Category Archives: कोकण

​’लालपरी’ झाली जलपरी! चालत्या बसमध्ये छत्री उघडून बसण्याची प्रवाशांवर नामुष्की!

   Follow us on        

सावंतवाडी:

“बहुजन हिताय, बहुजन सुखाय” हे ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी) कारभार चौकुळ-कुंभवडे मार्गावर मात्र प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. या मार्गावर धावणारी एकमेव एसटी बस पूर्णपणे गळकी झाली असून, प्रत्येक पावसाळ्यात प्रवाशांना चक्क बसमध्ये बसूनही छत्र्या उघडाव्या लागत आहेत. या गंभीर समस्येमुळे हैराण झालेल्या उल्हास पनवेलकर, स्वरांगी गावडे, समिक्षा गावडे, कमलेशकुमार गावडे, सुनिता गावडे, कृष्णा गावडे, प्रकाश जाधव, राहुल चव्हाण, ऋतुराज गावडे, सुरेश गावडे आदी नागरिकांनी एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रकांकडे लेखी निवेदन देऊन ही बस तातडीने बदलण्याची मागणी केली आहे.

​या मार्गावरील एसटीवर विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी आणि नोकरदार वर्ग रोजच्या प्रवासासाठी पूर्णपणे अवलंबून आहेत. मात्र, बसच्या छतातून पाणी गळत असल्याने प्रवाशांचे कपडे, विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य आणि नोकरदारांची महत्त्वाची कागदपत्रे भिजून नुकसान होत आहे. त्यामुळे हा प्रवास अत्यंत त्रासदायक आणि असुरक्षित बनला आहे. प्रवाशांनी लेखी निवेदन देऊनही प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही, ज्यामुळे स्थानिक प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.

​”महामंडळाकडे नवीन बसेस उपलब्ध आहेत, मग चौकुळ-कुंभवडे मार्गावरील प्रवाशांच्या नशिबीच ही गळकी बस का? ग्रामीण भागातील नागरिक एसटी प्रशासनासाठी दुय्यम आहेत का?” असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. महामंडळाने केवळ घोषणाबाजी न करता प्रत्यक्षात सुरक्षित, स्वच्छ आणि सुस्थितीतील बस उपलब्ध करून देणे ही त्यांची जबाबदारी आहे, अन्यथा “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” हे ब्रीदवाक्य केवळ फलकापुरतेच उरेल, अशी टीकाही केली जात आहे. प्रशासन आता तरी खडबडून जागे होऊन चौकुळ-कुंभवडे मार्गावरील गळकी एसटी तातडीने बदलणार की प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत पाहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सावंतवाडी टर्मिनस इमारत कामाची निविदा जारी; ईमेल मोहीम व कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या लढ्याला यश

   Follow us on        

सिंधुदुर्ग: सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या भूमिपूजन सोहळ्याला तब्बल ११ वर्षे पूर्ण झाली, तरीही टर्मिनसची कामे रखडलेलीच होती. या अन्यायाविरुद्ध ‘कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी’ यांच्या वतीने नुकतीच एक व्यापक ईमेल मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे आणि निर्माण झालेल्या दबावामुळे अवघ्या ५ दिवसांत रेल्वे प्रशासनाला जाग आली असून, सावंतवाडी टर्मिनस टप्पा-२ अंतर्गत रखडलेल्या मुख्य टर्मिनस इमारतीच्या कामाची अधिकृत निविदा (Tender) अखेर जारी करण्यात आली आहे.

१००० पेक्षा जास्त ईमेल आणि डिजिटल मीडियाचा खंबीर पाठिंबा

या मोहिमेदरम्यान कोकण रेल्वे महामंडळ, रेल्वे बोर्ड आणि राज्य शासनाला रखडलेल्या कामांच्या तपशिलासह तब्बल १००० पेक्षा जास्त ईमेल पाठवण्यात आले होते. या जनआंदोलनाला ‘दैनिक पुढारी’सह विविध वृत्तपत्रे आणि डिजिटल मीडियाने खंबीर साथ दिल्यामुळे शासन व प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला आणि अखेर ही निविदा काढण्यात आली. टर्मिनस प्रेमींनी हा आपल्या सर्वांच्या एकजुटीचा आणि लढ्याचा विजय असल्याचे म्हटले आहे.

कोकणातील आमदारांना साकडे

सध्या राज्य शासनाचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने, मुंबई आणि कोकणातील सर्व विधानसभा व विधानपरिषद आमदारांना संघटनेने भावनिक साकडे घातले आहे. राज्य शासनाच्या अधीन असलेल्या ‘तिलारी आंतरराज्य धरणातून पाणी पुरवठा योजना’ आणि ‘रत्नसिंधू समृद्धी योजनेतून’ होणाऱ्या सावंतवाडी टर्मिनसच्या कामांना या अधिवेशनात तातडीने मंजुरी मिळवून द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

गणेशोत्सव अवघ्या काही महिन्यांवर आला असून दरवर्षी मुंबईहून गावी येणाऱ्या चाकरमान्यांना प्रवासात मोठा त्रास सहन करावा लागतो. हा त्रास कमी करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी आताच ठोस पावले उचलावीत, असे आवाहन कोकण रेल्वे प्रवासी संघटना आणि समस्त कोकणवासीयांनी केले आहे.

लढा अद्याप संपलेला नाही; प्रमुख मागण्या कायम

रेल्वेने केवळ इमारतीच्या कामाची निविदा काढली असली, तरी प्रवाशांच्या खऱ्या सोयीसाठी पुढील मागण्यांवर कोकण रेल्वे महामंडळाने त्वरित विचार करून निधीची तरतूद करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे:

प्लॅटफॉर्मवर संपूर्ण शेड: पावसाळी व उन्हाळी संरक्षणासाठी प्लॅटफॉर्मवर ‘संपूर्ण शेड’ उभारणे.

नवा प्लॅटफॉर्म: गाड्यांची संख्या वाढवण्यासाठी ‘अजून एक नवीन प्लॅटफॉर्म’ तयार करणे.

अतिरिक्त रेल्वे रुळ: अतिरिक्त रेल्वे रुळांची (ट्रॅक) निर्मिती करणे.

या सर्व प्रमुख मागण्या आणि कामे मार्गी लावण्याचा लढा यापुढेही कायम राहील, असा निर्धार कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने व्यक्त केला आहे.

सिंधुदुर्गातील ६,७१० शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा; ५३.८३ कोटींची कर्जमाफी मंजूर

   Follow us on        

​सिंधुदुर्ग नगरी:

शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल ६ हजार ७१० शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. या सर्व पात्र शेतकऱ्यांना एकूण ५३ कोटी ८३ लाख २० हजार ४९१ रुपयांच्या कर्जमाफीचा मोठा लाभ मिळणार आहे. पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती शासनाच्या विशेष पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले असून, ही प्रक्रिया पूर्ण होताच पात्र लाभार्थ्यांची अधिकृत यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

​या कर्जमाफी योजनेमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ४,००८ शेतकऱ्यांचा समावेश असून, त्यांची २० कोटी ६९ लाख ५४ हजार रुपयांची कर्जमाफी होणार आहे. तर जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयीकृत, व्यापारी व ग्रामीण बँकांमधील २,७०२ शेतकऱ्यांना एकूण ३३ कोटी १३ लाख ६३ हजार ४९१ रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. याशिवाय, जे शेतकरी आपल्या कर्जाची नियमित परतफेड करतात, अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढील टप्प्यात ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार असून त्यासाठी स्वतंत्र पात्र यादी तयार केली जाणार आहे.

​दुसरीकडे, शासनाने निश्चित केलेल्या कालावधीपूर्वीची कर्जे असणे, तसेच काही कर्जदार विविध शासकीय किंवा इतर पदांवर कार्यरत असणे अशा विविध कारणांमुळे जिल्ह्यातील काही शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरले असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील थकीत कर्जखात्यांची माहिती शासकीय लेखापरीक्षकांकडून तपासण्यात आली आहे. सर्व माहिती पोर्टलवर अपलोड झाल्यानंतर शासनाकडून संगणकीय पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर ‘आधार प्रमाणीकरणासाठी’ पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल. ही यादी निबंधक कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था आणि स्थानिक स्तरावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे यादी प्रसिद्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांनी सेवा सुविधा केंद्रांमार्फत आपले आधार प्रमाणीकरण वेळेत पूर्ण करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

राजापूर: रेल्वेच्या धडकेत ४ दुभत्या म्हशींचा मृत्यू; संरक्षक फेन्सिंगची मागणी

   Follow us on        

राज्यापूर: तालुक्यातील मोसम येथील सरवणकरवाडी परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. तातडीने मिळालेल्या माहितीनुसार, तळगाव येथील एका गरीब शेतकऱ्याच्या चार दुभत्या म्हशी चाऱ्याच्या शोधात मोसम परिसरातील रेल्वे मार्गाजवळ गेल्या होत्या. त्याचवेळी तिथून जाणाऱ्या एका भरधाव रेल्वेने त्यांना जोराची धडक दिली. या भीषण अपघातात चारही म्हशींचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचे सुमारे ५ लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दुभती जनावरे दगावल्याने संपूर्ण कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

​स्थानिक नागरिकांनी आणि ग्रामस्थांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, राजापूर तालुक्यातून जाणाऱ्या रेल्वे मार्गाच्या अनेक संवेदनशील भागांमध्ये आजही रेल्वे प्रशासनाने कोणतीही संरक्षक फेन्सिंग (कुंपण) उभारलेली नाही. त्यामुळे जनावरे सहजपणे रेल्वे रुळांवर पोहोचतात आणि अशा अपघातांना बळी पडतात. या भागात डिसेंबर महिन्यानंतर गुरे मोकाट सोडण्याची प्रथा असल्याने, जनावरे चाऱ्याच्या शोधात रेल्वे मार्गाकडे आकर्षित होतात. फेन्सिंगचा अभाव असल्यामुळे यापूर्वीही अनेक बैल, गाई आणि म्हशींचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला आहे, मात्र प्रशासनाने अद्याप कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना केलेली नाही.

​सर्वात खेदाची बाब म्हणजे, अशा अपघातांमध्ये जनावरे दगावल्यानंतर शेतकऱ्यांना रेल्वे प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक नुकसानभरपाई मिळत नाही. शेतीसोबतच दुग्धव्यवसायावर उदरनिर्वाह करणाऱ्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी दुभत्या जनावरांचा मृत्यू हा एक दुहेरी आर्थिक फटका ठरतो. या गंभीर परिस्थितीची पार्श्वभूमी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी आणि रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूंना भक्कम संरक्षक फेन्सिंग बसविण्यात यावी, अशी आग्रही मागणी आता जोर धरू लागली आहे.

Konkan Railway: कोकण रेल्वेत २३ लाख रुपयांचा गैरव्यवहार; प्रकरण न्यायालयात

   Follow us on        

मडगाव:

मडगाव आणि वेर्णा येथील कोकण रेल्वेच्या रनिंग रूमच्या देखभालीच्या कामात सुमारे २३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) भ्रष्टाचार प्रतिबंधक शाखेने मोठी कारवाई केली आहे. या कथित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी सीबीआयने कोकण रेल्वेच्या दोन अधिकाऱ्यांसह दोन कंत्राटदारांविरुद्ध दक्षिण गोव्याच्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये मडगाव विभागाचे तत्कालीन वरिष्ठ प्रादेशिक यांत्रिक अभियंता मंजनाथ क्षेत्रपाल, तत्कालीन मुख्य लोको निरीक्षक गोर्धनलाल बलई आणि कंत्राटदार एम. के. बेलवाडी व उदय के. बेलवाडी यांचा आरोपी म्हणून समावेश आहे.

​दक्षिण गोवा विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश शर्मिला पाटील यांनी २९ जून २०२६ रोजी या प्रकरणातील काही आरोपांमध्ये अंशतः बदल करण्यास परवानगी दिली. त्यानंतर सीबीआयने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय दंड संहितेअंतर्गत फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, कट रचणे आणि खोटी कागदपत्रे वापरणे अशा विविध कलमांखाली हे आरोपपत्र सादर केले आहे.

​सीबीआयच्या आरोपपत्रानुसार, जून २०१८ ते जून २०१९ या कालावधीत मडगाव आणि वेर्णा येथील रनिंग रूमच्या देखभालीसाठी सादर करण्यात आलेल्या बिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळून आली. कंत्राटदारांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) आणि कर्मचारी राज्य विमा योजना (ईएसआयसी) संदर्भातील बनावट कागदपत्रे जोडून खर्च फुगवून दाखवला होता. तपासात असे समोर आले आहे की, प्रत्यक्षात कामावर नसलेल्या कर्मचाऱ्यांच्या नावाने वेतन, ईपीएफ आणि ईएसआयसी योगदानाचा खोटा खर्च दाखवून सुमारे २३ लाख रुपयांचा आर्थिक लाभ उठवण्यात आला. या गैरव्यवहारामुळे कोकण रेल्वेचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, आता या प्रकरणाची पुढील सुनावणी विशेष न्यायालयात होणार आहे.

आंबोलीत विजेच्या तारेचा धक्का लागून गाभण म्हशीसह रेडकाचा मृत्यू

   Follow us on        

आंबोली:

येथील मुळवंदवाडी भागात जमिनीवर पडलेल्या जिवंत विद्युत वाहिनीच्या (वीज तारेच्या) संपर्कात आल्याने एका गाभण म्हशीसह रेडकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मुळवंदवाडी येथील शेतकरी भिसाजी महादेव सरमळकर यांची गुरे शेतात चरण्यासाठी गेली असता हा अपघात झाला. या घटनेत शेतकरी सरमळकर यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सुदैवाने, परिसरातील नागरिक गणपत गावडे यांनी प्रसंगावधान राखत इतर जनावरांना पुढे जाण्यापासून रोखल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.

​घटनेची माहिती मिळताच महावितरण आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. प्रशासनाच्या वतीने मृत गुरांचा रीतसर पंचनामा करण्यात आला असून, बाधित शेतकरी सरमळकर यांना नियमानुसार योग्य ती नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे. पंचनामा पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्याने गुरांचे मृतदेह ताब्यात घेतले. दरम्यान, आंबोलीतील नांगरतास भागात नव्याने बसविण्यात आलेले विद्युत पोल धोकादायक स्थितीत असल्याकडे स्थानिक नागरिकांनी लक्ष वेधले असून, पावसाळ्याचे दिवस असल्याने महावितरणने तातडीने उपाययोजना करून वीज वाहिन्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

कुडाळमध्ये बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

   Follow us on        

कुडाळ:

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ बाजारपेठेत वन्यजीवांच्या अवयवांची बेकायदेशीर खरेदी-विक्री आणि तस्करी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा वन विभागाने यशस्वी पर्दाफाश केला आहे. येथील प्रसिद्ध ‘मसुरकर जेम्स’ या दुकानावर वन विभागाच्या संयुक्त पथकाने अचानक छापा टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ३० जून २०२६ रोजी सावंतवाडीच्या वनक्षेत्रपालांना या बेकायदेशीर काळ्याबाजाराविषयी गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सावंतवाडी व कुडाळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन पंचांसमक्ष या दुकानाची अचानक झडती घेतली. या कारवाईदरम्यान दुकानातून अत्यंत धक्कादायक आणि गंभीर बाबी उघडकीस आल्या.

​दुकानाच्या झडतीमध्ये वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या अनुसूची १ अन्वये अत्यंत संरक्षित असलेल्या बिबट्याची शिकार करून तयार केलेले अनेक अवयव हस्तगत करण्यात आले. यामध्ये बिबट्याची ६ अस्सल नखे, वन्यप्राण्यांच्या शिंगांपासून तयार केलेली ६ बनावट नखे, बिबट्यांच्या नखांचे इतर २० अवयव आणि बिबट्याचे २ सुळे (दात) यांचा समावेश आहे. शिकार करून हे अवयव केवळ विक्रीच्या उद्देशाने दुकानात बेकायदेशीरपणे बाळगण्यात आले होते. वनविभागाने हा सर्व मुद्देमाल जागीच जप्त केला आहे.

​या खळबळजनक प्रकरणातील मुख्य संशयित आणि दुकानाचा मालक अजित वसंत मसुरकर याला वन विभागाने तात्काळ अटक केली आहे. आरोपीने बिबट्याची नखे आणि अवयव विक्रीसाठी बाळगल्याचा गुन्हा मान्य केला आहे. त्याला कुडाळच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला २ दिवसांची वनकोठडी (Forest Custody) सुनावली आहे. ही धडक कारवाई सावंतवाडीचे उपवनसंरक्षक मिलीश शर्मा आणि कोल्हापूर दक्षता विभागाचे विभागीय वनाधिकारी संजय वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली, अशी माहिती कुडाळचे वनक्षेत्रपाल चेतन पाटील यांनी दिली.

कोकण रेल्वेच्या १७ महिला स्टेशन मास्तरांना ‘विशेष कार्यसन्मान पुरस्कार’

   Follow us on        

रत्नागिरी:

गेली १४ वर्षे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०३ व्यक्ती आणि ५ संस्था यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करणाऱ्या बोडस चॅरिटेबल ट्रस्टने यावर्षी आपल्या वर्धापनदिनी एक कौतुकास्पद व ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सन २०२६ च्या वर्धापनदिनानिमित्त कोकण रेल्वेच्या १७ महिला स्टेशन मास्तरांना ‘विशेष कार्यसन्मान पुरस्कार’ देण्याचे ट्रस्टने जाहीर केले आहे. महिला सक्षमीकरण उपक्रमाचा एक भाग म्हणून हा विशेष सन्मान केला जाणार आहे. सेवा काळात या महिला स्टेशन मास्तरांनी दाखवलेले कमालीचे प्रसंगावधान, चाकोरीबाहेर जाऊन केलेले प्रवाशांचे संरक्षण, रस्ता चुकलेल्यांची त्यांच्या घरच्यांशी घडवून आणलेली पुनर्भेट, रोखलेल्या संभाव्य आत्महत्या आणि कसोटीच्या वेळी दाखवलेले धैर्य व तत्परता याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले आहे.

​बोडस चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यक्षेत्रातील दिवाणखावटी ते मडूरे या २६ स्थानकांपैकी १७ स्थानकांवर कार्यरत असलेल्या महिला स्टेशन मास्तरांना या पुरस्कारांतर्गत व्यक्तिगत सन्मानपत्र, शाल आणि एक पुस्तक देऊन गौरविण्यात येणार आहे. ३१ मे २०२६ अखेर कार्यरत असलेल्या महिला स्टेशन मास्तरांसाठी हा एकच निकष लावून ही निवड करण्यात आली आहे. या सन्मानमूर्तींमध्ये ७ महिला स्टेशन मास्तर रत्नागिरी जिल्ह्यातील असून १० जणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत. कोकण रेल्वेच्या सेवा नियमांचे पालन करून या उपक्रमांतर्गत गौरविमूर्तींना कोणत्याही स्वरूपाचा आर्थिक लाभ दिला जाणार नाही. या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमासाठी कोकण रेल्वेचे रत्नागिरीचे क्षेत्रीय प्रबंधक शैलेश बापट आणि जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी विशेष सहकार्य केले आहे.

​पुरस्कार जाहीर झालेल्या १७ महिला स्टेशन मास्तरांचा सेवाकालावधी ४ वर्षे ते ३० वर्षे असा व्यापक आहे. यामध्ये मडूरे स्टेशनच्या प्रतीक्षा लक्ष्मण गावकर या सर्वात सेवाज्येष्ठ आहेत, तर रत्नागिरी स्टेशनच्या चैताली राजेंद्र कल्याणकर या सर्वात तरुण स्टेशन मास्तर आहेत. एकूण १७ पैकी १५ महिला स्टेशन मास्तर मुळच्या कोकणातीलच रहिवासी आहेत. यापैकी सौ. अनुराधा रितेश पवार या सावंतवाडी स्थानकावरून जून २०२६ मध्ये २२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाल्या आहेत. या प्रकल्पासाठी एकूण ९ महिला स्टेशन मास्तर या रेल्वेसाठी जमीन गेलेल्या प्रकल्पग्रस्त गटातील आहेत, २ जणी अनुकंपा तत्त्वावर लागून पदोन्नती झालेल्या आहेत, तर उर्वरित ६ महिला थेट स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन सेवेत रुजू झाल्या आहेत. विशेष बाब म्हणजे यातील ३ जणींचे पतीसुद्धा कोकण रेल्वेमध्येच कार्यरत आहेत. तसेच सौ. अनघा राजाराम नाटेकर यांनी १९९५ मध्ये रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या उभारणीसाठी रोजंदारीवर देखील काम केले होते, ही एक गौरवास्पद बाब आहे.

​या गौरविमूर्तींपैकी ५ जणींना विविध वर्षी कोकण रेल्वेच्या अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांच्या (CMD) पुरस्काराने आधीच सन्मानित करण्यात आलेले आहे. २ जणींना रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे १००० रुपयांचे विशेष रोख पारितोषिक, तर २ जणींना रत्नागिरी क्षेत्रीय प्रबंधक यांचे विशेष प्रमाणपत्र आणि १००० रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. तसेच चैताली राजेंद्र कल्याणकर यांना त्यांच्या कार्यमूल्यमापनात प्रथम आल्यामुळे ‘केआरए’ पुरस्कार प्राप्त आहे, तर सौ. मनीषा हरिश्चंद्र तटकरी यांना दोन वेगवेगळ्या वर्षी दोन वेगवेगळ्या स्थानकांवर दोन वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत.

​पुरस्कार प्राप्त १७ महिला स्टेशन मास्तरांमध्ये मनीषा हरिश्चंद्र तटकरी (कळंबणी बुद्रुक), अस्मिता तुकाराम सावंत (खेड), श्रद्धा समीर चिले (खेड), शिल्पा शंकर दपके (चिपळूण), निकिता निलेश पवार (कडवाई), अनघा राजाराम नाटेकर (रत्नागिरी), चैताली राजेंद्र कल्याणकर (रत्नागिरी), प्राजक्ता प्रदीप कांबळे (खारेपाटण), अंजली श्रीराम चाळके (नांदगाव), मनस्वी सुभाष कदम (नांदगाव), विशालम दिनेश बेटकर (कणकवली), रंजना दीपक माने (कणकवली), सुविधा इमानवेल स्वामी (सिंधुदुर्ग), मेघा कमलाकर नागवेकर (सिंधुदुर्ग), प्रज्ञा भालचंद्र नाईक (झारप), अनुराधा रितेश पवार (सावंतवाडी) आणि प्रतीक्षा लक्ष्मण गावकर (मडूरे) यांचा समावेश आहे. जुलै महिन्यातील पहिल्या १० दिवसांत एकूण १२ महिला स्टेशन मास्तरांचा सन्मान त्यांच्या सेवेच्या ठिकाणी प्रत्यक्ष केला जाणार असून, उर्वरित ५ महिला स्टेशन मास्तरांचे सन्मान साहित्य त्यांच्या पत्त्यावर स्पीड पोस्टाने पाठविले जाईल, अशी माहिती बोडस चॅरिटेबल ट्रस्टच्या खजिनदार ॲड. सौ. आदिती अभिजित पटवर्धन यांनी दिली आहे.

शासकीय योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी ‘अँग्री स्टॅक फार्मर आयडी’ काढणे बंधनकारक

   Follow us on        

सिंधुदर्गनगरी, दि. ३०:

केंद्र आणि राज्य शासनाच्या ‘अँग्रीस्टॅक डिजिटल कृषी मिशन’ अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याचा एक युनिक (स्वतंत्र) ‘फार्मर आयडी’ (Farmer ID) तयार करण्याची विशेष मोहीम सध्या सिंधुदुर्ग जिल्हाभर राबविण्यात येत आहे. आगामी हंगामापासून शासकीय योजनांचे लाभ मिळण्यात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सर्व शेतकऱ्यांनी हा आयडी काढून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आंबा, काजू, भात, नारळ उत्पादक शेतकरी बांधवांनी, तसेच ग्रामपंचायत सदस्य, लोकप्रतिनिधी, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPCs) आणि महिला बचत गटांनी या मोहिमेत शासकीय यंत्रणेला सहकार्य करावे आणि गावातील १००% शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.

फार्मर आयडी’ शेतकऱ्यांसाठी का महत्त्वाचा आहे?

हा डिजिटल आयडी तयार केल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक शासकीय प्रक्रिया आणि योजनांचा लाभ मिळवणे अत्यंत सोपे होणार आहे:

सर्व योजना एकाच ठिकाणी: पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी यांसह शासनाच्या सर्व आर्थिक योजनांचा लाभ या एकाच आयडीच्या माध्यमातून थेट बँक खात्यात जमा होईल.

नोंदणी प्रक्रियेत सुलभता: पीक विमा, केसीसी (KCC) कर्ज, फळबाग अनुदान, तसेच कोकणातील विशेष आंबा-काजू प्रक्रिया योजनांसाठी लागणारी नोंदणी प्रक्रिया यामुळे अधिक सोपी होईल.

डिजिटल जोडणी: शेतकऱ्यांची ‘ई-पीक पाहणी’, ७/१२ (सातबारा) आणि ८अ चा उतारा ही सर्व महत्त्वाची कागदपत्रे या आयडीशी डिजिटली जोडली जाणार आहेत.

कागदपत्रांच्या कटकटीतून मुक्ती: एकदा हा आयडी तयार झाल्यानंतर, भविष्यात कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार कागदपत्रे सादर करण्याची गरज पडणार नाही.

कोकणासाठी विशेष लाभ: कोकणातील मुख्य पिके असलेल्या आंबा व काजू उत्पादकांसाठी येणाऱ्या विशेष योजनांचा लाभ थेट आणि गतीने मिळेल.

थेट नुकसान भरपाई: नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाल्यास, पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणारी मदत थेट आणि कोणत्याही विलंबाशिवाय प्राप्त होईल.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे:

१. आधार कार्ड आणि आधार कार्डशी लिंक असलेला चालू मोबाईल नंबर.

२. जमिनीचा अद्ययावत ७/१२ आणि ८अ उतारा.

नोंदणी कुठे आणि कशी करावी?

शेतकऱ्यांना नोंदणीसाठी दोन सोपे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत:

सीएससी केंद्र: आपल्या गावातील जवळच्या ‘महा-ई-सेवा केंद्रात’ (CSC Center) जाऊन शेतकरी ही नोंदणी करू शकतात.

स्वयं-नोंदणी: शेतकरी स्वतः मोबाईल किंवा संगणकाच्या सहाय्याने https://agristack.gov.in या अधिकृत शासकीय पोर्टलला भेट देऊन आपली नोंदणी पूर्ण करू शकतात.

शासकीय योजनांचा लाभ अखंडित सुरू ठेवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी विनाविलंब आपली नोंदणी पूर्ण करावी, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या नियमित गाड्यांची क्षमता वाढवा

   Follow us on        

मुंबई:कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर, गाड्यांची प्रवासी क्षमता वाढवण्यासाठी कोकण विकास समितीने रेल्वे प्रशासनाकडे आक्रमक पावले उचलण्याची मागणी केली आहे. सध्या रोहा ते मडगाव दरम्यानचा कोकण रेल्वेचा मार्ग तब्बल १६८% क्षमतेने धावत असून, रेल्वे मार्गाच्या मर्यादेमुळे नवीन गाड्या सोडणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा परिस्थितीत, उपलब्ध गाड्यांनाच कमाल डबे (Coaches) जोडून क्षमता वाढवणे हाच एकमेव प्रभावी आणि किफायतशीर उपाय असल्याचे समितीने म्हटले आहे. कोकण विकास समितीच्या नागरी व ग्रामीण विभागाचे जयवंत शंकर दरेकर आणि अक्षय मधुकर महापदी यांनी याबाबत रेल्वे बोर्ड, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) आणि संबंधित रेल्वे विभागांना सविस्तर प्रस्ताव पाठवून त्वरित कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.

​समितीने दिलेल्या प्रस्तावामध्ये प्रामुख्याने १० महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. यामध्ये मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस ८ वरून २० डब्यांची करणे, मुंबई-मंगळुरू एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस आणि जनशताब्दी एक्सप्रेस या गाड्या १६ वरून २२ डब्यांच्या करणे, तसेच सावंतवाडी-दिवा आणि रत्नागिरी-दिवा एक्सप्रेस २२ डब्यांपर्यंत वाढवणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय तुतारी एक्सप्रेस, मडगाव-बांद्रा एक्सप्रेस, पुणे-एर्नाकुलम एक्सप्रेस आणि गरीब रथ एक्सप्रेस या गाड्याही त्यांच्या कमाल क्षमतेने चालवण्याची मागणी करण्यात आली आहे. देखभाल दुरुस्तीसाठी मडगाव येथे पिट लाईनची लांबी वाढवणे किंवा काही गाड्यांचे टर्मिनस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) किंवा दादर येथे हलवून या तांत्रिक अडचणींवर मात करता येऊ शकते, असा पर्यायही समितीने सुचवला आहे.

​हा प्रस्ताव तातडीने मंजूर झाल्यास कोकण रेल्वे मार्गावर दररोज सुमारे ४५ अतिरिक्त डबे उपलब्ध होतील, ज्यामुळे प्रवाशांसाठी दररोज तब्बल ३,६९१ अतिरिक्त जागा (Seats) निर्माण होऊ शकतील. हा बदल म्हणजे या संतृप्त (saturated) मार्गावर एकही नवीन ट्रेन न चालवता, दोन्ही दिशांनी प्रत्येकी दोन नवीन पूर्ण लांबीच्या गाड्या सुरू करण्यासारखेच आहे. वर्षभर आरक्षणासाठी लागणाऱ्या लांबच लांब प्रतीक्षा याद्या आणि प्रवाशांचे होणारे हाल थांबवण्यासाठी रेल्वे बोर्डाने यावर कालबद्ध नियोजन करून अंमलबजावणी करावी, अशी मागणी कोकण विकास समितीने केली आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search