Category Archives: कोकण

Konkan Railway: सावंतवाडी स्थानकावर नव्याने थांबे मिळालेल्या गाड्यांचे वेळापत्रक जाहीर

   Follow us on        

Konkan Railway Updates:

कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. रेल्वे मंत्रालयाने सावंतवाडी स्थानकावर काही महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना प्रायोगिक तत्त्वावर (Experimental Stoppage) व्यावसायिक थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

​या निर्णयामुळे स्थानिक नागरिक, चाकरमानी आणि पर्यटकांची मोठी सोय होणार आहे. सावंतवाडी रोड स्थानकावर थांबा मिळालेल्या गाड्या, त्यांच्या वेळा आणि सुरू होण्याच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत:

​१. मुंबई सीएसएमटी – मंगळुरू जंक्शन – मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस (दररोज)

​गाडी क्र. १२१३३ (मुंबई सीएसएमटी ते मंगळुरू जंक्शन):

​स्थानक: सावंतवाडी

​वेळ: सकाळी ०७:०२ / ०७:०४

​सुरुवात: २६ जुलै २०२६ पासून

​गाडी क्र. १२१३४ (मंगळुरू जंक्शन ते मुंबई सीएसएमटी ):

​स्थानक: सावंतवाडी रोड

​वेळ: रात्री २३:३० / २३:३२

​सुरुवात: २७ जुलै २०२६ पासून

​२. हजरत निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम सेंट्रल – ह. निजामुद्दीन ‘राजधानी’ एक्स्प्रेस (आवड्यातून ३ दिवस)

​गाडी क्र. १२४३२ (ह. निजामुद्दीन ते तिरुवनंतपुरम सेंट्रल):

​स्थानक: सावंतवाडी

​वेळ: सकाळी ०६:१८ / ०६:२०

​सुरुवात: २६ जुलै २०२६ पासून

​गाडी क्र. १२४३१ (तिरुवनंतपुरम सेंट्रल ते ह. निजामुद्दीन):

​स्थानक: सावंतवाडी रोड

​वेळ: सकाळी ०९:४४ / ०९:४६

​सुरुवात: २८ जुलै २०२६ पासून

​३. लोकमान्य टिळक (टर्मिनस) – तिरुवनंतपुरम नॉर्थ – एलटीटी ‘गरीब रथ’ एक्स्प्रेस (आवड्यातून २ दिवस)

​गाडी क्र. १२२०१ (लोकमान्य टिळक (ट) ते तिरुवनंतपुरम नॉर्थ):

​स्थानक: सावंतवाडी

​वेळ: पहाटे ०२:०२ / ०२:०४

​सुरुवात: २७ जुलै २०२६ पासून

​गाडी क्र. १२२०२ (तिरुवनंतपुरम नॉर्थ ते लोकमान्य टिळक (ट)):

​स्थानक: सावंतवाडी

​वेळ: पहाटे ०३:२८ / ०३:३०

​सुरुवात: ३० जुलै २०२६ पासून

प्रवाशांनी या बदलांची आणि सुधारित वेळेची नोंद घ्यावी, असे आवाहन मुख्य जनसंपर्क अधिकारी (सुनील बी. नारकर) यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहिती आणि सविस्तर वेळापत्रकासाठी प्रवाशांनी भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला (www.enquiry.indianrail.gov.in) भेट द्यावी.

Konkan Railway: घोलवड-उमरगाव पूलाखाली पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली, पाश्चिम रेल्वेची वाहतुक विस्कळीत; कोकण रेल्वेच्या गाड्यांवर परिणाम

   Follow us on        

विशेष वृत्त: घोलवड ते उमरगाव रोड दरम्यान असलेल्या पुलावरील (पूल क्र. २०३) पाणी धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने पश्चिम रेल्वे प्रशासनाने सुरक्षिततेचा उपाय म्हणून काही गाड्या रद्द तर काही गाड्यांच्या मार्गात बदल (Divert) करण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

​या बदलांचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे:

​रद्द करण्यात आलेली गाडी:

​गाडी क्र. २०९१० (पोरबंदर – कोच्युवेली एक्सप्रेस): दिनांक २३/०७/२०२६ रोजी सुरू होणारी ही फेरी पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.

​मार्गात बदल करण्यात आलेल्या गाड्या (Diversion):

​१. गाडी क्र. १२२१८ (चंडीगड – तिरुवनंतपुरम सेंट्रल केरळ संपर्क क्रांती एक्सप्रेस): (दि. २२/०७/२०२६)

​नवीन मार्ग: सुरत – पाळधी – जळगाव – इगतपुरी – पनवेल – रोहा.

​२. गाडी क्र. २२९०८ (हापा – मडगाव जंक्शन एक्सप्रेस): (दि. २२/०७/२०२६)

​नवीन मार्ग: सुरत – पाळधी – जळगाव – इगतपुरी – पनवेल – रोहा.

​३. गाडी क्र. १२४८३ (तिरुवनंतपुरम सेंट्रल – अमृतसर जंक्शन एक्सप्रेस): (दि. २२/०७/२०२६)

​नवीन मार्ग: रोहा – पनवेल – इगतपुरी – जळगाव – पाळधी – सुरत.

​४. गाडी क्र. २२४७५ (हिसार – कोइम्बतूर जंक्शन एक्सप्रेस): (दि. २२/०७/२०२६)

​नवीन मार्ग: सुरत – जळगाव – इगतपुरी – पनवेल – रोहा.

​५. गाडी क्र. १६३३८ (एरनाकुलम जंक्शन – ओखा एक्सप्रेस): (दि. २२/०७/२०२६)

​नवीन मार्ग: पनवेल – इगतपुरी – जळगाव – पाळधी – उधना – सुरत.

​६. गाडी क्र. २२६५५ (एरनाकुलम जंक्शन – हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस): (दि. २२/०७/२०२६)

​नवीन मार्ग: पनवेल – इगतपुरी – जळगाव – पाळधी – उधना – सुरत.

​७. गाडी क्र. १६३३३ (वेरावळ – तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्सप्रेस): (दि. २३/०७/२०२६)

​नवीन मार्ग: सुरत – जळगाव – इगतपुरी – पनवेल – रोहा.

​प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी रेल्वेच्या या नव्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी. झालेल्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

Konkan Railway: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानकांसाठी ४६.६८ कोटी रुपयांचा निधी; रेल्वेमंत्र्यांची माहिती

   Follow us on        

नवी दिल्ली: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांवरील प्राथमिक सुविधांच्या विकासाबाबत आणि गाड्यांच्या थांब्याबाबत खासदार नारायण राणे यांनी विचारलेल्या प्रश्नाला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लेखी उत्तर दिले आहे. या उत्तरात त्यांनी स्पष्ट केले आहे की, २०२१-२२ ते २०२६-२७ (३० जून २०२६ पर्यंत) या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख स्थानकांच्या प्रवासी सुविधांसाठी सुमारे ४६.६८ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत किंवा त्यांची कामे सुरू आहेत.

​प्रमुख स्थानकांवरील विकासकामे

​रेल्वेने वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या मुख्य स्थानकांवर अनेक प्रवासी सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

​वैभववाडी रोड: येथे १० मॉड्युलर शेल्टर, हाय लेव्हल प्लॅटफॉर्म, ४ वॉटर पेडस्टल, फूट ओव्हर ब्रिज (FOB) आणि स्वच्छतागृहांचे नूतनीकरण पूर्ण झाले आहे.

​कणकवली: एसी लाउंज, प्लॅटफॉर्म १ आणि २ चा विस्तार, दिव्यांग-अनुकूल स्वच्छतागृहे, बायो-टॉयलेट आणि टीव्ही आधारित माहिती प्रणालीची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच लिफ्ट, एफओबी रूफ शेल्टर आणि डाऊनवर्ड एस्केलेटर बसवण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत.

​सिंधुदुर्ग: येथे ५ मॉड्युलर शेल्टर, दिव्यांग-अनुकूल स्वच्छतागृहे आणि टीव्ही आधारित माहिती प्रणालीची कामे पूर्ण झाली आहेत.

​कुडाळ: फूड कोर्ट, २६ मॉड्युलर शेल्टर, प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण आणि बायो-टॉयलेटची कामे पूर्ण झाली आहेत. याशिवाय लिफ्ट आणि एफओबी रूफ शेल्टरचे काम सुरू करण्यात आले आहे.

​सावंतवाडी: ८ मॉड्युलर शेल्टर, हाय लेव्हल प्लॅटफॉर्म, फूट ओव्हर ब्रिज, वन स्टेशन वन प्रॉडक्ट स्टॉल पूर्ण झाले आहेत. तसेच प्लॅटफॉर्म क्र. ३ वर दुसऱ्या प्रवेशद्वारावरील बुकिंग ऑफिस, वेटिंग हॉल आणि लिफ्टची कामे सुरू आहेत.

​याव्यतिरिक्त, खरेपाटण रोड, अचिरणे, नांदगाव रोड, झाराप आणि मडुरे यांसारख्या इतर स्थानकांवरही प्रवासी सुविधांची कामे करण्यात आली आहेत.

​तिकीट बुकिंग सुविधा आणि डिजिटल पर्याय

​सिंधुदुर्ग (ओरोस) आणि वैभववाडी रोड या स्थानकांवर सध्या युटीएस-कम-पीआरएस (UTS-cum-PRS) तिकीट बुकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

​प्रवाशांच्या सोयीसाठी ‘रेलवन ॲप’ (RailOne App) ची सुविधा देण्यात आली आहे, ज्याद्वारे प्रवासी मोबाईलवरच राखीव आणि अनारक्षित तिकिटे बुक करू शकतात.

​एक्स्प्रेस गाड्यांना नवीन थांबे

​सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी काही महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना नवीन थांबे देण्यात आले आहेत:

​सिंधुदुर्ग स्थानक: एर्नाकुलम – हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस (५ नोव्हेंबर २०२५ पासून) आणि एर्नाकुलम – अजमेर मरुसागर एक्सप्रेस (२ नोव्हेंबर २०२५ पासून) थांबत आहेत.

​कणकवली स्थानक: हिसार – कोईम्बतूर एक्सप्रेस (५ नोव्हेंबर २०२५ पासून) आणि गांधीधाम – नागरकोइल एक्सप्रेस (७ नोव्हेंबर २०२५ पासून) थांबत आहेत.

​सावंतवाडी रोड स्थानक: छत्रपती शिवाजी महाराज (T) – मंगळुरू जंक्शन एक्सप्रेस, तिरुवनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस आणि लोकमान्य टिळक (T) – तिरुवनंतपुरम नॉर्थ गरीब रथ एक्सप्रेस या गाड्यांनाही थांबा मंजूर करण्यात आला आहे.

कणकवली:१० रुपयांच्या पर्यटन करावरून पर्यटक आणि स्थानिकांमध्ये राडा

   Follow us on        

कणकवली तालुक्यातील सावडाव धबधबा येथे पर्यटन कराच्या मुद्द्यावरून दाजीपूर आणि इचलकरंजी येथून आलेल्या पर्यटक आणि स्थानिक ग्रामस्थांमध्ये मोठा वाद झाला. ही घटना दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. सावडाव ग्रामपंचायतीकडून धबधब्याकडे जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमागे दहा रुपये पर्यटन कर घेतला जातो. याच कराच्या वसुलीवरून १० ते १२ पर्यटकांनी तिथल्या कर्मचाऱ्यांशी वाद घातला आणि त्यांना बेदम मारहाण केली.

​मारहाणीचा हा प्रकार पाहून जेव्हा स्थानिक ग्रामस्थ तिथे जमा झाले, तेव्हा पर्यटकांनी त्यांच्यावरही दगडफेक केली. जसजसे अधिक ग्रामस्थ तिथे गोळा होऊ लागले, ते पाहून पर्यटकांनी आपल्या वाहनांसह मुंबई-गोवा महामार्गाच्या दिशेने पळ काढला. मात्र, या घटनेत गावकऱ्यांनी एका पर्यटकाला जागीच पकडले आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्या पर्यटकाला ताब्यात घेतले असून, मारहाण करणाऱ्या सर्व पर्यटकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कणकवली पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. पर्यटनाच्या नावाखाली येऊन स्थानिकांवर दादागिरी करणाऱ्या अशा हुल्लडबाजांवर कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी सावडाव ग्रामस्थांनी पोलिसांकडे केली आहे.

गणेशोत्सव रेल्वे तिकीट आरक्षण: ऑनलाईन बुकिंग पहिली १० मिनिटे बंद; फायदा कोणाचा?

   Follow us on        

Konkan Railway: रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये  दलालांकडून होणाऱ्या ऑनलाईन घोटाळ्यांबाबत रेल्वे विभागाकडे सातत्याने अनेक तक्रारी दाखल होत होत्या. हे दलाल बेकायदेशीरपणे ऑनलाईन तिकिटे हडप करून प्रवाशांना ती चौपट दराने विकत असल्याचा दाट संशय होता. याच पार्श्वभूमीवर, तिकीट खिडकीवर (Ticket Window) रात्रभर रांगेत उभे राहणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना प्राधान्याने तिकीट मिळावे, या उद्देशाने आज ऑनलाईन बुकिंग सुरुवातीची पहिली १० मिनिटे जाणीवपूर्वक बंद ठेवण्यात आली होती. या निर्णयामुळे रात्रभर रांग लावणाऱ्या अनेक सामान्य प्रवाशांना आज तिकिटे मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र ऑनलाईन तिकिटांची आस धरून बसलेल्या प्रवाशांच्या हाती निराशाच लागली.

​हा उपाय आहे की सामन्यांची डोकेदुखी?

दलालांना आळा घालण्यासाठी रेल्वेने योजलेला हा उपाय कितपत योग्य आहे, यावर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एजंट स्वतः रांगेत उभे न राहता, भाड्याने आपली माणसे रात्रभर तिकीट खिडकीच्या रांगेत उभी करून तिकिटे मिळवतात. रेल्वेच्या या नव्या प्रकारामुळे दलाल आता ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन रांगेत अधिक माणसे उभी करतील आणि काळाबाजार सुरूच ठेवतील, अशी रास्त भीती व्यक्त होत आहे.

​सर्वच उपनगरीय स्थानकांवर आरक्षित खिडक्या नाही आहेत. नोकरदार वर्ग, महिला आणि सर्वसामान्य लोकांसाठी तिकीट खिडकीवर रात्रभर रांग लावणे शक्य आणि सोयीचे नसते. त्यामुळे या वर्गाला ऑनलाईन तिकीट बुकिंगवरच अवलंबून राहावे लागते. ऑनलाईन तिकीट न मिळाल्यास त्यांना पुन्हा त्याच दलालांच्या दारात जावे लागेल. याचाच फायदा घेत दलाल चौपट दराने तिकिटांची विक्री करतील आणि रात्री रांग लावण्यासाठी भाड्याची माणसे आणखी वाढवतील. त्यामुळे दलालांना आळा घालण्यासाठी रेल्वेने असे उपाय अमलात आणणे हास्यास्पद आहे. अशा सामान्य प्रवाशांना त्रासदायक ठरणाऱ्या आणि वरवरच्या उपायांवर अवलंबून न राहता इतर प्रभावी, तांत्रिक आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. तसेच, सामान्य प्रवाशांचा होणारा हा आर्थिक आणि मानसिक छळ त्वरित थांबवावा, अशी आग्रही मागणी आता प्रवाशांकडून केली जात आहे.

वैभववाडी: खांबाळे मोहितेवाडीत लोखंडी पूल कोसळला; अडकलेल्या चार गुरांची सुटका

   Follow us on        

वैभववाडी:

​खांबाळे मोहितेवाडी (खालचीवाडी) येथील ओढ्यावरील लोखंडी साकव मंगळवारी सकाळी अचानक कोसळला. या दुर्दैवी घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी चार जनावरे जखमी झाली आहेत.

​मौजे मोहितेवाडी येथील संजय गोविंद पवार हे आपल्या मालकीची सहा जुरे चराईसाठी घेऊन ओढ्यावरील लोखंडी साकवावरून जात असताना ही घटना घडली. साकव अचानक कोसळल्यामुळे जनावरे तिथेच अडकली. मात्र, ग्रामस्थांनी तात्काळ प्रसंगावधान राखून अडकलेल्या जुरेची सुरक्षित सुटका केली. या अपघातात चार जनावरांना दुखापत झाली आहे.

​घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी घटनास्थळी भेट देऊन साकवाची पाहणी केली. यावेळी ग्रामपंचायत प्रशासक प्राजक्ता कदम, माजी सरपंच गणेश पवार तसेच विक्रांत पवार उपस्थित होते.

​या घटनेत जखमी झालेल्या चार जनावरांवर आचिर्णे येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे पर्यवेक्षक डॉ. हेूळकर यांनी जनावरांच्या मालकाच्या घरी जाऊन उपचार केले. दरम्यान, तलाठी केदारी बागल यांनी घटनास्थळी पंचनामा करून संबंधितांचे जबाब नोंदवले व अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला. याप्रसंगी पोलीस पाटील अस्मिता चव्हाण आणि कोतवाल संतोष काळे उपस्थित होते.

 

Konkan Railway: तांत्रिक कामांसाठी दिवा-रोहा दरम्यान गाड्यांना ‘ब्रेक’

   Follow us on        

मुंबई:

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील दिवा – रोहा दरम्यान तांत्रिक/किरकोळ कामांमुळे किंवा वाहतूक नियोजनामुळे काही गाड्यांच्या वेळेत बदल (Reschedule) आणि काहींचे नियमन (Regulation) करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

​या फेरबदलांमुळे खालील गाड्यांच्या प्रवासावर परिणाम होणार आहे:

​१. थांबवून चालवल्या जाणाऱ्या गाड्या (Regulation of Trains):

​गाडी क्रमांक २०११२ (मडगाव जंक्शन ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कोकणकन्या एक्सप्रेस):

​दिनांक: २१ जुलै २०२६ रोजी सुरू होणारी फेरी

​परिणाम: ही गाडी तळोजे पंचनंद स्थानकात ८० मिनिटे थांबवून (रेग्युलेट करून) चालवली जाईल.

​गाडी क्रमांक ११००४ (सावंतवाडी रोड ते दादर – तुतारी एक्सप्रेस):

​दिनांक: २१ जुलै २०२६ रोजी सुरू होणारी फेरी

​परिणाम: ही गाडी कळंबोली गुड्स शेड येथे ३५ मिनिटे थांबवून चालवली जाईल.

​गाडी क्रमांक १२६२० (मंगळुरू सेंट्रल ते लोकमान्य टिळक टर्मिनस – मत्स्यगंधा एक्सप्रेस):

​दिनांक: २१ जुलै २०२६ रोजी सुरू होणारी फेरी

​परिणाम: ही गाडी पनवेल स्थानकात १० मिनिटे थांबवून चालवली जाईल.

​२. वेळेत बदल करण्यात आलेली गाडी (Rescheduling of Train):

​गाडी क्रमांक १०१०३ (मुंबई CSMT ते मडगाव जंक्शन – मांडवी एक्सप्रेस):

​दिनांक: २२ जुलै २०२६ रोजी सुरू होणारी फेरी

​परिणाम: ही गाडी मुंबई CSMT वरून निघण्याच्या मूळ वेळेपेक्षा ९० मिनिटे (१ तास ३० मिनिटे) उशिराने म्हणजेच सकाळी ०८:४० वाजता सुटेल.

​रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून सर्व प्रवाशांनी या बदलांची नोंद घेऊन त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मुख्य जनसंपर्क अधिकारी (CPRO) सुनील बी. नारकर यांनी केले आहे.

दापोलीत डोंगराला २ किमीच्या भेगा; भूस्खलनाच्या भीतीने मळे-सुतारवाडीतील ग्रामस्थांचे स्थलांतर

   Follow us on        

दापोली तालुक्यातील मळे-सुतारवाडी परिसरात मुसळधार पावसामुळे निसर्गाचा मोठा प्रकोप पाहायला मिळत आहे. येथील स्थानिक डोंगराला अचानक मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याची घटना समोर आली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने भूस्खलनाचा गंभीर धोका निर्माण झाला असून, यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड घबराटीचे वातावरण पसरले आहे.

​प्रशासनाने केलेल्या प्राथमिक पाहणीत या भेगांची तीव्रता अत्यंत चिंताजनक असल्याचे स्पष्ट झाले आहे. डोंगराला तब्बल दोन किलोमीटर अंतरापर्यंत आणि सुमारे दोन ते चार फूट खोल भेगा पडल्याचे निदर्शनास आले आहे. पावसाच्या पाण्यामुळे डोंगर खचण्याची शक्यता अधिक वाढल्याने स्थानिक सुतारवाडी गावाला थेट धोका निर्माण झाला आहे.

​डोंगराला भेगा पडल्याची माहिती मिळताच दाभोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आणि नायब तहसीलदार यांनी आपल्या टीमसह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसराची सखोल पाहणी करून पंचनामा केला असून, या संपूर्ण घटनेचा सविस्तर अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आला आहे.

​संभाव्य आपत्ती लक्षात घेता महसूल प्रशासनाने सुतारवाडीतील ग्रामस्थांचे तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या कुटुंबांमध्ये भीतीचे सावट असून, भूस्खलनाच्या धास्तीने नागरिक रात्र जागून काढत आहेत. प्रशासनाने ग्रामस्थांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आणि सरकारी सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

​घटनेचे गांभीर्य ओळखून डोंगराच्या स्थैर्याची तपासणी करण्यासाठी भूवैज्ञानिक तज्ज्ञांच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे. हे पथक डोंगराच्या भेगांची खोली आणि त्याच्या संरचनेची सखोल तपासणी करेल. तज्ज्ञांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या भागातील सुरक्षेच्या दृष्टीने पुढील कायमस्वरूपी उपाययोजना आणि धोरण निश्चित केले जाणार आहे

गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षण टप्प्यांमध्ये सुरू करा

   Follow us on        

खेड:

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुकर व्हावा, यासाठी कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गणपती स्पेशल रेल्वे गाड्यांचे आरक्षण दोन टप्प्यांत सुरू करण्यात यावे, अशी आग्रही मागणी कोकण विकास समितीने रेल्वे बोर्डाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

​सध्याची समस्या काय आहे?

​सध्या गणपती स्पेशल गाड्यांच्या अप (Up) आणि डाऊन (Down) अशा दोन्ही दिशांच्या प्रवासाचे आरक्षण एकाच वेळी सुरू केले जाते. यामुळे आरक्षण खिडकी किंवा ऑनलाइन बुकिंग सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच सर्व जागा फुल होतात. परिणामी, तासनतास प्रतीक्षा करूनही अनेक कोकणवासीयांना तिकीट मिळत नाही आणि त्यांना निराश व्हावे लागते, अशा तक्रारी वारंवार समोर येत आहेत. नियमित गाड्यांचे आरक्षणही दोन ते तीन मिनिटांतच पूर्ण भरत असल्याचे समितीने निवेदनात म्हटले आहे.

​दोन टप्प्यांत आरक्षण करण्याचे फायदे:

​कोकण विकास समितीच्या दाव्यानुसार, आरक्षण पद्धतीत बदल केल्यास खालील फायदे होतील:

​नियोजनासाठी सुलभता: अप आणि डाऊन प्रवासाचे आरक्षण वेगवेगळ्या तारखांना किंवा दोन स्वतंत्र टप्प्यांत सुरू केल्यास प्रवाशांना त्यांच्या संपूर्ण प्रवासाचे नियोजन करणे अधिक सोपे जाईल.

​तत्काळ कोट्यावरील ताण कमी होणार: या निर्णयामुळे रेल्वेच्या तत्काळ कोट्यावर येणारा अतिरिक्त ताण लक्षणीयरीत्या कमी होईल.

​गैरप्रकारांना आळा: आरक्षण प्रक्रियेत होणाऱ्या काळ्याबाजाराला आणि इतर गैरप्रकारांना आळा घालण्यास मदत होईल.

​रेल्वे बोर्डाकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा

​गणेशोत्सवाच्या काळात कोकणातील लाखो गणेशभक्त आणि चाकरमान्यांची होणारी गैरसोय टाळणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे रेल्वे बोर्डाने या मागणीचा सकारात्मक विचार करून यंदाच्या गणपती स्पेशल गाड्यांच्या आरक्षणासाठी अधिक सुलभ व्यवस्था करावी आणि योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा कोकण विकास समितीने व्यक्त केली आहे.

सावंतवाडी-रत्नागिरी बस आणि कारचा हुमरसजवळ भीषण अपघात

   Follow us on        

कुडाळ: सावंतवाडी आगाराच्या एका एसटी बसला शनिवार, १८ जुलै २०२६ रोजी दुपारी कुडाळ येथील हुमरस परिसरात भीषण अपघाताचा सामना करावा लागला. सावंतवाडीहून रत्नागिरीच्या दिशेने मार्गस्थ झालेली बस (MH 13 CU 8729) हुमरस बस थांब्याजवळ आली असता, समोर उभ्या असलेल्या एका रेनॉल्ट क्विड कारला (MH 07 AG 6538) बसने मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारचा मागील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला असून कारचे मोठे नुकसान झाले आहे.

या दुर्घटनेत कार चालक पांडुरंग श्रीधर नाईक (वय ५४ वर्षे, रा. लक्ष्मीनगर, सावंतवाडी, मूळ रा. नेरूर) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

​घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलीस स्टेशनच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन अपघाताचा पंचनामा केला. तसेच कुडाळ आगार व्यवस्थापक रोहित कारभारी नाईक हे या प्रकरणातील पुढील कायदेशीर कारवाई आणि परिस्थिती हाताळत आहेत. पोलीस सध्या या अपघाताच्या नेमक्या कारणांचा अधिक तपास करत आहेत.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search