Category Archives: कोकण

Sindhudurg: मोठी बातमी:प्रशासकीय राजवट संपणार! जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका अखेर जाहीर

   Follow us on        

सावंतवाडी:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका अखेर जाहीर झाल्या आहेत. गेल्या नऊ वर्षांपासून रखडलेली ही निवडणूक येत्या ५ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडणार आहे. २०१७ नंतर पहिल्यांदाच या निवडणुका होत असल्याने जिल्ह्याचे राजकीय वातावरण कमालीचे तापले असून इच्छुकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळत आहे.

​प्रशासकीय राजवट संपणार; ५.९९ लाख मतदार बजावणार हक्क

​मार्च २०२२ मध्ये जिल्हा परिषदेची मुदत संपल्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या न्यायालयीन पेचामुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. गेल्या चार वर्षांपासून जिल्हा परिषदेवर प्रशासकाची नियुक्ती होती. आता या निवडणुकांमुळे जिल्ह्याला पुन्हा एकदा लोकनियुक्त प्रतिनिधी मिळणार आहेत.

​एकूण मतदार: ५,९९,५६७

​मतदान केंद्रे: ८७०

​जिल्हा परिषद जागा: ५०

​पंचायत समिती जागा: १००

​अध्यक्षपद ‘खुले’; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

​पुढील अडीच वर्षांच्या कालावधीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ‘खुले’ (General) प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. हे पद सर्वांसाठी खुले झाल्याने जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. आपल्या समर्थकांना उमेदवारी मिळवण्यासाठी आणि जिल्ह्यावर आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

​पंचायत समित्यांचे आरक्षण: ४ तालुक्यांत ‘महिला राज’

​जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांच्या सभापतीपदांचे आरक्षणही प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये आठपैकी चार तालुक्यांचे नेतृत्व महिलांकडे जाणार असून, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

​तालुकानिहाय आरक्षण खालीलप्रमाणे:

सावंतवाडी – अनुसूचित जाती (महिला)

कणकवली – ओबीसी (महिला)

दोडामार्ग – सर्वसाधारण (महिला)

मालवण – सर्वसाधारण (महिला)

वेंगुर्ला – ओबीसी (सर्वसाधारण)

कुडाळ – सर्वसाधारण (खुले)

वैभववाडी – सर्वसाधारण (खुले)

देवगड – सर्वसाधारण (खुले)

निवडणुकीचे महत्त्व

​सिंधुदुर्ग जिल्हा परिषद हे जिल्ह्याचे ‘मिनी मंत्रालय’ मानले जाते. ९ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर निवडणूक होत असल्याने मतदारांमध्येही मोठा उत्साह आहे. प्रलंबित विकासकामे आणि स्थानिक प्रश्नांवरून या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. ५ फेब्रुवारीला होणाऱ्या या मतदानानंतर जिल्ह्याची सत्ता कोणाच्या हाती जाणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Konkan Railway: लागून आलेल्या सुट्ट्यांसाठी मुंबई पुण्याहून विशेष गाड्या सोडाव्यात – कोकण विकास समिती

   Follow us on        

मुंबई/रत्नागिरी:

येणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या (२६ जानेवारी) जोडून आलेल्या दीर्घ सुट्ट्यांमुळे कोकण मार्गावर प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता, कोकण विकास समितीने रेल्वे प्रशासनाकडे विशेष गाड्या सोडण्याची आग्रही मागणी केली आहे. २३ जानेवारी ते २६ जानेवारी २०२६ या काळात मुंबई आणि पुण्याहून कोकणात जाणाऱ्या नियमित गाड्यांचे आरक्षण महिनाभर आधीच फुल्ल झाल्याने चाकरमानी आणि पर्यटकांचे हाल होत आहेत.

​या पार्श्वभूमीवर, ‘कोकण विकास समिती’चे जयवंत शंकर दरेकर आणि अक्षय मधुकर महापदी यांनी मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे प्रशासनाला सविस्तर पत्र लिहून विशेष गाड्यांचे नियोजन करण्याची विनंती केली आहे.

​प्रवाशांच्या सोयीसाठी या तीन मार्गांवर विशेष ट्रेनची मागणी:

​समितीने प्रवाशांच्या मागणीनुसार खालील तीन मार्गांवर विशेष फेऱ्यांचे प्रस्ताव मांडले आहेत:

​१. मुंबई CSMT – सावंतवाडी रोड – मुंबई CSMT:

ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि कुडाळ यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबून सिंधुदुर्गपर्यंत धावण्यासाठी अपेक्षित आहे. यात स्लीपर आणि एसी कोचची सोय असावी.

​२. पुणे – सावंतवाडी रोड – पुणे:

पुण्याहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. लोणावळा, कल्याण, पनवेलमार्गे ही गाडी सोडल्यास पुणेकर चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होईल.

​३. मुंबई CSMT – चिपळूण – मुंबई CSMT (दिवसा धावणारी स्पेशल):

कमी अंतराच्या प्रवाशांसाठी ही गाडी फायदेशीर ठरेल. पेण, माणगाव, वीर, खेड यांसारख्या स्थानकांवर थांबा देऊन सेकंड सीटिंग आणि एसी चेअर कारची सुविधा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

​दरवर्षी जानेवारीच्या अखेरीस येणाऱ्या लाँग वीकेंडमुळे कोकणात कौटुंबिक भेटी आणि पर्यटनासाठी मोठी गर्दी होते. नियमित गाड्यांमध्ये जागा नसल्याने प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल्सच्या अव्वाच्या सव्वा भाड्याचा सामना करावा लागतो किंवा असुरक्षित रस्ते प्रवासाचा धोका पत्करावा लागतो.

​”जर रेल्वेने वेळेत विशेष गाड्यांचे नियोजन केले आणि बुकिंग सुरू केले, तर प्रवाशांना शेवटच्या क्षणी होणारा मनस्ताप वाचेल. तसेच, यामुळे भारतीय रेल्वेच्या महसुलातही मोठी भर पडेल,” असे कोकण विकास समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

विधवा प्रथा बंद करण्यासाठी कोकणातील ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम; राज्य महिला आयोगाकडून दखल

   Follow us on        

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलमठ ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रात विधवा प्रथा पूर्णपणे बंद करण्याचा आणि विधवा महिलांना घरपट्टी व पाणीपट्टी करामध्ये सवलत देण्याचा अत्यंत पुरोगामी आणि धाडसी निर्णय घेतला आहे. याची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून दखल घेण्यात आली असून अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी ग्रा. पं.च्या अभिनंदनाचे पत्र सरपंच संदीप मेस्त्री व ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर यांना पाठविले आहे.

आजही समाजातील विधवा महिलांना सन्मानाने जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कलमठ ग्रामपंचायतीने केवळ सामाजिक अनिष्ट प्रथांवर घाला घातला नाही, तर त्या भगिनींना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये सवलत देऊन एक नवा आदर्श महाराष्ट्रासमोर ठेवला आहे. आपल्या निर्णयामुळे विधवा महिला स्वतःवर लादलेली बंधने झुगारून सन्मानाने मुख्य प्रवाहात येतील तसेच कर सवलतीमुळे एकल महिलांना कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी मोठी मदत लाभणार आहे. हा निर्णय संपूर्ण राज्यातील इतर हजारो ग्रामपंचायतींसाठी दीपस्तंभाचे कार्य करेल व आपल्याप्रमाणेच महाराष्ट्रातील इतर ग्रामपंचायतींनी अनुकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग प्रयत्न करेल.

आपण अशा संवेदनशील निर्णयाला दिलेले प्रोत्साहन आणि पाठबळ कौतुकास्पद आहे. महिलांच्या हक्कासाठी आणि सन्मानासाठी काम करणारी सर्वोच्च संस्था म्हणून महाराष्ट्र राज्य महिला आयोग आपल्या या निर्णयाचे स्वागत करतो. याबद्दल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने आपले मनःपूर्वक अभिनंदन! भविष्यातही सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिला सबलीकरणाचे असेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातील, अशी आम्हाला खात्री असल्याचे पत्रात नमुद केले आहे.

 

परप्रांतियांना जमीनी विकणार नाही; ग्राम देवतेसमोर नारळ ठेवत गावकऱ्यांनी घेतली शपथ

   Follow us on        

दोडामार्ग | १२ जानेवारी (प्रतिनिधी):

पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील (इकोसेन्सिटिव्ह झोन) असलेल्या कोलझर गावामध्ये सध्या परप्रांतीय लोकांचा वावर वाढल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर, आपल्या जमिनी आणि निसर्गाचे रक्षण करण्यासाठी कोलझरमधील ग्रामस्थ एकवटले असून, त्यांनी ग्रामदेवतेसमोर नारळ ठेवून सामूहिक शपथ घेतली आहे.

नेमके प्रकरण काय?

​गेल्या काही दिवसांपासून या भागात अनधिकृत उत्खनन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जमिनींच्या विक्रीचे व्यवहार अद्याप अधिकृतरीत्या समोर आले नसले तरी, भविष्यात गावातील जमिनी परप्रांतीयांच्या हाती जाऊ नयेत यासाठी ग्रामस्थ सावध झाले आहेत.

ग्रामसभेत महत्त्वाचे निर्णय:

  • जमीन विक्रीवर बंदी: गावातील कोणत्याही नागरिकाने आपल्या रक्ताच्या नात्याबाहेरील व्यक्तीला जमीन विकू नये, याबाबत ग्रामस्थांचे एकमत झाले आहे.
  • व्यावसायिकांना विनंती: ज्यांनी जमिनी विकण्याचे ठरवले आहे किंवा ज्यांच्या चर्चा सुरू आहेत, त्यांना विनंती करून हे व्यवहार थांबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
  • आंदोलनाचा इशारा: इथून पुढे कुणालाही न विचारता अनधिकृत उत्खनन किंवा जमिनींचे व्यवहार झाल्यास कायदेशीर मार्गाने तीव्र आंदोलनात्मक लढा उभारला जाईल, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

​निसर्गसंपन्न असलेल्या कोलझर गावाचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि बाहेरच्या लोकांचा हस्तक्षेप रोखण्यासाठी ग्रामस्थांनी हा निर्णय घेऊन नवीन आदर्श घालून दिला आहे.

शक्तीपीठ महामार्गाच्या सुधारित संरेखनाच्या सर्वेक्षणाला वेग; संभाव्य गावांची यादी समोर

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) वतीने प्रस्तावित असलेल्या ८०२ किलोमीटरच्या नागपूर-गोवा ‘शक्तीपीठ महामार्गा’बाबत मोठी अपडेट समोर येत आहे. महामार्गाच्या अलाइनमेंटमध्ये (नव्या मार्गामध्ये) समाविष्ट असलेल्या गावांसाठी सध्या ‘व्हिलेज मॅप’ (गाव नकाशा) संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे सर्वेक्षण करण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यानुसार गावांच्या याद्या तयार केल्या आहेत. या यादीत प्रामुख्याने खालील जिल्ह्यांतील गावांचा समावेश आहे:

विदर्भ आणि मराठवाडा: नांदेड जिल्ह्यातील हदगाव आणि हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत, औंढा या तालुक्यांमधील अनेक गावांच्या नकाशांची मागणी करण्यात आली आहे.

पश्चिम महाराष्ट्र: सोलापूर (बार्शी, मोहोळ, माढा, पंढरपूर, माळशिरस), सातारा (माण, खटाव) आणि सांगली (खानापूर, पलूस, वाळवा) या जिल्ह्यांतील गावेही या प्रक्रियेत आहेत.

कोल्हापूर आणि कोकण: कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, राधानगरी, भुदरगड, आजरा आणि चंदगड या तालुक्यांतील गावांच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यांतील बांदा, कोळझर यांसारख्या गावांचाही यात समावेश आहे.

स्थानिक विरोध आणि फेरबदल: दरम्यान, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील काही भागांतून या महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होत होता. या पार्श्वभूमीवर, सरकारने काही तालुक्यांना मूळ आराखड्यातून वगळण्याचे सूतोवाच केले होते. परंतु, समोर आलेल्या ताज्या यादीत अद्यापही या भागातील गावांची नावे दिसत असल्याने, ही ‘नवीन अलाइनमेंट’ मधील गावे आहेत का, याबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आणि चिंतेचे वातावरण आहे.

अद्याप जमिनीच्या संपादनाचे (Land Acquisition) काम पूर्ण झालेले नसून, केवळ नकाशांची जुळवाजुळव करण्याचे प्राथमिक काम सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

जिल्ह्यानुसार आणि तालुक्‍यानुसार संभाव्य गावांची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे आहे:

.
नांदेड जिल्हा
हदगाव: पेवा, शिराड, कोहाळी, महाटला , चाक्री, कोळी, मर्दगा.

.
हिंगोली जिल्हा

कळमनुरी: येहळेगाव तुकाराम, घोडा, कामठा, पिंपरी बु., डोंगरगाव पूल, गणगाव, कुप्ती, सापाळी, धारधावंडा, कसबे धावंडा, किल्ले वडगाव, गोरलेगाव, पोत्रा, बोल्डा, बोल्डावाडी.

वसमत: पांगरा शिंदे, गुंडा, करंजाळा, बोरसावंत, आडगाव, हट्टा, पिंपळगाव हजाम, संगमेश्वर.

औंढा: राजदरी, सोनवाडी, लोहारा खु., लोहारा बु., सावरखेडा, आसोला तर्फ लाख, दरेगव्हाण, नागेशवाडी, पुंजाळ, रांजाळा.

.
परभणी आणि बीड जिल्हा

परभणी: नांदगाव खु., नांदगाव बु., आलापूर पंढरी, धनगरवाडी, आसोला.

सोनपेठ: रेवा तांडा.

परळी (बीड): कौथळी तांडा.

 

सोलापूर जिल्हा

बार्शी: रतनंजन, सर्जापूर, राळेरास, सासुरे, मुंगशी (वा), दहिठणे, मौजे ताडवळे.

मोहोळ: वाळूज , भैरववाडी, देगांव, वाफळे, सिद्धेवाडी, तेलंगवाडी, शेतफळ, वैरागवाडी .

माढा: धनोरे, मानेगाव , बुद्रुकवाडी, पंच फुलवाडी, खैराव, कुंभेज, अंजनगाव खु., मोडनिंब, वैरागवाडी .

पंढरपूर: बर्डी, करकंब, भोसे, नेमतवाडी, शेवते, पेहे, आव्हे.

माळशिरस: जांबुड, विठ्ठलवाडी, खळवे, बोंडले, उघडेवाडी, वेळापूर, निमगाव, चांदापुरी, तरंंगफळ, मगरवाडी, गरवाड.

.
सातारा जिल्हा

माण: कारखेल, पर्यंत, खडकी, वरकुटे म्हसवड, वाकी, दिवाड, धामणी, गेटेवाडी, वडजाळ, कुकुडवाड.

खटाव: कण्हेरवाडी, हिवरवाडी, पाडल, मयाणी, अनफळे, कांकत्रे.

 

सांगली जिल्हा

खानापूर: भिकावाडी बु., माहुली, चिखलहोल, नागवाडी, घाणावड, नेवरी, आंबेगाव, वाडीयेरायबाग, भालवणी.

पलूस: वांगी, शिरगाव, देवराष्ट्रे, कुंभारगाव, कुंडल, घोगाव.

वाळवा: मसुचीवाडी, जुने खेड, बोरगाव, वाळवा, उरण इस्लामपूर, कामेरी, येडे निपाणी, इटाकरे, येळूर, कुरळप, ऐतवडे खु.

.
कोल्हापूर जिल्हा
हातकणंगले: पारगाव, मणपाडळे .

पन्हाळा: बहिरेश्वर, जाखले, गिरोली, पोहळे तर्फ आळते, कुशिरे.

करवीर: केरली, केरले, वरंगे, पाडळी बु., शिंदेवाडी, खुपिरे, वाकरे, कुडित्रे , बहिरेश्वर, बीड, गणेशवाडी, शिरोली दुमाला, सादोली दुमाला, भाटणवाडी, हासूर.

राधानगरी: राशिवडे बु., कोडावडे, वाघवडे, मोहडे, चाफोडी तर्फ तारळे, कौलव, पिंपळवाडी, ठिकपुर्ली, कुऱ्हाडवाडी, माजगाव, तळशी, तुरंबे, कापिलश्वर, सरवडे.

कागल: उंदरवाडी .

भुदरगड: खापरेवाडी, टिकेवाडी, नाधवाडे, पाचवडे, बासरेवाडी, मिणचे खु., लोटेवाडी, कोळवण, पालेवाडी, भाटीवडे, हेदवडे, देवकेवाडी, शेणगाव, करडवाडी, शेलोली, पाडखंबे, सोनुर्ली, मेघोली, बेडीव, अरळगुंडी.

आजरा: कोरीवडे, हरपवडे, पेरनोली, देवर्डे, वेळवट्टी, पेठेवाडी , मसोली, खानापूर, पोळगाव, एरंडोल, सातेवाडी.

चंदगड: गवसे, बुजावडे, कुरणी, महाळुंगे इनाम, बिजूर , भोगोली, कानूर बु., पिळणी, जांबरे, इसापूर .

.
सिंधुदुर्ग जिल्हा

सावंतवाडी: केगड , पडवे माजगाव, पडवे, डेगवे, बांदा.

दोडामार्ग: कुंभवडे, भेकुर्ली, कोळझर, तळकट, झोळंबे.

महत्वाची सूचना: सदर माहिती हि प्राथमिक स्वरूपाची असून,या यादीवर शिक्केमार्फत झालेले नाही किंवा कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला नाही आहे. त्यामुळे ही यादी संभाव्य स्वरूपाची असून अंतिम मानता येणार नाही.

 

संगमेश्वरमध्ये जनआक्रोश समितीचे रस्ता रोको आंदोलन यशस्वी; मात्र आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल 

मुंबई–गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात आक्रमक रस्ता रोको-

संगमेश्वर | ११ जानेवारी २०२६

“कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही… मुंबई–गोवा महामार्ग झालाच पाहिजे!”

“या तिरडीत झोपलाय कोण,आमदार–खासदार सगळेच चोर… ही तिरडी कशाला? प्रशासनाच्या मयताला!”

अशा तीव्र व आक्रमक घोषणांनी रविवारी संगमेश्वर येथील सोनवी पुल परिसर अक्षरशः दणाणून गेला. गेल्या तब्बल १७ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाविरोधात नागरिकांचा संयम संपल्याने जनआक्रोश समितीच्या वतीने महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

महामार्गावरील संथगतीने सुरू असलेले काम, नियोजनाचा अभाव व ठेकेदारांचा हलगर्जीपणा यामुळे सातत्याने भीषण अपघात घडत आहेत. अनेक निष्पाप नागरिक, दुचाकीस्वार, वाहनचालक तसेच मुक्या जनावरांचे प्राण गेले असून, शेकडो नागरिक गंभीर जखमी, कायमचे अपंग झाले आहेत. आर्थिक नुकसान व मानसिक त्रास हे कोकणकरांचे रोजचे वास्तव बनले आहे.

“अजून किती जीव गेल्यावर शासन व प्रशासन जागे होणार?” असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.

आंदोलनामुळे महामार्गावर चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संपूर्ण संगमेश्वर परिसर काही काळ पोलीस छावणीत रूपांतरित झाला होता.

वरिष्ठ अधिकाऱ्यांऐवजी कनिष्ठ अभियंता – जनतेचा संताप

आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांऐवजी केवळ कनिष्ठ अभियंत्याला पाठवण्यात आल्याने आंदोलनकर्त्यांचा संताप अनावर झाला.

“आमच्या प्रश्नांची दखल घ्यायची असेल तर जबाबदार वरिष्ठ अधिकारीच आले पाहिजेत. अटक झाली, जेलची हवा खावी लागली तरी माघार नाही,” असा ठाम इशारा देण्यात आला.

सुमारे तासभर महामार्ग पूर्णतः ठप्प राहिला. काही आंदोलनकर्ते सोनवी पुलावरच झोपून प्रतिकार करत होते, तर महिलांनीही महामार्गावर ठाण मांडले. प्रतीकात्मक तिरडी ठेवून जोरदार घोषणाबाजी सुरूच होती.

अखेर अधीक्षक अभियंता आंदोलनस्थळी

दीर्घ तणावानंतर महामार्ग प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता अनामिका जाधव आंदोलनस्थळी दाखल झाल्या.जनआक्रोश समितीने स्पष्ट भूमिका मांडत सांगितले की, “पोकळ आश्वासने नकोत. लेखी, ठोस व कालबद्ध हमी दिली तरच आंदोलन स्थगित करू.” अधीक्षक अभियंता अनामिका जाधव यांनी संगमेश्वर येथील उड्डाणपुलाचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करून वाहतुकीसाठी खुले केले जाईल, तसेच इतर मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतले जातील, असे आश्वासन दिले.

चार तासांचा नाट्यपूर्ण संघर्ष

सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत संपूर्ण परिसरात तणावपूर्ण वातावरण होते. परवानगीशिवाय राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको केल्याप्रकरणी काही आंदोलनकर्त्यांवर संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सुरेंद्र पवार, संजय जंगम, रुपेश दर्गे, जितेंद्र गिजे, अनिकेत मेस्त्री, संतोष आंब्रे, विशाखा खेडेकर.

राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक अडवणे हे कायद्याने गुन्हा असला तरी, सार्वजनिक सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून प्रशासन व ठेकेदारांनी केलेली दिरंगाई हीदेखील गंभीर गुन्हेगारी कसूर आहे, असा ठाम आरोप जनआक्रोश समिती व नागरिकांनी केला आहे.

या आंदोलनात जनआक्रोश समितीचे सुरेंद्र पवार, संजय जंगम, रुपेश दर्गे, जितेंद्र गिजे, अनिकेत मेस्त्री, संतोष आंब्रे, हरिश बेगावले, विशाखा खेडेकर यांच्यासह मुंबईतून आलेले ८० कोकणकर, संगमेश्वरचे युयुत्सु आर्ते, मनसेचे जितेंद्र चव्हाण, अशोक जाधव तसेच तालुक्यातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

​‘फुकटची’ बस नको, हक्काची ट्रेन द्या! मत हवे असेल तर ‘टर्मिनस’ द्या!

मत’ हवे असेल तर ‘टर्मिनस’ द्या!

   Follow us on        

​मुंबई/सावंतवाडी:

“निवडणुका आल्या की आमची आठवण येते, सणासुदीला मोफत बसचे गाजर दाखवले जाते. पण आम्हाला ही तात्पुरती मलमपट्टी नको आहे. आम्हाला सन्मानाचा आणि हक्काचा रेल्वे प्रवास हवा आहे. जर मते हवी असतील, तर आधी सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा प्रश्न मार्गी लावा,” अशा शब्दांत मुंबईतील कोकणी चाकरमान्यांनी आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींना धारेवर धरले आहे.

​सोशल मीडियावर सध्या एका व्यथित चाकरमान्याचे पत्र तुफान व्हायरल होत असून, ‘तात्पुरती बस नको, हक्काची ट्रेन हवी’ ही मागणी आता एका जनआंदोलनाचे रूप धारण करत आहे.

​बसेसच्या राजकारणापेक्षा कायमस्वरूपी उपाय हवा

​दरवर्षी गणेशोत्सव आणि शिमग्याला राजकीय पक्षांकडून ‘मोफत बस’ सोडण्याची चढाओढ लागते. मात्र, तासनतास होणारी वाहतूक कोंडी आणि बसचा प्रवास हा त्रासदायक ठरत असल्याची भावना चाकरमान्यांमध्ये आहे. “आम्ही भिकारी नाही, आम्ही कष्टाळू आहोत. आम्हाला फुकटचा प्रवास नको, तर सुरक्षित रेल्वे प्रवास हवा आहे,” असा सणसणीत टोला या पत्राद्वारे राजकीय नेत्यांना लगावण्यात आला आहे.

​‘मत’ हवे असेल तर ‘टर्मिनस’ द्या!

​”जो आमच्या हक्कासाठी लढेल, त्याच्याच पाठीशी कोकणी समाज खंबीरपणे उभा राहील,” असा इशाराही चाकरमान्यांनी दिला आहे. भावी नगरसेवकांनी केवळ वॉर्डापुरते मर्यादित न राहता, सभागृहात आणि प्रशासनासमोर सावंतवाडी टर्मिनसचा आवाज उठवावा, अशी मागणी जोर धरत आहे.

​”कोकणी बाणा हा आहे की, आम्ही कष्टाचे खातो. आम्हाला निवडणुकीपुरती मलमपट्टी नको, तर रेल्वेच्या रुळावर धावणारी कायमस्वरूपी प्रगती हवी आहे.”

— एक व्यथित कोकणी चाकरमानी

सावधान! येथे बिबट्यांचा वावर आहे; रत्नागिरीतील ‘या’ १०५ गावांना सतर्कतेचा इशारा

   Follow us on        

रत्नागिरी:रत्नागिरी जिल्ह्यातील विविध भागांत बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीची वनविभागाने गंभीर दखल घेतली असून, ज्या गावांमध्ये बिबट्याचा वावर आहे अशा १०५ गावांची अधिकृत यादी रत्नागिरी वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केली आहे.

​बिबट्यांच्या संख्येत वाढ आणि मानवी वस्तीत शिरकाव

​वनविभागाच्या अंदाजानुसार, या परिक्षेत्रात सध्या सुमारे १०० ते १२५ बिबट्ये असण्याची शक्यता आहे. पूर्वी बिबट्यांचा अधिवास १० किमी परिसरात असायचा, मात्र संख्या वाढल्याने आता हा अधिवास ५ किमीपर्यंत मर्यादित झाला आहे. यामुळे शिकारीच्या शोधात बिबट्ये आता थेट मानवी वस्त्यांमध्ये शिरत आहेत. पाळीव प्राण्यांवर आणि काही ठिकाणी माणसांवरही हल्ले होण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील बिबट्या प्रवण गावांची यादी

​१. रत्नागिरी तालुका (सर्वात जास्त बाधित)

​जाकादेवी परिसर, जयगड, सांडेलवण, कोतवडे, कर्बुडे, हातखंबा, फणसवळे, निवळी, पानवल, चाफेरी, कचरे, गणपतीपुळे, निवेंडी, भगवतीनगर, नेवरे, ओरी, वेतोशी, काळबादेवी, चाफे, उंडी, वरवडे, मालगुंड, भंडारपुळे, जांभरुण, भोके, खानू, पाली, नाणीज, उंबरे, पावस, हरचेरी, टिके, टेंभ्ये, नाचणे, जुवे, करला, फणसोप, कोळंबे, गोळप, गावखडी, मेर्वी, पूर्णगड, गावडेआंबेरे, दाभिल, आंजारी, मावळंगे, हातिस, चिंचखरी, सोमेश्वर, बाळके, केळवणे, चरवेली, डोळस, कुवारबाव, मिरजोळे, शिरगाव, आडी, साखरतर, कासारवेली.

​२. लांजा तालुका / परिसर

​धडे, वनगुळे, गावाणे, कुरुचे, पुनस, लांजा, घुडेरे, मठ, गोळवल, वाडगाव, कगडवली, विलवडे, हसोळ, आडवली, शिपोशी, वेरवली, खेरवसे, कोर्ले, शिरवली.

​३. राजापूर तालुका

​पेंढखळे, सागवे, केरवण, भू, भानवलो, नाटे, तुळसंवडे, शिवणे, वडदहसोल, कोळ्ये, ओणी, वाटूळ, आडीवरे, ताम्हाणे.

​४. संगमेश्वर तालुका / क्षेत्र

​फुणगुस, कोसुंब, शिवणे, कुरुधुंडा, साखळे, आरवली परिसर, कुंभारखाणी, राजिवली, राजवाडी, कडवई, धामणी, कजारी, साखरपा परिसर.

​महत्त्वाची सूचना: वनविभागाने या १०५ गावांमध्ये विशेष सतर्कता बाळगण्यास सांगितले आहे. बिबट्या दिसल्यास स्वतःहून त्याला पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न न करता तातडीने वनविभागाला कळवावे.

Shaktipeeth Expressway: सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्गाच्या आराखड्यात बदल होणार?

   Follow us on        

सावंतवाडी: महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘शक्तीपीठ महामार्गा’च्या मूळ आराखड्यात बदल करण्याचे संकेत मिळाल्यानंतर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेमक्या कोणत्या गावांतून हा मार्ग जाणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुन्या मार्गात बदल करण्याचे स्पष्ट केले असले तरी, स्थानिक प्रशासनाकडे अद्याप नवीन बदलांचे कोणतेही लेखी निर्देश प्राप्त झालेले नाहीत.

​नव्या बदलांनुसार जिल्ह्यातील गावांची नेमकी स्थिती काय असेल, याबाबत खातरजमा करण्यासाठी येथील स्थानिक शासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी अद्याप नवीन सर्वेक्षण किंवा भूसंपादनाबाबत वरिष्ठांकडून कोणतेही आदेश आले नसल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी किंवा प्रांताधिकारी कार्यालयाकडून अधिकृत सूचना मिळाल्यावरच पुढील कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

​शक्तीपीठ महामार्गाचा जुना आराखडा हा पवनार (वर्धा) ते पत्रादेवी (गोवा) असा ८०२ किमीचा प्रस्तावित आहे. या जुन्या आराखड्यानुसार हा मार्ग महाराष्ट्रातील १२ जिल्हे, ३९ तालुके आणि ३७० गावांमधून जाणार आहे.​ या प्रकल्पामुळे सुपीक जमिनी आणि पर्यावरणाचे नुकसान होईल, या भीतीने स्थानिक शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी यापूर्वीच मोठा विरोध दर्शवला होता.

​महामार्गाच्या आराखड्यात बदल होणार असल्याची चर्चा सुरू झाल्यापासून सिंधुदुर्गातील गावांमधील लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. नक्की कोणत्या जमिनी संपादित केल्या जातील आणि कोणाचे घर किंवा शेती वाचेल, याबाबत स्पष्टता नसल्यामुळे लोकांची ‘धाकधूक’ वाढली आहे.

​जोपर्यंत सरकार नवीन नकाशा किंवा लेखी आदेश प्रसिद्ध करत नाही, तोपर्यंत हा संभ्रम असाच कायम राहण्याची शक्यता आहे.

Submarine Tourism Project: कोकणचा पर्यटन अनुभव आता समुद्राखालीही

   Follow us on        

मुंबई – महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीला जागतिक पर्यटन नकाशावर ठळकपणे अधोरेखित करण्यासाठी राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि नाविन्यपूर्ण प्रकल्प हाती घेतला आहे. या अंतर्गत भारतामधील पहिल्या पाणखालील (सबमरीन) पर्यटन प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे देशांतर्गत तसेच परदेशी पर्यटकांना समुद्राखालील नैसर्गिक सृष्टीचा थेट अनुभव घेता येणार आहे.

या योजनेनुसार २४ प्रवाशांची क्षमता असलेली अत्याधुनिक पॅसेंजर सबमरीन विकसित करण्यात येणार आहे. या सबमरीनद्वारे पर्यटकांना समुद्राच्या खोल भागात नेण्यात येईल, जिथे प्रवाल भित्ती (कोरल रीफ), विविध प्रकारचे मासे, सागरी वनस्पती आणि जैवविविधता जवळून पाहता येणार आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रवासात प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार आहे.

हा प्रकल्प सुमारे ₹११२ कोटी खर्चाचा असून, त्याची जबाबदारी माझॅगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) या नामांकित सार्वजनिक क्षेत्रातील संस्थेकडे सोपवण्यात आली आहे. एमडीएल ही संस्था भारतीय नौदलासाठी युद्धनौका व पाणबुड्या तयार करण्याचा मोठा अनुभव असलेली असल्याने, या पर्यटन प्रकल्पाला तांत्रिकदृष्ट्या अधिक विश्वासार्हता मिळणार आहे.

या उपक्रमाचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे EX-INS ‘गुलदार’ या पाणबुडीचे पाण्याखालील संग्रहालयात रूपांतर करणे. या पाणबुडीला समुद्रात मुद्दाम बुडवून कृत्रिम प्रवाळ भित्ती (Artificial Reef) तयार केली जाणार आहे. यामुळे एकीकडे सागरी जैवविविधतेला चालना मिळेल, तर दुसरीकडे पाण्याखालील वारसा आणि संरक्षणात्मक पर्यटन (Eco-Tourism) यांना प्रोत्साहन मिळेल.

हा प्रकल्प प्रथम २०१८-१९ च्या राज्य अर्थसंकल्पीय भाषणात जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर विविध तांत्रिक, पर्यावरणीय आणि आर्थिक बाबींचा सखोल अभ्यास करण्यात आला. केंद्र सरकारच्या सहकार्याने आवश्यक त्या परवानग्या आणि मंजुरी मिळाल्यानंतर आता हा प्रकल्प प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यावर आला आहे.

या सबमरीन पर्यटनामुळे सिंधुदुर्ग व कोकण पट्ट्यातील पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळणार असून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. हॉटेल व्यवसाय, वाहतूक, मार्गदर्शक सेवा आणि स्थानिक हस्तकला यांसारख्या क्षेत्रांनाही याचा फायदा होणार आहे.

पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते, हा प्रकल्प केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून पर्यावरणपूरक विकास, सागरी संवर्धन आणि शाश्वत पर्यटन धोरण यांचा आदर्श नमुना ठरेल. भविष्यात भारतातील इतर किनारी राज्यांसाठीही हा उपक्रम प्रेरणादायी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search