Category Archives: कोकण

Konkan Railway: ‘सोशिक’ चाकरमान्यांच्या नशिबी २७ तासांचा यातनेचा प्रवास

   Follow us on        

ठाणे: कोकणात गावी जाण्यासाठी सध्या चाकरमान्यांची ‘तुफान गर्दी’ उसळली आहे. नियमित गाड्यांसह विशेष गाड्यांचे आरक्षण (Reservation) आधीच फूल झाल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. खाजगी बसचे दर गगनाला भिडलेले असल्याने गरीब आणि मध्यमवर्गीय प्रवाशांना ते परवडत नाहीत. परिणामी, जनरल डब्यातून प्रवास करणे हा एकमेव पर्याय आता कोकणी माणसासमोर उरला आहे.

​या भीषण गर्दीमुळे दादर, ठाणे आणि सीएसएमटी यांसारख्या प्रमुख स्थानकांवर प्रवाशांना कमालीचा संघर्ष करावा लागत आहे. कोकण कन्या, मंगलोर आणि तुतारी एक्सप्रेस यांसारख्या गाड्यांच्या जनरल डब्यात पाय ठेवण्यासाठी जागा मिळावी, म्हणून प्रवाशांना गाडी सुटण्यापूर्वी १२ ते १५ तास आधीच स्थानकावर रांगा लावाव्या लागत आहेत. ऐन उन्हाळ्यात प्लॅटफॉर्मवर ताटकळत उभे राहून जागा मिळवण्यासाठी ही जीवघेणी कसरत सुरू आहे.

​या लांबच लांब रांगांचा आणि प्रवासाचा सर्वाधिक फटका महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. १५ तास रांगेत उभे राहिल्यानंतर पुन्हा पुढील १० ते १५ तासांचा गर्दीत करावा लागणारा प्रवास, असा एकूण २७ ते ३० तासांचा हा प्रवास प्रवाशांच्या पाचवीलाच पुजला आहे. यामध्ये रात्रीची झोप नाही आणि बसण्यासाठी हक्काची जागाही नाही, अशा स्थितीत चाकरमानी आपला प्रवास पूर्ण करत आहेत.

​प्रवासादरम्यानच्या सुविधांची स्थिती तर अत्यंत भयावह आहे. प्रचंड उकाडा आणि गर्दीमुळे डब्यात साधे बाथरूमपर्यंत पोहोचणेही अशक्य होऊन बसते. रांगेत उभे असताना जेवणाखाण्याचे हाल होतात आणि प्रवासात पाण्याचा घोट घेण्यासाठीही कसरत करावी लागते. ‘नकोसा वाटणारा हा प्रवास’ केवळ गावाकडच्या ओढीपोटी कोकणी माणूस सहन करत आहे. मात्र, या गैरसोयींमुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

​इतकी भीषण परिस्थिती असूनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप होत आहे. ‘सोशिक कोकणी माणूस’ सर्व काही निमूटपणे सहन करतो, याचाच गैरफायदा घेतला जात असल्याची भावना प्रवाशांमध्ये निर्माण झाली आहे. दरवर्षीची हीच परिस्थिती असूनही जनरल डब्यांची संख्या वाढवणे किंवा रांगांचे सुयोग्य नियोजन करणे यामध्ये रेल्वे प्रशासन अपयशी ठरल्याने, आता हे चाकरमान्यांचे दुःख नेमकं कोणाला दिसेल, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

याशिवाय यावर कायमस्वरूपी उपाय म्हणजे कोकण रेल्वे मार्गाचे कोकण रेल्वेच्या या कायमस्वरूपी समस्यांवर मात करण्यासाठी मार्गाचे दुहेरीकरण आणि भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण करणे ही काळाची गरज बनली आहे. प्रवाशांची वाढती संख्या आणि गाड्यांची गर्दी पाहता, जोपर्यंत रेल्वे मार्गाचे पूर्णतः दुहेरीकरण होत नाही, तोपर्यंत गाड्यांचा वेग वाढवणे आणि नवीन फेऱ्या सुरू करणे तांत्रिकदृष्ट्या कठीण आहे. तसेच, कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेच्या मुख्य प्रवाहात विलिनीकरण झाल्यास निधीची उपलब्धता वाढून पायाभूत सुविधांचा विकास अधिक वेगाने होऊ शकतो. मात्र, दुर्दैवाने या कळीच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होताना दिसत असून, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे कोकणचा रेल्वे प्रवास आजही ‘सिंगल ट्रॅक’वरच अडकून पडला आहे.

भालावलीत जंगली हत्तीचा ‘रात्रीस खेळ चाले’; गाड्यांचे नुकसान करत उच्छाद

   Follow us on        
सिंधुदुर्ग: सावंतवाडी  तालुक्यातील भालावल परिसरात काल रात्री दीड वाजण्याच्या सुमारास एका जंगली हत्तीने जोरदार एन्ट्री करत भीतीचे वातावरण निर्माण केले. या हत्तीने गावात प्रवेश केल्यानंतर आपला मोर्चा थेट उभ्या असलेल्या गाड्यांकडे वळवला.
स्थानिक रहिवासी विकास गुयेकर यांच्या गाडीचे या हत्तीने प्रचंड नुकसान केले आहे. सुमारे अर्धा तास हा हत्ती गाडीसोबत खेळत होता; त्याने गाडी चहूबाजूंनी फिरवून अक्षरशः उचलून फेकण्याचा प्रयत्न केला. यानंतर हत्तीने आपला मोर्चा शेजारच्या बागांकडे वळवला. तिथे असलेल्या फणसाच्या झाडाला जोरात हलवून त्याने फणस पाडले आणि फस्त केले. एवढ्यावरच न थांबता, हत्ती पुन्हा परतला आणि त्याने तिथे उभ्या असलेल्या दुसऱ्या एका गाडीचीही तोडफोड केली.
हा हत्ती आकाराने मध्यम असला तरी तो एकटाच फिरत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. हत्तीचा नेमका ठावठिकाणा शोधण्यासाठी वनविभागाकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने हवेतून हत्तीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या हा हत्ती तांबोळीच्या दिशेने गेल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

आडीवरे येथील श्री नगरेश्वर महादेव मंदिरात सापडला १२५ वर्षांपूर्वीचा ताम्रपट

   Follow us on        

राजापूर (प्रतिनिधी): कोकणातील सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. राजापूर तालुक्यातील आडीवरे येथील श्री नगरेश्वर महादेव मंदिराच्या परिसरात सुमारे १२५ वर्षांपूर्वीचा (सन १९०० चा) ऐतिहासिक ताम्रपट सापडला आहे. या शोधामुळे मंदिराचा प्राचीन इतिहास आणि तत्कालीन जीर्णोद्धाराची माहिती समोर आली असून, इतिहासप्रेमींमध्ये कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे.

काय आहे ताम्रपटात?

सापडलेला ताम्रपट हा शके १८२२ (ई.स. १९००) मधील असल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. यावर कोरलेल्या मजकुरात मंदिराच्या तत्कालीन व्यवस्थापनाबद्दल आणि जीर्णोद्धाराबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. विशेषतः मंदिराच्या बांधकामासाठी ज्यांनी योगदान दिले, त्या व्यक्तींची नावे आणि तत्कालीन सामाजिक स्थितीचे संदर्भ यात आढळतात.

जीर्णोद्धाराचा इतिहास समोर

नगरेश्वर महादेव मंदिर हे आडीवरे परिसरातील एक जागृत देवस्थान मानले जाते. या ताम्रपटामुळे हे स्पष्ट झाले आहे की, १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात मंदिराच्या संवर्धनासाठी स्थानिक भाविकांनी आणि मानकऱ्यांनी मोठा पुढाकार घेतला होता. या दस्तऐवजातून मंदिरातील धार्मिक विधी, उत्सव आणि जमिनीच्या दानाबद्दलचे महत्त्वाचे तपशीलही उघड झाले आहेत.

इतिहास संशोधकांसाठी मोठी पर्वणी

कोकणात अनेक ठिकाणी प्राचीन शिलालेख आणि ताम्रपट दडलेले आहेत. आडीवरे येथे सापडलेला हा ताम्रपट स्थानिक इतिहासाचा एक महत्त्वाचा दुवा मानला जात आहे. हा ताम्रपट सध्या मंदिर समितीच्या देखरेखीखाली असून, त्याचे अधिक सखोल वाचन करण्यासाठी इतिहास संशोधकांची मदत घेतली जाण्याची शक्यता आहे.

या शोधामुळे आडीवरे गावाच्या ऐतिहासिक वैभवात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, भाविक आणि पर्यटकांची पावले आता नगरेश्वर मंदिराकडे वळू लागली आहेत.

मालवण: जबलपूर दुर्घटनेनंतर मालवण बंदर विभाग सतर्क; बोटीवरील प्रवासी संख्येवर मर्यादा

   Follow us on        

मालवण: मध्यप्रदेशातील जबलपूर येथे घडलेल्या भीषण बोट दुर्घटनेनंतर मालवण बंदर विभाग पूर्णपणे ‘ॲक्टिव्ह मोड’वर आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव बंदर विभागाने सिंधुदुर्ग किल्ल्यावर पर्यटकांची ने-आण करणाऱ्या बोटींवर कडक बंधने लादली होती. नवीन नियमांनुसार एका बोटीतून केवळ २० प्रवाशांना नेण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, या निर्णयामुळे स्थानिक बोट व्यावसायिक कमालीचे नाराज झाले होते.

​कमी प्रवासी संख्या आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याची भूमिका व्यावसायिकांनी मांडली. इंधनाचे वाढते दर आणि देखभालीचा खर्च पाहता, केवळ २० प्रवाशांमुळे व्यवसायावर मोठा परिणाम होत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. या मुद्द्यावरून बंदर विभाग अधिकारी आणि बोट व्यावसायिक यांच्यात मोठा वाद निर्माण झाला होता.

​अखेर या वादावर मार्ग काढण्यासाठी दोन्ही बाजूंची महत्त्वाची बैठक पार पडली. या चर्चेदरम्यान दोन्ही पक्षांनी आपापली बाजू मांडली. चर्चेअंती हा वाद यशस्वीपणे मिटवण्यात आला असून, प्रशासनाने प्रवासी संख्येची मर्यादा २० वरून वाढवून ३० केली आहे. या निर्णयामुळे व्यावसायिकांना दिलासा मिळाला असून पर्यटकांची वाहतूक आता सुरळीत सुरू झाली आहे. यासोबतच सुरक्षेचे नियम पाळणे आणि पर्यटकांना लाईफ जॅकेट अनिवार्य करणे यावरही पुन्हा एकदा जोर देण्यात आला आहे.

Photo Credit – AI

मालवण: कडक निर्बंधांमुळे थांबलेली किल्ले प्रवासी होडी वाहतूक अखेर सुरू

   Follow us on        

मालवण: मध्य प्रदेशातील जबलपूर येथे अलीकडेच घडलेल्या दुर्दैवी बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मालवण बंदर विभागाने सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी होणाऱ्या प्रवासी होडी वाहतुकीवर प्रवासी क्षमतेच्या दृष्टीने कडक निर्बंध लादले होते. रविवारी सकाळी बंदर विभागाने अचानक प्रत्येक होडीतील प्रवाशांची संख्या निश्चित केल्यामुळे होडी व्यावसायिक आणि बंदर अधिकारी यांच्यात वादाची स्थिती निर्माण झाली. नियमानुसार पर्यटकांच्या सुरक्षेचे काटेकोर पालन करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये या निर्णयामुळे संभ्रमाचे वातावरण पसरले आणि याचा परिणाम म्हणून काही काळ प्रवासी होडी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. सुट्ट्यांमुळे मोठ्या संख्येने आलेल्या पर्यटकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला.

​या गंभीर परिस्थितीची दखल घेत होडी व्यावसायिकांनी आणि उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधले. पर्यटकांच्या सुरक्षेला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या होडी व्यावसायिकांची बाजू आमदार निलेश राणे यांनी प्रशासनासमोर मांडली. या सकारात्मक चर्चेनंतर अखेर तोडगा निघाला आणि बंद पडलेली किल्ले प्रवासी होडी वाहतूक पुन्हा एकदा पूर्ववत सुरू झाली. या निर्णयामुळे खोळंबलेल्या पर्यटकांसह व्यावसायिकांनीही समाधान व्यक्त केले असून, ‘शिवराजेश्वर किल्ला प्रवासी वाहतूक’ संस्थेच्या वतीने आमदार निलेश राणे यांचे आभार मानण्यात आले आहेत.

कोकण रेल्वेची वाहतुक विस्कळीत! गाड्या ३ ते ५ तास उशिराने, प्रवाशांचे प्रचंड हाल

   Follow us on        

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक गेल्या दोन दिवसांपासून पूर्णपणे कोलमडले असून, अनेक महत्त्वाच्या गाड्या ३ ते ५ तास उशिराने धावत आहेत. मे महिन्याच्या सुट्ट्यांमुळे गाड्यांना प्रचंड गर्दी असतानाच, या विलंबाचा मोठा फटका हजारो प्रवाशांना बसत आहे.

​विंलंबाचे मुख्य कारण: नांदगाव रोड-कणकवली दरम्यान ‘ब्लॉक’? 

​रेल्वे प्रशासन काही कारण पुढे करत नसले तरी मिळालेल्या माहितीनुसार, कोकण रेल्वे मार्गावरील नांदगाव रोड आणि कणकवली स्थानकांदरम्यान अंडरपासच्या (भुयारी मार्ग) बांधकामासाठी रेल्वे प्रशासनाने ३० एप्रिल आणि १ मे २०२६ रोजी विशेष ‘ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक’ घेतला होता. या तांत्रिक कामामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, ब्लॉक संपल्यानंतरही गाड्यांचे वेळापत्रक अद्याप पूर्वपदावर आलेले नाही. परिणामी, कालपासून अनेक गाड्या एकामागोमाग एक रखडल्या आहेत. हा ब्लॉक घेण्यासाठी रेल्वेने ऐन हंगामाचा मुहूर्त का पकडला असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

​अनेक गाड्यांना रेल्वे प्रशासनाकडून रीशेड्यूल (वेळ बदलणे) करण्यात आले आहे. प्रमुख गाड्यांच्या विलंबाचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

​मांडवी एक्सप्रेस (१०१०३): ही गाडी आज, २ मे रोजी सीएसएमटीवरून सकाळी ७:१० ऐवजी १०:०० वाजता (२ तास ५० मिनिटे उशिराने) सुटली आहे. आता ती चार तास उशिराने धावत आहे. काल १ मे रोजी देखील ही गाडी मडगावला रात्री ११:३० च्या सुमारास पोहोचली होती.

​शेवटची लोकल चुकली 

जनशताब्दी एक्सप्रेस (१२०५२): मडगाववरून सुटलेली ही गाडी तब्बल ५ तास २४ मिनिटे उशिराने पहाटे ५:३४ वाजता मुंबईला पोहोचली. त्यामुळे दिवसा प्रवास करून रात्री किमान शेवटची लोकल पकडून घरी जाण्याचा प्रयत्नात असलेल्या चाकरमान्यांना दुसर्‍या दिवसाची पहिली लोकल पकडून घरी जावे लागले.

​कोकण कन्या एक्सप्रेस (२०११२): मडगाव येथून सुटलेली ही गाडी २ तास ४८ मिनिटे उशिराने मुंबईत पोहोचली.

​एलटीटी-मडगाव उन्हाळी विशेष (०११०३): ही गाडी १ मे रोजी २ तास ५ मिनिटे उशिराने सुटली आणि मडगावला तब्बल ५ तास १० मिनिटे उशिराने पोहोचली.

​तुतारी एक्सप्रेस (११००३): दादर-सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस १ मे रोजी आपल्या नियोजित वेळेपेक्षा १ तास ४८ मिनिटे उशिराने सावंतवाडीला पोहोचली.

आपल्या नेहमीच्या लेटमार्क साठी ‘कुप्रसिद्ध’ असलेल्या एलटीटी – मडगाव – एलटीटी ( ११०९९/११०००) दोन्ही दिशेने सुमारे ५  तासांचा लेटमार्क लावला.

​प्रवाशांचा खोळंबा:

​उन्हाळी सुट्ट्यांच्या हंगामात गाड्यांना आधीच मोठी प्रतीक्षा यादी असताना, या ब्लॉकमुळे झालेल्या विलंबाने प्रवाशांच्या मनस्तापात भर पडली आहे. वाढत्या उकाड्यात प्रवास लांबल्याने जनरल आणि स्लीपर डब्यातून प्रवास करण्यात प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे, मात्र वेळापत्रक कधीपर्यंत सुरळीत होईल, याबाबत अद्याप निश्चित माहिती मिळालेली नाही.

 

मदार–तिरुवनंतपुरम स्पेशल ट्रेनला संगमेश्वर रोड स्थानकावर थांबा मंजूर

   Follow us on        

संगमेश्वर | २९ एप्रिल २०२६ कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या मदार (अजमेर) ते तिरुवनंतपुरम सेंट्रल दरम्यानच्या विशेष गाडीला संगमेश्वर रोड स्थानकावर अधिकृत थांबा मंजूर करण्यात आला आहे. यामुळे संगमेश्वर आणि परिसरातील प्रवाशांची मोठी गैरसोय दूर झाली असून परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

​सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

​यापूर्वी या गाडीला संगमेश्वर स्थानकावर थांबा नसल्याने स्थानिक प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. या संदर्भात ‘निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर रेल्वे ग्रुप’ च्या वतीने कोकण रेल्वेकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. तसेच, पद्मश्री गजानन माने यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण रेल्वेचे सी.एम.डी. (CMD) संतोष कुमार झा यांच्यासोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा विषय प्रकर्षाने मांडण्यात आला होता. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत अखेर या थांब्याचे अधिकृत पत्र प्रसिद्ध केले आहे.

​गाडीचे वेळापत्रक आणि वेळ

​रेल्वे प्रशासनाने जाहीर केल्यानुसार, ०२ मे २०२६ ते ०६ जून २०२६ या कालावधीत ही सेवा उपलब्ध असेल:

​ट्रेन क्र. ०६०१३ (तिरुवनंतपुरम – मदार जं. स्पेशल): ही गाडी दर गुरुवारी सकाळी ०८:१६ वाजता संगमेश्वर स्थानकावर येईल आणि दोन मिनिटांच्या थांब्यानंतर ०८:१८ वाजता मार्गस्थ होईल.

​ट्रेन क्र. ०६०१४ (मदार जं. – तिरुवनंतपुरम स्पेशल): ही गाडी दर रविवारी रात्री २३:१० वाजता संगमेश्वर स्थानकावर पोहोचेल आणि २३:१२ वाजता पुढील प्रवासासाठी रवाना होईल.

​कोकण रेल्वेने घेतलेल्या या निर्णयामुळे संगमेश्वर परिसरातील नागरिक आणि पर्यटकांना मोठा फायदा होणार आहे. रेल्वे ग्रुपच्या या यशस्वी पाठपुराव्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

कशेडी घाटात एसटी बसचा भीषण अपघात; १२ ते १३ प्रवासी जखमी

   Follow us on        

खेड: मुंबई-गोवा जुन्या महामार्गावरील कशेडी घाटात गुरुवारी उशिरा रात्री एक भीषण अपघात घडला. खेड डेपोची खेड-बोरीवली एसटी बस रात्री १० वाजता मार्गस्थ झाली होती. रात्री ११:३० ते १२ च्या सुमारास रायगड जिल्ह्यातील भोगाव परिसरात पोहोचली असता, बसचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. परिणामी, या बसने समोर असलेल्या एका बल्कर ट्रकला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ट्रक चालकासह बसमधील सुमारे १२ ते १३ प्रवासी जखमी झाले असून, त्यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

​अपघाताचे ठिकाण हे अत्यंत धोकादायक असून एका बाजूला खोल दरी आहे. सुदैवाने, धडक बसल्यानंतर बस दरीच्या टोकावर थांबली, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि अनेक प्रवाशांचे प्राण वाचले. घटनेची माहिती मिळताच शिवसेना खेड तालुकाप्रमुख सचिन धाडवे, तसेच मदत ग्रुपचे प्रसाद गांधी, अक्षय भोसले, निखिल चौधरी, समीर मोरे आणि दर्पण दरेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. पोलादपूर पोलिसांनीही तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

​कशेडी घाटात सध्या बोगद्याचे काम पूर्ण झाले असले, तरी स्थानिक गावांसाठी काही एसटी बसेस अजूनही जुन्या घाटातूनच धावतात. भोगाव परिसरात सध्या रस्त्याचे काम सुरू असून, त्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना केल्या जात नसल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे घाटातील रस्ते सुरक्षा आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Konkan Railway: मदार-मडगाव दरम्यान ‘वन-वे’ विशेष गाडी

   Follow us on        

मडगाव: उत्तर पश्चिम रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मदार ते मडगाव दरम्यान विशेष ‘वन-वे’ रेल्वे सेवा जाहीर केली आहे. गाडी संख्या ०९६०७, मदार-मडगाव स्पेशल रविवार, दिनांक ३ मे २०२६ रोजी मदार स्थानकावरून सायंकाळी १९.५५ वाजता सुटेल आणि मंगळवारी पहाटे ०४.४० वाजता मडगाव येथे पोहोचेल.

​या प्रवासात ही गाडी राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहे. या विशेष रेल्वेचे सर्व थांबे खालीलप्रमाणे आहेत:

​प्रवासातील सर्व स्थानके:

मदारहून सुटल्यानंतर ही गाडी अजमेर, विजयनगर, भीलवाडा, चित्तौडगड, नीमच, मंदसौर, रतलाम, वडोदरा, भरूच, सुरत, वापी, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमली या स्थानकांवर थांबेल. त्यानंतर ही गाडी आपल्या अंतिम स्थानकावर म्हणजेच मडगाव येथे पोहोचेल.

​डब्यांची रचना आणि सुविधा:

या गाडीला एकूण २२ डबे असतील, ज्यात २ सेकंड एसी, ६ थर्ड एसी, १ थर्ड एसी इकॉनॉमी, ७ शयनयान (स्लीपर), ४ सामान्य श्रेणी आणि २ पॉवरकार डब्यांचा समावेश आहे. रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या विशेष रेल्वेमध्ये लिननची (चादर, उशी, ब्लँकेट) सुविधा उपलब्ध नसेल, त्यामुळे प्रवाशांनी स्वतःची व्यवस्था करून प्रवास करावा.

​कोकण रेल्वे मार्गावरून जाणारी ही गाडी विशेषतः दक्षिण भारतात आणि कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी सोय ठरणार आहे. प्रवाशांनी वेळापत्रकाची नोंद घेऊन आपले आरक्षण निश्चित करावे, असे आवाहन रेल्वे विभागातर्फे करण्यात आले आहे.

तिरुवनंतपुरम – मदार जंक्शन विशेष एक्सप्रेस शनिवारपासून संगमेश्वर स्थानकावर थांबणार

   Follow us on        

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे प्रशासनाने संगमेश्वर रोड स्थानकावर तिरुवनंतपुरम मदार विशेष जादा थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल २ मे २०२६ पासून ६ जून २०२६ पर्यंत लागू राहणार आहे.

​गाडी क्र. ०६०१३ तिरुवनंतपुरम सेंट्रल ते मदार जंक्शन ही साप्ताहिक विशेष ट्रेन (जी दर बुधवारी तिरुवनंतपुरमवरून सुटते) दर गुरुवारी सकाळी ०८:१६ वाजता संगमेश्वर रोड स्थानकावर पोहोचेल आणि ०८:१८ वाजता पुढील प्रवासासाठी रवाना होईल. या गाडीला ६ मे २०२६ ते ३ जून २०२६ या कालावधीत हा थांबा मिळेल.

​तसेच परतीच्या प्रवासात गाडी क्र. ०६०१४ मदार जंक्शन ते तिरुवनंतपुरम सेंट्रल ही साप्ताहिक विशेष ट्रेन (जी दर शनिवारी मदार जंक्शनवरून सुटते) दर रविवारी रात्री २३:१० वाजता संगमेश्वर रोड स्थानकावर येईल आणि २३:१२ वाजता मार्गस्थ होईल. या गाडीला २ मे २०२६ ते ६ जून २०२६ या कालावधीत हा जादा थांबा देण्यात आला आहे.

​कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी ही माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली असून प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search