मुंबई, २५ फेब्रुवारी २०२६: महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाच्या समुद्रकिनारी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या प्रस्तावाला गती देण्यावर भर देण्यात आला.
महाराष्ट्र सागरी मंडळाच्या ८५व्या संचालक मंडळ बैठकीत या प्रकल्पाला तत्त्वतः मान्यता मिळाली आहे. मात्र, प्रशासकीय व तांत्रिक मान्यता प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत सर्व अडथळे दूर करून काम लवकरात लवकर सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
सिंधुदुर्ग हा पर्यटनाचा जिल्हा असून, तारकरली, मालवण, देवगड, विजयदुर्ग, आचरा आदी ठिकाणी दरवर्षी लाखो पर्यटक येतात. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तसेच किनारपट्टीवरील अवैध कृत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरेल, असे मत यावेळी व्यक्त झाले.बैठकीला आयटी विभागाचे वीरेंद्र सिंग, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे), जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे) व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवरील सुरक्षा अधिक मजबूत होईल आणि पर्यटन क्षेत्राला नवीन चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


