शेकडो ‘रिकाम्या सीटस’ घेऊन धावणाऱ्या समर स्पेशल गाडीला संगमेश्वरला थांबा देण्याची मागणी

   Follow us on        

संगमेश्वर: कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या थिरुवनंतपुरम सेंट्रल – मदार जंक्शन – थिरुवनंतपुरम सेंट्रल (०६०१३ / ०६०१४) या समर स्पेशल गाड्यांना संगमेश्वर रोड स्थानकावर थांबा देण्यात आलेला नाही. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे स्थानिक प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, कोकण रेल्वेच्या दुजाभावाच्या धोरणाविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे या गाड्यांना माणगाव, रोहा आणि मडगाव यांसारख्या स्थानकांवर थांबे दिलेले असताना संगमेश्वरला डावलण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

​संगमेश्वर रेल्वे स्थानक हे कोकणातील एक महत्त्वाचे व्यापारी आणि प्रवासी केंद्र आहे. वार्षिक सुमारे सहा कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या या स्थानकावरून दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. इतके मोठे उत्पन्न आणि प्रवाशांची संख्या असूनही, महत्त्वाच्या स्पेशल गाड्यांना येथे थांबा न देणे हे स्थानिकांच्या हिताकडे दुर्लक्ष करणारे असल्याचे बोलले जात आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे संगमेश्वर परिसरातील चाकरमानी आणि पर्यटकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

​एकीकडे या समर स्पेशल गाड्यांमधील शेकडो जागा रिक्त असल्याचे निदर्शनास येत आहे, तर दुसरीकडे संगमेश्वरच्या प्रवाशांना प्रवासासाठी संघर्ष करावा लागत आहे. जर या गाड्यांना संगमेश्वर येथे थांबा दिला, तर प्रवाशांची सोय होण्यासोबतच रेल्वेच्या उत्पन्नातही मोठी भर पडू शकते. रिकाम्या धावणाऱ्या गाड्यांमुळे रेल्वेचे आर्थिक नुकसान होत असतानाही थांबा का दिला जात नाही, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

​या गंभीर समस्येची दखल घेत ‘निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर’ या फेसबुक ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन यांनी कोकण रेल्वे प्रशासनाला अधिकृत पत्र पाठवून या गाड्यांना तात्काळ थांबा देण्याची मागणी केली आहे. स्थानिक नागरिकांनीही या मागणीला जोरदार पाठिंबा दिला असून, जर रेल्वे प्रशासनाने लवकरच सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर आंदोलनाचा पवित्रा घेण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search