मुंबई, दि. २५: मुंबई आणि कोकणाला जलमार्गाने जोडण्याच्या उद्देशाने रो-रो (Roll-on/Roll-off) जलवाहतूक सेवा सुरू करण्याची संकल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असून, या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी १ मार्चपासून सुरू होणार आहे. भाऊचा धक्का (मुंबई) ते विजयदुर्ग हा पहिला टप्पा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मत्स्य व बंदरे विकास मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी विधिमंडळातील पत्रकार परिषदेत दिली.
मंत्री राणे म्हणाले की, मुंबई–विजयदुर्ग हा पहिला जलमार्ग असला तरी येत्या काळात मुंबई–रत्नागिरी, मुंबई–महाड आदी विविध मार्गांवरही रो-रो सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. या बोट सेवेची सविस्तर माहिती आणि तिकीट दर अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून तिकीट बुकिंगला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
कोकणात लवकरच शिमगोत्सव सुरू होत असल्याने सिंधुदुर्गसह कोकणातील नागरिकांकडून या सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. या उपक्रमामुळे मुंबई–कोकण जोडणी मजबूत होण्याबरोबरच पर्यटन, रोजगार आणि कृषी क्षेत्राला चालना मिळणार आहे.
जलमार्गामुळे साडेचार ते पाच तासांत कोकणात पोहोचता येणार असून प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचेल. तसेच आंबा, काजू आणि मच्छीमारी व्यवसायालाही मोठा फायदा होणार आहे. सुरक्षिततेच्या सर्व परवानग्या मिळाल्यानंतर आवश्यक चाचण्या पूर्ण करूनच सेवा सुरू केली जात असून, १ मार्चपासून प्रवासी प्रवास करू शकतील. समुद्र प्रवासादरम्यान अस्वस्थता जाणवणाऱ्या प्रवाशांसाठी बोटीवर डॉक्टरांचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.
पर्यावरणपूरक विकास हा राज्य सरकारचा मुख्य उद्देश असून जलवाहतुकीच्या माध्यमातून शाश्वत प्रगती साधण्याचा प्रयत्न असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले.
मुंबई-कोंकण रो-रो सर्विस 1 मार्च से शुरू होगी!
📍२५-०२-२०२६ | विधान भवन, मुंबई pic.twitter.com/jAuYKPQ9ry
— Nitesh Rane (@NiteshNRane) February 25, 2026


