Author Archives: Kokanai Digital

गुहागर : मच्छी वाहतूक करणारा टेम्पो उलटला, क्लिनर जखमी

   Follow us on        

गुहागर: चिपळूण महामार्गावरील चिखली येथे सोमवारी दुपारी सुमारास चारच्या दरम्यान अंजनवेल ते रत्नागिरी या मार्गावर मच्छी वाहतूक करणारा टेम्पो उलटल्याची घटना घडली. या अपघातात टेम्पोचा क्लिनर जखमी झाला असून त्याला तात्काळ उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंजनवेलकडून रत्नागिरीच्या दिशेने मच्छी घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा चालक चिखली परिसरात वाहनावरील नियंत्रण गमावून बसला आणि टेम्पो रस्त्याच्या कडेला उलटला. अपघातामुळे टेम्पोत असलेली मच्छी रस्त्यावर विखुरली गेली, तर टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. जखमी क्लिनरला स्थानिकांनी प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. नंतर अपघातग्रस्त टेम्पो बाजूला हटवण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २४,९१८ शेतकऱ्यांना ६९.४८ कोटींची पिकविमा नुकसानभरपाई वितरित

  •    Follow us on        

सिंधुदुर्ग : पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना (अंबिया बहार, सन २०२४-२५) अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिकविमा नुकसानभरपाईचे वितरण सुरू झाले आहे. या अंतर्गत आतापर्यंत २४,९१८ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये तब्बल ६९.४८ कोटी रुपये थेट जमा करण्यात आले असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.

उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये देखील नुकसानभरपाईची रक्कम टप्प्याटप्प्याने जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

जिल्ह्यातील गरीब व कष्टकरी शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा विमा लाभ दिवाळीपूर्वी मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसत आहेत.

 

Konkan Railway: महत्वाचे! कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात उद्यापासून बदल.

   Follow us on        

Konkan Railway: कोकण रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. उद्या दिनांक २१ ऑक्टोबर पासून कोकण रेल्वे मार्गावर बिगर पावसाळी वेळापत्रक लागु होणार असून रेल्वे गाड्या जलद धावण्यास सुरुवात होणार आहे.

पावसाळ्यामध्ये कोकण रेल्वेकडून पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात येवून सर्वच गाड्यांचा वेग कमी करण्यात येतो. कोकण रेल्वे मार्गावर दरडी कोसळण्याची भीती लक्षात घेवून हा निर्णय कोकण रेल्वे प्रशासना कडून घेण्यात येत असतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पावसाळ्यात हा वेग कमी करण्यात आला होता.

दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई – कोकण मार्गावरील प्रवास गतीमान होणार आहे.

दरवर्षी १० जून ते ३१ ऑक्टोबर दरम्यान कोकण रेल्वेवर पावसाळी वेळापत्रक लागू केले जाते, परंतु यंदा पूर्व पावसाळी कामे वेळेवर पूर्ण झाल्यामुळे १५ दिवस लवकर पावसाळी वेळापत्रक संपविण्यात आले आहे.

त्यामुळे आता प्रवाशांना मुंबई – कोकण मार्गावर जलद प्रवास करता येणार आहे. गैरसोय होऊ नये यासाठी प्रवाशांनी NTES या रेल्वेच्या अधिकृत अॅप वर आपण प्रवास करणार असलेल्या गाडीचे वेळापत्रक आणि सद्यस्थिती तपासावे.

Konkan Railway: सिंधुदुर्ग आणि कणकवली येथे चार गाड्यांना थांबे मंजूर

नवी दिल्ली | 17 ऑक्टोबर 2025

   Follow us on        

रेल्वे मंत्रालयाने (Ministry of Railways) नवीन आदेश जाहीर करत चार महत्त्वाच्या गाड्यांना सिंधुदुर्ग आणि कणकवली स्थानकांवर थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. हा थांबा प्रायोगिक तत्त्वावर (Experimental Basis) देण्यात आला असून, तो लवकरच अमलात येणार आहे.

या आदेशानुसार खालील गाड्यांना थांबा मिळणार आहे:

22655/22656 Ernakulam – Hazrat Nizamuddin Express – थांबा: सिंधुदुर्ग

12977/12978 Ernakulam – Ajmer Marusagar Express – थांबा: सिंधुदुर्ग

22475/22476 Hisar – Coimbatore Express – थांबा: कणकवली

16335/16336 Gandhidham – Nagercoil Express – थांबा: कणकवली

 

 

सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे भिजत घोंगडे; मुंबईतील सिंधुपुत्र आमदारांचा कोकणवासियांच्या हक्कासाठी लढा.

मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून प्रलंबित मागण्यांकडे वेधले लक्ष.

   Follow us on        

मुंबई: कोकणाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे अनेक वर्षांपासून रखडलेले काम आणि कोकण रेल्वेच्या विविध गाड्यांना थांबा मिळावा, या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर मुंबईतील जोगेश्वरी पूर्व मतदारसंघाचे आमदार श्री. अनंत (बाळा) नर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मूळचे सिंधुदुर्गातील तरळा-वारगावचे सुपुत्र असलेल्या श्री. नर यांनी थेट मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कोकणवासियांच्या मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे, ज्यामुळे या प्रश्नासाठी लढणाऱ्या स्थानिक प्रवासी संघटनांच्या संघर्षाला मोठे बळ मिळाले आहे.

गेली अनेक वर्षे सावंतवाडी येथील रेल्वे टर्मिनस आणि कोचिंग डेपोचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. यामुळे कोकणातील हजारो प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. हक्काच्या गाड्या सोडण्याकरिता आणि इतर टर्मिनस सुविधांसाठी त्यांना थेट मडगाव किंवा मुंबईवर अवलंबून राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर, आमदार बाळा नर यांनी आपल्या पत्राद्वारे या गंभीर समस्येकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. त्यांनी पत्रात नमूद केले आहे की, टर्मिनसचे काम पूर्ण झाल्यास केवळ प्रवाशांची सोय होणार नाही, तर स्थानिकांना रोजगाराच्या नवीन संधीही उपलब्ध होतील.

या पत्राद्वारे केवळ टर्मिनसच्या कामाचीच नव्हे, तर कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या अनेक महत्त्वाच्या गाड्यांना सावंतवाडी येथे थांबा मंजूर करण्यासाठी रेल्वे बोर्डाकडे शिफारस करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. यामध्ये मुंबई-मंगळूरु एक्सप्रेस, संपर्कक्रांती एक्सप्रेस, निजामुद्दीन – एर्नाकुलम एक्सप्रेस यांसारख्या गाड्यांचा समावेश आहे. या थांब्यांमुळे मुंबई, पुणे आणि इतर शहरांमध्ये नोकरी-व्यवसायानिमित्त स्थायिक झालेल्या कोकणी चाकरमान्यांची प्रवासाची सोय होईल, असे त्यांनी अधोरेखित केले.

स्थानिक संघटनांचा अविरत संघर्ष

सावंतवाडी टर्मिनस आणि रेल्वे थांब्यांसाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना (सावंतवाडी) सातत्याने लढा देत आहे. संघटनेचे मुंबईतील पदाधिकारी श्री. संदीप गुरव, शाखाप्रमुख श्री. नंदकुमार ताम्हणकर, उपशाखाप्रमुख शैलेश बांदेलकर, श्री. केशव पांचाळ, राजापूर तालुका सहसंपर्कप्रमुख श्री. जगन्नाथ कदम आणि इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यासाठी अविरत प्रयत्नशील आहेत. काही दिवसांपूर्वीच माहीमचे आमदार श्री. महेश सावंत यांनीही या विषयात पत्रव्यवहार केला होता. आता आमदार बाळा नर यांच्या पुढाकाराने या मागणीला अधिक वजन प्राप्त झाले आहे.

आमदार नर यांच्या या पत्रामुळे कोकणवासियांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून, “आता कोकणच्या हक्काचे टर्मिनस मिळवूच!” असा निर्धार व्यक्त केला जात आहे. सरकार आणि रेल्वे प्रशासन या मागणीची दखल घेऊन कोकणवासीयांना न्याय देईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सावंतवाडीतील चिमुकल्या ‘नृत्या’ला जीवनदानाची गरज – उपचारासाठी १५ लाखांची आवश्यकता, समाजातील दानशूरांकडून मदतीचे आवाहन

   Follow us on        

सावंतवाडी, ता. ९ : सावंतवाडीतील अवघी तीन वर्षांची चिमुरडी ‘नृत्या’ सध्या जीवघेण्या आजाराशी झुंज देत आहे. निमोनियाच्या गंभीर प्रकारामुळे तिला कोल्हापूर येथील साई स्पर्श चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून उपचारासाठी तब्बल १० ते १५ लाख रुपयांची आवश्यकता आहे.

‘नृत्या’ ही सावंतवाडीतील सुप्रसिद्ध कोरिओग्राफर महेश जांभोरे यांची कन्या आहे. जन्मापासूनच विविध आरोग्य समस्यांशी ती लढत आहे. आतापर्यंत जांभोरे यांनी आपली सर्व जमापुंजी खर्च करून मुलीवर उपचार सुरू ठेवले, मात्र सध्याच्या परिस्थितीत उपचारांचा खर्च परवडणं कठीण झालं आहे.

आठवडाभरापूर्वी ताप व श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्यानंतर तिला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु प्रकृतीत सुधारणा न झाल्याने जिल्ह्यातील अन्य रुग्णालयांमधून तिला कोल्हापूर येथे हलविण्यात आलं. सध्या तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

त्यासाठी प्रवीण कुबल (7066415169) या नंबरवर संपर्क साधावा. तसेच ज्या दात्यांना आर्थिक मदत द्यायची असेल त्यांनी या बँक अकाउंटवर IFSC :- SBIN0000476, Account no :- 20300618631 किंवा गुगल पे महेश जांभोरे (9545472152) वर आपली मदत पाठवावी.

नृत्याच्या उपचारांसाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन मदतीचा हात द्यावा, असे आवाहन तिच्या मित्रपरिवाराकडून करण्यात आले आहे.

 

 

तळकोकणात थांबा नसणार्‍या त्या ३२ गाड्यांना थांबा द्यावा; शरद पवार यांची रेल्वेला विनंती

   Follow us on        

पुणे: कोकणवासीयांसाठी जिव्हाळ्याचा आणि अत्यंत महत्त्वाचा विषय असलेल्या कोकण रेल्वेवरील एक्स्प्रेस गाड्यांच्या थांब्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून विशेष विनंती केली आहे.

या पत्रात त्यांनी कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडी या तळकोकणातील स्थानकांवर निवडक लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी केली आहे.

शरद पवार यांनी पत्रात नमूद केले आहे की, महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा असून तो आपल्या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांसाठी, ऐतिहासिक किल्ल्यांसाठी आणि समृद्ध कोकणी संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, अनेक एक्स्प्रेस गाड्या सध्या या जिल्ह्यातून न थांबता जात असल्याने स्थानिक नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिक आणि पर्यटक यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर पवार यांनी प्रायोगिक तत्त्वावर पर्यटन हंगामात आणि प्रमुख सणांच्या काळात — म्हणजे गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, नववर्ष, होळी आणि उन्हाळी सुट्टीच्या काळात — निवडक एक्स्प्रेस गाड्यांना कुडाळ, कणकवली किंवा सावंतवाडी येथे थांबे देण्यात यावेत, अशी मागणी केली आहे.

त्यांनी नमूद केले आहे की, या निर्णयामुळे तळकोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, विद्यार्थी, व्यावसायिक आणि रुग्णांच्या प्रवासात मोठी सोय होईल, तसेच स्थानिक उत्पादने आणि हस्तकलेच्या वाहतुकीला प्रोत्साहन मिळेल. यामुळे सर्वसामान्य कोकणवासीयांच्या प्रलंबित मागणीला न्याय मिळेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला आहे.

Konkan Railway: रेल्वेचा गलथान कारभार! आरक्षित असलेला डब्बा न जोडताच गाडी रवाना

   Follow us on        

मुंबई, दि. ८ ऑक्टोबर : मुंबईवरून मडगावकडे जाणाऱ्या १२०५१ जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांमध्ये आज तीव्र संतापाची लाट उसळली. प्रवाशांकडे  कन्फर्म तिकीटे असलेला DL-1 डबा गाडीला लावण्यातच आलेला नव्हता.

या अनपेक्षित घटनेमुळे गाडीत गोंधळ आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. प्रवाशांना जागा न मिळाल्याने प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागला. परिस्थिती हाताळताना रेल्वेतील टीसी आणि कर्मचारी देखील अडचणीत सापडले.

टीसींनी प्रवाशांना या प्रकरणाची तक्रार रेल्वे प्रशासनाकडे नोंदविण्याचा सल्ला दिला असून, प्रवाशांनी या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवला आहे. रेल्वेच्या या गलथान कारभारामुळे प्रवाशांना विनाकारण त्रास सहन करावा लागल्याने सर्वत्र नाराजी व्यक्त होत आहे.

प्रवाशांनी संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली असून, हा प्रकार रेल्वेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली आहे

लहान मुलांसाठी कफ सिरप धोकादायक? केंद्र सरकारने दिला महत्वाचा इशारा

   Follow us on        

नवी दिल्ली: लहान मुलांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी कफ सिरप आणि सर्दीवरील औषधांच्या वापराबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार बालरोग तज्ज्ञ आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लहान मुलांना ही औषधे देताना विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, दोन वर्षांखालील मुलांना कफ आणि सर्दीवरील कोणतीही औषधे देऊ नयेत. तसेच, पाच वर्षांखालील मुलांसाठी ही औषधे सामान्यतः शिफारस केलेली नाहीत. कारण, लहान मुलांमधील तीव्र कफ आणि सर्दीचे बहुतांश आजार स्वतःहून बरे होतात आणि त्यासाठी औषधांची गरज पडत नाही.


सर्व आरोग्य केंद्रे आणि दवाखान्यांनी केवळ उत्तम उत्पादन मानकांनुसार (GMP) तयार केलेली आणि उच्च औषधी दर्जाची कफ सिरप खरेदी करावीत, असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद आहे. या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी सर्व दवाखाने, जिल्हा आरोग्य विभाग, औषध वितरण केंद्रे, प्राथमिक आणि सामुदायिक आरोग्य केंद्रे, जिल्हा रुग्णालये तसेच वैद्यकीय शिक्षण संस्थांमध्ये तातडीने करावी, असे निर्देश सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आहेत.

 

Loading

Konkan Railway: वास्को-द-गामा – मुझफ्फरपूर विशेष गाडी एलएचबी रेकसह धावणार

   Follow us on    

 

 

Konkan Railway: वास्को-द-गामा : प्रवाशांच्या अधिक सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी वास्को-द-गामा – मुझफ्फरपूर – वास्को-द-गामा साप्ताहिक विशेष गाडी (क्र. 07311/07312) आता पारंपरिक आयसीएफ डब्यांऐवजी आधुनिक एलएचबी डब्यांसह धावणार आहे.

ही सुविधा 22 सप्टेंबर 2025 पासून वास्को-द-गामा येथून सुटणाऱ्या गाडी क्रमांक 07311 साठी लागू होणार असून, मुझफ्फरपूर येथून 25 सप्टेंबर 2025 रोजी सुटणाऱ्या गाडी क्रमांक 07312 पासून अमलात येईल.

रेल्वेच्या माहितीनुसार, या गाडीत यापुढे एक फर्स्ट एसी, दोन टू टियर एसी, तीन थ्री टियर एसी, नऊ स्लीपर, तीन जनरल, एक जनरेटर कार आणि एक एसएलआर असा एकूण 20 एलएचबी डब्यांचा समावेश असेल. पूर्वी या गाडीत 21 आयसीएफ डबे जोडले जात होते.

प्रवाशांच्या प्रवासाचा अनुभव अधिक आरामदायी, सुरक्षित आणि वेगवान व्हावा या उद्देशाने हा बदल करण्यात आला आहे. संबंधित गाडीचे तपशीलवार वेळापत्रक आणि थांबे www.enquiry.indianrail.gov.in
या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

या बदलामुळे प्रवाशांनी रेल्वेच्या सेवांचा अधिक सोयीस्कररीत्या लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी केले आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search