Category Archives: सिंधुदुर्ग

ऐतिहासिक कामगिरी! ‘जनगणना २०२७’ च्या पाहिल्या टप्प्यात सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रात प्रथम; अवघ्या २० दिवसांत १००% उद्दिष्ट पूर्ण

   Follow us on        

सिंधुदुर्गनगरी, दि. ५ : जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यातील घरगणना मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्याने ऐतिहासिक कामगिरी नोंदवत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. अवघ्या २० दिवसांच्या विक्रमी कालावधीत घरगणनेचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करणारा सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनबद्ध कामकाजामुळे हा मान जिल्ह्याला मिळाला आहे.

जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यातील घरगणना मोहीम १६ मे २०२६ पासून सुरू करण्यात आली होती. या मोहिमेत जिल्ह्यातील ०८ तहसील कार्यालये, ०३ नगरपरिषदा आणि ०५ नगरपंचायती अशा एकूण १६ कार्यालयांचा सहभाग होता. जिल्ह्यातील २६० पर्यवेक्षक आणि १,४६० प्रगणकांनी अथक परिश्रम घेत १,४५१ घरयादी गटांची गणना यशस्वीरित्या पूर्ण केली.

या यशामागे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे सूक्ष्म नियोजन, सातत्यपूर्ण आढावा बैठका, क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिलेले मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींतून समस्यांचे तत्काळ निराकरण यांचा मोठा वाटा राहिला. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनीही संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमुळे मोहिमेला गती मिळाली. तसेच प्रभारी अधिकारी म्हणून कर्तव्य पार पाडणाऱ्या तहसिलदार आणि मुख्याधिकारी यांनीही आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली. जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी सांगितले की, घरगणनेचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर आता गुणात्मक पाहणी आणि अनियमितता दुरुस्तीची प्रक्रिया देखील मुदतीत पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.

स्वगणना मोहिमेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद

जनगणना प्रक्रियेतील स्वगणना (Self Enumeration) टप्पा १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत राबविण्यात आला होता. या टप्प्यात जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत डिजिटल माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला. एकूण २९ हजार ५९१ घरांची स्वगणना पूर्ण झाली असून १७ गावे आणि एका नगरपंचायतीने शंभर टक्के स्वगणनेचे उद्दिष्ट गाठले. यामध्ये वेंगुर्ला तालुक्यातील ‘मूठ’ हे गाव सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण करणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले महसुली गाव ठरले. या यशामुळे जिल्ह्यातील नागरिकांची नागरी जबाबदारीची जाणीव आणि डिजिटल साक्षरता अधोरेखित झाली आहे.

प्रगणक-पर्यवेक्षकांच्या परिश्रमांना यशाचे श्रेय

जनगणना मोहिमेच्या यशात जिल्ह्यातील सर्व प्रगणक आणि पर्यवेक्षक यांचे योगदान मोलाचे ठरले. त्यांच्या शिस्तबद्ध कार्यपद्धती, समन्वय, समर्पण आणि टीमवर्कमुळेच ही ऐतिहासिक कामगिरी शक्य झाली. या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सर्व प्रगणक, पर्यवेक्षक आणि संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याने जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यात नोंदविलेली ही राज्यातील अग्रक्रमाची कामगिरी प्रशासनाची कार्यक्षमता, नियोजनबद्धता आणि जनसहभागाचे उत्कृष्ट उदाहरण ठरत असून, राज्यातील इतर जिल्ह्यांसाठीही ती प्रेरणादायी ठरणार आहे.

कुणकेश्वर -कोल्हापूर एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी

   Follow us on        

देवगड: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखले जाणारे धार्मिक व पर्यटन स्थळ कुणकेश्वर ते कोल्हापूर अशी थेट एसटी बसफेरी तात्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी कुणकेश्वर ग्रामपंचायतीचे प्रशासक महेश ताम्हणकर यांनी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे. कुणकेश्वर (ता. देवगड) येथे दर्शनासाठी आणि पर्यटनासाठी महाराष्ट्रभरातून, विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातून वर्षभर मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्याचप्रमाणे देवगड आणि कुणकेश्वर परिसरातील नागरिक, व्यापारी आणि रुग्ण हे वैद्यकीय उपचार, व्यापार आणि करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) च्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने कोल्हापूरला जात असतात.

​सध्या कोल्हापूर ते कुणकेश्वर दरम्यान कोणतीही थेट एसटी बस सेवा उपलब्ध नाही. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंना, पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना गाड्या बदलत (कनेक्टिंग प्रवास) करावा लागतो. थेट बस नसल्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात असून त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोल्हापूर हे दक्षिण महाराष्ट्रातील प्रमुख व्यापारी, वैद्यकीय आणि शैक्षणिक केंद्र असल्याने या मार्गावर प्रवाशांची संख्या मोठी आहे, मात्र थेट बसअभावी प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

​जर एसटी महामंडळाने कोल्हापूर-कुणकेश्वर अशी थेट बसफेरी सुरू केली, तर प्रवाशांची मोठी सोय होईलच, शिवाय महामंडळाच्या उत्पन्नातही भरघोस वाढ होईल, असा विश्वास या पत्रात व्यक्त करण्यात आला आहे. या सर्व बाबींचा सकारात्मक विचार करून परिवहन मंत्र्यांनी एसटी महामंडळाला लवकरात लवकर ही थेट सेवा सुरू करण्याचे आदेश द्यावेत, अशी नम्र विनंती कुणकेश्वर ग्रामपंचायत प्रशासक महेश ताम्हणकर यांनी केली आहे. या मागणीमुळे आता दोन्ही जिल्ह्यांतील प्रवाशांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

सिंधुदुर्ग ते गोवा रो-रो बोट सेवेसाठी प्रस्ताव सादर

   Follow us on        

सिंधुदुर्ग:

सिंधुदुर्ग जिल्हा आणि शेजारील गोवा या दोन्ही प्रमुख पर्यटन क्षेत्रांमधील दळणवळण अधिक जलद आणि सुलभ करण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना आखली जात आहे. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळापासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या जेटीवरून थेट गोव्यापर्यंत जलवाहतूक सेवा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयातील त्यांच्या दालनात पार पडलेल्या एका विशेष बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला.

​हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास दोन्ही राज्यांमधील पर्यटनाला नवी गती मिळण्यासोबतच प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन आणि वाहतूक सुविधांच्या विकासाच्या दृष्टीने बुधवारी मंत्रालयात ‘कॉन्टिनेंटल इंटरलँक प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘गोवा (जॉईज) कार रेंटल’ या कंपन्यांचे विशेष सादरीकरण (प्रेझेंटेशन) झाले. यावेळी सिंधुदुर्ग ते गोवा दरम्यानची वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ, जलद आणि पर्यटकांसाठी सोयीस्कर करण्याच्या विविध पर्यायांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

​या बैठकीला सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिशे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, चिपी विमानतळाचे मुख्य संचालक कुलदीप सिंग, कॉन्टिनेंटल इंटरलँकचे विकास राजपूत व सतीश येरूनकर तसेच गोवा कार रेंटलचे नाथन वेगास यांच्यासह बंदरे विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या प्रस्तावाच्या तांत्रिक आणि कायदेशीर बाबी तपासून पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

Important: दिलेला फोटो केवळ नमुन्यासाठी असून, भविष्यातील योजनेची ढोबळ कल्पना देणारा आहे

सिंधुदुर्गात निघणार ‘राखणदार पदयात्रा’

   Follow us on        

सिंधुदुर्ग:

कोकणातील जल, जंगल, जमीन आणि स्थानिक पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘राखणदार संघा’तर्फे आगामी १३ जूनपासून ‘राखणदार पदयात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेच्या पहिल्या टप्प्यामध्ये सहभागी होण्यासाठी निसर्गप्रेमी, तरुण आणि कोकणप्रेमींना पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पदयात्रेचा पहिला टप्पा गोवा-कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील कणकुंबी येथून सुरू होणार असून, गोवा-दोडामार्ग सीमावर्ती भागातून तेरेखोल नदी खोऱ्यात प्रवेश करत सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली माऊली मंदिर येथे या टप्प्याची सांगता होणार आहे.

​या यात्रेदरम्यान विविध गावांना भेटी देऊन कोकणच्या निसर्गपूजक परंपरा, सातेरी-राखणदार संस्कृती, पवित्र देवराया आणि पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व याबाबींवर मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जाणार आहे. तसेच जल, जंगल, जमीन आणि मानवी जीवन यांच्यातील परस्परसंबंध अधोरेखित करत स्थानिक समुदायांशी थेट संवाद साधला जाईल. तरुण पिढीला पर्यावरणीय प्रश्नांची जाणीव करून देणे, कोकणासमोरील वाढत्या पर्यावरणीय आव्हानांवर चर्चा घडवून आणणे आणि सामूहिक उपाययोजनांबाबत विचारमंथन करणे हा या यात्रेचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. ही

पदयात्रा केवळ एक जनजागृती मोहीम नसून, कोकणच्या नैसर्गिक वारशाशी आणि सांस्कृतिक परंपरांशी पुन्हा नाते जोडण्याचा एक सामूहिक प्रयत्न आहे. या पदयात्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी अधिक माहितीसाठी ७०५८८२६६७४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ‘राखणदार संघा’कडून करण्यात आले आहे.

ओंकार हत्ती वेत्येत दाखल; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

   Follow us on        

सावंतवाडी:

‘ओंकार’ नावाच्या हत्तीचे पुन्हा एकदा वेत्ये गावात आगमन झाल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. रविवारी रात्री या हत्तीने वेत्ये येथे दर्शन दिल्यानंतर ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली. यामुळे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, वनविभागाकडून यावर ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून ओंकार हत्तीच्या सततच्या वावरामुळे वेत्ये आणि आसपासच्या परिसरातील शेतकरी, मजूर तसेच रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणारे नागरिक स्वतःला असुरक्षित समजत आहेत. हत्तीच्या या पुनरागमनामुळे ग्रामस्थांची चिंता अधिकच वाढली आहे.

सरपंचांचा वनविभागावर संताप:

याच पार्श्वभूमीवर वेत्ये गावचे सरपंच गुणाजी गावडे यांनी वनविभागाच्या कारभारावर संतप्त शब्दांत तीव्र टीका केली आहे. ओंकार हत्तीच्या हालचालींची पूर्ण माहिती असूनही वनविभाग नेमके काय करत आहे? ग्रामस्थांच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी ठोस उपाययोजना का केल्या जात नाहीत? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ‘हत्तीचा धुमाकूळ आणि प्रशासनाचा मौनकल्लोळ’ अशी चर्चा आता गावोगावी रंगू लागली आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने प्रभावी पावले उचलून हत्तीच्या हालचालींवर नियंत्रण मिळवावे आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात असून संपूर्ण परिसराचे लक्ष आता वनविभागाच्या भूमिकेकडे लागले आहे.

सिंधुदुर्गात वन्यजीव तस्करीचा पर्दाफाश; ९२ लाखांच्या मुद्देमालासह चौघे गजाआड

   Follow us on        

सिंधुदुर्गनगरी: जिल्ह्यात वन्यजीव तस्करीचे जाळे पुन्हा एकदा उघडकीस आले असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) केलेल्या धडक कारवाईत तब्बल ९२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रानबांबुळी येथील अनावकरवाडी परिसरात पोलिसांनी सापळा रचून ही मोठी कारवाई केली.

दुर्मिळ खवले आणि सांबराची शिंगे जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत दुर्मिळ खवले मांजराची (Pangolin) १.८०० किलो वजनाची खवले, सांबराची दोन शिंगे आणि दोन मोटारसायकली ताब्यात घेण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या खवल्यांना आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी असल्याचे सांगितले जाते. तसेच सांबराच्या शिंगांचाही अवैध व्यापार केला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

चार आरोपींना अटक

या प्रकरणी पोलिसांनी खालील चौघांना ताब्यात घेतले आहे:

१. गणेश प्रदीप शिर्के (वय ३०, रा. पडवे, ता. कुडाळ)

२. विठोबा भगवान बावळेकर (वय ८२, रा. रानबांबुळी)

३. शंकर यशवंत तारापूरे (वय ३१, रा. पडवे)

४. कालिदास दत्तात्रय वारंग (वय ५५, रा. सुकळवड, ता. मालवण)

अशी झाली कारवाई

शुक्रवार, दिनांक २९ मे २०२६ रोजी सकाळी ११.४० वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रानबांबुळी येथील अनावकरवाडी परिसरात सापळा रचला आणि संशयितांना रंगेहात पकडले.

आरोपींविरुद्ध भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत कलम ९, ४४, ४९(ब), ५१ तसेच बी.एन.एस. (BNS) कलम ३(५) अन्वये सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस पथक:

ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोलिस उपनिरीक्षक अनिल हडळ, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुरेश राठोड, हवालदार डॉमिनिक डिसोजा, राणे, जॅक्सन तसेच पोलीस कर्मचारी कांडर आणि समजिस्कर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

वन्यजीवांची अवैध शिकार आणि तस्करी रोखण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांनी उचललेले हे पाऊल अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे. या रॅकेटमागे आणखी कोणाचे हात आहेत, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.

“काळ आला होता पण…” अक्कलकोटला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीवर झाड कोसळले; २१ जण थोडक्यात वाचले

   Follow us on        

कुडाळ: कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गुढीपूर येथील  २१ प्रवासी अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जात असताना आकेरी येथे त्यांच्या धावत्या गाडीवर अचानक एक मोठे आकाशिचे झाड कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली. या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले असले, तरी स्वामी समर्थांच्या कृपेने सर्व २१ प्रवासी सुदैवाने बालंबाल बचावले आहेत. या घटनेत गाडीचा चालक आणि अन्य एक जण किरकोळ जखमी झाले आहेत.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, कुडाळ गुढीपूर येथील रहिवासी राजेश सिंगनाथ आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य (एकूण २१ प्रवासी) ‘टेम्पो ट्रॅव्हलर’ (क्र. MH 48 K 1171) या गाडीने अक्कलकोट स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी निघाले होते. ही गाडी सावंतवाडीजवळील आकेरी येथे पोहोचली असता, रस्त्याच्या कडेला असलेले एक मोठे आकाशिचे झाड अचानक चालत्या गाडीवर कोसळले.

झाड थेट गाडीवर पडल्याने वाहनाचा पुढचा भाग पूर्णपणे चेपला गेला आणि मोठे नुकसान झाले. मात्र, गाडीतील सर्व प्रवासी सुखरूप असून कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. अपघात घडताच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. किरकोळ जखमी झालेल्या चालकाला तातडीने उपचारासाठी सावंतवाडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्थानिक ग्रामस्थांची समयसूचकता

अपघाताचा भीषण आवाज ऐकताच आकेरी येथील स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांनी कटरच्या साहाय्याने रस्त्यावर आणि गाडीवर पडलेले झाड वेगाने कापून बाजूला केले आणि वाहतुकीसाठी रस्ता मोकळा केला. ग्रामस्थांनी दाखवलेल्या या समयसूचकतेचे आणि मदतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वणव्यांमुळे झाडे होताहेत पोकळ

पावसाळा सुरू होण्यापूर्वी ग्रामीण आणि डोंगरभागात मोठ्या प्रमाणावर वणवे पेटवले जातात. या वणव्यांच्या आगीमुळे रस्त्याशेजारील अनेक झाडे मुळापासून जळतात आणि आतून पोकळ होतात. वरून हिरवीगार दिसणारी ही झाडे आतून कमकुवत झालेली असतात, ज्यामुळे मे महिन्यातील वादळी वाऱ्यात ती अचानक उन्मळून पडतात. आजचा अपघातही अशाच एका जळालेल्या झाडामुळे घडल्याचे समोर आले आहे.

हे वणवे प्रवाशांच्या जीवावर बेतू लागल्याने त्यावर वेळीच नियंत्रण मिळवणे गरजेचे झाले आहे. या अपघातात मोठी जीवितहानी टळली असली, तरी वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याशेजारील अशी धोकादायक व जळालेली झाडे तातडीने हटवावीत, अशी मागणी आता नागरिक आणि प्रवाशांमधून केली जात आहे.

Sawantwadi: ऐतिहासिक मोती तलावाचा होणार कायापालट; पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी फूड प्लाझा, बोटिंगसह ईतर प्रकल्पांचा आराखडा तयार

   Follow us on        

सावंतवाडी:सुमारे १५० वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आणि सावंतवाडीची शान असलेल्या ‘मोती तलावाचा’ आता पूर्णपणे कायापालट होणार असून या ऐतिहासिक तलावाला नवसंजीवनी मिळणार आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी तलावाचा ऐतिहासिक लुक कायम ठेवून परिसराचा विकास केला जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी विकास आराखड्याचे (प्रोजेक्ट) सादरीकरण महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे आणि माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धा राजे भोसले व युवराज लखमराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत या संदर्भातील माहिती दिली. हा दूरदृष्टी आराखडा ‘रतन जे. बटलीबोई कन्सल्टंट्स प्रा. लि.’ आणि ‘ईडन एलएलपी’ यांच्या सहकार्याने तयार करण्यात आला आहे.

​तलावाच्या सौंदर्यीकरणासोबतच त्याच्या संवर्धनासाठी विशेष काळजी घेतली जाणार आहे. तलाव परिसरातील भिंतींचे संरक्षण करण्यासोबतच, तलावातील पाणी गढूळ होऊ नये म्हणून ‘फिल्टर प्लांट’ बसवण्यात येणार आहे, ज्यामुळे केवळ स्वच्छ पाणीच तलावात जाईल आणि माती आत जाणार नाही. पर्यटनाला चालना देण्यासाठी तलावाच्या खाऊ गल्लीसाठीच्या आरक्षित भागात वाढ करून तिथे भव्य ‘फूड प्लाझा’ आणि ‘बोटिंग प्रोजेक्ट’ उभारला जाणार आहे. याशिवाय, फेस्टिव्हल मार्केटसाठी स्वतंत्र जागा, हँड क्राफ्टसह कलावंतांसाठी राखीव जागा आणि स्थानिक कलाप्रकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी राजवाड्यासमोर ‘ओपन एम्फीथिएटर’ उभारण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे.

​या प्रकल्पात लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि पर्यटकांसाठी विशेष बैठक व्यवस्था केली जाणार आहे. ऐतिहासिक टच असलेल्या बैठकांसह तलावाच्या काठावर बसून निसर्गरम्य दृश्य पाहता येईल अशी व्यवस्था केली जाईल. गणेश विसर्जनाचा भाग देखील ‘व्ह्यू पॉईंट’ म्हणून विकसित केला जाणार आहे. सुमारे ३१ एकर क्षेत्रात पसरलेल्या या ऐतिहासिक मोती तलावाला ग्लोबल स्तरावर ओळख मिळवून देणे आणि शहराबाहेरून जाणारा पर्यटक सावंतवाडीकडे कसा वळेल यासाठी आमचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही युवराज लखमराजे भोसले यांनी दिली. तसेच, आपल्या कारकिर्दीत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस नगराध्यक्षा श्रद्धा राजे भोसले यांनी व्यक्त केला असून, या प्रकल्पासाठी जास्तीत जास्त निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नामकरण: मधु दंडवते यांचा गौरव की ऐतिहासिक ओळखीचा प्रश्न?

   Follow us on        

मुंबई, २७ मे २०२६: महाराष्ट्र सरकारने मंगळवारी (२६ मे) मंत्रिमंडळ बैठकीत सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ करण्यास मंजुरी दिली. हा निर्णय कोकण रेल्वेच्या शिल्पकार आणि ज्येष्ठ समाजवादी नेते स्वर्गीय मधु दंडवते यांच्या सन्मानार्थ घेण्यात आला असून, तो कोकणवासीयांच्या दीर्घकाळाच्या मागणीचा परिपाक मानला जात आहे. मात्र, या निर्णयाने काहींमध्ये ऐतिहासिक ओळख हरवण्याची भीतीही निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर झाला. आता हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या (रेल्वे आणि गृह मंत्रालय) अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. मंजुरी मिळाल्यानंतर सावंतवाडी रोड हे नाव अधिकृतपणे बदलले जाईल.

या निर्णयाचे कोकणात मोठ्या प्रमाणात स्वागत झाले आहे. कोकण रेल्वे प्रवासी संघटना, स्थानिक नेते आणि सामान्य जनतेकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

“कोकण रेल्वेचे स्वप्न साकार करणाऱ्या मधु दंडवते यांना योग्य सन्मान मिळाला,” अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली.

स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संघटनांनी सांगितले की, ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. “कोकणवासीयांच्या हृदयातील नेत्याला त्यांच्या योगदानानुसार गौरव मिळाला,” असे मत व्यक्त होत आहे.

सोशल मीडियावर अनेकांनी “ऐतिहासिक निर्णय”, “अभिमानाची बाब” आणि “पुढील पिढ्यांसाठी प्रेरणा” असे शब्द वापरले.

मधु दंडवते यांनी कोकण रेल्वे प्रकल्पासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यामुळे हा निर्णय त्यांच्या वारशाचा सन्मान मानला जातो.

काही आक्षेप: “सावंतवाडी नाव जपावे”

जरी सकारात्मक प्रतिसाद प्रबळ असला तरी, काही लोकांनी नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. हे मुख्यतः सोशल मीडियावर दिसले:

“सावंतवाडी हे नाव शतकानुशतके जुने आणि स्थानिक इतिहास, संस्कृतीशी जोडलेले आहे. त्यामुळे मूळ नाव बदलल्याने स्थानिक ओळख हरपेल,” असा आक्षेप काहींनी नोंदवला.

काहींना वाटते की मधु दंडवते यांचा जास्त संबंध राजापूरशी होता, त्यामुळे त्या स्टेशनला नाव देणे अधिक योग्य ठरले असते.

“नेत्यांचा आदर दुसऱ्या माध्यमातून करावा, पण रेल्वे स्थानकाचे मूळ नाव कायम ठेवावे,” असे मतही व्यक्त झाले.

मात्र, हे आक्षेप व्यक्तिगत पातळीवर आहेत आणि मोठ्या संघटना किंवा मुख्य माध्यमांमध्ये तीव्र विरोध दिसला नाही.

सरकारने स्पष्ट केले की, हा निर्णय कोकणातील जनभावनांचा आदर करणारा आहे. प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात येत असल्याने लवकरच अंतिम निर्णय अपेक्षित आहे.

सावंतवाडी रेल्वे स्थानक कोकण रेल्वेवरील महत्त्वाचे स्टेशन आहे. नामकरणानंतर प्रवाशांना नव्या नावाची सवय होण्यास काही काळ लागेल, असे प्रवासी म्हणतात. हा निर्णय कोकण रेल्वेच्या विकासात एक नवा अध्याय ठरू शकतो.

Sawantwadi: ओटवणेतील अज्ञातांनी रातोरात उभारलेल्या छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामागील गूढ कायम.

   Follow us on        

ओटवणे (प्रतिनिधी): येथील देऊळवाडीमध्ये भिवसेन गावकर यांच्या घरासमोरील जागेत अज्ञात शिवप्रेमींनी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात उभारल्याची घटना समोर आली आहे. पहाटे ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच आश्चर्य व्यक्त होत असतानाच गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. मनात असलेली इच्छा अज्ञात शिवप्रेमींनी प्रत्यक्षात उतरवली, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण गावात पसरताच पुतळ्याचे दर्शन घेण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मनमोहक पुतळा पाहून अनेक जण नतमस्तक झाले आणि राजांनी मानाचा मुजरा अर्पण केला.

​दरम्यान, पुतळा उभारल्याची माहिती पोलीस प्रशासनालाही मिळाल्यानंतर नियमानुसार चौकशी करण्यात आली. मात्र, हा पुतळा नेमका कोणी उभारला याचा उलगाडा होऊ शकला नाही. तरीही स्थानिक युवकांनी अज्ञात शिवप्रेमींच्या या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पुतळ्याची पुढील जबाबदारी स्वीकारण्याची ग्वाही पोलीस प्रशासनाला दिली आहे. ओटवणे येथील रावळनाथ विद्यामंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा पूर्वीपासून असला तरी सार्वजनिक ठिकाणीही पुतळा असावा, ही स्थानिकांची इच्छा होती. देऊळवाडीत नव्याने पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आल्याने शिवप्रेमींमध्ये समाधान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

​या पुतळ्याचे दर्शन घेण्यासाठी अनेक शिवभक्तांनी गर्दी केली. पुतळ्याचे पवित्र्य जपण्याबरोबरच त्याची संपूर्ण जबाबदारी वाडीतील युवकांनी स्वीकारली असून, ही जबाबदारी सर्व ओटवणेकरांची असल्याची भावना व्यक्त होत आहे. एका रात्रीत उभारलेल्या या पुतळ्याची ओटवणे दशक्रोशी परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. पुढील काळात येथे शिवजयंतीसह विविध कार्यक्रम जल्लोषात साजरे करण्यात येणार असल्याने शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search