Category Archives: कोकण
सिंधुदुर्ग | दि. ९ : कुडाळ आणि सिंधुदुर्ग स्थानकादरम्यान मडगावच्या दिशेने जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसची अचानक रुळावर आलेल्या बैल आणि म्हशींना धडक बसली. या अपघातात काही गुरे मृत्युमुखी पडली. धडकेमुळे रेल्वेच्या ओव्हरहेड विद्युत वाहिनीचा खांब वाकला आणि वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी कुडाळ–मडगाव दिशेची सर्व रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली.
अपघातानंतर वंदे भारत एक्स्प्रेस जागीच थांबवण्यात आली. विद्युत वाहिनीचे मोठे नुकसान झाल्याने रेल्वे प्रशासनाने तातडीने डिझेल इंजिन लावून गाडी घटनास्थळावरून हलवली. सुमारे दुपारी २ वाजता वंदे भारत एक्स्प्रेस घटनास्थळावरून रवाना करण्यात आली. त्यानंतर विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याचे काम हाती घेण्यात आले.
या घटनेमुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक सुमारे साडेतीन तास ठप्प झाली होती. कुडाळ स्थानकात मांडवी एक्स्प्रेस, उदना एक्स्प्रेस, शताब्दी एक्स्प्रेस, तर झाराप स्थानकात राजधानी एक्स्प्रेस थांबवण्यात आली. सावंतवाडीत दूरांतो एक्स्प्रेस, मडुरा स्थानकात मत्स्यगंधा एक्स्प्रेस आणि कणकवलीत मंगला एक्स्प्रेसही थांबवून ठेवण्यात आल्या.
वाहतूक ठप्प झाल्यामुळे अनेक प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. आज आंगणेवाडी जत्रेसाठी प्रवास करणाऱ्या भाविकांचा परतीचा प्रवासही काही काळ लांबला. अखेर दुपारी ३ वाजून ५ मिनिटांनी रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यात आली, अशी माहिती रेल्वे सूत्रांनी दिली आहे.
मुंबई: कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे मंत्रालयाने ‘गाडी क्रमांक २२६२९/२२६३० तिरुनेलवेली-दादर एक्स्प्रेस’चे टर्मिनल बदलून ते लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे कोकण विकास समितीने स्वागत केले असून, आता ही गाडी २२ किंवा २४ डब्यांची (LHB कोच) करावी, अशी आग्रही मागणी रेल्वे बोर्डाकडे केली आहे.
१५ एप्रिल २०२६ पासून तिरुनेलवेली येथून आणि १६ एप्रिल २०२६ पासून मुंबईतून सुटणारी ही गाडी दादरऐवजी एलटीटीवरून धावेल. दादर स्थानकातील तांत्रिक अडचणींमुळे या गाडीचे डबे वाढवता येत नव्हते त्यामुळे ती १६ डब्यांसह चालविण्यात येत असे, आता तो अडथळा आता दूर झाला आहे. कोकण विकास समितीचे जयवंत दरेकर आणि अक्षय महापदी यांनी या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला होता. या मार्गावर प्रवाशांची सतत मोठी गर्दी आणि प्रतीक्षा यादी असते, त्यामुळे डब्यांची संख्या वाढवल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल आणि रेल्वेची क्षमता अधिक कार्यक्षमतेने वापरता येईल, असा विश्वास समितीने व्यक्त केला आहे
तसेच ही डबेवाढ वेळेबद्ध पद्धतीने अंमलात आणून प्रवाशांना लवकरात लवकर त्याचा लाभ मिळावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. या निर्णयाबद्दल रेल्वे मंत्रालय, रेल्वे बोर्ड, मध्य रेल्वे आणि संबंधित सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानत, कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या गरजांकडे भविष्यातही सकारात्मक लक्ष दिले जाईल, अशी आशा कोकण विकास समितीने व्यक्त केली आहे.
मुंबई: कोकणातील शिमगोत्सव (होळी) उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांच्या सोयीसाठी २०२६ मध्ये जादा वाहतुकीची विशेष योजना जाहीर केली आहे. मुंबई आणि मुंबई महानगर परिसरातून मोठ्या संख्येने प्रवासी कोकणात जात असल्याने ही विशेष बससेवा सुरू करण्यात आली आहे.
या जादा वाहतुकीअंतर्गत मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला-नेहरू नगर, ठाणे, बोरीवली, नालासोपारा आदी प्रमुख ठिकाणांहून कोकणातील खेड, दापोली, गुहागर, चिपळूण, महाड, लांजा, कासे, सायन, देवगड, शिर्डी यांसह विविध गावी जाणाऱ्या बसेस सोडण्यात येणार आहेत.
या गाड्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे
मुंबई सेंट्रल आगार (२७ फेब्रुवारी २०२६ पासून)
मुंबई सेंट्रल ते कासे: रात्री ८:३० वाजता
मुंबई सेंट्रल ते खेड: रात्री ९:३० वाजता
मुंबई सेंट्रल ते गुहागर: रात्री १०:०० वाजता
मुंबई सेंट्रल ते दापोली: रात्री १०:४५ वाजता
परळ आगार (२८ फेब्रुवारी २०२६ पासून)
परळ ते दापोली: सकाळी ६:०० वाजता
परळ ते देवरुख: संध्याकाळी ७:३० वाजता
परळ ते खेड: रात्री १०:०० वाजता
कुर्ला नेहरू नगर व सायन (२७ फेब्रुवारी २०२६ पासून)
कुर्ला ते गुहागर: रात्री ९:३० वाजता
कुर्ला ते खेड: रात्री १०:३० वाजता
सायन ते दापोली: संध्याकाळी ७:३० वाजता
ठाणे CBS आगार (२८ फेब्रुवारी २०२६ पासून)
ठाणे ते महाड: सकाळी ८:०० आणि रात्री ११:३० वाजता
ठाणे ते खेड शिंदी: रात्री ९:०० वाजता (मार्गे: पनवेल, इंदापूर, माणगाव, महाड, पोलादपूर)
ठाणे ते साखरपा: रात्री ९:१५ वाजता
ठाणे ते गुहागर: रात्री ९:३० वाजता
ठाणे ते खेड: रात्री ९:४५ वाजता
ठाणे ते दापोली: रात्री ९:४५ वाजता
बोरीवली आगार (२८ फेब्रुवारी २०२६ पासून)
बोरीवली ते खेड: सकाळी ८:३० वाजता
बोरीवली ते लांजा: संध्याकाळी ६:३० वाजता
बोरीवली ते दापोली: रात्री ९:३० वाजता (ठाणे मार्गे)
विठ्ठलवाडी आगार (२८ फेब्रुवारी २०२६ पासून)
विठ्ठलवाडी ते चिपळूण: सकाळी ५:४७ आणि रात्री ९:०१ वाजता
विठ्ठलवाडी ते महाड: सकाळी ६:३२ वाजता
विठ्ठलवाडी ते खेड: सकाळी ८:०० वाजता
विठ्ठलवाडी ते गुहागर: रात्री ८:३२ वाजता
विठ्ठलवाडी ते दापोली: रात्री ९:०२ आणि ९:१६ वाजता
मिळणाऱ्या विशेष सवलती:
१. अमृत ज्येष्ठ नागरिक योजना: ७५ वर्षांवरील सर्व प्रवाशांना सर्व प्रकारच्या एसटी बसेसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा (अटी लागू).
२. महिला सन्मान योजना: सर्व महिला प्रवाशांना तिकीट दरात ५०% सवलत देण्यात येत आहे (अटी लागू).
सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पावशी गावात सखी मतदान केंद्र खूपच चर्चेत आहे! नारळाच्या करवंट्या, माडाच्या झावळ्या आणि बांबू यांचा वापर करून पूर्णपणे पर्यावरणपूरक (इको-फ्रेंडली) सेल्फी पॉइंट उभारण्यात आला आहे. हा सेल्फी पॉइंट मतदान केंद्राचे मुख्य आकर्षण ठरला असून, मतदारांना आकर्षित करत होता.
या मतदान केंद्राचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पूर्णपणे पर्यावरणपूरक (eco-friendly) पद्धतीने तयार केलेला सेल्फी पॉइंट. नारळाच्या झाडांच्या करवंट्या (fronds), माडाच्या झावळ्या (palm leaves) आणि बांबू यांसारख्या स्थानिक, नैसर्गिक आणि पुनर्वापरयोगी साहित्याचा वापर करून हा सेल्फी पॉइंट उभारण्यात आला आहे. या सुंदर आणि सर्जनशील रचनेमुळे मतदानासाठी आलेल्या मतदार – विशेषतः तरुण आणि महिलांना – सेल्फी घेण्यासाठी आणि सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी खूपच आवडले आहे.सखी मतदान केंद्र म्हणजे काय?
‘सखी मतदान केंद्र’ ही संकल्पना राज्य निवडणूक आयोगाने राबवली आहे. या केंद्रांवर संपूर्ण कर्मचारी वर्ग महिला असतो. महिलांना मतदान प्रक्रियेत अधिक सहज आणि सुरक्षित वाटावे यासाठी खास सोय उपलब्ध करून दिली जाते. यामध्ये बालसंगोपन केंद्र (creche), स्वच्छता पॅड्स, पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था अशा सुविधा पुरवल्या जातात. परिणामी ग्रामीण भागातील महिलांचा मतदानाचा टक्का वाढण्यास मदत होते.पावशी गावातील या केंद्राने केवळ मतदान प्रक्रियेलाच नव्हे तर पर्यावरण जागृतीलाही चालना दिली आहे. प्लास्टिक आणि इतर कचऱ्याऐवजी स्थानिक उपलब्ध साहित्याचा वापर करून पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
मुंबई: झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेली ‘देवखेळ’ ही वेबसीरिज सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली असून, या सीरिजवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या वेबसीरिजमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध ‘नमन-खेळे’ या प्राचीन लोककलेचे चुकीच्या पद्धतीने चित्रण करण्यात आले असून, या कलेतील प्रमुख पात्र असलेल्या ‘शंकासूर’ या देवतेचा अवमान केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची आणि वेबसीरिजवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
कोकणातील ‘नमन-खेळे’ ही केवळ एक लोककला नसून ती सामाजिक आणि धार्मिक महत्त्व असलेली एक प्राचीन हिंदू परंपरा आहे. या कलेचा थेट संबंध ग्रामदैवतांशी असल्याने तिला विशेष पावित्र्य लाभले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागामार्फत या कलेच्या संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात आणि दरवर्षी शासकीय महोत्सवांचेही आयोजन केले जाते. मात्र, ‘देवखेळ’ वेबसीरिजमुळे या लोकपरंपरेला धक्का लागल्याची भावना जनमानसात निर्माण झाली आहे. कोकणातील कलावंतांच्या विविध संघटनांनी या सीरिजला तीव्र विरोध दर्शवत शासनाकडे आपली नाराजी व्यक्त केली आहे.
सध्या कोकणात शिमगोत्सवाचे वातावरण असून ९ ते ११ फेब्रुवारी दरम्यान खेड येथे शासकीय नमन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सण-उत्सवाच्या या काळात अशा वादग्रस्त चित्रणामुळे सामाजिक वातावरण गढूळ होण्याची शक्यता अॅड. आशिष शेलार यांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, लोकांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक भावना लक्षात घेऊन शासनाने यावर तातडीने योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी आता सर्वस्तरातून होत आहे.
‘देवखेळ’ वेब सीरिजच्या टीझरमध्ये शंकासुर देवाला क्रूर, अमानवी आणि अंधश्रद्धेशी जोडलेला देव म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेषतः “शंकासूर शिक्षा करतो, बळी घेतो”, “होळीत दरवर्षी खून करण्याची प्रथा आहे”, अशा संवादांमुळे भाविक वर्गाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप आहे.
चिपळूण: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने कोकणात गावी आलेल्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनातर्फे चिपळूण-पनवेल आणि पनवेल-रत्नागिरी दरम्यान विशेष अनारक्षित गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारी, ८ फेब्रुवारी २०२६ रोजी या गाड्या धावतील. या विशेष गाड्यांमुळे निवडणुकीनंतर मुंबई-पुण्याकडे परतणाऱ्या प्रवाशांची गर्दी विभागण्यास मोठी मदत होणार आहे.
१. गाडी क्र. ०११५८ चिपळूण – पनवेल विशेष (अनारक्षित)
दिवस: रविवार, ८ फेब्रुवारी २०२६
वेळ: चिपळूण येथून दुपारी ३:२५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ८:१५ वाजता पनवेलला पोहोचेल.
गाडीचे थांबे: अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामने, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, पेण आणि आपटा.
२. गाडी क्र. ०११५७ पनवेल – रत्नागिरी विशेष (अनारक्षित)
दिवस: रविवार, ८ फेब्रुवारी २०२६
वेळ: पनवेल येथून रात्री ८:२५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४:०० वाजता रत्नागिरीला पोहोचेल.
गाडीचे थांबे: आपटा, पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामने, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड, अंजनी, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.
महत्त्वाची टीप: प्रवाशांनी गाडीच्या अधिकृत वेळेसाठी रेल्वेच्या www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा NTES / RailOne ॲपचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईतील प्रवासी गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून सीएसएमटी–सावंतवाडी रोड–सीएसएमटी दरम्यान TOD (ट्रेन ऑन डिमांड) विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अतिरिक्त प्रवासी गर्दी लक्षात घेऊन ही विशेष रेल्वे नियोजित करण्यात आली असून प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन DRM मुंबई मध्य यांनी केले आहे.
०११२९ सीएसएमटी–सावंतवाडी रोड TOD विशेष रेल्वे ही गाडी १४, १९ आणि २१ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १२.२० वाजता सीएसएमटी येथून सुटणार आहे. ही गाडी दुपारी १२.३० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचणार आहे.
तसेच, ०११३० सावंतवाडी रोड–सीएसएमटी TOD विशेष रेल्वे ही गाडी १५,२० आणि २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.२० वाजता सावंतवाडी रोड येथून सुटेल. ही रेल्वे दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ वाजता सीएसएमटी येथे पोहोचणार आहे.
या विशेष रेल्वेच्या डब्यांची रचना एकूण २२ आयसीएफ डब्यांची असून त्यामध्ये जनरल, स्लीपर आणि एसी डब्यांचा समावेश आहे. कोकण आणि मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळणार असून गर्दीच्या काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यास मदत होणार आहे.
स्थानके :
सीएसएमटी, दादर, ठाणे, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, वीर, खेड़, चिपळूण, सावरडा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आदवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड.
डब्यांची रचना :
जनरल (GS) – ४, जनरल-कम-गार्ड (GSLRD) – २, एसी थ्री टियर (WGACCN) – ५, एसी टू टियर (WGACCW) – १, स्लीपर (WGSCN) – १०, एकूण डबे – २२ (आयसीएफ).
मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना विनंती केली आहे की, जास्तीत जास्त प्रवाशांनी या TOD विशेष रेल्वे सेवेचा लाभ घ्यावा.
मुंबई: सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे रखडलेले काम आणि या प्रकल्पाबाबत कोकण रेल्वे महामंडळाची असलेली उदासीन भूमिका, या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी (मुंबई विभाग) यांच्या वतीने आज, ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मुख्यमंत्री सचिवालयात एक विशेष निवेदन सादर करण्यात आले. या पत्राद्वारे संघटनेने सावंतवाडी टर्मिनसचा प्रकल्प राज्य सरकारच्या ‘मित्रा’ (MITRA) संस्थेकडे हस्तांतरित करण्याची आणि उर्वरित कामांसाठी तातडीने अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची आग्रही मागणी केली आहे. दहा वर्षांपूर्वी या कामाचे भूमिपूजन होऊनही प्रकल्प अद्याप अपूर्ण असल्याने कोकणवासियांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
या निवेदनात कोकण रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेवर कडक शब्दांत ताशेरे ओढण्यात आले आहेत. कोकण रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकांनी (CMD) ‘सावंतवाडी हे केवळ वे-साइड स्टेशन आहे, टर्मिनस नाही’ असे खळबळजनक विधान केल्याचा दावा संघटनेने केला असून, हे विधान कोकणच्या विकासाला खीळ घालणारे असल्याचे त्यांनी नमूद केले. या बेजबाबदार विधानामुळे रेल्वे प्रशासन आपली जबाबदारी झटकत असल्याचे स्पष्ट होत असून, यामुळे स्थानिक जनतेत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
टर्मिनसचे काम रखडल्यामुळे मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांचे आणि पर्यटकांचे प्रचंड हाल होत असल्याकडेही या पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे. सण-उत्सव आणि सुट्ट्यांच्या काळात गावी जाण्यासाठी रेल्वे तिकीटांचा तुटवडा निर्माण होतो आणि काळाबाजार वाढतो. जोपर्यंत सावंतवाडी येथे हक्काचे टर्मिनस पूर्ण होत नाही, तोपर्यंत नवीन गाड्या सुरू करणे शक्य होणार नाही, ही वस्तुस्थिती प्रशासनासमोर मांडण्यात आली आहे. त्यामुळे, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून हा प्रकल्प मार्गी लावावा, अशी मागणी प्रवासी संघटनेचे मुंबई विभागाचे संपर्कप्रमुख श्री. विनोद नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.
मुंबई: कुर्ला स्थानकापुढील लोकल मार्गावरील आणि दादर स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने दादर–तिरुनेलवेली–दादर साप्ताहिक एक्स्प्रेस (गाडी क्रमांक 22629/22630) च्या टर्मिनलमध्ये महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार ही गाडी आता दादर स्थानकाऐवजी लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला) येथून सुटणार व तेथेच तिचा प्रवास संपणार आहे.
गाडी क्रमांक 22629 लोकमान्य टिळक टर्मिनस येथून गुरुवारी रात्री 20:45 वाजता सुटेल, तर ठाणे स्थानकावर 21:02 ते 21:05 दरम्यान थांबेल आणि शनिवारी पहाटे 03:55 वाजता तिरुनेलवेली येथे पोहोचेल.
त्याचप्रमाणे, गाडी क्रमांक 22630 तिरुनेलवेली येथून बुधवारी सकाळी 07:30 वाजता सुटून ठाणे स्थानकावर 14:27 ते 14:30 दरम्यान थांबेल आणि दादरऐवजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुपारी 15:00 वाजता दाखल होईल.
हा बदल 16 एप्रिल 2026 पासून लोकमान्य टिळक टर्मिनस–तिरुनेलवेली प्रवासासाठी, तर 15 एप्रिल 2026 पासून तिरुनेलवेली–लोकमान्य टिळक टर्मिनस प्रवासासाठी लागू होणार असून,
या निर्णयामुळे दादर स्थानकावरील गर्दी कमी होऊन मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांना अधिक सोयीचा प्रवास उपलब्ध होणार आहे. मात्र कोकणातील आणि दक्षिणेकडील राज्यातील प्रवाशांना दादर ऐवजी एलटीटी स्थानक गाठण्यासाठी त्रास सहन करावा लागणार आहे.











