रुपेश मनोहर कदम / सायले: कसबा पंचायत समिती गणामध्ये निवडणूक रणधुमाळीला वेग आला असून, अपक्ष उमेदवार संदेश सुरेश जिमन यांच्या प्रचाराने संपूर्ण गणात चांगलीच चर्चा निर्माण केली आहे. तुल्यबळ उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले असताना, काही उमेदवारांना पक्षीय दिग्गजांचा पाठिंबा आहे, तर काही उमेदवार आपल्या सामाजिक कार्याच्या जोरावर राजकीय प्रवास घडवू पाहत आहेत. अशा परिस्थितीत संदेश सुरेश जिमन यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरून जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे.
सध्या सुरू असलेल्या प्रचारात संदेश जिमन यांनी आघाडी घेतली असून, त्यांचे नेतृत्व जनतेच्या पसंतीस उतरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. वाड्या-वस्त्यांवर जाऊन थेट जनतेशी संवाद साधत, त्यांनी आजवर केलेली जनसेवा आणि पुढील काळात समाजकार्य अधिक प्रभावीपणे करण्याची आपली निर्भीड भूमिका स्पष्ट केली आहे. कमी वयात समाजासाठी केलेल्या कामांमुळे त्यांना जनसामान्यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी सातत्याने पाठपुरावा करत लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांना संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात थांबा मिळावा यासाठी केलेले प्रयत्न, दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, शिवरायांच्या चरित्र ग्रंथांचे तसेच गोष्टींच्या पुस्तकांच्या संचांचे वितरण, ही त्यांची उल्लेखनीय सामाजिक कामगिरी ठरली आहे. याशिवाय, पाणीटंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा, तसेच गरीब व गरजू नागरिकांना वैद्यकीय मदत देण्याचे कार्यही त्यांनी केले आहे.
विकास आणि रोजगारनिर्मिती, पाणी प्रश्नावर ठोस उपाययोजना, या गणातील शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी गरजेनुसार एसटी बससेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न, तसेच कसबा हे ऐतिहासिक क्षेत्र पर्यटनाचे आकर्षक केंद्र बनवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन संदेश जिमन यांनी दिले आहे.
कसबा पंचायत समिती गणातील या चुरशीच्या लढतीत संदेश सुरेश जिमन यांची सरशी होताना दिसत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. ही वाढती लोकप्रियता इतर उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरणार की काय, याची उत्सुकता आता निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.












