आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. यावर नाण्याची दुसरी बाजू म्हणजे फुकट्या प्रवाशांच्या बेजबाबदार वर्तनाचा रेल्वेला बसणारा फटका, त्यामुळे होणारे नुकसान कसे टाळता येईल यादृष्टीने उपाययोजना करण्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या चर्चेत ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन, रुपेश मनोहर कदम, अशोक मुंडेकर हे सहभागी झाले होते.कोकण रेल्वेच्या मार्गावर धावणाऱ्या हॉलिडे स्पेशल एक्स्प्रेसना संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात थांबा मिळाला तर दररोज हजारोंच्या संख्येने प्रवास करणाऱ्या तालुक्यातील रेल्वे प्रवाशांचा रेल्वे प्रवास नक्कीच सुखकर होणार!

दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसच्या वेळेत १२ जानेवारीपासून बदल

   Follow us on        

​ठाणे: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची आणि पर्यटकांची हक्काची गाडी असलेल्या ‘दिवा-सावंतवाडी-दिवा एक्सप्रेस’च्या वेळापत्रकात मध्य रेल्वेने एक बदल केला आहे. रेल्वे गाड्यांचा वक्तशीरपणा सुधारण्यासाठी आणि वाहतूक अधिक सुरळीत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, नव्या वेळापत्रकानुसार या गाडीची वेळ आता ‘प्रीपोन’ म्हणजेच नियमित वेळेच्या काही मिनिटे आधी करण्यात आली आहे. हे सुधारित बदल १० जानेवारी २०२६ ऐवजी १२ जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहेत.

​नव्या बदलांनुसार, ट्रेन क्रमांक १०१०५ दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस आता दिवा स्थानकावरून पूर्वीच्या वेळेपेक्षा साधारण १० ते १५ मिनिटे लवकर सुटेल. रोहा स्थानकावर ही गाडी सध्या सकाळी ०९:०० वाजता पोहोचत होती, ती आता सकाळी ०८:५० वाजता पोहोचेल आणि ०८:५५ वाजता पुढील प्रवासासाठी रवाना होईल. याचप्रमाणे परतीच्या प्रवासात ट्रेन क्रमांक १०१०६ सावंतवाडी रोड-दिवा एक्स्प्रेसच्या वेळेतही बदल करण्यात आला असून, ही गाडी रोहा स्थानकावर संध्याकाळी ५:२० ऐवजी ५:०५ वाजता पोहोचेल.

मोठी बातमी! पश्चिम घाट बचाव मोहिमेचे प्रणेते, ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन

   Follow us on        

पुणे: भारताच्या पर्यावरण चळवळीचे आधारस्तंभ, प्रख्यात शास्त्रज्ञ आणि पश्चिम घाट बचाव मोहिमेचे प्रणेते, पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ यांचे काल रात्री पुणे येथे निधन झाले. ते ८३ वर्षाचे होते. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी पर्यावरण संरक्षण, संशोधन आणि लोकचळवळींना दिशा देण्याचे काम केले.

​डॉ. गाडगीळ यांनी हार्वर्ड विद्यापीठातून जगप्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ ई. ओ. विल्सन यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण पूर्ण केले होते. परदेशात संधी उपलब्ध असूनही, त्यांनी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. आधुनिक विज्ञानाची सांगड त्यांनी भारतातील पारंपारिक ज्ञान प्रणालींशी घातली. विशेषतः जैवविविधता संवर्धनासाठी त्यांनी स्थानिक समुदायांच्या सहभागावर नेहमीच भर दिला.

​डॉ. गाडगीळ यांच्या कारकिर्दीतील काही महत्त्वाचे टप्पे:

​सायलेंट व्हॅली आंदोलन: ७०-८० च्या दशकात सायलेंट व्हॅली वाचवण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

​बस्तर वनरक्षण: ८० च्या दशकात बस्तरमधील जंगलांच्या संरक्षणासाठी त्यांनी केलेले हस्तक्षेप निर्णायक ठरले.

​संस्थात्मक बांधणी: त्यांनी ‘बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ आणि ‘झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ या संस्थांना नवीन दिशा दिली.

​गाडगीळ समिती अहवाल: २०११ मध्ये त्यांनी सादर केलेला पश्चिम घाट पारिस्थितिकी तज्ज्ञ समितीचा (WGEEP) अहवाल हा पर्यावरण रक्षणातील एक मैलाचा दगड मानला जातो. हा अहवाल अत्यंत लोकशाहीवादी आणि संवेदनशील पद्धतीने तयार करण्यात आला होता.

​डॉ. गाडगीळ हे केवळ एक शास्त्रज्ञ नव्हते, तर ते अनेक विद्यार्थी आणि धोरणकर्त्यांसाठी मित्र, तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शक होते. माजी पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना म्हटले की, “डॉ. गाडगीळ हे खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्माते होते. त्यांची विद्वत्ता अफाट होती, पण त्यासोबतच त्यांचा स्वभाव अत्यंत नम्र आणि सहानुभूतीपूर्ण होता.”

​त्यांच्या पत्नी सुलक्षणा गाडगीळ या मान्सून अभ्यासक आहेत, तर त्यांचे वडील धनंजयराव गाडगीळ हे भारताचे ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ होते. तीन वर्षांपूर्वीच त्यांनी त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध केले होते, ज्यातून त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलू समोर आले.

​डॉ. माधव गाडगीळ यांच्या निधनाने भारताने एक निष्ठावान शास्त्रज्ञ आणि निसर्गाचा खरा रक्षक गमावला आहे. पर्यावरण संतुलन आणि संरक्षणासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. त्यांच्या निधनाने पर्यावरणाप्रती कमालीची तळमळ असलेलं नेतृत्व आपण आज गमावलं आहे. कोकण आणि पश्चिम घाटाच्या संरक्षणाबाबत त्यांनी केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करणं, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

दादर-रत्नागिरी पॅसेंजर पाठोपाठ कोकण रेल्वेच्या अजून दोन गाड्या कायमस्वरूपी मुंबईच्या बाहेर नेण्याचा डाव

   Follow us on        

मुंबई: मुंबईहून कोकण आणि किनारपट्टी कर्नाटककडे जाणाऱ्या दोन महत्त्वाच्या गाड्या पुन्हा एकदा पनवेलला ‘शॉर्ट-टर्मिनेट’ करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयामुळे प्रवाशाची गैरसोय होत असून रेल्वेच्या दीर्घकालीन हेतूंवरही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे.

दिनांक १ जानेवारी २०२६ ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत नेत्रावती एक्सप्रेस (१६३४५/१६३४६) आणि मत्स्यगंधा एक्सप्रेस (१२६१९/१२६२०) लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ऐवजी पनवेलपर्यंतच धावणार आहेत.

​​मध्य रेल्वेने ‘एलटीटी’ यार्डातील पिट लाईन क्रमांक ३ च्या देखभालीचे कारण देऊन या गाड्या महिनाभर पनवेलला थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोकण विकास समितीने यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. यापूर्वीही अशाच प्रकारे ४० दिवस गाड्या रोखण्यात आल्या होत्या. रेल्वे प्रवाशांना हळूहळू पनवेल टर्मिनसची सवय लावून या गाड्या कायमस्वरूपी तिथूनच चालवण्याचा घाट घातला जात असल्याची भीती समितीने व्यक्त केली आहे.

​पूर्वी रत्नागिरी-दादर पॅसेंजर कोव्हिडचे कारण देऊन तात्पुरत्या काळासाठी दादर ऐवजी दिवा स्थानकापर्यंत चालविण्याचा निर्णय घेतला गेला होता. मात्र कोव्हिड काळानंतर ही ट्रेन कायमची दिवा स्थानकावर हलवण्यात आली. यामुळे मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. आता तोच प्रकार आता नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्सप्रेसच्या बाबतीत तर होणार नाही ना? अशी भीती समितीने व्यक्त केली आहे.

​पनवेलला गाडी थांबल्यामुळे वृद्ध, महिला आणि जड सामान असलेल्या प्रवाशांना लोकलने पुढचा प्रवास करणे जिकिरीचे ठरत आहे. खाजगी वाहनांनी प्रवास करताना वेळ आणि पैसा यांचा मोठा फटका बसत आहे.

​कोकण विकास समितीचे जयवंत शंकर दरेकर आणि अक्षय मधुकर महापदी यांनी रेल्वे प्रशासनाकडे एक व्यावहारिक पर्याय मांडला आहे:

सध्या नेत्रावती आणि मत्स्यगंधा गाड्यांचे रेक एलटीटी स्थानकावर उभे करून ठेवावे लागतात. या दोन्ही गाड्यांच्या रेकचे (Rake Linking) एकत्रीकरण करून त्या ‘प्लॅटफॉर्म-रिटर्न’ पद्धतीने चालवाव्यात. यामुळे गाड्यांना बराच वेळ यार्डात उभं राहण्याची गरज उरणार नाही आणि पिट लाईनवरील ताणही कमी होईल.

​समितीच्या प्रमुख मागण्या:

समितीने रेल्वे प्रशासनाला पाठवलेल्या निवेदनात खालील मागण्या केल्या आहेत.

​१. नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्सप्रेसच्या रेक लिंकिंग प्रस्तावाला त्वरित मंजुरी द्यावी.

२. मध्य रेल्वे, कोकण रेल्वे आणि दक्षिण रेल्वेची संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न कायमचा निकाली काढावा.

३. तात्पुरत्या कामांचे कारण देऊन प्रवाशांच्या हक्काच्या मुंबई जोडणीला कायमस्वरूपी सुरुंग लावू नये.

​याप्रश्नी रेल्वे प्रशासन आता काय भूमिका घेते, याकडे हजारो प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search