Category Archives: कोकण

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावरील ११ गाड्या पूर्ण क्षमतेने चालविण्याची गरज

   Follow us on        

Konkan Railway: २५ वर्षांपूर्वी कोकणात रेल्वे आली आणि कोकणवासीयांसाठी एक जलद, परवडणारा आणि सुरक्षित पर्याय उपलब्ध झाला. सुरुवातीला प्रवासी संख्या कमी होती, त्यामुळे ज्या गाड्या या मार्गावर धावत होत्या त्या प्रवाशांच्या त्यावेळच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम होत्या. मात्र हळूहळू परिस्थिती बदलत गेली, गर्दी वाढत गेली आणि अधिक गाड्यांची मागणी होण्यास सुरवात झाली रेल्वे प्रशासनानेही गरज लक्षात घेऊन गाड्यांची संख्या वाढवली. मात्र कोकण रेल्वे मार्गाचे एकेरीकरण आणि इतर मर्यादांमुळे त्यात अपेक्षित वाढ झाली नाही आहे. कोकण रेल्वे प्रशासनाच्या मते सध्या कोकण रेल्वे आपल्या पूर्ण क्षमतेने चालत असून आत गाड्यांमध्ये वाढ करणे शक्य नाही आहे. संपूर्ण कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण आणि विलीनीकरण या दोन्ही गोष्टी पूर्ण झाल्यानंतरच हे शक्य आहे.

कोकण रेल्वे प्रवाशी संघटनांनी याबाबत आवाज उठवल्यामुळे प्रशासनाने सुद्धा यात लक्ष घातले असून त्या दृष्टीने प्रयत्नही चालू झाले आहेत. रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करणे या गोष्टीला काही वर्षे जातील. मात्र तोपर्यंत रेल्वेकडे जी संसाधनाने आहेत त्याचा पूर्णपणे उपयोग करून रेल्वे प्रवाशांचा प्रवास सोयीचा कसा होईल याकडे लक्ष देणे गरजचे आहे. दुर्दैवाने तसे होत नसल्याचे दिसत आहे.

कोकण रेल्वे मार्गावर नियमित धावणाऱ्या काही गाड्या कमी क्षमतेने धावत आहेत. या गाडयांना डबे जोडून त्याची क्षमता वाढवणे शक्य आहे. मात्र रेल्वे प्रशासन रेकची आणि डब्यांची उपलब्धता नसणे, पिट लाईनची कमी लांबी अशी थातुर मातुर कारणे देऊन हे टाळत आहे. खरेतर काही बदल करून या गाड्या पूर्ण क्षमतेने चालविणे शक्य आहे.

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांमध्ये सध्या मोठी गर्दी होत आहे. गर्दीमुळे आत शिरता न आल्याने दरवाजावरून तोल जाऊन प्रवासी खाली पडण्याच्या घटना देखील वाढू लागल्या आहेत. कधी कधी भीती वाटत आहे कि गर्दीमुळे मुंब्रा स्थानकावर घडलेल्या घटनेसारखा अपघात घडेल. अशा घटना घडल्यावर जागे न होता हे अपघात घडू न देणे यासाठी प्रयत्न करणे रेल्वे प्रशासनाकडून अपेक्षित आहे.

नवीन गाड्या येतील तेव्हा येतील. परंतु आताच कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या जनशताब्दी, तुतारी, मंगळुरू सुपरफास्ट, रत्नागिरी दिवा, सावंतवाडी दिवा, मडगाव वांद्रे, पुणे एर्नाकुलम, तेजस २२ डब्यांनी आणि वंदे भारत २० डब्यांची चालवल्यास दिवसाला एका दिशेला किमान ४० डबे वाढवता येतील. एका डब्यात सरासरी ८० प्रवासी धरल्यास दिवसाला किमान ३००० प्रवासी जास्त नेता येऊ शकतील. ही संख्या दोन नवीन गाड्यांएवढी आहे. रेल्वे उपलब्ध साधनसंपत्तीचा अपव्यय करत आहे.

अक्षय महापदी
सचिव, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती

Pic credit – @akshaymahapadi

 

Sawantwadi Terminus: भूमीपूजन दगडाचा प्रतिकात्मक केक कापून अपूर्ण कामाचा वाढदिवस साजरा..

   Follow us on        

Sawantwadi: सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या भूमिपूजनाला आज २७ जून रोजी १० वर्षे पूर्ण होऊन देखील ते अदृश्य असल्याने कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने रेल्वे स्थानकावर वाढदिवस साजरा केला. सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेकडून हाताला काळ्या फिती बांधून साखर वाटत, भुमिपुजन दगडाचा केक कापून गांधीगिरीने याचा निषेध नोंदविण्यात आला.

सावंतवाडी टर्मिनसचे भूमिपूजन २७ जून २०१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, तत्कालीन पालकमंत्री आमदार दीपक केसरकर, तत्कालीन खासदार विनायक राऊत आणि इतर लोकप्रतिनिधी व रेल्वे अधिकारी यांच्या उपस्थितीत झाले होते. यानंतर पहिल्या टप्प्याचे काम झाले. मात्र, दुसऱ्या टप्प्याचे काम अजूनही झालेले नाही. परिणामी, हे महत्त्वाकांक्षी टर्मिनस आजही धूळ खात पडले आहे. रेल्वे प्रवासी संघटनेने या टर्मिनसच्या पूर्णत्वासाठी वेळोवेळी आंदोलने केली. मात्र, प्रवाशांची गैरसोय होत असूनही लोकप्रतिनिधी यावर गप्प बसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर १० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साखर वाटून, केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. रेल्वे प्रशासन, प्रवाशी यांना साखर वाटून गांधीगिरी मार्गान प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

यावेळी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड. संदीप निंबाळकर म्हणाले, १० वर्ष प्रकल्प रखडलेला आहे. तिन्ही सार्वत्रिक निवडणूक एकाच पक्षाची सत्ता राज्यात आलेली आहेत. त्याच सरकारने भूमिपूजन केल्यानंतर प्रकल्प पूर्ण होत नसेल तरी ती क्षरमेची बाब आहे. सरकारला जाग आणण्यासाठी व अर्धवट कामाची जाणीव करून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे‌. केवळ रेल्वे मंत्री बदलले म्हणून प्रकल्प अर्धवट ठेवणं योग्य नाही. प्रकल्प पूर्ण करायचा नसेल तर जनतेची फसवणूक केल्याच जाहीर करा असं आवाहन त्यांनी केलं‌. तर ज्या दगडावर नारळ फोडून भुमिपूजन केलं तो दगड केक स्वरूपात आम्ही कापून अर्धवट कामाचा निषेध केला. जन आंदोलन करून देखील सरकार दखल घेत नसल्याने दगडी सरकारला हा दगड होता. त्यामुळे निदान आता तरी सरकारनं कोकणवासीयांना न्याय द्यावा. प्रवाशांची होणारी गैरसोय रोखावी असं मत सचिव मिहिर मठकर यांनी व्यक्त केले. तसेच गणेशोत्सवापूर्वी रेल्वे टर्मिनस पूर्णत्वास आणून चाकरमान्यांचे होणारे हाल, अपेष्टा रोखाव्यात असे मत उपाध्यक्ष सागर तळवडेकर यांनी व्यक्त केले. उपस्थित पोलिस, रेल्वे कर्मचारी, प्रवासी, रिक्षा चालक यांना साखर वाटून अनोख्या पद्धतीने हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड.संदीप निंबाळकर, सचिव मिहिर मठकर, सल्लागार सुभाष शिरसाट, सल्लागार अँड सायली दुभाषी ,भूषण बांदिवडेकर,पांडुरंग राऊळ, सागर तळवडेकर,तेजस पोयेकर,पुंडलिक दळवी, अभिमन्यू लोंढे, हरिश्चंद्र पवार, विनायक गांवस , नितिन गावडे, सिद्धार्थ निंबाळकर, मंगेश सावंत, चंद्रकांत राघो कोरगावकर, रवी सातवळेकर, पांडुरंग परब, नारायण मसुरकर, प्रमोद खानोलकर,विनायक राऊळ, लवू नाईक, एकनाथ नाटेकर, राजेंद्र वरडे , प्रकाश महादेव भाईंडकर , दिलीप कुलकर्णी, काका पांढरे, रिक्षा व्यावसायिक तसेचं रेल्वे प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Sangameshvar: अंत्रवली ग्रामपंचायत कार्यालयाला आश्वासनाचा विसर, पत्रकार संदेश जिमन यांच्या स्मरणपत्राने कार्यकारी मंडळाला येईल काय जाग?

   Follow us on        

गतवर्षी १२ जून २०२३ रोजी पत्रकार संदेश जिमन आणि वाडी ग्रामस्थ यांनी प्रशासनाला धारेवर धरत मागणी नसताना बांधण्यात आलेल्या मालपवाडी येथील साकवाचा मुद्दा उपस्थित केला. त्या साकवाला दोन्ही बाजूला चढणे उतरणे यासाठी योग्य ती सुविधा नसल्याने उपोषण करणार असे पत्र संदेश जिमन यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला दिले होते.

या पत्राची दखल घेत सरपंच महोदयांनी लेखी पत्र संदेश जिमन यांना दिले. त्या पत्रात स्पष्ट उल्लेख केला असा की “३१ जानेवारी २०२४ पर्यंत साकवाच्या दोन्ही बाजूचे काम पूर्ण केले जाईल.” हे एक वेळकाढू आश्वासन ठरले. अद्याप ते काम पूर्ण न झाल्याने पत्रकार संदेश जिमन यांनी या समस्येकडे आपला मोर्चा पुन्हा वळवला आहे.

दिनांक २० जून २०२४ रोजी ग्रामपंचायत अंत्रवली येथे ग्रामसेवक महोदयांना स्मरणपत्र देऊन संदेश जिमन यांनी चांगली झाडाझडती घेतली. या पत्रात संदेश जिमन यांनी ग्रामपंचायत अंत्रवली च्या कार्यकारी मंडळाला दिलेल्या आश्वासनाकडे डोळे झाक का केली? उपोषणाला विरोध करण्यासाठीच केवळ हा आश्वासनाचा बनाव होता काय?
असे प्रश्न विचारले आहेत.

ग्रामपंचायत कार्यकारी मंडळाने जर कर्तव्यदक्षतेने हा विषय मार्गी लावला असता तर स्थानिक ग्रामस्थांना आणि संदेश जिमन यांना हा खटाटोप करावा लागला नसता. केवळ मोठ्या पदांची लालसा बाळगणे पण प्रत्यक्षात त्या पदांचे महत्त्व ध्यानात न घेता कामात कुचराई करणे हे कितपत योग्य! कोणत्या दबावामुळे हे काम आजवर पुर्ण झाले नाही,याचे उत्तर गुलदस्त्यात आहे.

या गंभीर विषयावर चर्चा करण्यासाठी विशेष ग्रामसभा बोलवावी. प्रश्न निकाली काढावा. जर काहीच शक्य नसेल तर संदेश जिमन यांनी कायदेशीर मार्गाने जाण्यास ग्रामपंचायत कार्यालयाची काही हरकत नसल्याचे लेखी पत्र ग्रामपंचायतीने द्यावे असे पत्रात म्हटले आहे.

या विषयाचे गांभीर्य ध्यानात घेऊन संबंधित विभागाने चौकशी आदेश देऊन सत्यता पडताळणे गरजेचे आहे. दोषींवर कारवाई होणे गरजेचे आहे. लाखोंचा निधी कोणाच्या भल्यासाठी? ठेकेदार आणि त्यांच्या बगलबच्च्यांसाठी की जनसामान्यांच्या हितासाठी?  ही अनागोंदी कोणाच्या आशिर्वादाने चालते? याला जबाबदार कोण? कारवाई झाली पाहिजे! ही ग्रामस्थांची मागणी आहे.

Konkan Railway: गणेश चतुर्थी रेल्वे आरक्षणासाठी कोकण रेल्वेचे ‘रिग्रेट’ गाणे

   Follow us on        

 

Konkan Railway: यंदाच्या गणेश चतुर्थीसाठी नियमित गाड्यांसाठी रेल्वे आरक्षण सुरु झाले असून या गाड्यांचे आरक्षण अवघ्या काही सेकंदात फुल्ल होत आहे. बहुतेक सर्वच गाड्या आता रिग्रेट हे स्टेटस दाखवत असल्याने ज्या गणेश भक्तांना आरक्षण भेटले नाही ते नाराज झाले आहेत.

यंदा २७ ऑगस्टपासून गणेशोत्सवाची धामधूम सुरू होणार आहे. गणेशोत्सवात कोकण मार्गावर धावणाऱ्या नियमित गाड्यांचे आरक्षण खुले होताच मिनिटभरातच सर्वच नियमित गाड्या हाऊसफुल्ल झाल्या. सर्वच नियमित गाड्यांची आसन क्षमता संपल्याने ‘रिग्रेट’चा शेरा मिळत आहे. यामुळे आरक्षित तिकिटांसाठी तासन्तास रांगेत उभ्या राहिलेल्या गणेशभक्त तिकीटे न भेटल्याने नाराज झाले आहेत.

 

गणेशोत्सवासाठी लाखोंच्या संख्येने चाकरमानी गावी दाखल होतात. रेल्वे प्रशासनाने यंदा ६० दिवस अगोदरच म्हणजेच २३ जूनपासून आरक्षणाची दालने खुली केली. त्यानुसार चाकरमान्यांची गणेशोत्सवात गावी जाण्यासाठी आरक्षित तिकिटे पदरात पाडण्यासाठी सकाळपासूनच तिकिट खिडक्यांवर झुंबड उडाली. मात्र अवघ्या दीड मिनिटातच नियमित रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले. यामुळे असंख्य चाकरमानी प्रतीक्षा यादीवर राहिले. यानंतर ‘रिग्रेट’चाच शेरा मिळत असल्याने चाकरमानी कोंडीत अडकले आहेत. कोकण मार्गावरून धावणाऱ्या तुतारी एक्प्रेस, सुपरफास्ट कोकणकन्या, मांडवी, मत्स्यगंधा, एलटीटी-मडगाव, मुंबई-मंगळूर या एक्स्प्रेस गाड्यांची गणेशोत्सवातील आसन क्षमता संपली आहे. यामुळे या सर्व गाड्यांचे शेकडो गणेशभक्त प्रतीक्षा यादीवर आहेत. रेल्वे प्रशासनाने अजूनही गणपती स्पेशल गाड्यांची घोषणा केलेली नाही. यामुळे गणेशभक्तांची सारी मदार आता गणपती स्पेशल गाड्यांवर अवलंबून आहे. कोकण विकास समितीसह अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, जल फाऊंडेशनसह अन्य प्रवासी संघटनांनी गणेशोत्सवात कोकण मार्गावर विशेष गाड्या चालवण्यासाठी आग्रह धरला आहे. मुंबई-चिपळूणसह मुंबई-सावंतवाडी स्वतंत्र विशेष गाडी चालवण्याची मागणीही केली जात आहे. तशी निवेदनेही केंद्रीय रेल्वेमंत्र्यांसह रेल्वे बोर्डाला देण्यात आली आहेत. केवळ निवेदने देवून न थांबता सातत्याने पाठपुरावाही सुरू आहे. रेल्वे बोर्ड सकारात्मक निर्णय घेवून गणेशभक्तांना दिलासा देईल, अशी गणेशभक्त बाळगून आहेत. कोकण रेल्वे प्रशासनाने यंदाही दिवा-चिपळूण व दिवा-रत्नागिरी मेमू स्पेशल चालवण्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी गणेशभक्तांकडून करण्यात येत आहे.

Sawantwadi: सावंतवाडीकरांची ‘गांधीगिरी’, साजरा केला जाणार ‘अपूर्ण टर्मिनसचा वाढदिवस’

   Follow us on        

Sawantwadi:सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या भूमिपूजनाला उद्या 27 जून रोजी 10 वर्षे पूर्ण होत आहेत. भूमिपूजन झाले तरी अद्याप टर्मिनस पूर्णत्वास आले नसल्याने याची जाग प्रशासनाला आणून देण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून 27 जून 2025 रोजी सावंतवाडी रेल्वे स्थानकावर सकाळी 11 वाजता टर्मिनसचा वाढदिवस साजरा करीत साखर वाटून गांधीगिरी आंदोलन छेडण्यात येणार आहे. अशी माहिती सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष ॲड .संदीप निंबाळकर यांनी येथे दिली आहे.


सावंतवाडी टर्मिनसचे भूमिपूजन २७ जून २०१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, तत्कालीन पालकमंत्री आमदार दीपक केसरकर, तत्कालीन खासदार विनायक राऊत आणि इतर लोकप्रतिनिधी व रेल्वे अधिकारी यांच्या उपस्थितीत होते. यानंतर पहिल्या टप्प्याचे काम झाले, मात्र दुसऱ्या टप्प्याचे काम अजूनही झालेले नाही. परिणामी, हे महत्त्वाकांक्षी टर्मिनस आजही धूळ खात पडले आहे.रेल्वे प्रवासी संघटनेने या टर्मिनसच्या पूर्णत्वासाठी वेळोवेळी आंदोलने केली आहेत. मात्र, प्रवाशांची गैरसोय होत असूनही लोकप्रतिनिधी यावर गप्प बसल्याची खंत बैठकीत व्यक्त करण्यात आली. लवकरच सावंतवाडी शहर आणि परिसरातील व्यापारी व व्यावसायिकांची पुन्हा बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यावर चर्चा झाली. भूमिपूजनाला १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, २७ जून रोजी सकाळी ११ वाजता सावंतवाडी रेल्वे स्थानकावर एकत्र येऊन ‘टर्मिनस भूमिपूजन कोनशिलेचा वाढदिवस’ साजरा करण्यात येणार आहे.

 

Shaktipeeth Expressway: शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाबाबत मंत्रीमंडळाचा मोठा निर्णय

   Follow us on        

Shaktipeeth Expressway: पवनार (जि.वर्धा) ते पत्रादेवी ( जि. सिंधुदुर्ग) या दरम्यान बांधण्यात येणार्‍या राज्यातील साडेतीन शक्तिपीठ, दोन ज्योतिर्लिंग आणि पंढरपूर अंबेजोगाईसहित 18 तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाच्या आखणीस तसेच भूसंपादनासाठी 20 हजार कोटी रुपयांच्या तरतुदीस आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

कोणताही प्रकल्प भूसंपादनाअभावी रखडू नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच विविध खात्यांचे मंत्री उपस्थित होते.

या महामार्गामुळे बारा जिल्ह्यातील 27 हजार 500  एकरांची जमीन हस्तांतरित होणार आहे. महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग राज्यातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांना  जोडणार आहे.  पुढे तो कोकण द्रूतगती महामार्गास गोवा-महाराष्ट्र सीमेवर जोडला जाणार आहे. या महामार्गामुळे राज्यातील प्रमुख शक्तीपीठे माहुर, तुळजापूर आणि कोल्हापूर तसेच अंबेजोगाई ही तीर्थक्षेत्रे जोडली जाणार आहेत.  तसेच संतांची कर्मभूमी असलेले मराठीचे आद्यकवी अंबेजोगाईस्थित मुकूंदराज स्वामी, जोगाई देवी तसेच 12 ज्योर्तिलिंगापैकी 2 औंढानागनाथ आणि परळी वैजनाथ, महाराष्ट्राचे आराध्य पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, यासह कारंजा-लाड, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर ही दत्त गुरूंची धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत.  या महामार्गामुळे नागपूर ते गोवा हे 18 तासांच्या प्रवासाचे अंतर 8 तासांवर येणार आहे.

Revas Reddy Costal Highway: उड्डाणपूल नको तर समुद्राला समांतर असा रस्ता हवा- काळबादेवी ग्रामस्थांची मागणी

   Follow us on    

 

 

Revas Reddy Costal Highway: रेवस रेड्डी सागरी महामार्ग नियोजनामध्ये रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी येथे साडेचार कि.मी. चे उड्डाणपूल प्रस्तावित आहे. या उड्डाणपुलाऐवजी समुद्रकिनाऱ्यालगत जमिनीवरचा रस्ता व्हावा, यामुळे गावच्या पर्यटन उद्योगाला मोठी मदत मिळेल असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या मागणीसाठी यापूर्वी ग्रामसभेत ठराव झाला असून आता गमिस्थांचे स्वाक्षरी अभियान हाती घेण्यात आले आहे.

आतापर्यंत चारशेहून अधिक ग्रामस्थांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत, अशी माहिती सरपंच तृप्ती पाटील यांनी दिली. राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी रेवस-रेड्डी सागरी महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये मिऱ्या-काळबादेवी खाडीवील पूल प्रस्तावित आहे. या पुलाला जोडून उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला आहे. या उड्डाणपूल बसणी साखरतर रस्त्याला जोडण्यासाठी प्रस्तावित आहे. या उड्डाणपुलाऐवजी मिऱ्या-काळबादेवी पुलाला लागून समुद्रालगत आरे गावापर्यंत रस्ता प्रस्तावित करावा अशी मागणी काळबादेवी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभने २० ऑगस्ट २०२४ रोजी केली

Malvan: राजकोट किल्ल्यावर पर्यटकांना बंदी; कारण काय?

   Follow us on        

Malvan: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवणमधील समुद्र तटबंदीवरील राजकोट किल्ला आजपासून पुढील काही दिवस शिवप्रेमी आणि पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. किल्ल्यावरील पदपथाची आवश्यक दुरुस्ती आणि इतर अनुषंगिक कामे पूर्ण होईपर्यंत राजकोट किल्ला शिवप्रेमी आणि पर्यटकांसाठी काही दिवस बंद राहणार असल्याची माहिती येथील प्रशासनाकडून देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चबुतराच्या सभोवताली पदपथाच्या आवश्यक दुरुस्ती पूर्ण होईपर्यंतआजपासून राजकोट किल्ला बंद राहणार आहे.

मालवणमधील राजकोट किल्ला आजपासून पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. यावर माजी आमदार वैभव नाईक यांनी नाराजी व्यक्त करत टीका केली. ‘मागच्या वेळेला जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला तसा पुन्हा पुतळ्याच्या आजूबाजूचा भाग कोसळेल या भीतीमुळेच किल्ला बंद ठेवण्यात आला आहे का?’, असा सवाल माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.

तसंच, ‘शंभर कोटी रूपये खर्च करून शंभर वर्षे टीकेल असे पुतळ्याचे काम केल्याचे सरकार सांगत असताना अशा प्रकारे बंदी आणली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अजूनही लक्ष घालून जे अधिकारी दोषी आहेत. त्यांच्यावर कारवाई केली पाहीजे.’ अशी मागणी देखील माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.

राजकोट किल्ला बंद करण्यात आल्यामुळे कोकणामध्ये फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे. किल्ल्याच्या बाहेर येऊन पर्यटकांना परत जावे लागत आहे. दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर हा किल्ला पुन्हा पर्यटकांसाठी खुला केला जाईल असे सांगितले जात आहे.

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार! मंत्रालयातील बैठकीत घेतले गेले महत्वाचे निर्णय

   Follow us on    

 

 

Mumbai Goa Highway : कोकणात जाण्यासाठी मुंबई व गोवा हायवे हा अत्यंत महत्वाचा मार्ग आहे. याच मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या 17 वर्षांपासून रखडलेले आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना नेहमी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मुंबई गोवा महामार्गाला जे चार पर्यायी मार्ग आहेत. याबाबत उपमुख्यंत्री अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
उपमुख्यंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठक पार पडली. या बैठकीत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आढावा घेण्यात आला.  मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पर्यायी मार्गांचे रुंदीकरण, दुरुस्ती करुन तातडीची उपाययोजना करण्यात येणार आहे.  इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत.  मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणे आवश्यक आहे. त्यासाठी चारही रस्त्यांच्या कामांसाठी आवश्यक 15 कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
अजित पवार यांनी बैठकीत याबाबत महत्वाच्या सूचना केल्या.  मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणे आवश्यक आहे. त्यासाठी  मोरबा रोड ते मुंबई-गोवा हायवे रस्ता, साईनगर कालवा ब्रिज ते उत्तेखोल कालवा गावापर्यंतचा रस्ता आणि निजामपूर रोड कालवा ते भादाव रस्ता हे माणगाव नगरपंचायत हद्दीतील तीन रस्ते आणि मुंबई – गोवा महामार्गावरील इंदापूर कॅनल रस्ता ते विगवली फाटा रस्ता, अशा चारही रस्त्यांच्या कामांसाठी आवश्यक 15 कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून देण्यात येईल. ही कामे  पूर्णत्वास नेण्याची कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

Devgad: रिक्षेची एसटीला धडक बसून भीषण अपघात; ४ प्रवाशांचा मृत्यू

   Follow us on    

 

 

देवगड: देवगड तालुक्यातील नारिंग्रे कोटकामते मार्गावर नारिंग्रे स्मशानभूमीनजीक अचानक समोरून आलेल्या एसटीला बाजू देताना रिक्षेची एसटीला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात रिक्षा चालकासह रिक्षेतील चार प्रवाशांचा मृत्यू झाला. तर एक प्रवासी गंभीर जखमी झाला. मृतांमध्ये रिक्षाचालक संकेत सदानंद घाडी (२९, आचरा देऊळवाडी), संतोष रामजी गावकर (३३, आचरा गाऊडवाडी), सुनिल उर्फ सोनू सूर्यकांत कोळंबकर (४८, आचरा पिरावाडी), रोहन मोहन नाईक (२९, आचरा गाऊडवाडी) यांचा समावेश आहे. तर रघुनाथ रामदास बिनसाळे (५०, आचरा भंडारवाडी) हे गंभीर जखमी झाले. हे सर्वजण आचरा येथील रिक्षा व्यावसायिक असून ते वर्षा पर्यटनासाठी देवगड तालुक्यात आले होते.

हा अपघात शुक्रवारी दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास घडला. घटनेची माहिती मिळताच मिठबाव सरपंच तथा रामेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाई नरे, शैलेश लोके, काका नरे यांच्यासह मिठबाव, नारिंग्रे ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबविले. देवगड पोलीस निरीक्षक भरत धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे, पोलीस हवालदार आशिष कदम, प्रवीण सावंत, नीलेश पाटील, स्वप्नील ठोंबरे, योगेश महाले, नितीन डोईफोडे, गणपती गावडे आदींनी घटनास्थळी जात पंचनामा केला. अपघातातील मृतदेह विच्छेदनासाठी मिठबाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. या अपघाताची माहिती आचरा गावात पसरताच मोठ्या संख्येने आचरावासीय मिठबाव प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जमा झाले. मृत व्यक्तींचे नातेवाईकही मिठबाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाले. त्यांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे हृदय पिळवटून टाकणारा होता. यावेळी आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, शिंदे शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राणे यांच्यासह आचरा येथील रिक्षा व्यावसायिक, स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search