Category Archives: कोकण

कोकण रेल्वेसंबंधी विविध मागण्यांसाठी प्रवासी संघटनांनी घेतली आमदार माधवी नाईक यांची भेट

   Follow us on        

ठाणे: कोकण आणि रेल्वे प्रवाशांच्या विविध मागण्यांसाठी शनिवार, १ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी विधानपरिषद आमदार सौ. माधवी नाईक यांची ठाणे येथील कार्यालयात भेट घेतली. या बैठकीत कोंकण विकास समिती, सिंधुदुर्ग मराठा विकास मंडळ, ठाणे, कोकण रेल्वे प्रवासी संघटना (सावंतवाडी) आणि महाराष्ट्र रेल्वे परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

​यावेळी, नव्याने मान्यता मिळालेल्या मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – सावंतवाडी रोड दैनिक एक्सप्रेसबद्दल आमदार सौ. माधवी नाईक यांच्यासह रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानण्यात आले. तसेच, सावंतवाडी टर्मिनसच्या दुसऱ्या टप्प्यातील काम पूर्ण होण्यासाठी आवश्यक प्रशासकीय मान्यता मिळवून देण्यात सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली. याशिवाय, कोकणातील चाकरमान्यांसाठी व प्रवाशांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या रत्नागिरी-दादर पॅसेंजर ट्रेन पूर्ववत सुरू करण्यासाठी योग्य त्या पातळीवर पाठपुरावा करण्याची मागणीही करण्यात आली.

​आमदार सौ. माधवीताई नाईक यांनी कार्यकर्त्यांच्या सर्व समस्या व मागण्या शांतपणे ऐकून घेतल्या आणि यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या शिष्टमंडळात किशोर सावंत, अक्षय मधुकर महापदी, प्रसन्न प्रकाश कलमस्टे, प्रमोद बागवे, संजय शिंदे, अशोक शिंदे, अमित शेलार, जतिन कोठारे, हेमंत गडकरी, रविंद्र साटम आणि राजेश तावडे आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

खुशखबर! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान नवीन दैनिक एक्सप्रेसला मंजुरी

   Follow us on        

मुंबई:

कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी आणि पर्यटकांसाठी एक अत्यंत आनंददायी बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वेने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि सिंधूदूर्गातील सावंतवाडी रोड दरम्यान एका नवीन दैनिक (रोज धावणारी) एक्सप्रेस ट्रेन सेवा सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. ५१० किलोमीटरच्या या मार्गामुळे मुंबई, ठाणे आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीदरम्यानची रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे.

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या (PIB) प्रसिद्धीपत्रकानुसार, या नवीन सेवेमुळे पर्यटन, व्यवसाय, शिक्षण आणि स्थानिक रोजगारासाठी प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व सोयीचा होणार आहे.

ट्रेनचा क्रमांक व मार्ग

ही नवीन एक्सप्रेस ट्रेन दररोज पुढील क्रमांकांनी धावेल:

  • ट्रेन क्र. १५०८७: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते सावंतवाडी रोड एक्सप्रेस

  • ट्रेन क्र. १५०८८: सावंतवाडी रोड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) एक्सप्रेस

 थांबे (Stoppages)

मुंबई महानगर क्षेत्र ते दक्षिण कोकणाला जोडणाऱ्या या ५१० किमीच्या प्रवासात प्रमुख शहरांना व स्थानकांना व्यावसायिक थांबे देण्यात आले आहेत:

दादर • ठाणे • पनवेल • पेण • रोहा • माणगाव • वीर • खेड • चिपळूण • सावर्डे • अरावली रोड • संगमेश्वर रोड • रत्नागिरी • अडवली • विलवडे • राजापूर रोड • वैभववाडी रोड • नांदगाव रोड • कणकवली • सिंधुदुर्ग • कुडाळ • सावंतवाडी रोड.

पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला गती

ही नवीन रेल्वे सेवा कोकणातील निसर्गरम्य समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, मंदिरे आणि इको-टूरिझम केंद्रांना भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून यामुळे पर्यटनास मोठा उत्साह मिळेल. तसेच, रोजचा प्रवास करणारे नागरिक, विद्यार्थी, व्यापारी व छोट्या व्यावसायिकांना यामुळे थेट आणि सोयीस्कर प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाल्याने प्रादेशिक आर्थिक विकासाला हातभार लागणार आहे. याशिवाय, कोकण मार्गावर सातत्याने असणारी प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता या नवीन दैनिक सेवेमुळे इतर गाड्यांवरील ताण कमी होण्यास मदत होईल. एकंदरीत, भारतीय रेल्वेच्या या निर्णयामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टीच्या प्रादेशिक विकासाला आणि वाहतूक व्यवस्थेला मोठा हातभार लागणार आहे.

मालवण – पंढरपुर – अक्कलकोट एसटी बससेवा सुरू

   Follow us on        

मालवण: एसटी महामंडळाच्या मालवण आगारामार्फत मालवण ते अक्कलकोट ही थेट बससेवा सुरू करण्यात आली आहे. स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी ही सेवा अत्यंत दिलासादायक ठरणार असून कोकणातील प्रवाशांना आता बस बदल न करता थेट अक्कलकोटपर्यंत प्रवास करता येणार आहे.

​ही बस मालवण येथून दररोज दुपारी ३.४५ वाजता सुटणार आहे, तर अक्कलकोट येथून सायंकाळी ७.३० वाजता परतीचा प्रवास सुरू होईल. या प्रवासादरम्यान आचारा, कणकवली, तळेरे, वैभववाडी, गगनबावडा, कोल्हापूर, सांगोला, पंढरपूर आणि सोलापूर ही प्रमुख ठिकाणे येणार आहेत.

​प्रवाशांच्या सोयीसाठी या बसचे ऑनलाईन आरक्षण उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच शासनाच्या विविध सवलत योजनांनुसार महिलांना ५० टक्के सवलत आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के सवलत लागू आहे. त्यामुळे अधिकाधिक प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मालवण आगारामार्फत करण्यात आले असून, अधिक माहितीसाठी ०२३६५-२५२०३४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या नामांतरणाच्या प्रक्रियेला वेग; केंद्र सरकारने मागवले अभिप्राय

   Follow us on        

सावंतवाडी: कोकण रेल्वे मार्गावरील ‘सावंतवाडी रेल्वे स्टेशन टर्मिनस’ चे नाव बदलून ‘लोकमान्य मधू दंडवते टर्मिनस’ करण्याच्या प्रक्रियेला आता प्रशासकीय पातळीवर वेग आला आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, नामवंत संसदपटू आणि भारताचे माजी केंद्रीय मंत्री स्व. मधू दंडवते यांनी कोकणाच्या विकासात, विशेषतः कोकण रेल्वेच्या उभारणीत दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यांच्या या योगदानाचा गौरव करण्यासाठी सावंतवाडी टर्मिनसला त्यांचे नाव देण्याची मागणी दीर्घकाळापासून केली जात होती.

या मागणीची दखल घेत महाराष्ट्र शासनाने नामकरणाचा प्रस्ताव तयार केला होता. मुख्यमंत्री आणि राज्य मंत्रिमंडळाच्या २६ मे २०२६ रोजी झालेल्या बैठकीत सावंतवाडी टर्मिनसचे नाव बदलून ‘लोकमान्य मधू दंडवते टर्मिनस’ करण्याच्या प्रस्तावाला अधिकृत मंजुरी देण्यात आली. या मान्यतेनंतर राज्याचे अप्पर मुख्य सचिव (परिवहन व बंदरे) संजय सेठी यांनी १६ जून २०२६ रोजी केंद्रीय गृह सचिवांना पत्र पाठवून नामकरणाबाबत केंद्र सरकारने लवकरात लवकर पुढील कार्यवाही करावी, अशी विनंती केली होती.

महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावावर केंद्रीय गृह मंत्रालयाने तातडीने पावले उचलली आहेत. गृह मंत्रालयाचे अवर सचिव कुंदन कुमार यांनी २७ जुलै २०२६ रोजी एक कार्यालयीन ज्ञापन जारी केले आहे. या ज्ञापनाद्वारे केंद्र सरकारच्या नियमांनुसार नामकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारच्या या प्रस्तावाची प्रत संबंधित केंद्रीय मंत्रालये आणि विभागांकडे पुढील अभिप्रायासाठी पाठवण्यात आली आहे.

गृह मंत्रालयाने या प्रस्तावावर रेल्वे मंत्रालय (रेल्वे बोर्ड), विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, भारतीय सर्वेक्षण विभाग (सर्व्हेअर जनरल ऑफ इंडिया) आणि टपाल विभागाकडून अधिकृत मते व अभिप्राय मागवले आहेत. या सर्व संबंधित विभागांकडून मंजुरी व अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या नव्या नामकरणाची अंतिम आणि अधिकृत अधिसूचना जारी केली जाईल.

धक्कादायक! शाळेत वर्ग सुरू असतानाच छतावरील कौले कोसळली

   Follow us on        

बांदा: बांदा-सटमठवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत वर्ग सुरू असतानाच छतावरील कौले विद्यार्थ्यांसमोर अचानक खाली कोसळली, मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. मुख्याध्यापिका आत्लेषा कांबळी या विद्यार्थ्यांना शिकवत असताना ही घटना घडली असून, काही क्षणांसाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

​या गंभीर घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य ऋतिका नाईक, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, मनसे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, प्रसाद वीर, राकेश विरनोडकर, प्रदीप कळंगुटकर, राजदीप पावसकर आणि महेंद्र मांजेरकर यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली. गेल्या पंधरा दिवसांत बांदा परिसरातील जिल्हा परिषद शाळांच्या छातासंदर्भातील ही तिसरी गंभीर घटना असल्याने शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी खेळ करणाऱ्या या दुर्लक्षाबाबत स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

​शाळा व्यवस्थापन समितीने अनेकदा छप्पर दुरुस्तीचे प्रस्ताव संबंधित विभागाकडे सादर केले, मात्र त्याची दखल घेतली गेली नसल्याचा आरोप साईप्रसाद काणेकर यांनी केला. विद्यार्थ्यांच्या जीविताची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल उपस्थित करत त्यांनी तातडीने निधी मंजूर करून दुरुस्ती करण्याची मागणी केली. शिक्षण विभागाने तातडीने छप्पर दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत अन्यथा आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच, मनसे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी पिण्याच्या पाण्याच्या टाकीची दूरवस्था आणि खेळणी साहित्यांची झालेली मोडतोड निदर्शनास आणून दिली असून, ऋतिका नाईक यांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

​आता फक्त ६० रुपयांत मिळणार डिजिटल भूनकाशा

   Follow us on        

कणकवली: मूळ जमाबंदीवेळी तयार झालेले भूमापनचे सर्व्हे नंबरचे नकाशे, एकत्रीकरण योजनेअंतर्गत तयार झालेले गट नंबरचे डिजिटल नकाशे, नगर भूमापन नकाशे, गावठाण भूमापन नकाशे तसेच स्वामित्व योजनेअंतर्गत तयार झालेले गावठाण भूमापन नकाशे एप्लीकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (API) द्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठीचे शुल्कही निश्चित करण्यात आले असून, या अंतर्गत संगणकीकृत स्वाक्षरीचे पीडीएफ नकाशे सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रिपेड स्वरूपात ६० रुपये दराने मिळणार आहेत.

​संगणकीकृत स्वाक्षरीचे .dwg स्वरूपातील नकाशे आणि .shp स्वरूपातील नकाशे १२० रुपयांच्या दरात उपलब्ध होणार आहेत. खासगी व सरकारी बँकांसाठीही हाच दर लागू असणार असून, त्यांच्यासाठी पोस्टपेड स्वरूपात एक महिना क्रेडिट उपलब्ध होईल. राज्य शासनाच्या प्रशासनिक विभागांसाठी असे नकाशे नि:शुल्क मिळणार आहेत. भारत सरकारचे सार्वजनिक उपक्रम, महामंडळे व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यासाठी पोस्टपेड स्वरूपात पीडीएफ नकाशे ८४ रुपयात, तर संगणकीकृत स्वाक्षरीचे .dwg व .shp नकाशे ६० रुपये दराने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. संपूर्ण गाव नकाशाची मागणी केल्यास ५००० रुपये आकारणी करण्यात येणार असून, त्यात राज्य शासनाचा हिस्सा ३००० रुपये आणि जमाबंदी आयुक्त यांचा हिस्सा २००० रुपये असेल.

​संगणकीकृत स्वाक्षरीने मिळकत पत्रिकेसाठी अ, ब, क वर्ग नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात नागरिकांसाठी ९० रुपये प्रति अभिलेख आणि ग्रामीण क्षेत्रासाठी ४५ रुपये प्रति अभिलेख दर असणार आहे. सरकारी व खासगी बँकांसाठीही हाच दर लागू आहे. सामान्य नागरिकांसाठी पीडीएफ स्वरूपातील सातबारा, आठ-अ आणि फेरफारसाठी प्रति अभिलेख १५ रुपये, सरकारी व खासगी बँकांसाठी एक महिन्याच्या क्रेडिटवर पोस्टपेड स्वरूपात १५ रुपये आणि प्रशासकीय विभागांसाठी हे अभिलेख नि:शुल्क देण्यात येणार आहेत.

​सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक महामंडळे, स्वायत्त संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यासाठी पोस्टपेड स्वरूपात प्रति अभिलेख १५ रुपये आकारले जातील. भारत सरकारचे जे विभाग महसूल अभिलेख देऊन स्वतःकडील डेटा शेअर करतात, अशा विभागांसाठी हे अभिलेख नि:शुल्क देण्यात येणार आहेत. मात्र, भारत सरकारचे जे विभाग अभिलेख घेऊन स्वविभागाकडे डेटा शेअर करत नाहीत, त्यांना १५ रुपये आकारण्यात येणार आहेत.

‘सागरमाला २.०’ अंतर्गत राज्यातील प्रकल्पांच्या मंजुरीसाठी नितेश राणे यांचा केंद्राकडे पाठपुरावा

   Follow us on        

मुंबई : महाराष्ट्रातील बंदरे, मत्स्यव्यवसाय, किनारी पायाभूत सुविधा आणि सागरी पर्यटनाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. ‘सागरमाला २.०’ अंतर्गत राज्याने प्रस्तावित केलेल्या विविध प्रकल्पांना लवकरात लवकर मंजुरी मिळावी, यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट घेऊन पत्र दिले आणि विशेष पाठपुरावा केला आहे.

​मंत्री नितेश राणे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, महाराष्ट्र सरकारने ‘सागरमाला २.०’ कार्यक्रमांतर्गत विविध प्रकल्पांना सर्वोच्च प्राधान्य दिले असून, हे प्रकल्प २.० अंतर्गत विविध घटकांचा समावेश असलेले सर्वसमावेशक प्रकल्प प्रस्ताव आहेत. हे प्रकल्प ‘विकसित भारत २०४७’ या राष्ट्रीय संकल्पनेशी सुसंगत असल्याने त्यांना प्राधान्याने मंजुरी देण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.

​या प्रकल्पांमुळे राज्यातील बंदराधारित विकासाला चालना मिळणार असून बहुविध लॉजिस्टिक संपर्क व्यवस्था मजबूत होईल, मत्स्य बंदरांचे आधुनिकनीकरण होईल, किनारी भागातील पायाभूत सुविधा उन्नत होतील तसेच किनारी जलवाहतूक, अंतर्गत जलमार्ग आणि सागरी पर्यटनालाही मोठी चालना मिळेल. याशिवाय किनारी भागात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होण्यास मदत होईल, खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल आणि राज्याच्या आर्थिक विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने केंद्र सरकारच्या सूचनांनुसार ‘सागरमाला २.०’ अंतर्गत विविध घटकांचा समावेश असलेले सर्वसमावेशक प्रकल्प प्रस्ताव सादर केले आहेत.

​केंद्र सरकारकडून या प्रस्तावांना लवकर मंजुरी मिळाल्यास महाराष्ट्रातील बंदर विकास, सागरी पायाभूत सुविधा, किनारी अर्थव्यवस्था आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रात मोठी प्रगती होईल. असा विश्वास व्यक्त करत राज्य सरकार सागरी क्षेत्रात महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य राज्य बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे.

चिरेकापणीच्या मशिनवर पडून कामगाराचा मृत्यू

   Follow us on        

देवगड:

तालुक्यातील लिंगडाळ येथील एका चिरेखाणीवर काम करणारा सुखदेव बड्डा टेकाम (३६, मूळ रा. कोडल, तेंडूखेडा, जि. दमोह, रा. मध्य प्रदेश) हा कामगार चिरे कापण्याच्या मशिनवर पडून गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना २७ जून, २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. लिंगडाळ येथील चिरेखाणीवर काम करत असताना तो अचानक मशिनवर पडल्याने त्याच्या गळ्याला गंभीर दुखापत होऊन तोंडातून रक्तस्राव झाला.

​ही बाब लक्षात येताच इतर कामगारांनी त्याला तातडीने देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचार सुरू करण्यापूर्वीच तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर त्याचा मृतदेह अंत्यविधीसाठी त्याच्या मूळ गावी नेण्यात आला.

​या प्रकरणी सुखदेव टेकाम (२६, रा. कोडल) यांनी २९ जून रोजी तेंडूखेडा पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून, सुरुवातीला तिथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडल्याने, तेंडूखेडा पोलिसांनी हे प्रकरण तपासासाठी सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत देवगड पोलीस स्थानकाकडे वर्ग केले. त्यानुसार देवगड पोलीस स्थानकात मंगळवारी रात्री उशिरा या घटनेची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक श्याम बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुले पुढील तपास करत आहेत.

‘शक्तीपीठ’ तीन महामार्गांना जोडेल! – आमदार दीपक केसरकर

   Follow us on        

सावंतवाडी: ‘शक्तीपीठ’ महामार्ग तीन महामार्गांना जोडला जाईल आणि याद्वारे पर्यटन विकास घडवला जाईल असे विधान सावंतवाडी येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना आमदार दीपक केसरकर यांनी काल केले,. दोडामार्ग तालुक्यातील काही गावे ‘इको सेन्सिटिव्ह’ झोनमध्ये समाविष्ट झाल्यामुळे तेथे काही निर्बंध आले आहेत, ज्यांचे पालन करणे गरजेचे आहे. या भागातील वृक्षतोट रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सजगता निर्माण करण्यासाठी एनजीओच्या मदतीने प्रत्येक गावात जाऊन जनजागृती केली जाणार आहे.

​मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांच्या आमसभा गेल्या काही वर्षांपासून झालेल्या नव्हत्या, मात्र आता त्या होत असल्याची आनंदाची बाब त्यांनी व्यक्त केली. वेळापत्रकानुसार सावंतवाडी तालुक्याची आमसभा ६ ऑगस्टला तर दोडामार्ग तालुक्याची आमसभा ७ ऑगस्टला होणार असून, सावंतवाडी व दोडामार्गपाठोपाठ पुढील आठवड्यात वेंगुर्ला तालुक्याची आमसभा घेतली जाईल. या तिन्ही तालुक्यांचा सर्वांगीण विकास आणि पर्यटन विकासाला आपले प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

​याशिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्यामुळे सावंतवाडी रेल्वे स्थानकावर तीन नव्या गाड्यांना थांबा मिळाला आहे. भविष्यात या भागात अजून जास्त गाड्या उपलब्ध करून देण्याच्या आणि सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला पाण्याची व्यवस्था पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे केसरकर यांनी शेवटी सांगितले.

पाश्चिम रेल्वेकडून विशेष गाड्यांना मुदतवाढ; कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या एका गाडीचा समावेश

   Follow us on        

Railway Updates: स्वातंत्र्य दिनी लागून आलेल्या सुट्ट्या आणि सणासुदीच्या काळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष गाड्यांच्या फेऱ्या वाढवल्या आहेत. यात ०९४२४ / ०९४२३ | अहमदाबाद – मंगळुरू विशेष या कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या गाडीचा समावेश असल्याने कोकणात जाणार्‍या प्रवाशांची सोय होणार आहे.

मुंबई, २९ जुलै २०२६:

अतिरिक्त प्रवासी वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षित व आरामदायी प्रवासाची खात्री करण्यासाठी पश्चिम रेल्वेने अनेक लोकप्रिय विशेष गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवासारख्या आगामी सणांच्या काळात चाकरमानी आणि प्रवाशांना होणारी गर्दी लक्षात घेता हा निर्णय अत्यंत दिलासादायक ठरणार आहे.

महत्त्वाच्या गाड्यांचे तपशील व फेऱ्यांचा विस्तार:

| ट्रेन क्रमांक | गाडीचे नाव (मार्ग) | फेरीचा वार (Frequency) | वाढीव कालावधी / विस्तार

| ०९००५ / ०९००६ | बांद्रा टर्मिनस – भिवानी सुपरफास्ट विशेष | साप्ताहिक (बुधवार / गुरुवार) | २६.०८.२०२६ / २७.०८.२०२६ पर्यंत |

| ०९००१ / ०९००२ | मुंबई सेंट्रल – भिवानी सुपरफास्ट विशेष | द्वि-साप्ताहिक (मंगळवार-शुक्रवार / बुधवार-शनिवार) | २८.०८.२०२६ / २९.०८.२०२६ पर्यंत |

| ०९१८५ / ०९१८६ | मुंबई सेंट्रल – कानपूर अनवरगंज सुपरफास्ट विशेष | साप्ताहिक (रविवार / सोमवार) | ३०.०८.२०२६ / ३१.०८.२०२६ पर्यंत |

| ०९४२४ / ०९४२३ | अहमदाबाद – मंगळुरू विशेष | साप्ताहिक (शुक्रवार / शनिवार) | २८.०८.२०२६ / २९.०८.२०२६ पर्यंत |

| ०९४४७ / ०९४४८ | अहमदाबाद – पाटणा सुपरफास्ट विशेष | साप्ताहिक (बुधवार / शुक्रवार) | ०५.०८.२०२६ / ०७.०८.२०२६ पर्यंत |

| ०९०९३ / ०९०९४ | उधना – अयोध्या धाम / अयोध्या कॅन्ट – उधना विशेष | साप्ताहिक (शनिवार इ.) | २९.०८.२०२६ पर्यंत |

| ०९०९७ / ०९०९८ | उधना – अयोध्या कॅन्ट विशेष | साप्ताहिक (मंगळवार / बुधवार) | २५.०८.२०२६ / २६.०८.२०२६ पर्यंत |

| ०९०३३ / ०९०३४ | उधना – मालदा टाउन विशेष | साप्ताहिक (गुरुवार / रविवार) | २७.०८.२०२६ / ३०.०८.२०२६ पर्यंत |

| ०९४५१ / ०९४५२ | गांधीधाम – भागलपूर विशेष | साप्ताहिक (शुक्रवार / सोमवार) | २८.०८.२०२६ / ३१.०८.२०२६ पर्यंत |

आरक्षण आणि महत्त्वाची माहिती:

आरक्षण सुरू: या सर्व वाढीव फेऱ्यांचे आरक्षण आजपासून म्हणजेच २९ जुलै २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजल्यापासून सर्व पीआरएस (PRS) काऊंटर्स आणि आयआरसीटीसी (IRCTC) च्या अधिकृत वेबसाइटवर सुरू झाले आहे.

या सर्व गाड्या विशेष भाड्याने (Special Fare) चालवल्या जातील आणि त्यांचा कालावधी ऑगस्ट २०२६ च्या अखेरपर्यंत राहील.

वेळापत्रक व थांबे: गाड्यांच्या वेळा, थांबे आणि रचनेसंबंधीची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 

 

View this post on Instagram

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search