Category Archives: महाराष्ट्र

परराज्यातील गाड्या मुंबईपर्यंत; महाराष्ट्रातील गाड्यांना ‘मार्गच’ नाही- मध्यरेल्वेचा दुजाभाव

   Follow us on        

मुंबई: जिथे परराज्यात जाणार्‍या गाड्यांना मध्य रेल्वे मुंबई भागात हिरवा कंदील देत आहे तिथे कोरोना काळापासून बंद झालेली आणि कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याची असलेली ‘रत्नागिरी-दादर पॅसेंजर’ रेल्वे प्रशासनाने दिवा स्टेशनवर मर्यादित केल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या अन्यायाविरोधात अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने आता थेट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून या प्रश्नात आक्रमकपणे लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

​रेल्वेचा दुटप्पी कारभार: परराज्यातील गाड्यांना रेड कार्पेट, महाराष्ट्राच्या गाड्यांना बाहेरचा रस्ता!

​समितीचे सचिव अक्षय सरोज मधुकर महापदी यांनी पत्रात रेल्वेच्या कार्यपद्धतीवर गंभीर बोट ठेवले आहे. मध्य रेल्वेने ‘मार्गाची क्षमता नाही’ (Line Capacity) असे तांत्रिक कारण देऊन रत्नागिरी पॅसेंजर दादरऐवजी दिव्यातून चालवण्याचा निर्णय घेतला. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे त्याच मार्गावरून दादर-गोरखपूर आणि दादर-बालिया यांसारख्या परराज्यात जाणाऱ्या गाड्यांना रेल्वेने हिरवा कंदील दिला आहे. एवढेच नाही तर अलीकडेच नव्याने घोषणा करण्यात आलेली एलटीटी बंगळुरू एक्सप्रेस एलटीटी वरून सुटणार आहे. मग महाराष्ट्रातील अंतर्गत गाड्यांसाठीच रेल्वेकडे मार्ग उपलब्ध का नाही? असा संतप्त सवाल कोकणवासीयांनी विचारला आहे.

​दिव्यापर्यंत गाडी मर्यादित केल्याने प्रवाशांचे हाल:

​वेळेचा अपव्यय: दादरला गाडीत पाणी भरण्याची सोय होती. आता दिव्यात सोय नसल्याने पनवेलला गाडी थांबवून पाणी भरावे लागते, ज्यात ३० ते ४० मिनिटे वाया जात आहेत.

​क्षमता असूनही प्रवासी वंचित: दिवा स्थानकातील फलाट आखूड असल्याने या गाड्यांना १७ पेक्षा जास्त डबे लावता येत नाहीत. हीच गाडी दादर किंवा CSMT वरून सुटल्यास २२-२४ डबे लावता येतील, ज्यामुळे दररोज ३ ते ४ हजार अतिरिक्त प्रवाशांना प्रवास करता येईल.

​कनेक्टिव्हिटी तुटली: दक्षिण मुंबई, वसई-विरार आणि गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांसाठी दादर हे सर्वात सोयीचे स्थानक होते, जे आता हिरावले गेले आहे.

यापूर्वी माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर आणि गोपाळ शेट्टी यांसारख्या अनेक नेत्यांनी पत्रव्यवहार करूनही रेल्वे प्रशासनाने याला केराची टोपली दाखवली आहे. संसदेत आणि विधिमंडळात विषय मांडूनही तो निकाली निघत नसल्याने आता या प्रश्नावर राजकीय लढा उभारण्याची गरज पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.

​आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वळण

​”कोकण रेल्वे प्रकल्पात महाराष्ट्राचा २२% आर्थिक सहभाग आहे. तरीही मराठी प्रवाशांना त्यांच्या हक्काच्या गाडीसाठी झगडावे लागत आहे,” असा आरोप समितीने केला आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर, मुंबईतील मोठा मतदार असलेल्या कोकणवासीयांचा हा प्रश्न उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे केंद्र सरकारकडे लावून धरतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

​ ५०१०४/५०१०३ रत्नागिरी दादर पॅसेंजर कोरोनापूर्वीप्रमाणे पूर्ववत दादर स्थानकावरूनच सुरू करावी आणि डब्यांची संख्या वाढवून कोकणवासीयांना दिलासा द्यावा अशी प्रमुख मागणी समितीने केली आहे.

कानसे ग्रुपच्या २७ वर्षातील पदार्पणाच्या निमित्ताने ‘दख्खनचा वाघ’ या ऐतिहासिक नाट्यप्रयोगाचे मुंबईत सादरीकरण 

   Follow us on        

मुंबई: गेली २६ वर्षे विविध नाट्यकलाकृतींमधून रंगमंच गाजवणारा कानसे ग्रुप आपल्या २७व्या वर्षात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. यावर्षी समूहाच्या वतीने स्वराज्याचा धगधगता, शौर्यपूर्ण आणि अजूनही पूर्णपणे न उलगडलेला इतिहास रंगमंचावर दिमाखात सादर केला जाणार आहे.

“हे स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा” या प्रेरणेतून उभ्या राहिलेल्या स्वराज्यासाठी असंख्य मावळ्यांनी आपले प्राण अर्पण केले. त्यातील काही पराक्रम इतिहासात नोंदले गेले असले, तरी अनेक शूर मावळ्यांचे योगदान आजही अज्ञात आहे. अशाच १६०० पराक्रमी मावळ्यांच्या शौर्याची साक्ष शिवनेरी आजही अभिमानाने मिरवते. त्या न वाचलेल्या इतिहासाच्या पानांना नाट्यरूप देत, प्रेक्षकांना केवळ पाहण्यासाठी नव्हे तर जगण्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे.

कोकण सांस्कृतिक कलामंच निर्मित,

दिनेश कुडतरकर साहेब पुरस्कृत

आणि साईश्रद्धा कलापथक व कानसे ग्रुप आयोजित

कोकणची लोककला “नमन”

हा भव्य नाट्यप्रयोग

दिनांक : २३ डिसेंबर २०२५

स्थळ : दिनानाथ नाट्यगृह

वेळ : रात्री ८:३० वाजता

स्वराज्याचा तेजस्वी इतिहास, कोकणची लोककला आणि पराक्रमाची ज्वाला अनुभवण्यासाठी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

तब्बल २७ बोगदे असलेल्या कोकण रेल्वेसारख्या अजून एका रेल्वेमार्गाला गती मिळणार

   Follow us on        

Sindhudurg: तब्बल 28 कि.मी. लांबीचे एकूण 27 बोगदे आणि रस्त्यावरील 55 उड्डाणपूल असणाऱ्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गासाठी भूसंपादन सुरू करा, असे आदेश गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. केंद्र आणि राज्य सरकारच्या सहभागातून होणार्‍या या मार्गासाठी राज्य सरकारच्या हिश्श्याची तरतूद करा, असेही आदेश त्यांनी दिले. या निर्णयामुळे पावणेदहा वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या या मार्गाला अखेर चालना मिळाली आहे.

निसर्गाच्या कुशीतून जाणारा हा मार्ग आहे. सर्वात मोठा बोगदा 3.96 कि.मी. लांबीचा आहे. 2 कि.मी.पेक्षा जादा लांबीचे 3, तर त्यापेक्षा कमी लांबीचे 24 बोगदे असतील. या मार्गावर रस्त्यावरील 55 उड्डाणपूल, रस्त्याखालील 68 पूल असतील. यासह छोटे पूल 74, तर मोठे पूल 55 असतील. या मार्गावर एकूण 10 स्थानकेही प्रस्तावित केली आहेत.

विधानभवनातील मंत्री परिषदेच्या सभागृहात बंदरे विकास विभागाची आढावा बैठक झाली, या बैठकीत कोकणातील जयगड, आंग्रे, रेडी व विजयदुर्ग या बंदरांचा विकास करण्यासाठी वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वे मार्गाची गरज आहे, असे सांगत फडणवीस म्हणाले, हा रेल्वे मार्ग केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्यातून उभारला जाणार आहे. याकरिता या मार्गासाठी राज्य शासनाच्या आर्थिक सहभागाची तरतूदही करा, असेही आदेश त्यांनी दिले. बैठकीस मत्स्य व बंदरे विकासमंत्री नितेश राणे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, परिवहन व बंदरे विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. आदींसह अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, या निर्णयाची माहिती मंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. हा निर्णय केवळ कोकणासाठी नव्हे, तर महाराष्ट्रासाठी गेमचेंजर ठरणार आहे. या रेल्वे मार्गामुळे विकासाची असंख्य दालने उघडणार आहेत. प्रामुख्याने कृषी आणि मत्स्य उत्पादनांच्या वाहतुकीला चालना मिळेल. पर्यटनात वाढ, पूर आणि भूस्खलनाच्या काळात दळणवळणाची पर्यायी सुविधा म्हणून हा मार्ग उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

27 बोगदे, 55 उड्डाणपूल

या मार्गावर 28 कि.मी. लांबीचे एकूण 27 बोगदे असतील. यासह रस्त्यावरील 55 उड्डाणपूल आहेत. निसर्गाच्या कुशीतून जाणारा हा मार्ग आहे. सर्वात मोठा बोगदा 3.96 कि.मी. लांबीचा आहे. 2 कि.मी.पेक्षा जादा लांबीचे 3, तर त्यापेक्षा कमी लांबीचे 24 बोगदे असतील. या मार्गावर रस्त्यावरील 55 उड्डाणपूल, रस्त्याखालील 68 पूल असतील. यासह छोटे पूल 74, तर मोठे पूल 55 असतील. या मार्गावर एकूण 10 स्थानकेही प्रस्तावित केली आहेत.

२०२६ साठी २४ दिवसांच्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर; ‘या’ तारखेला असणार एक अतिरिक्त सुट्टी

   Follow us on        

मुंबई, दि. ९: महाराष्ट्र शासनाने २०२६ या वर्षासाठी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी २४ सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या असून, भाऊबीज (११ नोव्हेंबर २०२६, बुधवार) यादिवशी अतिरिक्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे, सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.

जाहीर केलेल्या सुट्ट्यांमध्ये प्रमुख सण आणि राष्ट्रीय दिवसांचा समावेश आहे. या सुट्या महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालये, राज्य शासनाचे उपक्रम, महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती यांना लागू राहील.

याशिवाय १ एप्रिल २०२६ (बुधवार) हा दिवस केवळ बँकांसाठी वार्षिक लेखापरीक्षणासाठी सुट्टी म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

 

 

 

शालेय सहलींसाठी फक्त एसटी बस हाच पर्याय; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सरकारचे कठोर नियम

   Follow us on        

मुंबई : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून, राज्यातील सर्व शालेय सहलींसाठी फक्त एमएसआरटीसीच्या एसटी (लालपरी) बसचांचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे खासगी आणि शाळेच्या मालकीच्या बसद्वारे सहली आयोजित करण्यावर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे.

नव्या नियमांनुसार सहलीसाठी शाळांनी प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असून, प्रत्येक १० विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक असा प्रमाण राखणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुलींच्या गटांसाठी महिला शिक्षकांची नियुक्ती अनिवार्य असेल. तसेच सहलींचे नियोजन ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक स्थळांना प्राधान्य देऊन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

एमएसआरटीसीकडून दररोज ८०० ते १००० बस २५१ डेपोमधून उपलब्ध करून देण्याची तयारी असून, शालेय सहलींसाठी ५० टक्के भाडे सवलत देण्यात येणार आहे. सरकारच्या मते या नियमांमुळे विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि नियंत्रित होईल अशी अपेक्षा आहे.

औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव आता “छत्रपती संभाजीनगर”

   Follow us on    

 

 

औरंगाबाद – दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील “औरंगाबाद” रेल्वे स्थानकाचे नाव अधिकृतपणे बदलून “छत्रपती संभाजीनगर” असे करण्यात आले आहे. या बदलास केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी मान्यता दिली असून स्थानकाचा नवीन कोड CPSN असा असणार आहे.

आता पुढे “औरंगाबाद” ऐवजी सर्व रेल्वे फलक, आरक्षण तिकीट प्रणाली आणि घोषणांमध्ये “छत्रपती संभाजीनगर” हे नाव वापरले जाईल. रेल्वे प्रवाशांना आणि नागरिकांना याबाबत दक्षिण मध्य रेल्वेकडून अधिकृत माहिती देण्यात आली आहे.

या निर्णयामुळे ऐतिहासिक शहराच्या नावात बदल करत “छत्रपती संभाजीनगर” हे नाव अधिकृतपणे भारतीय रेल्वेच्या नोंदीत समाविष्ट झाले आहे.

Konkan Railway: सिंधुदुर्ग आणि कणकवली येथे चार गाड्यांना थांबे मंजूर

नवी दिल्ली | 17 ऑक्टोबर 2025

   Follow us on    

 

 

रेल्वे मंत्रालयाने (Ministry of Railways) नवीन आदेश जाहीर करत चार महत्त्वाच्या गाड्यांना सिंधुदुर्ग आणि कणकवली स्थानकांवर थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. हा थांबा प्रायोगिक तत्त्वावर (Experimental Basis) देण्यात आला असून, तो लवकरच अमलात येणार आहे.

या आदेशानुसार खालील गाड्यांना थांबा मिळणार आहे:

22655/22656 Ernakulam – Hazrat Nizamuddin Express – थांबा: सिंधुदुर्ग

12977/12978 Ernakulam – Ajmer Marusagar Express – थांबा: सिंधुदुर्ग

22475/22476 Hisar – Coimbatore Express – थांबा: कणकवली

16335/16336 Gandhidham – Nagercoil Express – थांबा: कणकवली

 

 

सावंतवाडीतील चिमुकल्या ‘नृत्या’ला जीवनदानाची गरज – उपचारासाठी १५ लाखांची आवश्यकता, समाजातील दानशूरांकडून मदतीचे आवाहन

   Follow us on    

 

 

सावंतवाडी, ता. ९ : सावंतवाडीतील अवघी तीन वर्षांची चिमुरडी ‘नृत्या’ सध्या जीवघेण्या आजाराशी झुंज देत आहे. निमोनियाच्या गंभीर प्रकारामुळे तिला कोल्हापूर येथील साई स्पर्श चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून उपचारासाठी तब्बल १० ते १५ लाख रुपयांची आवश्यकता आहे.

‘नृत्या’ ही सावंतवाडीतील सुप्रसिद्ध कोरिओग्राफर महेश जांभोरे यांची कन्या आहे. जन्मापासूनच विविध आरोग्य समस्यांशी ती लढत आहे. आतापर्यंत जांभोरे यांनी आपली सर्व जमापुंजी खर्च करून मुलीवर उपचार सुरू ठेवले, मात्र सध्याच्या परिस्थितीत उपचारांचा खर्च परवडणं कठीण झालं आहे.

आठवडाभरापूर्वी ताप व श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्यानंतर तिला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु प्रकृतीत सुधारणा न झाल्याने जिल्ह्यातील अन्य रुग्णालयांमधून तिला कोल्हापूर येथे हलविण्यात आलं. सध्या तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

त्यासाठी प्रवीण कुबल (7066415169) या नंबरवर संपर्क साधावा. तसेच ज्या दात्यांना आर्थिक मदत द्यायची असेल त्यांनी या बँक अकाउंटवर IFSC :- SBIN0000476, Account no :- 20300618631 किंवा गुगल पे महेश जांभोरे (9545472152) वर आपली मदत पाठवावी.

नृत्याच्या उपचारांसाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन मदतीचा हात द्यावा, असे आवाहन तिच्या मित्रपरिवाराकडून करण्यात आले आहे.

 

 

Konkan Railway: रेल्वेचा गलथान कारभार! आरक्षित असलेला डब्बा न जोडताच गाडी रवाना

   Follow us on        

मुंबई, दि. ८ ऑक्टोबर : मुंबईवरून मडगावकडे जाणाऱ्या १२०५१ जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांमध्ये आज तीव्र संतापाची लाट उसळली. प्रवाशांकडे  कन्फर्म तिकीटे असलेला DL-1 डबा गाडीला लावण्यातच आलेला नव्हता.

या अनपेक्षित घटनेमुळे गाडीत गोंधळ आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. प्रवाशांना जागा न मिळाल्याने प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागला. परिस्थिती हाताळताना रेल्वेतील टीसी आणि कर्मचारी देखील अडचणीत सापडले.

टीसींनी प्रवाशांना या प्रकरणाची तक्रार रेल्वे प्रशासनाकडे नोंदविण्याचा सल्ला दिला असून, प्रवाशांनी या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवला आहे. रेल्वेच्या या गलथान कारभारामुळे प्रवाशांना विनाकारण त्रास सहन करावा लागल्याने सर्वत्र नाराजी व्यक्त होत आहे.

प्रवाशांनी संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली असून, हा प्रकार रेल्वेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली आहे

पीएसआय परिक्षेत अव्वल ठरलेल्या अश्विनी केदारीचा दुर्दैवी मृत्यू; पुण्यात हळहळ

   Follow us on    

 

 

पुणे : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पाळू येथील रहिवासी अश्विनी केदारी (वय ३०) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेतलेल्या २०२३ च्या पीएसआय परीक्षेत मुलींत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या अश्विनीचा २८ ऑगस्ट रोजी झालेल्या अपघातात गंभीर भाजल्याने मृत्यू झाला.

२८ ऑगस्टच्या सकाळी अभ्यास करताना तिने बाथरूममधील गिझर सुरू करून पाणी गरम केले होते. पाण्याचे तापमान पाहण्यासाठी गेल्यावर तिला विजेचा धक्का बसला आणि अंगावर उकळते पाणी ओतले गेले. यात ती ८० टक्क्यांहून अधिक प्रमाणात भाजली.

तिला तात्काळ पिंपरी-चिंचवड येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या उपचारासाठी समाजातील अनेकांनी आर्थिक मदतही केली. मात्र, काही दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

शेतकरी कुटुंबातील अश्विनीने स्वतःच्या कष्टावर यश मिळवले होते. जिल्हाधिकारी होण्याचे तिचे स्वप्न होते. तिच्या निधनाने खेड तालुक्यासह तिचे कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवार आणि स्पर्धा परीक्षेतील अभ्यासकांवर दुःखाचे सावट पसरले आहे

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search