



गतवर्षी १२ जून २०२३ रोजी पत्रकार संदेश जिमन आणि वाडी ग्रामस्थ यांनी प्रशासनाला धारेवर धरत मागणी नसताना बांधण्यात आलेल्या मालपवाडी येथील साकवाचा मुद्दा उपस्थित केला. त्या साकवाला दोन्ही बाजूला चढणे उतरणे यासाठी योग्य ती सुविधा नसल्याने उपोषण करणार असे पत्र संदेश जिमन यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला दिले होते.
या पत्राची दखल घेत सरपंच महोदयांनी लेखी पत्र संदेश जिमन यांना दिले. त्या पत्रात स्पष्ट उल्लेख केला असा की “३१ जानेवारी २०२४ पर्यंत साकवाच्या दोन्ही बाजूचे काम पूर्ण केले जाईल.” हे एक वेळकाढू आश्वासन ठरले. अद्याप ते काम पूर्ण न झाल्याने पत्रकार संदेश जिमन यांनी या समस्येकडे आपला मोर्चा पुन्हा वळवला आहे.
दिनांक २० जून २०२४ रोजी ग्रामपंचायत अंत्रवली येथे ग्रामसेवक महोदयांना स्मरणपत्र देऊन संदेश जिमन यांनी चांगली झाडाझडती घेतली. या पत्रात संदेश जिमन यांनी ग्रामपंचायत अंत्रवली च्या कार्यकारी मंडळाला दिलेल्या आश्वासनाकडे डोळे झाक का केली? उपोषणाला विरोध करण्यासाठीच केवळ हा आश्वासनाचा बनाव होता काय?
असे प्रश्न विचारले आहेत.
ग्रामपंचायत कार्यकारी मंडळाने जर कर्तव्यदक्षतेने हा विषय मार्गी लावला असता तर स्थानिक ग्रामस्थांना आणि संदेश जिमन यांना हा खटाटोप करावा लागला नसता. केवळ मोठ्या पदांची लालसा बाळगणे पण प्रत्यक्षात त्या पदांचे महत्त्व ध्यानात न घेता कामात कुचराई करणे हे कितपत योग्य! कोणत्या दबावामुळे हे काम आजवर पुर्ण झाले नाही,याचे उत्तर गुलदस्त्यात आहे.
या गंभीर विषयावर चर्चा करण्यासाठी विशेष ग्रामसभा बोलवावी. प्रश्न निकाली काढावा. जर काहीच शक्य नसेल तर संदेश जिमन यांनी कायदेशीर मार्गाने जाण्यास ग्रामपंचायत कार्यालयाची काही हरकत नसल्याचे लेखी पत्र ग्रामपंचायतीने द्यावे असे पत्रात म्हटले आहे.
या विषयाचे गांभीर्य ध्यानात घेऊन संबंधित विभागाने चौकशी आदेश देऊन सत्यता पडताळणे गरजेचे आहे. दोषींवर कारवाई होणे गरजेचे आहे. लाखोंचा निधी कोणाच्या भल्यासाठी? ठेकेदार आणि त्यांच्या बगलबच्च्यांसाठी की जनसामान्यांच्या हितासाठी? ही अनागोंदी कोणाच्या आशिर्वादाने चालते? याला जबाबदार कोण? कारवाई झाली पाहिजे! ही ग्रामस्थांची मागणी आहे.