लोकल गाड्यांमध्ये होणाऱ्या गर्दीवर उपाय! दोन मेट्रो मार्गांचा अंबरनाथ- बदलापूरपर्यत विस्तार होणार

   Follow us on        

अंबरनाथ: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) ने २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात कल्याण लोकसभा मतदारसंघातील वाहतूक आणि पायाभूत सुविधांसाठी तब्बल ४,८९७.१९ कोटी रुपयांची तरतूद जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सादर झालेल्या या अर्थसंकल्पात मेट्रो मार्ग ५ (ठाणे-भिवंडी-कल्याण) आणि मेट्रो मार्ग १४ (कांजूरमार्ग-बदलापूर) या प्रकल्पांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. या निर्णयामुळे कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरातील लाखो नागरिकांना मुंबईशी थेट, वेगवान आणि आरामदायी कनेक्टिव्हिटी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मेट्रो मार्ग ५ अंतर्गत ठाणे ते भिवंडी ते कल्याण असा २४.९ किमी लांबीचा आणि १५ स्थानकांचा मूळ मार्ग असून, त्याचा विस्तार कल्याणहून दुर्गाडी, उल्हासनगर, अंबरनाथ (मेट्रो ५अ) पर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी मेट्रो ५ साठी १,३०९.३० कोटी रुपये तर मेट्रो ५अ साठी १८३.३५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या विस्तारामुळे अंबरनाथ शहर थेट मेट्रो नेटवर्कशी जोडले जाणार असून, उल्हासनगरमार्गे चिखलोलीपर्यंत कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. परिणामी, लोकल रेल्वेतील प्रचंड गर्दीतून सुटका होऊन नागरिकांना वातानुकूलित मेट्रोमधून सुखकर प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

मेट्रो मार्ग १४ हा कांजूरमार्ग ते बदलापूर दरम्यान सुमारे ३८ ते ४५ किमी लांबीचा प्रस्तावित मार्ग असून तो देशातील सर्वात लांब मेट्रो मार्गांपैकी एक ठरणार आहे. या मार्गावर कांजूरमार्ग, विक्रोळी, शिळफाटा, महापे, घणसोली, ऐरोली, तुर्भे, दिघा, अंबरनाथ आणि बदलापूर अशी महत्त्वाची स्थानके असणार आहेत. या प्रकल्पासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. काटई नाका ते बदलापूरपर्यंतचे काम प्राधान्याने हाती घेतले जाणार असून, या मार्गामुळे बदलापूर आणि अंबरनाथला मुंबईच्या पूर्व उपनगरांशी थेट जोडणी मिळेल. सध्या रस्त्याने १.५ ते २ तास लागणारा प्रवास केवळ ४० ते ४५ मिनिटांत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

या दोन्ही प्रकल्पांमुळे कर्जत-कसारा लोकलमधील गर्दी आणि रस्त्यावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. प्रवास वेळेत ३० ते ४० टक्क्यांनी घट होऊ शकते. मध्यमवर्गीय चाकरमान्यांसाठी हा मोठा दिलासा ठरणार असून, रोजच्या प्रवासासाठी एसी मेट्रोचा पर्याय उपलब्ध होणार आहे. तसेच बदलापूरच्या निसर्गरम्य परिसरात आणि अंबरनाथच्या औद्योगिक वसाहतीत गुंतवणूक वाढून रिअल इस्टेट आणि स्थानिक उद्योगांना चालना मिळेल.

हे सर्व प्रकल्प २०३० पर्यंत पूर्णत्वास जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. राज्य सरकार आणि MMRDA च्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे कल्याण-डोंबिवली-अंबरनाथ-बदलापूर पट्ट्यातील विकासाला नवी गती मिळणार असून, मुंबई महानगर प्रदेश अधिक सुसंगत, आधुनिक आणि वेगवान होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search