Category Archives: सिंधुदुर्ग

मागणी पूर्ण! सावंतवाडी–रेल्वे स्थानक–बांदा बससेवा सुरू; बस फेऱ्यांचे वेळापत्रक असे असेल

   Follow us on        

बांदा :सावंतवाडी रेल्वे स्टेशन–निगुडे–सोनूर्ली–बांदा या मार्गावर नवीन बससेवा सुरू करण्यात आली आहे. या मार्गावर नियमित बसफेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून सातत्याने करण्यात येत होती. अखेर प्रशासनाने याची दखल घेत बससेवा सुरू केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

निगुडे येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नव्या सेवेचा लाभ विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी तसेच व्यापाऱ्यांना होणार असून रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचणे आता अधिक सोयीचे होणार आहे.

नवीन बससेवेअंतर्गत दिवसातून एकूण ११ फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. सकाळपासून सायंकाळपर्यंत नियमित वेळापत्रकानुसार बस धावणार असून सावंतवाडी रेल्वे स्टेशन, निगुडे, सोनूर्ली आणि बांदा या प्रमुख ठिकाणी थांबे असणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना शहराशी थेट जोडणी मिळाली आहे.

ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत करत प्रशासनाचे आभार मानले असून भविष्यात फेऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. नवीन बससेवा सुरू झाल्याने या भागातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

नवीन बस फेरीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:

१) बांदा – सकाळी ७:१५ (मार्गे: निगुडे, सोनूर्ली, रेल्वे स्टेशन) ➡️ सावंतवाडी – सकाळी ८:००

२) सावंतवाडी – सकाळी ९:०० (मार्गे: रेल्वे स्टेशन, सोनूर्ली, निगुडे) ➡️ बांदा – सकाळी ९:४५

३) बांदा – सकाळी ९:५० (मार्गे: निगुडे, सोनूर्ली, रेल्वे स्टेशन) ➡️ सावंतवाडी – सकाळी १०:३५

४) सावंतवाडी – सकाळी ११:३० (मार्गे: रेल्वे स्टेशन, सोनूर्ली, निगुडे) ➡️ बांदा – दुपारी १२:१५

५) बांदा – सकाळी ११:३० (मार्गे: निगुडे, सोनूर्ली, रेल्वे स्टेशन) ➡️ सावंतवाडी – दुपारी १२:१५

६) सावंतवाडी – दुपारी १२:२५ (मार्गे: रेल्वे स्टेशन, सोनूर्ली, निगुडे) ➡️ बांदा – दुपारी १३:१० (१:१०)

७) बांदा – दुपारी १३:२० (१:२०) (मार्गे: निगुडे, सोनूर्ली, रेल्वे स्टेशन) ➡️ सावंतवाडी – दुपारी १३:४५ (१:४५)

८) सावंतवाडी – दुपारी १४:०० (२:००) (मार्गे: रेल्वे स्टेशन, सोनूर्ली, निगुडे) ➡️ बांदा – दुपारी १४:४५ (२:४५)

९) बांदा – दुपारी १४:५५ (२:५५) (मार्गे: निगुडे, सोनूर्ली, रेल्वे स्टेशन) ➡️ सावंतवाडी – दुपारी १५:४० (३:४०)

१०) सावंतवाडी – सायं. १७:०० (५:००) (मार्गे: रेल्वे स्टेशन, सोनूर्ली, निगुडे) ➡️ बांदा – सायं. १७:४५ (५:४५)

११) बांदा – सायं. १७:५५ (५:५५) (मार्गे: निगुडे, सोनूर्ली, रेल्वे स्टेशन) ➡️ सावंतवाडी – सायं. १८:४० (६:४०)

 

 

 

कोकण–कोल्हापूर कनेक्टिव्हिटीला बूस्ट! एक-दोन नव्हे, तर तब्बल तीन नवे घाट मार्ग प्रस्तावित

   Follow us on        

वारणानगर: कोल्हापूर जिल्हा, शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यातील दळणवळण तसेच पर्यटनाला मोठी चालना देण्यासाठी तीन नवीन घाट रस्ते निर्माण करण्यात येणार आहेत. हे नवीन मार्ग कोल्हापूरला थेट कोकणाशी जोडणार असून, यामुळे दोन्ही विभागांच्या विकासाला मोठी गती मिळणार असल्याची माहिती आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली आहे.

या संदर्भात आमदार कोरे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन चर्चा केली. या प्रस्तावित कामांना लवकरच मंजुरी देण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले आहे.

प्रस्तावित नवीन घाट रस्ते खालीलप्रमाणे आहेत:

१. पावनखिंड ते देवडे-भोवडे मार्ग: शाहूवाडी तालुक्यातील पावनखिंड-गजापूर-विशाळगड पायथा ते रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवडे-भोवडे यांना जोडणारा नवीन घाट मार्ग तयार करणे.

२. अणुस्कुरा ते भांबेड मार्ग: शाहूवाडी तालुक्यातील अणुस्कुरा-गावडवाडी (कोल्हापूर जिल्हा हद्द) ते रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील भांबेड-धनगरवाडी या दोन जिल्ह्यांना जोडणारा घाट रस्ता बांधणे.

३. वाशी-पडसाळी ते काजिर्डा मार्ग: पन्हाळा तालुक्यातील वाशी-पडसाळी ते रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील काजिर्डा यांना जोडणाऱ्या नवीन घाट रस्त्याचे काम करणे.

या बैठकीप्रसंगी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती. यामध्ये करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रदीप नरके, राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत, तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती सर्जेराव पाटील यांचा प्रामुख्याने समावेश होता. या मान्यवरांसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे विविध वरिष्ठ अधिकारीदेखील या चर्चेत सहभागी झाले होते.

थोडक्यात सांगायचे तर: या तीनही नवीन घाट रस्त्यांच्या कामांमुळे कोल्हापूर आणि कोकणातील अंतर कमी होणार असून, दुर्गम भागातील दळणवळणाची समस्या सुटण्यास मदत होईल. विशेषतः विशाळगड आणि पावनखिंड परिसरातील ऐतिहासिक पर्यटनाला यामुळे मोठी उभारी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


बांदा – सावंतवाडी रेल्वे स्टेशन बस सेवेसाठी धरणे आंदोलन

   Follow us on        

सावंतवाडी: बांदा ते सावंतवाडी रेल्वे स्टेशन दरम्यान नियमित एसटी बस फेऱ्या सुरू कराव्यात, या प्रमुख मागणीसाठी आज  शनिवार, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडी एसटी डेपोसमोर भव्य धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनाला ‘रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी’ यांनी आपला जाहीर पाठिंबा दर्शवला असून, प्रशासनावर दबाव निर्माण करण्यासाठी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकवटणार आहेत.

​हे आंदोलन जिल्हा परिषद सदस्य श्री. नितीन सावंत आणि पंचायत समिती सदस्य श्री. सदाशिव राणे यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे. बांदा, निगुडे, शेर्ले, इन्सुली, कास, वाफोली, डेगवे, विलवडे, निरवडे, रोणापाल, मडुरा, सोनुर्ली, मळगांव आणि वेत्ये या गावांतील सरपंच, माजी सरपंच, ग्रामस्थ, युवक मंडळे, महिला मंडळे, प्रवासी आणि सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

​बऱ्याच काळापासून बांदा परिसरातील प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी हक्काची बस सेवा उपलब्ध नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. प्रवाशांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून, यामुळे आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वारंवार मागणी करूनही एसटी प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले आहे. जोपर्यंत एसटी प्रशासनाकडून ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.

सिंधुदुर्ग: जिल्हाधिकाऱ्यांकडून २०२६ वर्षातील ३ स्थानिक सुट्ट्या जाहीर

   Follow us on        

सिंधुदुर्ग: जिल्ह्यात सन २०२६ साठी तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी महसूल विभागाच्या नियमांनुसार अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. ही अधिसूचना दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी काढण्यात आली असून, ती जिल्ह्यातील शासकीय कार्यालये, महसूल विभाग आणि संबंधित यंत्रणांना लागू राहणार आहे.

या अधिसूचनेनुसार, खालीलप्रमाणे स्थानिक सुट्ट्या जाहीर झाल्या आहेत:

१७ ऑगस्ट २०२६ (सोमवार) – नागपंचमी

१८ सप्टेंबर २०२६ (शुक्रवार) – उज्वळी पौर्णिमा (उज्वळी पौर्णिमा / उज्वळी पौर्णिमा पूजन)

६ नोव्हेंबर २०२६ (शुक्रवार) – धनत्रयोदशी (धनत्रयोदशी / धनत्रयोधशी ज्योतिषी)

या सुट्ट्या जिल्ह्यातील महसूल हद्दीतील शासकीय कार्यालयांसाठी लागू असून, स्थानिक परंपरा आणि सणांचा विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी ही घोषणा केली आहे. अधिसूचना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर (sindhudurg.nic.in) उपलब्ध आहे.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी डिजिटल स्वाक्षरी करून ही अधिसूचना प्रसिद्ध केली असून, ती मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मुंबई यांच्यापर्यंत विविध अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांनी या सुट्ट्यांचा लाभ घेऊन सण उत्साहाने साजरा करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दोडामार्ग आणि सावंतवाडीतील २५ गावांना ‘इको सेन्सिटिव्ह झोन’चा दर्जा; खाणकाम आणि प्रदूषणकारी प्रकल्पांवर बंदी

   Follow us on        

सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील २५ गावांसाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने या गावांना ‘इको सेन्सिटिव्ह झोन’ (ESZ) म्हणून जाहीर करणारी अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली असून, यामुळे या भागात प्रस्तावित असलेल्या खाणकामांना आणि पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या मोठ्या प्रकल्पांना आता अधिकृतपणे चाप बसणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रिया राबवण्यात आली असून, मंगळवारी केंद्र सरकारने यावर अंतिम शिक्कामोर्तब केले. विशेष म्हणजे, २०१० सालापासून ‘वनशक्ती’ या संस्थेच्या माध्यमातून स्टॅलिन दयानंद यांनी हा न्यायालयीन लढा यशस्वीपणे सुरू ठेवला होता.

या नव्या अधिसूचनेमुळे आता संबंधित गावांमध्ये खाणकाम, ‘लाल श्रेणी’तील प्रदूषणकारी उद्योग आणि वनसंपदेला धोका निर्माण करणाऱ्या प्रकल्पांवर पूर्णपणे बंदी असेल. या निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष असतील, तर उपवनसंरक्षक हे सचिव म्हणून काम पाहतील. ही समिती वर्षभराच्या आत स्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या पर्यावरणपूरक निर्णयामध्ये केसरी, फणसवडे, उडेली, दाभील-नेवली, सरमळे, ओटवणे, घारपी, असनिये, फुकेरी, तांबोळी, कोनशी, भालावल, भेकुर्ली, कुंभवडे, खडपडे, तळकट, झोळंबे, कोलझर, शिरवल, कुंभरल, पणतूर्ली, उगाडे, भिकेकोनाळ, कळणे आणि पडवे माजगाव या २५ गावांचा समावेश आहे.

विशेष गाडीचा सावंतवाडी स्थानकावरील थांबा हटवला; प्रवाशांमध्ये नाराजी

   Follow us on        

सावंतवाडी: कोकण रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या वतीने आगामी काळात चालवण्यात येणाऱ्या अहमदाबाद-मंगळुरू विशेष गाडीच्या (०९४२४/०९४२३) थांब्यांच्या यादीतून सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकाचा थांबा वगळण्यात आल्याने स्थानिक प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. यापूर्वी या गाडीला सावंतवाडी येथे थांबा दिला जात होता, मात्र २७ फेब्रुवारी ते २१ मार्च २०२६ या कालावधीत धावणाऱ्या विशेष फेऱ्यांसाठी प्रशासनाने जाणीवपूर्वक हा थांबा काढून घेतल्याचा आरोप केला जात आहे.

कुठल्याच लॉजिक मध्ये बसत नाही 

या गाडीला यापुर्वी असलेले जवळ जवळ सर्वच थांबे तसेच ठेवून सावंतवाडीचा थांबा काढण्यात आला आहे. कमी प्रवासी संख्या असलेल्या थांब्याना हात न लावता चांगली प्रवासीसंख्या footfall असलेल्या स्थानकाचा थांबा काढला हे कोणत्याही लॉजिक मध्ये बसत नाही.

जाणीवपूर्वक हा थांबा काढून घेतल्याचा आरोप

कोकण रेल्वेच्या महाराष्ट्र हद्दीतील स्थानकांमध्ये उत्पन्नाच्या बाबतीत ५ व्या स्थानावर असलेल्या सावंतवाडी स्थानकाचे या वर्षीचे उत्पन्न सुमारे १८ कोटी रुपये आहे. पुढील वर्षात हा आकडा २० कोटींच्या पार जाण्याची शक्यता असून, तसे झाल्यास स्थानकाला NSG-3 ही उच्च श्रेणी प्राप्त होईल. मात्र, ही श्रेणी मिळू नये आणि स्थानकाचा विकास होऊ नये, यासाठीच राजधानी, गरीब रथ आणि मंगळुरू स्पेशल सारख्या महत्त्वाच्या  गाड्यांचे थांबे जाणून बुजून नाकारले जात असल्याचे बोलले जात आहे.

कोकण रेल्वे प्रवासी संघटना (सावंतवाडी)ने याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ​रेल्वे प्रशासनाच्या या भूमिकेमुळे सावंतवाडीच्या महत्त्वावर घाला घातला जात आहे. कोकण रेल्वे (KR) प्रशासनाकडून होणारा हा अन्याय थांबवून तात्काळ सावंतवाडी येथे थांबा बहाल करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.

उत्पन्न असूनही सुविधांपासून वंचित ठेवण्याच्या या धोरणामुळे पर्यटनावर आधारित असलेल्या या भागातील अर्थव्यवस्थेलाही फटका बसू शकतो अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

ताजा कलम:

आज दुपारपर्यंत या गाडीला सावंतवाडी थांबा देण्यात आला नव्हता. ही बाब निदर्शनास येताच ‘अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, महाराष्ट्र’चे सचिव श्री. अक्षय महापदी, श्री. मंदार सहस्त्रबुद्धे व त्यांच्या सहकाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाकडे तातडीने पाठपुरावा केला. त्याचप्रमाणे संगमेश्वरचे श्री. संदेश जिमन यांनी कोकण रेल्वेचे CPRO श्री. नारकर यांच्याशी संपर्क साधून या त्रुटीकडे लक्ष वेधले. कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी ने आपले पर्यन्त चालू ठेवले. या प्रयत्नांना परखड कोकणाई डिजिटल चॅनलच्या लेखणीची जोड मिळाली. प्रवासी संघटना आणि जागरूक नागरिकांच्या या संघटित प्रयत्नांना यश आले. दुपारी कोकण रेल्वे प्रशासनाची तातडीची बैठक पार पडली आणि अखेर सावंतवाडीला हा अधिकृत थांबा मंजूर करण्यात आला.

 

सिंधुदुर्गच्या समुद्रकिनाऱ्यांवर आता सीसीटीव्हीची नजर!

   Follow us on        

मुंबई, २५ फेब्रुवारी २०२६: महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाच्या समुद्रकिनारी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या प्रस्तावाला गती देण्यावर भर देण्यात आला.

महाराष्ट्र सागरी मंडळाच्या ८५व्या संचालक मंडळ बैठकीत या प्रकल्पाला तत्त्वतः मान्यता मिळाली आहे. मात्र, प्रशासकीय व तांत्रिक मान्यता प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत सर्व अडथळे दूर करून काम लवकरात लवकर सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

सिंधुदुर्ग हा पर्यटनाचा जिल्हा असून, तारकरली, मालवण, देवगड, विजयदुर्ग, आचरा आदी ठिकाणी दरवर्षी लाखो पर्यटक येतात. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तसेच किनारपट्टीवरील अवैध कृत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरेल, असे मत यावेळी व्यक्त झाले.बैठकीला आयटी विभागाचे वीरेंद्र सिंग, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे), जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे) व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या उपक्रमामुळे सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवरील सुरक्षा अधिक मजबूत होईल आणि पर्यटन क्षेत्राला नवीन चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

 

सिंधुदुर्गातील चार ऐतिहासिक समुद्री किल्ल्यांच्या संशोधनासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर

   Follow us on        

मालवण, १९ फेब्रुवारी २०२६: छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाचे संवर्धन आणि शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकोट आणि सर्जेकोट या चार प्रमुख समुद्री किल्ल्यांच्या सखोल अभ्यास, दस्तावेजीकरण आणि संशोधनासाठी मुंबई विद्यापीठांतर्गत मालवण येथे स्वतंत्र अध्यासन केंद्र (Study Centre) उभारण्यास मंजुरी मिळाली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने या प्रकल्पासाठी ५० लाख रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. हे केंद्र मालवणात स्थापन होणार असून, शिवकालीन व्यापार, आरमार व्यवस्था, या किल्ल्यांच्या रणनीतिक महत्त्व आणि ऐतिहासिक दस्तऐवजांचा वैज्ञानिक अभ्यास होईल. यामुळे युवा संशोधकांना मार्गदर्शन, व्याख्याने, संशोधन प्रकल्प आणि या वारशाचे जागतिक स्तरावर प्रसार होण्यास मदत होईल.

सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या पुढाकाराने आणि प्रस्तावानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी एप्रिल २०२५ मध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याच्या ३५८व्या वर्धापन दिनी या केंद्राची घोषणा करण्यात आली होती. आता निधी मंजुरीमुळे प्रकल्पाला प्रत्यक्ष गती मिळाली आहे.पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी या निर्णयाचे स्वागत करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री आशिष शेलार आणि महायुती सरकारचे आभार मानले आहेत.

या केंद्रामुळे शिवरायांच्या दूरदृष्टी आणि पराक्रमाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचेल आणि सिंधुदुर्गच्या सागरी वारशाला नवे आयाम मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.हे केंद्र केवळ संशोधनापुरते मर्यादित न राहता, स्थानिक इतिहासप्रेमी, विद्यार्थी आणि पर्यटन क्षेत्रालाही फायदेशीर ठरेल.

 

 

सिंधुदुर्ग: गोव्याच्या दिशेने जाणार्‍या ट्रकचा विचित्र अपघात

   Follow us on        

ओटवणे : कोल्हापूरहून बांदा-गोव्याच्या दिशेने लोखंडी प्लेट्स आणि स्टील ट्यूब्स घेऊन जाणारा एक कॅन्टर (MH 09 BA 9279) विलवडे तिठ्यावर पहाटे एका विचित्र अपघाताचा बळी ठरला. रस्त्यावरील मोठी चढण, खड्डे आणि क्षमतेपेक्षा जास्त भरलेला लोखंडी माल यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.

​चढणीवर गाडी आवरताना कॅन्टरची पुढची दोन्ही चाके जमिनीपासून तब्बल १० ते १५ फूट हवेत उडाली. गाडी अशा विचित्र अवस्थेत हवेत लटकलेली पाहून परिसरात खळबळ उडाली. सुदैवाने, मागच्या बाजूला असलेला जड माल जमिनीला टेकल्यामुळे गाडी मागे सरकली नाही किंवा उलटली नाही, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.

​या घटनेत चालक सुखरूप असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेनंतर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती, जी जेसीबीच्या मदतीने पूर्ववत करण्यात आली. स्थानिक नागरिकांनी या धोकादायक चढणीची आणि खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

 

मानवता विकास परिषदेचे अध्यक्ष श्रीकांत उर्फ बाळा सावंत यांचा मालवण – कणकवली ‘विशेष दौरा’ उत्साहात पार

   Follow us on        
सिंधुदुर्ग: मानवता विकास परिषद अध्यक्ष, रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषद अध्यक्ष तथा राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज सेवा समिती कार्यवाह श्रीकांत सावंत यांचा ६ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण- कणकवली दौरा संपन्न झाला. या दरम्यान श्रीकांत सावंत यांनी  मालवण तालुक्यातील मसुरे आंगणेवाडीतल्या आंगणे कुटुंबियांच्या श्री देवी भराडी मातेच्या वार्षिकोत्सवाला भेट दिली. त्यांनी श्री. देवी भराडी मातेचे दर्शन घेतले व उपस्थितांशी भेटी घेत चर्चा केली. श्रीकांत सावंत यांनी या दौर्यात राजकीय नेत्यांच्या, सामाजिक कार्यकर्त्यांच्या भेटी घेत चर्चा केली.
त्यांनी मालवण येथे नगरपरिषद निवडणुकीतील विजयाबद्दल नगरसेवक मंदार केणी यांची भेट घेत अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. वेरली सरपंच धनंजय परब यांचेही त्यांनी अभिनंदन केले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकांमधल्या विजयाबद्दल श्रीकांत सावंत यांनी क्षमा हडकर यांचा शाल देऊन सत्कार केला. यावेळी त्यांच्यासोबत भय्यु प्रभुगावकर व संदीप हडकर उपस्थित होते. ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदी सौ. शर्मिला पिंपळोलकर यांची निवड झाल्याबद्दल देखिल श्रीकांत सावंत यांनी सदिच्छा भेट घेतली. दरम्यान, श्रीकांत सावंत यांनी वरीष्ठ वकिल श्री. समीर गवाणकर व मसुरे येथे डाॅ. अनिरुद्ध मेहेंदळे, हाॅटेल व्यावसायिक संजय गावडे यांचीही सदिच्छा भेट घेतली.
श्रीकांत सावंत यांनी या दौऱ्यातील गाठी भेटी अत्यंत सकारात्मक होत्या असे सांगितले आणि समाजाला  मानवता, धर्म आणि राष्ट्र यांच्या प्रती जागृतीसाठी राष्ट्रसंत परमपूज्य पाचलेगांवकर महाराजांना अभिप्रेत कार्य करत रहायचा आग्रह सुरू ठेवायचे आवाहन केले. यावेळी श्रीकांत सावंत यांनी भेट घेतलेल्या विविध मान्यवरांना राष्ट्रसंत पाचलेगांवकर महाराजांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त त्यांना समर्पित तसेच श्रीकांत सावंत मुख्य संपादक असलेला संचारेश्वर विशेषांक सदिच्छा भेट स्वरुपात दिला.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search