Category Archives: कोकण

Konkan Railway: कोकण रेल्वेत २३ लाख रुपयांचा गैरव्यवहार; प्रकरण न्यायालयात

   Follow us on        

मडगाव:

मडगाव आणि वेर्णा येथील कोकण रेल्वेच्या रनिंग रूमच्या देखभालीच्या कामात सुमारे २३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) भ्रष्टाचार प्रतिबंधक शाखेने मोठी कारवाई केली आहे. या कथित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी सीबीआयने कोकण रेल्वेच्या दोन अधिकाऱ्यांसह दोन कंत्राटदारांविरुद्ध दक्षिण गोव्याच्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये मडगाव विभागाचे तत्कालीन वरिष्ठ प्रादेशिक यांत्रिक अभियंता मंजनाथ क्षेत्रपाल, तत्कालीन मुख्य लोको निरीक्षक गोर्धनलाल बलई आणि कंत्राटदार एम. के. बेलवाडी व उदय के. बेलवाडी यांचा आरोपी म्हणून समावेश आहे.

​दक्षिण गोवा विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश शर्मिला पाटील यांनी २९ जून २०२६ रोजी या प्रकरणातील काही आरोपांमध्ये अंशतः बदल करण्यास परवानगी दिली. त्यानंतर सीबीआयने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय दंड संहितेअंतर्गत फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, कट रचणे आणि खोटी कागदपत्रे वापरणे अशा विविध कलमांखाली हे आरोपपत्र सादर केले आहे.

​सीबीआयच्या आरोपपत्रानुसार, जून २०१८ ते जून २०१९ या कालावधीत मडगाव आणि वेर्णा येथील रनिंग रूमच्या देखभालीसाठी सादर करण्यात आलेल्या बिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळून आली. कंत्राटदारांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) आणि कर्मचारी राज्य विमा योजना (ईएसआयसी) संदर्भातील बनावट कागदपत्रे जोडून खर्च फुगवून दाखवला होता. तपासात असे समोर आले आहे की, प्रत्यक्षात कामावर नसलेल्या कर्मचाऱ्यांच्या नावाने वेतन, ईपीएफ आणि ईएसआयसी योगदानाचा खोटा खर्च दाखवून सुमारे २३ लाख रुपयांचा आर्थिक लाभ उठवण्यात आला. या गैरव्यवहारामुळे कोकण रेल्वेचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, आता या प्रकरणाची पुढील सुनावणी विशेष न्यायालयात होणार आहे.

आंबोलीत विजेच्या तारेचा धक्का लागून गाभण म्हशीसह रेडकाचा मृत्यू

   Follow us on        

आंबोली:

येथील मुळवंदवाडी भागात जमिनीवर पडलेल्या जिवंत विद्युत वाहिनीच्या (वीज तारेच्या) संपर्कात आल्याने एका गाभण म्हशीसह रेडकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मुळवंदवाडी येथील शेतकरी भिसाजी महादेव सरमळकर यांची गुरे शेतात चरण्यासाठी गेली असता हा अपघात झाला. या घटनेत शेतकरी सरमळकर यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सुदैवाने, परिसरातील नागरिक गणपत गावडे यांनी प्रसंगावधान राखत इतर जनावरांना पुढे जाण्यापासून रोखल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.

​घटनेची माहिती मिळताच महावितरण आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. प्रशासनाच्या वतीने मृत गुरांचा रीतसर पंचनामा करण्यात आला असून, बाधित शेतकरी सरमळकर यांना नियमानुसार योग्य ती नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे. पंचनामा पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्याने गुरांचे मृतदेह ताब्यात घेतले. दरम्यान, आंबोलीतील नांगरतास भागात नव्याने बसविण्यात आलेले विद्युत पोल धोकादायक स्थितीत असल्याकडे स्थानिक नागरिकांनी लक्ष वेधले असून, पावसाळ्याचे दिवस असल्याने महावितरणने तातडीने उपाययोजना करून वीज वाहिन्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

कुडाळमध्ये बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

   Follow us on        

कुडाळ:

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ बाजारपेठेत वन्यजीवांच्या अवयवांची बेकायदेशीर खरेदी-विक्री आणि तस्करी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा वन विभागाने यशस्वी पर्दाफाश केला आहे. येथील प्रसिद्ध ‘मसुरकर जेम्स’ या दुकानावर वन विभागाच्या संयुक्त पथकाने अचानक छापा टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ३० जून २०२६ रोजी सावंतवाडीच्या वनक्षेत्रपालांना या बेकायदेशीर काळ्याबाजाराविषयी गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सावंतवाडी व कुडाळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन पंचांसमक्ष या दुकानाची अचानक झडती घेतली. या कारवाईदरम्यान दुकानातून अत्यंत धक्कादायक आणि गंभीर बाबी उघडकीस आल्या.

​दुकानाच्या झडतीमध्ये वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या अनुसूची १ अन्वये अत्यंत संरक्षित असलेल्या बिबट्याची शिकार करून तयार केलेले अनेक अवयव हस्तगत करण्यात आले. यामध्ये बिबट्याची ६ अस्सल नखे, वन्यप्राण्यांच्या शिंगांपासून तयार केलेली ६ बनावट नखे, बिबट्यांच्या नखांचे इतर २० अवयव आणि बिबट्याचे २ सुळे (दात) यांचा समावेश आहे. शिकार करून हे अवयव केवळ विक्रीच्या उद्देशाने दुकानात बेकायदेशीरपणे बाळगण्यात आले होते. वनविभागाने हा सर्व मुद्देमाल जागीच जप्त केला आहे.

​या खळबळजनक प्रकरणातील मुख्य संशयित आणि दुकानाचा मालक अजित वसंत मसुरकर याला वन विभागाने तात्काळ अटक केली आहे. आरोपीने बिबट्याची नखे आणि अवयव विक्रीसाठी बाळगल्याचा गुन्हा मान्य केला आहे. त्याला कुडाळच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला २ दिवसांची वनकोठडी (Forest Custody) सुनावली आहे. ही धडक कारवाई सावंतवाडीचे उपवनसंरक्षक मिलीश शर्मा आणि कोल्हापूर दक्षता विभागाचे विभागीय वनाधिकारी संजय वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली, अशी माहिती कुडाळचे वनक्षेत्रपाल चेतन पाटील यांनी दिली.

कोकण रेल्वेच्या १७ महिला स्टेशन मास्तरांना ‘विशेष कार्यसन्मान पुरस्कार’

   Follow us on        

रत्नागिरी:

गेली १४ वर्षे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०३ व्यक्ती आणि ५ संस्था यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करणाऱ्या बोडस चॅरिटेबल ट्रस्टने यावर्षी आपल्या वर्धापनदिनी एक कौतुकास्पद व ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सन २०२६ च्या वर्धापनदिनानिमित्त कोकण रेल्वेच्या १७ महिला स्टेशन मास्तरांना ‘विशेष कार्यसन्मान पुरस्कार’ देण्याचे ट्रस्टने जाहीर केले आहे. महिला सक्षमीकरण उपक्रमाचा एक भाग म्हणून हा विशेष सन्मान केला जाणार आहे. सेवा काळात या महिला स्टेशन मास्तरांनी दाखवलेले कमालीचे प्रसंगावधान, चाकोरीबाहेर जाऊन केलेले प्रवाशांचे संरक्षण, रस्ता चुकलेल्यांची त्यांच्या घरच्यांशी घडवून आणलेली पुनर्भेट, रोखलेल्या संभाव्य आत्महत्या आणि कसोटीच्या वेळी दाखवलेले धैर्य व तत्परता याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले आहे.

​बोडस चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यक्षेत्रातील दिवाणखावटी ते मडूरे या २६ स्थानकांपैकी १७ स्थानकांवर कार्यरत असलेल्या महिला स्टेशन मास्तरांना या पुरस्कारांतर्गत व्यक्तिगत सन्मानपत्र, शाल आणि एक पुस्तक देऊन गौरविण्यात येणार आहे. ३१ मे २०२६ अखेर कार्यरत असलेल्या महिला स्टेशन मास्तरांसाठी हा एकच निकष लावून ही निवड करण्यात आली आहे. या सन्मानमूर्तींमध्ये ७ महिला स्टेशन मास्तर रत्नागिरी जिल्ह्यातील असून १० जणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत. कोकण रेल्वेच्या सेवा नियमांचे पालन करून या उपक्रमांतर्गत गौरविमूर्तींना कोणत्याही स्वरूपाचा आर्थिक लाभ दिला जाणार नाही. या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमासाठी कोकण रेल्वेचे रत्नागिरीचे क्षेत्रीय प्रबंधक शैलेश बापट आणि जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी विशेष सहकार्य केले आहे.

​पुरस्कार जाहीर झालेल्या १७ महिला स्टेशन मास्तरांचा सेवाकालावधी ४ वर्षे ते ३० वर्षे असा व्यापक आहे. यामध्ये मडूरे स्टेशनच्या प्रतीक्षा लक्ष्मण गावकर या सर्वात सेवाज्येष्ठ आहेत, तर रत्नागिरी स्टेशनच्या चैताली राजेंद्र कल्याणकर या सर्वात तरुण स्टेशन मास्तर आहेत. एकूण १७ पैकी १५ महिला स्टेशन मास्तर मुळच्या कोकणातीलच रहिवासी आहेत. यापैकी सौ. अनुराधा रितेश पवार या सावंतवाडी स्थानकावरून जून २०२६ मध्ये २२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाल्या आहेत. या प्रकल्पासाठी एकूण ९ महिला स्टेशन मास्तर या रेल्वेसाठी जमीन गेलेल्या प्रकल्पग्रस्त गटातील आहेत, २ जणी अनुकंपा तत्त्वावर लागून पदोन्नती झालेल्या आहेत, तर उर्वरित ६ महिला थेट स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन सेवेत रुजू झाल्या आहेत. विशेष बाब म्हणजे यातील ३ जणींचे पतीसुद्धा कोकण रेल्वेमध्येच कार्यरत आहेत. तसेच सौ. अनघा राजाराम नाटेकर यांनी १९९५ मध्ये रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या उभारणीसाठी रोजंदारीवर देखील काम केले होते, ही एक गौरवास्पद बाब आहे.

​या गौरविमूर्तींपैकी ५ जणींना विविध वर्षी कोकण रेल्वेच्या अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांच्या (CMD) पुरस्काराने आधीच सन्मानित करण्यात आलेले आहे. २ जणींना रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे १००० रुपयांचे विशेष रोख पारितोषिक, तर २ जणींना रत्नागिरी क्षेत्रीय प्रबंधक यांचे विशेष प्रमाणपत्र आणि १००० रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. तसेच चैताली राजेंद्र कल्याणकर यांना त्यांच्या कार्यमूल्यमापनात प्रथम आल्यामुळे ‘केआरए’ पुरस्कार प्राप्त आहे, तर सौ. मनीषा हरिश्चंद्र तटकरी यांना दोन वेगवेगळ्या वर्षी दोन वेगवेगळ्या स्थानकांवर दोन वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत.

​पुरस्कार प्राप्त १७ महिला स्टेशन मास्तरांमध्ये मनीषा हरिश्चंद्र तटकरी (कळंबणी बुद्रुक), अस्मिता तुकाराम सावंत (खेड), श्रद्धा समीर चिले (खेड), शिल्पा शंकर दपके (चिपळूण), निकिता निलेश पवार (कडवाई), अनघा राजाराम नाटेकर (रत्नागिरी), चैताली राजेंद्र कल्याणकर (रत्नागिरी), प्राजक्ता प्रदीप कांबळे (खारेपाटण), अंजली श्रीराम चाळके (नांदगाव), मनस्वी सुभाष कदम (नांदगाव), विशालम दिनेश बेटकर (कणकवली), रंजना दीपक माने (कणकवली), सुविधा इमानवेल स्वामी (सिंधुदुर्ग), मेघा कमलाकर नागवेकर (सिंधुदुर्ग), प्रज्ञा भालचंद्र नाईक (झारप), अनुराधा रितेश पवार (सावंतवाडी) आणि प्रतीक्षा लक्ष्मण गावकर (मडूरे) यांचा समावेश आहे. जुलै महिन्यातील पहिल्या १० दिवसांत एकूण १२ महिला स्टेशन मास्तरांचा सन्मान त्यांच्या सेवेच्या ठिकाणी प्रत्यक्ष केला जाणार असून, उर्वरित ५ महिला स्टेशन मास्तरांचे सन्मान साहित्य त्यांच्या पत्त्यावर स्पीड पोस्टाने पाठविले जाईल, अशी माहिती बोडस चॅरिटेबल ट्रस्टच्या खजिनदार ॲड. सौ. आदिती अभिजित पटवर्धन यांनी दिली आहे.

शासकीय योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी ‘अँग्री स्टॅक फार्मर आयडी’ काढणे बंधनकारक

   Follow us on        

सिंधुदर्गनगरी, दि. ३०:

केंद्र आणि राज्य शासनाच्या ‘अँग्रीस्टॅक डिजिटल कृषी मिशन’ अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याचा एक युनिक (स्वतंत्र) ‘फार्मर आयडी’ (Farmer ID) तयार करण्याची विशेष मोहीम सध्या सिंधुदुर्ग जिल्हाभर राबविण्यात येत आहे. आगामी हंगामापासून शासकीय योजनांचे लाभ मिळण्यात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सर्व शेतकऱ्यांनी हा आयडी काढून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आंबा, काजू, भात, नारळ उत्पादक शेतकरी बांधवांनी, तसेच ग्रामपंचायत सदस्य, लोकप्रतिनिधी, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPCs) आणि महिला बचत गटांनी या मोहिमेत शासकीय यंत्रणेला सहकार्य करावे आणि गावातील १००% शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.

फार्मर आयडी’ शेतकऱ्यांसाठी का महत्त्वाचा आहे?

हा डिजिटल आयडी तयार केल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक शासकीय प्रक्रिया आणि योजनांचा लाभ मिळवणे अत्यंत सोपे होणार आहे:

सर्व योजना एकाच ठिकाणी: पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी यांसह शासनाच्या सर्व आर्थिक योजनांचा लाभ या एकाच आयडीच्या माध्यमातून थेट बँक खात्यात जमा होईल.

नोंदणी प्रक्रियेत सुलभता: पीक विमा, केसीसी (KCC) कर्ज, फळबाग अनुदान, तसेच कोकणातील विशेष आंबा-काजू प्रक्रिया योजनांसाठी लागणारी नोंदणी प्रक्रिया यामुळे अधिक सोपी होईल.

डिजिटल जोडणी: शेतकऱ्यांची ‘ई-पीक पाहणी’, ७/१२ (सातबारा) आणि ८अ चा उतारा ही सर्व महत्त्वाची कागदपत्रे या आयडीशी डिजिटली जोडली जाणार आहेत.

कागदपत्रांच्या कटकटीतून मुक्ती: एकदा हा आयडी तयार झाल्यानंतर, भविष्यात कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार कागदपत्रे सादर करण्याची गरज पडणार नाही.

कोकणासाठी विशेष लाभ: कोकणातील मुख्य पिके असलेल्या आंबा व काजू उत्पादकांसाठी येणाऱ्या विशेष योजनांचा लाभ थेट आणि गतीने मिळेल.

थेट नुकसान भरपाई: नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाल्यास, पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणारी मदत थेट आणि कोणत्याही विलंबाशिवाय प्राप्त होईल.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे:

१. आधार कार्ड आणि आधार कार्डशी लिंक असलेला चालू मोबाईल नंबर.

२. जमिनीचा अद्ययावत ७/१२ आणि ८अ उतारा.

नोंदणी कुठे आणि कशी करावी?

शेतकऱ्यांना नोंदणीसाठी दोन सोपे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत:

सीएससी केंद्र: आपल्या गावातील जवळच्या ‘महा-ई-सेवा केंद्रात’ (CSC Center) जाऊन शेतकरी ही नोंदणी करू शकतात.

स्वयं-नोंदणी: शेतकरी स्वतः मोबाईल किंवा संगणकाच्या सहाय्याने https://agristack.gov.in या अधिकृत शासकीय पोर्टलला भेट देऊन आपली नोंदणी पूर्ण करू शकतात.

शासकीय योजनांचा लाभ अखंडित सुरू ठेवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी विनाविलंब आपली नोंदणी पूर्ण करावी, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या नियमित गाड्यांची क्षमता वाढवा

   Follow us on        

मुंबई:कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर, गाड्यांची प्रवासी क्षमता वाढवण्यासाठी कोकण विकास समितीने रेल्वे प्रशासनाकडे आक्रमक पावले उचलण्याची मागणी केली आहे. सध्या रोहा ते मडगाव दरम्यानचा कोकण रेल्वेचा मार्ग तब्बल १६८% क्षमतेने धावत असून, रेल्वे मार्गाच्या मर्यादेमुळे नवीन गाड्या सोडणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा परिस्थितीत, उपलब्ध गाड्यांनाच कमाल डबे (Coaches) जोडून क्षमता वाढवणे हाच एकमेव प्रभावी आणि किफायतशीर उपाय असल्याचे समितीने म्हटले आहे. कोकण विकास समितीच्या नागरी व ग्रामीण विभागाचे जयवंत शंकर दरेकर आणि अक्षय मधुकर महापदी यांनी याबाबत रेल्वे बोर्ड, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) आणि संबंधित रेल्वे विभागांना सविस्तर प्रस्ताव पाठवून त्वरित कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.

​समितीने दिलेल्या प्रस्तावामध्ये प्रामुख्याने १० महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. यामध्ये मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस ८ वरून २० डब्यांची करणे, मुंबई-मंगळुरू एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस आणि जनशताब्दी एक्सप्रेस या गाड्या १६ वरून २२ डब्यांच्या करणे, तसेच सावंतवाडी-दिवा आणि रत्नागिरी-दिवा एक्सप्रेस २२ डब्यांपर्यंत वाढवणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय तुतारी एक्सप्रेस, मडगाव-बांद्रा एक्सप्रेस, पुणे-एर्नाकुलम एक्सप्रेस आणि गरीब रथ एक्सप्रेस या गाड्याही त्यांच्या कमाल क्षमतेने चालवण्याची मागणी करण्यात आली आहे. देखभाल दुरुस्तीसाठी मडगाव येथे पिट लाईनची लांबी वाढवणे किंवा काही गाड्यांचे टर्मिनस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) किंवा दादर येथे हलवून या तांत्रिक अडचणींवर मात करता येऊ शकते, असा पर्यायही समितीने सुचवला आहे.

​हा प्रस्ताव तातडीने मंजूर झाल्यास कोकण रेल्वे मार्गावर दररोज सुमारे ४५ अतिरिक्त डबे उपलब्ध होतील, ज्यामुळे प्रवाशांसाठी दररोज तब्बल ३,६९१ अतिरिक्त जागा (Seats) निर्माण होऊ शकतील. हा बदल म्हणजे या संतृप्त (saturated) मार्गावर एकही नवीन ट्रेन न चालवता, दोन्ही दिशांनी प्रत्येकी दोन नवीन पूर्ण लांबीच्या गाड्या सुरू करण्यासारखेच आहे. वर्षभर आरक्षणासाठी लागणाऱ्या लांबच लांब प्रतीक्षा याद्या आणि प्रवाशांचे होणारे हाल थांबवण्यासाठी रेल्वे बोर्डाने यावर कालबद्ध नियोजन करून अंमलबजावणी करावी, अशी मागणी कोकण विकास समितीने केली आहे.

कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट

   Follow us on        

मुंबई: राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा जोर प्रचंड वाढणार असून, हवामान विभागाकडून कोकण किनारपट्टीला ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवारपासूनच पावसाचा जोर वाढला असून अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. या संततधार पावसामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी पडझड झाल्याच्या घटना समोर येत आहेत.

​कणकवली शहरामध्ये या मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला असून, तेथील सुमारे ४० वर्षे जुन्या असलेल्या भाजी मार्केटचा एक भाग मंगळवारी अचानक कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी आजूबाजूच्या स्थानिक नागरिकांमध्ये आणि व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी तातडीने सहकाऱ्यांसह घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व योग्य त्या सूचना दिल्या.

​हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि लगतच्या भागात पुढील ४ ते ५ दिवस अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला असून, किनारपट्टीवरील नागरिकांनी आणि मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी स्थानिक प्रशासन सज्ज झाले आहे

कोकण-गोव्यातील पर्यावरणाच्या रक्षणासाठी १८ तरुणांची ‘राखणदार यात्रा’

   Follow us on        

दोडामार्ग:

विकासाच्या नावाखाली कोकण आणि गोवा भागातील जल, जंगल आणि जमिनीचा होत असलेला ऱ्हास आणि स्थानिक लोकसंस्कृती समूळ नष्ट करण्याचे चाललेले प्रयत्न याविरोधात जनजागृती करण्यासाठी नुकतीच ‘राखणदार यात्रा’ काढण्यात आली होती. निसर्ग आणि स्थानिक अस्तित्वाविषयी सजग असलेल्या १८ तरुणांनी १३ ते १६ जून या कालावधीत तब्बल १२० किलोमीटरची पायी पदयात्रा करत १२ गावांना भेटी दिल्या. या यात्रेच्या माध्यमातून निसर्गरक्षणाची प्रवृत्ती जागृत करणे आणि स्थानिकांच्या आर्थिक, सामाजिक व नैसर्गिक संसाधनांच्या प्रश्नांवर चर्चा घडवून आणणे हा मुख्य उद्देश होता, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते मल्हार इंदुलकर यांनी एका मुलाखती दरम्यान दिली.

​या यात्रेची सुरुवात कणकवली येथील कणकुंबीच्या माऊली देवी मंदिरापासून झाली. त्यानंतर केरी, विर्डी, कारापूर, दोडामार्ग, भेडशी, कुडासे, शिरवळ, झोळंबे, तांबोळी, बांदा आणि विलवडे अशा मार्गाने ही यात्रा पुढे गेली. म्हादाई नदीचे पात्र वळवण्याचे संकट, वन्यप्राण्यांसाठी संवेदनशील असलेल्या दोडामार्ग-सावंतवाडी पट्ट्यात चालणारे बेसुमार खाणकाम, रस्ते आणि रिसॉर्ट्ससाठी होणारी वृक्षतोड यांमुळे निर्माण झालेल्या पर्यावरणीय धोक्यांकडे या यात्रेच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले. उत्तर गोव्यातील कारापूर येथे स्थानिक मुणगेकर लोकांच्या जमिनी बळकावून चाललेल्या मोठ्या बांधकाम प्रकल्पाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनालाही या यात्रेने पाठिंबा दिला.

​या यात्रेला गावकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, शिरवलसारख्या गावांनी आपल्या जमिनी बाहेरच्या लोकांना न विकण्याचा महत्त्वपूर्ण ठराव केला आहे. या मोहिमेत प्रसाद गावडे, अविनाश उषा वसंत, सत्यजित चव्हाण यांसारखे कार्यकर्ते पूर्णवेळ सहभागी होते. भांडवलदार आणि मोठ्या प्रकल्पांमुळे कोकणचा विनाश होऊ नये यासाठी हा लढा अधिक तीव्र केला जाणार असून, यात्रेच्या पुढील टप्प्यात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या समुद्रकिनाऱ्यालगतच्या गावांमधील आंबा-काजू उत्पादक शेतकरी आणि मच्छिमारांच्या समस्यांवर काम केले जाईल, असा निर्धार यात्रेकरूंनी व्यक्त केला आहे.

बांदा: भर वस्तीत आढळले मगरीचे पिल्लू

   Follow us on        

बांदा, दि. ३०:

बांदा शहरात सोमवारी मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. या धुवाँधार पावसामुळे येथील बांदा सोसायटीसमोर उभ्या असलेल्या एका टेम्पोखाली मगरीचे पिल्लू आढळून आले. भर शहरात मगरीचे पिल्लू दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ओहोळात आलेल्या पाण्याच्या तीव्र प्रवाहाबरोबर हे मगरीचे पिल्लू थेट रस्त्यावर आल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत या मगरीच्या पिल्लाला सुखरूप पकडले आणि तात्काळ वन विभागाच्या ताब्यात दिले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला सुरक्षितस्थळी हलवल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

​बांदा शहराच्या जवळून वाहणाऱ्या तेरेखोल नदीपात्रात मगरींचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. गेल्या दोन दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावल्याने या नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत मुसळधार पावसामुळे मगरी नदीपात्राबाहेर पडून मानवी वस्तीत शिरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सोमवारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. पावसाचे दिवस अजून पुढे असल्याने नदीकाठच्या आणि ओहोळाच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

Mumbai Goa Highway: आता ‘गुगल मॅप’ सांगणार मुंबई-गोवा महामार्गावरील धोक्याची ठिकाणे!

   Follow us on        

रत्नागिरी:

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा एक महत्त्वपूर्ण आणि प्रभावी वापर सुरू केला आहे. ‘ऑपरेशन टॅप फॉर सेफ’ (Welcome to Ratnagiri) या विशेष मोहिमेंतर्गत जिल्हा पोलिसांनी थेट गुगल कंपनीशी समन्वय साधून एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या माध्यमातून आता महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना गुगल मॅपवर धोक्याच्या ठिकाणांचे ‘रिअल-टाईम ऍलर्ट’ मिळणार आहेत.

अशा प्रकारचा तंत्रज्ञानाचा वापर करणारा हा राज्यातील पहिलाच उपक्रम असल्याचा दावा जिल्हा पोलीस अधिक्षक नितीन बगाटे यांनी केला आहे.

 

असे काम करणार हे तंत्रज्ञान:

या नव्या उपक्रमांतर्गत, वाहनचालक जसेही मुंबई-गोवा महामार्गावरून रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करतील, तसा त्यांच्या गुगल मॅपवर ‘Welcome to Ratnagiri’ असा संदेश (Notification) दिसेल. त्यानंतर पुढील प्रवासादरम्यान रस्त्यात येणारे धोकादायक घाट, तीव्र वळणे, शाळा, मानवी वस्ती, अंडरपास तसेच अपघातप्रवण क्षेत्रांची (Black Spots) माहिती आगाऊ ऍलर्टद्वारे चालकाला दिली जाईल. यामुळे वाहनचालकांना वेळेतच वाहनाचा वेग नियंत्रित करणे आणि संभाव्य धोका ओळखून सावधपणे वाहन चालवणे सोपे होणार आहे.

१० महत्त्वाचे ‘ब्लॅक स्पॉट’ निश्चित:

महामार्गावरील ज्या भागात आजवर वारंवार अपघात घडले आहेत, अशा साधारण एक ते दोन किलोमीटरच्या पट्ट्यातील १० महत्त्वाचे अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) पोलिसांनी निश्चित केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने भोस्ते घाट, हातखंबा, निवळी आणि लांजा आदी भागांचा समावेश असून, या परिसराची अचूक माहिती गुगल मॅपवर अपडेट करण्यात आली आहे. पोलिसांच्या या आधुनिक पाऊलामुळे महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search