मुंबई: मुंबई लोकलमध्ये होणारी गर्दी आणि दरवाज्यात उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता, मध्य रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एसी लोकलप्रमाणेच आता स्वयंचलित बंद दरवाजे असलेली नॉन-एसी लोकल लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. गेल्या वर्षी मुंब्रा स्थानकाजवळ लोकलमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला होता, या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा नवा उपाय शोधण्यात आला आहे.
मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली स्वयंचलित दरवाजांची नॉन-एसी लोकल फेब्रुवारी अखेरीस चेन्नईच्या आयसीएफ (ICF) मधून मुंबईत दाखल होईल, तर दुसरी गाडी मार्च महिन्यात येण्याची शक्यता आहे. या गाड्यांची चाचणी यापूर्वीच कुर्ला कारशेडमध्ये यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून, सुरुवातीला या लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते कल्याण दरम्यान चालवल्या जाऊ शकतात.
या निर्णयाचे स्वागत होत असले तरी, तज्ज्ञांनी काही महत्त्वाचे धोकेही वर्तवले आहेत. वाहतूक तज्ज्ञ विवेक पै यांच्या मते, दरवाजे बंद असल्यामुळे प्रवासी फुटबोर्डवर उभे राहू शकणार नाहीत, ज्यामुळे अपघाती मृत्यू नक्कीच कमी होतील; मात्र मुंबईतील प्रचंड गर्दी पाहता डब्यांमध्ये हवा खेळती राहणे आवश्यक आहे. जर डब्यांमध्ये योग्य व्हेंटिलेशन किंवा हवा खेळती राहण्याची व्यवस्था नसेल, तर प्रवाशांना गुदमरल्यासारखे वाटू शकते. तसेच, जर तांत्रिक कारणामुळे दरवाजे बंद झाले नाहीत, तर रेल्वेचे संपूर्ण वेळापत्रक कोलमडण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे ही सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यापूर्वी रेल्वे प्रशासनाने सर्व तांत्रिक बाजू आणि प्रवाशांची सोय विचारात घेणे गरजेचे आहे.


