



सावंतवाडी, १५ ऑगस्ट:
सावंतवाडीतील युवकांच्या सामाजिक कार्याला राज्यस्तरीय पातळीवर मोठा सन्मान मिळाला आहे. कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीचे उपाध्यक्ष सागर तळवडेकर आणि सचिव मिहिर मठकर यांची ‘राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट समाजरत्न पुरस्कार २०२५’ साठी निवड करण्यात आली आहे. जनजागृती सेवा संस्था (रजि.) यांच्यातर्फे हा प्रतिष्ठित पुरस्कार १६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता कणकवली येथील भवानी सभागृहात आयोजित समारंभात प्रदान करण्यात येणार आहे.
संस्थेने जारी केलेल्या निवडपत्रानुसार, सागर तळवडेकर व मिहिर मठकर यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या कार्याची स्तुती करताना संस्थेने म्हटले आहे की, “त्यांचे सामाजिक योगदान हे भूषणावह आहे व तरुणांसाठी प्रेरणादायक आहे.”
पुरस्कार वितरण समारंभात अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून, संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात हा पुरस्कार एक मानाचा तुरा ठरणार आहे. या निवडीमुळे सावंतवाडी आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्वल झाले असून, स्थानिक पातळीवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ म. तिरपणकर आणि सचिव संचिता भंडारी यांनी श्री. तळवडेकर व श्री. मठकर यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.