Category Archives: कोकण

Konkan Railway: मध्य रेल्वेकडून प्रवाशांसाठी खूशखबर! सीएसएमटी – मडगाव दरम्यान TOD विशेष गाडीची घोषणा

   Follow us on        

मुंबई:

कोकण आणि गोवा प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीचा ताण कमी करण्यासाठी आणि त्यांच्या प्रवासाची सोय सुरळीत व्हावी, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि मडगाव (MAO) दरम्यान विशेष ट्रेन (TOD Special) चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑगस्ट २०२६ मधील अतिरिक्त गर्दीच्या काळात या विशेष गाड्या धावणार आहेत.

​गाडीचे तपशील आणि फेऱ्या

​गाडी क्रमांक 01029 (CSMT – MAO विशेष): ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १३.०८.२०२६ आणि १५.०८.२०२६ रोजी मडगावसाठी प्रस्थान करेल. या मार्गावर याच्या एकूण २ फेऱ्या असणार आहेत.

​गाडी क्रमांक 01030 (MAO – CSMT विशेष): ही ट्रेन मडगाव येथून १३.०८.२०२६ आणि १५.०८.२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे रवाना होईल. या मार्गावरही एकूण २ फेऱ्या नियोजित आहेत.

​डब्यांची रचना (Coach Composition)

​प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी या विशेष ट्रेनमध्ये एकूण २४ ICF कोचेस जोडण्यात आले आहेत. यामध्ये खालीलप्रमाणे डब्यांचा समावेश आहे:

​१२ शयनयान (GSCN) कोचेस

​०१ प्रथम वातानुकूलित (ACCW) कोच

​०५ वातानुकूलित (ACCN) कोचेस

​०४ सामान्य (GS) कोचेस

​०२ एसएलआरडी (SLRD) कोचेस

​थांबे आणि वेळापत्रक (Schedule)

​ही विशेष ट्रेन मार्गावरील सर्व प्रमुख स्थानकांवर थांबणार असून, प्रवाशांच्या सोयीसाठी वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:

01029 सीएसएमटी – मडगाव विशेष ट्रेनचे वेळापत्रक (आगमन / प्रस्थान)

* CSMT: 00:25 (सुटते)

* दादर (Dadar): 00:37 / 00:40

* ठाणे (Thane): 01:20 / 01:23

* पनवेल (Panvel): 02:10 / 02:15

* पेन (Pen): 03:14 / 03:16

* रोहा (Roha): 03:50 / 03:55

* माणगाव (Mangaon): 04:18 / 04:20

* वीर (Veer): 04:32 / 04:34

* खेड (Khed): 05:10 / 05:12

* चिपळूण (Chiplun): 05:40 / 05:45

* सावर्डा (Sawarda): 06:05 / 06:07

* संगमेश्वर रोड (Sangameshwar Road): 06:32 / 06:34

* रत्नागिरी (Ratnagiri): 07:20 / 07:25

* अडवली (Adavali): 07:55 / 07:57

* राजापूर रोड (Rajapur Road): 08:26 / 08:28

* वैभववाडी रोड (Vaibhavwadi Road): 08:40 / 08:42

* कणकवली (Kankavali): 09:28 / 09:30

* सिंधुदुर्ग (Sindhudurg): 09:50 / 09:52

* कुडाळ (Kudal): 11:05 / 11:07

* सावंतवाडी रोड (Sawantwadi Road): 11:30 / 11:32

* थिविम (Thivim): 12:40 / 12:42

* करमाळी (Karmali): 13:20 / 13:22

* मडगाव (Madgaon – MAO): 15:15 (येते)

01030 मडगाव – सीएसएमटी विशेष ट्रेनचे वेळापत्रक (आगमन / प्रस्थान)

* मडगाव (Madgaon – MAO): 16:00 (सुटते)

* करमाळी (Karmali): 16:30 / 16:32

* थिविम (Thivim): 16:50 / 16:52

* सावंतवाडी रोड (Sawantwadi Road): 17:18 / 17:20

* कुडाळ (Kudal): 17:38 / 17:40

* सिंधुदुर्ग (Sindhudurg): 17:52 / 17:54

* कणकवली (Kankavali): 18:12 / 18:14

* वैभववाडी रोड (Vaibhavwadi Road): 18:42 / 18:44

* राजापूर रोड (Rajapur Road): 19:10 / 19:12

* अडवली (Adavali): 19:45 / 19:47

* रत्नागिरी (Ratnagiri): 20:20 / 20:25

* संगमेश्वर रोड (Sangameshwar Road): 21:00 / 21:02

* सावर्डा (Sawarda): 21:30 / 21:32

* चिपळूण (Chiplun): 21:50 / 21:52

* खेड (Khed): 22:08 / 22:10

* वीर (Veer): 23:30 / 23:32

* माणगाव (Mangaon): 23:56 / 23:58

* रोहा (Roha): 00:55 / 01:00

* पेन (Pen): 01:20 / 01:22

* पनवेल (Panvel): 02:05 / 02:10

* ठाणे (Thane): 02:47 / 02:50

* दादर (Dadar): 03:10 / 03:13

* CSMT: 03:45 (येते)

 

नवीन गाडी मंजूर केल्याबद्दल केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा विशेष सत्कार

   Follow us on        

नवी दिल्ली:

​छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्याच्या दीर्घप्रलंबित मागणीला अखेर मंजुरी मिळाली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे कोकणवासीयांच्या प्रवासाचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार असून, संपूर्ण कोकणात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

​या रेल्वे मंजूर झाल्याबद्दल कोकणवासीयांच्या वतीने नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आणि कोकणवासीयांनी एकत्र येत रेल्वेमंत्र्यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव केला आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.

​या सत्कार सोहळ्याला शिवसेनेचे संसदीय गटनेते डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के, महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर उपस्थित होते. तसेच, खासदार संजय दिना पाटील, खासदार श्रीरंग बारणे आणि खासदार ओम राजे निंबाळकर हे प्रमुख नेतेही यावेळी आवर्जून हजर होते.

​ही नवीन ट्रेन सुरू झाल्यामुळे आगामी गणेशोत्सवात आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासाची सोय होणार आहे. गावी जाण्यासाठी नेहमीच होणारी गर्दी आणि तिकिटांची मारामारी यांमुळे गणेशोत्सवात होणारा त्रास यामुळे काही प्रमाणात कमी होणार आहे.

​केवळ सणउत्सवातच नव्हे, तर वर्षभर नियमित प्रवास करणाऱ्या कोकणवासीयांना या गाडीचा मोठा फायदा होणार आहे. मुंबई आणि कोकणातील दळणवळण अधिक वेगवान आणि सुखकर होणार असल्याने प्रवाशांमधून रेल्वे प्रशासनाचे आभार मानले जात आहेत.

नव्याने जाहीर झालेली मुंबई – सावंतवाडी एक्सप्रेस मुंबईहून रात्री सोडण्याची मागणी

   Follow us on        

मुंबई: भारतीय रेल्वेने कोकणवासीयांना मोठा दिलासा देत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते सावंतवाडी रोड दरम्यान नव्या ‘दैनिक एक्स्प्रेस’ला मंजुरी दिली आहे. मुंबई आणि कोकणचे अतूट समीकरण लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने ५१० किलोमीटरच्या या अंतरासाठी नवीन गाडी दररोज चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रवासासाठी गाडी क्रमांक १५०८७ आणि परतीच्या प्रवासासाठी म्हणजेच सावंतवाडी रोड ते सीएसएमटीसाठी गाडी क्रमांक १५०۸८ निश्चित करण्यात आली आहे. दररोज धावणाऱ्या या गाडीमुळे तिकीट आरक्षणाचा ताण कमी होणार असून प्रवाशांचे नियोजन अधिक सोपे होणार आहे.

“वेळापत्रक रात्रीचेच असावे!”

सध्या कोकण मार्गावर धावणाऱ्या मांडवी एक्स्प्रेस आणि दिवा-सावंतवाडी यांसारख्या बहुतांश गाड्या दिवसाच्या आहेत. कोकणकन्या आणि तुतारी या मोजक्याच गाड्या रात्री धावत असल्या, तरी त्या कायम ‘फुल’ असतात आणि कोकणकन्याला सर्वच ठिकाणी थांबेही नाहीत. याउलट, दिवसाच्या प्रवासामुळे नोकरदार आणि कामधंद्यानिमित्त मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांचे जाण्या-येण्यातच रजेचे दोन महत्त्वाचे दिवस फुकट जातात.

वेळेची आणि रजेची मोठी बचत होणार

या नव्या दैनिक एक्स्प्रेसला खऱ्या अर्थाने प्रवाशांचा लाभ मिळायचा असेल, तर तिचे वेळापत्रक निश्चित करताना ती मुंबईतून रात्री ९ वाजता सोडण्यात यावी, अशी आग्रही आणि जोरदार मागणी आता कोकणी चाकरमान्यांकडून सोशल मीडियावर होऊ लागली आहे. रात्रीच्या वेळी ही गाडी सुटल्यास चाकरमानी आपापले काम संपवून थेट गावी पोहोचू शकतील, ज्यामुळे त्यांच्या बहुमूल्य वेळेची आणि रजेची मोठी बचत होणार आहे.

कोकणात केली थायलंडच्या ‘जास्मिन राइस’ची यशस्वी लागवड

   Follow us on        

रायगड: पावसाचा लहरीपणा, अतिवृष्टी आणि नैसर्गिक अडचणींवर यशस्वी मात करत पनवेल तालुक्यातील गुळसुंदे येथील प्रयोगशील ‘कृषी भूषण’ शेतकरी मिनेश गाडगीळ यांनी जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या थायलंडच्या ‘जस्मिन राइस’ची यंदा यशस्वी लागवड केली आहे. पूर्णपणे स्व-संशोधित सेंद्रिय द्रव्यांच्या जिरावर घेतलेला हा प्रयोग रायगडच्या कृषी क्षेत्रात विशेष चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरत आहे.

​गेल्या वर्षी गाडगीळ यांनी थायलंडमधून जस्मिन राइसचे बियाणे मागवले होते. पहिल्या वर्षी विविध नैसर्गिक अडचणींचा सामना करत सुमारे दोन किलो भाताचे उत्पन्न मिळाले. यंदा याच धान्यापासून पुनरुत्पादन करण्याचे नियोजन त्यांनी केले. मात्र, यंदा मुळातच मान्सून लांबल्याने पेरणी वेळेत करता आली नाही. त्यानंतर सुरू झालेल्या धोधाम पावसामुळे रायगड जिल्ह्यात हाहाकार माजवला. नद्या, नाले आणि शेते तुडूंब भरल्याने अनेकांची पेरलेली धान्ये उगवली नाहीत, तर कमी प्रमाणात उगवली रोपे कुजून गेली.

​या काळात योग्य संधी साधत मिनेश गाडगीळ यांनी २२ जून रोजी पेरणी केली आणि सुरुवातीला बोरवेलच्या साहाय्याने पाणी दिले. अवघ्या चार ते पाच दिवसांत धान्य व्यवस्थित उगवून आले आणि त्यानंतर सुरू झालेल्या पावसाचा रोपांना मोठा फायदा झाला. सध्या भाताची नर्सरी अत्यंत उत्तम स्थितीत असून याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे.

​सुगंधी आणि आरोग्यदायी तांदूळ:

जस्मिन राइस हा जगातील सर्वाधिक सुगंधी तांदळांपैकी एक मानला जातो. हा तांदूळ पूर्णपणे झिरो ग्लुटन (Zero Gluten) असून त्यात फॅट्सचे प्रमाण अत्यंत अल्प असते. याशिवाय यामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्बोहायड्रेट्स, आयरन (लोह), मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी-९ (फॉलिक एसिड) आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म मुबलक प्रमाणात आढळतात.

​योग्य नियोजन, चिकाटी आणि सेंद्रिय शेतीची जोड दिली तर प्रतिकूल हवामानातही परदेशी व उच्च दर्जाची पिके यशस्वीरीत्या घेता येतात, हे मिनेश गाडगीळ यांनी आपल्या या प्रयोगातून पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

या प्रयोगाबद्दल बोलताना मिनेश गाडगीळ म्हणाले, “कोणतेही रासायनिक खत न वापरता, केवळ मी स्वतः संशोधन केलेल्या सेंद्रिय द्रव्यांची फवारणी या पिकावर केली आहे. आता पुढे निसर्गाची अनुकूल साथ लाभल्यास यातून सुमारे १०० किलोपर्यंत शुद्ध बियाणे उपलब्ध होईल.”

कुटगिरी येथे लोखंडी पूल कोसळल्याची दुर्घटना: एका बैलाचा मृत्यू, ६ जनावरे गंभीर जखमी

   Follow us on        

गुहागर शहर : तालुक्यातील कुटगिरी गावठाणवाडी परिसरातील नदीवरील लोखंडी पूल सोमवारी सायंकाळी ७:३० वाजता अचानक कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली. पूल कोसळत असताना त्यावरून जात असलेली सुमारे १० ते १२ जनावरे पुलाखाली अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. या दुर्घटनेमध्ये दिलीप गुरव यांच्या मालकीच्या एका बैलाचा मृत्यू झाला असून, अन्य ६ जनावरे गंभीर जखमी झाल्याची माहिती गुहागर आपत्ती विभागाकडून प्राप्त झाली आहे.

​घटना घडताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, नदीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने तसेच पुलाचे जड लोखंडी साहित्य जनावरांवर कोसळल्यामुळे बचावकार्य करताना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. काही ग्रामस्थ नदीत उतरून जनावरे वाचवण्याचा प्रयत्न करत असले तरी, लोखंडी रचना हटवल्याशिवाय अनेक जनावरांना बाहेर काढणे शक्य होत नव्हते.

​घटनेची माहिती मिळताच मंडळ अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच, जिल्हा परिषद बांधकाम उपअभियंता व पशुवैद्यकीय अधिकारी यांना घटनास्थळी पोहोचण्याच्या सूचना गुहागर आपत्ती विभागाकडून देण्यात आल्या होत्या. त्यानंतर स्थानिक नागरिक व प्रशासनाच्या मदतीने दुर्घटनेत मृत झालेल्या बैलासह सर्व जखमी ६ जनावरांना अखेर सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

कोकण रेल्वेत विविध पदांसाठी भरती जाहीर; अर्ज कसा कराल?

   Follow us on        

नवी मुंबई: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) ने विविध विभागांतील २०२ रिक्त पदांच्या भरतीसाठी रोजगार अधिसूचना क्र. CO/P-R/02/2026 जारी केली आहे. या भरती प्रक्रिया अंतर्गत ज्युनिअर इंजिनिअर, स्टेशन मास्तर, असिस्टंट लोको पायलट आणि ट्रॅक मेंटेनर यांसारख्या विविध महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांना ऑगस्ट २०२६ च्या शेवटच्या आठवड्यापासून KRCL च्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

१.एकूण पदे -२०१

 

महत्त्वाची नोंद: ट्रॅक मेंटेनर (Track Maintainer) ची सर्व ५७ पदे केवळ प्रकल्पग्रस्त (Land Losers) उमेदवारांसाठीच राखीव आहेत.

२. निवड प्रक्रियेत प्राधान्यक्रम (Preference Order)

कोकण रेल्वेने उमेदवारांच्या निवडीसाठी पुढीलप्रमाणे प्राधान्यक्रम निश्चित केला आहे:

प्रथम प्राधान्य: कोकण रेल्वे प्रकल्पासाठी जमीन दिलेल्या प्रकल्पग्रस्त (Land Loser) उमेदवारांना.

द्वितीय प्राधान्य: कोकण रेल्वे मार्गावरील जिल्ह्यांमधील (रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा राज्य, उत्तर कन्नड, उडुपी, दक्षिण कन्नड) रोजगार कार्यालयात नोंदणीकृत असणारे उमेदवार.

तृतीय प्राधान्य: महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यातील डोमिसाईल (अधिवास) धारक उमेदवार व KRCL मधील नियमित कर्मचारी.

३. वयोमर्यादा (Age Limit) व शैक्षणिक पात्रता

वयोमर्यादा (०१/०८/२०२६ रोजी):

गट ‘क’ (Group C) पदे: १८ ते ३६ वर्षे.

ट्रॅक मेंटेनर (Group D) पदे: १८ ते ४५ वर्षे.

(सरकारी नियमांनुसार SC/ST उमेदवारांना ५ वर्षे, तर OBC (NCL) उमेदवारांना ३ वर्षांची सूट दिली जाईल).

शैक्षणिक पात्रता:

पदांनुसार १० वी पास, ITI, अभियांत्रिकी पदविका (Diploma), B.E./B.Tech किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणतीही पदवी (Graduation) आवश्यक आहे.

४. अर्ज शुल्क आणि अर्ज प्रक्रिया

परीक्षेचे शुल्क:

सामान्य व इतर प्रवर्ग: रु. १,१८०/- (रु. १००० + १८% GST).

SC / ST / महिला / माजी सैनिक / PwBD / अल्पसंख्याक / EBC: परीक्षा दिल्यानंतर नियमानुसार शुल्क बँक शुल्काची रक्कम कापून परत (Refund) केले जाईल.

अर्जाची पद्धत: अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील.

 

५. निवड प्रक्रिया (Selection Process)

१. संगणकावर आधारित परीक्षा (CBT): सर्व पदांसाठी संभाव्यतः सप्टेंबर २०२६ मध्ये संगणकावर आधारित परीक्षा घेतली जाईल.

२. अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट / PET: स्टेशन मास्तर, ALP व सेक्शन कंट्रोलरसाठी ‘अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट’ आणि ट्रॅक मेंटेनरसाठी ‘शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)’ घेतली जाईल.

३. कागदपत्र पडताळणी (DV) व वैद्यकीय तपासणी (Medical Examination).

महत्त्वाच्या लिंक्स व अधिकृत संकेतस्थळ

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कोकण रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी:

अधिकृत वेबसाईट: www.konkanrailway.com

 

 

कोकण रेल्वेसंबंधी विविध मागण्यांसाठी प्रवासी संघटनांनी घेतली आमदार माधवी नाईक यांची भेट

   Follow us on        

ठाणे: कोकण आणि रेल्वे प्रवाशांच्या विविध मागण्यांसाठी शनिवार, १ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी विधानपरिषद आमदार सौ. माधवी नाईक यांची ठाणे येथील कार्यालयात भेट घेतली. या बैठकीत कोंकण विकास समिती, सिंधुदुर्ग मराठा विकास मंडळ, ठाणे, कोकण रेल्वे प्रवासी संघटना (सावंतवाडी) आणि महाराष्ट्र रेल्वे परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

​यावेळी, नव्याने मान्यता मिळालेल्या मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – सावंतवाडी रोड दैनिक एक्सप्रेसबद्दल आमदार सौ. माधवी नाईक यांच्यासह रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानण्यात आले. तसेच, सावंतवाडी टर्मिनसच्या दुसऱ्या टप्प्यातील काम पूर्ण होण्यासाठी आवश्यक प्रशासकीय मान्यता मिळवून देण्यात सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली. याशिवाय, कोकणातील चाकरमान्यांसाठी व प्रवाशांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या रत्नागिरी-दादर पॅसेंजर ट्रेन पूर्ववत सुरू करण्यासाठी योग्य त्या पातळीवर पाठपुरावा करण्याची मागणीही करण्यात आली.

​आमदार सौ. माधवीताई नाईक यांनी कार्यकर्त्यांच्या सर्व समस्या व मागण्या शांतपणे ऐकून घेतल्या आणि यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या शिष्टमंडळात किशोर सावंत, अक्षय मधुकर महापदी, प्रसन्न प्रकाश कलमस्टे, प्रमोद बागवे, संजय शिंदे, अशोक शिंदे, अमित शेलार, जतिन कोठारे, हेमंत गडकरी, रविंद्र साटम आणि राजेश तावडे आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

खुशखबर! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान नवीन दैनिक एक्सप्रेसला मंजुरी

   Follow us on        

मुंबई:

कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी आणि पर्यटकांसाठी एक अत्यंत आनंददायी बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वेने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि सिंधूदूर्गातील सावंतवाडी रोड दरम्यान एका नवीन दैनिक (रोज धावणारी) एक्सप्रेस ट्रेन सेवा सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. ५१० किलोमीटरच्या या मार्गामुळे मुंबई, ठाणे आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीदरम्यानची रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे.

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या (PIB) प्रसिद्धीपत्रकानुसार, या नवीन सेवेमुळे पर्यटन, व्यवसाय, शिक्षण आणि स्थानिक रोजगारासाठी प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व सोयीचा होणार आहे.

ट्रेनचा क्रमांक व मार्ग

ही नवीन एक्सप्रेस ट्रेन दररोज पुढील क्रमांकांनी धावेल:

  • ट्रेन क्र. १५०८७: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते सावंतवाडी रोड एक्सप्रेस

  • ट्रेन क्र. १५०८८: सावंतवाडी रोड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) एक्सप्रेस

 थांबे (Stoppages)

मुंबई महानगर क्षेत्र ते दक्षिण कोकणाला जोडणाऱ्या या ५१० किमीच्या प्रवासात प्रमुख शहरांना व स्थानकांना व्यावसायिक थांबे देण्यात आले आहेत:

दादर • ठाणे • पनवेल • पेण • रोहा • माणगाव • वीर • खेड • चिपळूण • सावर्डे • अरावली रोड • संगमेश्वर रोड • रत्नागिरी • अडवली • विलवडे • राजापूर रोड • वैभववाडी रोड • नांदगाव रोड • कणकवली • सिंधुदुर्ग • कुडाळ • सावंतवाडी रोड.

पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला गती

ही नवीन रेल्वे सेवा कोकणातील निसर्गरम्य समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, मंदिरे आणि इको-टूरिझम केंद्रांना भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून यामुळे पर्यटनास मोठा उत्साह मिळेल. तसेच, रोजचा प्रवास करणारे नागरिक, विद्यार्थी, व्यापारी व छोट्या व्यावसायिकांना यामुळे थेट आणि सोयीस्कर प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाल्याने प्रादेशिक आर्थिक विकासाला हातभार लागणार आहे. याशिवाय, कोकण मार्गावर सातत्याने असणारी प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता या नवीन दैनिक सेवेमुळे इतर गाड्यांवरील ताण कमी होण्यास मदत होईल. एकंदरीत, भारतीय रेल्वेच्या या निर्णयामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टीच्या प्रादेशिक विकासाला आणि वाहतूक व्यवस्थेला मोठा हातभार लागणार आहे.

मालवण – पंढरपुर – अक्कलकोट एसटी बससेवा सुरू

   Follow us on        

मालवण: एसटी महामंडळाच्या मालवण आगारामार्फत मालवण ते अक्कलकोट ही थेट बससेवा सुरू करण्यात आली आहे. स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी ही सेवा अत्यंत दिलासादायक ठरणार असून कोकणातील प्रवाशांना आता बस बदल न करता थेट अक्कलकोटपर्यंत प्रवास करता येणार आहे.

​ही बस मालवण येथून दररोज दुपारी ३.४५ वाजता सुटणार आहे, तर अक्कलकोट येथून सायंकाळी ७.३० वाजता परतीचा प्रवास सुरू होईल. या प्रवासादरम्यान आचारा, कणकवली, तळेरे, वैभववाडी, गगनबावडा, कोल्हापूर, सांगोला, पंढरपूर आणि सोलापूर ही प्रमुख ठिकाणे येणार आहेत.

​प्रवाशांच्या सोयीसाठी या बसचे ऑनलाईन आरक्षण उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच शासनाच्या विविध सवलत योजनांनुसार महिलांना ५० टक्के सवलत आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के सवलत लागू आहे. त्यामुळे अधिकाधिक प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मालवण आगारामार्फत करण्यात आले असून, अधिक माहितीसाठी ०२३६५-२५२०३४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या नामांतरणाच्या प्रक्रियेला वेग; केंद्र सरकारने मागवले अभिप्राय

   Follow us on        

सावंतवाडी: कोकण रेल्वे मार्गावरील ‘सावंतवाडी रेल्वे स्टेशन टर्मिनस’ चे नाव बदलून ‘लोकमान्य मधू दंडवते टर्मिनस’ करण्याच्या प्रक्रियेला आता प्रशासकीय पातळीवर वेग आला आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, नामवंत संसदपटू आणि भारताचे माजी केंद्रीय मंत्री स्व. मधू दंडवते यांनी कोकणाच्या विकासात, विशेषतः कोकण रेल्वेच्या उभारणीत दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यांच्या या योगदानाचा गौरव करण्यासाठी सावंतवाडी टर्मिनसला त्यांचे नाव देण्याची मागणी दीर्घकाळापासून केली जात होती.

या मागणीची दखल घेत महाराष्ट्र शासनाने नामकरणाचा प्रस्ताव तयार केला होता. मुख्यमंत्री आणि राज्य मंत्रिमंडळाच्या २६ मे २०२६ रोजी झालेल्या बैठकीत सावंतवाडी टर्मिनसचे नाव बदलून ‘लोकमान्य मधू दंडवते टर्मिनस’ करण्याच्या प्रस्तावाला अधिकृत मंजुरी देण्यात आली. या मान्यतेनंतर राज्याचे अप्पर मुख्य सचिव (परिवहन व बंदरे) संजय सेठी यांनी १६ जून २०२६ रोजी केंद्रीय गृह सचिवांना पत्र पाठवून नामकरणाबाबत केंद्र सरकारने लवकरात लवकर पुढील कार्यवाही करावी, अशी विनंती केली होती.

महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावावर केंद्रीय गृह मंत्रालयाने तातडीने पावले उचलली आहेत. गृह मंत्रालयाचे अवर सचिव कुंदन कुमार यांनी २७ जुलै २०२६ रोजी एक कार्यालयीन ज्ञापन जारी केले आहे. या ज्ञापनाद्वारे केंद्र सरकारच्या नियमांनुसार नामकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारच्या या प्रस्तावाची प्रत संबंधित केंद्रीय मंत्रालये आणि विभागांकडे पुढील अभिप्रायासाठी पाठवण्यात आली आहे.

गृह मंत्रालयाने या प्रस्तावावर रेल्वे मंत्रालय (रेल्वे बोर्ड), विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, भारतीय सर्वेक्षण विभाग (सर्व्हेअर जनरल ऑफ इंडिया) आणि टपाल विभागाकडून अधिकृत मते व अभिप्राय मागवले आहेत. या सर्व संबंधित विभागांकडून मंजुरी व अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या नव्या नामकरणाची अंतिम आणि अधिकृत अधिसूचना जारी केली जाईल.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search