Category Archives: कोकण

अभिमानास्पद! केंद्र सरकारच्या ‘कॉफी टेबल बुक’मध्ये कोकणातील निर्मनुष्य बेटावरील ध्वजारोहणाला स्थान

   Follow us on        

सिंधुदुर्ग: देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करणाऱ्या आणि दुर्गम भागात कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दलाच्या कामगिरीची दखल आता थेट केंद्र सरकारने घेतली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील निवती पोलीस ठाण्याने ‘निवती रॉक’ या निर्मनुष्य बेटावर केलेल्या ऐतिहासिक ध्वजारोहणाचा समावेश केंद्र सरकारच्या विशेष ‘कॉफी टेबल बुक’ मध्ये करण्यात आला आहे.

अडथळ्यांची शर्यत आणि जिद्द
निवती किनाऱ्यापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या या बेटावर पोहोचणे अत्यंत कठीण असते. ज्या दिवशी हे ध्वजारोहण करण्यात आले, त्या दिवशी समुद्रात मोठी ओहोटी होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत बोटीने प्रवास करून, उभ्या कपारीच्या खडकावर चढून पोलिसांनी राष्ट्रध्वज फडकवला. पंतप्रधान मोदी यांनी निर्मनुष्य बेटांवर ध्वजारोहण करण्याबाबत मांडलेल्या संकल्पनेला अनुसरून ही मोहीम राबवण्यात आली होती.


“हा केवळ निवती पोलिसांचा सन्मान नसून संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. केंद्र सरकारने आमच्या कष्टाची दखल घेतली, याचा खूप आनंद आहे.”
— भीमसेन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक, निवती पोलीस ठाणे.

या यशामुळे निवती पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

नियतीपुढे जिद्द हरली! दहावीत ९९ टक्के गुण मिळवणारी कोकणची ‘नीट’ टॉपर सिद्धी भिडे हिचे वयाच्या २० व्या वर्षी निधन

 

   Follow us on        

बांदा (सिंधुदुर्ग):
एकीकडे यशाची शिखरे पादाक्रांत करायची जिद्द आणि दुसरीकडे शरीराला ग्रासलेला जीवघेणा आजार, अशा द्वंद्वात अखेर मृत्यूचा विजय झाला. दहावीत ९९ टक्के गुण मिळवून आणि NEET परीक्षेत कोकणात अव्वल येऊन डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सिद्धी शिवानंद भिडे (वय २०) हिचे शुक्रवारी कर्करोगाने निधन झाले. तिच्या निधनाने संपूर्ण बांदा शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.


कर्करोगावर मात करत मिळवले होते दैदिप्यमान यश


सिद्धी भिडे हिचा प्रवास कोणत्याही चित्रपटाला शोभेल असा प्रेरणादायी पण तितकाच क्लेशदायक होता. सातवीत असतानाच तिला कर्करोगाचे (Cancer) निदान झाले होते. मात्र, या संकटाने खचून न जाता तिने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. तिने दहावीच्या परीक्षेत तब्बल ९९ टक्के गुण मिळवून सर्वांना थक्क केले होते. त्यानंतर वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या NEET परीक्षेतही तिने कोकण विभागातून प्रथम येत आपले डॉक्टर होण्याचे स्वप्न जिवंत ठेवले होते.


डॉक्टर होऊन सेवा करण्याचे स्वप्न अपूर्ण


सिद्धीला स्वतः कॅन्सरचा त्रास होत असतानाही, भविष्यात डॉक्टर होऊन इतरांचे प्राण वाचवायचे होते. तिची जिद्द आणि चिकाटी पाहून ती नक्कीच एक उत्तम डॉक्टर झाली असती, अशी भावना तिचे शिक्षक आणि नातेवाईक व्यक्त करत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तिची प्रकृती खालावली आणि वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी तिची प्राणज्योत मालवली.

“समान मत, समान किंमत!” राजकीय नेत्यांना चिमटा काढणारा कणकवलीतील तो बॅनर लक्ष वेधतोय

   Follow us on    

 

 

कणकवली: निवडणुकीच्या काळात पैशांचा पाऊस पडतो, हे काही नवीन नाही. मात्र, याच पैशांच्या वाटपावरून आता मतदारांनी चक्क बॅनरबाजी करत राजकीय नेत्यांना चिमटा काढला आहे. कणकवली तालुक्यातील हळवल येथे लावण्यात आलेला एक बॅनर सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

​काय आहे बॅनरवर?

​हळवल ग्रामपंचायतीच्या प्रवेशद्वाराजवळच ग्रामस्थांनी एक मोठा बॅनर लावला आहे. त्यावर लिहिले आहे:

​”समान मत, समान किंमत..! शहरातील मतदारांना १५ हजार रू. देणाऱ्यांनी ग्रामीण भागातील मतदारांवर अन्याय करू नये!”

— ग्रामीण भागातील मतदार

​नेमके प्रकरण काय?

​मिळालेल्या माहितीनुसार, अलीकडेच झालेल्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीत मतदारांना १०,००० ते २५,००० रुपयांपर्यंत वाटप झाल्याची जोरदार चर्चा परिसरात रंगली होती. याच चर्चेचा धागा पकडून ग्रामीण भागातील मतदारांनी हा उपरोधिक बॅनर लावला आहे.

​”पैशाची हाव की लोकशाहीवर घाव?” असा यक्षप्रश्न या बॅनरच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. जर शहरात मताची किंमत एवढी मोठी असेल, तर ग्रामीण भागात भेदभाव का? असा तिरकस सवाल करत मतदारांनी राजकीय व्यवस्थेवर आणि निवडणूक प्रक्रियेवर उपरोधिक टीका केली आहे.

​सोशल मीडियावर व्हायरल

​या बॅनरचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार ‘स्लीपर विशेष’ एक्सप्रेस

   Follow us on    

 

 

कोकण रेल्वे: शनिवार-रविवारची प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने मडगाव जंक्शन आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) दरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांच्या फेऱ्यांचे सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहेत:

१. गाडी क्रमांक ०१००४ मडगाव – लोकमान्य टिळक (T) स्पेशल

​दिनांक: शनिवार, २४ जानेवारी २०२६.

​वेळ: मडगाव जंक्शनवरून दुपारी १६:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०५:५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

​२. गाडी क्रमांक ०१००३ लोकमान्य टिळक (T) – मडगाव स्पेशल

​दिनांक: रविवार, २५ जानेवारी २०२६.

​वेळ: लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सकाळी ०७:५५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २२:०० वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचेल.

​या विशेष गाड्या खालील स्थानकांवर थांबतील:

करमळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे.

​गाडीची रचना (Composition)

​या गाडीला एकूण २० डबे असतील, ज्यामध्ये:

​स्लीपर क्लास (Sleeper): १८ डबे

​एसएलआर (SLR): ०२ डबे

 

अखेर रेल्वे प्रशासन नरमले! चर्चेला तयार; नेमळेकर यांचे उपोषण स्थगित

२७ जानेवारीला कोकण रेल्वे मुख्यालयात तातडीची विशेष बैठक

   Follow us on    

 

 

नवी मुंबई (प्रतिनिधी) :

महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे सल्लागार व कोकण रेल्वेचे संस्थापक सदस्य श्री. सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर यांनी २६ जानेवारी २०२६ रोजी सुरू केलेल्या उपोषणासंदर्भात कोकण रेल्वे प्रशासनाशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर बेलापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी तसेच कोकण रेल्वेचे उप-मुख्य वाणिज्य व्यवस्थापक (कमर्शियल मॅनेजर) श्री. दिनेश जी. बोंडे यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. या चर्चेत विशेषतः सावंतवाडी टर्मिनस, कोल्हापूर–सावंतवाडी रेल्वे मार्ग, तसेच संध्याकाळची सावंतवाडीपर्यंत धावणारी अतिरिक्त विशेष रेल्वे या महत्त्वाच्या मागण्यांवर सखोल विचारविनिमय करण्यात आला.

चर्चेदरम्यान उपस्थित सर्व मुद्दे लेखी स्वरूपात नोंदवून घेण्यात आले असून, या विषयांवर कोकण रेल्वेच्या वाणिज्य (कमर्शियल) विभागातील संबंधित अधिकारी व अभियंत्यांसोबत विशेष बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील मुख्यालयात तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीत सर्व मागण्यांवर सविस्तर वाणिज्यिक चर्चा करून कायमस्वरूपी व ठोस तोडगा काढण्याचे आश्वासन कोकण रेल्वे प्रशासनाने दिले आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष श्री. अभिजीत धुरत, कोकण रेल्वेचे अधिकारी श्री. दिनेश बोंडे व पोलिस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने श्री. नेमळेकर यांचे उपोषण स्थगित करण्यात आले.

दरम्यान, कोकण रेल्वे प्रशासनाने आपल्या अधिकृत पत्राद्वारे महासंघाच्या मागण्या योग्य व विचारार्ह असल्याचे स्पष्ट संकेत दिले असून, येत्या बैठकीत सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

अरण्यातून साक्षात अवतरला ‘वन विनायक’; मळगावच्या खडपकर कुटुंबाची २६ वर्षांची अनोखी भक्तीगाथा

   Follow us on    

 

 

सावंतवाडी: निसर्ग आणि मानवाच्या नात्याचे अनेक पदर आपण अनुभवतो, पण सावंतवाडीच्या माळगावात एक असा चमत्कार घडला ज्याने श्रद्धेला नवी परिभाषा दिली. एका बाजूला पितृशोक आणि दुसऱ्या बाजूला बाप्पाच्या विसर्जनाचे दुःख अशा दुहेरी कात्रीत अडकलेल्या एका भक्ताला चक्क जंगलात ‘साक्षात देव’ भेटला. ही कथा आहे सुमन खडपकर आणि त्यांच्या घरी विराजमान असलेल्या ‘श्री वन विनायक’ या लाकडी मूर्तीची.

​जेव्हा ‘तो’ अरण्यात भेटला…

​वर्ष २००० ची ही गोष्ट. खडपकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. पितृनिधनामुळे घरच्या गणपतीचे विसर्जन अवघ्या दीड दिवसात करावे लागले. लाडक्या बाप्पाला इतक्या लवकर निरोप द्यावा लागल्याची सल सुमनजींच्या मनात होती. अशातच माळगावच्या घनदाट अरण्यातून जात असताना, त्यांना निसर्गाच्या कुशीत लाकडाच्या ओंडक्याला आलेला एक नैसर्गिक आकार दिसला. तो हुबेहूब ‘एकदंती’ गणपतीसारखा होता. जणू बाप्पानेच शब्द दिला होता – “विसर्जनाचे दुःख करू नकोस, मी आता तुझ्या घरी कायमचा वास्तव्याला येतोय.”

​श्रद्धेचा ‘अडीच दशकांचा’ प्रवास

​तेव्हापासून आजतागायत, म्हणजे तब्बल २६ वर्षे, ही नैसर्गिक लाकडी मूर्ती खडपकर कुटुंबाचा अविभाज्य हिस्सा आहे. गेल्या वर्षी या मूर्तीचे ‘श्री वन विनायक’ असे नामकरण करण्यात आले. दरवर्षी माघी गणेशोत्सवाचा सोहळा येथे एखाद्या उत्सवासारखा साजरा होतो. यंदाही सकाळी अभिषेक, पूजन आणि दुपारी महाप्रसादाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

​भक्तीचा ‘मळा’ आणि कीर्तनाची ‘सेवा’

​या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे सायंकाळची कीर्तन सेवा. स्वतः सुमन खडपकर जेव्हा आपल्या रसाळ वाणीने कीर्तन करतात, तेव्हा उपस्थित भक्त मंत्रमुग्ध होतात. यंदा त्यांना मयूर गवळी यांनी हार्मोनियमवर साथ दिली. केवळ एक धार्मिक विधी न राहता, या उत्सवाने माळगावच्या सांस्कृतिक जीवनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

​नात्यांची वीण आणि निसर्गाची ओढ

​आजच्या काळात जिथे माणसांमधील संवाद संपत चालला आहे, तिथे या ‘वन विनायकाने’ सर्वांना एकत्र गुंफले आहे. निसर्गाने स्वतः घडवलेली ही मूर्ती आणि खडपकर कुटुंबियांची त्याप्रती असलेली निष्ठा, हे श्रद्धा आणि पर्यावरणाच्या संगमाचे एक उत्तम उदाहरण ठरले आहे.

जनसेवेचा ‘संदेश’ आता राजकारणात; रेल्वे प्रवाशांच्या हक्कांसाठी लढणारे जिमन राजकीय आखाड्यात!

कसबा संगमेश्वर पंचायत समिती गणातून आपला “अपक्ष” उमेदवारी अर्ज दाखल केला!

   Follow us on    

 

 

रुपेश मनोहर कदम/सायले:

दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम ठरवलेल्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. काही दिवसांपूर्वी आपले मतप्रदर्शन करणारे संदेश जिमन यांनी जनसेवा दृष्टीपथात ठेवून हा निर्णय गांभीर्याने घेतला आहे. आजवर कोणत्याही प्रसिद्धीसाठी, मोठेपणा मिळवण्यासाठी आपण रेल्वे संबंधित कामे केली नाहीत.तालुक्यातील जनतेच्या समस्या जाणून त्यांचे निराकरण करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केले.

याच प्रयत्नातून संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात नेत्रावती, जामनगर, पोरबंदर, मडगाव या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसला थांबा मिळाला आहे. रेल्वे प्रवास आता पहिल्या पेक्षा कितीतरी पटीने आरामदायी झाला आहे.

हे काम करीत असताना वेळोवेळी राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी घ्याव्या लागत होत्या.

त्यामुळे या क्षेत्रातील व्यक्तींशी जवळून संपर्कात आलो असे त्यांनी म्हटले. माझी जन सेवेची तळमळ बघून सगळेच भारावून गेले असल्याचे त्यांनी म्हटले पण जेव्हा भक्कम आधारावर जनसामान्यांच्या सेवा सुविधांसाठी झटायचा विचार मनात आला.

निष्ठावंत,जवळचे, स्नेह संबंधित व्यक्तींचा लळा मला कोणत्याही पक्षाकडून तिकीट मिळवण्यासाठी अडसर ठरला आणि म्हणून हा अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. कसबा पंचायत समिती गणातील दुर्गम भागातील गावांचा विचार आपण प्रामुख्याने करणार!

आजवर गृहीत धरलेल्या समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न करणार. आजही या भागातील जनतेला,शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एसटीचा प्रवास, जनसामान्यांच्या पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष आणि हेळसांड,उपेक्षेचे दाखले देणारे रस्ते, जनतेच्या सुविधांसाठी असलेल्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी झटणार! जनतेच्या खऱ्या गरजा ओळखून त्यांना परिपूर्ण करण्यासाठी वेळ देणार! असे वक्तव्य पोटतिडकीने संदेश जिमन यांनी केले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले ज्या सह्याद्रीच्या खोऱ्यात छत्रपती संभाजीराजांचा श्वास खेळला, शौर्याचा लाव्हा उसळला त्या छत्रपतींचे कसबा संगमेश्वर या तालुक्याच्या ठिकाणी केवळ आंतरराष्ट्रीय स्मारक झाले आणि धन्य झालो एवढ्यावर न थांबता पर्यटन आणि स्थानिकांना रोजगार मिळवा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय कसबा गणातील महिला, पुरुष, गरजू व्यक्ती, दिव्यांग , यांच्या मदतीसाठी कायम प्रयत्नशील रहाणार असल्याचे म्हटले.

एकंदरीत एक युवा, सुशिक्षित, समाजसेवेची नाळ जाणणारा व्यक्ती या राजकीय परिघात प्रवेश करतो आहे. सद्यस्थितीत राजकारण आणि शिक्षण यांचा संबंध जवळजवळ नावालाही नसावा अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ग्लानीत असलेल्या मतदार बंधू भगिनींनी उमेदवार निवडून देताना विकास आणि विश्वासार्ह व्यक्तीमत्व यांची निवड केली तरच भविष्याचे चित्र बदलेल!

Kudal: पिंगुळी येथे दि.२९ जानेवारीला सद्गुरु समर्थ राऊळ महाराज यांच्या ४१ व्या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन

   Follow us on    

 

 

कुडाळ(प्रतिनिधी):
प.पू. सद्गुरू समर्थ राऊळ महाराज यांचा ४१वा पुण्यतिथी उत्सव दि.२९ते ३१ जानेवारी २०२६ पासून सद्गुरु राऊळ महाराज संस्थान, कुडाळ येथे सुरू होत असून या कालावधीमध्ये भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन संस्थानकडून करण्यात आले आहे. यावेळी विविध धार्मिक, सांस्कृतिक, कार्यक्रमासोबतच आरोग्य उपक्रम घेण्यात आला आहे.

 

कार्यक्रमाचा शुभारंभ प.पू. सद्गुरू समर्थ राऊळ महाराज यांच्या ‘ वर्णावी ती थोरी”या लीलामातृचे सामुदायिक पारायणाने उत्सवाला सुरुवात करण्यात येणार आहे. तद्वतच राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. संदीप बुवा मांडके रामदासी पुणे यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. यानिमित्ताने भरगच्च कार्यक्रमांची आयोजित करण्यात आले आहेत. दरम्यान मुख्य कार्यक्रमाला शनिवारी दि.३१जानेवारी रोजी पहाटे ५.३० वाजल्यापासून प्रारंभ होऊन नित्य काकड आरती ,सकाळी ९ ते१० या वेळेत राऊळ महाराज समाधी मंदिरात अभिषेक व सार्वजनिक गाऱ्हाणे त्यानंतर प.पू.विनायक अण्णा महाराज पादुका पूजन १०.३० ते ११.३० हरिपाठ – जीवन विद्या मिशन सद्गुरू श्री वामनराव पै प्रणित उपासना व संगीत साधना ११.३० ते १२.३० नामस्मरण श्रीपत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् सद्गुरू श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज नामस्मरण परिवार माणगाव दुपारी १२.३० ते १ समाधीस्थळी महाराजांची महाआरती त्यानंतर दुपारी १ते रात्री ११ अखंड महाप्रसाद तसेच यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध भागातून वारकरी भजन मंडळे आपली सेवा राऊळ महाराज चरणी सादर करतील. रात्रौ ८ते १० या वेळेत प.पू. राऊळनाथ नगरीतील नामवंत भजनी बुवांचे संयुक्त भजन होईल. ठिक ११ वाजता ‘लोकराजा ‘ सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेहरू यांचा महापौराणिक नाट्यप्रयोग ” ब्रम्हसंकेत सादर होईल.तरी समस्त राऊळ भाविकांनी सदर पुण्यतिथी उत्सवास मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. विठोबा विनायक (अण्णा) राऊळ सद्गुरू राऊळ महाराज संस्थान, श्री क्षेत्र पिंगुळी यांनी केले आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा मुद्दा ऐरणीवर

   Follow us on    

 

 

सिंधुदुर्ग | प्रतिनिधी: जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांचे वारे वाहू लागले असतानाच, सिंधुदुर्गातील जागरूक मतदारांनी विकासाचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि गेल्या दहा वर्षांपासून रखडलेला मुद्दा ऐरणीवर आणला आहे. ‘सावंतवाडी रेल्वे टर्मिनस’ पूर्ण करणाऱ्या उमेदवारालाच मत देणार, अशी ठाम भूमिका मतदारांनी खुल्या पत्राद्वारे जाहीर केली आहे.

केवळ रस्ते, वीज व पाणी यापुरते न थांबता जिल्ह्याच्या अर्थकारणाला चालना देणारा हा प्रकल्प तातडीने मार्गी लावावा, अशी जोरदार मागणी होत आहे. मतदारांनी मांडलेल्या मुद्द्यांनुसार, टर्मिनस पूर्ण झाल्यास मुंबई–पुण्याहून थेट रेल्वे सेवा सुरू होऊन ‘वीकेंड टुरिझम’ला मोठी चालना मिळेल. शिरोडा, वेंगुर्ला, देवगड, मालवण यांसारख्या पर्यटनस्थळांवर पर्यटकांची संख्या वाढेल. एका खासगी सर्वेक्षणानुसार दररोज ५०० नवीन पर्यटक आले, तरी वर्षाला सुमारे ५४ कोटी रुपयांची उलाढाल होऊ शकते. याशिवाय येथे प्रस्तावित ३९ कोटींच्या ‘रेल्वे बजेट हॉटेल’चे काम निधीअभावी रखडले असून तेही पूर्ण करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या दृष्टीनेही हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मतदारांचे म्हणणे आहे. सध्या देवगडचा हापूस आंबा व वेंगुर्ल्याचा काजू महागड्या ट्रकमार्गे वाशी मार्केटला पाठवावा लागतो. टर्मिनस सुरू झाल्यास रेल्वेमार्गे कमी खर्चात व कमी वेळेत मालवाहतूक शक्य होऊन शेतकऱ्यांचा नफा वाढेल.

तरुणांसाठी स्थानिक रोजगारनिर्मितीचा मोठा स्रोत म्हणूनही टर्मिनसकडे पाहिले जात आहे. गाड्यांची सफाई, पाणी भरणे, देखभाल आदी कामांतून स्थानिकांना रोजगार मिळेल. ‘एक स्थानक, एक उत्पादन’ या योजनेमुळे महिला बचत गट व लाकडी खेळणी व्यवसायाला कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध होईल.

दरम्यान, टर्मिनससाठी आवश्यक असलेला अप्रोच रोड सुमारे ९० टक्के पूर्ण झाला असला, तरी पाण्याचा प्रश्न अद्याप लालफितीत अडकलेला आहे. तिलारी धरणातून पाणीपुरवठ्यासाठी ‘जल जीवन मिशन’अंतर्गत १५ कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारकडे प्रलंबित आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास टर्मिनससह मळगाव, कुंभार्ली आणि ब्राह्मणपाट गावांचाही पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

गेल्या दहा वर्षांत केवळ भूमिपूजन झाल्या असून आता प्रत्यक्ष पूर्तता हवी, असा निर्वाणीचा इशारा मतदारांनी दिला आहे. जो उमेदवार आपल्या अधिकृत जाहीरनाम्यात ‘सावंतवाडी रेल्वे टर्मिनस व रेलोटेल प्रकल्प’ पूर्ण करण्याचे स्पष्ट वचन देईल आणि निवडून आल्यानंतर त्याचा सातत्याने पाठपुरावा करेल, त्यालाच मत दिले जाईल, असा निर्धार या खुल्या पत्रातून व्यक्त करण्यात आला आहे.

कोकणच्या स्वाभिमानाशी जोडलेला हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आपल्या ‘व्हिजन’मध्ये याला अग्रक्रम द्यावा, अशी अपेक्षा सिंधुदुर्गातील मतदार व्यक्त करत आहेत.

Konkan Expressway: प्रतीक्षा वाढली! मुंबई-गोवा प्रवास ६ तासांत पूर्ण करणाऱ्या प्रकल्पाबाबत मोठी अपडेट

   Follow us on    

 

 

मुंबई: कोकणच्या विकासाला नवी दिशा देणारा आणि मुंबई-गोवा प्रवासाचे अंतर निम्म्यावर आणणारा ‘कोकण एक्स्प्रेसवे’ (Konkan Expressway) आता खऱ्या अर्थाने चर्चेत आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) या महत्त्वाकांक्षी ग्रीनफिल्ड प्रकल्पाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज्याचे सध्या सुरू असलेले पुणे रिंग रोड आणि जालना-नांदेड एक्स्प्रेसवे यांसारखे मोठे प्रकल्प मार्गी लागल्यानंतर, तत्काळ कोकण एक्स्प्रेसवेच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात केली जाणार आहे.

​अभियांत्रिकीचा अद्भुत अविष्कार

कोकणची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता, हा एक्स्प्रेसवे उभारणे हे अभियांत्रिकीसाठी मोठे आव्हान असणार आहे. रायगड जिल्ह्यातील बळवलीपासून सुरू होऊन थेट सिंधुदुर्गच्या पत्रादेवीपर्यंत जाणाऱ्या या मार्गावर निसर्गाचा समतोल राखत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. या प्रकल्पामध्ये एकूण ४१ बोगदे, २१ मोठे पूल आणि ५१ व्हायाडक्ट्सचा (उड्डाणपूल) समावेश असेल. डोंगराळ भागातून रस्ता काढताना प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी हा मार्ग ‘घाटमुक्त’ ठेवण्यात येणार आहे, हे या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य ठरेल.

​वेळेची मोठी बचत आणि पर्यटनाला चालना

सध्या मुंबई ते गोवा प्रवासासाठी प्रवाशांना राष्ट्रीय महामार्ग ६६ किंवा कोकण रेल्वेवर अवलंबून राहावे लागते, ज्यासाठी १० ते १२ तासांचा वेळ लागतो. मात्र, हा ६ पदरी एक्स्प्रेसवे पूर्ण झाल्यावर मुंबई ते पत्रादेवी (महाराष्ट्र-गोवा सीमा) हे अंतर अवघ्या ५ तासांत पार करता येईल. तिथून पणजी केवळ एका तासाच्या अंतरावर असल्याने, मुंबई ते पणजी हा प्रवास फक्त ६ तासांत पूर्ण होईल. यामुळे केवळ प्रवासाचा वेळच वाचणार नाही, तर कोकणातील आंबा, काजू उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला आंतरराष्ट्रीय दर्जाची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.

​प्रशासकीय तयारी आणि नियोजन

MSRDC ने स्पष्ट केल्यानुसार, या प्रकल्पाची व्याप्ती आणि गुंतागुंत मोठी असल्याने त्याचे नियोजन अत्यंत सूक्ष्म पद्धतीने केले जात आहे. भूसंपादनाची प्रक्रिया आणि तांत्रिक सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर कामाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होईल. या महामार्गामुळे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांतील दळणवळण व्यवस्था पूर्णपणे बदलून जाईल आणि स्थानिक रोजगाराच्या संधींमध्ये मोठी वाढ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search