No block ID is set
जळगाव: जळगाव जिल्ह्यातील सुरत-भुसावळ मार्गावर पाळधी येथील स्थानकाजवळ रेल्वे रुळांवर धोकादायक पद्धतीने ‘रील’ (Reel) बनवण्याचा प्रयत्न करत असलेल्या दोन समवयस्क तरुणांचा धावत्या रेल्वेखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.
अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे प्रशांत पवन खैरनार (१८) आणि हर्षवर्धन महेंद्र ननवरे (१८) (दोन्ही रा. महात्मा फुले नगर, पाळधी, जि. जळगाव) अशी आहेत.
रविवारी सुट्टी असल्याने हे दोघे पाळधी स्थानकापासून जवळच असलेल्या पथराड गावाकडील गेटजवळ सकाळी ११ च्या सुमारास रेल्वे मार्गावर उभे राहून रील बनवत होते. त्याच वेळी धरणगावच्या दिशेकडून जळगावकडे जाणारी ‘अहमदाबाद-हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस’ आली.
प्रशांत आणि हर्षवर्धन यांनी कानावर हेडफोन लावलेले असल्याने, रेल्वे रुळांजवळ आलेल्या या वेगातल्या गाडीकडे त्यांचे अजिबात लक्ष नव्हते. यामुळे रेल्वे अगदी जवळ आल्यानंतर त्यांना जीव वाचवण्याची कोणतीही संधी मिळाली नाही आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे पाळधी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. धोकादायक ठिकाणी रील बनवण्याच्या फॅडमुळे तरुणांचे जीव जात असल्याच्या घटना पुन्हा एकदा अधोरेखित झाल्या आहेत.


