Category Archives: सिंधुदुर्ग

सावंतवाडी: रात्रीच्या थरारक मोहिमेत ७ फूटी मगरीला जेरबंद

   Follow us on        

सावंतवाडी:झाराप-कामळेवीर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करणारी तब्बल सहा ते सात फूट लांबीची मगर अखेर “वाइल्ड लाइफ रेस्क्यूअर सिंधुदुर्ग” संस्थेच्या धाडसी टीमने मध्यरात्रीच्या थरारक मोहिमेत पकडून वनविभागाच्या ताब्यात दिली आहे. ही घटना नितीन मांजरेकर यांच्या घराजवळ घडली असून, रात्री सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास मगर दिसल्याने संपूर्ण परिसरात मोठी धावपळ उडाली होती.

​मगरीच्या हालचालींची माहिती मिळताच “वाइल्ड लाइफ रेस्क्यूअर सिंधुदुर्ग” संस्थेची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. ग्रामस्थांच्या मदतीने अत्यंत सावधगिरीने आणि शिताफीने रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले. अखेर काही तासांच्या प्रयत्नांनंतर मगरीला सुरक्षितरित्या पकडण्यात यश आले. ही मोहीम सावंतवाडीचे ACF वैभव बोराटे तसेच मठ वनपरिक्षेत्र अधिकारी सावळा कामळी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पकडलेली मगर पुढील कार्यवाहीसाठी आकेरी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे.

​रेस्क्यू टीम आणि ग्रामस्थांचे सहकार्य

​या धाडसी मोहिमेत संस्थेचे अध्यक्ष विष्णू मस्के, डॉ. प्रसाद धुमकर, दीपक दुतोडकर, सिद्धेश ठाकूर, प्रसन्न गंगावणे आणि मंदार गावडे यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच नितीन मांजरेकर, शिरिधर मांजरेकर, केशव होडावडेकर, संतोष पेडणेकर, शुभम पेडणेकर, प्रमोद सावळ आदि ग्रामस्थांनीही मोलाची मदत केली. या संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनची परिसरात मोठी चर्चा सुरू असून, नागरिकांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले आहे.

​नागरिकांना आवाहन:

दरम्यान, संस्थेचे अध्यक्ष विष्णू मस्के यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “मगर किंवा अन्य वन्यजीव परिसरात आढळल्यास घाबरून न जाता स्वतःहून कोणतीही धोकादायक कृती करू नये. तात्काळ संस्थेच्या हेल्पलाईन क्रमांक 9545436244 किंवा वनविभागाच्या 1926 या क्रमांकावर संपर्क साधावा.”

वेंगुर्ले: शिरोडा समुद्रात नौका उलटली; दोघांना वाचविण्यात यश, एकाचा शोध सुरू

   Follow us on        

वेंगुर्ले: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला जवळील शिरोडा समुद्रात आज २४ मे २०२६ रोजी सकाळी अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्या आणि पावसामुळे एक मासेमारी नौका उलटली. या दुर्घटनेत नौकेवरील तीन मच्छिमार समुद्रात पडले. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत दोघांना वाचवले, तर शिरोडा केरवाडी येथील राजन सारंग यांचा अद्याप शोध सुरू आहे.

दुर्घटना घडल्यानंतर स्थानिक मच्छिमार आणि बचाव पथकांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली आहे. समुद्रात अजूनही खवळलेले पाणी आणि वादळी स्थिती असल्याने शोधकार्य आव्हानात्मक बनले आहे. प्रशासनाने देखील मदत कार्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या प्रकारची घटना सिंधुदर्ग किनारपट्टीवर अधूनमधून घडत असल्याने छोट्या नौकांमधून मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांनी हवामान पूर्वसूचना लक्षात घेऊन समुद्रात जाण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे. राजन सारंग यांचा शोध लवकरात लवकर लागावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Photo Credit – Google

मुंबई गोवा महामार्गावर आंबे विक्रेत्यांकडून ग्राहकांची फसवणूक

   Follow us on        

सिंधुदुर्ग: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या पर्यटकांची आणि ग्राहकांची ‘देवगड हापूस’च्या नावाखाली होणारी मोठी फसवणूक उघडकीस आली आहे. कणकवली तालुक्यातील ओसरगाव टोलनाक्याजवळ काही विक्रेते महामार्गाच्या कडेला स्टॉल लावून कर्नाटकवरून आणलेला आंबा अस्सल देवगड हापूस सांगून विकत होते. विशेष म्हणजे ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी देवगड हापूसचे ब्रँडिंग असलेल्या पेट्यांचा वापर केला जात होता. मात्र, शनिवार २३ मे रोजी संध्याकाळच्या सुमारास स्थानिक आंबा बागायतदार आणि जागरूक नागरिकांनी या स्टॉलवर अचानक धाड टाकत या काळ्या धंद्याचा पर्दाफाश केला.

​संशयावरून नागरिकांनी जेव्हा आंब्याच्या बॉक्सची बारकाईने पाहणी केली, तेव्हा त्यामध्ये खाली कर्नाटक (कन्नड) भाषेतील वृत्तपत्रांचे रद्दी कागद अंथरल्याचे उघड झाले. तसेच त्यातील आंबे हे हापूस नसून परराज्यातील असल्याचे स्पष्ट झाले. या लबाडीमुळे संतापलेल्या स्थानिक नागरिकांनी संबंधित विक्रेत्याला चांगलाच जाब विचारला. हा राडा पाहून महामार्गावरील इतर स्टॉलधारकांनीही कारवाईच्या भीतीने आपले आंबे घाईघाईने टेम्पोमध्ये भरून तिथून पळ काढला.

​सध्या कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी आधीच विविध नैसर्गिक व आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. त्यातच अशा प्रकारे परराज्यातील स्वस्त आंबे देवगडच्या नावावर खपवले जात असल्याच्या तक्रारी देवगड आंबा-काजू बागायतदार संघटनेकडे सातत्याने येत होत्या. या बनावटगिरीमुळे मूळ देवगड हापूसच्या बाजारपेठेचे आणि नावाचे मोठे नुकसान होत असून, स्थानिक शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसत असल्याची चिंता यावेळी बागायतदारांनी व्यक्त केली.

Photo Credit – Google

Mumbai Goa Highway: महामार्गावरील प्रवास महागणार!

   Follow us on        

रायगड: गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुंबई-गोवा ४ पदरी राष्ट्रीय महामार्गाचे काम अद्यापही अपूर्णच आहे. असे असतानाच या महामार्गावर टोलवसुली सुरू करण्यात आल्यामुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येत्या जून महिन्यापर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती दिली असली, तरी प्रत्यक्षात नागोठाणे आणि कोलाड येथील उड्डाणपूल, सुकेली घाट, माणगाव आणि इंदापूर जवळील रस्त्यांची कामे अद्यापही अपूर्ण आहेत. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दररोज भीषण वाहतूक कोंडी आणि धुळीचा सामना करावा लागत आहे. या दुरवस्थेमुळे आणि रखडलेल्या कामांमुळे नागरिकांमध्ये आधीच तीव्र असंतोष आहे.

​तीन ठिकाणी टोलनाक्यांचे नियोजन आणि स्थानिक विरोध

​अपूर्ण कामांच्या पार्श्वभूमीवर, रायगड जिल्ह्यात खारपाडा, खांब आणि पोलादपूरजवळील लोहारे अशा तीन ठिकाणी टोलवसुली करण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यापैकी खारपाडा येथे प्रत्यक्ष टोलवसुली सुरू झाली असून, या टोलनाक्याचे कंत्राट तीन महिन्यांचे आहे. नागरिकांकडून याला मोठ्या प्रमाणावर विरोध होत असतानाच, खांब येथेही टोलनाका उभारण्यात आला आहे. खारपाडा येथील टोलनाक्यावरून मिळणाऱ्या प्रतिसादाचा अंदाज घेऊन खांब येथे टोलवसुली सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे आणि त्यानंतर लोहारे येथेही टोलनाका सुरू केला जाईल. या लागोपाठच्या टोलनाक्यांमुळे मुंबई-गोवा प्रवास अधिक खर्चिक होणार असून, याचा थेट परिणाम सर्वसामान्य कोकणवासीयांसह वाहतूक क्षेत्रावर होणार आहे. वाहतूक खर्च वाढल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंबरोबरच बाजारपेठेतील इतर वस्तूही महागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

​लोकप्रतिनिधींचे मौन ​आंदोलनाचा इशारा

​खारपाडा टोल सुरू झाल्यावर स्थानिक नागरिकांना यातून वगळण्यात येईल, असे तोंडी सांगण्यात आले असले तरी सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे, सत्ताधारी घटक पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी या संवेदनशील विषयावर पूर्णपणे मौन बाळगल्याने त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. पूर्वी खारघर टोलनाक्याविरुद्ध जशी ठोस आणि आक्रमक भूमिका घेण्यात आली होती, तशी भूमिका या टोलबाबत घेतली जात नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. दरम्यान, जोपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होऊन त्याचे अधिकृत उद्घाटन होत नाही, तोपर्यंत खारपाडा येथील टोलवसुली तात्काळ थांबवावी, अशी मागणी रायगड प्रेस क्लबने केली आहे. तसेच, या अन्यायाविरोधात २१ मे रोजी खारपाडा टोलनाक्यावर ‘ठिय्या आंदोलन’ करण्याचा इशाराही रायगड प्रेस क्लबने प्रशासनाला दिला आहे.

सावंतवाडी: दिव्याखालीच अंधार! पंचायत समितीच्या बैठकीत अधिकारीच मोबाईलवर मटका चार्ट पाहण्यात व्यस्त; व्हिडिओ व्हायरल

   Follow us on        

सावंतवाडी:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. जनसामान्यांच्या समस्या आणि सार्वजनिक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या एका महत्त्वाच्या सरकारी बैठकीत, जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी एक जबाबदार अधिकारी आपल्या मोबाईलवर मटका जुगाराचे चार्ट पाहण्यात मग्न असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा एक ३५ सेकंदांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, यामुळे शासकीय वर्तुळात आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

​या व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, व्यासपीठावर इतर वरिष्ठ अधिकारी गंभीर मुद्द्यांवर चर्चा करत असताना, हा अधिकारी मात्र कोणाचीही भीती न बाळगता आपल्या स्मार्टफोनवर ‘कल्याण मॉर्निंग’ आणि ‘मुंबई रॉयल नाईट’ सारख्या नामांकित मटका मार्केटचे रिझल्ट्स आणि चार्ट्स स्क्रोल करत आहे. शासकीय बैठकीचे गांभीर्य बाजूला ठेवून, कर्तव्यावर असताना जुगाराच्या आकड्यांमध्ये गुंग राहण्याच्या या प्रकारामुळे प्रशासकीय अनास्था आणि बेजबाबदारपणा चव्हाट्यावर आला आहे. मटका जुगार हा कायद्याने पूर्णपणे प्रतिबंधित असतानाही, एका बड्या शासकीय अधिकाऱ्याकडूनच असे कृत्य केले जात असल्याने कायद्याच्या अंमलबजावणीवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या लाजिरवाण्या प्रकारानंतर संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे, मात्र या संपूर्ण प्रकरणावर प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५३ पूरबाधित आणि ११० दरडप्रवण गावे; आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज

   Follow us on        

कणकवली:यंदाच्या पावसाळ्यात संभाव्य आपत्ती निवारणासाठी सिंधुदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ, दरड कोसळणे, वीज पडणे आणि आग यांसारख्या संभाव्य धोक्यांच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत-परूळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाळ्यातील संभाव्य आपत्तींचा सामना करण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींसह सर्व विभागांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक विभाग, तालुकास्तर आणि ग्रामपातळीवर आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्यात आले असून जिल्ह्यातील एकूण ८९९ इतके मनुष्यबळ तैनात ठेवण्यात आले आहे.

​सिंधुदुर्ग जिल्ह्यात १४ वर्षांचे सरासरी पर्जन्यमान ३,४६८.३८ मी.मी. असून दरवर्षी पावसाळ्यात येथील नागरिकांना विविध नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. यंदा जिल्ह्यात एकूण ५३ पूरबाधित गावे निश्चित करण्यात आली आहेत, ज्यामध्ये दोडामार्ग-११, वेंगुर्ले-६, सावंतवाडी-९, कुडाळ-५, मालवण-६, देवगड-४, कणकवली-६ आणि वैभववाडी-६ अशी गावे समाविष्ट आहेत. तसेच ११० गावे दरडप्रवण (दरड कोसळण्याची शक्यता असलेली) म्हणून घोषित करण्यात आली असून, यात दोडामार्ग १३, सावंतवाडी-१५, वेंगुर्ले-१२, मालवण-९, कणकवली-१३, देवगड-१७ आणि वैभववाडी-१२ गावांचा समावेश आहे. या सर्व गावांना आधीच सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

​या आपत्ती व्यवस्थापनासाठी ८९९ प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध असून, त्यात एनडीआरएफ पथक-२० (१ जुलै ते ३० सप्टेंबर), आपदा मित्र-२००, युवा आपदा मित्र-६६, गृहरक्षक-१३९, नागरी संरक्षण स्वयंसेवक-४३४ आणि विविध स्थानिक रेस्क्यू ग्रुप जसे की आंबोली व सांगेली रेस्क्यू ग्रुप-२०, सह्याद्री जीव रक्षक करूळ-२० आणि जय बालाजी रेस्क्यू ग्रुप मालवण-१० यांचा समावेश आहे. याशिवाय, जिल्हा प्रशासनाने बचावासाठी १०१८ लाईफ जॅकेट्स, ६१३ लाईफ बोया, ३७ बोट, १३ रोबोटिक वॉटरक्राफ्ट, १२६ स्ट्रेचर, ८७ सेफ्टी रोप्स, १३ टेंट, १५ सॅटेलाईट फोन आणि ६८ वॉकी टॉकी अशी अत्याधुनिक उपकरणे देखील सज्ज ठेवली आहेत.

‘आयएनएस गुलदार’ अरबी समुद्रात विसावली; सिंधुदुर्गात साकारणार देशातील पहिले पाण्याखालील संग्रहालय आणि पर्यटन केंद्र

   Follow us on        

सिंधुदुर्ग:भारतीय नौदला सेवेतून निवृत्त झालेली ‘आयएनएस गुलदार’ (INS Guldar) ही युद्धनौका महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विकास महामंडळाने (MTDC) सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील निवती रॉक जवळ यशस्वीरित्या समुद्रात बुडवली आहे. सुमारे २० ते २२ मीटर खोल समुद्राच्या तळाशी ही नौका आता विसावली असून, याद्वारे भारतात पहिल्यांदाच पाण्याखालील युद्धनौका संग्रहालय, कृत्रिम प्रवाळ (Artificial Coral Reef) आणि पाणबुडी (Submarine) पर्यटनाचा अनोखा प्रकल्प साकारला जात आहे. १९ मे रोजी विजयदुर्गजवळ अत्यंत काळजीपूर्वक आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली तब्बल ३६ तासांच्या अथक परिश्रमानंतर ही मोहीम फत्ते करण्यात आली. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे नौदल वारशाचे जतन करत सागरी पर्यटनाला चालना देणारा हा केवळ भारतातीलच नव्हे, तर संपूर्ण आशियातील पहिलाच अभिनव उपक्रम ठरला आहे.

​जवळपास चार दशके भारतीय नौदलात शौर्य गाजवणारी कुंभीर-श्रेणीतील ही लँडिंग शिप १२ जानेवारी २०२४ रोजी सेवेतून निवृत्त झाली होती. त्यानंतर फेब्रुवारी २०२५ मध्ये नौदलाने ही नौका महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे विनामूल्य सुपूर्द केली. नौका समुद्रात विलीन करण्यापूर्वी तिची पूर्णपणे स्वच्छता करण्यात आली आणि सागरी पर्यावरणाला तसेच जलचरांना कोणताही धोका पोहोचू नये म्हणून त्यातील सर्व घातक व रासायनिक पदार्थ काढून टाकण्यात आले. मुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या सहकार्याने MTDC चे व्यवस्थापकीय संचालक निलेश गथाणे आणि त्यांची टीम या प्रकल्पावर काम करत आहे.

​हा प्रकल्प पुढील दीड वर्षात पर्यटकांसाठी पूर्णपणे खुला होण्याची शक्यता आहे. एकदा हा प्रकल्प सुरू झाला की, पर्यटकांना ‘पॅडी’ (PADI) प्रमाणित डायव्हर्सच्या मार्गदर्शनाखाली समुद्रात स्कुबा डायव्हिंग करून या खऱ्याखुऱ्या युद्धनौकेचा थरार जवळून अनुभवता येईल. तसेच ज्यांना पाण्यात उतरणे शक्य नाही, त्यांच्यासाठी विशेष पाणबुडी (Submarine) पर्यटनाची सोय केली जाणार आहे, जेणेकरून सुरक्षितपणे या ऐतिहासिक नौकेचे दर्शन घेता येईल. या जहाजाच्या अवशेषांवर हळूहळू वनस्पती, मासे आणि प्रवाळांची वाढ होऊन त्याचे रूपांतर एका मोठ्या कृत्रिम बेटासारख्या परिसंस्थेत होईल, ज्यामुळे सागरी जीवनाला मोठा फायदा होईल. या ऐतिहासिक आणि साहसी प्रकल्पामुळे कोकण किनारपट्टीवरील पर्यटनाला मोठी गती मिळणार असून, स्थानिक कोळी बांधव आणि तरुणांसाठी रोजगाराच्या अनेक नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

🌏 आपली जाहिरात लाखो वाचकापर्यंत पोहोचवा. जाहिरातीचा स्लॉट बूक करण्यासाठी संपर्क – 9356968462

“जीव गेला तरी जमीन विकणार नाही” शिरशिंगेवासीयांनी जमीन मोजणी हाणून पाडली

   Follow us on        

सावंतवाडी:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील, कोकणाचे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरशिंगे गावात सामूहिक जमिनी हडप करण्याचा बाहेरच्या धनदांडग्यांचा कुटील डाव ग्रामस्थांनी एकजुटीने हाणून पाडला आहे. गावातील श्रीदेवी पाहुणाई रवळनाथ मंदिरामध्ये गावातील सर्व मानकरी, ग्रामस्थ आणि सरपंच एकत्र आले होते. या ठिकाणी महसूल आणि भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीने मंगेश तारकर आरोसकर यांच्या जागेसंदर्भात लावण्यात आलेली जमिनीची मोजणी सर्व गावकऱ्यांनी तीव्र विरोध करत आणि प्रशासनाला जाब विचारत पूर्णपणे उधळून लावली. ‘जीव गेला तरी चालेल, पण आपली वडिलोपार्जित जमीन कोणत्याही परप्रांतीय किंवा बाहेरच्या व्यक्तीला कवडीमोल भावाने विकणार नाही’, असा पक्का निर्धार या सभेमध्ये सर्व शिरशिंगेवासीयांनी एकमुखाने केला.

​गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरशिंगे गावातील ३२ एकर हे सामायिक (सामूहिक) क्षेत्र असून त्यावर संपूर्ण गावाचा समहक्क आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही एका व्यक्तीला संमतीशिवाय किंवा धडेवाटप न करता जमिनीचा तुकडा देता येणार नाही. गावातील काही एजंट आणि महसूल विभागातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या या जमिनी काही हजारांत बळकावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे गावात एकीचा नवा इतिहास रचत भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांना जागेवरच मोजणी स्थगितीचा पंचनामा करण्यास भाग पाडण्यात आले.

​याप्रसंगी शिरशिंगे गावाचे सरपंच दीपक शांताराम राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आमच्या पूर्वजांनी जशी सामायिक जमीन एकत्र ठेवली, तशीच ती पुढेही कायम राखण्यासाठी संपूर्ण गावाने एकत्र येऊन या मोजणीला आणि जमीन विक्रीला पूर्ण विरोध केला आहे. जमीन राहिली तरच गाव आणि गावाचे अस्तित्व टिकून राहील, त्यामुळे गावकऱ्यांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. तसेच चुकीच्या पद्धतीने मोजणीचे घाट घालू नका, असा इशारा त्यांनी प्रशासनालाही दिला आहे. गावाच्या या एकजुटीमुळे धनदांडग्यांचे मनसुबे धुळीस मिळाले असून हा शिरशिंगेवासीयांच्या एकीचा मोठा विजय मानला जात आहे.

कोकणातील पारंपरिक आणि नैसर्गिक सजावटीला सोशल मीडियावर पसंती

   Follow us on        

सावंतवाडी: आजकालच्या आधुनिक आणि भपकेबाज सजावटीच्या काळात कोकणातील एका पारंपरिक, नैसर्गिक सजावटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ‘कोकणचा भटक्या’ (kokancha_bhatkya) या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांनी डोक्यावर घेतले असून, त्याला तब्बल ७ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत, तर आता हा आकडा १ मिलियनच्या पार जाण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

​या व्हिडिओमध्ये बांबू आणि विणलेल्या माडाच्या झावळ्यांचा वापर करून अत्यंत देखणी अशी नैसर्गिक सजावट केल्याचे दिसून येत आहे. या सजावटीमध्ये कोकणी संस्कृतीचे प्रतीक फणस देखील लटकवलेले पाहायला मिळत आहे. ही सुंदर  कलाकृती ‘कारीवडे भैरववाडी’ (Kariwade, Bhairavwadi) तील ग्रामस्थांच्या सहकार्यातून दिनांक १४ मे रोजी वाडीतील सत्यनारायण पूजेच्या निमित्ताने ही सजावट साकारण्यात आली आहे. तुषार साईल, रोहन साईल आणि दीपक साईल यांच्यासह स्थानिक गावकऱ्यांनी मिळून ही आकर्षक सजावट केली आहे. “आजकालच्या मॉडर्न डेकोरेशनपेक्षा अशी नैसर्गिक सजावट कशी वाटते?” असा प्रश्न विचारत निसर्गरम्य कोकणची ही कलात्मक बाजू सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात कौतुकाचा विषय ठरत आहे.

 

View this post on Instagram

 

पर्यटकांसाठी महत्वाची बातमी! मालवणमध्ये या तारखेपासून जलपर्यटन आणि वॉटर स्पोर्ट्स पूर्णपणे बंद

   Follow us on        

मालवण (प्रतिनिधी):पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! मालवणमध्ये या तारखेपासून जलपर्यटन आणि वॉटर स्पोर्ट्स पूर्णपणे बंद मालवणमधील यंदाच्या पर्यटन हंगामाचा शेवटचा टप्पा सुरू असून, आगामी पावसाळी कालावधीच्या पार्श्वभूमीवर समुद्रातील संभाव्य धोके लक्षात घेता मालवण बंदर क्षेत्रात सर्व प्रकारची प्रवासी जलवाहतूक आणि व्यावसायिक जलक्रीडा (वॉटर स्पोर्ट्स) प्रकार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र सागरी मंडळाने जारी केले आहेत. हा बंदी आदेश २६ मे २०२६ पासून ते ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत लागू राहणार आहे. मालवणच्या पर्यटनात सागरी व खाडीतील जलपर्यटनाचे मोठे महत्त्व असून दरवर्षी १ सप्टेंबर ते २५ मे असा हा जलपर्यटनाचा अधिकृत हंगाम असतो. सध्या मे महिन्यात या हंगामाचा शेवटचा टप्पा असल्यामुळे महाराष्ट्र सागरी मंडळाच्या मालवण बंदर निरीक्षकांनी अधिकृत पत्र काढून ही बंदी जाहीर केली आहे.

​प्रादेशिक बंदर अधिकारी यांच्या १३ मे २०२६ च्या पत्राचा संदर्भ देऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ‘इनलँड व्हेसल्स ऍक्ट, १९१७’ अंतर्गत नोंदणी असलेल्या सर्व जहाजांना, बोटींना आणि जलवाहनांना या मान्सून काळात सुरक्षेच्या कारणास्तव आपली वाहतूक आणि व्यावसायिक उपक्रम थांबवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. यानुसार २६ मे ते ३१ ऑगस्ट या पावसाळी कालावधीत सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक, सर्व प्रकारच्या जलक्रीडा, नौकाविहार (बोटिंग) आणि स्कुबा डायव्हिंग या सेवा पूर्णपणे बंद राहतील.

​हा आदेश मालवणमधील एकूण ३९ प्रमुख संस्था, गृहनिर्माण व पर्यटन सोसायट्या आणि वैयक्तिक बोट चालकांना थेट बजावण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशन, शिवशक्ती जलपर्यटन संस्था, चिवला जलपर्यटन संस्था, तारकर्ली, देवबाग, दांडी येथील बोटिंग संघटना व वॉटर स्पोर्ट्स संस्था, तसेच स्थानिक स्कुबा डायव्हिंग व्यावसायिक आणि वैयक्तिक बोट मालकांचा समावेश आहे. कोकण किनारपट्टीवर पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. अशा धोकादायक परिस्थितीत पर्यटकांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या जीवाला कोणताही धोका निर्माण होऊ नये, म्हणून दरवर्षी प्रशासनातर्फे ही आवश्यक खबरदारी घेतली जाते.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search