



Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा खूप चांगला प्रतिसाद लाभत आहे. सद्यस्थितीत सुपरफास्ट एक्सप्रेस ८ डब्यांची धावत आहे. मात्र हे डबे अपुरे पडत आहेत. त्यात पावसाळ्यात या गाडीच्या फेऱ्यांत कपात केली जात असल्याने प्रचंड मागणी असूनही या गाडीची सेवा अपुरी पडत आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेत एक्सप्रेस १६ किंवा २० डब्यांची चालवावी अशा मागणीचे निवेदन कोकण विकास समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष जयवंत दरेकर यांनी रेल्वे बोर्डाला दिले आहे.
जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस नांदेडपर्यंत वाढवण्याचा निर्णय मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसशी तिचे एकीकरण करण्याचा निर्णय अलिकडेच रेल्वे बोर्डाने घेतला आहे. या डब्यांची प्राथमिक देखभाल आता नांदेडला हलवण्यात आली आहे. यामुळे मुंबईत पिट लाईन आणि देखभाल स्लॉट उपलब्ध झाला आहे. या पिट लाईन आणि देखभाल स्लॉटचा वापर मुंबई -मडगाव वंदे भारत एक्सप्रेस साठी वापरल्यास ती १६ किंवा २० डब्यांची चालविणे शक्य होणार आहे. कोकण मार्गावरून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसने ९५ टक्के आसन क्षमतेची प्रभावी अंमलबजावणी राखली आहे. यामुळे सध्या धावणारी ८ डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांसाठी आसनांअभावी गैरसोयीची ठरत आहे. यामुळे एक्सप्रेस १६ किंवा २० डब्यांची चालवण्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्याचे आर्जवही करण्यात आले आहे.