Category Archives: कोकण

​आता फक्त ६० रुपयांत मिळणार डिजिटल भूनकाशा

   Follow us on        

कणकवली: मूळ जमाबंदीवेळी तयार झालेले भूमापनचे सर्व्हे नंबरचे नकाशे, एकत्रीकरण योजनेअंतर्गत तयार झालेले गट नंबरचे डिजिटल नकाशे, नगर भूमापन नकाशे, गावठाण भूमापन नकाशे तसेच स्वामित्व योजनेअंतर्गत तयार झालेले गावठाण भूमापन नकाशे एप्लीकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (API) द्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठीचे शुल्कही निश्चित करण्यात आले असून, या अंतर्गत संगणकीकृत स्वाक्षरीचे पीडीएफ नकाशे सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रिपेड स्वरूपात ६० रुपये दराने मिळणार आहेत.

​संगणकीकृत स्वाक्षरीचे .dwg स्वरूपातील नकाशे आणि .shp स्वरूपातील नकाशे १२० रुपयांच्या दरात उपलब्ध होणार आहेत. खासगी व सरकारी बँकांसाठीही हाच दर लागू असणार असून, त्यांच्यासाठी पोस्टपेड स्वरूपात एक महिना क्रेडिट उपलब्ध होईल. राज्य शासनाच्या प्रशासनिक विभागांसाठी असे नकाशे नि:शुल्क मिळणार आहेत. भारत सरकारचे सार्वजनिक उपक्रम, महामंडळे व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यासाठी पोस्टपेड स्वरूपात पीडीएफ नकाशे ८४ रुपयात, तर संगणकीकृत स्वाक्षरीचे .dwg व .shp नकाशे ६० रुपये दराने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. संपूर्ण गाव नकाशाची मागणी केल्यास ५००० रुपये आकारणी करण्यात येणार असून, त्यात राज्य शासनाचा हिस्सा ३००० रुपये आणि जमाबंदी आयुक्त यांचा हिस्सा २००० रुपये असेल.

​संगणकीकृत स्वाक्षरीने मिळकत पत्रिकेसाठी अ, ब, क वर्ग नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात नागरिकांसाठी ९० रुपये प्रति अभिलेख आणि ग्रामीण क्षेत्रासाठी ४५ रुपये प्रति अभिलेख दर असणार आहे. सरकारी व खासगी बँकांसाठीही हाच दर लागू आहे. सामान्य नागरिकांसाठी पीडीएफ स्वरूपातील सातबारा, आठ-अ आणि फेरफारसाठी प्रति अभिलेख १५ रुपये, सरकारी व खासगी बँकांसाठी एक महिन्याच्या क्रेडिटवर पोस्टपेड स्वरूपात १५ रुपये आणि प्रशासकीय विभागांसाठी हे अभिलेख नि:शुल्क देण्यात येणार आहेत.

​सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक महामंडळे, स्वायत्त संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यासाठी पोस्टपेड स्वरूपात प्रति अभिलेख १५ रुपये आकारले जातील. भारत सरकारचे जे विभाग महसूल अभिलेख देऊन स्वतःकडील डेटा शेअर करतात, अशा विभागांसाठी हे अभिलेख नि:शुल्क देण्यात येणार आहेत. मात्र, भारत सरकारचे जे विभाग अभिलेख घेऊन स्वविभागाकडे डेटा शेअर करत नाहीत, त्यांना १५ रुपये आकारण्यात येणार आहेत.

‘सागरमाला २.०’ अंतर्गत राज्यातील प्रकल्पांच्या मंजुरीसाठी नितेश राणे यांचा केंद्राकडे पाठपुरावा

   Follow us on        

मुंबई : महाराष्ट्रातील बंदरे, मत्स्यव्यवसाय, किनारी पायाभूत सुविधा आणि सागरी पर्यटनाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. ‘सागरमाला २.०’ अंतर्गत राज्याने प्रस्तावित केलेल्या विविध प्रकल्पांना लवकरात लवकर मंजुरी मिळावी, यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट घेऊन पत्र दिले आणि विशेष पाठपुरावा केला आहे.

​मंत्री नितेश राणे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, महाराष्ट्र सरकारने ‘सागरमाला २.०’ कार्यक्रमांतर्गत विविध प्रकल्पांना सर्वोच्च प्राधान्य दिले असून, हे प्रकल्प २.० अंतर्गत विविध घटकांचा समावेश असलेले सर्वसमावेशक प्रकल्प प्रस्ताव आहेत. हे प्रकल्प ‘विकसित भारत २०४७’ या राष्ट्रीय संकल्पनेशी सुसंगत असल्याने त्यांना प्राधान्याने मंजुरी देण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.

​या प्रकल्पांमुळे राज्यातील बंदराधारित विकासाला चालना मिळणार असून बहुविध लॉजिस्टिक संपर्क व्यवस्था मजबूत होईल, मत्स्य बंदरांचे आधुनिकनीकरण होईल, किनारी भागातील पायाभूत सुविधा उन्नत होतील तसेच किनारी जलवाहतूक, अंतर्गत जलमार्ग आणि सागरी पर्यटनालाही मोठी चालना मिळेल. याशिवाय किनारी भागात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होण्यास मदत होईल, खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल आणि राज्याच्या आर्थिक विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने केंद्र सरकारच्या सूचनांनुसार ‘सागरमाला २.०’ अंतर्गत विविध घटकांचा समावेश असलेले सर्वसमावेशक प्रकल्प प्रस्ताव सादर केले आहेत.

​केंद्र सरकारकडून या प्रस्तावांना लवकर मंजुरी मिळाल्यास महाराष्ट्रातील बंदर विकास, सागरी पायाभूत सुविधा, किनारी अर्थव्यवस्था आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रात मोठी प्रगती होईल. असा विश्वास व्यक्त करत राज्य सरकार सागरी क्षेत्रात महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य राज्य बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे.

चिरेकापणीच्या मशिनवर पडून कामगाराचा मृत्यू

   Follow us on        

देवगड:

तालुक्यातील लिंगडाळ येथील एका चिरेखाणीवर काम करणारा सुखदेव बड्डा टेकाम (३६, मूळ रा. कोडल, तेंडूखेडा, जि. दमोह, रा. मध्य प्रदेश) हा कामगार चिरे कापण्याच्या मशिनवर पडून गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना २७ जून, २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. लिंगडाळ येथील चिरेखाणीवर काम करत असताना तो अचानक मशिनवर पडल्याने त्याच्या गळ्याला गंभीर दुखापत होऊन तोंडातून रक्तस्राव झाला.

​ही बाब लक्षात येताच इतर कामगारांनी त्याला तातडीने देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचार सुरू करण्यापूर्वीच तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर त्याचा मृतदेह अंत्यविधीसाठी त्याच्या मूळ गावी नेण्यात आला.

​या प्रकरणी सुखदेव टेकाम (२६, रा. कोडल) यांनी २९ जून रोजी तेंडूखेडा पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून, सुरुवातीला तिथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडल्याने, तेंडूखेडा पोलिसांनी हे प्रकरण तपासासाठी सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत देवगड पोलीस स्थानकाकडे वर्ग केले. त्यानुसार देवगड पोलीस स्थानकात मंगळवारी रात्री उशिरा या घटनेची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक श्याम बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुले पुढील तपास करत आहेत.

‘शक्तीपीठ’ तीन महामार्गांना जोडेल! – आमदार दीपक केसरकर

   Follow us on        

सावंतवाडी: ‘शक्तीपीठ’ महामार्ग तीन महामार्गांना जोडला जाईल आणि याद्वारे पर्यटन विकास घडवला जाईल असे विधान सावंतवाडी येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना आमदार दीपक केसरकर यांनी काल केले,. दोडामार्ग तालुक्यातील काही गावे ‘इको सेन्सिटिव्ह’ झोनमध्ये समाविष्ट झाल्यामुळे तेथे काही निर्बंध आले आहेत, ज्यांचे पालन करणे गरजेचे आहे. या भागातील वृक्षतोट रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सजगता निर्माण करण्यासाठी एनजीओच्या मदतीने प्रत्येक गावात जाऊन जनजागृती केली जाणार आहे.

​मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांच्या आमसभा गेल्या काही वर्षांपासून झालेल्या नव्हत्या, मात्र आता त्या होत असल्याची आनंदाची बाब त्यांनी व्यक्त केली. वेळापत्रकानुसार सावंतवाडी तालुक्याची आमसभा ६ ऑगस्टला तर दोडामार्ग तालुक्याची आमसभा ७ ऑगस्टला होणार असून, सावंतवाडी व दोडामार्गपाठोपाठ पुढील आठवड्यात वेंगुर्ला तालुक्याची आमसभा घेतली जाईल. या तिन्ही तालुक्यांचा सर्वांगीण विकास आणि पर्यटन विकासाला आपले प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

​याशिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्यामुळे सावंतवाडी रेल्वे स्थानकावर तीन नव्या गाड्यांना थांबा मिळाला आहे. भविष्यात या भागात अजून जास्त गाड्या उपलब्ध करून देण्याच्या आणि सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला पाण्याची व्यवस्था पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे केसरकर यांनी शेवटी सांगितले.

पाश्चिम रेल्वेकडून विशेष गाड्यांना मुदतवाढ; कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या एका गाडीचा समावेश

   Follow us on        

Railway Updates: स्वातंत्र्य दिनी लागून आलेल्या सुट्ट्या आणि सणासुदीच्या काळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष गाड्यांच्या फेऱ्या वाढवल्या आहेत. यात ०९४२४ / ०९४२३ | अहमदाबाद – मंगळुरू विशेष या कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या गाडीचा समावेश असल्याने कोकणात जाणार्‍या प्रवाशांची सोय होणार आहे.

मुंबई, २९ जुलै २०२६:

अतिरिक्त प्रवासी वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षित व आरामदायी प्रवासाची खात्री करण्यासाठी पश्चिम रेल्वेने अनेक लोकप्रिय विशेष गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवासारख्या आगामी सणांच्या काळात चाकरमानी आणि प्रवाशांना होणारी गर्दी लक्षात घेता हा निर्णय अत्यंत दिलासादायक ठरणार आहे.

महत्त्वाच्या गाड्यांचे तपशील व फेऱ्यांचा विस्तार:

| ट्रेन क्रमांक | गाडीचे नाव (मार्ग) | फेरीचा वार (Frequency) | वाढीव कालावधी / विस्तार

| ०९००५ / ०९००६ | बांद्रा टर्मिनस – भिवानी सुपरफास्ट विशेष | साप्ताहिक (बुधवार / गुरुवार) | २६.०८.२०२६ / २७.०८.२०२६ पर्यंत |

| ०९००१ / ०९००२ | मुंबई सेंट्रल – भिवानी सुपरफास्ट विशेष | द्वि-साप्ताहिक (मंगळवार-शुक्रवार / बुधवार-शनिवार) | २८.०८.२०२६ / २९.०८.२०२६ पर्यंत |

| ०९१८५ / ०९१८६ | मुंबई सेंट्रल – कानपूर अनवरगंज सुपरफास्ट विशेष | साप्ताहिक (रविवार / सोमवार) | ३०.०८.२०२६ / ३१.०८.२०२६ पर्यंत |

| ०९४२४ / ०९४२३ | अहमदाबाद – मंगळुरू विशेष | साप्ताहिक (शुक्रवार / शनिवार) | २८.०८.२०२६ / २९.०८.२०२६ पर्यंत |

| ०९४४७ / ०९४४८ | अहमदाबाद – पाटणा सुपरफास्ट विशेष | साप्ताहिक (बुधवार / शुक्रवार) | ०५.०८.२०२६ / ०७.०८.२०२६ पर्यंत |

| ०९०९३ / ०९०९४ | उधना – अयोध्या धाम / अयोध्या कॅन्ट – उधना विशेष | साप्ताहिक (शनिवार इ.) | २९.०८.२०२६ पर्यंत |

| ०९०९७ / ०९०९८ | उधना – अयोध्या कॅन्ट विशेष | साप्ताहिक (मंगळवार / बुधवार) | २५.०८.२०२६ / २६.०८.२०२६ पर्यंत |

| ०९०३३ / ०९०३४ | उधना – मालदा टाउन विशेष | साप्ताहिक (गुरुवार / रविवार) | २७.०८.२०२६ / ३०.०८.२०२६ पर्यंत |

| ०९४५१ / ०९४५२ | गांधीधाम – भागलपूर विशेष | साप्ताहिक (शुक्रवार / सोमवार) | २८.०८.२०२६ / ३१.०८.२०२६ पर्यंत |

आरक्षण आणि महत्त्वाची माहिती:

आरक्षण सुरू: या सर्व वाढीव फेऱ्यांचे आरक्षण आजपासून म्हणजेच २९ जुलै २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजल्यापासून सर्व पीआरएस (PRS) काऊंटर्स आणि आयआरसीटीसी (IRCTC) च्या अधिकृत वेबसाइटवर सुरू झाले आहे.

या सर्व गाड्या विशेष भाड्याने (Special Fare) चालवल्या जातील आणि त्यांचा कालावधी ऑगस्ट २०२६ च्या अखेरपर्यंत राहील.

वेळापत्रक व थांबे: गाड्यांच्या वेळा, थांबे आणि रचनेसंबंधीची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 

 

View this post on Instagram

 

​१ ऑगस्टपासून खोल समुद्रात मासेमारी सुरू!

   Follow us on        

मुंबई: राज्यातील मच्छिमारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली असून, १ ऑगस्ट २०२६ पासून विशेष आर्थिक क्षेत्रात (Exclusive Economic Zone – EEZ) म्हणजेच किनाऱ्यापासून १२ सागरी माइलापुढील खोल समुद्रात मासेमारी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, महाराष्ट्राच्या प्रादेशिक जलक्षेत्रात (किनाऱ्यापासून १२ सागरी माइलापर्यंत) १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत मासेमारीवरील बंदी कायम राहणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाने दिली आहे.

​पावसाळा हा अधिकांश सागरी माशांच्या प्रजननाचा काळ असल्याने मत्स्यसंपत्तीचे संवर्धन आणि पुनरुत्पादन व्हावे, यासाठी दरवर्षी या कालावधीत मासेमारीवर बंदी घातली जाते. यंदा महाराष्ट्र शासनाने प्रादेशिक जलक्षेत्रातील बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत, म्हणजेच एकूण ७६ दिवसांपर्यंत वाढवला आहे. त्यामुळे किनाऱ्यापासून १२ सागरी माइलापर्यंतच्या समुद्रात या कालावधीत मासेमारी करण्यास परवानगी नाही. त, केंद्र शासनाने पश्चिम किनारपट्टीवरील विशेष आर्थिक क्षेत्रात (EEZ) ३१ जुलैपर्यंत म्हणजेच ६१ दिवसांची बंदी लागू केली होती, त्यामुळे १ ऑगस्टपासून EEZ क्षेत्रात मासेमारी पुन्हा सुरू होणार आहे.

​मत्स्यव्यवसाय विभागाने मच्छिमारांना खोल समुद्रात मासेमारी करताना या मर्यादांचे काटेकोर पालन करण्याचे आणि सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, बंदीच्या कालावधीत महाराष्ट्राच्या प्रादेशिक जलक्षेत्रात बेकायदेशीररीत्या मासेमारी करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र सागरी मत्स्यव्यवसाय नियमन अधिनियम अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही विभागाने दिला आहे.

तब्बल सहा वर्षानी राजधानी एक्सप्रेस सावंतवाडीत थांबली; जल्लोषात स्वागत

   Follow us on        

सावंतवाडी रोड (लोकनेते मधू दंडवते टर्मिनस) रेल्वे स्थानकावर राजधानी एक्सप्रेसला पुन्हा एकदा थांबा मिळाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. बुधवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही गाडी स्थानकात दाखल होताच, कोकण रेल्वे प्रवासी संघटना आणि स्थानिक रेल्वेप्रेमींनी तिचे अत्यंत उत्साहात स्वागत केले. यावेळी रेल्वेची विधिवत पूजा करण्यात आली, तसेच गाडीच्या दोन्ही चालकांचा श्रीफळ, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थित प्रवाशांना पेढे वाटून हा आनंदोत्सव मोठ्या दणक्यात साजरा करण्यात आला.

​या कार्यक्रमादरम्यान कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव मिहीर मठकर यांनी कोरोना काळातील अडचणींना उजाळा दिला. कोरोना काळात राजधानी आणि गरीब रथ एक्सप्रेसचा थांबा बंद करण्यात आला होता, मात्र संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आता राजधानी एक्सप्रेससह गरीब रथ आणि मंगळूरू एक्सप्रेसचा थांबा पुन्हा मिळवण्यात यश आल्याची माहिती त्यांनी दिली. या यशामागे मुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार आणि इतर लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या मोलाच्या मेहनतीचे त्यांनी विशेष कौतुक केले. तसेच सावंतवाडी स्थानकाला ‘लोकनेते मधू दंडवते टर्मिनस’ हे नाव प्राप्त झाले असून, या नामासाजेसा प्रवाशांचा विकास व सुविधा भविष्यात येथे उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

​या स्वागताच्या सोहळ्याला संघटनेचे उपाध्यक्ष सागर तळवडकर, ज्येष्ठ सल्लागार सुभाष शिरसाट, खजीनदार भूषण बांदिवडेकर यांच्यासह सिद्धेश सावंत, मिहीर गावडे, यश सावंत, संकेत सावंत, सरिता सावंत, प्रेरणा पोकळे, निधी धुरी, करण धुरी, श्री. तानावडे, तसेच मळगाव रिक्षा संघटनेचे पदाधिकारी, रेल्वे प्रवासी संघटनेचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने रेल्वेप्रेमी उपस्थित होते.

पनवेल: एर्नाकुलम-पुणे एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड; प्रवाशांना सुरक्षितपणे हलवले

   Follow us on        

बुधवारी पनवेल रेल्वे स्थानकावर एर्नाकुलम-पुणे सुपरफास्ट एक्सप्रेसच्या (ट्रेन क्रमांक २२१४९) बी-१ या डब्यात तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली. ट्रेन पनवेल स्थानकावर पोहोचल्यानंतर डब्यातील कंट्रोल आर्म तुटल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले, ज्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने तातडीने पावले उचलली.

​ही तांत्रिक अडचण लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित बी-१ डबा मुख्य ट्रेनपासून वेगळा करण्याचा निर्णय घेतला. या डब्यात प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना कोणतीही जोखीम न पत्कता इतर डब्यांमध्ये सुरक्षितपणे स्थानांतरीत करण्यात आले. या सुयोग्य आणि तत्पर नियोजनामुळे कोणतीही जीवितहानी किंवा दुखापतीची घटना घडली नाही, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.

​डबा वेगळा करणे आणि प्रवाशांची सुरक्षित सोय करण्याच्या या प्रक्रियेमुळे ट्रेनच्या वेळेत सुमारे तीन तासांचा विलंब झाला. सर्व आवश्यक तांत्रिक पडताळणी आणि सुरक्षेची खात्री केल्यानंतर ट्रेन आपल्या पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली. या अनपेक्षित बिघाडामुळे प्रवाशांना झालेल्या मनस्तापाबद्दल व असुविधेबद्दल रेल्वे प्रशासनाने जाहीर दिलगीर व्यक्त केली आहे.

मत्स्यसंपदा योजनेंतर्गत मच्छिमारांना सॅटेलाइट फोनचे वाटप

   Follow us on        

मुंबई: राज्यातील मच्छिमारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महाराष्ट्र शासनाने सॅटेलाइट फोन वाटпаच्या उपक्रमाला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला असून, मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना अंतर्गत बीएसएनएलचे सॅटेलाइट फोन राज्यातील मच्छिमारांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली.

​मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत नवीन सॅटेलाइट फोनबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. हे फोन समुद्राच्या कोणत्याही भागात कार्यरत राहत असल्यामुळे, समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छिमारांचा त्यांच्या कुटुंबांशी तसेच मत्स्य विभागाशी संपर्क कायम ठेवणे शक्य होणार आहे.

​समुдраत मासेमारीदरम्यान अपघात, वादळ किंवा इतर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास अनेकदा मच्छिमारांचा बाहेरील जगाशी संपर्क तुटतो. त्यामुळे वेळेवर मदत मिळण्यात अडचणी येतात. सॅटेलाइट फोनमुळे अशा परिस्थितीत तातडीने संपर्क साधणे शक्य होईल, परिणामी बचावकार्य अधिक जलद होऊन मच्छिमारांचे प्राण वाचवण्यास मोठी मदत मिळणार आहे.

​बीएसएनएलने विकसित केलेले हे सॅटेलाइट फोन मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून राज्यातील जास्तीत जास्त मच्छिमारांपर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पात्र मच्छिमारांना सॅटेलाइट फोन उपलब्ध करून दिले जाणार आहेत. राज्यातील अधिकाधिक मच्छिमारांनी मत्स्य विभागाशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी केले. प्रत्येक मच्छिमाराकडे सॅटेलाइट फोन उपलब्ध झाल्यास समुद्रातील आपत्कालीन परिस्थितीत त्यांची सुरक्षा वाढण्याबरोबरच वेळेवर मदत पोहोचवणे अधिक प्रभावी होईल आणि अनेकांचे प्राण वाचवण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Konkan Railway: गणपती विशेष गाड्यांच्या आरक्षणाच्या तारखा जाहीर..

   Follow us on        

गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने (CR) विशेष शुल्कावर  ‘टीओडी’ (TOD) विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला असून, या विशेष गाड्यांच्या आरक्षणाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. या विशेष गाड्यांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे:

​छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) – रत्नागिरी (RN):

​गाडी क्रमांक ०११५३ / ०११५४: ११/०९/२०२६ ते २६/०९/२०२६ आणि १२/०९/२०२६ ते २७/०९/२०२६ या कालावधीत ही गाडी दररोज धावणार असून याचे तिकीट आरक्षण ०१/०८/२०२६ पासून सुरू होईल.

​पुणे – रत्नागिरी(RN):

​गाडी क्रमांक ०१४४५ / ०१४४६: १५/०९/२०२६ व २२/०९/२०२६ रोजी साप्ताहिक (मंगळवारी) धावणार असून याचे आरक्षण ०१/०८/२०२६ पासून सुरू होईल.

​गाडी क्रमांक ०१४४७ / ०१४४८: १२/०९/२०२६, १९/०९/२०२६ आणि २६/०९/२०२६ रोजी साप्ताहिक (शनिवारी) धावणार असून याचे आरक्षण ०१/०८/२०२६ पासून सुरू होईल.

​लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – रत्नागिरी (RN):

​गाडी क्रमांक ०११६७ / ०११६८: १२/०९/२०२६ ते २६/०९/२०२६ आणि १३/०९/२०२६ ते २७/०९/२०२६ दरम्यान मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार, रविवार व सोमवार या वारांमध्ये धावणार असून याचे आरक्षण ०१/०८/२०२६ पासून सुरू होईल.

​लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – मडगाव (MAO):

​गाडी क्रमांक ०११६५ / ०११६६: १५/०९/२०२५ व २२/०९/२०२५ रोजी साप्ताहिक (मंगळवारी) धावणार असून याचे आरक्षण ०२/०८/२०२६ पासून सुरू होईल.

​गाडी क्रमांक ०११८५ / ०११८६: १६/०९/२०२६ व २३/०९/२०२६ रोजी साप्ताहिक (बुधवारी) धावणार असून याचे आरक्षण ०२/०८/२०२६ पासून सुरू होईल.

​छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) – सावंतवाडी रोड (SWV):

​गाडी क्रमांक ०११०३ / ०११०४: ११/०९/२०२६ ते २६/०९/२०२६ आणि १२/०९/२०२६ ते २७/०९/२०२६ दरम्यान ही गाडी दररोज धावणार असून याचे आरक्षण ०३/०८/२०२६ पासून सुरू होईल.

​गाडी क्रमांक ०११५१ / ०११५२: ११/०९/२०२६ ते २७/०९/२०२६ दरम्यान ही गाडी दररोज धावणार असून याचे आरक्षण ०३/०८/२०२६ पासून सुरू होईल.

​लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – सावंतवाडी रोड (SWV):

​गाडी क्रमांक ०११२९ / ०११३०: १५/०९/२०२६ व २२/०९/२०२६ रोजी साप्ताहिक (मंगळवारी) धावणार असून याचे आरक्षण ०३/०८/२०२६ पासून सुरू होईल.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search