मुंबई: मुंबईतील ब्रिटिश कालीन रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यासंबधी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाल्याची माहिती शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.
कोणत्या स्टेशनची नावे बदलणार?
करीरोडचं नाव – लालबाग
सॅण्सरोडचं – डोंगरी,
मरीनलाईन्सचं – मुंबादेवी
डॉकयार्डचं – माझगाव स्टेशन
चर्नीरोडचं नाव – गिरगाव,
कॉर्टन ग्रीन – काळाचौकी आणि
किंग्ज सर्कलचं – तिर्थकर पार्श्वनाथ
अशी नावे करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. ही नावे बदलण्याचा अधिकार राज्याला आहे असेही शेवाळे यांनी यावेळी नमूद केलं. तर मुंबई सेंट्रलचे नाव नाना जगनाथ शंकर शेठ हे ठेवण्यात यावं असा प्रस्ताव देखील केंद्राला देण्यात आला आहे असेही त्यांनी सांगितलं.
ही नावं लवकरात लवकर बदलण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सोबत बैठक घेणार आहेत. तसेच ज्या ज्या मागण्या आल्या आहेत त्यानुसार त्या नावांमध्ये बदल करण्यात येईल असेही शेवाळे यांनी यावेळी सांगितले.
नवी मुंबई : रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हय़ात दिवसा उन्हाचा ताप जाणवत आहे. त्यामुळे आंबा काढणीयोग्य झालेला आहे. दोन्ही जिल्ह्यांतून दिवसाला १४ हजार पेट्या वाशी बाजार समितीमध्ये पाठविल्या जात आहेत. आवक स्थिर असल्यामुळे पेटीचे दर २ हजारांपासून ५ हजार रुपयांपर्यंत आहेत.
पहिल्या पंधरवड्यात पेट्यांची संख्या कमी होती; मात्र त्यानंतर त्यात वाढ होऊ लागली. मार्चच्या सुरवातीला उन्हाचा कडाका जाणवू लागल्यानंतर फळे तयार होण्याचा वेगही वाढला.
पहिल्या टप्प्यातील उत्पादन मार्चअखेरपर्यंत राहील, असे बागायतदारांचे म्हणणे आहे. एप्रिल महिन्यात काही दिवस पेट्यांची संख्या कमी राहील. पुन्हा काही दिवस आंबा मिळेल, पण ते प्रमाणही तुलनेत कमी राहील. गेल्या काही दिवसांत पुन्हा झाडांना मोहोर येऊ लागला आहे. त्यामधून प्रत्यक्ष उत्पादन मे महिन्याच्या अखेरीस मिळेल, असा बागायतदारांचा अंदाज आहे.
मुंबई: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सध्याच्या मुंबई – मडगाव एक्सप्रेसला प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून ही एक्सपेस अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. दुसऱ्या बाजूला मडगाव ते मंगुळुरु या मार्गावर दुसरी वंदे भारत एक्सपेस हल्लीच सुरु झाली असून कोकण रेल्वेच्या पूर्ण पट्ट्यात वंदे भारत एक्सप्रेस ची सेवा सुरु झाली आहे. मात्र दक्षिणेकडील एका खासदाराने रेल्वे मंगुळुरु ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्यात यावी अशी पत्राद्वारे मागणी केली आहे. ही मागणी पूर्ण झाल्यास लवकरच मुंबई ते कोकण रेल्वे मार्गावर दोन एक्सप्रेस धावताना दिसतील.
दक्षिण कन्नडचे खासदार नलीन कुमार कटील यांनी ही मागणी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना केली आहे. कोकण रेल्वे सुरु झाल्यापासून मंगुळुरु ते मुंबई हे अंतर दिवसात (१२ तासात) गाठेल अशी एक्सप्रेस मिळावी असे आमचे स्वप्न होते. आता ते स्वप्न पूर्ण करेल अशी अतिजलद गाडी वंदे भारत आता मुंबई ते मडगाव तसेच दुसरी गाडी मडगाव ते मंगळुरु या मार्गावर चालविण्यात येत आहे. मात्र मुंबई ते मंगुळुरु अशा अखंड गाडीची सर्वात जास्त गरज आहे. अशी गाडी चालू झाल्यास दक्षिणेकडील प्रवाशांना दिवसात मुंबई गाठणे सोपे होईल असे खासदार नलीन कुमार कटील यांनी या पत्रात म्हंटले आहे.
याशिवाय त्यांनी रेल्वेस याबाबत २ पर्याय असल्याचे निदर्शनास आणूनही दिले आहे. त्यातील पहिला पर्याय म्हणजे सध्या मुंबई ते मडगाव दरम्यान चालविण्यात येणारी वंदे भारत एक्सप्रेस क्रमांक २२२२९/३० जी आठ डब्यांची चालविण्यात येत आहे ती १६ डब्यांची करून तिचा विस्तार मंगुळुरु पर्यंत करण्यात यावा. जर या गाडीचा मंगुळुरुपर्यंत विस्तार करण्यात काही अडचणी असतील दुसरा पर्याय म्हणजे सध्या मंगुळुरु ते मडगाव दरम्यान चालविण्यात येणारी वंदे भारत एक्सप्रेस क्रमांक २०६४५/४६ या गाडीचा मुंबई पर्यंत विस्तार करण्यात यावा. डब्यांची संख्या तीच ठेवून आठवड्यातून ३ दिवस ही गाडी चालविण्यात यावी असे त्यांनी या आपल्या मागणीत म्हंटले आहे.
खासदार साहेबाची ही मागणी पूर्ण झाली तर लवकरच मुंबई ते कोकण २ वंदे भारत एक्सप्रेस धावताना दिसतील हे मात्र नक्की
नवी मुंबई : रविवारी होणाऱ्या मुंबई मॅरेथॉनसाठी शनिवारी रात्री ११ ते रविवारी दुपारी १ वाजेपर्यंत अशा एकूण दहा तासांसाठी न्हावा – शिवडी सागरी अटल सेतूवरून अत्यावश्यक वाहने वगळता सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली असल्याची माहिती नवी मुंबई वाहतूक विभागाने अधिसूचना काढून दिली आहे.
त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. यामध्ये पुण्यातून द्रुतगती आणि जुन्या महामार्गावरून मुंबईकडे येणारी वाहने गव्हाण फाटा मार्गे बेलापूर- वाशी मुंबई अशी तर जेएनपीटी आणि उरणहून मुंबईत जाणारी वाहनेही गव्हाण फाटामार्गे वाशी या मार्गाने वळविण्यात आली आहेत.
या वर्षीची मॅरेथॉन ही पहिल्यांदाच नागरिकांचे आकर्षण ठरलेल्या अटल सेतूवर आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई ते चिर्लेदरम्यान मॅरेथॉन होणार आहे. यासाठी ‘एमएमआरडीए’कडून वाहतूक विभागाकडे हा मार्ग बंद करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ही प्रवेशबंदी जाहीर करणारी सूचना नवी मुंबई वाहतूक पोलीस आयुक्त तिरुपती काकडे यांनी काढली असल्याची माहिती न्हावाशेवा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी. बी. मुजावर यांनी दिली आहे.
नवी मुंबई: मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) अर्थात अटल सेतूवर प्रवास करत असताना तुम्ही पिकनिक च्या मूड मध्ये असाल आणि सेल्फी काढण्यासाठी गाडी थांबवत असाल तर सावधान! कारण या सेतूवर असे केल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार आता पर्यंत सेल्फी घेण्यासाठी थांबल्याबद्दल नवी मुंबई आणि मुंबई पोलिसांनी एकत्रितपणे एका महिन्यात 1,612 लोकांना दंड ठोठावला आहे.
21.8 किमी सागरी पुलावर थांबणाऱ्या लोकांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली असताना, वाहन थांबल्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये या साठी हा दंड आकारण्यात येत आहे.
नवी मुंबई पोलिसांनी 1,387 जणांना तर मुंबई पोलिसांनी 225 जणांना दंड ठोठावला आहे. नवी मुंबई पोलिसांनी 10.99 लाख रुपये एवढा दंड वसूल केला तर मुंबई पोलिसांनी ₹1.12 लाख एवढी रक्कम या दंडाद्वारे वसूल केली आहे.
अनेक वाहनधारक आपली वाहने कडेला थांबवून सेल्फी घेत वेळ घालवत असत. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण होत आहे. या साठी मुंबई पोलिस आणि नवी मुंबई पोलीसांनी ही मोहीम चालवली आहे. मात्र संपूर्ण 22 किमी लांबीच्या पुलावर गस्त घालण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
Konkan Railway News:मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनस येथील कोचिंग यार्डमध्ये पायभूत सुविधा उभारण्यासाठी आजपासून पुढील सात दिवस १८ फेबुवारी २०२४ पर्यत दररोज मध्यरात्रीपासून ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे एलटीटी स्थानक येणाऱ्या आणि सुटणाऱ्या अनेक मेल- एक्सप्रेस गाड्यांचा वेळात बदल करण्यात आलेला आहे.
या ब्लॉकमुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या तब्बल आठ गाड्यांच्या वेळापत्रकावर, आरंभ आणि अंतिम स्थानकांमध्ये बदल होणार आहे. या बाबत रेल्वे प्रशासनाने दिलेली सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे .
1)Train no. 22116 Karmali – Lokmanya Tilak (T) Express गुरुवार दिनांक 15/02/2024 या दिवशी प्रवास सुरू करणार्या या गाडीचा प्रवास ठाणे स्थानकापर्यंत मर्यादित करण्यात आला आहे. ही गाडी पुढे लोकमान्य टिळक टर्मिनसला जाणार नाही.
MTHL News: नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या आणि देशातील सर्वात लांब सागरी सेतू म्हणुन ओळखल्या जाणार्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर MHTL (अटल सेतू) वर बेस्ट BEST आता प्रीमियम बस सेवा सुरु करणार आहे.
ही प्रीमियम बस कोकण भवन, बेलापूर ते वर्ल्ड ट्रेड सेंटर दरम्यान चालविण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बसला S-145 असा नंबर देण्यात आला असून तिचे साई संगम, तारघर, उल्वे नोड, आई तरुमाता, कामधेनु ओकलैंड्स, एमटीएचएल, ईस्टर्न मोटरवे, सीएसएमटी, चर्चगेट स्टेशन और कफ परेड हे स्टॉप असतिल.चलो अॅपद्वारे (Chalo App) या बसमध्ये आसन आरक्षित केल्या जाऊ शकतील.
सकाळी बेलापूर ते वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि दुपारी दोन वाजता वर्ल्ड ट्रेड सेंटर ते बेलापूर अशा दोन सेवा सुरुवातीला चालविण्यात येतील. ही बस सेवा प्रीमियम बस सेवा असणार आहे. या बसचे तिकीट दर जाहीर केले नाही आहेत.
या प्रीमियम बससेवे नंतर लवकरच सामान्य बस सुद्धा या मार्गावर चालविण्यात येणार आहेत. सार्वजनिक वाहनांचा टोल भार सरकार सहन करत असल्याने त्याचा परिणाम तिकिट दरात होणार नसल्याने या सामान्य बस चा तिकीटदर ईतर बस प्रमाणे असतिल असे बेस्ट च्या अधिकार्यांनी सांगितले आहे.
वाशी, २९ जानेवारी : कोकणातील हापूस वाशी बाजारात दाखल व्हायला सुरूवात झाली आहे. वाशी बाजार समितीमध्ये जानेवारी महिन्यात हापूसची विक्रमी आवक झाली आहे. यावर्षी जानेवारीत बाजार समितीमध्ये विक्रमी ३६० पेट्यांची आवक झाली आहे. प्रतवारीनुसार या आंब्याला प्रतिपेटी सात हजार ते १२ हजारांचा दर मिळत आहे.
अद्याप आंबा हंगामाला पूर्णपणे सुरूवात झालेली नाही. दरवर्षी जानेवारी महिन्यात हापूसची २५ ते ३० पेट्यांची आवक होत असते. मात्र, यंदा जानेवारी महिन्यात वाशी बाजारात हापूसच्या विक्रमी ३६० पेट्यांची आवक झाली आहे. या आंब्याला दरही चांगला मिळत आहे.
अवकाळी पावसामुळे बऱ्याच ठिकाणी आंब्याचा मोहराची गळ झाली होता. तसेच बुरशीजन्य रोग आणि रसशोषक कीडींचाही प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे आंबा पिकाचे नुकसान झाले. पावसामुळे मोहर गळ झाल्याने पुनर्मोहराची प्रकिया लांबली. परिणामी फळ तयार होण्याच्या प्रक्रियेलाही उशीर झाला. परंतु काही भागात अवकाळीचा फटका बसूनही योग्य व्यवस्थापनामुळे फळ वेळेत तयार झाले आहे.
मागील वर्षी आंब्याचे उत्पादन घटले होते. त्यामुळे यंदाच्या हंगामात आंब्याचे चांगल्या प्रमाणत उत्पादन राहील, असा अंदाज व्यापाऱ्यांना होता. मात्र, मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे एप्रिलमध्ये येणाऱ्या आंब्याचा मोहर काळा पडला. याशिवाय रसशोषक कीडीचाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे एप्रिलच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.
उरण : शिवडी न्हावा शेवा अटल सेतुवर रविवारी दुपारी ३ वाजता पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर आठवड्याभरात पहिला अपघात झाला आहे. हे वाहन उरणच्या चिर्लेकडून मुंबईकडे जात असताना हा किरकोळ अपघात झाला आहे. पुलावर उरणच्या दिशेने १२ किलोमीटर अंतरावर एका वाहनाने चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने पुलाच्या मधल्या दुभाजकाला धडक दिली. हे वाहन एक महिला चालवीत होती. वाहनात एक पुरुष आणि एक लहान मूल होते. यावेळी तातडीने अपघात स्थळी मदत पोहचविण्यात आली आहे.
या अपघातात वाहन चालक महिला किरकोळ जखमी झाली असून त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी नेले आहे. त्याचप्रमाणे अपघातस्थळी अग्निशमन दलाचे जवानही उपस्थित होते. “रविवारी दुपारी अटलसेतुवर किरकोळ अपघात झाला आहे. चिर्लेच्या दिशेने हे वाहन मुंबईला जात असताना हा अपघात झाला”, अशी माहिती माहिती न्हावा शेवा वाहतूक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी. एम. मुजावर यांनी दिली.
Mumbai Transharbour Link Road :देशाचे पंत्रपधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उदघाटन होणाऱ्या देशातील सर्वात लांब समुद्री महामार्ग अशा ‘मुंबई ट्रान्सहार्बर लिंक ’ अर्थात अटल बिहारी वाजपेयी सेवरी न्हावा शेवा अटल सेतूवर कमाल १०० किलोमीटर प्रतितास अशी वेगमर्यादा राहणार आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालय तर्फे जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार चार चाकी वाहनासाठी कमाल वेग मर्यादा १०० किलोमीटर प्रतितास राहणार आहे. तर पुलाच्या सुरवातीला चढणीला आणि शेवटी उतरताना ताशी 40 किलोमीटरपर्यंत मर्यादित असेल. दुचाकी आणि तीनचाकी वाहनांसाठी या महामार्गावर प्रवेश असणार नाही.
भारतातील सर्वात लांब सागरी सेतू (Sea Bridge) असलेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) वर वाहनधारकांना एकेरी 250 रुपये आणि परतीच्या प्रवासासाठी 375 रुपये मोजावे लागणार आहेत.
प्राप्त माहितीनुसार, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा मुंबईला जोडणार सर्वात महाग महामार्ग असणार आहे. या महामार्गावर एकेरी प्रवासासाठी कारला 250 रुपये टोल आकारण्यात येणार आहे. दैनंदिन पास एकमार्गी भाड्याच्या 2.5 पट असेल, म्हणजेच 625 रुपये, आणि मासिक पास एकमार्गी भाड्याच्या 50 पट असेल (रु. 12,500 प्रति महिना आणि 1.5 लाख रुपये प्रति वर्ष).